Pages

Wednesday, April 23, 2025

पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “जागतिक वसुंधरा दिन” साजरा

हवामानातील बदल आणि पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे जागतिक तापमान वाढीची समस्या निर्माण झाली असून त्याचे परिणाम शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच त्याची काळजी घेणे  गरजेचे आहे असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “जागतिक वसुंधरा दिन” दिनांक २२ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी महाउर्जाचे उप सहव्यवस्थापक श्री. विनोद शिरसाठ, भारत सरकारच्या उर्जा कार्यक्षमता ब्युरोचे उर्जा लेखापरीक्षक श्री.केदार खामीतकर, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, विभागप्रमुख डॉ. मदन पेंडके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस.डी.विखे, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.केदार खामीतकर म्हणाले कि, पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संरक्षण, शाश्वत उर्जा पद्धतीवर भर दिला पाहिजे. श्री. विनोद शिरसाठ यांनी उर्जा बचतीच्या विविध उपायांची माहिती सांगून उर्जा बचतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल रामटेके यांनी केले. ते म्हणाले की पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जगातील १९३ देशात “वसुंधरा दिन” साजरा केला जातो. उर्जा बचती विषयी तसेच अपारंपारिक उर्जा वापराविषयी विद्यापीठात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

वसुंधरा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे पदयात्रेचे आयोजन केले. यावेळी उर्जा बचती विषयी जागरूकता निर्माण करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

या  कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागप्रमुख, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा.विवेकानंद भोसले, डॉ. सुमंत जाधव, डॉ. मधुकर मोरे, डॉ.रविंद्र शिंदे, डॉ.प्रमोदिनी मोरे, प्रा.दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. अश्विनी गांवडे तर आभार प्रदर्शन जिमखाना सचिव डॉ.गजानन वसू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अनिकेत वाईकर, इंजि.कार्तिक गिराम यांनी पुढाकार घेतला.