Wednesday, June 18, 2025

खरीप हंगामासाठी विभागीय संशोधन व सल्लागार समितीची ७७ वी बैठक उत्साहात पार

 शेतकरी देवो भव” ही भावना साकारण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प येथे दिनांक १७ जून रोजी ‘७७ वी खरीप विभागीय कृषि विस्तार व सल्लागार समितीची बैठक’ उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांनी भूषवले.

या बैठकीस महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख (छ. संभाजीनगर) व श्री. साहेबराव दिवेकर (लातूर), तसेच विद्यापीठातील विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जिल्हा वन अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विस्तार कृषि विद्यावेत्ता उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव:” ही संकल्पना मांडत, विद्यापीठाच्या संशोधन व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेली तंत्रज्ञान शिफारस थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात कपात आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शनाची आज नितांत आवश्यकता आहे. “मन प्रसन्न ठेवून कार्य केल्यास जीवनशैली आनंदी राहते आणि चिरतरुणतेची अनुभूती मिळते,” असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीचे त्यांनी महाराष्ट्रातील शेती विकासाचा आदर्श ‘मॉडेल’ म्हणून गौरव केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून राज्यात विभागीय रचनेनुसार चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. १९६० पासून निम्न कृषि शिक्षण सुरू झाले असून, त्यातून शाळा आणि संस्थांमधून कुशल मनुष्यबळ घडवण्याचे मोठे कार्य पार पडले, असेही त्यांनी स्पष्ट केले. माननीय कुलगुरूंनी सांगितले की, राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, पुणे येथील कृषि परिषद आणि विविध विभागांमार्फत (लाईन डिपार्टमेंट्स) आयोजित बैठकीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची शिफारस सातत्याने केली जाते. हे तंत्रज्ञानप्रसाराचे एक आदर्श मॉडेल असून, अशा प्रकारचा दृष्टिकोन देशातील इतर राज्यांत फारसा दिसून येत नाही, असे ते म्हणाले. शेतीच्या सर्वांगीण समृद्धीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या संस्थेने चांगले कार्य केल्यास, इतर संस्थांनी त्याचा उपयोग करून आपले कार्य पुढे न्यावे, असे सांगत त्यांनी सहकार्याची भावना अधोरेखित केली. विद्यापीठ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने वसमत येथील संशोधन केंद्रात ऊस उत्पादनावर आधारित संशोधनाला चालना देणार आहे. तसेच, जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारत सरकारच्या ‘पीएम प्रणाम’ योजनेचा प्रभावी प्रसार केला जाणार असून, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला यामुळे बळकटी मिळेल, असे यावेळी सांगितले. विद्यापीठाने विविध संशोधन प्रकल्प शासनाकडे सादर केले असून, संशोधन प्रयोगशाळांसाठी दिलेल्या भरीव आर्थिक मदतीबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभार मानले. शेतकरी देवो भव:’ ही भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विद्यापीठ व इतर सर्व विभागांनी आपली ताकद ओळखून, सहकार्यात्मक भावना, नवोपक्रमशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन एकत्र साधावा,” असे त्यांनी नमूद केले. शेवटी, त्यांनी वनक्षेत्र वाढीसाठी वन विज्ञान केंद्र स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणालाही चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे  यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कृषि विद्यापीठांच्या शिफारसी उपयुक्त ठरत असून यासाठी संशोधन व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कापसाखालील क्षेत्र घटत चालले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मजुरांची टंचाई. या पार्श्वभूमीवर कापूस वेचण्यासाठी यांत्रिकीकरणावर आधारित तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. कापूस हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासाठी विशेष संशोधनाची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितले की, ऊस पिकासह कमी पाण्यावर येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन होणे आवश्यक आहे. आच्छादन, पाचटाचा योग्य वापर आणि उसापासून पोटॅशसारखी उपयुक्त उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. हळद आणि आद्रक यासारख्या नगदी पिकांवरही संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी अनेकदा पीक उत्पादनात अपयशी ठरतात, हे अपयश दूर करण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचे कार्य हाती घ्यावे. बायोमिक्समध्ये  विद्यापीठांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्याचे विकेंद्रीकरण करून ते मराठवाड्यातील इतर केंद्रांवर पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. सेंद्रिय घटकांच्या आधारावर पीक शिफारशी करता याव्यात यासाठी विशिष्ट मानके तयार करावीत, तसेच कीटकनाशकांचा वापर पीकस्थितीच्या आधारेच करावा. यामुळे उरलेले अवशेष (residual effect) टाळता येतील. यासाठी शेतकरी व कृषि सेवा केंद्र चालकांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोसंबी फळगळीचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मराठवाड्यात ज्वारीचा हुरडा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याच्या साठवणूक क्षमतेसाठी शिफारशी तयार करून उत्पादन खर्चात बचत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शेतीतील साधनसामुग्रीचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी केली. त्यांनी नमूद केले की, चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेतील शिफारशी, तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी पोहोच सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विभागामार्फत शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया संकलित केल्या जातात आणि त्यानुसार पुढील हंगामासाठी संशोधनाची दिशा ठरवली जाते. यासोबतच, पिकांसंबंधित अडचणी समजून घेऊन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठीही प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख (छ. संभाजीनगर) व श्री. साहेबराव दिवेकर (लातूर), यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांचे प्रत्याभरणे (प्रत्यक्ष अनुभव) मांडले, तसेच विभागासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली. त्यांनी उपयुक्त व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने खजूर, ॲव्होकॅडो, राजमा, ड्रॅगन फ्रूट, देशी कापूस, फळबाग लागवडीसह विविध बाबींवर मार्गदर्शन व यावरील संशोधनाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या चर्चेदरम्यान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच संबंधित विषयांवर उत्तरे दिली. तसेच, भविष्यात यावर सखोल संशोधन करण्याचेही निश्चित करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा वनाधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी ऍग्रो-फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने विशिष्ट प्रकारचे मॉडेल विकसित करावे, असेही त्यांनी सुचवले. या उपक्रमासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान खरीप हंगामासाठी विविध विभागीय योजनांची माहिती, तांत्रिक सल्ला, हवामान आधारित पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन, बियाणे उपलब्धता, खत वापराचे मार्गदर्शन, जलसंधारण व शाश्वत शेती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन डॉ एस बी कदम यांनी केले तर आभार डॉ सी बी पाटील यांनी मानले. बैठक यशस्वीततेसाठी डॉ. डी एस मुटकुळे, डॉ ए बी बागडे, श्री रामेश्वर ठोंबरे आणि राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  




वनामकृविद्वारा सफरचंद लागवडीचा मराठवाड्यात अनोखा प्रयोग

 


मराठवाडा मराठवाडा विभागातील हवामानात काश्मीरसारख्या थंड हवामानात येणाऱ्या सफरचंद फळपिकाची यशस्वी लागवड होऊ शकते का, याचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्रात सफरचंद लागवडीचा एक वेगळा प्रयोग हाती घेतला असल्याचे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रतिपादन केले. फळ संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर दिनांक १७ जून रोजी सफरचंद लागवडीचा औपचारिक शुभारंभ माननीय  कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, उपसंचालक हरिहर कौसडीकर, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. इंद्र मणि म्हणाले की, विभागातील पारंपरिक फळपिकांसोबतच इतर अनोख्या फळपिकांची लागवड करून त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. सध्या प्रक्षेत्रात ॲव्होकॅडो, बेल, ड्रॅगन फ्रूट, आंब्याचे विविध वाण यांची लागवड करण्यात आली असून, याचे परिणाम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.

यावेळी डॉ. रविंद्र नैनवाड, प्रशांत सुरडकर, डॉ. सदाशिव अडकिने, शेख इसाक, डॉ. विजय सावंत यांच्यासह अन्य कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

 



छत्रपती संभाजीनगर येथे जैविक औषधे व खते संशोधन आणि निर्मिती प्रयोगशाळेचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुरू करण्यात आलेल्या जैविक औषधे व जैविक खते संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेचे उद्घाटन दि. १७ जून रोजी  विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख (छत्रपती संभाजीनगर) आणि श्री. साहेबराव दिवेकर (लातूर) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की,  या नविन प्रयोगशाळांमधून ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, मेटारायझियम, व्हर्टिसिलियम, बायोमिक्स यांसारखी जैविक औषधे तसेच ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद व पालाश विरघळणारे जिवाणू, झिंक व गंधक विरघळणारे जिवाणू संघ  यांसारखी जैविक खते मोठ्या प्रमाणावर तयार केली जाणार आहेत. तसेच ही उत्पादने शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कपात व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने होणार आहे, असे नमूद केले.

राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन तथा प्रकल्प प्रमुख  डॉ सूर्यकांत पवार यांनी सांगितले की, या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे. परिणामी, जैविक उत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठा आता छत्रपती संभाजीनगर येथेच उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना परभणीस जाण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान  राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाद्वारे प्राप्त जैविक औषधे व  खते निर्मिती आणि विक्री परवान्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

या वेळी डॉ  दीपक पाटील, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ . हरिहर कौसडीकर, डॉ, दिलीप इंगोले, डॉ चंद्रकांत पाटील, डॉ.ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ आशिष बागडे, डॉ सुरेखा कदम, अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.




Monday, June 16, 2025

वनामकृविला भारतीय कृषि अनुसंधान परिषदे कडून ‘ए ग्रेड’ मानांकन; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा सत्कार सोहळा

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीमार्फत प्रतिष्ठेचे ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या दिनांक १६ मे २०२५ रोजी पार पडलेल्या ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली आहे. या मूल्यांकनात विद्यापीठाने ३.२१ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून, हे संपूर्ण विद्यापीठासाठी अत्यंत गौरवाचे आणि अभिमानास्पद क्षण आहेत.

या यशाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या परभणी येथील कास्ट्राइब कर्मचारी महासंघ शाखेच्यावतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभ दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील कुलगुरू कार्यालयात पार पडला.

या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक व महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान आसेवार तसेच महासंघाचे इतर सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठाचे हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे शक्य झाले, असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले. या मानांकनामुळे विद्यापीठात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे यांच्यासह सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरीने सहकार्याची भावना व्यक्त केली.

हा सत्कार सोहळा केवळ एक औपचारिकता नसून, विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तेची पावती आहे, असेही महासंघाच्यावतीने नमूद करण्यात आले आहे.


Sunday, June 15, 2025

वनामकृवित पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठक संपन्न

 जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

 विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


परभणी जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात उत्पादनवाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योगवाढीवर विशेष भर देण्यात येणार असून, यासाठी शासन, प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छताउर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक १४ जून रोजी आयोजित ‘पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठकी’त त्या बोलत होत्या. या बैठकीस विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, जिल्हाधिकारी माननीय श्री. रघुनाथ गावडे, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. संजय मारिवाला आणि उद्योजक श्री. रावसाहेब घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल असून येथे दूध, रेशीम, फळे, मिरची, झेंडू, टोमॅटो आदी कच्चा माल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अमूल, मदर डेअरी, रामदेवबाबा आदी नामवंत कंपन्यांशी संपर्क साधून दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिल्क टू मिल्क’ या संकल्पनेतून तुतीपासून रेशीम धागा आणि दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करणार आहोत. शेतकऱ्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर थांबू नये तर प्रक्रिया उद्योगात उतरावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सोबतच त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. फळप्रक्रिया, टोमॅटो सॉस, चटणी, मिरची कांडप, झेंडू प्रक्रिया उद्योग यासारख्या गृहउद्योगांना चालना देण्यासाठी गुंतवणूकदारांना परभणीत आमंत्रित करण्यात येईल. स्थानिक उद्योजक व शेतकऱ्यांना योग्य मार्केटिंगसह उत्पादनवाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'अन्न प्रक्रिया उद्योगासाठी परभणी जिल्हा सक्षम असून, येथे जागा, मनुष्यबळ, कच्चा माल, उद्योजक आणि गुंतवणूक यांचा समतोल आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग शाखांसाठी परभणीला प्राधान्य द्यावे, यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्यात येईल,' असे माननीय पालकमंत्र्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्थानिक उद्योजकांना कृषि उत्पादनात मूल्यवर्धन, फूड प्रोसेसिंग आणि मार्केटिंगमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. स्थानिक तरुणांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. परभणीसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीच्या संधी उपलब्ध असून येथे मोठ्या उद्योगनिर्मितीचे ध्येय ठेवूनच कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत, हे बदलत्या आणि प्रयोगशील कृषि उद्योगस्नेही परभणीचे प्रतीक असल्याचे माननीय कुलगुरूंनी स्पष्ट केले. परभणी कृषि विद्यापीठाने अनेक उत्कृष्ट कृषि प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास केला असून, या तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया युनिट्सची उभारणी, मार्केटिंग, प्रशिक्षण व संशोधनावर भर देण्यात येईल, असे माननीय जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी सांगितले.

श्री. संजय मारिवाला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात गुणवत्ता व प्रमाणवाढीवर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

बैठकीचे सूत्रसंचालन उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांनी केले तर आभार सहाय्यक कुलसचिव श्री राम खोबे यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कृषि संशोधक व उद्योजक – आशिष श्रीवास्तव, संदीप माळी, किरण वाघ पाटील, सुहास गोडगे, डॉ. उमेश कांबळे, जश मिराणी, उपेंद्र शाह, प्रसाद जोशी, तसेच पीएनपीचे संचालक नवनाथ बारहाते उपस्थित होते.





Saturday, June 14, 2025

वनामकृविच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ‘बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा’ उत्साहात पार

कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनावर भर : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत (SC Sub Plan) “बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा” दिनांक १३ जून रोजी मौजे भोसा, ता. मानवत, जि. परभणी येथे यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी मंचावर डॉ. हरीश आवारी (मुख्य शास्त्रज्ञ), श्री ऋषिकेश औंढेकर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठात विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन यांसारख्या पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. कमी पाण्यात अधिक उत्पादन हे शाश्वत शेतीचे सूत्र असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविक करताना डॉ. हरीश आवारी यांनी सांगितले की, विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण आणि लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांनी तुषार सिंचन व ठिबक सिंचनाच्या वापरावर भर देत उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी ही तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्या शुभहस्ते अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत भोसा व लोहरा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन व तूर वाणांची बियाणे वाटप करण्यात आली. तसेच विद्यापीठाची कृषि दैनंदिनी व दिनदर्शिकेचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. हरीश आवारी व श्री ऋषिकेश औंढेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन व पाणी बचत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी आधुनिक उपायांची प्रभावी माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रगतशील शेतकरी ॲड. राहुल झोडपे यांनी केले. या कार्यक्रमाला भोसा परिसरातील अनेक शेतकरी बांधव आणि महिलांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास जाधव, कार्तिक गिराम, सुरेश शिंदे आणि प्रगतशील शेतकरी श्री बाबाराव जाधव यांचे विशेष योगदान लाभले.




Thursday, June 12, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात वनामकृविला ‘ईट राईट कॅम्पस’चा ५-स्टार सन्मान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या मराठवाड्यातील अग्रगण्य संस्थेला ‘ईट राईट कॅम्पस’ (Eat Right Campus) उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) कडून ५-स्टार रेटिंगसह सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे विद्यापीठाच्या शाश्वत, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न व्यवस्थापनातील प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.

ईट राईट कॅम्पस’ हा FSSAI चा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यस्थळे आणि रुग्णालये या ठिकाणी सुरक्षित, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक खाद्य पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो राबवण्यात येतो.

या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे कॅम्पस परिसरात स्वच्छ, दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठ्याची हमी, संतुलित आणि पोषक आहाराची सवय वृद्धिंगत करणे तसेच पर्यावरणपूरक खाद्य व्यवस्थापन व प्रक्रिया अंगीकारणे अशी आहेत.

या प्रमाणन प्रक्रियेत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या (FSSAI) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, अन्न सुरक्षा प्रशिक्षण, सुविधांचे मूल्यांकन आणि अंतिम मूल्यमापनानंतर मानांकन दिले जाते. परभणी कृषि विद्यापीठाने या सर्व निकषांची अत्युच्च पातळीवर पूर्तता करून ५-स्टार रेटिंग  मिळवले आहे.

सदर सन्मान प्रमाणपत्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडे प्राधिकरणाने दिनांक १२ जून रोजी सुपूर्द केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या यशस्वी उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन, परभणी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले असून सहायक आयुक्त (अन्न) श्री. अनंतकुमार चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अनिकेत भिसे, श्री. अरुण तम्मलवाड आणि सौ. राजश्री सावंत यांनी प्रमाणन प्रक्रियेत मार्गदर्शन करून विशेष भूमिका बजावली.

या उल्लेखनीय यशामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली असून, इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.