Tuesday, March 13, 2018

राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होते....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयाच्‍या रासेयो अंतर्गत मौजे खटिंग सायाळा येथे आयोजित विशेष शिबीराचे उदघाटन
राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या विविध उपक्रमातुन सामाजिक बांधिलकीची जाण महाविद्यालयीन युवकांना होऊन आत्‍मविश्‍वास वाढीस लागण्‍यास मदत होते. राष्‍ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी मोठे व्‍यासपीठ आहे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय यांच्‍या संयुक्त विद्यमाने राष्‍ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे आयोजन मौजे खटिंग सायाळा येथे करण्‍यात आले असुन दिनांक 13 मार्च रोजी उदघाटना प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख, सरपंचा वच्‍छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्‍मणराव खटिंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य सचिव प्रा माधव बावगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बुवाबाजी व भोंदुगिरी हा समाजास लागलेला रोग असुन उच्‍च शिक्षित वर्ग ही यास बळी पडत आहे, असे सांगुन प्रात्‍यक्षिकाव्‍दारे समाजातील अंधश्रध्‍देच्‍या आधारे होत असलेल्‍या फसवेगिरी वर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ ए एस कडाळे, प्राचार्य डॉ टी बी तांबे व विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ ए एस देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक प्रा. व्‍ही बी जाधव यांनी केले. सुत्रसंचालन तेजस्‍वीनी भदरे हिने केले तर आभार स्मिता देशमुख हिने मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार जाधव, डॉ जयकुमार देशमुख, प्रा. एस पी सोळंके, डॉ पपिता गोरखेडे, डॉ संजय पवार आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व गावकरी यांनी परिश्रम घेतले. 
यावेळी रासेयो स्‍वयंसेविकांनी महिला सबलीकरण व स्‍त्रीभ्रुण हत्‍यावर आधारित पथनाटय सादर केले. सदरिल शिबीरात ग्रामस्‍वच्‍छता, श्रमदान, व्‍यक्‍तीमत्‍व विकास, उमेद कार्यक्रम, कृषि तंत्रज्ञान प्रसार मोहिम, प्रभात फेरी, शेतकरी चर्चासत्र, अंधश्रध्‍दा निर्मुलन, योग प्रशिक्षण, एडस जनजागरण, आरोग्‍य तपासणी, रक्‍तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.