Thursday, March 27, 2014

राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते त्‍याप्रसंगी प्राचार्य डॉ उदय खोडके, श्री. दिवाकर काकडेप्रा. रविंद्र शिंदे, प्रा. विजय जाधव, प्रा. अनिश कांबळे व प्रा. सोळंके, प्रा. गुळभिळे आदी.
............................................................

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष शिबीरातंर्गत रक्‍तदान शिबीराचे आयोजन दिनांक 24 मार्च रोजी करण्‍यात आले होते. या रक्‍तदान शिबीराचे उदघाटन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ उदय खोडके यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या प्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना डॉ उदय खोडके म्‍हणाले की, राष्ट्रिय सेवा योजनामुळे स्‍वयंसेवकांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाची जडणघडण व पायाभरणी होत असते. समाजोपयोगी अनेक कार्यामध्‍ये युवकांना कर्तव्‍याची जाणीव म्‍हणुन रक्‍तदान शिबीरात सहभाग महत्‍वाचा आहे. जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालायातील रक्‍तपिढी विभागातील श्री. देशमुख यांनी एका व्‍यक्तिच्‍या रक्‍तदानातून चार व्‍यक्तिंचे जीवन वाचवता येऊ शकतात असे सांगीतले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे, प्रा. विजय जाधव, प्रा. अनिश कांबळे व प्रा. सोळंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवक दिनेश जगताप, मयुरी काळे, सचिन नावकर, उमेश राजपूत, योगेश निलवर्ण, स्‍नेहा कदम, अभय भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

Wednesday, March 26, 2014

महाराष्‍ट्रातील गारपीटग्रस्‍त शेतक-यांच्‍या मदतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-या तर्फे एक दिवसाचे वेतन

      महाराष्‍ट्रात झालेल्‍या अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतक-यांचे जवळपास 15 लाख हेक्‍टर जमीनीवरील उभी पिके, फळबागा तसेच जनावरे व घरे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्‍यांच्‍या मदतीला थोडासा हातभार लागावा व शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ह्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कर्मचारी संघाने एक दिवसाचे वेतन देण्‍याचा निर्णय बैठकीत घेण्‍यात आला. बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी मकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे हे होते तर उपाध्‍यक्ष श्री प्रदीप कदम, जि. बी. शिंदे, सरचिटणीस डी. टी. पवार, सहसचिव एकनाथराव कदम, प्रा. रमेश देशमुख, प्रा. जनार्धन कातकडे, श्री कृष्‍णा जावळे, सुभाष जगताप, पी. जी. जाधव, श्रीराम घागरमाळे, मधुकर ढगे, प्रा. भानुदास पाटील आदी कार्यकारणी सदस्‍य उपस्थित होते.
      मकृवि कर्मचारी संघाचे शिष्‍टमंडळ अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे ह्यांच्‍या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेशरलु यांची भेट घेऊन एक दिवसाचे वेतन कपात करुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस धनादेश देण्‍यात यावे, ही विनंती निवेदनाद्वारे करण्‍यात आली. मा.कुलगुरु यांनी ह्या उपक्रमाबाबत सर्व कर्मचा-यांचे अभिनंदन केले. 

शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त तंत्रज्ञानाचा प्रात्‍यक्षिकात समावेश करावा.... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु. 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर. 
*******************************************
कृषि विज्ञान केंद्राने विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानासोबतच या भागातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त व अनुकूल देशात ईतरत्र उपलब्‍ध असलेल्‍या तंत्रज्ञानाचे प्रात्‍यक्षिकात समावेश करून त्‍याचा प्रसार करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने आयोजित दोन दिवशीय (दिनांक 25 व 26 मार्च रोजी) कार्यशाळेच्‍या उद्घाटन ते प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर हे उपस्थित होते तर मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के. दत्‍तात्री, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा विभागात एकरा कृषि विज्ञान केंद्राच्‍या 2014-15 साठीच्‍या वार्षिक कृती आराखडा निश्चित करण्‍यासाठी हया कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.
मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, शेतक-यांच्‍या विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा असुन त्‍यापुर्ण करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. नैसर्गीक संकटाचा सामाना करण्‍यासाठी शेतक-यांना शास्‍त्राज्ञांनी मार्गदर्शन करावे. शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी एसएमएस व मोबाईल सेवांचा वापर करण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला.
विभागीय प्रकल्‍प संचालक डॉ. एन. सुधाकर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विज्ञान केंद्राची विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचे शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिक घेऊन शेतक-यांच्‍या परिस्थितीनुसार त्‍यात बदल करण्‍याची महत्‍वाची भुमिका पार पाडत आहे, त्‍याचबरोबर ग्रामीण युवकांसाठी कृषी संलग्‍न उद्योग उभे करण्‍यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.
प्रास्‍ताविकात डॉ. अशोक ढवण यांनी कृषि विस्‍तारात कृषि विज्ञान केंद्राची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश आहिरे यांनी केले. या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक व विषय तज्ञासह विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी सहभागी झाले आहेत. 

परिपुर्ण व्‍यक्‍ती घडविण्‍याचे कार्य कृषि महाविद्यालय करित आहे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांना निरोप
कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, डॉ. विश्‍वास शिंदे, डॉ. डि.बी. देवसरकर, डॉ. बी.बी.भोसले, डॉ. विलास पाटील आदी.
निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक  डॉ. विश्‍वास शिंदेडॉ. डि. बी. देवसरकरडॉ. बी. बी. भोसलेडॉ. विलास पाटील आदी.
कृषि महाविद्यालयाच्‍या अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू, डॉ. विश्‍वास शिंदे, डॉ. डि.बी. देवसरकर, डॉ. बी.बी.भोसले, डॉ. विलास पाटील आदी.
**********************************
करियर व रोजगार संधीच्‍या दृष्टिने वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्‍या तुलनेत कृषि शिक्षण कोठेही कमी नसुन परिपुर्ण व्‍यक्‍ती घडविण्‍याचे कार्य कृषि महाविद्यालय करीत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या जिमखानाच्‍या वतीने दि. 25 मार्च रोजी आयोजित अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या निरोप समारंभाच्‍या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे होते तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, निम्‍न शिक्षणाचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर व जिमखानाचे उपाध्‍यक्ष डॉ. विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि पदवीधरांना सध्‍या मोठया संधी उपलब्‍ध होत असुन विद्यापीठात मोठया कंपन्‍या परिसर मुलाखती मार्फत मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांना नौकरीच्‍या संधी प्राप्‍त करून देत आहेत. देशात पातळीवरील कनिष्‍ठ संशोधन फेलोशीप परिक्षेतील विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांच्‍या यशाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी अधिक प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे म्‍हणाले की, शेती क्षेत्रापुढे अनेक आव्‍हाने आहेत, या क्षेत्रात कृषि पदवीधरांनी अधिकाधिक योगदान देणे गरजेचे आहे. कृषि शिक्षण हे कला, विज्ञान व अभियांत्रिकी ज्ञानाचा संगम असुन जीवन जगण्‍यासाठी आवश्‍यक गोष्‍टी महाविद्यालयात विद्यार्थ्‍यांना शिकायला मिळतात, त्‍याचा उपयोग विद्यार्थ्‍यीनी करावा.
सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महाविद्यालय हे ज्ञान मंदिर असुन त्‍यांचे पावित्र्य  विद्यार्थ्‍यानी जपले पाहिजे. कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी कोणत्‍याही क्षेत्रात कार्य क‍रीत असले तरी विद्यापीठाशी असलेली नाळ तोडत नाहीत. महाविद्यालयीन चार वर्षे हे आयुष्‍याला वळण देणारी असतात. जिमखाना उपाध्‍याक्ष डॉ विलास पाटील म्‍हणाले की, महाविद्यालय तर्फे आयोजित विविध व्‍यक्‍तीमत्‍व विकासाच्‍या उपक्रमाचा विद्यार्थ्‍यां मोठा फायदा होतांना दिसत असुन प्रत्‍येक क्षेत्रात कृषि पदवीधर यशस्‍वीरिता कार्य करित आहे.
कार्यक्रमात अंतिम सत्राचे विद्यार्थ्‍यी तुकाराम मंत्री, गजानन मोंगल, ज्‍योती खुपसे आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण तिडके, नितीन थोरात, गौरी दिक्षित व प्रिती भालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सहाव्‍या सत्राच्‍या‍ विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

निरोप समारंभात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे

Tuesday, March 25, 2014

एल पी पी स्‍कुलच्‍या विद्यार्थ्‍यांचा पाचवा दिक्षांत समारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातील एल पी पी स्‍कुलच्‍या ब्रिज सेक्‍शनच्‍या विद्यार्थ्‍यांचा पाचवा दिक्षांत समारंभ दि 27 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे व महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

Monday, March 24, 2014

गारपिटग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वगभुमीवर औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन


औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 23 मार्च रोजी गारपिटग्रस्‍त परिस्थितीच्‍या पार्श्‍वभुमीवर शेतकरी-शास्‍त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. संवाद कार्यक्रमाचे उद् घाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु याच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. श्री. एच. एम. देसरडा, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यापीठाचे माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोविंद जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी उदय देवळाणकर व आत्‍माचे श्री. सतिष शिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, देशात गतवर्षी पाऊस ब-यापैकी पडला, परंतु पडणारे पाणी अडविण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. राजस्‍थानसारख्‍या राज्‍यात काही भागात खुप कमी पाऊस पडतो, परंतु तेथील शेतकरी कधीच खचुन जात नाही, तंत्रज्ञानाच्‍या जोडीने सुधारीत शेतीची कास त्‍यांनी धरली आहे. गारपीटग्रस्‍तांना दिलासा देण्‍याचा कार्य विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञांमार्फत सुरू असुन गार‍पीटग्रस्‍त शेतक-यांनी खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे. नैसर्गिक आपत्‍तीचा अंदाज करणे शक्‍य नाही, शेतकरी जोखीम घेऊन शेती करतात, त्‍याप्रमाणे अधिक उत्‍पादनाची रास्‍त अपेक्षा त्‍यांची असते. परंतु काही नैसर्गिक आपत्‍तीमुळे उत्‍पादनात घट झाल्‍यास आत्‍महत्‍यासारख्‍या मार्गांचा अवलंब करू नये. कोणतीही आपत्‍तीही नवीन काही शिकवित असते, संध्‍याकाळ नंतर पहाट उगवतेच. विद्यापीठ हवामान बदलाचा विचार करून पीक पध्‍दतीवर व तंत्रज्ञान संशोधनावर अधिक भर देणार आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा म्‍हणाले की, सकळ राष्‍ट्रीय उत्‍पादनात शेतक-यांचा लाभाचा हिस्‍सा केवळ 10 टक्‍केच असुन शेतक-यांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. शेती विकासात अधिक गुंतवणुक करणे गरजेचे आहे.
माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. गोंविद जाधव म्‍हणाले की, आजच्‍या परिस्थितीत शेती संबंधी मिळणा-या सुविधांचा व योजनांचा शेतक-यांना त्‍वरीत लाभ मिळवुन देणे अत्‍यंत गरजेचे आहे. शेतकरी कुटुंब प्रामुख्‍याने अशा वेगळया मार्गाने जाऊन जीवन संपविणे हे कुटुंबाच्‍या दृष्‍टीने खुप घातक असुन अशा संकटाच्‍या वेळी कुटुंबातील सर्व सदस्‍याने एकमेकांशी सूसंवाद केला पाहिजे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, गार‍पीटीमुळे मराठवाडयातील शेतक-यांचे भरून न काढता येणारे अतोनात नुकसान झाले असुन शेतक-यांनी या संकटाला न घाबरता मोठया धैर्याने तोंड दयावे. या आपत्‍कालीन परिस्थितीत सर्वांनी एकत्र येवुन मुकाबला केला पाहीजे.
कार्यक्रमात सध्‍याच्‍या परिस्थितीत मोसंबी, आंबा, डाळींब, द्राक्ष आदी फळपिकांच्‍या संगोपनाविषयी बदनापुर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील व औरंगाबाद फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ टी बी तांबे यांनी उपस्थितीत शेतक-यांना विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ एस बी पवार यांनी केले. यावेळी उपस्थित शेतक-यांनी कुलगुरू व शास्‍त्रज्ञांनी संवाद साधला. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, March 20, 2014

मातापित्‍याची सेवा हीच ईश्‍वर सेवा – प्रसिध्‍द ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ

रायपूर येथे वनामक़ृविच्‍या रासेयो विशेष शिबीरात प्रतिपादन 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत राष्‍ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीराचे आयोजन कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने रायपूर येथे  करण्‍यात आले असुन विशेष शिबीराचे उदघाटन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ.बी.बी.भोसले यांच्‍या हस्‍ते दि. 18 मार्च रोजी झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रसिध्‍द ग्रामीण कथाकथनकार व हास्‍यकवी राजेंद्र गहाळ हे उपस्थित होते तर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, विदयार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख व पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      राजेंद्र गहाळ म्‍हणाले की, मातापित्‍याची सेवा हीच ईश्‍वर सेवा असून त्‍यांची विद्यार्थ्‍यांनी जाणीव आयुष्‍यभर ठेवली पाहीजे, जीवनात यश प्राप्‍तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याया नाही. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्‍हणाले की, रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी या शिबीरांत ग्रामीण जीवनाचा व समस्‍यांचा अभ्‍यास करावा, भविष्‍यात कृषि पदविधरांना ग्राम विकासात योगदान देतांना या अनुभवाचा निश्चितच फायदा होणार आहे. तसेच प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी उपस्थित ग्रामस्‍थांना शिक्षणाचे तर विदयार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून दिले.
      विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे व स्‍वयंसेवक दिनेश भोसले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र शिंदे यांनी स्‍वयंसेवकांना राष्‍ट्रीय सेवा योजनेची शपथ दिली तर कार्यक्रम अधिकारी श्री. अनिस कांबळे यांनी रासेयोच्‍या विशेष शिबीराची रुपरेषा विशद केली. विशेष शिबीरासाठी विविध महाविदयालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. व्हि.बी. जाधव व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. या सात दिवशीय विशेष शिबीरात व्‍यसनमुक्‍ती, अंधश्रध्‍दा निर्मुलन, रक्‍तदान शिबीर, ग्रामविकास, कृषि मेळावा, ग्रामीण स्‍वच्‍छता आदी विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. 
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिता देशमूख व राजेंद्र पवार यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.व्हि.बी. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी दिनेश जगताप, शिवराज भांगे, सचिन नावकर, किरण दांगडे, योगेश निलवर्ण, देवकन्‍या स्‍वामी, स्‍वाती अमले, ज्‍योती खुपसे, मयुरी काळे, सागर झावरे, राजेश शिराळे यांच्‍यासह रासेयोच्‍या विविध महाविदयालयातील सर्व स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवीका यांनी परिश्रम घेतले.

Wednesday, March 12, 2014

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या सौर फवारणी सयंत्रास प्रग्‍या 2014 मध्‍ये प्रथम पारितोषिक


राष्ट्रिय स्‍तरावरील अभियांत्रिकी स्‍पर्धा टेकनिकॅल फिस्‍टा प्रग्‍या 2014 चे आयोजन नांदेड येथील श्री गुरूगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्‍थेतर्फे दिनांक 7 ते 9 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यीनी विकसित केलेल्‍या सौर फवारणी सयंत्राने कृषि टेक गटात प्रथम पारितोषिक प्राप्‍त केले. हा प्रकल्‍प रोशनकुमार, अंकितकुमार, काजल भताने, नुतन नाईक व आनंदा हांडे या विद्यार्थ्‍यानी प्रा. संजय पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. समारोपाच्‍या दिवशी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ट्रॅाफी, प्रशस्‍तीपत्र व रोख रक्‍कम विद्यार्थ्‍यांना प्रदान करण्‍यात आले. या निमित्‍त महाविद्यालयाचे सहयोगी अधि‍ष्‍ठाता डॉ उदय खोडके व विभाग प्रमुख प्रा विवेकांनद भोसले यांनी प्रा संजय पवार व विद्यार्थ्‍याचे अभिनंदन केले. 

Tuesday, March 11, 2014

येत्‍या दोन दिवसात वादळी वा-यासह काही-काही ठिकाणी पावसाची शक्‍यता

लक्षव्‍दीप ते मध्‍य-उत्‍तर कर्नाटक या भुप्रदेशावर 900 मीटर उंचीवर वा-याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असुन अरबी समुद्रात मध्‍यभागात व दक्षिण गुजराथ भुप्रदेशावर भुपृष्‍ठापासुन दीड किलोमीटर उंचीवर वा-याची द्रोणीय स्थिती आहे. यास्‍तरात हवेतील आर्द्रता अधिक असुन वा-याचा वेग अधिक राहणार आहे. याचा परिणाम म्‍हणुन येत्‍या दोन दिवसात आकाश ढगाळ राहुन वादळी वा-यासह मराठवाडयातील सर्व जिल्‍हयात तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे, अशी अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि हवामानशास्त्र विभागाच्‍या ग्रामिण कृषि मौसम सेवाचे मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांनी दिली.  उस्‍मानाबाद, लातुर, नांदेड व हिंगोली जिल्‍हयात तुरळक ठिकाणी हलकी ते मध्‍यम सवरूपाच्‍या गारांचा पाऊस पडण्‍याची शक्‍यता असुन शुक्रवार नंतर हवामान स्‍वच्‍छ होऊन अवकाळी पाऊस व गारपीट याची तीव्रता कमी होण्‍याची शक्‍यता असल्‍याचा अंदाज त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Saturday, March 8, 2014

विद्यापीठ कर्मचारी क्रीडास्पर्धा 2014 चे शानदार उदघाटन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत कार्यरत असलेल्‍या सर्व महिला व पुरूष अधिकारी व कर्मचारी यांच्‍या विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्‍पर्धे 2014’ चे आयोजन दिनांक 8 ते 10 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले असुन दि 8 मार्च रोजी परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले यांच्‍या हस्‍ते मशाल पेठवुन स्‍पर्धेचे उदघाटन करण्‍यात आले. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख व विभाग प्रमुख डॉ बी व्‍ही आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्‍पर्धेचे उदघाटक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, कर्मचा-याच्‍या सर्वांगीण विकासाकरिता याप्रकारच्‍या खेळांचे आयोजन आवश्यक असुन कर्मचा-यावरील कार्यलयीन दैनंदिन कामाचा ताण यामुळे कमी करण्‍यास मदत होते. 
    कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. शाहु चौहान यांनी तर आभार प्रदर्शन डॉ आशाताई देशमुख यांनी केले. या क्रीडास्‍पर्धेत हॉलीबॉल, टेबल टेनीस, बॅडमिंटन, टेनिस बॉल क्रिकेट, कबड्डी, बुध्‍दीबळ, कॅरम, रांगोळी स्‍पर्धा आदी विविध खेळांचा समावेश असुन विविध समित्‍याचे गठण करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम दिनांक 10 मार्च रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

जागतिक महिला दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृहात जागतिक महिला दिन साजरा करण्‍यात आला. गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता प्रा. विशाला पटणम कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी होत्‍या तर प्रा शुभांगी कलपांडे, डॉ शिल्‍पा जेथलिया व डॉ जयश्री एकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्‍यवरांनी विद्यार्थिनींना सर्वांगीण विकास घडवुन चांगले करिअर व वैयक्तिक जीवनात यश मिळवण्‍यासाठी मार्गदर्शन केले. यानिमित्‍य मला अशी स्‍त्री व्‍हायचंय या विषयावर वकृत्‍व स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत कृषि महाविद्यालयाची अथिरा रविंद्रन हिने प्रथम, गृहविज्ञान महाविद्यालयाची प्रतिभा ठोंबरे हिने व्दितीय तर शिवशक्‍ती गोडसलवार व ज्‍योती बहिरट या विदयार्थिंनी तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्‍यांचे प्रा. विशाला पटणम यांनी स्‍मृतीचिन्‍ह देऊन अभिनंदन केले तर मान्‍यवरांना देखिल विद्यार्थ्‍यींनी स्‍मृतीचिन्‍ह देऊन गौरवण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रेश्‍मा मल्‍लेशे, वेदांती मुळे, अंकिता रत्‍नपारखी व ज्‍योती बहिरट या विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले. 

जपा फळबागा ....विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता प्रा. अरूण गुट्टे यांचा सल्‍ला

Friday, March 7, 2014

मराठवाडयात येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पाऊसाची शक्यता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि हवामानशास्त्र विभागाच्‍या ग्रामिण कृषी मौसम सेवा प्रकल्‍पामार्फत प्राप्‍त माहितीनुसार येत्‍या सोमवार पर्यंत मराठवाडयात तुरळक ठिकाणी पुन्‍हा वादळी वा-यासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली असुन कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, तसेच हवेतील आद्रतेच्‍या प्रमाणात वाढ होणार आहे. याचे कारण म्‍हणजे पश्चिमीवात (ईस्‍ट्रलीझ) प्रकारचे वारे लक्षव्‍दीप व दक्षिण गुजरात या भुप्रदेशावर निर्माण झाले असुन मालदीप बेटे व लक्षव्‍दीप समुह यावर भूपृष्‍ठापासुन सुमारे 900 मीटर उंचीवर हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. भूपृष्‍ठापासुन दीड ते दोन कि. मी. उंचीवर अरबी समुद्रामध्‍ये महाराष्‍ट्राच्‍या समुद्रतटीय प्रदेशावर अशीच हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती येत्‍या दोन दिवसात अशीच राहण्‍याची शक्‍यता आहे. याचाच परिणाम म्‍हणुन येत्‍या 11 मार्चपर्यंत मराठवाडयातील सर्व जिल्‍हयात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: जालना, बीड, लातुर व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी गारा पडण्‍याची शक्‍यता आहे, अशी माहिती ग्रामिण कृषी हवामान विभागाचे मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांनी दिली असुन यास कृषि हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी. व्‍ही. आसेवार यांनी यास दुजोरा दिला आहे.
    ग्रामिण कृ‍षी मौसम सेवा मार्फत मागील आठवडयात वर्तविण्‍यात आलेल्‍या अंदाजाप्रमाणे बुधवार व गुरूवार रोजी नांदेड, जालना व बीड जिल्‍हयात अनेक ठिकाणी गारा पडल्‍या. बीड जिल्‍हातील परळी तालुक्‍यातील प्रगतीशील शेतकरी कृषिभुषण नाथाराव कराड यांनी सांगीतले की प्रकल्‍पाच्‍या संदेशाप्रमाणे इंजेगाव व परिसरात भारी स्‍वरूपात गारपीट होऊन फळपिकांसह रब्‍बी पिकांचे मोठी हानी झाली आहे. याच प्रमाणे प्रतिक्रीय नांदेड जिल्‍हयातील लोहा तालुकयातील रिसनगांवचे शेतकरी महादेव शिंदे यांनी व्‍यक्‍त केली.

विद्यापीठ कर्मचारी क्रीडास्पसर्धा 2014 ची जय्यत तयारी

विद्यापीठ कर्मचारी क्रीडास्पसर्धा 2014 ची जय्यत तयारी सुरू असतांना विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी, विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी 
******************************************************

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत कार्यरत असलेल्‍या सर्व महिला व पुरूष अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विद्यापीठ स्‍तरावर दिनांक 8 मार्च ते 10 मार्च कालावधीत विद्यापीठ कर्मचारी क्रीडास्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. यास्‍पर्धेचे उदघाटन दिनांक 8 मार्च रोजी परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ बी बी भोसले यांच्‍या हस्‍ते उदघाटन होणार असुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या क्रीडास्‍पर्धेत हॉलीबॉल, टेबल टेनीस, बॅडमिंटन, टेनिस बॉल क्रिकेट, कबड्डी, बुध्‍दीबळ, कॅरम, रांगोळी स्‍पर्धा आदी विविध खेळांचा समावेश असुन विद्यार्थी कल्‍याण अधिकारी यांच्‍या नेतृत्‍वखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेची जय्यत तयारी सुरू असुन स्‍पर्धेचा बक्षिस वितरण दिनांक 10 मार्च रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

Wednesday, March 5, 2014

विद्यापीठातील शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे वनामकृवि चे कुलगुरू मा. डॉ. व्यंकटेश्वरलु यांचे निर्देश

बीड जिल्‍हयातील अंबाजोगाईतील गारपिटीसह वादळी वा-याने नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी करतांना महसुल विभाग, कृषि विभाग व विद्यापीठातील अधिकारी व शास्‍त्रज्ञांनाचे पथक 


परभणी - राज्‍यात गेल्‍या काही दिवसांत गारपिटीसह वादळी वा-याने गहु, हरभरा, रब्‍बी ज्‍वारी आदी रब्‍बी पिकांसह आंबा, डाळींब, द्राक्ष व मोसंबी फळबागांचे मोठे नुकसान झाले असुन अवेळी झालेल्‍या पावसानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्‍ये शेतावर उभ्‍या असलेल्‍या पिकांमध्‍ये शेतक-यांनी कोणत्‍या प्रकारजी काळजी घेतली पाहिजे याबाबतचा कृषि सल्‍ला विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन देण्‍याचे निर्देश वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिले आहेत. त्‍यानुसार विस्‍तार शि‍क्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील आठही जिल्‍हयात शास्‍त्रज्ञांचे पथक तयार करण्‍यात आले असुन संबंधीत जिल्‍हयांतील कृषि विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रातील शास्‍त्रज्ञांचा त्‍यात समावेश आहे. हे पथक शेतक-यांच्‍या शेतावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. 
गारपीट व अवकाळी पाऊसामुळे फळपिकावर होणारे दुष्‍परिणाम व उपाय
फळपिकांमध्‍ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्‍यामुळे फळे सडण्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच गार‍पीटीमुळे मोठया प्रमाणावर फुलगळ व फळगळ होत आहे. अशा परिस्थितीमध्‍ये शेतक-यांनी फळांची सडण्‍याची स्थिती ओळखुन प्रती लिटर पाण्‍यात 1.5 ग्रॅम कार्बन्‍डेन्‍झीम किंवा 2.5 ग्रॅम रिडोमील ची फवारणी करण्‍याचा सल्‍ला बदनापुर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला आहे. तसेच मोठया प्रमाणात फळगळ व फुलगळ होत असेल तर 100 लिटर पाण्‍यात 1.5 ग्रॅम एनएए या संजीवकाची फवारणी करावी. आंबा व मोसंबीच्‍या प्रत्‍येक झाडास 500 ग्रॅम युरिया दयावा व आंब्‍याच्‍या भुरी रोगासाठी 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम पाण्‍यात विळघणारे गंधकाची फवारणी कराबी.
द्राक्षे पिकामध्‍ये फळे तडकण्‍याचे प्रमाण वाढत असुन फळातील पाणी घडावर साठुन घड सडण्‍याची प्रक्रिया सुरू होते, त्‍यावर रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्‍यासाठी प्रती लिटर पाण्‍यात 1 ग्रॅम बेनोमील अधिक 1.5 ग्रॅम नुवान ची फवारणी करावी. द्राक्षाच्‍या नवीन वाढीवर करपा व अॅ‍थ्रेकनोजचा प्रार्दुर्भाव अशा वातावरणात येतो. त्‍यासाठी ब्‍ल्‍यु कॉपर 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात अधिक स्‍ट्रेप्‍टोसायकलीन 6 ग्रॅम प्रती 30‍ लिटर पाण्‍यात एकत्र फवारणी कराण्‍याचा सल्‍लाही त्‍यांनी दिला. अशाच प्रकारची फवारणी डाळीब व लिंबु फळपिकावर सुध्‍दा करावी.    


Sunday, March 2, 2014

कृषिविद्या विभागात राष्‍ट्रीय विज्ञान दिन साजरा

     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषि विद्या विभाग व भारतीय कृषि विद्याविद्या संस्‍था शाखा परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 28 फेब्रुवारी 2014 रोजी डॉ.सी.बी.रमण यांच्‍या संशोधन कार्यानिमित्‍त राष्‍ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी कृषि विद्या विभागातील विद्यार्थ्‍यांसाठी लेखी प्रश्‍न मंजुषा आयोजित करण्‍यात आली होती. स्‍पर्धेत सर्वाधिक गुण प्राप्‍त करुन श्री जी. एस. काझी हा विद्यार्थी प्रथम पारितोषिक मिळविण्‍याचा मानकरी ठरला, त्‍यास विभाग प्रमुख डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांच्‍या हस्‍ते मा‍नचिन्‍ह देऊन सत्‍कार करण्‍यात आला. 
     या प्रसंगी डॉ. ए. एस. जाधव, डॉ. के. टी. जाधव, प्रा. एन.जी.कु-हाडे व प्रा. जी. डी. गडदे यांनी उपस्थित विद्यार्थ्‍याना मार्गदर्शन केले. अध्‍यक्षीय समारोपात डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी विद्यार्थ्‍यांना सचोटी व सातत्‍य ठेवुन काम केल्‍यास यश संपादन करणे सहज शक्‍य आहे असे सांगीतले. प्रश्‍न मंजूषा पार पाडण्‍यासाठी डॉ. एस. एस. जाधव, डॉ. के. टी. जाधव आणि प्रा. पी. के. वाघमारे यांनी विशेष प्रयत्‍न केले. कार्यक्रमाचे सूचसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पी. के. वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमात कृषिविद्या विभागाचे प्रा. डॉ. अवसरमल, प्रा. पवार मॅडम, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी उपस्थित होते.