Wednesday, September 12, 2018

भावी हरित क्रांतीत सुक्ष्‍म जीवाणुची महत्‍वाची भुमिका ....डॉ विलास पाटील

वनामकृवित आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानात प्रतिपादन
जमिनीची सुपिकता, आरोग्‍य व उत्‍पादकतेत मातीतील जैव विविधता व सुक्ष्‍म जीवाणु यांची मोठे महत्‍व असुन भावी हरित क्रांतीत यांची मोठी भुमिका राहणार असल्‍याचे प्रतिपादन व्‍याख्‍याते शिक्षण संचालक तथा मृदा शास्‍त्रज्ञ डॉ विलास पाटील यांनी केले. भारतीय मृदविज्ञान संस्थानवी दिल्ली व शाखा परभणी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्‍टेबर रोजी आयोजित कै. डॉ. बी. व्ही. मेहता स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु माडॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भारतीय मृदविज्ञान संस्था शाखा परभणी अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल व सचिव डॉमहेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थित होती.
डॉ विलास पाटील पुढे म्‍हणाले की, सुक्ष्म जिवाणुंच्या परस्परक्रिया व मृदसंकरणाचा अन्नद्रंव्यांचा गतिशीलतेवर परिणाम होऊन जमिनीच्‍या आरोग्‍याची जपवणुक होते, हे संशोधनाच्‍या आधारित सिध्‍द झाले आहे. भारतीय संस्‍कृतीत वट, पिंपळ व उंबर या वृक्षास मोठे महत्‍व आहे, या वृक्षाखालील माती ही अधिक जैवसमृध्‍द असुन या मृदाचे संकरण कृषी उत्‍पादन वाढीसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. यावेळी डॉ पाटील यांनी शेतक-यांच्‍या शेतावर घेतलेल्‍या प्रयोगातील निर्ष्‍कशाचे सादरिकरण केले. 
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात कार्य करणा-या शास्त्रज्ञ, विद्यार्थ्‍यी, शेतकरी व विस्‍तार कार्यकर्ता या सर्वांनी कृषि विकासासाठी ए‍कत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. देशातील विख्‍यात मृद शास्‍त्रज्ञांच्‍या संशोधनातील योगदानाबाबत माहिती देऊन बौध्‍दीक संपदा वाढीसाठी अशा व्‍याख्‍यानाचे वेळोवेळी आयोजन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले.    

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. सय्यद इस्माईल यांनी मृदा शास्‍त्रज्ञ कै. डॉ. बी. व्ही. मेहता यांच्‍या कार्याची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ महेश देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्त्रज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.