Friday, February 13, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रम; शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या निर्देशानुसार करण्यात येते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवून, विद्यापीठापासून दूर असलेल्या भागांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहोचविण्याच्या उद्देशाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ९ चमूंमधील २५ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील कार्यक्रमास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ केवळ कृषि तंत्रज्ञान पुरविण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्यही घेतले जाईल. विद्यापीठ शेतकरी देवो भवः’ या तत्त्वावर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद करून, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विविध योजना व सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राकेश अहिरे यांनी सोयाबीन, तूर, कापूस व हळद या मराठवाड्यातील प्रमुख पिकांच्या अधिक उत्पादनासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी कापसाची घनपद्धतीने लागवड, सुधारित वाणांचा वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाचा महिला मेळावा (३ जानेवारी), खरीप (१८ मे) व रब्बी (१७ सप्टेंबर) या शेतकरी मेळाव्यांची माहिती देत, बियाणे व निविष्ठा विक्री, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच व्हॉट्सअॅप हेल्पलाईन, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल, ब्लॉग व ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे विद्यापीठ शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन तसेच लागवड पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळदीतील कंदमाशी व्यवस्थापन, कापूस लागवड तंत्रज्ञान व कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयी माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, बदनापूर, खामगाव) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, प्रा. किशोर जगताप, डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन धांडगे, श्री. मधुकर मांडगे, तसेच कृषि विभागाचे अधिकारी श्री. आनंद नंदनवरे, श्री. सचिन उबाळे व श्री. उदय देवळणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.














वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; विकासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माननीय कुलगुरू महोदयांनी केंद्रातील नैसर्गिक शेती पद्धतीखाली घेतलेल्या भाजीपाला पिकांच्या संशोधन प्रात्यक्षिकांची, तसेच नैसर्गिक निविष्ठा (इनपुट) निर्मिती संचाची सखोल पाहणी केली. त्यांनी केंद्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत शेवगा, ड्रॅगन फ्रूट व कढीपत्ता यांची लागवड करण्याबाबत, तसेच उपलब्ध असलेली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणून हंगामी पिके व आच्छादन पिके (Cover Crops) घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. निविष्ठा निर्मितीसाठी विशेषतः नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र व विशेष निविष्ठा निर्मिती कक्ष स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच डाळी व भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक वाणांचे (लँडरेसेस) संवर्धन, संकलन व मूल्यांकन यावर संशोधन हाती घेण्याच्या सूचनाही माननीय कुलगुरू यांनी दिल्या.

यावेळी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक वाणांचे मूल्यांकन, तसेच देशी व संकरित गोवंश जातींच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच केंद्रामध्ये मेक्सिकन (झायगोग्राम्मा) भुंगे (Zygogramma Beetle) संगोपन, गांडूळ खत (वर्मी-कंपोस्ट) निर्मिती व ट्रायकोडर्मा उत्पादनाचे व्यावसायिक कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले.

या भेटीदरम्यान माननीय अधिकाऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन अधिक प्रभावी व शेतकरीकेंद्रित करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या भेटीच्या प्रसंगी केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, शाखा अभियंता श्री. शेख, कनिष्ठ अभियंता श्री. कटकुरी, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. दिलीप झटे, डॉ. तेजस्विनी कच्छवे, तसेच केंद्रातील कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.








Wednesday, February 11, 2026

मराठवाड्यात नैसर्गिक शेतीचे मॅपिंग व वैज्ञानिक दस्तऐवजीकरण गरजेचे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी पीजीएस (Participatory Guarantee System) प्रमाणिकरण पद्धत या विषयावर दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा विभागात नैसर्गिक शेतीचे सविस्तर मॅपिंग व वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करण्याची गरज अधोरेखित केली.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, मराठवाड्यात किती शेतकरी नैसर्गिक शेतीचे संपूर्ण प्रोटोकॉल अवलंबत आहेत व किती शेतकरी त्यातील एक किंवा अधिक घटकांचा वापर करीत आहेत, याची शास्त्रीय नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीमध्ये तण व्यवस्थापन (weed dynamics), पाण्याची गरज, ऊर्जा व मजूर गरज, लागवड खर्च आदी घटकांचा योग्य डेटा संकलन करून त्यावर आधारित वैज्ञानिक सादरीकरण विकसित करावे, असे त्यांनी नमूद केले. नैसर्गिक शेतीमध्ये प्रमाणिकरणाला अनन्यसाधारण महत्त्व असून योग्य प्रमाणिकरणामुळे बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते व उत्पादनाचा विश्वासार्ह ब्रँड तयार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्पादन प्रणालीचे प्रमाणिकरण करावे की थेट उत्पादनाचे, याबाबतही सखोल मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच नैसर्गिक शेतीमुळे मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये होणारे बदल, मातीची सुपीकता, पाणी व मृदा संवर्धन, मानवी आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, उत्पादन खर्चात होणारी बचत तसेच शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव यांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ उत्पादन (yield) या एका निकषावर न थांबता मातीचे आरोग्य व पर्यावरणीय लाभ यांचा व्यापक विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. पिकांची योग्य निवड व शेतकऱ्यांचा अनुभव हा नैसर्गिक शेतीच्या यशाचा महत्त्वाचा पाया असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रम संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांच्या मार्गदर्शनात पार पडला. विद्यापीठाच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले.

प्रमुख मार्गदर्शक मुंबई येथील या विषयावर सर्टिफिकेशन सर्विसेसचे संचालक डॉ. अतुल पाटील यांनी नैसर्गिक शेतीमध्ये प्रमाणिकरणाचे महत्त्व, गरज व भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पीजीएस प्रमाणिकरण प्रक्रिया, गट प्रमाणिकरण, प्रमाणिकरणाचा खर्च, तपासणी पद्धती, आवश्यक नोंदी (रेकॉर्ड्स) तसेच विपणन व निर्यातीतील संधी याबाबत सखोल माहिती दिली.

सूत्रसंचालन आणि आभार डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा मार्गदर्शन कार्यक्रम नैसर्गिक शेतीच्या शास्त्रीय अभ्यासाला चालना देणारा ठरला असून मराठवाड्यात नैसर्गिक शेतीच्या विस्तारासाठी व शाश्वत शेती व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



मृदा ही राष्ट्रीय संपत्ती; तिचे संवर्धन व संरक्षण आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 



मृदा ही केवळ शेतीचा एक घटक नसून मानवी संस्कृतीशी नाते जोडलेली राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे तिचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत मृद विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माती परीक्षण आणि खतांचा वापर” या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, प्रशिक्षण संचालक व विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर तसेच राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. बी. एम. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, बदलत्या काळात मातीचे आरोग्य जपणे व खतांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित या प्रशिक्षण शिबिराचा प्रशिक्षणार्थींनी पुरेपूर लाभ घ्यावा. सर्व प्रकारच्या शेती पद्धतींमध्ये मातीचे अनन्यसाधारण महत्त्व असून मातीला मातृत्वाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन व संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मातीशिवाय मानवाचे पालनपोषण अशक्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मातीच्या आरोग्याविषयी जागतिक स्तरावर जनजागृती सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्दिष्टे व त्याचे महत्त्व विशद केले.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यरेषा गजभिये यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिरासाठी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत तसेच कर्मचारी श्री. भानुदास इंगोले, श्री. महेश देशमुख, श्री. रामप्रसाद जोंधळे, श्री. अमोल जोंधळे व श्री. सुदाम मोगल यांच्यासह आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी ३० प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मृदा परीक्षण व खतांचा योग्य वापर याबाबत कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कुशल मनुष्यबळाची निर्मिती हा या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश असून, शिबिर यशस्वी करण्यासाठी मृद विज्ञान विभागाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.







हिंगोली जिल्ह्यात कृषि शिक्षण व संशोधन बळकटीकरणाबाबत माननीय कुलगुरू व माननीय जिल्हाधिकाऱ्यांमध्ये सखोल चर्चा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांच्यात हिंगोली जिल्ह्यातील कृषि शिक्षण व संशोधनाच्या बळकटीकरणाबाबत दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सखोल चर्चा झाली. या बैठकीत विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव तसेच ऊस संशोधन केंद्र, वसमत नगर यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शिक्षण, शासन व उद्योग (Academia–Government–Industry) यांच्या समन्वयातूनच शेतीचा शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केले. संशोधन  हे विकासासाठी मूलभूत आधार असून त्याला प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठ, शासन व उद्योग यांच्यातील समन्वय वाढविल्यास शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल गुप्ता यांनी हवामान बदलास अनुरूप (Climate Resilient) पिकांवर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही मान्यवरांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हिंगोली जिल्ह्यात विद्यापीठांतर्गत शासकीय नवीन कृषि विज्ञान केंद्र (KVK) स्थापन करण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक व सखोल चर्चा झाली. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि कृषि क्षेत्राला मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी  शिंदे यांची  उपस्थिती होती. 

Monday, February 9, 2026

अहंकार त्याग, ‘डिसएंगेज’ची कला आणि वर्तमानात जगण्याचा मंत्रच यशाचा मार्ग – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” प्रेरणादायी व्याख्यान

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालनालय व ब्रह्मकुमारी, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठातील सिम्पोसियम सभागृह (हॉल क्र. १५), प्रशासकीय भवन येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ते, लाईफ कोच व मोटिवेशनल स्पीकर डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी व्याख्यान दिले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, अर्चना बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जर सर्वांनी अहंकार सोडला तर निश्चितच यशस्वी होता येईल. विनाकारण तणाव घेऊन त्याचे ओझे वाहू नये, यासाठी सोडून देण्याची  (‘डिसएंगेज’ करण्याची) कला आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कृतीगीत व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले. लहान मुलांसारखी निरागस वृत्ती ठेवून साधे व आनंदी जीवन जगण्याची कला शिकावी, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की घर, कार्यालय किंवा इतर ठिकाणी शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसतानाही त्या ठिकाणचे विचार मनात असतील, तर मनाची द्विधा अवस्था निर्माण होते आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे समोर असलेली व्यक्ती, वेळ आणि कार्य यांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. भविष्याची चिंता करत वर्तमान खराब करू नये, तर वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करावी, यासाठी चांगल्या आठवणींचे स्मरण करावे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबाबत अधिक विचार करू नये, तर नियंत्रणाऐवजी योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा, असे सांगताना त्यांनी म्हटले की डोक्यावरचे ओझे माणसाला थकवत नाही, तर डोक्यातील ओझे माणसाला थकवते. आपण इतरांसाठी चांगले केल्यावर त्यांच्याकडून तशीच अपेक्षा ठेवू नये, दुर्लक्ष करण्याची क्षमता वाढवावी, आनंदाचे क्षण जपावेत आणि सामर्थ्यवान व्यक्तीनेही क्षमा करण्याची कला आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. बी. के. शक्तिराज भाई यांनी हॅपिनेस को कहो हाय… टेन्शन को कहो बाय” या प्रभावी विषयावर मार्गदर्शन केले. सकारात्मक विचारसरणी, आनंदी जीवनशैली, तणावमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व तसेच आत्मविकासासाठी मानसिक सशक्ततेची आवश्यकता यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी शैलीतील भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. शक्तिराज भाई यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या बुद्धीला चार्ज करणे आवश्यक आहे. मानवी जीवनात केवळ बुद्ध्यांक (IQ) नव्हे, तर भावनिक क्षमता निर्देशांक (Emotional Quotient – EQ) अधिक महत्त्वाचा असून, वर्तमान परिस्थितीत येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी भावनिक संतुलन आवश्यक असते. सैन्यदल, क्रीडा, कार्यालयीन जीवन अशा सर्व क्षेत्रांत यशस्वी संतुलनासाठी भावनिक समतोल राखणे गरजेचे आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी दैनंदिन ध्यान (मेडिटेशन) हा एक प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाने स्वतःमधील शक्ती ओळखून आपल्या भावनिक क्षमतांचा विकास करावा, असे सांगत त्यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे अहंकार व गर्व दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हसू, राग आणि तणाव यामुळे शरीरात होणारे शारीरिक बदल व त्यातून निर्माण होणाऱ्या हार्मोन्सचे परिणाम त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विशद केले. आनंदी जीवनासाठी कोणताही औषधी खुराक नसून, आनंद ही एक जीवनशैली आहे, असे त्यांनी सांगितले. आज आपण आनंदी असू, तर भविष्यातही आनंदी राहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे वर्तमान क्षणाचे महत्त्व ओळखावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.










भारत@१०० साठी शाश्वत कृषि व आरोग्य विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्णायक भूमिका : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद २०२६; कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानावर भर


अचूक शेती (Precision Agriculture), स्मार्ट कृषि व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया तसेच हवामान-अनुकूल परिस्थितीत उत्पादनवाढ, खर्चकपात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील परिषद २०२६ (The International Conference on Advances in Information Technology and Management – ICAIM 2026) मध्ये मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च (TIMSCDR) यांच्या वतीने करण्यात आले होते. “कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर – भारत@१०० साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही परिषद दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील ठाकूर एज्युकेशनल कॅम्पस, कांदिवली (पूर्व) येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवोन्मेषाधारित शाश्वत कृषि विकास” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. हवामान बदल, संसाधनांची टंचाई आणि वाढत्या अन्नसुरक्षेची आव्हाने यांना सामोरे जाताना कृषि क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान संशोधक, विद्यार्थी, शेतकरी तसेच धोरणकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरले.

या कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT), मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. सुजीत कुमार शुक्ला हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. परिषदेत AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience या विषयावर अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथील डिजिटल अ‍ॅग्रोनॉमी रिसर्च टीम (DART) चे संचालक डॉ. गौरव झा यांनी मार्गदर्शन केले. तसेच AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture  या विषयावर पालघर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व कृषि तज्ज्ञ डॉ. अमोल व्ही. दहिफळे यांनी शाश्वत शेतीसाठी AI आधारित प्रणालींचे महत्त्व विशद केले. AI Enabled Digital Ecosystem for Climate Resilient Agriculture या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि व मृदाशास्त्र तज्ज्ञ श्री. विजय कोळेकर यांनी हवामान-सहनशील शेतीसाठी डिजिटल परिसंस्थेची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या शेवटी “AI for Bharat@100: भारतीय कृषितील प्रश्न व आव्हाने” या विषयावर तज्ज्ञांची सखोल पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेमध्ये AI तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील संधी, अडचणी तसेच भविष्यातील दिशा यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), स्वयंचलन (Automation) आणि डिजिटल परिसंस्था यांचा कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कसा प्रभावी वापर करता येईल, यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. उत्पादनक्षमता वाढ, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन, सेवा सुलभता, ताणतणावांना सामोरे जाण्याची क्षमता (Resilience) आणि दीर्घकालीन शाश्वतता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी जबाबदार आणि विस्तारयोग्य (Scalable) AI उपाययोजनांना चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था, उद्योग, शासन आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत@१०० साठी तंत्रज्ञानाधारित, सक्षम आणि शाश्वत भवितव्य घडविण्यात ICAIM 2026 महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





 

The Decisive Role of Artificial Intelligence in Sustainable Agricultural and Healthcare Development for India@100: Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

International Conference on Advances in Information Technology and Management 2026 held in Mumbai; emphasis on Artificial Intelligence and Information Technology for sustainability in the agriculture and healthcare sectors.

 

Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani emphasized that modern technology plays a crucial role in promoting Precision Agriculture, smart agricultural management, and technology-driven decision-making, as well as in increasing productivity, reducing costs, and enhancing farmers’ income under climate-resilient conditions. He was speaking as the Chief Guest at the International Conference on Advances in Information Technology and Management (ICAIM 2026), organized to discuss recent developments in the fields of information technology and management.

The international conference was organized by Thakur Institute of Management Studies, Career Development and Research (TIMSCDR), Mumbai. The conference, based on the central theme “Leveraging Information Technology for Sustainability in Agriculture and Healthcare – Artificial Intelligence (AI) for Bharat@100,” was successfully held on 7 February 2026 at the Thakur Educational Campus, Kandivali (East), Mumbai.

On this occasion, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani delivered in-depth guidance on the highly significant topic “Innovation-driven Sustainable Agricultural Development through Drone Technology, Digital Tools, and Artificial Intelligence.” He emphasized that AI-based digital solutions are becoming extremely important for the agricultural sector in addressing challenges such as climate change, resource scarcity, and growing food security concerns. His scholarly and inspiring lecture proved to be a guiding force for researchers, students, farmers, and policymakers alike.

The programme was graced by the presence of Dr. Sujit Kumar Shukla, Scientist at the Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT), Mumbai, under the Indian Council of Agricultural Research (ICAR), as the Guest of Honour.

During the conference, Dr. Gaurav Jha, Director of the Digital Agronomy Research Team (DART) at Kansas State University, USA, delivered an expert lecture on the theme “AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience.”

Dr. Amol V. Dahiphale, Officer-in-Charge and Agricultural Expert at the Agricultural Research Centre, Palghar, elaborated on the importance of AI-based systems for sustainable agriculture while speaking on “AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture.”

On the theme “AI-Enabled Digital Ecosystem for Climate-Resilient Agriculture,” Mr. Vijay Kolekar, Agriculture and Soil Science Expert from the Department of Agriculture, Government of Maharashtra, emphasized the need for a robust digital ecosystem to support climate-resilient farming practices.

At the conclusion of the programme, an in-depth expert panel discussion was organized on the topic “AI for Bharat@100: Issues and Challenges in Indian Agriculture.” The discussion focused on the opportunities, challenges, and future directions related to the implementation of AI technologies in the agricultural sector.

As India moves towards the centenary of its independence, the conference witnessed comprehensive deliberations on the effective use of Artificial Intelligence, Data Analytics, Internet of Things (IoT), Automation, and digital ecosystems for sustainable development in the agriculture and healthcare sectors. Special emphasis was laid on increasing productivity, efficient resource management, ease of service delivery, resilience to stresses, and long-term sustainability.

The conference was organized with the objective of promoting responsible and scalable AI solutions for sustainable development in agriculture and healthcare. The organizers expressed confidence that ICAIM 2026 will play a significant role in shaping a technology-driven, empowered, and sustainable future for Bharat@100 by strengthening collaboration among academic institutions, industry, government, and the research community.