Wednesday, June 3, 2026

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे रावराजुर येथे “खेत बचाओ अभियान” अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणात मृदा आरोग्य, एल-निनो व कार्बन क्रेडिटवर मार्गदर्शन

 जमिनीचे आरोग्य टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज : डॉ. हरिहर कौसडीकर



माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या “खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे रावराजुर, ता. पालम, जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचेठाचेनाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनखाली विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.

यावेळी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अभय जाधव, परभणीचे विख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केदार खटिंग, रावराजुर गावचे श्री अशोकरावजी शिंदे, तसेच प्राणा कंपनीचे श्री. ध्रुव साकोरे यांच्यासह पंचक्रोशीतील सुमारे २०० शेतकरी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले की, जमिनीचे आरोग्य टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य खत व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कमी करावा. तसेच पिकांच्या संतुलित पोषणासाठी उपलब्ध विविध पर्यायांची माहितीही त्यांनी दिली. याबरोबरच, विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पिकांची निवड करावी आणि पेरणी कोणत्या कालावधीत करावी, याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण खरीप हंगामातील संभाव्य पर्जन्यमानाबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

यानंतर डॉ. अभय जाधव यांनी फेरसाळ लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. केदार खटिंग यांनी मानवी आरोग्यासाठी मातीचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

यावेळी श्री. ध्रुव साकोरे यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील माहिती देऊन, प्राणा कंपनीसोबत समन्वय साधून शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिटचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. हेमचंद्र शिंदे यांनी केले, तर प्राध्यापक नितीन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याच कार्यक्रमात डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. केदार खटिंग यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांच्या माती परीक्षणाचे अहवाल वितरित करण्यात आले.







Tuesday, June 2, 2026

वाल्हा येथे “खेत बचाओ अभियान”चा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते शुभारंभ : मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन

 


माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या “खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे वाल्हा (ता. बदनापूर, जि. जालना) येथे अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचा शुभारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते दिनांक २ जून २०२६ रोजी करण्यात आला.

यावेळी वाल्हा गावचे सरपंच श्री. कोल्हे, उपसरपंच श्री. सचिन घाडगे, माजी सभापती पंचायत समिती श्री. संजयजी जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. बद्रीभाऊ पठारे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषी महाविद्यालय बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. डी. के. पाटील, सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रमुख डॉ. सोमवंशी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, २०० हून अधिक शेतकरी तसेच रावेचे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय व जैविक खतांचा अवलंब तसेच शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे ही काळाची गरज असून मृदा परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य खत व्यवस्थापन स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रे व कृषि प्रसार यंत्रणा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणार आहेत. अभियानांतर्गत मृदा परीक्षण, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका, संतुलित खत व्यवस्थापन तसेच पिकनिहाय शिफारसींबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला.




वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनांक ३१ मे २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास प्रकल्प संचालक प्रा. अभिजित संघई तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन केले. शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. अभिजित संघई यांनी “तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या, कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकार यांसारख्या गंभीर आजारांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तंबाखूचे व्यसन केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीलाही घातक ठरते, असे त्यांनी नमूद केले. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीताने करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. सुभाष विखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात तंबाखूविरोधी शपथ घेण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन परिसरात जनजागृती केली. “तंबाखूला द्या नकार, निरोगी जीवनाचा करा स्वीकार” तसेच “व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत” अशा घोषणांद्वारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविण्यात आले. पदयात्रेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मुदिता इंगळे यांनी केले, तर आभार आर्या चोपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. शंकर शामार्थी, श्री. प्रमोद राठोड, श्री. हनुमंत ढगे, श्री. रमेश मोहीते, श्री. माणिक खटींग तसेच विद्यार्थी यश जाधव, श्रद्धा पवार, गीता दुधाटे, संकेत पवार, गणेश बोराडे आणि स्वराज ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.








 

Monday, June 1, 2026

वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम

 

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत समुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक १ जून २०२६ रोजी तंबाखू व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करून तंबाखूमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यांसारख्या गंभीर व्याधी उद्भवतात, त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी तंबाखूमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना तंबाखू व इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. त्यांनी युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच समाजातही जनजागृती करून तंबाखूविरोधी चळवळ अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसरात “तंबाखूला नकार – आरोग्याला होकार” हा संदेश देत जनजागृती करण्यात आली.







Sunday, May 31, 2026

देशपातळीवरील “खेत बचाओ अभियान”मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची सक्रिय भूमिका

 मृदा आरोग्य संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे संकल्प करूया : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या “खेत बचाओ अभियान”मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून सक्रिय सहभाग नोंदविण्यात येणार असल्याची माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी दिली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रे आणि कृषि प्रसार यंत्रणा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, मृदा परीक्षणाला चालना देण्यासाठी तसेच अभियानाची उद्दिष्टे गावागावांत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहतील. विविध प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि शेतकरी संवादाच्या माध्यमातून मातीचे आरोग्य जपण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. यानिमित्त माननीय कुलगुरूंनी सर्व शेतकरी, विद्यार्थी, कृषि अधिकारी आणि नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, आपली माती निरोगी, शेती लाभदायक आणि कृषि शाश्वत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे संकल्प करूया.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खतांचा वापर, जैविक व हरित खतांना प्रोत्साहन, शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे तसेच शेतकऱ्यांना वेळेवर वैज्ञानिक व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. हे अभियान केवळ शासकीय उपक्रम नसून शाश्वत व लाभदायी शेतीसाठीचे व्यापक जनआंदोलन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Thursday, May 28, 2026

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘सीएचएआय सन्माननीय फेलो’ आणि ‘आजीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

 

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री. नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) तसेच ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) या प्रतिष्ठेच्या दुहेरी राष्ट्रीय पुरस्कारांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना गौरविण्यात आले. हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

कृषि शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेषतः कृषी शिक्षणातील गुणवत्ता वृद्धी, संशोधनाला चालना, शेतकरी हिताच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सीएचएआय (CHAI) संस्थेने हा सन्मान जाहीर केला.

‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) हा पुरस्कार भारतीय कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील नेतृत्व व उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो, तर ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) हा पुरस्कार संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान केला जातो.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित करणे तसेच शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य प्रगत पद्धतीने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत अनेक अभिनव उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांसाठी उद्योगसहभागी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना अमेरिका, दक्षिण आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध संस्थांमध्ये विद्यापीठीन व्याख्याते म्हणून कार्य करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून उच्चांकी ३.२१ गुणांसह ‘ए ग्रेड’ हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २५ जुलै २०२२ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI), नवी दिल्ली येथून कृषि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर व आचार्य पदवी संपादन केली आहे. अल्पावधीतच त्यांनी शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी गती दिली आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘भारतरत्न सी. सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ए.एस.ए.बी.ई. (ASABE) चा ‘प्रेसिडेन्शियल सायटेशन पुरस्कार’, जलसंपदा मंत्रालयाचा ‘भूजल संवर्धन पुरस्कार’, भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI) चा ‘सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार’, तसेच आय.ए.ए.बी.ई. (IAABE) व आय.एस.ए.ई. (ISAE) फेलोशिप, ‘भारतीय अभियंता संस्था’चा ‘विख्यात अभियंता पुरस्कार – २०२४’ आणि ‘वर्षातील कुलगुरू – उत्कृष्ट नेतृत्वासाठी पुरस्कार – २०२५’ यांचा समावेश आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवोन्मेष केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या दृष्टीकोनातून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे केवळ मराठवाड्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राचा गौरव वाढला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर व्यापक दखल घेण्यात आली आहे.

या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिवाराच्या सामूहिक कार्य, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव आहे. आधुनिक कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. ‘शेतकरी देवो भवः’ या मूल्याला केंद्रस्थानी ठेवून कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान, हवामान अनुरूप शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठ सातत्याने कार्यरत राहील. हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने आणि नव्या उमेदीने शेतकरी कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल.”

या यशाबद्दल विद्यापीठाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठ म्हणून आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.










वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ राष्ट्रीय पुरस्कार

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी  यांच्या शुभहस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV), परभणी यास ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ (Institutional Fellow of CHAI-2026) हा प्रतिष्ठेचा सन्मान हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारला.

कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदान तसेच उद्यानविद्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे असे CHAI चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंह यांनी नमूद केले.

यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, हा पुरस्कार विद्यापीठाने मराठवाड्यातील शेती विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात नव्या उमेदीने विद्यापीठाच्या कार्यात भर पडून विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यास चालना मिळेल. तसेच, याद्वारे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे कल्याण साधले जाईल.

सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गेल्या पाच दशकांत कृषि शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान प्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यापीठाने विविध पिकांच्या १६० हून अधिक वाणांची निर्मिती, ६० पेक्षा अधिक शेती अवजारे विकसित करणे तसेच ११०० हून अधिक कृषि तंत्रज्ञान व शिफारसी विकसित केल्या आहेत. हवामान बदल, कोरडवाहू शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शेती यावर विद्यापीठ विशेष भर देत आहे.

विद्यापीठाकडे १६ सलग्न आणि ४० मान्यताप्राप्त महाविद्यालये असून याद्वारे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान केली जाते. विद्यापीठाने याद्वारे तब्बल १.२७ लाख कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण केले आहे.  १९ संशोधन केंद्रे, २३ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP), तसेच विस्तृत कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे कार्यरत असून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे केले जात आहे. डिजिटल कृषि, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषि यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतही विद्यापीठ सक्रियपणे कार्यरत आहे.

या सन्मानामुळे विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला मोठी दखल मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.