Pages

Wednesday, May 14, 2025

वनामकृविच्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत" उपक्रमाची मराठवाड्यात उत्स्फूर्ततेने राबवणूक

 शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत" हा अभिनव उपक्रम मराठवाड्यात दिनांक १४ मे रोजी उत्स्फूर्ततेने राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे होय.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील ८ शास्त्रज्ञांच्या चमूमधील २९ शास्त्रज्ञांनी १० गावांमध्ये २१०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, आणि शेतकरी मेळावे घेतले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानासह हवामान बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील पालम येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. बी. एम. कलालबंडी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री एम. बी. मांडगे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पालम येथील कार्यक्रमात उपस्थित राहून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच सेंद्रिय शेतीस उपयुक्त पीएम-प्रणाम योजना आणि विद्यापीठात चालू असलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. याबरोबरच शेती उत्पादनामध्ये बायोमिक्सचा वापर करण्याचे आणि दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त  आयोजित केलेल्या 'खरीप पीक परिसंवाद' कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.

या कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विविध विस्तार उपक्रमांची उपस्थिती शेतकऱ्यांना माहिती दिली.

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी सोयाबीन, कापूस व तूर लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तर उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ.बी.एम.कलालबंडी आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.मधुकर मांडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.

या उपक्रमात विस्तार शिक्षण संचालनालय, छत्रपती संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर येथील विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्रे,  मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर व फळ संशोधन केंद्र, संभाजीनगर, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प व विभागीय कृषी विस्तार केंद्र, संभाजीनगर, कापूस संशोधन केंद्र, नांदेड, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी या केंद्रातील डॉ. पी. आर. देशमुख,  डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, डॉ. हनुमान गरुड, डॉ. भय्यासाहेब गायकवाड, डॉ. दीपक कच्छवे, प्रा. अरुण गुट्टे,  डॉ.दिप्ती पाटगावकर, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री. विजय पवार, डॉ. संजय देवकुळे, डॉ. पवन ढोके, श्री. इंदरोड आदी शास्त्रज्ञांचा सहभाग होता.

 या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना सुधारित पद्धती, हवामान सुसंगत शेती, कीड व रोग नियंत्रण, उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अनेक ठिकाणी कृषी विद्यावेत्त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्रे शेतकऱ्यांच्या अधिक जवळ जात असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.