Thursday, February 23, 2017

वनामकृवित लिंबूवर्गीय फळपिकांबाबत चार दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या लिंबूवर्गीय फळपिकांवर मराठवाडाकरिता तत्रंज्ञान अभियांनातर्गत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 07 ते 10 मार्च दरम्‍यान मोसंबी, संत्रा व लिंबू उत्‍पादक बागायतदारांकरीता आयोजित करण्‍यात आला आहे. प्रशिक्षणात रोपवाटीका व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन, पिक संरक्षण व काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदीबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीची निवासाची व भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून प्रशिक्षणाकरीता परभणी येथे येण्‍याचा व जाण्‍याचा खर्च प्रशिक्षणार्थीना स्‍वत: करावा लागेल. स‍दरील प्रशिक्षण विदयापीठ प्रशासकीय इमारती समोरील शेतकरी भवन येथे आयोजीत करण्‍यात आले आहे. तरी मराठवाडयातील इच्‍छूक लिंबूवर्गीय फळ उत्‍पादक बागायतदारांनी दिनांक 1 मार्च पर्यंत टिएमसीचे प्रभारी अधिकारी प्रा आर एस बोरडे (भ्रमणध्‍वनी क्र 7588156217 किंवा दुरध्‍वनी क्रमांक 02425-220685) व विस्‍तार शिक्षण संचालनालयाशी संपर्क साधुन आपली नावनोंदणी करावी. प्रथम येणा-यास प्राधान्‍य देण्‍यात येणार असून मर्यादीत साधरणत: 40 ते 50 बागायदारांना प्रशिक्षण देण्‍यात येईल तसेच बागायदारांच्‍या प्रतिसादानुसार सदरील प्रशिक्षण पुन्‍हा एकदा आयोजीत करण्‍यात येईल, असे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी कळविले आहे.

माती परीक्षण प्रयोगशाळेतील जमिनीचे विविध गुणधर्म पृथ:करण या विषयावरील कृषि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि जिल्हा कृषि अधिकारी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जमिनीचे रासायनिक गुणधर्म व मुख्य अन्नद्रव्ये तपासणी या‍ विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण दिनांक 27 फेब्रुवारी ते 03 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कृषि विभागातील माती परिक्षण प्रयोगशाळेतील विविध तंत्र अधिकारी यांना प्रयोगशाळेत जमिनीच्या गुणधर्म पृथ:करणातील येणाऱ्या अडचणी प्रशिक्षणाव्दारे सोडविता येणार आहेत. प्रशिक्षणासाठी जालना जिल्हातील मृद परिक्षण तंत्र अधिकारी, प्रयोगशाळेतील 12 तंत्रज्ञ आणि कृषि सहाय्यक सहभाग नोंदविणार आहेत. सध्या जमिनीमध्ये एका पेक्षा अधिक अन्नद्रव्यांच्या कमतरता आढळुन येत आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. या संदर्भात आंतरराष्ट्रीयस्तरावर जमिनीच्या आरोग्याबाबत जागृती होण्यासाठी आतंरराष्ट्रीय मृदा वर्ष 2015 म्हणुन साजरे करण्‍यात आले. याच अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने मृदा आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रमावर भर दिला जात आहे. आरोग्य पत्रिकेत जमिनीचे‍ विविध गुणधर्माचे पृथ:करण अद्यावत पध्दतीने करावे अशा मार्गदर्शक सुचना जिल्हा स्तरावरील माती परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त झाल्या आहेत. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सुनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदी कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

Wednesday, February 22, 2017

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात कृषि अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागातील अधिका-यांचे प्रशिक्षण दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ बी. बी. भोसले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. आर. शिंदे कृषि उपसंचालक डॉ. रक्षा शिंदे, कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे, आत्माचे  प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपले, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, मधवर्ती रोपवाटीकाचे प्रभारी अधिकारी प्रा. आर. एस. बोराडे, श्री. आर. टी. सुखदेव आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाकपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापनावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, खरिप पूर्व तयारी याबाबत डॉ. यु.एन. आळसे यांनी तर हुमणी अळीचे व्यवस्थापनावर प्रा. डि. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. आर शिंदे यांनी जिल्हयातील कृषि विषयक माहीती ग्राफिक्सद्वारे दिली तर श्री. बी. एस. कच्छवे आणि श्री. एम. एल. चपळे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. बी.बी. भोसले यांनी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, आत्मा आणि जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी शेतक-यांसाठी अधिकाधिक विस्‍तार कार्यक्रमांचे नियोजन करुन मार्गदर्शन करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. यु.एन. आळसे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार प्रा. डि. डी. पटाईत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ . एस. जी. पुरी, प्रा. डि. डी. पटाईत, श्री. सुदर्शन बोराडे श्री. गणेश कटारे, श्री. बेद्रे, श्री. पांडुरंग डिकळे, श्री. शिंदे आणि दिपक वाघ यांनी परिश्रम घेतले.  प्रशिक्षणाचा कृषि विभाग आणि आत्मा कार्यालयातील तीस अधिका-यांनी सहभाग नोंदविला.

Monday, February 20, 2017

छत्रपतींच्‍या स्‍वराज्‍यात शेतक-यांना मोठे पाठबळ होते....... प्रा. डॉ अशोक जोंधळे

शिवरायांच्‍या स्‍वराज्‍यात जिथे जि‍थे नापीक जमिनी होत्‍या, त्‍या पिकाऊ केल्‍या गेल्‍या. त्‍यांच्‍या स्‍वराज्‍यात नैसर्गिक आत्‍पतीमध्‍ये शेतसारा माफ केला जात असे, शेतक-यांना मोठे पाठबळ होते, असे प्रतिपादन ज्ञानोपासक महाविद्यालयाच्‍या हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रख्‍यात व्‍याख्‍याते प्रा. डॉ. अशोक जोंधळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍त दिनांक 18 फेब्रवारी रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते, व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ उद्य खोडके, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ राकेश आहिरे, विद्यार्थी प्रतिनिधी रवि सुरवसे, अमोल पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. अशोक जोंधळे पुढे म्‍हणाले की, शिवाजी राजे शेतक-यांना अर्थसहाय्य करणार शासनकर्ता होता. त्‍यांच्‍या राज्‍यात शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, नांगर, अवचारे आदीसाठी बिनव्‍याजी कर्ज दिल जात असे. छत्रपतीच्‍या विचारांचे आजच्‍या युवकांनी पुजन करावे, छत्रपती शिवाजी हे केवळ डोक्‍यावर घेऊन मिरवु नका तर डोक्‍यात घेऊन मिरवा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोप प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले. यावेळी विद्यार्थी धीरज पवार व धंनजय भोसले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. सुत्रसंचलन डॉ पी के वाघमारे यांनी व आभार प्रदर्शन डॉ पी एच गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

औरंगाबाद येथील कृ‍षी विज्ञान केंद्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात सोयाबीन प्रक्रिया उद्योगावर चार दिवासीय कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 13 ते 17 फेब्रुवारी दरम्‍यान संपन्‍न झाला. प्रशिक्षणात किमान कौशल्य आधारित सोया प्रक्रिया उद्योगाविषयी सोयाबीन पासून सोया दूध, सोया पनीर, श्रीखंड, शिरा, सोया नट्स, भजे, सोया ब्रेड रोल, सोया पनीर पकोडा, सोया आपे, सोया लाडू, सोया चिवडा, सोया चकली, सोया खीर आदी पदार्थ तयार करण्‍याचे प्रात्‍याक्षिके दाखविण्यात आली. देशात कुपोषणाचे वाढते प्रमाण कमी करण्याच्‍या दृष्‍टीने व आजच्या दगदगीच्‍या जीवनात योग्य आहार व्यवस्‍थापनात आरोग्यदायी सोयबीनचा वापर रोजच्या आहारात कसे करावे, शास्त्रीय पद्धतीने सोयाबीन पासून प्रथिणयुक्त व चविष्ट पदार्थ साध्या व सोप्या पद्धतीने बनविण्‍याचे मार्गदर्शन प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी केले. प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील एकुण 28 महिला व पुरुषांनी घेतला. कार्यक्रमाच्‍या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे आत्माचे उपसंचालक श्री सतीश शिरोडकर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, आरोग्यदायी पदार्थाची बाजारपेठेत मोठी मागणी असुन तरुण महिला व पुरुषांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार यांनी महिलांनी शेतामालाचे मूल्यवर्धन करून व्यवसायभिमूख होण्‍याचा सल्‍ला दिला. प्रशिक्षणात सहभागी भावी उद्योजकांचे मनोबल वाढविण्यासाठी शिकविण्यात आलेले पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला.

Sunday, February 19, 2017

वनामकृवित शिवजयंती उत्‍साहात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक 19 फेब्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजाच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ ए एस कदम, प्राचार्या प्रा. विशाला पटणम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केदार बोरूळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजाच्‍या प्रतिमेची ढोलताशाच्‍या गजरात शहरात मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यपक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, February 18, 2017

जागतिक बँकेचे तज्ञ डॉ. एन.एच. रविंद्रनाथ यांच्या उपस्थित हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाची बैठक संपन्न

जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने राज्‍यात रा‍बविण्‍यात येणा-या हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाच्‍या (पोक्रा) पुर्वतयारीची झाली चर्चा
राज्‍यात रा‍बविण्‍यात येणा-या जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाच्‍या (पोक्रा) पुर्वतयारी बाबत दि. १० फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय येथे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व जागतिक बँकेचे तज्ञ तथा बेंगळुर येथील भारतीय विज्ञान संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ प्रा. डॉ. एन. एच. रविंद्रनाथ यांच्‍या प्रमुख उपस्थित बैठक संपन्‍न झाली. बैठकीचे आयोजन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.
महाराष्‍ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खानदेश (जळगांव) या विभागातील १५ जिल्‍ह्यांमध्‍ये जागतिक बँकेच्‍या सहाय्याने हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍प (पोक्रा) म्‍हणजेच नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प राबविण्‍यात येणार असुन मराठवाडा विभागातील सर्वच आठही जिल्‍ह्यांचा समावेश राहणार आहे. शेतक-यांची अन्‍न व आर्थिक सुरक्षा टिकवुन ठेवण्‍याच्‍या उद्देशाने पाणी व जमीन यांची उत्‍पादकता टिकवुन ठेवणे, हवामानातील बदलास अनुसरुन पीक बदल करणे, उपलब्ध पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणे, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांच्‍या सहाय्याने शेतमाल विक्री व्‍यवस्‍था बळकट करणे आदी उपक्रम या प्रकल्‍पात प्रस्‍तावित आहेत. या प्रकल्‍पाच्‍या पुर्वतयारीचा आढावा घेण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अंतर्गत विविध जिल्‍ह्यात कार्यरत कृषि संशोधक, विस्‍तार कृषि विद्यावेता यांचेशी चर्चा करण्‍यात आली. मराठवाडा विभागातील पीक रचना, हवामान, प्रकल्‍प क्षेत्रातील जिल्‍ह्यातील (ग्रीन हाऊस गॅस इमिशन व त्‍यास कारणीभुत घटक) तापमान वाढीस कारणीभुत घटक, जमिनी व जमिनीची वैशिष्‍ट्ये, कर्बाची स्थिती व कर्ब ग्रहण वाढविण्‍यासाठी विविध उपाययोजना आदीवर बैठकीत चर्चा करण्‍यात आली. बैठकीत मार्गदर्शन करतांना कुलगुरु मा. डॉ. बी. वेकंटेश्‍वरलु म्‍हणाले की, कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी दिर्घकालीन प्रणाली विकसीत करण्‍याचे व त्‍याचा समावेश या प्रकल्‍पात करणे गरजेचे असुन पावसाच्‍या पाण्‍याचे संवर्धन व कार्यक्षम वापर, जमिनीची सुपिकता व बिजोत्‍पादन या त्रिसुत्रीवर भर देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी यावेळी शास्‍त्रज्ञांना दिला.
शास्‍त्रज्ञ प्रा. डॉ. एन. एच. रविंद्रनाथ यांनी सदरील प्रकल्‍प शेतक-यांना उपयोगी ठरण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांनी कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करावा तसेच मागील २५ - ३० वर्षाच्‍या पावसाच्‍या आकडेवारीचा अभ्‍यास करुन आदर्श मॉडेल विकसित करावे, असे सांगितले.

     संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी सदरिल प्रकल्‍पाचा प्रकल्‍प अहवाल व अंर्तभुत तंत्रज्ञानामध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा मोठा सहभाग असुन विद्यापीठ आपले योगदान व तांत्रिक पाठबळ या प्रकल्‍पास उपलब्‍ध करुन देण्‍यास सज्‍ज आहे, असे सांगितले. मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. अासेवार यांनी कोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान व नवीन उपाययोजना यावर सादरीकरण केले. बैठकीस एकात्‍मीक शेती पध्‍दती, कापुस संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, कोरडवाहु संशोधन केंद्र, कृषि संशोधन केंद्र बदनापुर व विविध संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शास्‍त्रज्ञ, विस्‍तार कृषि वेत्‍ता उपस्थित होते. यात डॉ. डब्‍लु, एन. नारखेडे, डॉ. के. एस. बेग, डॉ. व्‍ही. डी. सोळंके, डॉ. एम. के. घोटके, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. डी. एस. पेरके, डॉ. यु. एन. आळसे, प्रा. ऐ. व्‍ही. गुट्टे, डॉ. जी. के. गायकवाड, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. सरोदे, डॉ. लोमटे आदी उपस्थित होते. प्रकल्‍पात संरक्षित सिंचन, जमिनीची सुपिकता, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, बिजोत्‍पादन, वनशेती, पावसाच्‍या आकडेवारीचा उपयोग, एकात्‍मीक शेती पध्‍दती आदी महत्‍वाच्‍या विषयावर चर्चा करण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी केले.

Thursday, February 16, 2017

छत्रपतीच्‍या स्‍वराज्‍यात जलसंधारणाचे चांगले नियोजन होते..... अॅड. गणेश हलकारे

वनामकृविच्‍या परभणी कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवजयंती उत्‍सव २०१७ चे आयोजन
छत्रपतींच्‍या स्‍वराज्‍यात शेतक-यांच्‍या हिताचे रक्षण केले जात असे. शिवरायाच्‍या राज्‍यात कोडरवाहु शेतीचा मोठा भाग होता, जलसंधारणाचे चांगले नियोजन केले गेले होते. आजच्‍या युवकांनी शिवचरित्राचा तटस्‍थ अभ्‍यास करणे गरजेचे आहे. आज प्रगत तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी शेतमालाचे चांगले उत्‍पादन घेत आहेत, शेतकरी उत्‍तम उत्‍पादक आहे, परंतु शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढले नाही. कारण शेतकरी उत्‍तम व्‍यापारी होऊ शकला नाही. उत्‍पादन खर्चावर आधारी शेतमालाला भाव मिळल्‍याशिवाय ही स्थिती बदलणार नाही, शेतीला उद्योगाचा दर्जा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमरावतील येथील प्रख्‍यात व्‍यक्‍ते अॅड. गणेश हलकारे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित व्‍याख्‍यानाच्‍या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ डि एन गोखले हे होते तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ ए एस कदम, विभाग प्रमुख डॉ टि बी तांबे, डॉ आर डि आहिरे, डॉ ए एस कार्ले, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल पवार, रवि सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अॅड. गणेश हलकारे पुढे म्‍हणाले की, शिवाजी राजे उत्‍तम प्रशासक, व्‍यवस्‍थापक, रणधुरंदर, मुत्‍सद्दी होते. त्‍यांच्‍या स्‍वराज्‍यात जातीधर्मास थारा नव्‍हता. सर्व जातीधर्माचे लोक त्‍यांच्‍या प्रशासनात व सैन्‍यात होते. आजही त्‍यांच्‍या विचारांची गरज असुन जातीभेद मानणारा देश कधीही महासत्‍ता होऊ शकत नाही.
अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी राजे शिवाजी यांचे शेतक-यांच्‍या कल्‍याणाकडे आपल्‍या स्‍वराज्‍यात विशेष लक्ष होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ आर डि आहिरे यांनी केले तर प्रमुख व्‍यक्‍त्‍याचा परिचय डॉ मेधा सुर्यवंशी हिने करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ ए एस कार्ले यांनी तर आभार स्‍वप्‍नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, February 14, 2017

चाकुर (लातुर) येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदव्‍युत्‍तर संस्थेत माजी विद्यार्थ्‍यीच्‍ाा मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या चाकुर (लातुर) येथील कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन पदव्‍युत्‍तर संस्थेत माजी विद्यार्थ्‍यीच्‍या मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १२ व १३ फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य प्रा हेमंत पाटील यांच्‍या हस्‍ते झाले तर समारोप शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थित संपन्‍न झाला. दोन दिवस चालेल्‍या या मेळाव्‍यात महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या करिअर मधील अनुभव सांगुन भविष्‍य विविध क्षेत्रातील संधीबाबत उपस्थित विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्‍या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते, यात विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्‍यी संघटनेचे अध्‍यक्ष अमोल दौने यांनी मनोगत व्‍यक्‍त करून आभार प्रदर्शन केले. तसेच धारवाड कृषि विद्यापीठात आचार्य पदवीसाठी शिक्षण घेत असलेली माजी विद्या‍र्थ्‍यींनी ज्‍योती हिनेही मार्गदर्शन केले. सदरिल महाविद्यालयाची स्‍थापना २००९ साली झाली असुन प्रथमच माजी विद्यार्थ्‍यांच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्‍यापक व विद्या‍र्थ्‍यांनी परिश्रम घेतले.

Thursday, February 9, 2017

मराठवाडयात ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचन पध्‍दतीचाच वापर करावा....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
मराठवाडयात कोरडवाहु क्षेत्र मोठया प्रमाणात असुन शेतक-यांनी ऊस लागवडीकरिता ठिबक सिंचनाच वापर करावा, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजित एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथील शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, डॉ. बी. व्ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी शेतीमधील पालापाचोळा जाळु नये, यामुळे पर्यावरणाचा -हास होतो, त्‍याचा खत म्‍हणुन वापर करावा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती उत्पन्न वाढवावे, असे नमुद केले.
प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, हरभरा लागवडीवर डॉ. यु. एन. आळसे, कोरडवाहू शेती लागवड तंत्रज्ञानावर डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी, कापुस लागवडीवर डॉ. ए. जी. पंडागळे यांनी तर हुमणी किड व्यवस्थापनावर प्रा. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. जी. पुरी यांनी मानले. याप्रसंगी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी. एस. चव्हाण हे उपस्थित होते. प्रशिक्षणात परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. यु. एन. आळसे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. जी. पुरी, प्रा. डी. डी. पटाईत, के. डी. कौसडीकर, एस. बी. जाधव, सुदर्शन बोराडे, हनुमान बनसोडे, गणेश कटारे, एकनाथ डिकळे, मुरलीधर शिंदे, दिपक वाघ आदींनी परिश्रम घेतले.

कृषि विद्यापीठातील मनुष्‍यबळाच्‍या कौशल्‍य विकासासाठी प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल.......कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने आयोजित राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
कोणत्‍याही संस्‍थेचे भविष्‍य हे संस्‍थेतील उपलब्‍ध मनुष्‍यबळावर अवलंबुन असते, कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांचे ज्ञान अद्यावत करण्‍यासाठी व कौशल्‍य विकासासाठी वेळोवेळी प्रशिक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने मृदापिकजल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकासया विषयावरील राज्यस्तरीय एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपाप्रसंगी (दिनांक ९ फेब्रुवारी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील हे उपस्थित होते तर राजेंद्रनगर (हैद्राबाद) येथील माजी शिक्षण संचालक डॉ पी. चंद्रशेखरराव, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बदलत्या हवामानानुसार शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्यात व विविध शाखेतील प्रयोगशाळा सुसज्य करण्यासाठी सदरिल प्रशिक्षणातील ज्ञानाचा विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांना उपयोग होईल.
माजी कुलगुरू मा. डॉ. व्ही. के. पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले कीआज अन्नधान्य सुरक्षेतेसाठी कार्य करतांना कृषि शास्त्रज्ञांनी प्रशिक्षणातील ज्ञानाचा उपयोग करावा. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्‍या सोडविण्‍यासाठी विविध विषयात आंतरशाखीय प्रशिक्षणाची गरज असुन सदरिल प्रशिक्षणाच्‍या आयोजनाबाबत कौतुक केले.
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले तसेच प्रशिक्षनार्थींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यंवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. प्रशिक्षणा देशातील नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), श्रीचौरे (मुंबई), डॉ. व्हि. के. खर्चे, डॉ काटकर (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), डॉ के. डी. पाटील तसेच विद्यापीठ तज्ञांंनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ३० शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, February 7, 2017

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रशिक्षणात ऊस लागवड तंत्रज्ञान, कोरडवाहु शेती व्‍यवस्थापन, हुमणी किड व्‍यवस्‍थापन, कापसावरील शेंदरी अळीचे व्‍यवस्‍थापन, हरभरा काढणी व प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. यात ऊस लागवड तंत्रज्ञानावर विशेष मार्गदर्शन पाडेगाव येथील मध्‍यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे डॉ धर्मेंद्रकुमार फाळके हे करणार आहेत. प्रशिक्षणाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते होणार आहे, तरी सदरिल प्रशिक्षणाचा लाभ परिसरातील शेतक-यांनी घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे यांनी केले आहे. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्‍यासाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या ०२५४२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर दिनांक ८ फेब्रुुवारी दुपारी ५.०० वाजेपर्यंत आपली नावनोंदणी करावी, असे कळविण्‍यात आले आहे.

Saturday, February 4, 2017

बाजारपेठेची खात्री करूनच दर्जेदार औषधी वनस्‍पतीचे शेतक-यांनी उत्पादन घ्यावे......कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्‍न

राज्‍यात आयुर्वेद उपचार पध्‍दतीचा लोकांत उपयोग वाढत आहे, आयुर्वेद उपचारासाठी दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणीही वाढत आहे. शेतक-यांनी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड करण्‍यापुर्वी बाजारपेठाचा विचार करूनच लागवड करावी. राज्‍यात कोरडवाहु क्षेत्र मोठे असुन कोरडवाहु क्षेत्रात येणा-या औषधी व सुगंधी वनस्‍पतींची निवड शेतक-यांना करावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व पुणे येथील महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ३ फेब्रवारी रोजी औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवड व उपयोगया विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्‍हणुन पुणे येथील फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळाचे संचालक मा. डॉ एस एल जाधव हे उपस्थित होते, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डी एन गोखले, विभाग प्रमुख डॉ डी बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, शेतक-यांनी औषधी वनस्‍पतीची लागवडीपुर्वी प्रत्‍यक्ष आयुर्वेदतज्ञ, आयुर्वेद औषधी निर्माते व प्रक्रिया उद्योजक यांच्‍याशी प्रत्‍यक्ष भेट घेऊनच निर्णय घ्‍यावा. क्‍लस्‍टर पध्‍दतीने गटशेतीच्‍या माध्‍यमातुन औषधी वनस्‍पतीची लागवड व विपणन करण्‍याचा सल्‍लाही शेतक-यांना दिला.  
संचालक मा. डॉ एस एल जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, देशात दर्जेदार औषधी वनस्‍पतीची मागणी वाढत आहे, राज्‍यात आपल्‍या वातावरणात येणा-या औषधी वनस्‍पतीचे क्षेत्र वाढविणे शक्‍य आहे. या वनस्‍पती लागवड व साठवणुक शास्‍त्रशुध्‍दपणे करणे गरजेचे आहे. महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन व औषधी वनस्‍पती मंडळ राज्‍यात विविध कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन औषधी व सुगंधी वनस्पतीच्‍या लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्‍साहित करत आहे. यापासुन मुख्‍य पीकासोबतच अतिरिक्‍त उत्‍पादनाचे साधन शेतक-यांना प्राप्‍त होऊ शकते.  सदरिल वनस्‍पतीच्‍या लागवाडीसाठी शासकिय अनुदानाचीही सोय आहे.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमात सर्पगंधा लागवड तंत्रज्ञानावर घडीपत्रिकेचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विमोजन करण्‍यात आले. सदरिल कार्यशाळेत गुगळ, अश्‍वगंध, सर्पगंधा, चंदन, शतावरी लागवड व उपयोग याविषयावर आयुर्वेद तज्ञ डॉ वैशाल महाजन, आयुर्वेद तज्ञ डॉ कौसडीकर, वनश्री पुरस्‍कार प्राप्‍त श्री महेंद्र घोगरे, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एल एन जावळे, डॉ डि जी दळवी, डॉ अशोक जाधव, डॉ विजया पवार, डॉ के व्‍ही देशमुख आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ डी बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा एस एस शिंदे यांनी केले तर आभार डॉ. एल एन जावळे यांनी मानले. कार्यक्रमास मराठवाडयातील प्रगतशील शेतकरी, आयुर्वेद औषधी निर्माते, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्‍वीतेसाठी कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.