Monday, August 22, 2016

विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेचे आयोजन

संपुर्ण मराठवाडयात राबविण्‍यात येणार मोहिम
मराठवाडा विभागात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसा झाला परंतू मागील २० ते २२ दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण व येणा-या रबी हंगामाचे नियोजन याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावर्षीही कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु व विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी. बी. भोसले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्रात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, सर्व घटक महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम विद्यापीठ आपल्या दारी :  तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता जिल्हा / तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला असुन सदरिल कार्यक्रम दि. २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार ते सहा गावाचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक दिवशी दोन ते तीन गांवाचा दौरा करण्याचे नियोजित आहे. या दोन जिल्हयाकरिता शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले असुन यात कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश राहणार आहे. छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असून हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण इत्‍यादी विषयावर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष करुन आजच्या परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षण व शेतक-यांचे प्रश्‍न यावर शेतक­यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप राहणार आहे.

कार्यक्रमात साधारणत: १५ दिवसांचा कालावधीत परभणी व हिंगोली जिल्हयातील एकूण ५६ ते ७० गांवे कृषि विभागाच्या समन्वयाने प्रस्तावित केली असून एकूण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि.मी. होणार आहे. यामध्ये सबंधित शास्त्रज्ञाचा चमु, कृषि विभाग प्रतिनिधी व शेतकरी बांधव यांच्या समन्वयातुन कार्यक्रमामध्ये बदल करता येऊ शकतो. या कार्यक्रमाचा जास्‍तती जास्‍त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे अवाहन असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. एन. आळसे व प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.