Thursday, February 19, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांतून समाज व विद्यार्थ्यांनी घडवावे उज्ज्वल भविष्य - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय कुलगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत करून प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी श्री. संघर्ष शृंगारे, विद्यार्थी प्रतिनिधी तथा उत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण अनेक प्रेरणादायी मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. असे महान व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी माता जिजाबाई यांच्यासारखी संस्कारक्षम माता लाभणे आवश्यक आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय कार्य केले. त्यांनी रुजवलेली स्वराज्याची भावना आजही आपण अंगीकारली पाहिजे. पुढे ते म्हणाले की, येत्या चार वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला चारशे वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर ४०० वा, ५०० वा आणि अनंत काळापर्यंत त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावरून हे सिद्ध होते की महान कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण अनंतकाळ केले जाते. म्हणूनच समाजहितासाठी महान कार्य करण्याचे गुण आपण सर्वांनी अंगीकारावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात संरक्षण, आरोग्य, मान-सन्मान, शेतकरी कल्याण यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था होती. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. हे सर्व आदर्श गुण आजच्या समाजाने अंगीकारण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कार्यपद्धती देशाला दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, उज्ज्वल जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारावेत. विद्यापीठातील विद्यार्थी ऊर्जावान असून विविध महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात, हे कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांनी सर्व महाविद्यालयाचे जिमखाना विभाग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती आत्मसात करून ती संपूर्ण देशात पोहोचवावी, असे आवाहन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूरच्या आदिलशाही व मुघल सत्तेला आव्हान देत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ते कुशल प्रशासक, गनिमी कावा तंत्राचे जनक तसेच भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व समाजघटकांना समान सन्मान मिळत होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सांगितले की, शिवाजी महाराजांचे आचरण पावलोपावली केल्यास जीवन सुखकर व यशस्वी होईल.

यावेळी सभागृहात विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. तसेच विद्यार्थिनी साक्षी इंगळे यांनी केलेल्या शिवगर्जना आणि ऋतुजा वारे हिने केलेल्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह संचारला. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांच्या वतीने आयोजित स्पर्धांमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वामन काळबांडे व आशुतोष मदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.

विद्यापीठाच्या मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर शिवजयंती उत्सव साजरा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















वनामकृविद्वारा मानवत येथे ‘करडई शेती दिन’ उत्साहात संपन्न

करडई मधील ३४ टक्के तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प व हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करडई पिकावरील प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘करडई शेती दिन’ मानवत येथे उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम मानवत येथील आंबेगाव रोडवरील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. प्रसाद, कृषि विद्यावेत्ता डॉ. संजीव मलय्या तसेच शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा एन. डी. उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव” हा संदेश देत संशोधनाधिष्ठित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या करडई पिकामध्ये ३४ टक्के तेलाचे प्रमाण असलेले वाण उपलब्ध असून, भविष्यात ते ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे शेतकरी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे व सक्षम शास्त्रज्ञांमुळे जागतिक स्तरावर अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सन्मान हाच शेतीचा सन्मान असून, शेतकऱ्यांना भेटल्यावर देव आपोआप भेटतो, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. याप्रसंगी माननीय कुलगुरूंच्या हस्ते उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी संशोधनाधिष्ठित शेतीचे महत्त्व, विस्तार सेवांची भूमिका तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आर. डी. प्रसाद यांनी करडई पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे निदान याविषयी माहिती दिली, तर डॉ. संजीव मलय्या यांनी करडई पिकासाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत व संतुलित खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश धुतमल यांनी केले. यावेळी तज्ज्ञांनी करडई पिकातील सुधारित वाण, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत, संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. संतोष शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवत येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री व श्री. प्रतापराव सोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, परभणी येथील डॉ. घुगे, श्री. पांचाळ, श्री. मगर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तांत्रिक माहितीचा लाभ घेतला.








वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

 शिवकाळ आणि आजचा भारत” विषयावर प्रा. अरविंद सगर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रा. अरविंद सगर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. धैर्य, संघटन कौशल्य व स्वराज्याची संकल्पना आजच्या युवकांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शनपर भाषणात प्रा. अरविंद सगर यांनी शिवकाळ आणि आजचा भारत” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास विसरता कामा नये, असे सांगत युवकांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थिनी कु. मोदीता इंगळे, कु. आरती शिंदे तसेच विद्यार्थी यशराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा उल्लेख करत देशप्रेम, शिस्त व संघभावना या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. सुमंत जाधव यांनी करून दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, शिवजन्म पाळणा उत्सव, छावा संगमेश्वर आदी ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले. ढोल व लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढली.

व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. विवेकानंद भोसले, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. सुमंत जाधव व डॉ. प्रमोदिनी मोरे उपस्थित होते. तसेच डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. शैलजा देशवेना यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थी सतेज मेटकर, अथर्व घुगे, राम शेडगे, संकेत पवार, समर्थ असूटकर, अभिषेक गवळी तसेच जिमखाना विभागातील श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड, श्री. शंकर शामार्थी व श्री. हनुमंत ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किंजल मोरे व कु. शिवानी डोईजड यांनी केले, तर आभार प्रदर्शन राधेश्याम खंटीग यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक शोभिवंत व संस्मरणीय ठरला.










वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) SC-SP अनुदानांतर्गत व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींसाठी सॉफ्ट स्किल्स” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला असून समारोप मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी शुभेच्छा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून रोजगारक्षम युवक घडविण्यास यामुळे निश्चितच मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सामुदायिक विस्तार व संपर्क व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली.

तीन दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास वाढ, नेतृत्वगुण विकास, निर्णयक्षमता, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर तसेच रोजगाराच्या विविध संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ वीणा भालेराव आणि अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी व्यक्तिमत्त्व व संवाद कौशल्य वृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम यांनी करिअर विकासासाठी प्रभावी संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्रा. डॉ. पंडित निर्मल यांनी व्यक्तिमत्त्व विकासात भाषेची भूमिका उलगडून सांगितली. दुपारच्या सत्रात व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक श्री. शेखर आष्टिकर व शिवाजी महाविद्यालयाचे कुलसचिव विजय मोरे यांनी सॉफ्ट स्किल्स वृद्धीबाबत मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पुण्याचे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक श्री रामेश्वर चिलवंत यांनी अवचेतन मनाची शक्ती व न्यूरोप्लॅस्टिसिटी या विषयावर सखोल कार्यशाळा घेतली. यानंतर माननीय कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कपसे यांनी व्यक्तिमत्त्वाचे SWOT विश्लेषण व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. वीणा भालेराव यांनी समुदायाशी नातेसंबंध वृद्धीवर व्याख्यान दिले.

तिसऱ्या दिवशी डॉ. शिवा ऐथाळ यांनी स्पष्ट विचारसरणी व निर्णयक्षमतेसाठी आवश्यक कौशल्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. नीता गायकवाड यांनी सॉफ्ट स्किल्स व रोजगार संधी यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत अभिप्राय नोंदविला. समारोप सत्रात विकास क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. उपेंद्र सोनटक्के यांनी व्यावसायिक व वैयक्तिक यशासाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले. या कार्यक्रमातून प्रभावी संवाद, निर्णयक्षमता तसेच रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास होऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी अधिक सक्षम करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.