Friday, July 3, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दुसऱ्या ड्रोन प्रशिक्षण केंद्रास डीजीसीए, नवी दिल्लीची मान्यता

भारतातील एकमेव पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण,२१-दिवसीय प्रोफेशनल प्रमाणपत्र देणाऱ्या विद्यापीठाची आणखी एक भरारी; आता विद्यापीठातील हे दुसऱ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता

कृषि  तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषि  क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA), नवी दिल्ली यांनी विद्यापीठातील नाहेप–डीएफएसआरडीए (NAHEP–DFSRDA) सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरू होणाऱ्या दुसऱ्या रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO – Remote Pilot Training Organization) ड्रोन प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान केली आहे.

विद्यापीठातील हे दुसरे अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र असून, यापूर्वीचे केंद्र कृषि  अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आता विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ड्रोन नियम, २०२१ मधील नियम ३९ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या Certificate of Authorization नुसार या केंद्रास रोटरक्राफ्ट–RPAS प्रकारातील स्मॉल व मीडियम वर्गाच्या ड्रोनसाठी VLOS (Visual Line of Sight) अंतर्गत दिवस व रात्र प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळाली आहे.

या प्रमाणपत्राचा तपशील RPTO Authorization No. : RPTO202600120, मंजुरी दिनांक : २३ जून २०२६ वैधता कालावधी : २३ जून २०२६ ते २२ जून २०३६ असा आहे. ही मान्यता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे सहसंचालक श्री. मनीष कुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, ही मान्यता त्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण फलित मानली जात आहे. या मान्यतेमुळे विद्यार्थी, संशोधक, शेतकरी युवक तसेच कृषि  उद्योजकांना अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेऊन आधुनिक कृषि  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मान्यता प्राप्त कृषि  विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असून, मराठवाडा विभागाच्या कृषि  तंत्रज्ञान विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

सध्या कृषि  क्षेत्रात ड्रोनचा वापर पीक संरक्षण फवारणी, खत व्यवस्थापन, सर्वेक्षण, पीक निरीक्षण, नकाशांकन तसेच अचूक शेती (Precision Farming) यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला प्राप्त झालेली ही मान्यता मराठवाडा तसेच राज्यातील कृषि  शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

या केंद्राचे अकाउंटेबल मॅनेजर (Accountable Manager) म्हणून नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे हे कार्यभार सांभाळणार आहेत.

प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे नमूद केले की, नाहेप–डीएफएसआरडीए हा भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेला प्रकल्प असून, सन २०१९ ते २०२३ या कालावधीत विविध उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत १५,००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना प्रशिक्षण, संशोधन व लघु प्रकल्पांसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून, विद्यापीठाच्या तांत्रिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्राने एग्रीबॉट, एग्रीड्रोन, एग्री-एजीव्ही, सेन्सर प्रणाली, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), डीप लर्निंग आणि डेटा सायन्स या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य, देश व विदेशातील ५५ हून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी येथे १ ते ३ महिन्यांच्या कालावधीत संशोधन व प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या माध्यमातून १५० हून अधिक संशोधन प्रबंध व पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह जागतिक स्तरावरील संशोधन समित्या, परिषद व कार्यशाळांमध्ये नेतृत्व करत या केंद्राने विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने भारतातील पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असून, आतापर्यंत झालेल्या दोन बॅचमध्ये १०० टक्के प्लेसमेंट साध्य झाले आहे. सध्या तिसरी बॅच सुरू होत आहे. सन २०३६ पर्यंतच्या नियम व अटींच्या अधीन राहून हे केंद्र कार्यरत राहण्यास मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशिक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

या केंद्राच्या उभारणीस आरपी ड्रोन लिमिटेड यांनी सहभाग नोंदवून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डीडीजी श्री. विनय चौरसिया व श्री. सुरेंद्र पंडिता यांनी प्रत्यक्ष तपासणी करून मान्यतेची शिफारस केली असून, सहसंचालक श्री. मनीष कुमार यांनी विद्यापीठास शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांनीदेखील या केंद्राच्या स्थापनेबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता तसेच सर्व अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हे यश संपादन झाले.

या यशाबद्दल शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तसेच डिजिटल एक्स्टेंशन तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. शंकर पुरी यांनी प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Thursday, July 2, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांना भावपूर्ण निरोप

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सत्कार




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयामार्फत दिनांक २ जुलै २०२६ रोजी संशोधन संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. खिजर बेग यांच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम अखिल भारतीय समन्वित पशुधन यांत्रिकीकरण संशोधन प्रकल्प (AICRP on Mechanisation in Animal Husbandry) सभागृहात पार पडला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विद्यापीठातील सर्व संचालक, कुलसचिव, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक, सर्व सहयोगी अधिष्ठाता तसेच संशोधन कार्यालयातील प्रभारी अधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच कठीण बाब आहे. मात्र कौटुंबिक गरजांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विद्यापीठ सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय पातळीवरील संशोधनाधारित प्रकल्प तयार करताना या विद्यापीठाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते आणि त्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे.

विद्यापीठाने वाण विकास, गुणवत्तापूर्ण रोप निर्मिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले असून या कार्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले. मात्र त्यांच्या इच्छेनुसार ते पुढील वाटचालीसाठी जात असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठातून सेवा पूर्ण करून अथवा इतर कारणांनी बाहेर पडताना आपल्या जाण्यामुळे विद्यापीठाच्या कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कामकाज थांबणार नाही, अशी कार्यपद्धती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.

डॉ. खिजर बेग यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना ते स्वच्छ मनाचे, कर्तव्यदक्ष आणि सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. आज सर्वांच्या उपस्थितीत झालेला उत्स्फूर्त सन्मान हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतेही यश हे समर्पित भावनेतून केलेल्या कार्यातूनच सिद्ध होते आणि अशा व्यक्तींची आठवण भविष्यात कायम राहते, असेही ते म्हणाले.

डॉ. खिजर बेग यांनी भविष्यातही विद्यापीठाशी समन्वय ठेवून जोडलेले राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत कुलगुरूंनी त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकारकीर्दीसाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, व्यक्ती सेवानिवृत्त होतात; मात्र विद्यापीठाची प्रगती कधीही थांबणार नाही.

सत्काराला उत्तर देताना डॉ. खिजर बेग म्हणाले की, याच विद्यापीठातून त्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण केली असून विद्यापीठाची एकूण २६ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. काम करण्याची आवड सुरुवातीपासूनच होती; मात्र मागील चार वर्षांत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात कामाचा वेग वाढला आणि सातत्यपूर्ण काम करण्याची सवय अधिक दृढ झाली.

कौटुंबिक कारणांमुळे विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत असून पुढे एका चांगल्या ठिकाणी कार्य करण्याची संधी मिळत आहे. या निवडीमध्ये देखील परभणी कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्वांना जिद्द, आवड आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

विद्यापीठात मनुष्यबळ कमी असतानाही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य तसेच पायाभूत सुविधा विकासामध्ये मागील चार वर्षांत उच्च दर्जाचे काम झाले आहे. सध्या विद्यापीठात आयोजित होणारे विविध कार्यक्रम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडतात. तसेच राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्या दहा संशोधन केंद्रांना प्रथम क्रमांक मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ते म्हणाले की, भविष्यात कुठेही कार्यरत असलो तरी विद्यापीठाशी समन्वय ठेवून कार्य करत राहणार असून विद्यापीठ परिवाराकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, आज झालेला सन्मान हा डॉ. खिजर बेग यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात कापूस आणि सोयाबीन वाण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे शेतकरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

कुलसचिव श्री. पुराभा काळे यांनी सांगितले कि, डॉ. खिजर बेग हे विद्यापीठाच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. कुलसचिव कार्यालयातील विविध निवड प्रक्रियेत त्यांनी निवड समितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाबद्दल खंत वाटत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केले.

प्रस्ताविकात उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण यांनी सांगितले की, माननीय कुलगुरू यांच्या निर्देशानुसार विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचा सन्मान विद्यापीठाच्या वतीने करण्यात यावा तसेच माननीय कुलगुरूंच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून भविष्यात दर महिन्याला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. वीणा भालेराव यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन उपसंचालक संशोधन डॉ. सुनीता पवार यांनी केले.

यावेळी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ नीता गायकवाड,विभागप्रमुख, संशोधन योजनांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; एससी-एसपी प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाचे उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे दि. २ जुलै २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली येथील मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव तसेच प्रशिक्षण तज्ज्ञ तथा प्रमुख प्रशिक्षक श्री राजीव पंडित उपस्थित होते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उपयोजना (SC-SP) अंतर्गत कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावरील दोन दिवसीय ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजच्या काळातील परवलीचे शब्द बनले असून दैनंदिन जीवनात त्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषि क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून कृषि पदवीधरांनी या ज्ञानाचा अंगीकार करून महाविद्यालयीन जीवनात कौशल्य विकासावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठीच कृषि महाविद्यालयाने हे उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे.

महाविद्यालयातील इंटरनेट व इन्व्हर्टर सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा तसेच अर्थशास्त्र विभागातील प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी प्रभावीपणे उपयोग व्हावा. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील हे प्रशिक्षण भविष्यात सातत्याने सुरू ठेवावे. तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर भर देऊन उद्योजक बनावे आणि नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी आजच्या डिजिटल युगात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास कसा करावा आणि आव्हानांना कसे सामोरे जावे यावर प्रभावी मार्गदर्शन केले. मोबाईल आणि सोशल मीडिया हे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारे मोठे माध्यम बनले असून महाविद्यालयीन जीवन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे. या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील नवनवीन कौशल्ये विकसित केली पाहिजेत. ही कौशल्ये भविष्यात स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

व्यक्तिमत्त्व विकासात संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी, प्राध्यापकांशी आणि सहकाऱ्यांशी उत्तम संवाद साधायला शिकले पाहिजे. संकोच किंवा भीती न बाळगता संवाद साधल्यास विचारांची देवाणघेवाण होते, आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी नमूद केले की, व्यक्तिमत्त्व विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे तसेच भविष्यातील करिअर घडविण्यास मोठा लाभ होणार आहे. याशिवाय जेआरएफ, एसआरएफ (JRF, SRF) आणि विविध स्पर्धा परीक्षांविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालयात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच २०० एकर प्रक्षेत्रावरील अंतरमशागतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लघु ट्रॅक्टरचे, मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक बैलचलित कृषि अवजारांचे, जनावरांसाठी नव्याने बांधलेल्या गोठ्याचे तसेच सेरिकल्चर (रेशीमशेती) युनिटचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली.

याशिवाय चार डिजिटल वर्गखोल्या, डिजिटल प्रयोगशाळा, इंटरनेट व इन्व्हर्टर सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा आणि अर्थशास्त्र प्रयोगशाळेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर माननीय कुलगुरूंनी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दशरथ सारंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुंडलिक वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. शंकर नरवाडे, प्रा. वैशाली बासटेवाड, डॉ. राहुल भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. आर. एफ. ठोंबरे, डॉ. ज्योती गायकवाड, श्री चंद्रकांत ताटीकोंडलवार, श्री सलीम पठाण, श्री नाईक, श्री आडे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रक्षेत्रावरील चालक, मजूर वर्ग आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Wednesday, July 1, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत आहारतज्ज्ञ पदावर निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थिनींचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या पदवीप्राप्त विद्यार्थिनी कीर्ती यशवंत घुमरे, मृणाली शिवदास तोंडारे, गायत्री बालमुकुंद काबरा आणि स्वाती केशवराव शिंदे यांची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र शासन अंतर्गत आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. तर योगेश्वरी सतिशराव पवार आणि जान्हवी रंगराव उक्कलगावकर या दोन विद्यार्थीनी प्रतीक्षा यादी मध्ये आहेत

या पदासाठी कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी.एस्सी. गृह विज्ञान (B.Sc. Home Science), बी.एस्सी. (ऑनर्स) गृह विज्ञान [B.Sc. (Hons.) Home Science] तसेच बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान [B.Sc. (Hons.) Community Science] या अभ्यासक्रमांच्या पदव्या शैक्षणिक पात्रता म्हणून ग्राह्य धरण्यात आल्या.

मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी स्पर्धा परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारण्यात आले असून परीक्षा एकूण २०० गुणांची होती. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी (Merit) व त्यानंतरच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या आधारे करण्यात आली.

या विद्यार्थिनींच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणातून मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या नव्या संधींबाबत उत्साह वाढला आहे.

या यशामागे विद्यापीठ प्रशासनाचे विशेष योगदान राहिले आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक तांत्रिक बाबींचे निराकरण केले होते.

विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, यांच्यासह सर्व माजी अधिष्ठाता, माजी विभागप्रमुख, माजी प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी यशस्वी विद्यार्थिनींनी भावना व्यक्त करत सांगितले की, तांत्रिक बाबींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयाने दिलेले अनमोल सहकार्य, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि खंबीर पाठिंबा याशिवाय हे यश संपादन करणे कठीण झाले असते.

ही निवड सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीची आणि विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनाची साक्ष देणारी ठरली आहे.

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषि दिना निमित्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषि दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते तथा कृषि विकासाचे दूरदर्शी नेते स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषि, सिंचन, जलसंधारण, ग्रामीण विकास व शेतकरी कल्याणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १ जुलै रोजी कृषि दिन साजरा केला जातो, असे सांगून कृषि दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची गरज, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच ‍ विद्यार्थीनी यांच्या हंस्ते वृक्षालागवड करण्यात आली. लावलेल्या वृक्षाची संगोपन करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना देण्यात आली.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायभाये,  डॉ. पंडित मुंडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. प्रमोदीनी मोरे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, इंजी. शिवणकर, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे तसेच कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी राधेशाम खटींग, सतेज मेटकर, कुनाल गडाख, राम शेडंगे, आभिमन्यु घूगे, गणेश बोराडे, संकेत पवार, मोदीता इंगळे, दुधाटे गीता तसेच, श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड , श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. रमेश मोहीते व श्री. माणिक खटींग इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.




सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

 कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिनांक १ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या कृषी विकासातील योगदानाला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत कृषी क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव केला.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, महाराष्ट्रात हरितक्रांतीची पायाभरणी करून शेती विकासाला नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शेतकरी केंद्रित धोरणे, सिंचन विकास, कृषी शिक्षण आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे.

कृषिदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देत आंबा, चिकू, करंज, चाफा, जास्वंद यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात वृक्षारोपण

 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते व कृषी विकासाला नवी दिशा देणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२६ रोजी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यापीठ परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासाच्या दूरदृष्टीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षलागवड हीच भावी पिढ्यांसाठी खरी गुंतवणूक असल्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी केले.

यावेळी डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. अमोल भोसले, डॉ. राहुल बघेले, डॉ. सय्यद शबनम, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. आशा सातपुते, डॉ. अर्चना घनवट, डॉ. कल्याणी देशमुख, डॉ. महेश, श्री. भुसारी तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प व्यक्त केला.