Monday, May 2, 2016

आदिवासी शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासुन वंचित राहु नये....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

अखिल भारतीय समन्वित पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अखिल भारतीय समन्वित पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत हिंगोली तालुक्‍यातील मौजे आमदरी व करवाडी येथील निवडक तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप दिनांक १ मे रोजी महा‍राष्‍ट्र दिनी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थिती पाहता शेतीसाठी पाणीचे नियोजन करतांना ठिबक व तुषार सिंचन या आधुनिक सिंचन पध्‍दती अवलंबाशिवाय गत्‍यांतर नाही. आदिवासी शेतकरीही या आधुनिक तंत्रज्ञानापासुन वं‍चीत राहु नये म्‍हणुन विद्यापीठ निवडक आदिवासी बहुल गावांत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करित आहे. आदिवासी शेतक-यांनीही विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या संपर्कात राहुन आधुनिक कृषि तंत्रज्ञान अवगत करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. सदरिल प्रकल्‍पामुळे आदिवासी शेतक-यांशी विद्यापीठाची नाळ जोडली गेली असल्‍याचे संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या भाषणात सांगितले. 
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांनी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जी. डि. गडदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यु. एन. क-हाड यांनी केले. कार्यक्रमास मौजे आमदरी व करवाडी गावातील आदिवासी शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी एन. के. गिराम, पी. एस. सावंत, डि. आर. कुरा, संजय देशमुख, रत्‍नाकर पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रकल्‍पातील पहारेकरी अच्‍युतराव पौळ हे सेवानिवृत्‍त झाले असुन कामगार दिनानिमित्‍त कुलगुरूंच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.