Sunday, May 17, 2026

वनामकृवि विद्यार्थ्यांची ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन २०२६’ मध्ये दमदार कामगिरी; विद्यापीठाचा पुन्हा गौरव

माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस आणि माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण

विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय यशामागे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रेरणादायी नेतृत्व


महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या समवेत दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन २०२६’मध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतील विजेते व उपविजेत्यांना धनादेश व पुरस्कारांचे वितरण केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सुभाष कुमार आणि वैष्णवी यांनी संशोधनाधिष्ठित अभिनव प्रकल्प सादर करून राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी छाप पाडली.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व प्रेरणा देत असून, विद्यापीठामध्ये उपलब्ध विविध सुविधा आणि संशोधनपर वातावरणाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांसह विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करता येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘कृषी यांत्रिकीकरण कृत्रिम बुद्धीमत्ता व रोबोटिक्स’ अंतर्गत ३डी उच्च-क्षमता फेनोटायपिंगसाठी संसाधन-कार्यक्षम संकरित कृत्रिम बुद्धिमत्ता (Resource-Efficient Hybrid AI for 3D High-Throughput Phenotyping) या विषयावरील अभिनव संशोधन प्रकल्प सादर केला. या प्रकल्पामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि 3D तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या वाढीचे, आकारमानाचे आणि उत्पादनक्षमतेचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या प्रणालीमुळे कच्च्या 3D डेटाच्या प्रक्रियेमध्ये ९८.८ टक्क्यांपर्यंत डेटा कमी होऊनही अचूकता कायम राखण्यात यश आले आहे. तसेच “हायब्रिड व्ही-३ आर्किटेक्चर” आणि “स्टोकॅस्टिक रिफाइनमेंट” (Hybrid V3 Architecture and Stochastic Refinement) यांसारख्या अभिनव संकल्पनांचा वापर करून मॉडेलची कार्यक्षमता अधिक वाढविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात कमी खर्चात अधिक अचूक व जलद विश्लेषण शक्य होणार असून, शेतकरी, संशोधक आणि बीज उत्पादकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पामुळे कृषी क्षेत्रात सुमारे ७५ टक्के खर्च बचत, ५० पट अधिक कार्यक्षमता आणि जलद विश्लेषण क्षमता निर्माण होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर विविध धान्य, कडधान्ये आणि तेलबिया पिकांच्या 3D डेटाबेस निर्मितीसह रोग निदानासाठीही होऊ शकतो.

Friday, May 15, 2026

वनामकृवि अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन २०२६ उत्साहात साजरा

महाविद्यालयाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल : वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाची ५० वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयामध्ये “आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन २०२६” विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच महाविद्यालयाने शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदानातून ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्याद्वारे  आनंद आणि अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या पाच दशकांपासून गृहविज्ञान व सामुदायिक विज्ञान क्षेत्रात महाविद्यालयाने ग्रामीण तसेच शहरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा ठसा उमटवत आहेत.

महाविद्यालयाच्या जडणघडणीत १९७६ पासून अनेक सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा, संस्कृती व सामाजिक कार्यामध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १५ मे २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी आपल्या संदेशात सांगितले की, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, संशोधन व समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळातही ही संस्था अधिक उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्या म्हणाल्या की, शेतकरी महिला व त्यांच्या कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – कृषीरत महिला यांच्या माध्यमातून सातत्याने संशोधन कार्य करण्यात येत आहे.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक करताना सांगितले की, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ही संस्था समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली आहे.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविद्यालयाने संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची प्रेरणा देणारे हे महाविद्यालय प्रेरणादायी केंद्र ठरले आहे.

महाविद्यालयाचे माजी सहायक प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देताना सांगितले की, ५० वर्षांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे संस्थेच्या समर्पित शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या एकत्रित परिश्रमाचे फलित आहे.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सेजल गुंडेवार व श्रेया डागा यांनी केले.








वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात १८ मे रोजी खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृह येथे “खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून राज्याच्या वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री माननीय ना. अॅड. आशीष जयस्वाल आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री परभणी जिल्हा माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार आहेत.

कार्यक्रमास राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य माननीय डॉ. खासदार अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री रामराव वडकुते, लोकसभा सदस्य माननीय खासदार श्री संजय जाधव, विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री. विक्रम काळे, विधानसभा सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री. रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री. बालाजी कल्याणकर, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री. राजेश विटेकर, विधानसभा सदस्य माननीय आमदार श्रीमती श्रीजया चव्हाण हे प्रमुख अतिथी राहणार आहेत.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष माननीय नामदार श्री तुषार पवार आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक तथा वाराणसी येथील बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू माननीय डॉ. पंजाब सिंग, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य माननीय डॉकौशिक बॅनर्जी, माननीय डॉव्ही. एम. मायंदे हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचे कृषि सचिव माननीय डॉ. परिमल सिंग (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. राहुल रंजन महिवाल (भाप्रसे), अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांची कार्यक्रमास  प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेगकुलसचिव श्री. पुरभा काळेविद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम आदींची कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

या परिसंवादामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे नियोजन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि तंत्रज्ञान, सुधारित वाण, यंत्रसामग्री तसेच कृषि पूरक उद्योगांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या विविध घडीपत्रिका, पुस्तिका व ‘शेतीभाती’ मासिकाचे प्रकाशन करण्यात येईल.

कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्रामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी विविध पिकांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या बियाणे विक्रीने होणार आहे.

विद्यापीठाने ज्वारी, मूग, तूर, सोयाबीन आणि बाजरी या पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे विक्रीस ठेवले असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खरेदी करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपलब्ध बियाण्यामध्ये ज्वारीचे ‘परभणी शक्ती’, मूगाचे ‘बीएम-२००३-२’, तुरीचे ‘बीडीएन-७१६ (लाल)’ व ‘बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी)’, सोयाबीनचे ‘एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२ व एमएयूएस-७१’ तसेच बाजरीचे ‘एचबी-१२००’ या वाणांचा समावेश आहे.

बियाण्यांचे दर प्रति किलोनुसार निश्चित करण्यात आले असून ज्वारी बियाणे १२५ रुपये प्रति किलो, मूग २२० रुपये प्रति किलो व तूर २५० रुपये प्रति किलो, सोयाबीन १०० रुपये प्रति किलो आणि बाजरी १९० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. बियाण्यांची विक्री बॅगनिहाय करण्यात येत असून विविध पिकांचे एकूण ३९७.२० क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती बीज प्रक्रिया केंद्राने दिली आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमास शेतकरी, कृषि अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण यांनी केले आहे.


Thursday, May 7, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कृषि विज्ञान केंद्रांची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न

 कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने परभणी येथे दिनांक ५ ते ६ मे २०२६ दरम्यान मराठवाडा विभागातील १२ कृषि विज्ञान केंद्रांची वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत १२ कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ उपस्थित राहून सन २०२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विस्तार कार्याबाबत सादरीकरण केले.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अटारीचे संचालक डॉ. एस. के. रॉय तसेच एनएआयपीचे माजी राष्ट्रीय संचालक डॉ. ए. पी. श्रीवास्तव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच मथुरा येथील आयसीएआर-सीआयआरजीचे संचालक डॉ. आर. पी. मिश्रा, शेरे कश्मीर युनिव्हर्सिटीचे डॉ. गुलाम अहमद पॅरी, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शास्त्रज्ञ विस्तार कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही, तोपर्यंत तो पूर्ण अर्थाने चांगला शास्त्रज्ञ ठरत नाही. याकरिता प्रत्येक शास्त्रज्ञाने विस्तार कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने आपल्या जिल्ह्यात उपजीविका सुरक्षिततेविषयी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपालमहोदय यांच्या निर्देशानुसार प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक गाव दत्तक घेऊन त्या गावातील शेतकरी बांधवांना कृषि विषयक नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्याचा प्रत्यक्ष वापर घडवून आणावा आणि त्या गावाला ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. एस. के. रॉय यांनी सांगितले की, देशातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांमार्फत रासायनिक खतांच्या संतुलित वापरासंदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी खरीप हंगामपूर्व “विकसित कृषि संकल्प अभियान” हा कार्यक्रम संपूर्ण देशभर आयोजित करण्यात आला होता. या अभियानामार्फत महाराष्ट्रातील सुमारे १० लाख आणि गुजरातमधील ५ लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ पोहोचले होते. विविध विस्तार कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खरीप हंगामासंबंधी माहिती देण्यात आली तसेच कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सत्रात डॉ. ए. पी. श्रीवास्तव यांनी उपजीविका सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शाश्वत विकास साधण्यासाठी एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करणेही गरजेचे आहे.

प्रास्ताविकात डॉ. आर. डी. अहिरे यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य विस्तार पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. शेतकरी, ग्रामीण युवक आणि विस्तार कार्यकर्त्यांसाठी गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच यावर्षी संभाव्य ‘अल निनो’ परिणाम, रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि उपजीविका सुरक्षितता या विषयांवर शेतकरी बांधवांमध्ये व्यापक प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभास परभणी मुख्यालयातील महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख,यांची  उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पटगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले.






Tuesday, May 5, 2026

अल्‍पभूधारक शेतकरी बांधवांना उपयुक्‍त विकसित केलेल्‍या बी पेरणी यंत्राची चाचणी

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचा संयुक्त उपक्रम 

मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू प्रदेश असून येथे शेतीतील अनेक कामे, विशेषतः पेरणी, अजूनही पारंपरिक पद्धतीने केली जाते. विविध पिकांच्‍या पेरणीचे करिता एकच किफायतीशीर पेरणी अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे वेळेत पेरणी होऊन जमिनीत असलेल्या ओलाव्याचा योग्य व प्रभावी वापर करता येतो. ही बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि पर्ड्यू विद्यापीठ, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालाची आवश्‍यकता असलेले बी पेरणी यंत्र तयार करण्‍यात आले असुन दिनांक ३ मे रोजी याची यंत्राची चाचणी प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवांनी वापरून करण्‍यात आली आहे. यावेळी आयोजित संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्‍द्र मणि हे होते तर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषी व जैव अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सरस्वत यांची विशेष उपस्थिती होते. सदर बैठकीचे आयोजन डॉ. राहुल टी. रामटेके, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी यांनी केले.

यंत्राबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, सदरील यंत्र अल्‍पभुधारक शेतकरी बांधना उपयुक्‍त असुन या यंत्रणेमुळे श्रम कमी होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. शेतकरी बांधवाच्‍या सुचनेनुसार यंत्रात बदल करण्‍यात येणार आहेत. शेतकरी महिलांनाही हे यंत्र वापर करता यावा, याकरिता प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे, सदर यंत्र बॅटरी चलित देखिल तयार करण्‍यात येणार आहे. डॉ. धर्मेंद्र सरस्वत म्‍हणाले की, मराठवाडा प्रदेशातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक व कमी देखभालीची बी पेरणी यंत्र तयार करण्‍यात आले असुन यात शेतकरी बांधवाच्‍या अभिप्राय नुसार पुन्‍हा बदल करण्‍यात येणार आहे, यामुळे याची उपयुकतता वाढेल.

या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विद्यापीठाच्या संशोधकांनी शेतकऱ्यांशी विविध संवाद बैठकांचे आयोजन करून तसेच सर्वेक्षणाद्वारे पेरणीसंबंधित त्यांच्या गरजा व अभिप्राय जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार ही बी पेरणी यंत्रणा डिझाइन व विकसित करण्यात आले असून यांचा उपयोग प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवांनी करून त्‍याबाबत अभिप्राय दिले, यात त्‍याप्रमाणे बदल करण्‍यात येणार आहे.  या कार्यक्रमादरम्यान परिसरातील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन आवारगंड, श्री. रमेश पवार, श्री. विद्याधर संगई, श्री. विश्वशंकर जावळे आदी यांनी प्राध्‍यापक डॉ धर्मेंद्र सरस्वत यांच्याशी संवाद साधून विकसित यंत्राबाबत आपले अभिप्राय व सुचना दिल्‍या. हा प्रकल्प माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्‍द्र मणि यांच्या प्रमुख संशोधक (Principal Investigator) म्हणून नेतृत्वाखाली राबविण्यात येत असुन कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी व सह-प्रमुख संशोधक डॉ. ओमकार गुप्ताया यांचा सहभाग आहे.  या प्रसंगी डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ प्रविण कापसे, डॉ. अनिकेत वायकर, डॉ. जी. एच. वासू, डॉ अनिल हरकल, डॉ विशाल काळबांडे आदी उपस्थित होते.



Monday, May 4, 2026

वनामकृवित ‘मोगरा फुलला’ने दरवळला संत परंपरेचा सुगंध; परभणीत सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ‘मोगरा फुलला’ हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने संगीतमय व ज्ञानप्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाने संत परंपरा, साहित्य आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा प्रयत्न साधला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी संत साहित्यामधील कृषिविषयक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. संतांनी आपल्या अभंग-रचनांमधून शेती, निसर्ग आणि कष्टाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले असून हे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले. संत साहित्य हे केवळ आध्यात्मिक नसून जीवनमार्गदर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास डॉ. भीमराव खाडे, श्री. विलास पानखडे, डॉ. रामेश्वर नाईक, ॲड. गोपाळ रोकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अन्ना जगताप, अधिव्याख्याता गणेश शिंदे, सुभाष ढगे, ज्ञानोबाराव नाईक, डॉ. मीनाक्षी पाटील, सौ. शीला चव्हाळ तसेच प्राचार्य डॉ. वामनराव जाधव यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम व शिक्षणाधिकारी प्रा. विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब काळे, श्री. अरुण टाक, श्री. बबन आव्हाड, डॉ. निलेश दळवे, श्री. मधुकर नायक तसेच विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, चतुरंग प्रतिष्ठान आणि वेध परिवाराच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रमाचे प्रस्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन श्री. बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रमात निरुपणकार श्री. गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात मोठ्या संख्येने विद्यार्थी व श्रोते उपस्थित राहिल्याने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषि विद्यापीठाच्या सभागृहात रंगलेल्या ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमाने संत परंपरेचा सुगंध आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली.




Sunday, May 3, 2026

वनामकृविद्वारा खरीप २०२६ आकस्मिक नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली “खरीप २०२६ आकस्मिक नियोजन” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन बैठक दिनांक ०२ मे २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तविलेल्या खरीप हंगामातील पावसाचा अंदाज (९२% ± ५%) तसेच ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामाचे प्रभावी नियोजन करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘एल निनो’च्या संभाव्य परिस्थितीतून उद्भवणाऱ्या जैविक व अजैविक ताण (biotic abiotic stress) व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली व हवामान अंदाजाच्या आधारे त्यावर सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

या बैठकीसाठी विशेष निमंत्रित म्हणून भारतीय मौसम विभाग, नवी दिल्ली येथील ॲग्रोमेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ. शेषकुमार गोरोशी उपस्थित होते. त्यांनी “हवामान आधारित कृषी नियोजन” या विषयावर सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः नमूद केले की, परभणी येथील ॲग्रोमेट फील्ड युनिट (AMFU) हे उपग्रह आधारित तंत्रज्ञान व रिअल-टाईम माहितीचा प्रभावी वापर करून देशातील उत्कृष्ट केंद्रांपैकी एक म्हणून कार्य करत आहे.

बैठकीत जिल्हा कृषी आकस्मिक योजना (DACP) अद्ययावत करणे, ‘एल निनो’ व खरीप नियोजन,  भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तसेच बियाणे, खते व पाणी साठवणूक यांचा आढावा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर बैठकीचे नियोजन विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प (AICRP on Agrometeorology) प्रभारी अधिकारी डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.