Pages

Monday, April 13, 2026

वनामकृविद्वारा सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथे तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाचे भूमिपूजन

तीळ बियाणे केंद्रामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व उत्पादनवाढीला चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथील कृषि संशोधन केंद्रात राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत (२०२५-२६ ते २०२९-३०) मंजूर तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खाद्यतेल पिकांच्या उत्पादनवाढीसाठी शुद्ध व दर्जेदार बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या तीळ बियाणे केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता वाढून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होईल. तसेच, राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, शुद्ध व प्रमाणित तीळ बियाणे उपलब्ध होणार असून, त्यातून उत्पादनवाढीसोबतच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच, स्थानिक स्तरावर बीज प्रक्रिया व साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाल्याने बियाण्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे सुलभ होणार आहे.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, कृषि महाविद्यालय (लातूर) चे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि व्यवस्थापन महाविद्यालय (चाकूर) चे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रभारी अधिकारी प्रा. सुधीर सूर्यवंशी यांनी तीळ बियाणे केंद्र स्थापन करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, या केंद्रामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निर्मिती, प्रक्रिया व साठवणूक यामध्ये मोठी सुधारणा होऊन शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अमोल सुनेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भगवान कांबळे, श्री. जोगदंड, श्री. प्रमोद कांबळे तसेच कंत्राटदार श्री. साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.