Pages

Saturday, May 3, 2025

नेत्रदान जनजागृतीसाठी वनामकृवित भव्य उपक्रम! - १४१ जणांची संमती; १००० नेत्रदानाचे संमतीचे उद्दिष्ट

 सर्वांनी स्वेच्छने नेत्रदान करून दातृत्वाचा आनंद घ्यावा .... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे नेत्रदानासाठी संमतीपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये दिनांक २ मे रोजी 'नेत्रदान जनजागृती कार्यक्रम' मोठ्या उत्साहात पार पडला. माननीय राज्यपाल  तथा  माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी यांच्या संकल्पनेनुसार मृत्यूनंतर डोळे दानाच्या महत्त्वाच्या विचारसरणीला जनमानसात रुजवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आणि माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली, आरोग्य केंद्र व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष उपक्रमात परभणी येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विजयसाई शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळे, डॉ. राहुल रामटेके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करत भारतीय संस्कृतीमधील दानपरंपरेचा गौरव करत नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित केले. जसे की,  विद्यापीठाच्या वतीने आपण वाण विकासातून अन्नदान करतोतसेच नेत्रदानाद्वारेही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देऊ शकतो, असे ते म्हणाले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात दृष्टीहीन व्यक्तींनी सादर केलेली सांस्कृतिक सादरीकरणं याचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता आपण सर्वांनी स्वेच्छने माननीय राज्यपाल महोदयांच्या संकल्पनेला प्रतिसाद देऊन नेत्रदान करूया आणि दातृत्वाचा आनंद घेऊ, असे नमूद केले.

या मोहिमेत आज (२ मे, रोजी) माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठातील विविध विभागाचे अधिकारी तसेच विद्यार्थी असे एकूण १४१ जणांनी नेत्रदानासाठी संमतीपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले असून, आणखी ३०० ते ३५० जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. दिनांक ५ मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. याशिवाय, या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने मुख्यालय व उपकेंद्रांसह एकूण १००० नेत्रदान संमतीपत्र मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत भारतात जवळपास दोन कोटी अंध लोक आहेत. त्यांच्या आयुष्यातील अंधकार नेत्रदानातून दूर करण्यासाठी मोठी मोहीम उभारली जात आहे.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आपल्या प्रस्ताविकेत ‘डोळे दान’ म्हणजे ‘दृष्टीदान’ असून आपल्या एका निर्णयामुळे दुसऱ्याचे आयुष्य उजळू शकते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात डॉ. विजयसाई शेळके यांनी नेत्रदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. नेत्रदान फक्त मृत्यूनंतरच करता येते आणि कोणताही आजार असलेली व्यक्ती (काही अपवाद वगळता) नेत्रदानासाठी पात्र असते, असे त्यांनी स्पष्ट केले. बुबुळाच्या विविध कारणांमुळे होणाऱ्या अंधत्वावर नेत्रदानाद्वारे उपाय शक्य आहे. त्यांनी सांगितले की, सध्या भारतात दोन कोटींहून अधिक अंध व्यक्ती असून दरवर्षी ३० ते ४० हजार नवीन प्रकरणांची भर पडते, त्यामुळे नेत्रदानाची नितांत आवश्यकता आहे. यावेळी माननीय कुलगुरूंनी नेत्रदानातून मिळणाऱ्या यशाचे प्रमाण विचारले असता ९९ टक्के यश मिळत असून एका नेत्रदानातून चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते असे डॉ. शेळके यांनी सांगितले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीपाद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी – एकूण सुमारे ४०० जणांनी सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून "नेत्रदान - जीवनदान" या विचारसरणीची सखोल रुजवणूक झाली. उपस्थित मान्यवरांनी हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारा आणि डोळे उघडणारा (Eye-opening) ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार 

सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विजयसाई शेळके 

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम