Friday, April 5, 2024

वनामकृविच्या संचालक संशोधन यांचा निरोप आणि स्वागत समारंभ

 कर्मचाऱ्याना प्रेरणा देवून पूर्ण क्षमतेने कार्य करून घ्यावे लागेल.....कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संचालक संशोधन या पदावरून डॉ. जगदीश जहागीरदार हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च रोजी निवृत्त झाले आणि त्यांच्या जागेवर डॉ. खिजर बेग यांना नियुक्ती विद्यापीठ प्रशासनाने केली. यानिमित्त डॉ. जगदीश जहागीरदार यांना निरोप तर डॉ. खिजर बेग यांचा स्वागत समारंभ संशोधन संचालनालयाच्या वतीने दिनांक ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. अध्यक्ष्यस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी डॉ. जगदीश जहागीरदार यांनी विद्यापीठास दिलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल आणि संचालक संशोधन म्हणून अल्पकाळात केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले आणि त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल यथोचित सन्मान करून अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांचेही स्वागत करून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्याकडून संचालक संशोधन म्हणून कार्य करत असताना आपल्या आणि विद्यापीठाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि एकूणच कमी मनुष्यबळाची समस्या व इतर आव्हाने आहेत. यासाठी उपलब्ध मनुष्यबळास प्रेरणा देवून पूर्ण क्षमतेने कार्य करून घ्यावे लागेले असे सूचित करून राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थेशी संपर्क ठेवून विद्यापीठामध्ये संशोधनासाठी प्रकल्प मिळविण्याचा प्रयत्न सतत ठेवावा तसेच संशोधन लेख, प्रकाशने वाढवून विध्यार्थी आणि शेतकऱ्यांचे हित जपावे व विद्यापीठाचे नांव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेवून जाण्यासाठी आपले संपूर्ण योगदान द्यावे अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ. जगदीश जहागीरदार यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यापीठामध्ये केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल आणि संचालक संशोधन म्हणून मिळालेलेल्या संधीबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले तसेच विद्यापीठ आणि विद्यापीठ प्रशासनाविषयी ऋण व्यक्त केले. याबरोबरच डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठ प्रशासनाचे संचालक संशोधन म्हणून दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले आणि ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडून विद्यापीठ प्रशासनाच्या आशा पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमामध्ये संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, उपसंचालक सशोधन (अर्थ) डॉ. दिगंबर पेरके, उपसंचालक (बियाणे) डॉ. शिवाजी म्हेत्रे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी आणि सौ. जागृती जहागीरदार यांनी सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रांचालन श्री. ऋषिकेश औढेकर यांनी केले तर आभार डॉ. मदन पेंडके यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.







Thursday, April 4, 2024

वनामाकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची कृषि महाविद्यालय लातूर येथे भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय लातूर येथे वनामाकृवि माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक ३ मार्च रोजी भेट दिली. त्यांच्या सोबत कृषि महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. ठोंबरे आणि पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रामुख्याने प्रियदर्शनी, पदवी आणि पदव्युत्तर या तीन मुलींच्या वसतिगृहास भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनीनी सोबत सवांद साधला आणि त्यांचा आहाराची व निवासाची चौकशी केली असता विद्यार्थिनी सकाळी नाश्ता करत नसल्याचे लक्षात आले. यावरून कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यार्थीनीना सकाळच्या नाश्त्याचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थीनीना सकाळी वसतिगृहामध्ये नाश्ता उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थीनीनी नियमित नाश्ता घेण्याची आग्रही भूमिका घेवून महाविद्यालयास तसे निर्देश दिले. त्यांनी वसतिगृहाच्या स्वच्छतेबाबत आणि वृक्षलागवडीबाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर विद्यार्थ्यांच्या कार्यानुभवातून शिक्षण उपक्रमांतर्गत कार्यान्वित असलेला रेशीम प्रकल्पास भेट दिली याठिकाणी विद्यार्थ्यांनी रेशीम कोषापासून तयार केलेल्या विविध वस्तू, हार यांची पहाणी केली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयामध्ये अर्चर्ड मिडलँड डॅनियल या अमेरिकन कंपनीद्वारा प्राप्त रु. २० लाख सीएसआर निधीतून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सोयाबीन मध्ये रासायनिक शेतीपासून टप्प्या टप्प्याने एकात्मिक शेतीकडे वाटचाल या प्रकल्पास भेट दिली. शेवटी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत विविध उपक्रमावर चर्चा केली आणि निर्देश दिले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. विजय भामरे, डॉ.दयानंद मोरे आणि डॉ. व्यंकट जगताप यांची उपस्थिती होती.




वनामाकृवि अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर येथिल बांधकामाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले निरीक्षण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत तुळजापूर येथे असलेल्या कृषि विज्ञान केंद्रच्या प्रक्षेत्रास १४०० मीटर लांब आणि १.८ मीटर उंचीच्या आरसीसीमध्ये संरक्षण भिंतीचे बांधकाम फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरु करण्यात आलेले आहे. सदरील काम विद्यापीठाची तुळजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विकासासाठी वापरण्यात आलेल्या जमिनीच्या प्राप्त महसुलात करण्यात येत आहे. याकामाचे गुण नियंत्रणासाठी मानके ठरविण्यात आलेले आहेत. त्या मानकाप्रमाणे कामाचा दर्जाचे निरीक्षण दिनांक ०३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता इंजिनियर श्री. दीपक कशाळकरसहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शाखा अभियंता श्री. ढगे आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. चालू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अंदाजपत्रकात दिलेल्या मानकाप्रमाणे काम होते किंवा कसे याचे निरीक्षण केले, तेव्हा सदरील काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी कामाचा गुणात्मक दर्जा उत्कृष्ठ ठेवण्याच्या सूचना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी संबधीत यंत्रणेस दिल्या.








वनामाकृवि अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर येथे शेतकरी कुटुंब आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांच्या आरोग्यात सुधारणा करून जिल्ह्यास “महिला स्वस्थ जिल्हा बनऊ” असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, एकात्मिक बाल विकास योजना तुळजापूर, संपदा ट्रस्ट तुळजापूर आणि ग्रामऊर्जा फाउंडेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी कुटुंब आरोग्य जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री किशोर गोरे, ज्येष्ठ अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. इंदूमती राठोड, संपदा ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक श्री विकास गोफणे, ग्राम ऊर्जा फाउंडेशन धाराशिव चे कार्यकारी संचालक दादासाहेब गायकवाड, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी आदींची मंचावर उपस्थित होती.

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, महिला करुणा, दया, प्रेमाची प्रतिकृती असून तिच्यावर सर्व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. म्हणून महिला स्वतः आरोग्य संपन्न, स्वस्थ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात सुख, शांती आणि भरभराट हवे असेल त्या घरी महिलांचा मान-सन्मान आणि आदर असणे आवश्यक आहे. आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विविध पदवी,पदव्युत्तर तथा आचार्य शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण सध्या जवळजवळ ५० % पर्यंत पोहोचले असून हा एक सकारात्मक बदल आहे. तसेच विद्यापीठाने महिलांना पौष्टिक खाद्य पुरवण्याकरिता ज्वारी आणि बाजरीच्या लोह-झिंकयुक्त निरनिराळ्या वाण विकसित केले आहेत. भविष्यात कृषि विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यातील महिलांकरिता एक आरोग्य पत्रिका  बनवून त्यामध्ये वैयक्तिक महिलांच्या आरोग्याची मासिक, त्रैमासिक वर्गीकरण अहवाल करण्यात येईल असे नमूद केले.

        यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोखले म्हणाले की महाराष्ट्रात महिला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत काम करत राहतात. सारखे कामात गुंतून राहिल्यामुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्याकरिता महिलांना आरोग्य संबंधित प्रशिक्षण देणे खूपच महत्त्वाचे आहे. महिलांमधील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आरोग्याविषयी विविध समस्या उत्पन्न होत असून वेळीच त्यावर उपचार न केल्यास महिलांना भविष्यात इतर आजारांना सामोरे जावे लागते. त्याकरिता महिलांनी पौष्टिक, सकस व ताजा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 कार्यक्रमामध्ये डॉ. मोहन पाटील, श्री. किशोर गोरे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक इंजि. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी केले आणि आभार डॉ.विजयकुमार जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता डॉ. भगवान अरबाड, डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. भैयासाहेब गायकवाड,  श्रीमती कसबे, डॉ. हरवाडीकर, जगदेव हिवराळे, शिवराज रुपनर आदींनी परिश्रम घेतले.




Wednesday, April 3, 2024

राष्ट्रीय पातळीवर वनामकृविचे विद्यार्थी चमकले

भारतीय विश्वविद्यालय संघाद्वारा २८ मार्च ते १ एप्रिल २०२४ दरम्यान पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय युवक महोत्सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या संघातील विद्यार्थ्यांनी साक्षी गणेश डाकुलगे यांनी पोस्टर मेकिंग या ललित कलाप्रकारात रौप्य पदक प्राप्त केले तर सिध्दी देसाई यांनी मेहंदी या कलाप्रकारात कांस्य पदक प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे आणि समन्वयकांचे अभिनंदन केले. या महोत्सवात देशभरातील ८ विभागातील एकूण ११० विद्यापीठे सहभागी झाली होती. या महोत्सवात वनामकृविच्या सहभागी संघाची निवड ही २२ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे पार पडलेल्या ३७ व्या पश्चिम विभागीय युवक महोत्सवातून मेहंदी, पोस्टर आणि मातीकाम या तीन ललित कला प्रकारातून झाली होती. अशाच प्रकारे देशभरातून आलेल्या विविध विभागातील निवडक संघांशी स्पर्धा करत वनामकृवि परभणीच्या संघातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करून चमकले. विद्यार्थांनी मिळविलेल्या यशाबद्दल संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी विद्यार्थ्यांचे आणि समन्वयकांचे अभिनंदन केले. समन्वयक म्हणून डॉ. वैशाली भगत यांनी कार्य केले त्यांना डॉ. सचिन पवने यांनी सहकार्य केले.

Tuesday, April 2, 2024

अन्नतंत्र महाविद्यालय परभणी येथे प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन

 हवामान बदलानुरूप अन्न तंत्रज्ञानातील विशेष कौशल्य मिळवावे... डॉ.उदय खोडके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालय परभणी येथे दर महिन्याला महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांना बोलावून अन्न तंत्रज्ञान विषयांमध्ये पदवी, पदव्युत्तर तथा आचार्य पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील अन्न तंत्र विषयामध्ये संशोधन व अद्यावत तंत्रज्ञान विषयी प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करून उद्योगातील कृषी-प्रक्रिया संधी समजाविल्या जातात. या अनुषंगाने दिनांक १ एप्रिल रोजी प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे येथील अल्कोहोल टेक्नॉलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. बी. बी. गुंजाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. बी बी गुंजाळ यांना अल्कोहोल टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये जवळपास ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी वसंत दादा साखर कारखाना मांजरी पुणे येथे कार्यरत असताना विविध प्रकारचे मद्य निर्मिती उद्योग, वाईन टेक्नॉलॉजी, आणि अन्न तंत्रज्ञान विषया मध्ये मार्गदर्शक तथा कन्सल्टंट म्हणून कार्य केलेले आहे. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर बी क्षीरसागर, माजी प्राचार्य प्रा. पी एन सत्वधर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी विभाग प्रमुख डॉ.एस. एस. थोरात, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी जागतिक हवामान बदलाच्या अनुषंगाने अन्न तंत्रज्ञान विषयांमधील संधी आणि त्यासाठी आवश्यक विशेष कौशल्य मिळविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अन्न उत्पादन, संरक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि अन्न सुरक्षा या मुद्यावरती विशेष भर दिला,
याप्रसंगी डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना अन्नतंत्रज्ञान विषयातील प्रक्रिया उद्योगासाठी उपलब्ध संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव सांगितले तसेच अन्न प्रक्रिया व मुल्यवर्धन, आयात, निर्यात आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी व विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी अंगीकारावायाचे गुण नमूद केले.
प्रास्तविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर बी क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील चालू घडामोडी तसेच विद्यार्थी निगडित यशाबाबत  माहिती दिली. कार्यक्रमात डॉ. एस.एस. थोरात यांनी प्रश्न-उत्तर मालिकेचे नेतृत्व केले, यातून विद्यार्थ्यांना विषयाची सखोल प्राप्ती झाली. हा कार्यक्रम विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी अन्न तंत्रज्ञान आणि कृषी-प्रक्रिया क्षेत्रात भविष्यातील प्रयत्नांना प्रेरणा देणारा ठरला. शेवटी महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे डॉ. बी बी गुंजाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण सहयोगी डॉ.प्रीती ठाकूर यांनी केले आणि आभार प्रदर्शन आचार्य पदवी विद्यार्थी संग्राम वांडेकर यांनी मानले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. कैलास गाडे, डॉ. व्हि.डी. सुर्वे, तसेचे विविध विभागाचे प्राध्यापक डॉ.भारत आगरकर, डॉ.अनुप्रिता जोशी, डॉ.सुरेंद्र सदावर्ते, डॉ. गिरीश माचेवाड, आणि पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीचे विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षण सहयोगी डॉ. एन एम देशमुख, डॉ.देसाई, डॉ.सय्यद जुबेर, डॉ. ए पी खापरे आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


Sunday, March 31, 2024

वनामकृवि अंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर

 विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि गुण नियंत्रण चमूने केले कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था मागील काही वर्षापासून अतिशय खराब झालेली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्वरीत प्रस्ताव दाखल केला, त्यास महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील २६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास मंजुरी दिली. या कामाचा शुभारंभ दिनांक २८ फेब्रुवारी रोजी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

विद्यापीठातील जमिनीची प्रत ओळखुन रस्ते मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम अद्यावत मानकाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट दर्जेचे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस आणि बांधकाम कंत्राट दारास माननीय कुलगुरू यांनी दिल्या होत्या. याकामाचे गुण नियंत्रणासाठी विद्यापीठ पातळीवर गुण नियंत्रण समिती गठीत केलेली आहे, त्यांच्याद्वारे दररोज कामाचे निरीक्षण केले जाते, शिवाय याकामाचा दर्जा महाराष्ट्र राज्य रस्ते संशोधन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक आणि केंद्रीय रस्ते संशोधन यंत्रणेद्वारे करण्याचेही निश्चित केलेले आहे. त्यानुसार याकामाची दिनांक २७ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि महाराष्ट्र राज्य रस्ते संशोधन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांचे गुणनियंत्रण कार्यकारी अभियंता व त्यांचा चमू तसेच विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण परीक्षण समिती यांनी निरीक्षण केले. यावेळी समितीने चालू असलेल्या रस्त्याचे अंदाजपत्रकात दिलेल्या मानकाप्रमाणे काम होते किंवा कसे हे विविध प्रकारच्या गुण नियंत्रण चाचण्या घेऊन कामाचे निरीक्षण केले, तेव्हा सदरील रस्त्याचे काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याची प्रतिक्रिया सर्व सदस्यांनी दिल्या आणि काम योग्य दिशेने प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. यासाठी प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी भेटी देऊन गुण नियंत्रण करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या. या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता इंजिनियर श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण समितीचे सदस्य सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आणि शाखा अभियंता श्री. शेख अहमद आदींची उपस्थिती होती.