Monday, August 24, 2026

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा कपाशीवरील रसशोषक किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सल्ला


कपाशी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व मावा यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाचे १६ ते २७ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच योग्य उपाययोजना कराव्यात. अनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून जैविक, यांत्रिक व रासायनिक उपायांचा योग्य समन्वय साधत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विभागात कार्यरत असलेल्या क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, क्रॉपसॅप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक तथा कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांनी दिला आहे.

कपाशीवरील रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे पिकाचे निरीक्षण करावे. अंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावे तसेच नत्र खताचा संतुलित वापर करावा. रसशोषक किडींना भक्ष्य करणारे ढालकीडे व क्रायसोपा या मित्रकीटकांचे प्रौढ व अळ्या शेतात आढळल्यास त्यांचे संवर्धन करावे आणि शक्यतो कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे, तर फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे हेक्टरी १० ते १२ या प्रमाणात लावावेत. पिठ्या ढेकणाच्या व्यवस्थापनासाठी व्हर्टीसीलीयम लेकॅनी १.१५ टक्के डब्ल्यूपी या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम मात्रा १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

किडींची संख्या आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी प्रति लिटर पाण्यात फ्लोनीकॅमीड ५० टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी ०.२ ग्रॅम किंवा डायफेन्थुरॉन ५० टक्के डब्ल्यूपी १.२ ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के एससी २ मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एससी ३ मिली किंवा टोल्फेनपायराड १५ टक्के ईसी २ मिली किंवा ॲसीफेट ५० टक्के + इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एसपी २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के + बुप्रोफेझीन २० टक्के एससी २ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या/नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. तसेच पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबर महिन्यापूर्वी सुरू करू नये. अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार आणि शिफारशीनुसारच कीटकनाशकांचा वापर करून कपाशीवरील रसशोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.


पावसात खंड, अष्टसूत्रीद्वारे करा खरीप पिकांचे व्यवस्थापन; संरक्षित सिंचन, जलसंधारण, फवारणीतून अन्न द्रव्यांची फवारणी, तण नियंत्रण, आच्छादनाचा वापराने वाढवा मातीतील ओलावा आणि पिके वाचवा

 वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसात मोठा खंड पडला आहे. विविध हवामान संस्थांच्या अंदाजानुसार आगामी काळात जोरदार पावसाची शक्यताही कमी आहे. खरिपातील प्रमुख पिके सध्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत आहेत. त्याचवेळी नेमका पावसाचा खंड पडल्याने, पिकांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पावसाच्या खंड काळात नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा लक्षात घ्यावा, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करा आणि प्रत्येक पावसाच्या थेंबाचे संधारण करा या तत्त्वावर पुढील पीक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

१)  शेतातील परिस्थितीचे परीक्षण करा

सर्व शेतांमध्ये एकसारखे व्यवस्थापन करणे योग्य नाही. प्रत्येक शेतातील जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, पिकाची अवस्था, पिकाची वाढ, पाण्याची उपलब्धता आणि पुढील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. शेतातील माती हातात घेऊन तिच्यामध्ये पुरेसा ओलावा आहे का हे तपासावे. पिकाची पाने सकाळच्या वेळी तजेलदार आहेत का, दुपारच्या वेळी पाने वाकतात का, पाने गुंडाळली जात आहेत का, वाढ मंदावली आहे का, फुलगळ होत आहे का, याचे निरीक्षण करा. त्यानुसार पिकांना संरक्षित सिंचन देण्याचा निर्णय घ्या.

२) संरक्षित सिंचन काटेकोरपणे वापरा

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल, शेततळे, कालवा किंवा अन्य सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी उपलब्ध पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर करावा. पाण्याचा जास्त ताण बसलेल्या पिंकांसाठी, त्यांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित सिंचनाचा वापर करा. सिंचनासाठी शक्यतो, ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करा.

३) पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करा

जो काही पाऊस पडेल त्या पावसाचे पाणी शेतात मुरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शेताच्या उतारानुसार जलसंधारणाच्या सऱ्या काढाव्यात, पुढील नियोजनासाठी शक्य तिथे कंपार्टमेंट बंडिंग, समतल बांध बंधिस्ती, सध्या शेततळ्यांचा आणि त्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर, नाला बांध व लघु जलसंधारण येथील पाण्याचा योग्य वापरपावसाचे पाणी शेताबाहेर वेगाने वाहून जाणार नाही याची काळजी घेणे, शेताच्या उतारानुसार योग्य ठिकाणी पाणी अडविण्याची व्यवस्था करावी. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध ओलावा पिकाच्या मुळांपर्यंत टिकवून ठेवा.  या सूत्रानुसार शक्य ते व्यवस्थापन करावे. सर्वात सोपे आणि कमी खर्चाचे तंत्रज्ञान म्हणजे कपाशी, तूर सारख्या अधिक अंतरावरील पिकांत एक ते दोन ओळीनंतर जल संधारण सरी काढावी.

४) तण नियंत्रणाला प्राधान्य

कमी पावसाच्या सध्याच्या परिस्थितीत तण हे पिकांशी पाणी,अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश व जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः पावसाच्या खंड काळात तण नियंत्रण केल्यास  मातीतील उपलब्ध ओलावा मुख्य पिकासाठी उपयुक्त ठरतो. सध्या पिकांची अवस्था पाहून खुरपणी आणि कोळपणी करावी. पीक फुलावर असल्यास कोळपणी टाळावी. शक्य तिथे उपट तण करावे.  मजूर उपलब्ध नसल्यास संबंधित पिकासाठी शिफारशीत उगवणपश्चात तणनाशकाचा वापर करावा. पिकांची आणि तणांची  योग्य अवस्था, तणनाशकाची फवारणी करताना एकरी योग्य मात्रा, योग्य वेळ आणि योग्य पद्धत वापरावी आणि यासाठी  पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. जमिनीत ओल असावी. मात्र पिकावर ताण असताना किंवा पाऊस/सिंचनानंतर अति ओलाव्याच्या स्थितीत तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी स्थानिक शिफारशींचे पालन करावे. आता तण नाशक वापरण्याची वेळ अनेक पिकात निघून गेली आहे. हळद, ऊस किंवा फळ पिकात वापर करता येईल. शिफारशी नुसारच तणनाशकांचा वापर करावा.

 ५) आंतर मशागत आणि जमिनीतील भेगा बुजवा

आंतर मशागत करताना पिकांच्या अवस्थेनुसार हलक्या कोळपण्या कराव्यात आणि जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, तण नियंत्रण करावे. परंतु जिथे पीक फुलावर असताना कोळपणी करू नये. फळ बागेत यावर भर द्यावा. जमिनीतील भेगा बुजवा पावसाचा दीर्घ खंड पडल्यास विशेषतः मध्यम ते भारी जमिनीत जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडू शकतात. या भेगांमधून जमिनीतील ओलावा वेगाने निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून पिकाच्या  योग्य अवस्थेत आंतरमशागत करून पृष्ठभागावरील भेगा बुजवाव्यात. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

६) एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन

पावसातील खंड आणि त्यानंतर मध्यम पाऊस अशा स्थितीत  शेताचे नियमित निरीक्षण करावे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मक्यामध्ये पानांवरील कीड, शेंगा/बोंडांवरील कीड, खोडकिडी या शिवाय रस शोषण करणाऱ्या किडींचे निरीक्षण करावे.

आणि शिफारशी नुसार त्या त्या कीटक नाशकांची किंवा बुरशीनाशकांची  फवारणी कीड किंवा  आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यावर करावी. तसेच रोगांची लक्षणे तपासावीत. कमी खर्चाचे तंत्रज्ञान जसे फेरोमोन सापळे, पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे आणि निंबोळी अर्क किंवा इतर जैविक उपायांचा योग्य वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केवळ गरजेनुसार आणि शिफारशीनुसार करावा.

७) आच्छादनाचा वापर

ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे पिकांचे अवशेष जमिनीवर ठेवणे किंवा योग्य आच्छादनाचा वापर करणे फायदेशीर ठरते. आच्छादनामुळे: बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते,जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. यात सोयाबीन पीक भुसा किंवा इतर पिकांचे अवशेष ५ टन प्रति हेक्टरी वापरावे.  किंवा सुबाभूळ, गिरीपुष्प यांचा पाला ३ टन प्रति हेक्टरी आच्छादन म्हणून वापरावे. साधी कोळपणी करून मातीचे आच्छादन करावे.

८)  अन्नद्रव्यांची फवारणी

पावसाचा खंड पडून जमिनीतील ओलावा कमी झाल्यास आणि पिकांची वाढ मंदावल्यास, जमिनीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाच्या अवस्थेनुसार पर्णीय अन्नद्रव्यांची फवारणी करता येते.  पोटॅशियम नायट्रेट (13:00:45): दोन टक्के द्रावण, म्हणजे २० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल. किंवा 19:19:19 (पाण्यात  विरघळणारे नत्र, स्फुरद, पालाश): एक टक्का द्रावण, म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर पाणी, फवारणी करता येईल. 10 लिटर पाण्यासाठी अनुक्रमे 200 ग्रॅम 13:00:45 किंवा 100 ग्रॅम 19:19:19 आवश्यक राहील.  यामुळे काही दिवस पाण्याचा ताण सहन करता येईल. साध्या पाण्याची फवारणी केली तरी  पिके 2 ते 4 दिवस ताण सहन करू शकतील. सध्या हळद, ऊस आणि फळ पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. गांडुळ खत, जैविक खते वापरावीत.

योग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक

पाऊस कमी असला तरी जल संधारणपाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा आधुनिक सिंचन पद्धतीने कार्यक्षम वापर आणि मृदओलावा संवर्धन आपल्या हातात आहे. पुढील पावसाचे पाणी जलसंधारण सऱ्यांद्वारे शेतात मुरवा, उपलब्ध सेंद्रिय अवशेषांनी आच्छादन करा, योग्य वेळी आंतरमशागत करून मातीचे आच्छादन तयार करा, जमिनीतील भेगा बुजवा आणि पिकाच्या अवस्थेनुसार मातीची भर द्यावी. कमी खर्चाच्या जैविक निविष्ठांचा वापर करा आणि फवारणीतून अन्नद्रव्यांची फवारणी करा आणि पिके वाचवा.

 

असा सल्ला विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकार तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, कनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे, यंग प्रोफेशनल (वन) श्री. सुरेश खटिंग आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मंगेश राऊत यांनी दिला.

अधिक माहितीसाठी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९५८८६४८२४२ यावर संपर्क साधावा.



Saturday, August 22, 2026

वनामकृवि – आरपीटीओ येथे सारथी प्रायोजित सेनापती धनाजी जाधव शेतकरी ड्रोन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची फ्लायिंग ग्राऊंडला भेट; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व प्रमाणपत्रांचे वितरण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) येथे सारथीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सेनापती धनाजी जाधव शेतकरी ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचचे सात दिवसीय प्रशिक्षण दिनांक १७ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वनामकृवि – आरपीटीओच्या फ्लायिंग ग्राऊंडला भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यांनी प्रशिक्षणार्थींनी घेतलेल्या प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली तसेच कृषि क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ कृषि फवारणीपुरता मर्यादित न ठेवता सर्वेक्षण, मॅपिंग, पीक निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध कृषि-आधारित सेवांसाठी करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

वनामकृवि – आरपीटीओ येथे डीजीसीएच्या मानकांनुसार ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येत असून, प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक ज्ञान, सिम्युलेटर प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना सुरक्षितपणे ड्रोन हाताळणी, उड्डाण संचालन आणि कृषि क्षेत्रातील ड्रोनच्या विविध उपयोगांची माहिती देण्यात येत आहे.

यापूर्वी दिनांक ५ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पहिल्या बॅचमधील १० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या बॅचचेही प्रशिक्षण पूर्ण झाले असून, सारथीच्या सहकार्याने वनामकृवि – आरपीटीओ येथे दर महिन्याला तीन ड्रोन पायलट प्रशिक्षण बॅच आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील तिसरी बॅच दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील युवकांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे अधिकृत प्रशिक्षण घेऊन कृषि तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये रोजगार व उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उपसंचालक (बियाणे) तथा विभाग प्रमुख डॉ. हरिकांत काळपांडे, कीटक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर,  पाणी सिंचन व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, वनामकृवि – आरपीटीओचे प्रमुख डॉ. विशाल इंगळे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. श्रद्धा धुरगुडे, श्री. ऋषिकेश औंढेकर तसेच कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रे व प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वनामकृवि – आरपीटीओच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासोबतच युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे.









सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळ्यांचे असे करा व्यवस्थापन; वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे महत्त्वाचे नगदी पीक असून, त्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होण्यामागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. पाने खाणाऱ्या अळ्यांमुळे सोयाबीनचे एकत्रितपणे ७१ टक्क्यांपर्यंत, तर केवळ उंटअळीमुळे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या सोयाबीन पिकावर उंटअळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश माने यांनी केले आहे.

सोयाबीन पिकाचे वेळोवेळी कीड सर्वेक्षण करून पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी व केसाळ अळी यांची अंडी आणि अळीग्रस्त पाने अलगद तोडून अळीसह नष्ट करावीत. तंबाखूवरील पाने खाणारी अळी व हिरवी घाटेअळी यांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्येक किडीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडून नष्ट करण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच शेतात इंग्रजी ‘T’ अक्षरासारखे ५० पक्षीथांबे प्रतिहेक्टरी उभारावेत.

तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी नोमुरिया रिलाय या बुरशीची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव आढळताच फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशकांची फवारणी करावी. यासाठी फ्लूबेंडामाईड ३९.३५% एससी ०.३ मिली, क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५% एससी ०.३ मिली, इमामेक्टीन बेंझोएट १.९०% ईसी ०.८५ मिली, टेरॅनिप्रोल १८.१८% एससी ०.५–०.६ मिली, नोव्हाल्युरॉन ५.२५% + इंडॉक्साकार्ब ४.५०% एससी १.६५–१.७५ मिली किंवा ॲसिटामीप्राईड २५% + बायफेंथ्रीन २५% डब्लूजी ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या किंवा नॅपसॅक पंपासाठी असून, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे तसेच फवारणी करताना सुरक्षिततेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

तंबाखूवरील पाने खाणारी व हिरवी घाटेअळी

तंबाखूवरील पाने खाणारी घाटेअळी

तंबाखूवरील पाने खाणारी घाटेअळी

उंटअळी

उंटअळी

उंटअळी

वनामकृवित गाजरगवत निर्मूलन सप्ताहानिमित्त मेक्सिकन भुंग्यांद्वारे जैविक नियंत्रण

गाजरगवताच्या समूळ निर्मूलनासाठी जैविक नियंत्रणाला चालना देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या परोपजीवी कीटक संशोधन योजना व कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘गाजरगवत निर्मूलन सप्ताहा’निमित्त अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंग्यांच्या माध्यमातून दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे व अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते परोपजीवी कीटक संशोधन योजना कार्यालयामार्फत निर्मित व संवर्धित करण्यात आलेले मेक्सिकन भुंगे अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी सोडण्यात आले.

मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ तसेच त्यांच्या अळ्या गाजरगवताची पाने खात असल्याने पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी गाजरगवताची वाढ व पुनरुत्पादन क्षमता कमी होण्यास मदत होते. विद्यापीठ परिसरात या जैविक नियंत्रण घटकांची संख्या वाढवून गाजरगवताचे पर्यावरणपूरक व शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी गाजरगवताचे केवळ नियंत्रण न करता त्याचे समूळ निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाजरगवत उपटून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे तसेच त्यापासून नैसर्गिक खत तयार करून त्याचा उपयोग करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

गाजरगवताच्या जैविक नियंत्रणामध्ये मेक्सिकन भुंग्याचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे स्पष्ट करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ व अळ्या दोन्ही गाजरगवताची पाने खात असल्याने त्याच्या वाढीस मोठ्या प्रमाणात आळा बसतो. अनेक भागांमध्ये मेक्सिकन भुंग्याच्या प्रभावामुळे गाजरगवताचे प्रमाण कमी झाले असून, त्याच्या जैविक नियंत्रणात या भुंग्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

कीड, रोग किंवा तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतींचा प्रभावी वापर केल्यास पर्यावरणपूरक व शाश्वत नियंत्रण साध्य करता येते. त्याचप्रमाणे गाजरगवताच्या व्यवस्थापनासाठी गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व त्यांच्या अळ्या तसेच तरोट्यासारख्या स्पर्धात्मक वनस्पतींचा वापर करून प्रभावी नियंत्रण साध्य करता येते. भविष्यात गाजरगवताचे समूळ निर्मूलन करण्यासाठी अशा जैविक उपाययोजनांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्त्व विशद करताना माननीय कुलगुरूंनी सापळा पिके आणि जैविक नियंत्रण घटकांच्या प्रभावी वापराबाबत अधिक संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. विविध पिकांमध्ये सापळा पिकांचा वापर करून कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येते. त्यामुळे मेक्सिकन भुंगा, त्याच्या अळ्या तसेच सापळा पिकांच्या प्रभावी वापराबाबत संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील ड्रोन प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या वेळी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ड्रोनच्या वापराबाबत माहिती देण्यात आली तसेच ड्रोनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कीड व रोग व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच कृषी क्षेत्रातील विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या प्रात्यक्षिकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी विद्यापीठ परिसरात गाजरगवत निर्मूलनासाठी कृषी कार्यानुभव कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहिमेदरम्यान विद्यापीठ परिसरातील गाजरगवत उपटून त्याचे निर्मूलन, योग्य पद्धतीने विल्हेवाट तसेच गाजरगवताची पाने खाणारे मेक्सिकन भुंगे व त्यांच्या अळ्यांच्या माध्यमातून जैविक नियंत्रण याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी गाजरगवत निर्मूलन सप्ताहाची उद्दिष्टे, गाजरगवतामुळे होणारे दुष्परिणाम तसेच मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ व अळ्या गाजरगवताची पाने खाऊन त्याचे जैविक नियंत्रण कशा प्रकारे करतात, याबाबत उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.

या उपक्रमात उपसंचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, एकात्मिक शेती पद्धतीचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, पाणी व्यवस्थापन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, डॉ. धनंजय मोहड, कृषी अभियंता डॉ. विशाल इंगळे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. ऋषिकेश औंढेकर, संशोधन सहयोगी डॉ. राजरत्न खंदारे व डॉ. योगेश मात्रे यांच्यासह कीटकशास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी तसेच कृषी महाविद्यालय, गोळेगाव येथील रावेच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.







Friday, August 21, 2026

गो-म्हैस स्टार्टअप म्हणजे शेतकऱ्याचा स्वाभिमान

 वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे पाच दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्राद्वारे गो-म्हैस स्टार्टअप : गोठ्यापासून उद्योगापर्यंत’ या विषयावर पाच दिवसीय कौशल्य विकासाधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ९० हून अधिक तरुण शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्य तसेच इच्छुक उद्योजकांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी व तज्ज्ञ मार्गदर्शक जिल्हा दुग्धविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर श्रीमती मनिषा हराळ-मोरे यांनी मार्गदर्शन करताना, गो-म्हैस व्यवसाय हा शेतकऱ्याचा स्वाभिमान, महिलांच्या सबलीकरणाचे माध्यम आणि गावाच्या आर्थिक विकासाचा आधार आहे, असे सांगितले. तरुण पिढीने या व्यवसायाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्याचे उद्योगात रूपांतर करून रोजगारनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मार्गदर्शन करताना गो-म्हैस स्टार्टअपचे महत्त्व स्पष्ट केले. शेतीसोबत दुग्ध व्यवसायातून वर्षभर नियमित उत्पन्न मिळू शकते, महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होते, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतात तसेच शेणखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून कृषि विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर यांनी काम पाहिले. प्रशिक्षणादरम्यान वैज्ञानिक पद्धतीने गोपालन, गाय-म्हशींची निवड, आहार व संगोपन, आधुनिक गोठा व्यवस्थापन, म्हशींसाठी विविध निवास पद्धती, रोग प्रतिबंध, लसीकरण, स्वच्छता व प्राथमिक उपचार, दुग्ध प्रक्रिया व मूल्यवर्धन, विपणन आणि वित्त व्यवस्थापन या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी चारा व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभाग, खुलताबाद येथील सहायक आयुक्त डॉ. उत्कर्ष वानखेडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी, सावंगी बाजार येथील डॉ. बिचोळे यांनी लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कृषि विस्तार शिक्षण विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे यांनी जैविक निविष्ठा निर्मितीविषयी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सावंगी बाजार येथील कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तरुण डेअरी उद्योजक श्री. संदीप नलावडे, संचालक, आदर्श डेअरी यांच्या डेअरी उद्योगाला प्रक्षेत्र भेट देण्यात आली. त्यांनी दुग्ध व्यवसायापासून उद्योग उभारणीपर्यंतचा प्रवास आणि यशोगाथा प्रशिक्षणार्थींना सांगितली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील श्याम गोसंवर्धन केंद्राला भेट देऊन शेण व गोमूत्रापासून जैविक निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक पाहण्यात आले. यावेळी श्री. राजकिरणजी व श्री. सुधीर विद्वांस यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणातून प्रेरणा घेत अनेक प्रशिक्षणार्थींनी लवकरच स्वतःचा गो-म्हैस व दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सतीश कदम, श्री. जयदेव सिंगल आणि श्री. जयदीप बनसोडे यांनी सहकार्य केले. कृषि विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.