Sunday, April 28, 2013

मराठवाडा़ कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 चे उत्‍साहात उदघाटन










आजच्‍या ताणतणावाच्‍या काळात खेळाच्‍या माध्‍यमातुन शरीर व मन हे ताजेतवाने राहाते. खेळाच्‍या स्‍पर्धेतुन विद्यापीठात एक खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्‍यास निश्‍चीतच मदत होणार आहे असे प्रतिपादन मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू, डॉ. किशनरावजी गोरे यांनी मराठवाडा कृषि विद्यापीठामध्‍ये आयोजित कर्मचारी क्रीडा स्‍पर्धा 2013 उदघाटन प्रसंगी केले. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वासरावजी शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, प्रभारी कुलसचिव श्री बी एम गोरे, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, डॉ. सत्‍वधर, प्रा. विशाला पटनम, डॉ. के. टी. आपेट, प्रा. दिलीप मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिनांक 27 ते 29 एप्रील 2013 दरम्‍यान प्रथमच मराठवाडा कृषि विद्यापीठा आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत. मा. डॉ. के. पी. गोरे पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील कर्मचा-याचा दैनंदिन कार्यालयीन कामाचा ताण कमी होण्‍यासाठी या प्रकारच्‍या क्रीडा स्‍पर्धा विद्यापीठात नियमीत आयोजित करण्‍यात याव्‍यात. या क्रीडा स्‍पर्धेमार्फत कर्मचा-यातुन विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी विविध खेळाचे प्रशिक्षक निर्माण होतील असी अपेक्षा व्‍यक्‍त केली.
याप्रसंगी मा कुलगुरूच्‍या हस्‍ते क्रीडाज्‍योत प्रज्‍वलीत करून उदघाटन करण्‍यात आले. या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वासरावजी शिंदे यांनी आपल्‍या भाषणात सांगीतले की, जीवनामध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास गरजेचा आहे आणि यासाठी खेळाच्‍या माध्‍यमातुन आपण प्रतिकुल परि‍स्थितीस तोंड देण्‍याचे बळ आपणास मिळते. या क्रीडा स्‍पर्धेमुळे विद्यापीठ कर्मचा-यामध्‍ये चैतन्‍य व प्रेरणा निमार्ण होईल. कृषि महाविद्यालय, लातुरचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक क्रीडा स्‍पर्धेचे कार्याध्‍यक्ष डॉ. महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. विणा भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एच. व्‍ही. काळपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी क्रीडा स्‍पर्धेच्‍या आयोजन समितीचे अध्‍यक्ष डॉ. अनिल गोरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या क्रीडा स्‍पर्धेत क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, कॅरम, रस्‍सीखेच, बुध्‍दीबळ, आदी क्रीडा प्रकाराचा समावेश असून यामध्‍ये मोठया प्रमाणात विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला आहे.  या स्पर्धेनिमित्त प्रदर्शनी सामान्य दरम्यान जमा होणाऱ्या नोंदणी फिसचा काही भाग हा दुष्काळग्रस्त निवारणासाठी देण्यात येणार आहे.  

Tuesday, April 16, 2013

कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिगंध वार्षिक अंकाचे विमोचन


दि. 14-04-2013 रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिगंध वार्षिक अंकाचे विमोचन प्रसिध्‍द विचारवंत प्रा. हरी नरके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले त्‍यावेळी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ. डि. बी. देवसरकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार जिमखाना उपाध्‍यक्ष तथा मृदविज्ञान व रसायनशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी हा वार्षिक अंक संपादित केला असुन त्‍यांना श्री अमोल सोनकांबळे, डॉ सुरेश वार्डकर, डॉ प्रशांत देशमुख, डॉ महेश देशमुख, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ अनिस कांबळे व डॉ धीरज कदम यांनी सहकार्य केले. या वार्षिक अंकात प्राध्यापकवृंद व विद्यार्थी लिखित वाचनीय असे कविता, लेख आदिंचा समावेश आहे.  

Monday, April 15, 2013

भविष्‍यातील आव्‍हाने पेलण्‍यासाठी फुले व आंबेडकरांचे विचार उपयुक्‍त : प्रा. हरी नरके



स्‍त्री पुरूष समानता, जाती निर्मुलन, संसाधनाचे फेरवाटप, धर्म चिकीत्‍सा, सर्वांसाठी शिक्षण व आंतरजातीय विवाह ही सूत्रे राष्‍ट्राच्‍या उभारणेत मोलाचे मार्गदर्शक असल्‍याचे महात्‍मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्‍या विचारातून स्‍पष्‍ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक खात्‍याचे मंत्री म्‍हणुन काम पाहिले त्‍यात उर्जा व पाटबंधारे मंत्री असतांना देशातील पहिल्‍या पंधरा धरणांची पायाभरणी त्‍यांच्‍या काळात झाली. देशाला 2000 साली जल आणि उर्जेच्‍या मागणीचे गणित त्‍यांनी सन 1945 सालीच मांडले. त्‍यांची जल नियोजनाची रचना व मांडणी आजही आपणास मार्गदर्शक आहे. सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे घटना लिहीणारे डॉ. आंबेडकरांनी स्‍वातंत्र्य, समता व बंधुता याला महत्‍व दिले. ज्‍या ठिकाणी स्‍वातंत्र, समता व बंधुत्‍व असते त्‍याच ठिकाणी सर्व सामान्‍यांना न्‍याय मिळू शकतो असे त्‍यांचे मत होते असे प्रतिपादन प्रा.हरी नरके यांनी आपल्‍या भाषणात केले.
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 122 व्‍या जयंती निमित्‍त मराठवाडा कृषि विद्यापीठात दि. 14-04-2013 रोजी पुणे येथील प्रसिध्‍द विचारवंत प्रा. हरी नरके यांचे फुले आंबेडकर यांचे विचार या विषयावर व्‍याख्‍यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुलसचिव डॉ. डि. बी. देवसरकर, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. हरी नरके पुढे म्‍हणाले की, 1938 मध्‍ये कुटूंब नियोजनाची संकल्‍पना डॉ. आंबेडकरांनी मांडली. कुटूंब नियोजन हे सक्‍तीचे करण्‍याचा पुरस्‍कार त्‍यांनी केला. विद्यार्थ्‍यांना शेतीचे शिक्षण सक्‍तीचे असावे असे त्‍यांचे मत होते. तसेच त्‍यांनी महिला सक्षमीकरणाचाही पुरस्‍कार केला. 71 टक्‍के स्त्रिया शेतामध्‍ये राबतात परंतु 97 टक्‍के जमीन ही पुरुषांच्‍याच नावे आहे. तसेच 93 टक्‍के घरे ही पुरुषांच्‍या नावे असून आजही स्त्रिया समाजात दुर्लक्षीत घटक आहेत. स्‍त्री-पुरुष समानतेसाठी फुले व आंबेडकरांचे विचार महत्‍वाचे आहेत. जाती व्‍यवस्‍था हे कामाचे वाटप नसून काम करणा-यांचे वाटप आहे. हा जाती-जातीचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी महात्‍मा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजासाठी महत्‍वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्‍या घटनेमध्‍ये आम्‍ही भारताचे लोक या वाक्‍यापासून सुरूवात केलेली आहे. कारण लोकशाहीमध्‍ये सामान्‍य जनताच सार्वभौम असते असे त्‍यांचे मत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मर्यादीत वर्गांचे नेते संबोधने म्‍हणजे त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व लहान करण्‍यासारखे आहे असे विचार प्रा. हरी नरके यांनी आपल्‍या व्‍याख्‍यानात मांडले.
     प्रा. हरी नरके म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या समस्‍येची जाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा फुले यांना चांगलीच होती. डॉ. आंबेडकरांनी भारतातील जमीनीची विभागणी व त्‍यावरील मार्ग या आपल्‍या शोध निबंधात शेतीचे तुकडीकरण यावर प्रकाश टाकला आहे. शेती किफायतशीर करण्‍यासाठी शेतीवरील बोजा कमी करणे गरजेचे आहे व शेतीला जोडधंद्याची साथ देणे व नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या शोध निबंधात मांडले आहे. तसेच महात्‍मा फुले यांनी शेतक-यांचा असूड या पुस्‍तकात शेतक-यांची परिस्थिती यावर प्रकाश टाकला आहे. शेतक-याचा लागवडीचा खर्च सुध्‍दा निघत नाही त्‍यांचे गणित या पुस्‍तकात मांडले आहे. तलाव, तळे व जलसंधारण यांचे महत्‍व त्‍यांनी त्या काळात मांडले आहे. भारतीय कृषि अर्थशास्‍त्राचा पाया महात्‍मा फुले यांनी रचला तर त्‍याची सखोल मांडणी डॉ. बाबासाहेबांनी केली. डॉ. आंबेडकर व महात्‍मा फुले यांनी त्‍या काळातच स्‍पष्‍ट केले होते की, आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेती केली तरच शेतकरी यशस्‍वी होतील.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, कोरडवाहु शेती यशस्‍वी करावयाची असेल तर जोडधंदे, प्रक्रिया उद्योग व मूल्‍यवर्धीत उद्योग याचा विकास करावा लागेल. जमीन, वीज व जल यांचे समान वाटप होणे आवश्‍यक आहे. नदी जोड प्रकल्‍प ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली संकल्‍पना आज उपयुक्‍त वाटते. भविष्‍यात यांत्रीकीकरण करावे लागणार असून त्‍याबाबत शेतक-यांनी प्रशिक्षण घ्‍यावे. असे त्‍यांचे मत होते. महात्‍मा फुले यांनी शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शन यांचे आयोजन करावे, यशस्‍वी शेतक-यांचा सत्‍कार करुन त्‍यांना प्रोत्‍साहन दिल्‍यास शेतीमधील तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होईल असे मत मांडले होते असे सांगीतले. त्‍या दृष्‍टीने काळाची गरज ओळखुन डॉ. आंबेडकर व महात्‍मा फुले यांच्‍या आर्थीक व कृषि क्षेत्रातील विचारांचा प्रसार व प्रसार करणे गरजेंचे आहे. त्‍यांच्‍या विचारांचा अभ्‍यास कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांनी करावा असे आवाहन त्‍यांनी केले.
     कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्‍यापक, कर्मचारी व नागरीका मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एच. व्‍ही. काळपांडे तर आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. के. टी. आपेट यांनी केले. 

Friday, April 12, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात प्रसिध्‍द विचारवंत प्रा. हरी नरके यांचे व्‍याख्‍यान

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 122 व्‍या जयंती निमित्‍त मराठवाडा कृषि विद्यापीठात दि. 14-04-2013 रोजी सकाळी 10.00 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात पुणे येथील प्रसिध्‍द विचारवंत प्रा. हरी नरके यांचे फुले आंबेडकर यांचे विचार या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे राहणार असून शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वासरावजी शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोकजी ढवण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास जास्‍तीत जास्‍त संख्‍येने विद्यार्थी, प्राध्‍यापक, कर्मचारी व नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्‍यात आले आहे. 

Thursday, April 11, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती साजरी


महात्‍मा फुले कृषि शिक्षणाचे महत्‍व जाणनारे आद्य समाजसुधारक होते. त्‍यांनी त्‍याकाळात मांडलेले कृषि विषयक व जल संधारणाचे विचार आज हि उपयुक्‍त आहेत असे प्रतिपादन मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी केले. मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महावि़द्यालयाच्‍यावतीने महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती साजरी करण्‍यात आली. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्रार्चाय डॉ एन डी पवार यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्‍हणाले कि, परदेशात जाउन शिक्षण घेण्‍याचा पुरस्‍कार त्‍याकाळात त्‍यांनी केला. शेतक-याचा आसूड यासारखी पुस्‍तके लिहुन शेतक-याच्‍या समस्‍या समाजापुढे मांडल्‍या. त्यांच्या विचारांची आजही समाजास गरज आहे. 
याप्रसंगी महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या प्रतीमेचे मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते पुजन करण्‍यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अवचित्‍य साधुन महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यान मध्‍ये आंबडेकराची वाचन संस्‍कृती जोपासनासाठी १८  तास अभ्‍यासाच्‍या उपक्रमास प्रारंभ करण्‍यात आला. यामध्‍ये महाविद्यालयाच्‍या ५५०  विद्यार्थ्‍यानी सहभाग घेतला. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ विलास पाटिल, डॉ वाघमारे, डॉ एच व्‍ही काळबांडे, डॉ जे पी जगताप, डॉ विशाल अवसरमल, डॉ ए बी बगाटे व विद्यापीठातील प्राध्‍यापकवर्ग, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री आवडे यांनी तर आभार रत्‍नदिप लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मोरे, आशिष भराडे, हार्णेसह इतर सर्व विद्यार्थ्‍यानी परिश्रम घेतले.
.

Tuesday, April 9, 2013

रमाकांत कारेगांवकर याची राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड




       मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरात उत्कृष्ट कार्याबाबत रमाकांत कारेगांवकर याची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्य विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शेर-ए-काश्मिर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ (जम्‍मु) चे माजी कुलगूरू तथा कृषी विज्ञान राष्ट्रीय अकॅडमीचे सचिव  मा डॉ अन्‍वर आलमस्‍वामी विवेकानंद तंत्रज्ञान विद्यापीठ (भिलाई) चे कुलगूरू डॉ बी सी मलभारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहायक महासंचालक तथा फरिदाबाद येथील एस्‍कॉर्ड लिमीटेडचे सल्‍लागार मा डॉ एस के टंडनदापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू डॉ शंकरराव मगरडॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा डॉ व्‍ही एम मायंदेनवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ संघटनेचे सचिव मा डॉ आर पी सिंग, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ अशोक कडाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा रवींद्र शिंदे, प्रा संजय पवार, प्रा सुमंत जाधव, प्रा सुभाष विखे, सौ प्रमोदिनी मोरे उपस्थित होते. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातशेततळ्याच्या मातीचे अस्तरीकरण, पाणी अडविणे व पाणी जिरविणे याचे प्रात्यक्षिक, परिसर स्वच्छता, रक्तदान, योगासने व प्राणायाम, महिला स्व-सुरक्षा, व्यसन मुक्ती आदी उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रम मध्ये  रमाकांत कारेगांवकर याने सक्रिय सहभाग घेऊन एक उत्कृष्ट स्वयंसेवकाचे कार्य केले यानिमित्ये त्याची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. 

Saturday, April 6, 2013

हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेच्‍या शास्त्रज्ञांचा मराठवाडा विभागातील दुष्‍काळ भागाचा पाहणी दौरा


नवी दिल्‍ली ये‍‍थील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या महासंचालक मा डॉ एस अय्यप्पन यांच्‍या सूचनेनूसार मराठवाडा विभागातील कमी पाउस झाल्‍यामुळे दुष्‍काळी परिस्थितीचा पाहणी करून त्‍यावर दिर्घकालीन व लघुकालीन उपाय योजनेचा अभ्‍यासाकरीता तज्ञ मंडळीचा समावेश असलेल्‍या पथकांनी दि 02 ते 5 एप्रिल दरम्‍यान जालना, औरंगाबाद व बीड दौरा केला. या पाहणी पथकात हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍था, बारामती येथील राष्ट्रिय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍था, वासद (गुजरात) येथील केंद्रिय जल व मृद संधारण संस्‍था व मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ तसेच कृषि विभागातील अधिकारी वर्ग यांचा समावेश होता. सदरील शास्‍त्रज्ञाच्‍या चमुची मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दि 05 एप्रिल रोजी बैठक संपन्‍न झाली यात दुष्‍काळी सद्य परिस्थितीच्‍या व भविष्‍यात करावयाच्‍या दिर्घकालीन उपाय योजनांबददल सविस्‍तर चर्चा झाली. या बैठकीस विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, संशोधक संचालक डॉ गोवर्धन खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाहणीसाठी तीन चमु करण्‍यात आले होते त्‍याच्‍या दौ-यातील निर्दशनास आलेल्‍या बाबींवर सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. बीड, औरंगाबाद जिल्‍हातील पैठण, औरंगाबाद तालुके, जालना जिल्‍हातील अंबड, घनसावंगी आदी तालुक्‍यातील बहुतांश फळबागा पाण्‍या अभावी वाळल्‍या आहेत. तसेच भुगर्भातील पाण्‍याची पातळी सर्वसाधारण क्षमतेपेक्षा 2.5 ते 5 मीटर खोलीपर्यत खोल गेली असुन बहुतांशी विहीरी व तलाव कोरडे पडलेले आहेत. या भागातील पिण्‍याच्‍या पाण्‍याची व जनावरांसाठी पाण्‍याची तीव्र टंचाइ निमार्ण झाली आहे असे पाहणीत प्रकर्षाने निर्दशनास आले. ज्‍या भागात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झालेली आहेत व पावसाच्‍या पाण्‍याचे साठवण व पुर्नवापर, विहीर पुर्नभरण अशा प्रकारची कामे झालेली आहेत अश्‍या भागात दुष्‍काळाची तीव्रता कमी जाणवत आहे म्‍हणजेच पाणलोट क्षेत्र विकासाची कामे विस्‍तृत प्रमाणात आणि शास्‍त्रीय पध्‍दतीने केल्‍यास दुष्‍काळावर काही प्रमाणात मात करता येते. ज्‍या भागात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली नाहीत त्‍या भागात दुष्‍काळाची तीव्रता जास्‍त होती. या दुष्‍काळी परीस्थितीमुळे मृद व जल संधारणाच्‍या कामाची गरज पुन्‍हा एकदा अधोरेखित झाली आहे असे मत शास्‍त्रज्ञानी चर्चे दरम्‍यान व्‍यक्‍त केले. तसेच मराठवाडा विभागातील फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाने शिफारस केल्‍याप्रमाणे ठिंबक सिंचन पध्‍दतीचा अवलंब, सेंद्रिय व प्‍लॉस्‍टीक आच्‍छादनांचा वापर, पाणी धरून ठेवणा-या हायड्राजेल वापर, झाडांच्‍या फांद्या कमी करणे, 6 टक्‍के द्रावणाचा केओलीनचा वापर आदी बाबींचा उपयोग होतो. तसेच पिक पध्‍दतीमध्‍ये बदल करून जनावरांसाठी चारा उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्टिने ज्‍वार पिक आधारीत पिक पध्‍दतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. भविष्‍यात फळबाग लागवडीसाठी जमिनीची खोलीचा विचार करूनच फळबागांची लागवड करण्‍याचा सल्‍ला दिला. कमी खोलीच्‍या जमिनीमध्‍ये तुलनेने पाण्‍याची कमी गरज असलेल्‍या डाळींब व सिताफळ यांचा मोंसबीला भविष्‍यात चांगला पर्याय ठरू शकेल असे मत शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केले. मा कुलगुरू यांनी आपल्‍या मार्गदर्शनात सांगितले की, हवामान बदलाचा विचार करून दीर्घकालीन उपाय योजनेवर भर देणे गरजेचे असुन लहान शेतक-यांनी कृषि संलग्‍न जोडधंद्ये करणे गरजेचे आहे. नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा -हास होत आहे, पाणी व माती या नैसर्गिक साधनसंपत्‍तीचा योग्‍य वापर करणे गरजेचे आहे. हवामान बदलातही शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पिकांच्‍या जाती विकसित करण्‍यावर संशोधनात भर दयावा. एकात्मिक शेती पध्‍दतीचा शेतक-यांनी अवलंब करावा असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
      सदरील दुष्‍काळी भागाची पाहणी करणा-या पथकामध्‍ये हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेचे डॉ मोहमद उस्‍मान, डॉ एस देसाइ, डॉ सामी रेडडी, डॉ मनोरंजन कुमार, डॉ एस एस बलोली, डॉ व्‍ही के राव, डॉ डी बी व्हि रमना, डॉ पी के पंकज, डॉ आर व्‍ही अडके, तसेच बारामती येथील राष्ट्रिय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे डॉ एन पी सिंग, डॉ जगदीश राना, डॉ एस के बल आणि वासद (गुजरात) येथील केंद्रिय जल व मृद संधारण संस्‍थेचे डॉ आर एस कुरोठे, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे अखिल भारतीय कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पाचे शास्‍त्रज्ञ डॉ वा नी नारखेडे, कृषि अभियंता डॉ मदन पेंडके, वनस्‍पती पैदासकार डॉ एस बी चौलवार तसेच कृषि विभागातील विभागीय कृषि अधिकारी श्री एस आर सरदार, बीड, औरंगाबाद व जालना येथील जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री यु आर घाटगे, श्री व्हि बी जोशी, कृषि विज्ञान केंद्राचे समन्‍वयक डॉ राकेश अहिरे (औरंगाबाद), श्री यु एन फाटक (खामगांव), श्री सोनवणे (खरपुडी), विस्‍तार विस्‍तार कृषिविद्यावेत्‍ता श्री ए व्‍ही गुटटे, डॉ एस बी पवार आदीचा या पाहणी पथकात समावेश होता.