Sunday, August 20, 2017

वनामकृविची विदयापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहीम



परभणी व हिंगोली जिल्‍हयातील साधारणत: पन्‍नास गावात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ करणार मार्गदर्शन

मराठवाडा विभागात यावर्षी खरिप हंगामाच्‍या सुरुवातीस समाधानकारक पावसाझाला परंतु मागील २५ - ३० दिवसाच्‍या पावसाच्‍या खंड पडला तसेच यामुळे किड व रोगांच्‍या प्रादुर्भाव झाला व हा प्रादुर्भाव वाढण्‍याची शक्‍यता आहे, अशा परिस्थितीत खरिप पिकांचे संरक्षण व येणा-या रब्‍बी हंगामाचे नियोजन याकरिता शेतक-यांच्‍या शेतावर भेट देऊन त्‍यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी दि. २३ ऑगस्‍ट ते १४ सप्‍टेंबर दरम्‍यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठाच्‍या वतीने यावर्षीही विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. परभणी व हिंगोली जिल्‍हयाकरीता जिल्‍हा / तालुकास्‍तरीय / गाव पातळीवर तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आला असुन विदयापीठ तंत्रज्ञान प्रभाविपणे शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी विदयापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभाग यांच्‍या सहकार्याने सदरिल जिल्‍हयात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्र, परभणी यांच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविदयालये, संशोधन योजनांच्‍या सहकार्याने विशेष विस्‍तार उपक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. या कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्‍ये कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रत्‍येक तालुक्‍यातील चार गावाचा समावेश करण्‍यात आला असुन प्रत्‍येक दिवशी या चारही गांवाचा दौरा करण्‍याचे नियोजित असुन दोन जिल्‍हयासाठी शास्‍त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्‍यात आले आहेत. या चमुमध्‍ये कृषिविदया, किटकशास्‍त्र, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र, उदया‍नविदया, विस्‍तार शिक्षण आदी पाच विषयतज्ञांचा समावेश करण्‍यात आला आहे. छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन प्रक्षेत्र भेट अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असुन हंगामी खरीप पिके, ऊस, फळपिके, भाजीपाला पिके, पीक संरक्षण व मुलस्‍थानी जलसंधारण आदी विषयावर तसेच रब्‍बी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांना शास्‍त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सद्य परिस्थितीमध्‍ये पिक व्‍यवस्‍थापन, पिक संरक्षण यावर शेतक-यांना विशेष मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे. या कार्यक्रमात दोन्‍ही जिल्‍हयातील एकूण ५२ गांवे कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने प्रस्‍तावित केली असून एकूण प्रवास अंदाजे अंतर ४१०० कि. मी. होणार असून त्‍यासाठी अंदाजे १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. यात  संबंधीत शास्‍त्रज्ञांचा चमु, कृषि विभाग प्रतिनिधी व शेतकरी बांधव यांच्‍या समन्‍वयातुन कार्यक्रमामध्‍ये बदल करता येऊ शकतो. या कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, डॉ. यु. एन. आळसे, प्रा. डि. डी. पटाईतव व डॉ. एस. जी. पुरी यांनी केले आहे.