Wednesday, March 18, 2026

वनामकृवितील दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पाला प्रकल्प समन्वयक डॉ. आर. एच. वंजारी यांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पास भारतीय मृद विज्ञान संस्था, भोपाळ येथील माननीय प्रकल्प समन्वयक डॉ. आर. एच. वंजारी यांनी दिनांक १७ मार्च २०२६ रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माननीय कुलगुरूनी जागतिक स्तरावरील दीर्घकालीन खतप्रयोग संशोधनाशी तुलना करून जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.

डॉ. आर. एच. वंजारी यांनी दीर्घकालीन खतप्रयोगाच्या अनुषंगाने सेंद्रिय व अजैविक खतांच्या परिणामांचा मृदा आरोग्य व पिकांच्या उत्पादकतेवर होणारा प्रभाव अभ्यासला. विशेषतः मागील दोन दशकांतील पीक चक्रातील बदल व त्याचे परिणाम यावर त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी मृदेमधील कार्बन साठवणूक व कार्बन क्रेडिटच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास मृद विज्ञान विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे, तसेच डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. जावेद जानी यांच्यासह पदव्युत्तर व पीएच.डी. विद्यार्थी उपस्थित होते.

शेवटी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  आणि माननीय डॉ. आर. एच. वंजारी यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे संशोधन कार्याला नवी दिशा मिळणार असून, भविष्यातील अभ्यासासाठी ही भेट उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.







गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व पारंपरिक ज्ञानाचा वापर आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कापूस संशोधन योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कापूस संशोधन योजना व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (IRM) – गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार” प्रकल्पांतर्गत दरवर्षी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने चालू वर्षातील प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकातील कीड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. विशेष अतिथी म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, प्रमुख पाहुणे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे व संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार हे उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी (पशु शक्तीचे यांत्रिकीकरण) डॉ. दयानंद टेकाळे, कापूस संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा जगताप, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिगंबर पटाईत तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे नमूद केले. या अळीवर प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित साधने, मोबाईल अ‍ॅप्स तसेच पारंपरिक ज्ञान (Indigenous Technical Knowledge - ITK) आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा अनुभवपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पुढे त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संशोधनाची दिशा निश्चित करणे आवश्यक असून विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत वेगाने व्हावा, यासाठी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांचा विस्तार कार्यात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. याबरोबरच ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रमांतर्गत शेतीविषयक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणेही तितकेच आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये कृषी शिक्षणाची गोडी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकीकरण पद्धतीने करण्यात आलेल्या कापूस लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांबाबत मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी इस्रायल देशाच्या कृषि अभ्यास दौऱ्यावरून परतलेले प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांचा विद्यापीठातर्फे माननीय कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी घन पद्धतीने कापूस लागवड (HDPS) तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले, तर डॉ. दयानंद टेकाळे यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या बैलचलित अवजारांबाबत व यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून प्रश्नावलीद्वारे कापूस लागवड व कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत अभिप्राय नोंदविण्यात आला, ज्याचा उपयोग पुढील संशोधन व विस्तार कार्यासाठी होणार आहे.

यावेळी उपस्थित खांबेगाव (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील शेतकरी प्रतिनिधी श्री. सुरेश शृंगारपुतळे यांनी प्रकल्पाबद्दल मनोगत व्यक्त करत विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवल्यामुळे त्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले.

प्रास्ताविक डॉ. मेघा जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले आणि आभार श्रीमती सारिका नारळे यांनी मानले.

या कार्यक्रमास माखणी, खांबेगाव (ता. पूर्णा), खानापूर, आर्वी, दैठणा (ता. परभणी) तसेच सायाळा (ता. लोहा, जि. नांदेड) व परभणी जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेले शेतकरी व विद्यापीठातील कर्मचारी असे एकूण सुमारे ८० जण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयआरएम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. इरफान बेग, यंग प्रोफेशनल श्री. नारायण ढगे, श्री. आशिष अंभोरे, श्री. गजानन रोही, श्री. अनिल ठाकर, श्री. विलास ढगे, श्रीमती अंजली इंगळे, श्री. सचिन रणखांब व श्री. प्रशांत पंडित यांनी परिश्रम घेतले.








Tuesday, March 17, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत कृषीसाठी वनस्पती मायक्रोबायोम तंत्रज्ञानावरील २१ दिवसीय प्रशिक्षणात व्याख्याने, प्रयोगशाळा प्रात्यक्षिके व प्रक्षेत्र भेटींवर भर

 

एकात्मिक शेती पद्धती योजना

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून उत्साहात सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सक्रिय सहभाग नोंदवत असून, वनस्पती मायक्रोबायोम, जैव-इनपुट्स तंत्रज्ञान, शाश्वत शेती व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषितंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. व्याख्याने, प्रयोगशाळा प्रात्यक्षिके आणि प्रक्षेत्र भेटी यांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य सर्वांगीण विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक १५ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांना विद्यापीठातील एकात्मिक शेती पद्धती योजनेस भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. लवलीन शुक्ला यांनी सखोल मार्गदर्शन करत ‘पुसा डी-कंपोजर’ या जैव-तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रयोगाची माहिती दिली. एकात्मिक शेती पद्धती योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव यांनीही प्रत्यक्ष दाखल्यांसह माहिती दिली.

प्रशिक्षणाच्या सतराव्या दिवशी, दिनांक १६ मार्च रोजी बायोमिक्स उत्पादन केंद्रात प्रशिक्षणार्थ्यांना बायो-एजंट मल्टिप्लिकेशन तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. बायोमिक्स केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी या तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करत जैव-इनपुट्स निर्मितीतील आधुनिक पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच दिनांक १७ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास भेट दिली. या वेळी केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी येथे राबविण्यात येणाऱ्या विविध तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये शेततळे (Farm Pond) तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती (Intercropping Systems) तसेच पावसावर आधारित एकात्मिक शेती पद्धती (Rainfed Integrated Farming System - IFS) याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक शेती पद्धती मॉडेलमधील फळपिके, शेळीपालन तसेच इतर पूरक व्यवसायांचे घटकही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (हवामानशास्त्र) अंतर्गत कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी वेधशाळेची कार्यप्रणाली स्पष्ट करत हवामानाधारित कृषी नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत व स्मार्ट शेतीसाठी हवामान माहिती कशी उपयुक्त ठरते, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या सर्व उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत असून, त्यांच्या संशोधन व विस्तार कार्याला नवी दिशा मिळत आहे.

या सर्व भेटी दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.




बायोमिक्स उत्पादन केंद्र




कोरडवाहू शेती संशोधन केंद्र 






आखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (हवामान शास्त्र)



वनामकृविच्या सलग्न, नाव्हा (जि. जालना) येथील रंगनाथ महाराज कृषि महाविद्यालयात द्राक्ष शेती मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

 शेतकरी देवो भव:” संदेशातून कृषि क्षेत्रातील आधुनिकतेवर भर – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सलग्न, नाव्हा (जि. जालना) येथील रंगनाथ महाराज कृषि महाविद्यालयात द्राक्ष उत्पादक शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी द्राक्ष शेती मार्गदर्शन शिबिर दिनांक १७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे प्रमुख पाहुणे होते.

आपल्या मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि त्यांनी “शेतकरी देवो भव:” हा संदेश देत कृषि क्षेत्रातील बदलत्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि राष्ट्रीय कृषि विस्तार शिक्षण प्रणाली (NAREES) यांची भूमिका स्पष्ट केली. शेतीचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी “जीवनदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव” हा नारा दिला. तसेच कृषि विद्यापीठांच्या स्थापनेत वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिबिरात द्राक्ष शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यापीठाचे मृदा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी द्राक्ष उत्पादन वाढीसाठी पंचसूत्री नियोजन व मातीच्या आरोग्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. याशिवाय तज्ञांनी द्राक्ष पिकातील रोग, कीड, पाणी व खत व्यवस्थापनाबाबत उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी ‘घड कुज’ व ‘साखर उतरणे’ यांसारख्या समस्यांवर प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांचे शास्त्रोक्त निराकरण केले. काही यशस्वी द्राक्ष बागायतदारांनी आपले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. राहुल बोंद्रे होते. यावेळी उपाध्यक्ष श्री. लक्ष्मणराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष श्री. अरुण इंगोले, प्राचार्य डॉ. व्ही. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि शेतीला विज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढविण्याचे मार्ग स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीधर गडदे यांनी केले, तर आभार डॉ. एस. आर. पवार यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणात कोरडवाहू शेतीसाठी हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञानावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दि. २८ फेब्रुवारी २०२६ पासून उत्साहात सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, त्यांना मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या बाबतीत अत्याधुनिक व शाश्वत कृषि तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून  दिले जात आहे. या उपक्रमामुळे विविध राज्यांतील शास्त्रज्ञ व कृषि तज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडून येत आहे.

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी या प्रशिक्षणांतर्गत विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी “कोरडवाहू शेतीतील हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान” (Climate Resilient Technologies in Dryland Agriculture) या विषयावर अत्यंत मार्गदर्शक व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांनी बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा घेत, जलसंधारण, मृदसंवर्धन, पीक विविधीकरण, दुष्काळ सहनशील वाणांचा वापर, तसेच अचूक शेती (Precision Farming) यांसारख्या उपाययोजनांवर विशेष भर दिला.

यावेळी त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनक्षमतेत वाढ होऊन शेती अधिक शाश्वत व नफा देणारी ठरू शकते. तसेच मायक्रोबायोम आधारित जैव-इनपुट्सचा वापर हा मृदा आरोग्य सुधारण्यासाठी व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी विषयाशी संबंधित विविध शंकांचे निरसन करून घेतले. चर्चासत्रामध्ये त्यांनी आपले अनुभव मांडत हवामान बदलाशी सामना करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली. या हिवाळी शाळेमुळे शाश्वत कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होऊन भविष्यातील कृषि व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.


Saturday, March 14, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जॉन डियर’ पॉवर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

तांत्रिक प्रात्यक्षिकातून कृषि अभियांत्रिकीतील भविष्यातील संधींची ओळख; उद्योग-सज्ज विद्यार्थ्यांच्या घडणीस चालना


शैक्षणिक शिक्षण आणि औद्योगिक नवोपक्रम यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि जॉन डियर, पुणे येथील प्रतिनिधी दीपाली जाधव यांच्या संकल्पनेतून कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ‘जॉन डियर पॉवर अँड टेक्नॉलॉजी ७.०या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आले.

या तांत्रिक प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील संधी व जागतिक बदलांची प्रत्यक्ष माहिती मिळाली. आधुनिक शेतीची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आणि ‘उद्योग-सज्ज’ व्यावसायिक तयार करण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयपूर्तीत हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, अशी भावना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

जॉन डियर इंडियाच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कृषि यंत्रसामग्रीतील अत्याधुनिक प्रगतीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रिमोट सेन्सिंग (RS) तंत्रज्ञानाचा आधुनिक शेती उपकरणांमध्ये कसा वापर केला जातो, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ‘स्मार्ट कनेक्टेड मशीन’ आणि भारतीय शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी डिझाइन केलेल्या उच्च-क्षमतेच्या नव्या यंत्रांचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. विवेकानंद भोसले, जॉन डियरचे मार्केटिंग मॅनेजर इंजि. आशिष चौधरी, सिंचन व निचरा विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, प्रशिक्षण समन्वयक डॉ. मधुकर मोरे आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व जॉन डियरमध्ये कार्यरत इंजि. कैलास टाकळगव्हाणकर यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय पाटील यांनी केले, तर डॉ. अनिकेत वाईकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, इंजि. अनिल हरकळ, इंजि. कौस्तुभ बणे आणि इंजि. विकास यांनी विशेष परिश्रम घेतले.





वनामकृवित ‘शिव वृक्ष वाटिका’चे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या विभागाच्या वतीने विद्यापीठ परिसरात ‘शिव वृक्ष वाटिका’ या विशेष उपक्रमाची स्थापना करण्यात आली असून या वाटिकेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १३ मार्च २०२६ रोजी संपन्न झाले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शिव वृक्ष वाटिका’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करताना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठ परिसरात विविध औषधी, धार्मिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करून या वाटिकेला शैक्षणिक व संशोधनात्मक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ विश्वनाथ खंदारे तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ‘शिव वृक्ष वाटिका’च्या फलकाचे अनावरण करून परिसराची पाहणी केली व लागवड करण्यात आलेल्या वृक्षांबाबत माहिती घेतली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वृक्षांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजण्यास मदत होणार असून विद्यापीठ परिसर हरित व पर्यावरणपूरक बनविण्यासही हातभार लागणार आहे.