Sunday, February 1, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ज्वारी संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रास भेट देऊन तेथील चालू संशोधन उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान ज्वारी पिकातील नवीन वाण व संकरीत (हायब्रिड) विकास, उत्पादनक्षमता वाढविणारे संशोधन तसेच ज्वार विविधता पॅनेल (Sorghum Diversity Panel) अंतर्गत सुरू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.

माननीय कुलगुरूंनी ज्वारी पिकाचे बदलत्या हवामानातील महत्त्व अधोरेखित करताना, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे, कीड-रोग प्रतिकारक्षम व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे वाण विकसित करण्यावर भर दिला. तसेच संशोधन हे केवळ प्रयोगशाळा किंवा शेतमर्यादित न राहता, त्याचे निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान पदव्युत्तर (पीजी) व पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकरीकेंद्रित, समस्या-आधारित व व्यवहार्य संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत माननीय कुलगुरूंनी महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले. संशोधन, विस्तार व शेतकरी यांच्यात सुसूत्रता निर्माण होणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी श्रीमती जयश्री मिश्रा, ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी व ज्वार पैदासकार डॉ. अंबिका मोरे, कृषि सहायक श्री इंगळे तसेच संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली.

माननीय कुलगुरूंच्या या प्रेरणादायी व मार्गदर्शक भेटीमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ज्वारी संशोधन केंद्राच्या वतीने त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रावर सुरू असलेल्या विविध संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी माननीय कुलगुरूंनी करडई पिकाच्या वाणनिर्मिती कार्यक्रमात विशेष रुची दाखवून एफ–१ संकरांची निर्मिती व मूल्यांकन, तसेच विभाजन पिढ्यांची प्रगती व निवड प्रक्रियेबाबत सखोल माहिती घेतली. तसेच जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नेटवर्क प्रकल्पातील कार्यवाहीचाही त्यांनी आढावा घेतला.

यासोबतच ४०० विदेशी व देशी गुणविशेषाधारित करडई ओळींच्या मूल्यांकनाची पाहणीही माननीय कुलगुरूंनी केली. करडई पिकामध्ये अधिक तेलांश असलेले, जैविक ताणतणावांना प्रतिकारक्षम तसेच लवकर पक्व होणारे वाण विकसित करण्याबाबत त्यांनी संशोधकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनामुळे करडई संशोधनास निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पांतर्गत २५० विविध करडई जर्मप्लाझम ओळींचे फिनोटायपिंग कार्य सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. माननीय कुलगुरूंच्या भेटीबद्दल व प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल केंद्रातील शास्त्रज्ञांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. व्ही. आर. घुगे उपस्थित होते.



Saturday, January 31, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘आविष्कार–२०२६’ संशोधन स्पर्धेत संशोधन सादरीकरण

विद्यार्थ्यांच्या संशोधन सादरीकरणाला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; आत्मविश्वास व सकारात्मकतेचा संदेश

सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रतजी यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.

आविष्कार–२०२६’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेअंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या —

१) मानविकी, भाषा व ललित कला

२) वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

३) शुद्ध विज्ञान

४) कृषि व पशुसंवर्धन

५) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

६) वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

सदर स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी ८६७ संशोधक विद्यार्थ्यांचे पोस्टर (भित्तीपत्रके), मॉडेल्स व विविध प्रयोगांचे सादरीकरण घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रयोग दालनास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर) आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी) उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी भित्तीपत्रके, मॉडेल्स व प्रयोगांच्या सादरीकरण दालनास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षकांसमोर सादरीकरण करताना नेमकी व मुद्देसूद मांडणी करावी, पूर्वतयारी ठेवून आत्मविश्वासपूर्ण उत्तरे द्यावीत तसेच विचार व शब्द यांचा योग्य समन्वय साधावा, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संशोधन कारकिर्दीची सुरुवात असून भविष्यात त्याचा निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनात सहभाग घेऊन संशोधन सादर केल्याबद्दल त्यांनी सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्या निवास, भोजन, सुरक्षितता व इतर सोयीसुविधांबाबतही माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी आनंदी व तणावमुक्त जीवन जगावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. स्पर्धेत सहभागी होताना निकालाची चिंता न करता संपूर्ण क्षमतेने सादरीकरण करावे, असे आवाहन करत अनेक सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन स्पष्टपणे दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा संशोधन विषयांचा विद्यापीठ पातळीवरही विचार करून निवड करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. या माध्यमातून मराठवाडा विभागातील शैक्षणिक व संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल, अशी आशा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

पोस्टर (भित्तीपत्रके, मॉडेल्स व विविध प्रयोग) सादरीकरणाचे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विषय गटात पदवी (UG) मधून १५, पदव्युत्तर (PG) मधून १२ आणि पोस्ट पीजी (PPG) मधून १० — अशा सरासरी ३७ विद्यार्थ्यांची पोडियम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मानविकी, भाषा व ललित कला (३७), शुद्ध विज्ञान (३७), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (३७), वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा (३९), वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र (३९) तसेच कृषि व पशुसंवर्धन (४२) अशा एकूण २३१ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता.

दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पोस्टर सादरीकरणातून निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे पोडियम सादरीकरण घेण्यात आले. पोडियम सादरीकरणाच्या प्रारंभी माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परीक्षकांची बैठक पार पडली.

या बैठकीस संमेलनाचे सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर), सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी), संमेलनाच्या Oversee and Study the Organisation उपसमितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. सुनील पाटील, संमेलनाच्या वित्त व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा बाटू विद्यापीठ, लोणेरे येथील डॉ. संजय खोब्रागडे, पोडियम समितीचे अध्यक्ष डॉ. गजानन भालेराव यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील परीक्षक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान डॉ. सुनील पाटील यांनी पोडियम सादरीकरणात अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

पोडियम सादरीकरणाचे मूल्यांकन संबंधित विषयांतील राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येकी सहा तज्ज्ञ परीक्षकांच्या चमूने केले. सहा विषय गटातून प्रत्येकी आठ, अशा एकूण ४८ संशोधक विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तर सहाही गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६ विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३० हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले

प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी

मानविकी, भाषा व ललित कला विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या इनामदार झफीराह झहीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच पणगेकर मनश्री यांनी प्रथम पुरस्कार मिळवला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नवले मनीषा यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रणव सुनील कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या बाणे चैताली यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या जैन वीरा सुनील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शुद्ध विज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या वर्मा प्रमोद यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच परमार ऑस्टिन अश्विन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या मिश्रा राहुल मनोजकुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या तिवारी अनुज कुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर एचएसएनसी विद्यापीठाच्या अमान मिर्झा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अजिंक्य पोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या विश्वकर्मा दिवाकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या शेख माझ मोहम्मद यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रोशन चांदवाणी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला.

वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या क्षीरसागर चिन्मयी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या काटकर मयुरेश यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नाथानी खुशाली यांनी प्रथम क्रमांक मिळवला.




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेत विजेत्यांचे पारितोषिक वितरण संपन्न

सुरवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण 

आविष्कार’ संशोधन स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह

प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.  या संशोधन स्पर्धेत विजेत्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पारितोषिके वितरीत करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित पवार यांच्या प्रतिमेस वंदन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे वाचन सभागृहात करण्यात आले.

बक्षीस वितरणास अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते.  व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, माननीय राज्यपाल नियुक्त देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सदस्य डॉ. प्रिया गेडाम, डॉ. दयाराम पवार, डॉ. विलास अवारी, डॉ. विनायक धुलप तसेच वित्त समितीचे सदस्य डॉ. संजय खोब्रागडे व डॉ. जयंत चौधरी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि डॉ. विश्वनाथ खंदारे यांची उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माननीय राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) यांचे प्रधान सचिव माननीय डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), माननीय राज्यपालांच्या शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय श्री. विकास कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, माननीय राज्यपाल नियुक्त वित्त व्यवस्थापन उपसमितीचे अध्यक्ष श्री. विकास देसाई, डॉ. चारुशीला गायके तसेच श्री. बोधीकिरण सोनकांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले.

या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील ९०७ संशोधक विद्यार्थी नोंदणी केली होती या पैकी ८६७ संशोधक विद्यार्थी त्यांचे संघ व्यवस्थापक व विद्यार्थी कल्याण संचालक, संपूर्ण भारतातून त्या त्या विषयातील (३६ तज्ञ) परीक्षक अशा एकूण १३० प्रतिनिधीसह विविध विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १५०० हून अधिक सहभागी झाले. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती, अकोला, जळगाव, नांदेड, राहुरी, सोलापूर, गडचिरोली आदी भागांतील विद्यापीठांनी सहभाग नोंदविला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण विद्यापीठात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून केवळ संशोधक विद्यार्थ्यांच्या औपचारिक संशोधन स्पर्धा घेण्यात आल्याचे नमूद केले. आजचा बक्षीस वितरण समारंभ हा सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. ए. के. सिंग (भात पिके तज्ज्ञ) आणि पद्मश्री डॉ. श्रीरंग (दादा) लाड (कापूस तज्ज्ञ) यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘आविष्कार’ हा संपूर्ण कार्यक्रम माननीय लोकभवन यांच्या रूपरेषेनुसार व त्यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आल्याचे नमूद करताना माननीय कुलगुरूंनी या स्पर्धेत सादर करण्यात आलेले संशोधन प्रकल्प अत्यंत उच्च दर्जाचे असल्याचे सांगितले. अनेक प्रकल्प इतके दर्जेदार होते की प्रथम व द्वितीय क्रमांक निश्चित करताना परीक्षकांनाही संभ्रम निर्माण झाला. तरीही देशभरातून सहभागी झालेल्या ३६ विविध परीक्षकांच्या सखोल निरीक्षणानंतर ठरलेल्या निकषांनुसार निकाल जाहीर करण्यात आला.

‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची परंपरा स्वामी विवेकानंद यांच्या १२ जानेवारी जन्मदिनी त्यांच्या विचारांची युवकांमध्ये रुजवणूक करण्याच्या उद्देशाने, माननीय लोकभवन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. मात्र परभणी येथे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत घेण्यास माननीय लोकभवन यांनी अनुमती दिल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘आविष्कार’ हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी एकत्र येऊन आपले संशोधन सादर करीत असल्यामुळे त्यांची संशोधक वृत्ती विकसित होत असून ज्ञानवृद्धीस चालना मिळत आहे.

विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, केवळ विद्या प्राप्त केल्याने ज्ञान मिळते; मात्र विद्वान होण्यासाठी विनम्रता आवश्यक आहे. मिळवलेल्या ज्ञानाचा समाजहितासाठी योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हातात अनेक महत्त्वपूर्ण संस्थांची जबाबदारी येऊ शकते, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांनी सुरवातीला माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले की, ‘आविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. याबद्दल त्यांनी माननीय लोकभवन कार्यालयाप्रती आदर व्यक्त केला. तसेच विद्यापीठासाठी भूषण ठरलेले व सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख करत गुणगौरव केला. शेवटी त्यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात अधिक जोमाने कार्य करावे याबरोबरच दूरदृष्टी, कठोर मेहनत, पक्का निश्चय व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड यांनी माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करून पुढे नमूद केले की, चिंतनातूनच संशोधन आपोआप घडते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात किंवा शेतीमध्ये नियमित भेटी देऊन सूक्ष्म निरीक्षण करावे. अशा निरीक्षणामुळे विविध बाबी समजून येतात आणि त्यातून चिंतनास चालना मिळते. त्यांनी आपल्या संशोधनातून सध्या कापूस पिकामध्ये ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित केले असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात मराठवाड्याचे भूषण असलेल्या शाळू ज्वारी या पिकावर संशोधन करून अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.या संशोधन वृत्तीमुळेच आज खेड्यातील संशोधक शेतकरी अशा व्यासपीठावर उभा राहून आपल्याशी संवाद साधतो; यातच खरे यश दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनीही माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून पुढे नमूद केले की, आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यापीठाचे अभिनंदन केले. आविष्कार संशोधन संमेलनाची सुरुवात सन २००६ मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले व त्याची संकल्पना स्पष्ट केली. सध्या नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात असले तरी महाराष्ट्राने सन २००६ मध्येच लोकभवन कार्यालयाच्या माध्यमातून आंतरशाखीय (Interdisciplinary) दृष्टिकोन स्वीकारून सहा विविध विषयगट एकत्र आणले. विद्यार्थ्यांना आपले संशोधन सादर करण्याचे तसेच एकमेकांचे विचार ऐकण्याचे प्रभावी व्यासपीठ म्हणजेच ‘आविष्कार’ संशोधन संमेलन असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले नाहीत त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने कार्य करावे व पुढील काळात यश संपादन करावे. मिळालेल्या पुरस्काराचा खरा आनंद तो समाज व राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात आणल्यासच आहे. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी व उद्योजक बनावे, हेच ‘आविष्कार’मध्ये सहभाग घेतल्याचे खरे यश असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की ज्ञान व संशोधन सादर करण्यासाठी ही एक मोठी व महत्त्वपूर्ण स्पर्धा असून, त्यातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी निश्चितच लाभ होईल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की जिज्ञासू वृत्ती ही यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. यश त्वरित मिळत नाही, त्यासाठी सातत्य आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू वृत्ती ठेवावी, सातत्याने प्रयत्न करावेत आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून माननीय राज्यपाल नियुक्त ‘आविष्कार’ देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, या संशोधन स्पर्धेतून निवडलेल्या प्रकल्पांचे भविष्यात स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

प्रास्ताविकात आविष्कार समितीचे सह-निमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम यांनी माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे महत्त्व विशद केले. तसेच दिनांक २८ जानेवारी रोजी सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ औपचारिक स्पर्धेचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी माननीय लोकभवन कार्यालयाने नियुक्त केलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक श्री. सुनील निंभोरे यांनी आपले अभिप्राय व्यक्त करून भावना मांडल्या.

 ‘Innovation, Invention, Discovery’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. 

आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय लोकभवन कार्यालयाचे समिती सदस्य, आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सह निमंत्रक तथा आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव व दयानंद मोरे यांनी केले, तर आभार डॉ. राजेश कदम यांनी मानले.

 

‘आविष्कार–२०२६’ अंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली.

१. मानविकी, भाषा व ललित कला

२. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

३. शुद्ध विज्ञान

४. कृषि व पशुसंवर्धन

५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

६. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

सदरील स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच  पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली. दिनांक २९ जानेवारी रोजी भित्तीपत्रके, मॉडेल्स, विविध प्रयोग सादरीकरण तर दिनांक ३० जानेवारी रोजी पोडियम सादरीकरण घेण्यात आले. या सर्वांचे परीक्षण सबंधित विषयातील तज्ज्ञ परीक्षाकाद्वारे करण्यात आले. प्रत्येक ६ गटातून प्रत्येकी ८ प्रमाणे एकूण ४८ विद्यार्थांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार तर ६ गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६ विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३० हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले.


आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार 

माननीय राज्यपाल नियुक्त ‘आविष्कार’ देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील 

आविष्कार समितीचे सह-निमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम 

बामू विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक श्री. सुनील निंभोरे 



माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भावपूर्ण श्रद्धांजली

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस वंदन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे वाचन आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेतील विजेत्या संशोधक विद्यार्थ्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पारितोषिक वितरण कार्यक्रमापूर्वी सभागृहात करण्यात आले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, माननीय राज्यपाल नियुक्त देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सदस्य डॉ. प्रिया गेडाम, डॉ. दयाराम पवार, डॉ. विलास अवारी व डॉ. विनायक धुलप तसेच वित्त समितीचे सदस्य डॉ. संजय खोब्रागडे, डॉ. चारुशीला गायके व डॉ. जयंत चौधरी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, तसेच विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे व डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण विद्यापीठात शोककळा पसरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून केवळ संशोधक विद्यार्थ्यांच्या औपचारिक संशोधन स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. सुनील पाटील व डॉ. राजेश कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी संशोधन स्पर्धेत सहभागी महाराष्ट्रातील कृषि व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील ८६७ संशोधक विद्यार्थी, त्यांचे संघ व्यवस्थापक, विद्यार्थी कल्याण संचालक, परीक्षक अशा एकूण १३० प्रतिनिधींसह विविध विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण १५०० हून अधिक उपस्थित होते. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती, अकोला, जळगाव, नांदेड, राहुरी, सोलापूर, गडचिरोली आदी भागांतील विद्यापीठांचा सहभाग होता.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास मान्यवरांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांची दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सदिच्छा भेट झाली. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील हेही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रातील सुरू असलेल्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीविषयक संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, प्रात्यक्षिके तसेच शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याची माहिती घेतली. केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नवोपक्रमशील उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही भविष्यातील शाश्वत शेती व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करून, या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांनीही संशोधन व विस्तार यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.

डॉ. आनंद गोरे यांनी या भेटी बाबत मान्यवरांचे आभार मानले, यावेळी केंद्रातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





फायदेशीर कापूस उत्पादनासाठी सघन लागवड व पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कमी अंतरावर सघन पद्धतीने लागवड करावी, तसेच कीड व्यवस्थापनावरील खर्च आणि त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी मौजे सायाळ (ता. लोहा, जि. नांदेड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थित होते.

सद्यस्थितीत हवामान बदलामुळे अतिवृष्टी अथवा पावसाच्या खंडामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, बेडवरील लागवड, कमी कालावधीच्या वाणांची निवड अशा जोखीम कमी करणाऱ्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्याऐवजी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पर्यायी निविष्ठा व आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. श्रम, सचोटी व सत्कार्य यांमुळेच जीवन आनंदमय होते, असा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. तसेच शेतीकामात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी केल्याशिवाय कुटुंबाची सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही, असेही माननीय कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या बीटी स्वरूपातील सरळ कपाशी वाणांची माहिती दिली. तसेच विविध पिकांचे अधिक उत्पादनक्षम वाण विद्यापीठाने विकसित केले असून शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड करावी, असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाने शिफारस केलेल्या पीक लागवड व संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात सातत्य येऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सायाळ गावातील प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी सघन पद्धतीने कापूस लागवड केल्यामुळे उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञानामुळे अळीचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. पारडी (ता. लोहा) येथील महिला शेतकरी गटाच्या सदस्या सौ. वर्षा पवार व इतर सदस्यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. कापूस पिकात मूग हे आंतरपीक घेतल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली असून, मूगाची डाळ गटामार्फत तयार करून प्रक्रिया उद्योग सुरू केल्याने अधिक आर्थिक लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कमी खर्चात उत्पादनात वाढ होत असल्याचे अनुभवही त्यांनी कथन केले.

या मेळाव्यास संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, तसेच कृषि विभाग, तालुका लोहा येथील अधिकारी व कर्मचारी आणि पंचक्रोशीतील सुमारे ३०० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायाळ येथील ग्रामस्थ तसेच संशोधन केंद्राचे श्री. सोनुले, श्री. ईंदरोड व श्री. जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.