Sunday, June 7, 2026

भारतीय कृषि विद्या सोसायटीत वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशकपदी नियुक्ती

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन


भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) माननीय महासंचालक तथा कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव डॉ. मांगीलाल जाट यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्या सोसायटीच्या (Indian Society of Agronomy) कार्यकारी समितीची बैठक दिनांक ३० मे २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत द्वैवार्षिक कालावधी २०२६–२०२७ साठी विविध राज्यांच्या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशक (Councillor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख यांनी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

देशातील विविध राज्यांमध्ये कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. भगवान आसेवार यांच्या नियुक्तीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच मराठवाड्यातील कृषि क्षेत्राच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठ परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

“माँ, माटी और जमीन” संकल्पनेतून रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाद्वारा सावरगाव येथे खेत बचाव अभियानांतर्गत भव्य कृषि मेळावा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे - RAWE), राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यापीठाचे रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी “खेत बचाव अभियानांतर्गत” कृषि मेळाव्याचे आयोजन दिनांक ०६ जून २०२६ रोजी सावरगाव खु. ता. मानवत, जि. परभणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला ३५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि सावरगाव गावचे सरपंच श्री. गजानन घाटुळ उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती झाडे, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. संदीप शिंदे व प्रा. धनंजय मोहड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रभारी अधिकारी डॉ. धीरज कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगावकर, डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान, कृषि सहाय्यक श्री. नारायण पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. माणिकराव सोन्नेकर, श्री. परमेश्वर नाना घाटुळ, श्री. आबासाहेब घाटुळ, श्री. संतोष सावते, श्री. अर्जुन घाटुळ व श्री. बबनराव गव्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच RAWE अंतर्गत गावामध्ये कार्यरत असलेले ४० विद्यार्थीही कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अंश उत्पादित धान्यामध्ये राहतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. “माँ, माटी और जमीन” या संकल्पनेनुसार शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी FFF (Fertilizer, Fuel, Foreign Currency) या सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले. या सूत्रानुसार खते, इंधन व परकीय चलनाचा वापर काटेकोरपणे आणि योग्य प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुंद वरंबा-सरी पद्धत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अतिवृष्टीच्या परिस्थितीत पाण्याचा निचरा होतो, तर दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच शक्यतो दरवर्षी शेतीची नांगरणी न करता ३ ते ४ वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करावी. सरळवाण्यामध्ये बियाण्यांची साठवण करून त्यांचा पेरणीसाठी वापर करावा. या पद्धतींचा अवलंब केल्यास पेरणी खर्चात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊन प्रति एकर ३ ते ४ क्विंटल उत्पादनवाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी माती परीक्षण करूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा तसेच गांडूळ खत व शेणखत यांसारख्या जैविक खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन केले. शेतीतील लागवड खर्च, उत्पादन व इतर बाबींची दैनंदिन नोंद ठेवावी तसेच पावसाच्या अंदाजानुसार पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

सावरगाव खु. व मंगरुळ या गावांमध्ये रावे अंतर्गत कार्यरत असलेल्या ४० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. हे विद्यार्थी संबंधित गावांमध्ये पूर्णवेळ वास्तव्यास राहून शेतीविषयक अभ्यास करतात व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान तसेच तुती पीक उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि कन्या स्नेहा थोरात व मनिषा सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मकरंद भोगावकर यांनी केले.











Saturday, June 6, 2026

वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवादात ‘१० ड्रम थिअरी’द्वारे नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून संवादाचा १०१ व्या भागाचे यशस्वी आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी आभासी माध्यमाद्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाच्या १०१ व्या भागाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आणि प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. एस. बी. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमात हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील श्रमनिष्ठा जैव-निविष्ठा संसाधन केंद्राचे प्रमुख तथा “बायोचार” विषयावरील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. शरद पवार यांनी नैसर्गिक शेतीसाठी “१० ड्रम थिअरी” या विषयावरील यशोगाथा सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. संदीप देशमुख यांनी श्री. शरद पवार यांच्या शेतीतील नाविन्यपूर्ण जैव-निविष्ठा संसाधन केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर पिकांवरील विविध कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास डॉ. तुकाराम मोटे, माजी विभागीय कृषि सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. मोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यासाठी प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा तयार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या ऑनलाईन कार्यक्रमात एकूण ५७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. नैसर्गिक शेतीतील जैव-निविष्ठांचे महत्त्व, बायोचार निर्मिती व त्याचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. बेद्रे एस. बी. यांनी केले.






वनामकृविच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ५ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाच्या सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील, कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे हेही उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन दिनचर्या तसेच वसतिगृहातील विविध सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींची माहिती जाणून घेतली. विद्यार्थिनींनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडल्या.

यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू व सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





वसमतला ‘करवंद नगरी’ बनविण्यासाठी वनामकृविचा पुढाकार : अन्न तंत्र महाविद्यालयात करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन चर्चासत्र उत्साहात संपन्न

 करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी समन्वय आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्न तंत्र महाविद्यालयात “करवंद प्रक्रिया आणि मूल्यवर्धन” या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक ४ जून २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. यावेळी परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसमत तालुक्यातील करवंद उत्पादक शेतकरी, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि अन्न तंत्र महाविद्यालय यांनी समन्वयाने कार्य करून करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या करवंद या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या फळाचे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग केल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. भविष्यात वसमत तालुक्याची ओळख “करवंद नगरी” म्हणून राज्यभर निर्माण व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी हवामान बदल आणि सध्या जगासमोर उभ्या असलेल्या ‘एल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानानुरूप शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. जलसंधारण, मृदसंवर्धन, अधिकाधिक वृक्षलागवड आणि जैविक तसेच सेंद्रिय शेतीचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे आवश्यक असून “खेती बचाओ अभियान” हे पर्यावरण संरक्षण, मातीची सुपीकता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी करवंद लागवडीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याच्या संधी तसेच प्रक्रियेद्वारे नफा वाढविण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. केदार खटिंग यांनी करवंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती व मूल्यवर्धन क्षेत्रात अन्न तंत्र महाविद्यालयाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. चर्चासत्रातील तांत्रिक सत्रात उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी करवंद लागवडीचे तंत्र आणि त्यामधील आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेत उपस्थित करवंद उत्पादक शेतकरी श्री. साखरे यांनी करवंद प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रक्रियायुक्त पदार्थांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने व्यापक जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच परिपक्व करवंद फळांच्या काढणीसाठी विद्यापीठाने विशेष काढणी यंत्र विकसित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून एकमुखाने करण्यात आली.

यावेळी करवंद लागवड व प्रक्रिया उद्योगातील प्रगतिशील शेतकरी श्री. सदाशिव अडकिने यांनी करवंद प्रक्रिया उद्योग उभारणीतील प्रत्यक्ष अडचणी तसेच उद्योग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.

चर्चासत्राच्या समन्वयक अधिकारी डॉ. अनुप्रिता जोशी यांनी करवंद प्रक्रिया व त्यापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित पदार्थांबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

विभाग प्रमुख डॉ. के. एस. गाडे यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीसाठी आवश्यक परवाने, गुणवत्ता चाचणी तसेच उत्पादनांच्या टिकवणक्षमतेबाबत सविस्तर विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अनुप्रिता जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. बी. एस. आगरकर तसेच इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि वसमत तालुक्यातील करवंद लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







‘मृदा वाचवा, पाणी वाचवा, शेती वाचवा’ : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे शाश्वत शेतीसाठी आवाहन

वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयाद्वारा मौजे सूरपिंपरी येथे ‘खेती बचाओ अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न




वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत ‘खेती बचाओ अभियान’ मौजे सूरपिंपरी (ता. जि. परभणी) येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘खेती बचाओ अभियान’ हे केवळ जनजागृती अभियान नसून देशाच्या अन्नसुरक्षा व शाश्वत कृषी विकासाशी निगडित राष्ट्रीय चळवळ असल्याचे सांगितले. त्यांनी जमिनीची सुपीकता जपणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणे तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांनी वैज्ञानिक तंत्रज्ञान, आधुनिक कृषी संशोधन आणि विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेती बचाओ अभियान’ अंतर्गत मृदा संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय पदार्थांचा वापर, पीक विविधीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ‘मृदा वाचवा, पाणी वाचवा आणि शेती वाचवा’ हा संदेश आत्मसात करून पुढील पिढ्यांसाठी शेती समृद्ध ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यावर शेती नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कोरडवाहू शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढविण्याचे उपायही सांगितले.

सूरपिंपरीचे सरपंच श्री. विलास बाबर यांनी गावातील विविध पिके, त्यावरील रोग व कीड समस्या तसेच त्या समस्यांवर विद्यापीठामार्फत मिळणाऱ्या तांत्रिक सहाय्याबाबत समाधान व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. त्यांनी ग्रामीण भागातील शेतीसमोरील आव्हाने, विद्यार्थ्यांची भूमिका आणि विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर विविध प्रात्यक्षिकांद्वारे उत्पन्नवाढीचा संदेश दिला.

मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी माती परीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत, प्रयोगशाळेतील तपासणी प्रक्रिया तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखण्याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, विषय विशेषज्ञ डॉ. आनंद दौंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते तसेच मौजे सूरपिंपरी येथील जगन्नाथ पवार, सर्जेराव पवार, श्रीराम जाधव, कपिलराव धुमाळ व इतर ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती होनराव, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती शिंदे आणि सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ऋतुजा खंदारे व वैष्णवी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरत साठे यांनी मानले.







Friday, June 5, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनामकृवित वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ संपन्न

 पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षाची अधिकृत थीम निसर्गापासून प्रेरित : हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी” (Inspired by Nature: For Climate, For Our Future) यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक वनीकरण विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉक येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ दिनांक  ५ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (आयपीएस) उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती सायमा पठाण यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांड, डॉ विलास खर्गखराटे, प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. श्रद्धा धुरागुडे तसेच वन विभागाचे अधिकारी श्री गजापुरे, श्रीमती निलोफर पठाण, श्रीमती चंद्रमोरे, श्रीमती गोरे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन केले. हवामान बदल, वाढते तापमान, भूजल पातळीतील घट, जैवविविधतेचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण या गंभीर आव्हानांवर मात करण्यासाठी व्यापक वृक्षारोपण व त्यांचे संगोपन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “एक वृक्ष म्हणजे केवळ हरित संपत्ती नसून तो शुद्ध हवा, पाणी संवर्धन, मृदा संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलनाचा आधार आहे.” प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठ परिसर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (आयपीएस) यांनी पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवड चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती सायमा पठाण यांनी सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

विद्यापीठाच्या सायळा ब्लॉकमधील गट क्रमांक ३१ ते ४५ आणि ९१ ते १०३ या परिसरात सुमारे ३० मीटर रुंदी आणि ९ किलोमीटर लांबीच्या परिसरात एकूण २४.०० हेक्टर क्षेत्रावर (दोन टप्प्यात) विविध फळझाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. तसेच सायळा ब्लॉक (गट क्र. ५०, ५१ व ५४) येथे १०.०० हेक्टर क्षेत्रावर औषधी, सुगंधी वनस्पती तसेच फळझाडांचे रोपवन विकसित करून  पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि विद्यापीठ परिसर अधिक हरित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून तो सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

याबरोबरच विद्यापीठाने हरित विद्यापीठ संकल्पनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य सुरू केले आहे. विद्यापीठाच्या परिसरातून जाणाऱ्या ४.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत ५०० मीटर रुंद हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे.