Pages

Thursday, April 16, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रात सिताफळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

 सिताफळ प्रक्रिया केंद्रामुळे मूल्यवर्धन व उद्योजकतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उभारण्यात आलेल्या सिताफळ संशोधन व प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन  दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय बंटेवाड, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे तसेच प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर माननीय कुलगुरूंनी प्रक्रिया केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. यामध्ये पल्पर, आईस्क्रीम मेकिंग मशीन, फर्मेंटर, ड्रायर, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड यंत्रणा, ओव्हन, थ्री-टियर कन्वेयर तसेच वॉक-इन कूलर यांचा समावेश आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, सिताफळ हे अल्प कालावधीत येणारे व लवकर खराब होणारे फळ असल्याने त्यावर प्रक्रिया करून आईस्क्रीम, रबडी, कुल्फी, कस्टर्ड पावडर यांसारखे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यास मोठी संधी आहे. या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी केंद्राच्या स्थापनेपासून (१९९७) आजपर्यंतचा प्रवास सविस्तर मांडला. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेली दर्जेदार रोपे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राकडे जतन केलेल्या २६ विविध जातींची माहितीही त्यांनी दिली. पुढील काळात केवळ उत्पादन वाढीवर भर न देता सिताफळाच्या गराचे मूल्यवर्धन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालासाहेब चिल्लरगे यांनी केले.