Tuesday, September 15, 2026

सर एम. विश्वेश्वरैय्या यांचे विचार अभियंत्यांनी आत्मसात करणे ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. सर एम. विश्वेश्वरैय्या हे केवळ एक उत्कृष्ट अभियंता नव्हते, तर ते महान दृष्टे, शिस्तप्रिय प्रशासक आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी त्या काळात उभारलेली धरणे, जलसिंचन व्यवस्था आणि औद्योगिक प्रकल्प आजही देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरले आहेत.

काम करताना सर्वोत्तम तेच करा आणि कामात कधीही तडजोड करू नका, हा सर एम. विश्वेश्वरैय्या यांचा जीवनमंत्र आजच्या प्रत्येक अभियंत्याने आपल्या मनात कोरून ठेवला पाहिजे, असेही माननीय कुलगुरूंनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आज आपण अशा युगात जगत आहोत, जिथे तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि हरित तंत्रज्ञानामुळे जगाचे स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत अभियंत्यांची जबाबदारी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. एक कुलगुरू म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो; त्याचबरोबर माझी एक अपेक्षाही आहे. तुम्ही केवळ ‘रोजगार मिळवणारे’ न बनता ‘रोजगार निर्माण करणारे’ उद्योजक बना. तुमच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल, याचा विचार करा. तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरणाचा समतोल राखणे हीदेखील तुमचीच जबाबदारी आहे.

गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद भालेराव यांनी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. नावीन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.

गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे वि.प्र. डॉ. प्रकाश जाधव यांनी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याचा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पनांवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तांत्रिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश त्यांनी दिला.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. समाजाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी प्रास्ताविक केले. अभियंता दिनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कृषि क्षेत्रात अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास विभागप्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. प्रफुल्ल घोंटे, डॉ. पंडित मुंडे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. संदीप पायाळ, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. अश्विनी गावंडे, इंजि. लक्ष्मीकांत राऊतमारे तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी गुलशन कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख डॉ. गोपाल शिंदे यांनी केले, तर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. गजानन वसू, इंजि. अनिल हरकळ, इंजि. काळबांडे, श्री. राजाराम वाघ, श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. रमेश मोहिते, श्री. प्रमोद राठोड तसेच विद्यार्थी राध्येशाम खटींग, सेतेज मेटकर, यश जाधव, संकेत पवार, गणेश बोराडे, यश ढाकणे, राम शेंडगे आदींनी परिश्रम घेतले.











भारतीय ज्ञान प्रणालीतून कृषि क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 हिमाचल प्रदेशातील अर्णी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील अर्णी विद्यापीठ, काठगढ, इंदोरा येथे “भारतीय ज्ञान प्रणाली : गौरवशाली भूतकाळापासून विकसित व आत्मनिर्भर भारत @२०४७” या विषयावर दिनांक ११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप दिनांक १२ सप्टेंबर रोजी झाला. समारोप सत्रासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अर्णी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) राम किंकर पांडे यांनी त्यांना हे निमंत्रण दिले होते.

यावेळी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि क्षेत्रासाठी भारतीय ज्ञान प्रणाली – २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल (Indian Knowledge System for Agriculture – Pathway towards a Self-Reliant India @2047)” या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारताच्या कृषि क्षेत्राने स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. १९५० च्या अन्नटंचाईच्या परिस्थितीतून भारताने अन्नउत्पादनातील स्वयंपूर्णतेकडे आणि त्यानंतर अन्नसुरक्षितता व अन्न अधिशेष राष्ट्राकडे केलेला प्रवास हा देशाच्या कृषि संशोधन, तंत्रज्ञान, शेतकरी आणि कृषि शिक्षणाच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण परिणाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात बोलताना त्यांनी प्राचीन व शाश्वत भारतीय ज्ञान आणि चिंतनाची समृद्ध परंपरा ही आजच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी (NEP-2020) मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. भारतीय ज्ञान व शिक्षण पद्धतीतील मूल्यांचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेत प्रभावीपणे समावेश करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये “प्राचीन भारतीय ज्ञान केंद्र (Centre for Ancient Indian Knowledge)” सारख्या केंद्रांची स्थापना करून भारतीय ज्ञानपरंपरेतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार त्यांनी मांडला.

प्राचीन भारतातील तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी यांसारख्या जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांचा संदर्भ देताना त्यांनी या संस्थांमध्ये बहुविषयक शिक्षण व संशोधनाला मोठे महत्त्व होते आणि जगभरातून विद्यार्थी व विद्वान तेथे येत असत, असे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांना पुन्हा जागतिक दर्जाची ओळख मिळवून देण्याची दिशा निश्चित झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय ज्ञान प्रणालीचा कृषि क्षेत्राशी असलेला संबंध अधोरेखित करताना त्यांनी पारंपरिक भारतीय कृषि ज्ञान, स्थानिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत शेती आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारतीय ज्ञानपरंपरेतील अनुभवाधारित ज्ञानाला आधुनिक कृषि संशोधनाशी जोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, संसाधनांचे संवर्धन आणि कृषि क्षेत्राची शाश्वतता साध्य होण्यास मदत होईल, असा विचार त्यांनी मांडला.

विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ज्ञान, संशोधन, शिक्षण, नवोन्मेष आणि भारतीय मूल्यपरंपरा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठांनी केवळ शिक्षण आणि संशोधनापुरते मर्यादित न राहता शेतकरी, समाज आणि राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन ज्ञाननिर्मिती व तंत्रज्ञान हस्तांतरणात अग्रणी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा, शिक्षण, संस्कृती, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषि, मानवी मूल्ये आणि सामाजिक विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि युवा संशोधकांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले. ऑनलाइन माध्यमातूनही तज्ज्ञांची निमंत्रित व्याख्याने आयोजित करण्यात आली.

कृषि शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षण प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव तसेच शैक्षणिक नेतृत्वाची व्यापक पार्श्वभूमी असलेले कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन परिषदेसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक कृषि विज्ञान यांचा समन्वय साधून आत्मनिर्भर कृषि आणि विकसित भारत @२०४७ या संकल्पनेला ज्ञानाधिष्ठित दिशा देण्यास महत्त्वपूर्ण प्रेरणा मिळाली.

परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “Coming together is a beginning; Keeping together is progress; Working together is success” हा संदेश देत ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांद्वारे विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी पुढे जाण्याचे आवाहन केले. 


For English

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित १७ सप्टेंबरला ‘रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानेरब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती लता विजयकुमार वाकळे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य मा. खा. अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य मा. खा. डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य मा. खा.श्री रामाराव वडकुते, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे, 

विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. सईद खान शेरगुल खान, विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विधानसभा सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष उपस्थितीत महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव माननीय डॉ. परिमल सिंह (भाप्रसे), महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे), भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक माननीय डॉ. एन. जी. पाटील, परभणीचे जिल्हाधिकारी माननीय श्री संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नतिशा माथुर  (भाप्रसे) आदी मान्यवर आहेत.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर आणि नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनात शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील विविध पिकांचे नियोजन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पीक उत्पादनवाढीच्या उपाययोजना तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. परभणी व परिसरातील शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि संबंधितांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक

संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश आहिरे, परभणीचे आत्मा विभागाचे संचालक श्री. दौलत चव्हाण आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तांत्रिक सत्रात मार्गदर्शन

पीक परिसंवादाच्‍या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यपरीस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रब्बी तेलबिया, रब्बी ज्वार, गहू, रब्बी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, सद्य:स्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

विद्यापीठ निर्मित बियाणे विक्री

कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे. विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे आणि बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी पुढील प्रमाणे कळविले आहेत.

ज्वारीचा परभणी शक्ती, सुपर मोती,  परभणी मोती, परभणी ज्योती विक्रीस उपलब्ध आहे. प्रत्येक वाणाची बॅग ४ किलोची असून प्रति बॅगचा दर ५०० रुपये तर हुरड्याचा परभणी वसंत हा वाण १ किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध असून प्रति बॅग १५० रुपये दर आहे. 

हरभरा वाण बीडीएनजीके ७९८ (काबुली), बीडीएनजी ७९७ (आकाश), फुले विक्रम व परभणी चना उपलब्ध आहे. दहा किलोची बॅगची पॅकिंग असून बीडीएनजीके ७९८ या वाणाच्या दर १२५० रुपये तर हरभराच्या इतर वाणाचा दर ९००  रुपये प्रति बॅग असा आहे. 

जवसाचा एलएसएल ९३ हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये तर २ किलोची बॅग २६० रुपये दरानुसार उपलब्ध आहे. 

करडईचे पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा), पीबीएनएस १८४, पीबीएनएस ८६ (परभणी पूर्णा), पीबीएनएस १२ (परभणी कुसुम) उपलब्ध असून ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून बॅगचा दर ६५० रुपये असा आहे. 

गहू या पिकाचे वाण एनआयएडब्ल्यू १९९४ (फुले समाधान) आणि एनआयएडब्ल्यू ३०१ (फुले त्र्यंबक) उपलब्ध असून बॅग पॅकिंग ४० किलोची आहे. याचा दर २००० रुपये प्रति बॅग असा आहे.

तिळाची टीएलटी- १० जात १ किलोची बॅग २५० रुपये, सुर्यफूलाची एल.एस.एफ.एच-१७१ या वाणाच्या २ किलोची बॅग १००० रुपये दराने मिळणार आहे. बाजराचे  ए.एच.बी-१२०० हा वाण १.५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून  २८५ रुपये प्रती बॅग असा दर आहे. भेंडीची परभणी क्रांती जात २० ग्रॅमचा दर ३० रुपये तर मिरचीचे वाण परभणी तेजस आणि पीबीएनसी-१७ यासाठी १० ग्रॅमचा दर ४० रुपये असा आहे. याप्रमाणे बियाणे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.

Monday, September 14, 2026

पर्यावरणपूरक सजावटीतून वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात

 वडाच्या पारंब्या व नैसर्गिक साहित्यापासून साकारला आकर्षक देखावा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात करण्यात आली. दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाविद्यालयात वडाच्या पारंब्या, बांबू, पाने, फुले आणि इतर विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक सजावट व देखावा साकारण्यात आला आहे. या सजावटीतून पारंपरिक कलात्मकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनी ही अभिनव सजावट तयार केली. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य व सर्जनशील वापर करून विद्यार्थ्यांनी साकारलेला हा देखावा गणेशोत्सवाच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, प्लास्टिकचा कमीतकमी वापर आणि पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे. विशेषतः सजावटीसाठी कृत्रिम व प्लास्टिक साहित्याला पर्याय म्हणून नैसर्गिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सवाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील उपक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात पूजन, प्रसाद वितरण, विविध मनोरंजक व बौद्धिक खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक सजावट, नैसर्गिक साहित्याचा अभिनव वापर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक आकर्षक, पर्यावरणस्नेही आणि सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी ठरला आहे.















वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात येथे श्री गणेशाची भक्तिभावात स्थापना

 श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा आकर्षक देखावा; टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाचे स्वागत


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाची उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात स्थापना करण्यात आली. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

कृषि महाविद्यालयातील गणेशोत्सव समिती-२०२६च्या वतीने यावर्षी महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर दर्शन घडविण्यात आले आहे. तसेच श्री गणरायाच्या आगमनावेळी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून गणरायाचे उत्साहात स्वागत केले.

गणेशाच्या आगमन मिरवणुकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या देखाव्यातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, भक्तीपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे.

याप्रसंगी कृषि महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा कृषि विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, कीटक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कृषि हवामानशास्त्र विभागप्रमुख डॉ. किरण जाधव, तसेच पूजा समितीचे सदस्य डॉ. आसमान खोब्रागडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. गजानन गोटे, डॉ. बरकुले, डॉ. धीरज पाथ्रीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




Saturday, September 12, 2026

५४ व्या संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत वनामकृविच्या ४२ पैकी ४१ तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता; पाचही वाण व चारही कृषी अवजारांच्या शिफारशी मंजूर

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शेतकरीकेंद्रित संशोधनाला मिळाले यश


राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६ आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या संशोधन तंत्रज्ञानांचा आढावा घेण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरत गोगावले होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनीही समारंभात मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव डॉ. परिमल सिंह (भाप्रसे) आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ), डॉ. संजय भावे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), डॉ. शरद गडाख (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) आणि डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ) यांच्यासह महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य श्री. विनायक काशिद, कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन विभागाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५–२६ या कालावधीत शेतकरी देवो भव’ या भावनेतून शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रांत संशोधनाला चालना दिली. विविध पिके, हवामान बदल, मृदा आरोग्य, पीक संरक्षण, डिजिटल शेती, जैविक निविष्ठा आणि मूल्यवर्धन आदी विषयांवर संशोधन करण्यात आले.

या संशोधन कार्याचा अहवाल विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत सादर केला. यासोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन विभागाने विविध पिकांचे वाण, पीक उत्पादन तंत्रज्ञान, कृषि अवजारे तसेच कृषि क्षेत्राशी संबंधित अन्य विषयांवरील एकूण ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या.

या ४२ शिफारशींसह वाण प्रसारणासंदर्भातील सोयाबीनची एक, आंब्याची एक आणि भाजीपाला पिकांच्या तीन अशा एकूण पाच वाणांच्या शिफारशींचा समावेश होता. तसेच कृषि अवजारांशी संबंधित चार शिफारशी सादर करण्यात आल्या.

संयुक्त ॲग्रेस्को बैठकीत सादर करण्यात आलेल्या ४२ तंत्रज्ञान शिफारशींपैकी ४१ शिफारशींना मान्यता मिळाली असून, सर्व पाच वाणांच्या तसेच चारही कृषि अवजारांच्या शिफारशींनाही मान्यता प्राप्त झाली आहे. यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शेतकरीकेंद्रित संशोधन कार्याला महत्त्वपूर्ण अधिमान्यता मिळाली आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विषयांवर विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञान शिफारशी आधुनिक, उपयुक्त आणि शाश्वत कृषि पद्धतींच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानांचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल.

कृषि संशोधन अधिकाधिक शेतकरीकेंद्रित, हवामान-अनुकूल, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने या मान्यतांना विशेष महत्त्व आहे. या तंत्रज्ञान शिफारशींच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि शेतीच्या शाश्वततेत सकारात्मक बदल घडवून आणण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी व्यक्त केला.

या बैठकीमध्ये विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, विविध संशोधन प्रकल्पांचे समन्वयक तथा मुख्य शास्त्रज्ञ यांनी सहभाग घेवून सबंधित विषयांचे सादरीकरण केले. वनामकृविच्या शास्त्रज्ञांच्या बैठकीतील सहभागासाठी संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. सुनिता पवार, डॉ. प्रभाकर पडघन, संशोधन संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वाण प्रसारण

१. सोयाबीन : एमएयूएस ७९१

सोयाबीन पिकाचा वाण एमएयूएस ७९१ हा स्थानिक व राष्ट्रीय तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस आढळून आला आहे. हा वाण विविध कीड व रोगास मध्यम प्रतिकारक आढळून आला असून, एमएयूएस ७९१ या वाणाची महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



२. आंबा – राजकेशर (FRSMC-1)

नियमित फलधारणा, लवकर फुलोरा व फलधारणा, कमी पीक कालावधी, आकर्षक रंग, अधिक फळे व उत्पादन, चवीला गोड आणि अधिक टिकवण क्षमता असणारा आंब्याचा “FRSMC-1” हा वाण राजकेशर” या नावाने मराठवाडा विभागात लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



३. खरबूज, परभणी खरबूज (VNMKVMH-1)

परभणी खरबूज (VNMKVMH-1) हा अर्धवट जाळीदार, कुरकुरीत व फिकट नारंगी जाडगर आणि एकसारखी लंबवर्तुळाकार फळे असणारा, अधिक उत्पादन देणारा व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



४. परभणी दुधी भोपळा

परभणी दुधी भोपळा (LTRBG-3x4) हा मध्यम वाढीचा, कडू नसलेली, लांब, सरळ आणि एकसारखी दंडगोलाकार फळे असणारा, अधिक उत्पादन देणारा व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.



५. परभणी कारली

परभणी कारली (VNMKVBGH-01) फळे ही गडद हिरव्या चमकदार रंगाची असून ती मध्यम आकाराची व दोन्ही टोकांना निमुळती आणि त्यांच्यावरील शिरा हे तुटक पण आकर्षक फळे असणारा, अधिक उत्पादन व लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त वाण आहे. या वाणाची मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

 


कृषी औजारे व यंत्र प्रसारण

१. पशुधन धुणे यंत्र

वनामकृवि विकसित पशुधन धुणे यंत्राच्या वापरामुळे पशुधन धुतल्यामुळे त्यांची स्वच्छता, उत्पादन व कार्यक्षमता वाढते. शेण आणि घाण ८९% कमी होते, बाह्यपरजीवींचे निर्मूलन ९५% होते, पाणी आणि मनुष्यबळाची बचत ५०% होते आणि या सर्व गोष्टींचा एकूण परिणाम पशुधनावर सरासरी ४५% या यंत्राच्या सहाय्याने बैलांस उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा, गायींसाठी उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा, तसेच म्हशींसाठी उन्हाळ्यात दररोज दोनदा, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात दररोज धुण्याची शिफारस गोशाळाचालक व पशुपालक शेतकऱ्यांना करण्यात येते.



२. बैलचलित बहुपीक टोकण व स्लरी टाकणे यंत्र

वनामकृवि विकसित बैलचलित बहुपीक टोकण व स्लरी टाकणे (सोबत रेखाचित्र) यंत्राचा वापर हरभरा व रब्बी ज्वारीवर एकाचवेळी पेरणी आणि स्लरी टाकण्यासाठी वापरल्यामुळे बियाण्यामध्ये ५० टक्के, मनुष्यबळात व एकूण मशागतीवर ४६ टक्के बचत झाल्याचे आढळून आले. म्हणून सेंद्रिय शेती करणाऱ्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वापरण्याची शिफारस करण्यात येते.



३. पशुधनास खरारा करणे यंत्र

वनामकृवि विकसित पशुधनास खरारा करणे यंत्राच्या वापरामुळे मोठ्या पशुधनाची स्वच्छता आणि आराम सुधारून त्यांचे उत्पादन व कार्यक्षमता वाढते. शेण आणि डाग ९१%, बाह्यपरजीवी ८८%, आजारी पडण्याचे प्रमाण ८२% कमी होते. या सर्व गोष्टींचा एकूण चांगला परिणाम पशुधनावर सरासरी ३६% आढळतो. या यंत्राच्या सहाय्याने बैलांस उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात दररोज, तसेच गायींसाठी उन्हाळ्यात दररोज, पावसाळ्यात एक दिवसाआड आणि हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा, आणि म्हशींसाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा आणि हिवाळ्यात एक दिवसाआड खरारा करण्याची शिफारस गोशाळा व पशुपालक शेतकऱ्यांसाठी करण्यात येते.



४. अर्ध-स्वयंचलित चारा व खुराक वहनयंत्रणा

वनामकृवि विकसित अर्ध-स्वयंचलित चारा व खुराक वहनयंत्रणा जनावरांना वाळलेला, हिरवा चारा व खुराक देण्यामध्ये मनुष्यबळात ५० टक्के, वेळेत ९३ टक्के आणि चारा नासाडीमध्ये ४४ टक्के पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत बचत होत असल्यामुळे सहा जनावरांपर्यंतच्या लहान दुग्धव्यवसायिक आणि पशुपालकांसाठी शिफारस करण्यात येते.