Saturday, September 3, 2016

मराठवाडयातील पीक पध्‍दतीत बदल करावा लागेल....... आमदार मा. डॉ. राहुल पाटील

विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरील अंतर्गत विशेष पीक संरक्षण मोहीमेचे उद्घाटन

अनिश्चित पर्जन्‍यमान व हवामान, कमी उत्‍पादकता, शेतमालास कमी भाव आदी अनेक समस्‍या शेतक-यांपुढे असुन शेतकरी आत्‍महत्‍या होत आहेत. यासाठी आपणास पीक पध्‍दतीत बदल करावा लागेल, शेतक-यांना शाश्‍वत पाणी व वीजेचा पुरवठा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परभणीचे आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. राहुल पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीमेच्‍या उद्घाटन (२ सप्‍टेंबर रोजी) प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. प्रल्‍हाद शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. पी. एन. सत्‍वधर, प्राचार्य डॉ. . एस. कदम, प्रगतशील शेतकरी श्री प्रताप काळे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मा. डॉ. राहुल पाटील पुढे म्‍हणाले की, कृषी विद्यापीठातील मर्यादित मनुष्‍यबळामुळे संशोधन व विस्‍तार कार्यावर मर्याद येत आहेत. अनेक प्रगतशील शेतकरी नवनवीन कृषी तंत्रज्ञान वापरत आहेत, अनेक शेतकरी संशोधक असुन त्‍यांच्‍या संशोधनाचा समावेश विद्यापीठाच्‍या संशोधन करावा. विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुलगुरु लाभल्यामुळे कोरडवाहू शेती संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे सातत्याने केले जाते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त करून विद्यापीठाच्या या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी मोहिमे अंतर्गत विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ योग्‍य वेळी, योग्‍य मार्गदर्शन प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन देत असुन याचा फायदा शेतक-यांना होत आहे.
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले यांनी विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत चालु असलेल्‍या विशेष पिक संरक्षण मोहीमेची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. याप्रसंगी आमदार मा. डॉ. राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते सदर मोहीमेच्‍या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व प्रगतशील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती केंद्राचे प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी, एस. बी. जाधव, के. डी. कौसडीकर, व्ही. एस. सातपुते, अशोक पंडित, हनुमान बनसोडे, गणेश कटारे, उत्तम बेद्रे, पांडुरंग डिकळे आदींनी परिश्रम घेतले.
शेतक-यांच्या प्रत्‍यक्ष शेतावर कृषी शास्‍त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन करण्यासाठी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु व विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्रयात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या व कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून, सर्व घटक महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी अंतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीम गेल्‍या आठवडयापासुन दिवसापासुन राबविण्‍यात येत आहेपरभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता सदरिल कार्यक्रम दि. २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत असुन या दोन जिल्हयाकरिता शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले असुन छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत. साधारणत: १५ दिवसांचा कालावधीत परभणी व हिंगोली जिल्हयातील एकूण ७० गांव मध्‍ये राबविण्‍यात येणार असुन आजपर्यंत ४७ गावात सदर कार्यक्रम राबविण्‍यात आला आहे. तसेच मराठवाडयातील साधारणत: ३५० ते ४०० गावांमध्ये १५ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.