Saturday, August 16, 2014

आदिवासी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा.......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित आदिवासी उपयोजनातंर्गत आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप


परभणी : देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतरही आदिवासी समाज विकासापासुन दुर आहे, शासनाने आदिवासी विकासाकरिता अनेक योजना राबविल्‍या, त्‍याप्रभावीपणे राबविण्‍यासाठी या योजनेतील खर्च फक्‍त आदिवासी समाजाकरिताच व्‍हावा सक्‍तीचे केलेले आहे. शेतीसाठी पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या व काटेकोरपणे वापर करण्‍यासाठी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्‍यावश्‍यक झाले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आदिवासी शेतक-यांनी घ्‍यावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. स्‍वातंत्रदिनाचे औचित्‍यसाधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वीत संशोधन प्रकल्‍पातंर्गत पाणी व्‍यवस्‍थापन योजनामार्फत आदिवासी उपयोजनातंर्गत हिंगोली जिल्‍हयातील कळमनुरी तालुक्‍यातील वाई गांवातील आदीवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटपाचा कार्यक्रम दि १५ ऑगस्‍ट रोजी आयोजित करण्‍यात आला होता. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते, याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ अशोक ढवण, सरपंच श्रीमती कविताताई दुधाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले व प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योजनेतंर्गत निवडक ४६ आदिवासी शेतक-यांना मान्‍यवारांच्‍या हस्‍ते तुषार सिंचन संचाचे वाटप करण्‍यात आले.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आदिवासी शेतक-यांनी पिक पध्‍दतीत बदल करून पारंपारिक पिकासोबतच फळपिकांकडे वळावे जेणेकरून आर्थिक समृध्‍दी होईल. विद्यापीठाने आदिवासीबहुल मौजे वाई हे गांव दत्‍तक घेऊन तेथे संपुर्ण कृषि क्रांतीसाठी प्रयत्‍न करण्‍याची सुचना त्‍यांनी केले.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेतीत आदिवासी शेतक-यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्‍यास त्‍यांच्‍या जीवनात नवी पहाट येईल. याकरिता आदिवासी बांधवांनी विद्यापीठास संपुर्ण सहकार्य करावे याप्रकल्‍पामुळे आदिवासी समाज व विद्यापीठ यांच्‍यातील नाते अधिक दृढ होईल अशी मत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आदिवासी शेतक-यांचे औषधी वनस्‍पतीचे ज्ञान अत्‍यंत महत्‍वाचे असुन त्‍याक्षेत्रातही विद्यापीठाला कार्य करत येईल अशी मत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ ए एस कडाळे म्‍हणाले की, वाई हे गांवा संपुर्णपणे आदिवासीबहुल गांव असुन ये‍थील शेतीला पाणी देण्‍यासाठी पारंपारिक पध्‍दतीचा वापर केला जात असल्‍याने पिकांची उत्‍पादकता कमी आहे, योजनेचे लाभार्थ्‍यांची निवड सविस्‍तर सर्व्‍हेक्षण करून ग्रामसभेमार्फत करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे तुषार सिंचन संच वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे करण्‍यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ जी डी गडदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के टी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रा कराड, गिराम, खराडे, कांबळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्‍या शेवटी तुषार सिंचना संचाच्‍या साहित्‍य गांवापर्यंत नेण्‍यासाठीची वाहनाची व्‍यवस्‍थाही प्रकल्‍पांतर्गत करण्‍यात आली होती, त्‍यावाहनास कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व वाई गांवाचे शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.