Saturday, July 30, 2016

वनामकृविच्‍या उद्यानविद्या विभागात फळबाग लागवड कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागात फळबाग लागवड कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २७ जुलै रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री. रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. व्‍ही डी पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डि. बी. देवसरकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विविध फळझाडांची लागवड करण्‍यात आली. कृषी महाविद्यालयातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासकीय मार्गदर्शनाच्‍या दृष्‍टीकोनातुन उद्यानविद्या विभागातील दहा एकर प्रक्षेत्रावर आंबा व पेरू फळांच्‍या विविध जातींची तीन हजार झाडांची लागवड करण्‍यात आली असुन एक आदर्श फळबाग विकसित करण्‍यात येत आहे. सदरिल फळबाग विकसित करण्‍यासाठी कुलगरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री. रविंद्र देशमुख आदींचे विशेष प्राेेत्‍साहन लाभले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्‍यापक, कर्मचारी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले.

Friday, July 29, 2016

औरंगाबाद येथे ‘मराठवाडयातील शेतीचे भवितव्‍य’ यावर एक दिवशीय कृषी परिषदेचे आयोजन

हवामानातील बदल जागतिक तापमान वाढ यामुळे मागील काही वर्षापासुन कृषी क्षेत्रास विविध प्रकारच्‍या आव्‍हानांना सामोरे जावे लागत असुन मराठवाडयातील कृषि आधारित ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेवर विपरित परिणाम होत आहे. यावर्षी मराठवाडा विभागात सर्व जिल्‍हयात समाधानकारक पावसाची सुरूवात झालेली आहे. या पार्श्‍वभुमीवर कृषि क्षेत्रासमोरील असलेल्‍या समस्‍या, आव्‍हाने संधी तसेच या क्षेत्रातील विविध पैलुंवर चर्चा विचारमंथन होऊन कृषि विकासाला चालना संजीवनी मिळावी, या उद्देशानेमराठवाडयातील शेतीचे भवितव्‍यया विषयावर एक दिवसीय कृषि परिषदेचे आयोजन विभागीय आयुक्‍तालयाच्‍या पुढाकाराने व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मराठवाडा विकास मंडळ, महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, दी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्‍ट्रीज अॅण्‍ड अॅग्रीकल्‍चर दी इन्‍स्‍टीटयुट ऑफ अग्रीकल्‍चरल टेक्‍नॉलॉजीस्‍ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्‍या सभागृहात करण्‍यात आले आहे. सदरिल परिषदचे उद्घाटन माननीय राज्‍यपाल माश्री. चेन्‍नमनेनी विद्यासागर राव यांच्‍या शुभहस्‍ते सकाळी 10 वाजता होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विधानसभेचे माननीय अध्‍यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे राहणार आहेत. सदरिल परिषदेत मराठवाडा विभागातील सन्‍माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी आदी सहभागी होणार आहेत. सदरिल कृषि परिषदेत हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान, शेती व्‍यवसायातील जोखीम व्‍यवस्‍थापन, जमिनीचे आरोग्‍य व सेंद्रिय शेती, पाण्‍याचा कार्यक्षम वापर, कोरडवाहु फलोत्‍पादन वनशेती, बीजोत्‍पादन व संरक्षित शेती, पशुपालन, दुग्‍धोत्‍पादन कृषी पुरक व्‍यवसाय, गटशेती, कृषि प्रक्रिया निर्यात, कृषि विकासात खासगी क्षेत्राचा सहभाग आदी विषयावर विद्यापीठातील विविध संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ, तज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या एक दिवशीय कृषि परिषदेचे आयोजन विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन परिषदेतील चर्चा, सुचनांचा व मार्गदर्शनांचा उपयोग मराठवाडयातील कृषि विकासाबाबत धोरणात्‍मक निर्णयासाठी होणार असल्‍याचे या एक दिवशीय कृषी परिषदेचे समन्‍वयक तथा वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी कळविले आहे.

Wednesday, July 27, 2016

मौजे सायळा (ख) येथे कृषिदूतांमार्फत लसीकरण मोहीम संपन्न

परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांचा उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीक सोयाबीन संशोधन प्रकल्प येथे कार्यरत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी मौज सायळा (ख) येथे दि. २६ जुलै रोजी सार्वजनिक पशु लसीकरण मोहीम आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे उपस्थित होते तर सरपंच श्री. भगवान खटिंग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने, डॉ. ए. टी. शिंदे, प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. डी. जी. मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी गावातील पशुपालकांना जनावरांचे स्‍वास्‍थ्‍य चांगले ठेवण्‍यासाठी जनावरांचे नियमीत लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. ए. टी. शिंदे यांनी पशुंच्या लसीकरणाचे महत्व विशद केले तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश माने यांनी पशुंचे लाळ व खुरकत रोगांबाबत माहिती देऊन जनावरांचे लसीकरण केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एल. बडगुजर यांनी केले. सुत्रसंचालन कृषिदूत विष्णू डोंगरे यांनी तर विजय धोत्रे यांनी आभार मानले. लसीकरण मोहीमे अंतर्गत गावातील दोनशे पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वतीसाठी कृषिदूत म्हणून परमेश्वर गायकवाड, समाधान देवकाते, संजय बोंगाने, राम देशमुख, शुभम गोद्रे, अक्षय गार्डी व संकेत डावरे यांनी परिश्रम घेतले.

Friday, July 22, 2016

वनामकृवि तज्ञांची कापुस पीक पाहणी

पाहणीत कापुस पीकात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळला
परभणी तालुक्‍यातील मौजे ब्राम्‍हणगांव, सोन्‍ना व परिसरातील कापुस पीकाची पाहणी दिनांक १९ जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. डी. एन. धुतराज व विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केली असता कापुस पीकाची वाढ खुंटल्‍याचे दिसुन आले. पीक साधारणत: २८ दिवसाचे झाले तरीही नवीन पान येतांना दिसत नाहीत. खालची पानं लाल पडत आहेत व नंतर पिवळी पडुन धक्‍का लागला की, गळुन पडत आहेत, खोड लाल पडत आहे. कुठल्‍याही प्रकारची किड कापसावर आढळुन आलेली नाही. सोन्‍ना शिवारात काही ठिकाणी तुडतुडयांचा थोडया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला. कापुस उपटुन बधितल्‍यानंतर मुळांची वाढ खुंटलेली दिसुन आली व मुळे जमिनीत खाली वाढयाऐवजी परत जमिनीच्‍या पृष्‍टभागाकडे वळतांना दिसली व तंतुमय मुळांची होत नसल्‍याचे आढळले. काही ठिकाणी मुळं काळी पडतांना आढळली.

प्रयोगशाळेत कापसाच्‍या नमुन्‍याची पाहणी केली असता मुळकुज रोग आढळुन आला. हा रोग बुरशीमुळे झाला असल्‍याचे निदर्शनास आले. याच्‍या नियंत्रणासाठी कार्बेन्‍डेन्‍झीम (६७%) अधिक मॅन्‍कोझेब (३३%) या संयुक्‍त बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन आळवणी करावी. तसेच कापुस पीकावर मुळकुजव्‍या रोग आल्‍यामुळे जमिनीतुन अन्‍न घेण्‍याची प्रक्रिया मंदावली आहे. त्‍यामुळे रोप पिवळी पडत आहेत व नंतर लाल पडत आहेत. ब-याच शेतक-यांनी पेरणीसोबत खते न दिल्‍यामुळे असे लक्षणं दिसतात. म्‍हणुन खताचा पहिला हप्‍ता पेरणी सोबतच दयावा. ज्‍या शेतक-यांनी पेरणी जुनच्‍या १५ तारखेला केली असेल अशा शेतक-यांनी लागवडीनंतर एक महिना पुर्ण झाल्‍यास कापसाला युरियाचा दुसरा हप्‍ता हेक्‍टरी ६५ किलो युरिया जमिनीतुन दयावा जमिनीत ओल कमी असल्‍यास नत्र देऊ नये. पिकाची जोमदार वाढ होण्‍याच्‍या दृष्‍टीने १.५० ते २.० टक्‍के १९:१९:१९ किंवा १३:००:४५ खत व सोबत २० ग्रॅम मॅग्‍नेशियम सल्‍फेट फवारणीतुन दयावे, असे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभाग यांच्‍या तर्फे कळविण्‍यात आले आहे.

Thursday, July 21, 2016

वनामकृविचे डॉ. गजेंद्र जगताप यांना ऑस्‍ट्रेलियन सरकारची इंडेव्‍हर पोस्‍ट डॉक्‍टरेट फेलोशिप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयातील सह्योगी प्राध्‍यापक डॉ गजेंद्र जगताप यांची ऑस्‍ट्रेलियन सरकारच्‍या आंतरराष्‍ट्रीय इंडेव्‍हर पोस्‍ट डॉक्‍टरेट फेलोशिपसाठी निवड झाली असुन या फेलोशिपसाठी सन २०१६ साठी निवड झालेले ते राज्‍यातील एकमेव कृषी शास्‍त्रज्ञ आहेत. या फेलोशिपच्‍या माध्‍यमातुन डॉ. गजेंद्र जगताप हे ऑस्‍ट्रेलियातील रॉयल मेलबॉर्न इंस्‍टीट्युट ऑफ टेक्‍नोलॉजी या विद्यापीठात ९ ऑगस्‍ट २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१७ या सहा महिन्‍याच्‍या कालावधीत प्‍लॅन्‍ट बायोटेक्‍नोलॉजी प्रयोगशाळेत डॉ. नितीन मंत्री यांच्‍या मार्गदर्शनाखाली सीट्रस बायोसेक्‍युरीटी या विषयावर अद्यावत संशोधन करणार आहेत. या संशोधनासाठी लागणारा सर्व खर्च ऑस्‍ट्रेलियन सरकार करणार असुन ही फेलोशिप मिळवण्‍यासाठी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांचे मार्गदर्शन व प्रोत्‍साहन डॉ गजेंद्र जगताप यांना लाभले. डॉ गजेंद्र जगताप यांचे सदरिल फेलोशिपसाठीच्‍या निवडीबाबत माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक आदीसह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

Monday, July 18, 2016

वनामकृवित जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी वरील आयोजीत प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्य शासन यांच्या संयक्त विद्यमाने मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी विषयावरील प्रशिक्षण दिनांक १२ ते १६ जुलै दरम्‍याण करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक १६ जुलै रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून हैद्राबाद येथील प्रो. जयशंकर तेलगंणा राज्‍य कृषि विद्यापीठाच्‍या प्राध्‍यापिका डॉ. जी. पद्मजा, विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील, डॉ. अे. पी. सुर्यवंशी, डॉ. सय्यद ईस्माईल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी जमिनीतील अन्नद्रव्याची घटत असलेली पातळी शेतीसाठी चिंताजनक असल्‍याचे सांगुन शेतक-यांसाठी व कृषि विस्‍तारकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करणे गरजेचे आहे, असे मत व्‍यक्‍त केले. माती परिक्षणावर आधारीत खतांच्या शिफारशीत मात्राचे शेतक-यांमध्‍ये वापर वाढण्‍यासाठी कृषी तंत्रज्ञांना सदरिल प्रकारचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्‍याचे मत प्राध्‍यापिका डॉ. पद्मजा यांनी आपल्‍या मार्गदर्शनात व्‍यक्‍त केले तर विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी जमीनीच्या गुणधर्मवार आधारीत प्रशिक्षण देणारी राज्‍यातील मुख्‍य विद्यापीठ असल्‍याचे मार्गदर्शनात विषद केले.
प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठ जिल्हातील तंत्र अधिकारी, कृषि सहाय्यक आदींनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षनार्थी डॉ एच. एस. पवार, श्री पांचाळ, श्री खजुरीकर आदींनी प्रशिक्षणाबाबतचे मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमात प्रशिक्षनार्थीना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रम विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक म्‍हणुन डॉ पपीता गौरखेडे यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सय्यद ईस्माईल यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. पपिता गौरखेडे व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सदाशिव अडकीणे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.