Thursday, January 25, 2018

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “व्यक्तिमत्व विकासव समुपदेशन” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक २४  व २५ जानेवारी रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, मुंबई येथील पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून नेहमी सकारात्मक भाव दिसणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, माजी प्राचार्य डॉ. आर जी नादरे, महाराष्ट्र रिमोट सेसिंग सेंटर, नागपूर येथील शास्त्रज्ञ संजय अप्तुरकर, जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम, माजी प्राचार्य डॉ. जगदीश कानडे यांनी मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, माजी प्राचार्य बापू अडकिने, माजी प्राचार्य डॉ सुरेश सोनी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे उपस्थित होते. समारोपीय भाषणात मा. डॉ शिवपूजे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्‍यासक्रमाबरोबर स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी प्रशिक्षणार्थीनी अनुभव कथन केले. कार्यशाळेला सुमारे १२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तर प्रशिक्षणार्थिना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक कडाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर आभार प्रा. सुमंत जाधव यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.