Pages

Monday, May 12, 2025

जगामध्ये शांती आणि सद्भभाव आणण्याचे सामर्थ्य महामानव तथागत भगवान बुद्धांच्या विचारात आहे....! माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

 भाविकांचा महासागर: पूर्णा शहरात उत्साहात पार पडली सामूहिक महाबुद्धवंदना


तथागत भगवान बुद्ध यांच्या २५६९ व्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरांमध्ये सार्वजनिक बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक महाबुद्धवंदना व अभिवादन कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात दिनांक १२ मे रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात शेकडो अनुयायी उपस्थित राहून भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व धम्मदेशक म्हणून अखिल भारतीय भिक्षू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो  यांनी उपस्थितांना बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रभावी धम्मदेशनेतून बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार झाला. हा भव्य कार्यक्रम जिल्हा मैदान, बुद्ध विहार समोरील भदंत उपाली थेरो नगर, पूर्णा (जि. परभणी) येथे पार पडला

प्रमुख अतिथी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी  संबोधित करताना सांगितले संपूर्ण जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रेमभाव निर्माण करण्याचे सामर्थ्य  तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारात आहे. संपूर्ण जगाने बुद्ध विचारसरणी आचरणात आणल्यास जगामध्ये वैरभाव शिल्लक राहणार नाही. माझी जन्मभूमी उत्तर प्रदेश सारनाथ बुद्धगया श्रावस्ती या ठिकाणाला मी नेहमीच भेटी देत असतो. तेथे गेल्यानंतर मनाला शांती आणि कमालीचे समाधान प्राप्त होते. डॉ. उपगुप्त महा थेरो यांचं धम्मकार्य बुद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी करत असलेले त्यांचे प्रयास प्रशंसनीय आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमात सार्वजनिक बुद्ध जयंती  मंडळ व बुद्ध विहार समितीच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा थायलंड येथील बुद्धरूप, शाल, पुष्पहार, बुद्ध विहार लिंबूनि स्मरणिका देऊन यथोचित नागरी सत्कार करण्यात आला.

डॉ. उपगुप्त महाथेरो आपल्या प्रमुख संबोधनांमध्ये प्रकाश टाकताना म्हणाले जगाला युद्ध नको आहे बुद्ध विचाराची गरज आहे. 

यावेळी नांदेड खुरगाव येथील भदंत पयाबोधी थेरो व श्रामनेर बाल भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. भदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते बुद्ध विहारावरील पंचरंगी धम्मद्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ. नीता गायकवाड, डॉ. रामप्रसाद खंदारे, आत्माराम कुरवारे, भारत उबाळे यांची उपस्थिती होती.

भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी महा बुद्ध वंदनेचे पार्श्वभूमी विशद केली.  महा बुद्ध वंदना पार पडल्यानंतर वाद्य वृंदासह सजवलेल्या बुद्ध मूर्तीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने पुढे जात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या मिरवणुकीची सांगता झाली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, जयंती मंडळाचे सल्लागार प्रकाश कांबळे, जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाने ध्वजाला मानवंदना दिली.  जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे, सल्लागार प्रकाश कांबळे यांनी जयंतीचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. भदंत पयावंश यांच्या आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ, पूर्णा आणि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञा डॉ. नीता गायकवाड यांच्यातर्फे करण्यात आले होते. महा बुद्ध वंदना यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक बुद्ध जयंती मंडळ बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेली महिला मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच बोधाचार्य त्र्यंबक कांबळे, उमेश बाराटे, अतुल गवळी, अमृत कऱ्हाळे, किशोर ढाकरगे यानी पार पडला. सूत्रसंचालन श्रीकांत शेवाळे यांनी केले.

कार्यक्रमात सर्वांनी पांढरे शुभ वस्त्र परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतल्याने वातावरणात एक प्रकारची शांती व अनुशासन अनुभवायला मिळाले.



माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा यथोचित नागरी सत्कार