Thursday, May 7, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कृषि विज्ञान केंद्रांची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न

 कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने परभणी येथे दिनांक ५ ते ६ मे २०२६ दरम्यान मराठवाडा विभागातील १२ कृषि विज्ञान केंद्रांची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत १२ कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ उपस्थित राहून सन २०२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विस्तार कार्याबाबत सादरीकरण केले.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. एस. के. रॉय तसेच एनएआयपीचे माजी राष्ट्रीय संचालक डॉ. ए. पी. श्रीवास्तव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच मथुरा येथील आयसीएआर-सीआयआरजीचे संचालक डॉ. आर. पी. मिश्रा, शेरे कश्मीर युनिव्हर्सिटीचे डॉ. गुलाम अहमद पॅरी, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ विस्तार कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही, तोपर्यंत तो पूर्ण अर्थाने चांगला शास्त्रज्ञ ठरत नाही. याकरिता प्रत्येक शास्त्रज्ञाने विस्तार कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने आपल्या जिल्ह्यात उपजीविका सुरक्षिततेविषयी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपालमहोदय यांच्या निर्देशानुसार प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक गाव दत्तक घेऊन त्या गावातील शेतकरी बांधवांना कृषि विषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्याचा प्रत्यक्ष वापर घडवून आणावा आणि त्या गावाला ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. एस. के. रॉय यांनी सांगितले की, देशातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांमार्फत रासायनिक खतांच्या संतुलित वापरासंदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी खरीप हंगामपूर्व “विकसित कृषि संकल्प अभियान” हा कार्यक्रम संपूर्ण देशभर आयोजित करण्यात आला होता. या अभियानामार्फत महाराष्ट्रातील सुमारे १० लाख आणि गुजरातमधील ५ लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ पोहोचले होते. विविध विस्तार कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खरीप हंगामासंबंधी माहिती देण्यात आली तसेच कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सत्रात डॉ. ए. पी. श्रीवास्तव यांनी उपजीविका सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करणेही गरजेचे आहे.

प्रास्ताविकात डॉ. आर. डी. अहिरे यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य विस्तार पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकरी, ग्रामीण युवक आणि विस्तार कार्यकर्त्यांसाठी गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच यावर्षी संभाव्य ‘अल निनो’ परिणाम, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि उपजीविका सुरक्षितता या विषयांवर शेतकरी बांधवांमध्ये व्यापक प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभास परभणी मुख्यालयातील महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख,यांची  उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पटगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले.






Tuesday, May 5, 2026

अल्‍पभूधारक शेतकरी बांधवांना उपयुक्‍त विकसित केलेल्‍या बी पेरणी यंत्राची चाचणी

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचा संयुक्त उपक्रम 

मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू प्रदेश असून येथे शेतीतील अनेक कामे, विशेषतः पेरणी, अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जाते. विविध पिकांच्‍या पेरणीचे करिता एकच किफायतीशीर पेरणी अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे वेळेत पेरणी होऊन जमिनीत असलेल्या ओलाव्याचा योग्य व प्रभावी वापर करता येतो. ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालाची आवश्‍यकता असलेले बी पेरणी यंत्र तयार करण्‍यात आले असुन दिनांक ३ मे रोजी याची यंत्राची चाचणी प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवांनी वापरून करण्‍यात आली आहे. यावेळी आयोजित संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्‍द्र मणि हे होते तर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी व जैव अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सरस्वत यांची विशेष उपस्थिती होते. सदर बैठकीचे आयोजन डॉ. राहुल टी. रामटेके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी यांनी केले.

यंत्राबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, सदरील यंत्र अल्‍पभुधारक शेतकरी बांधना उपयुक्‍त असुन या यंत्रणेमुळे श्रम कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. शेतकरी बांधवाच्‍या सुचनेनुसार यंत्रात बदल करण्‍यात येणार आहेत. शेतकरी महिलांनाही हे यंत्र वापर करता यावा, याकरिता प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे, सदर यंत्र बॅटरी चलित देखिल तयार करण्‍यात येणार आहे. डॉ. धर्मेंद्र सरस्वत म्‍हणाले की, मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालीची बी पेरणी यंत्र तयार करण्‍यात आले असुन यात शेतकरी बांधवाच्‍या अभिप्राय नुसार पुन्‍हा बदल करण्‍यात येणार आहे, यामुळे याची उपयुकतता वाढेल.

या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांशी विविध संवाद बैठकांचे आयोजन करून तसेच सर्वेक्षणाद्वारे पेरणीसंबंधित त्यांच्या गरजा व अभिप्राय जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार ही बी पेरणी यंत्रणा डिझाइन व विकसित करण्यात आले असून यांचा उपयोग प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवांनी करून त्‍याबाबत अभिप्राय दिले, यात त्‍याप्रमाणे बदल करण्‍यात येणार आहे.  या कार्यक्रमादरम्यान परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन आवारगंड, श्री. रमेश पवार, श्री. विद्याधर संगई, श्री. विश्वशंकर जावळे आदी यांनी प्राध्‍यापक डॉ धर्मेंद्र सरस्वत यांच्याशी संवाद साधून विकसित यंत्राबाबत आपले अभिप्राय व सुचना दिल्‍या. हा प्रकल्प माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्‍द्र मणि यांच्या प्रमुख संशोधक (Principal Investigator) म्हणून नेतृत्वाखाली राबविण्यात येत असुन कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व सह-प्रमुख संशोधक डॉ. ओमकार गुप्ताया यांचा सहभाग आहे.  या प्रसंगी डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ प्रविण कापसे, डॉ. अनिकेत वायकर, डॉ. जी. एच. वासू, डॉ अनिल हरकल, डॉ विशाल काळबांडे आदी उपस्थित होते.



Monday, May 4, 2026

वनामकृवित ‘मोगरा फुलला’ने दरवळला संत परंपरेचा सुगंध; परभणीत सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ‘मोगरा फुलला’ हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने संगीतमय व ज्ञानप्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाने संत परंपरा, साहित्य आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न साधला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी संत साहित्यामधील कृषिविषयक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. संतांनी आपल्या अभंग-रचनांमधून शेती, निसर्ग आणि कष्टाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले असून हे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले. संत साहित्य हे केवळ आध्यात्मिक नसून जीवनमार्गदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास डॉ. भीमराव खाडे, श्री. विलास पानखडे, डॉ. रामेश्वर नाईक, ॲड. गोपाळ रोकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अन्ना जगताप, अधिव्याख्याता गणेश शिंदे, सुभाष ढगे, ज्ञानोबाराव नाईक, डॉ. मीनाक्षी पाटील, सौ. शीला चव्हाळ तसेच प्राचार्य डॉ. वामनराव जाधव यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम व शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब काळे, श्री. अरुण टाक, श्री. बबन आव्हाड, डॉ. निलेश दळवे, श्री. मधुकर नायक तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, चतुरंग प्रतिष्ठान आणि वेध परिवाराच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे प्रस्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन श्री. बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रमात निरुपणकार श्री. गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात मोठ्या संख्येने विद्यार्थी व श्रोते उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषि विद्यापीठाच्या सभागृहात रंगलेल्या ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमाने संत परंपरेचा सुगंध आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली.




Sunday, May 3, 2026

वनामकृविद्वारा खरीप २०२६ आकस्मिक नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली “खरीप २०२६ आकस्मिक नियोजन” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन बैठक दिनांक ०२ मे २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविलेल्या खरीप हंगामातील पावसाचा अंदाज (९२% ± ५%) तसेच ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामाचे प्रभावी नियोजन करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘एल निनो’च्या संभाव्य परिस्थितीतून उद्भवणाऱ्या जैविक व अजैविक ताण (biotic abiotic stress) व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली व हवामान अंदाजाच्या आधारे त्यावर सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून भारतीय मौसम विभाग, नवी दिल्ली येथील ॲग्रोमेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ. शेषकुमार गोरोशी उपस्थित होते. त्यांनी “हवामान आधारित कृषी नियोजन” या विषयावर सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः नमूद केले की, परभणी येथील ॲग्रोमेट फील्ड युनिट (AMFU) हे उपग्रह आधारित तंत्रज्ञान व रिअल-टाईम माहितीचा प्रभावी वापर करून देशातील उत्कृष्ट केंद्रांपैकी एक म्हणून कार्य करत आहे.

बैठकीत जिल्हा कृषी आकस्मिक योजना (DACP) अद्ययावत करणे, ‘एल निनो’ व खरीप नियोजन,  भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तसेच बियाणे, खते व पाणी साठवणूक यांचा आढावा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर बैठकीचे नियोजन विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प (AICRP on Agrometeorology) प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.


Saturday, May 2, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाद्वारा महाराष्ट्र दिनानिमित्त जांब गावात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परभणी तालुक्यातील जांब (ता. परभणी) येथे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागामार्फत, अभ्यासक्रमातील “पालक शिक्षण कार्यक्रमाचा बालविवाह प्रतिबंधावर होणारा परिणाम” या संशोधन विषयाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. वीणा भालेराव, प्राध्यापक तथा विभागप्रमुख यांनी बालविवाह या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बालविवाहाची कारणे, त्याचे मुलींवर, कुटुंबावर तसेच भावी पिढ्यांवर होणारे दुष्परिणाम आणि हुंडा प्रथेचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली.

यानंतर विद्यार्थिनींनी “बालविवाह थांबवा, मुलींचे भविष्य वाचवा” या विषयावर नाटिका सादर केली. या नाट्यप्रयोगाद्वारे ग्रामीण भागातील मुली व मातांसमोर बालविवाहाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना बालविवाहाचे परिणाम, हुंडा प्रथा तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत टप्प्याटप्प्याने माहिती देत जनजागृती केली.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पालक व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन बालविवाह प्रतिबंधासाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील अंगणवाडी सेविका तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.


Friday, May 1, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा

राज्याच्या गौरवशाली परंपरेसोबत कृषि व शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन दिनांक  १ मे २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रीडा प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमानिमित्त बोलताना माननीय कुलगुरूंनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा अत्यंत समृद्ध असून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व विविध विकास प्रक्रियांमध्ये राज्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक वारसा मोठा असून राष्ट्रविकासात राज्याचे योगदान अनमोल आहे. संत, वीर, राष्ट्रपुरुष, देशभक्त, योद्धे व समाजसुधारकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत अनेक महान व्यक्तिमत्त्वे घडली. महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांच्या कार्याचा आज संपूर्ण देश आदर्श घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती साधली असून कृषी क्षेत्रात राज्य देशाला दिशादर्शक ठरत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला असून राज्यपातळीवर अग्रगण्य स्थान मिळवले आहे. मागील तीन वर्षांत विद्यापीठाच्या दहा संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच विविध पुरस्कार व पदकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा अधिक उंचावली असून आर्थिक सहाय्य मिळण्यासही मदत होत आहे.

विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर अशा विविध क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत असून सध्याच्या अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विद्यापीठ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातील नकारात्मकतेचा प्रभाव स्वतःवर पडू न देता सकारात्मकतेने पुढे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनुष्यबळ कमी असतानाही विद्यापीठसातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन यावर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले.








Thursday, April 30, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांना निरोप

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण विकास साधावा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक ३० एप्रिल २०२६  रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. डी. विखे, २०२२ बॅचचे समुपदेशक डॉ. एम. आर. मोरे व डॉ. व्ही. के. इंगळे उपस्थित होते.

या समारंभात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, चार वर्षे कृषि अभियांत्रिकीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आता हे विद्यार्थी शेती क्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ड्रोन, ठिबक सिंचन, स्मार्ट शेती अशा तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे कृषि अभियंते ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके म्हणाले की, चार वर्षांत महाविद्यालयात संपादन केलेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर पदवीधरांनी शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. तसेच त्यांनी माजी शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि) डॉ. उदय खोडके, माजी विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके व प्रभारी शिक्षण प्रा. विवेकानंद भोसले यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन केले.

विद्यार्थ्यांच्या वतीने ऋषीतिलक सातोनकर, समर्थ असुतकर, अंशिका राऊत, साक्षी क्षीरसागर व रोहित कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीला प्रथम वर्षांच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मोहिनी चापके, श्रद्धा देशमुख व मुदिता इंगळे यांनी केले. डॉ. एस. डी. विखे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिकेत वाइकर व डॉ. गजानन वसू यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रविंद्र शिंदे तसेच प्राध्यापक डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रेय पाटील, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. शैलजा देशवेना, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.