Thursday, July 16, 2026

वनामकृवित शिक्षणासाठी आलेल्या बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या आयसीएआर नागनाथ मुलांचे वसतिगृह येथे परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्रधिकरणचे वतीने बाहेरील राज्यांतील, विशेषतः पूर्वोत्तर भारतातील राज्यांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर बाबींची माहिती, संविधानिक अधिकारांची जाणीव तसेच विविध कायदेशीर अडचणींवर मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी विशेष कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे हे होते. प्रमुख उपस्थितीत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, मुख्य वसतिगृह अधीक्षक तथा विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत, वसतिगृह सहाय्यक श्री. शेलार तसेच विविध राज्यांतील सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, शिक्षणासोबतच कायदेविषयक जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची संविधानिक किंवा कायदेशीर अडचण उद्भवल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोफत विधी सहाय्याचा लाभ घ्यावा. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्रधिकरणचे पॅनल विधीज्ञ ॲड. श्री संदीप पाठारे आणि अधिकार मित्र कुमारी श्रुती माळी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने प्रदान केलेले मूलभूत अधिकार, मोफत विधी सहाय्याची उपलब्धता, शिक्षणादरम्यान उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी, सायबर गुन्हे, महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायदे, रॅगिंग प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांना कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास घाबरून न जाता कायद्याचा आधार घेऊन योग्य मार्गाने प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, शिस्त, परस्पर सहकार्य आणि कायद्याचे पालन याबाबत मार्गदर्शन केले. विविध संस्कृती व राज्यांतील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत असताना परस्पर आदर, संवाद आणि कायदेशीर जागरूकता ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी विद्यापीठात शिक्षणासाठी देशाच्या विविध राज्यांतून विद्यार्थी येत असून, त्यांना सुरक्षित, कायदेविषयकदृष्ट्या जागरूक व आत्मविश्वासपूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. शिलारे यांनी उपस्थित मान्यवर, विधिज्ञ आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कायदेशीर विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.









वनामकृवित मराठवाड्यातील युवा उद्योजकांना उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन; १८ जुलै रोजी परभणीत 'उद्यम – विकसित मराठवाडा मिशन' अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद

राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुण्या, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि; 'आत्मनिर्भर मराठवाडा २०३०'च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे परभणी येथील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) आणि सेवा भारती देवगिरी (जिल्हा परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोझियम हॉल येथे उद्योग–शैक्षणिक संवाद (Industry–Academia Interaction Programme) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास UAA (UDCT-अॅल्युमनी असोसिएशन), मराठवाडा चॅप्टर आणि AFSTI (असोसिएशन ऑफ फूड सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स – इंडिया), परभणी चॅप्टर यांचे सहकार्य लाभले आहे.

हा कार्यक्रम 'उद्यम (UDYAM) – विकसित मराठवाडा मिशन' अंतर्गत आयोजित करण्यात येत असून 'विकसित भारत - विकसित महाराष्ट्र - विकसित मराठवाडा' या संकल्पनेवर आधारित चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) च्या प्रादेशिक विकास अभियानाचा तो महत्त्वाचा भाग आहे. 'आत्मनिर्भर मराठवाडा २०३०' हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि असतील.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, अध्यक्ष माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि उद्योग तज्ज्ञांची प्रमुख व्याख्याने आणि मार्गदर्शन होईल. कार्यक्रमाची सुरुवात CASMB चे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे यांच्या स्वागतपर भाषणाने होईल. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, अन्नप्रक्रिया उद्योजक, स्टार्टअप्स तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

'उद्यम' मिशनअंतर्गत शेतस्तरावर मूल्यवर्धन (Value Addition at Farm Gate), MSMEs व स्टार्टअप्सना चालना, युवा व महिला उद्योजकता, बाजारपेठ जोडणी व निर्यात आणि शाश्वत विकास या पाच प्रमुख सूत्रांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्याशी घट्ट नाळ असलेल्या तीन यशस्वी उद्योगतज्ज्ञांकडून विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि युवा उद्योजकांना थेट मार्गदर्शन मिळणार आहे.

श्री. सतीश आर. भोरकडे हे खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ असून त्यांना फूड इंग्रेडिएंट्स (Food Ingredients) आणि सीझनिंग उद्योगातील १९ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी प्रविण मसाले, युनायटेड ब्रुअरीज, VKL Seasonings, Wild Flavors/ADM Agro आणि Flavosys India यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये कार्य केले आहे. ते VNMKV चे माजी विद्यार्थी असून त्यांनी जगभरातील ५,००० हून अधिक विद्यार्थी व व्यावसायिकांशी संवाद साधत ८० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच १२ हून अधिक फूड स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले आहे. ते खाद्य घटक, उत्पादन विकास, अन्नप्रक्रिया उद्योगातील करिअर आणि उद्योजकता या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

श्री. अतिश जयप्रकाश साळुंखे हे मराठवाड्यातील अग्रगण्य उद्योगपती आहेत. त्यांनी २००६ मध्ये भूमी न्यूट्रास्युटिकल्स प्रा. लि. ची स्थापना केली. आज ही कंपनी महाराष्ट्रातील आघाडीच्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादक उद्योगांपैकी एक असून तिला ISO, GMP, HACCP, Kosher, Halal, FDA आणि FSSAI यांसह विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे प्राप्त आहेत. २०२० मध्ये त्यांनी बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करून त्याची गाळप क्षमता २,५०० टनांवरून ४,५०० टन प्रतिदिन (TCD) पर्यंत वाढवली. तसेच भारत सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) धोरणानुसार ६० KLPD क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारला असून त्याचा विस्तार १२० KLPD पर्यंत करण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील तांत्रिक शिक्षणासाठी त्यांनी बसमत येथे JRD Institute of Technology ची स्थापना केली आहे. ते उद्योग पुनरुज्जीवन, कृषि प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण औद्योगिकीकरण या विषयांवर मार्गदर्शन करतील.

श्री. श्रीपाद गोरोबा ठोंबरे, प्रकल्प समन्वयक, नॅचरल उद्योग समूह, यांना २०११ पासून नैसर्गिक दुग्ध व्यवसायातील १५ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. लातूर येथील यांत्रिकी अभियंता असलेले श्री. ठोंबरे प्रकल्प अंमलबजावणी, दुग्ध मूल्यसाखळी आणि उद्योग संचालन या विषयांवर सहभागींचे मार्गदर्शन करतील.

मराठवाड्याच्या अन्नप्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा

मराठवाड्यात अन्नप्रक्रिया क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असून

केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (MoFPI) वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME – Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises) यामध्ये   मराठवाड्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या परभणी विद्यापीठातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर मुळे स्थानिक उद्योजकांना सुमारे रु ३२९.५० लाख किमतीच्या अत्याधुनिक प्रक्रिया व परीक्षण सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या,
"मराठवाड्यातील युवकांमध्ये क्षमता आणि प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती योग्य संधी आणि सक्षम व्यासपीठाची. 'उद्यम'सारख्या उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे नव्या पिढीला उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. विकसित महाराष्ट्रातून विकसित भारताचा मार्ग याच माध्यमातून घडणार आहे."

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आम्ही उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यापीठातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव देत आहे. या संवाद कार्यक्रमामुळे यशस्वी उद्योगपती आणि विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येतील. यामुळे कृषि पदवीधर नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनतील.

सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे म्हणाले, उद्यम’ हे CASMB चे असे अभियान आहे की मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या कृषि उत्पादनांचे प्रक्रिया, ब्रँडिंग आणि विपणनही मराठवाड्यातच व्हावे. सतीश भोरकडे, अतिश साळुंखे आणि श्रीपाद ठोंबरे यांसारखे यशस्वी उद्योगतज्ज्ञ जेव्हा आपल्या मातीतल्या युवकांना थेट मार्गदर्शन करतात, तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत नवे स्टार्टअप्स आणि MSMEs उभे राहावेत, हेच आमचे ध्येय आहे.

या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अन्नतंत्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर (मोबाईल क्रमांक ९८३४९ ०५५८०) व  सरचिटणीस डॉ. उमेश कांबळेयांच्याशी संपर्क साधावा

चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) विषयी

चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) ही संस्था सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. तंत्रज्ञान, कौशल्य विकास, बाजारपेठ, निर्यात संधी आणि शासकीय योजनांशी उद्योजकांना जोडण्याचे काम संस्था करते. उद्योग, विद्यापीठे, वित्तीय संस्था आणि शासन यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांना कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंत सक्षम करण्यासाठी CASMB सातत्याने कार्यरत आहे. याचे नेतृत्व डॉ. प्रबोध हळदे (चेअरमन), निलेश लेले (अध्यक्ष) आणि डॉ. उमेश कांबळे (सरचिटणीस) करत आहेत, अशी माहिती या संस्थेचे माध्यम संपर्क अधिकारी श्री विजय गायकवाड यांनी कळविले आहे.

Wednesday, July 15, 2026

मराठवाड्यातील हवामान बदल व पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर वनामकृवित पत्रकार परिषद

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब ही काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मराठवाड्यात सध्या हवामान बदल व पावसाच्या खंडामुळे उद्भवलेल्या विविध कृषि समस्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य आणि दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही पत्रकार परिषद विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम सभागृह (हॉल क्र. १८) येथे संपन्न झाली.

पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडण्याची परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींबरोबरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य पीक व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा भुसभुशीत थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष अथवा काडीकचऱ्याचे आच्छादन (मल्चिंग) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते. ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारणासाठी सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, त्याची शास्त्रीय पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आणि सूर्यफूल ही पिके घेता येतील. त्यानंतरही पावसास विलंब झाल्यास तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ आणि तीळ यांसारख्या दुष्काळसहिष्णू पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य तसेच दैनंदिन कामकाजाचा आढावाही पत्रकारांसमोर मांडला.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी पावसाच्या खंडामुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा सादर केला. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी 'एल निनो' या हवामान घटनेविषयी माहिती देत त्याचे संभाव्य परिणाम आणि आगामी पावसाचा अंदाज स्पष्ट केला. विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी मराठवाड्यातील पिकांची सद्यस्थिती, आवश्यक उपाययोजना तसेच आकस्मिक पीक नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड तसेच मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी केले. पत्रकार परिषदेस विविध मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











वनामकृविच्या बदनापूर कृषि महाविद्यालयास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांचे यश, अनुभवाधारित शिक्षण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांचे केले विशेष कौतुक

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे नवनियुक्त शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी बदनापूर येथील कृषि महाविद्यालयास दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशाबद्दल आणि परिसरात राबविण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयात अनुभवातून शिक्षण (ELP) अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या मधुमक्षिका पालन व कुक्कुटपालन प्रकल्पांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मान्यतेने महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या आळंबी उत्पादन व प्रशिक्षण प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी करून त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर डॉ. ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे सांगून त्यांनी हरित परिसर निर्मितीसाठी महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

यानंतर त्यांनी महाविद्यालयातील बीजोत्पादन कार्यक्रम, पीक प्रात्यक्षिके, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, विविध अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच इतर शैक्षणिक सुविधा यांची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व कौशल्याधारित शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रयोगाधारित शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेत स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन तसेच कृषी उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा. ज्ञानाबरोबरच कौशल्य, नवोन्मेषी विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासल्यास भविष्यात सक्षम कृषी व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता येईल.

महाविद्यालयातून दरवर्षी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होत असल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाची सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हे इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यापीठाचे बियाणे सहयोगी संचालक तथा कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे तसेच तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







वनामकृविद्वारा खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रासायनिक, यांत्रिक व जैविक उपायांचा समन्वय साधून तण व्यवस्थापन करा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


खरीप हंगामात तण नियंत्रण हे पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आला. मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी, कृषि पदवीधर तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले की, खरीप हंगामात पावसामुळे तणांची वाढ झपाट्याने होते. वेळेवर आणि योग्य पद्धतीने तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक, यांत्रिक, सांस्कृतिक व जैविक उपायांचा समन्वय साधून एकात्मिक तण व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यापीठ तण व्यवस्थापन विषयावर सातत्याने संशोधन करत असून, नवीन तंत्रज्ञान, तणनाशकांचा शास्त्रोक्त वापर तसेच शेतीतील यांत्रिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. तण व्यवस्थापन करताना पीक-तण स्पर्धेचा महत्त्वाचा कालावधी लक्षात घेऊन सुरुवातीच्या अवस्थेतच तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या तण व्यवस्थापन ॲपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले. तणनाशकांचा वापर नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. बाबू येवले, कृषि तज्ज्ञ, ग्लोबल विकास ट्रस्ट, परळी यांनी तण व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर व उदाहरणाधारित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात तणांचे विविध प्रकार – गवताळ, रुंदपर्णी व इतर तणांची ओळख तसेच तणांचा प्रसार – बियाणे, हवा, पाणी व शेती अवजारांद्वारे होणारा प्रसार, याबरोबरच तणांचे दुष्परिणाम – अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाशासाठी पिकांशी होणारी स्पर्धा तसेच कीड व रोगांना मिळणारा आश्रय, एकात्मिक तण व्यवस्थापन – प्रतिबंधात्मक, सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक व रासायनिक उपाययोजनांचा समन्वित वापर. तणनाशकांच्या वापरातील दक्षता – योग्य वेळ, मात्रा व सुरक्षितता उपाय. तण व्यवस्थापनातील यांत्रिकीकरण – कोळपणी, खुरपणी यंत्रे व आधुनिक अवजारांचा वापर यावर चर्चेमध्ये भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आनंद गोरे, प्रमुख अन्वेषक यांनी केले, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे शास्त्रीय व समाधानकारक उत्तरे देवून निरसन केले.




Tuesday, July 14, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सचिन मोरे हे होते.  यावेळी त्यांनी महाविद्यालयातील कायमस्वरूपी प्रदर्शनी, संग्रहालय, आहार चिकित्सालय तसेच विविध प्रयोगशाळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संवादादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडीलबंधूंनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केल्यामुळे सन १९८२ पासून त्यांचा या महाविद्यालयाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. या महाविद्यालयाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून, या संस्थेशी असलेल्या संपर्कामुळे आपले व्यक्तिमत्त्व साधे, सरळ आणि स्वच्छ घडले, हीच आज आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळत असते. त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. समाधानाने कार्य करण्याची सवय असल्यास प्रकृती निरोगी राहते आणि आनंदी जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात परस्पर सहकार्याच्या भावनेतून सांघिक पद्धतीने कार्य केल्यास अधिक चांगले परिणाम साध्य होतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

नवीन अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सामुदायिक विज्ञान क्षेत्रात कार्य करणारे आपण सर्व भविष्यातील सक्षम आधारस्तंभ आहात. त्यामुळे प्रत्येकाने शिस्तबद्ध राहून नियम व वेळेचे काटेकोर पालन करावे. तसेच नैतिक मूल्ये जपावीत, मोठ्यांचा आदर व सन्मान करावा आणि ही मूल्ये आपल्या आचरणातून जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.

हे महाविद्यालय कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असल्याने सेवाभाव, सहकार्य, शिस्त आणि नैतिकता हे गुण प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास आपल्या पाल्य प्राध्यापकांच्या माध्यमातून अथवा महाविद्यालयाच्या प्रशासनामार्फत माझ्यापर्यंत संपर्क साधू शकता. आवश्यक असल्यास थेट माझ्याशीही संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

आपल्या पूर्वीच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी नुकताच लातूर कृषि महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या 'वनश्री पुरस्काराची' यशोगाथा सांगितली. या पुरस्कारानिमित्त त्यांच्या मूळ गाव बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे उंदरी येथील मित्रांनी त्यांचे तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी परभणी येथे येऊन भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या मूळ गावी येथे भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिल्याचा उल्लेख केला.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा व सद्यस्थितीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्ष तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.











Sunday, July 12, 2026

वनामकृविच्या कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRP on Dryland Agriculture) येथे सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध पिकांवरील संशोधन, हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान, मृदा व जलसंधारण उपाययोजना तसेच पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत  *सविस्तर मार्गदर्शन केले.*

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींसोबत हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विशेषतः खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील घट टाळता येते.

त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीच्या भेगा बुजविण्याचा सल्ला दिला. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा बारीक थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन (Mulching) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते, असे त्यांनी सांगितले.

ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) ची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषण सुरळीत राहते आणि उत्पादन क्षमता टिकून राहण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा इतर जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचन द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारण सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर त्यांनी भर दिला.

पुढे त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक आहे. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी व सूर्यफूल ही पिके घेता येऊ शकतात. त्यानंतर पावसास विलंब झाल्यासव दुष्काळसहिष्णू पिके, जसे तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ व तीळ यांना प्राधान्य द्यावे.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी माननीय कुलगुरूंनी संशोधन, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे तसेच प्रकल्पावरील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गोरे यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची, हवामान बदलाशी संबंधित संशोधनाची आणि पावसाच्या खंड काळात पिकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली.