Thursday, September 17, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित ‘रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ संपन्न

शेतकरी देवो भव’ भावनेतून वनामकृविचे विस्तार कार्य; परिसंवाद व कृषि प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानेरब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तथा कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून केले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, पद्मश्री माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड, प्रगतिशील महिला शेतकरी श्रीमती मीरा चोपडे तसेच विद्यापीठाच्या विस्तार समितीचे सदस्य श्री. भिमराव डोणगापुरे यांची विशेष उपस्थिती होती.

व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. मराठवाड्यात मागील काही काळात पावसाने ओढ दिल्यामुळे काही भागांत पिकांचे नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या परिस्थितीत शासन आणि विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतीसमोरील विविध आव्हाने सोडविण्यासाठी शासन तत्पर असून, खरीप हंगामातील अडचणींचा विचार करून आगामी रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन करताना कृषि क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून करण्यात येणारी गुंतवणूक आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात असून, महिलांना महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये महिलांचा सातत्याने मोठा सहभाग असतो. विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांमुळे हा सहभाग वाढत आहे, असे प्रतिपादन केले.

पुढे त्यांनी नमूद केले की, विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम सातत्याने माझ्यापर्यंत पोहोचत असतात. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहेत.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मागील चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कार्याला सातत्याने गती मिळाली असून, विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे मंत्री पदाचा पदभार नसताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एका शास्त्रज्ञाने पाच शेतकरी दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी कार्य करावे, अशी सूचना मी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने कार्यवाही करून जवळपास ५०० शेतकऱ्यांना दत्तक घेतले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

परभणी जिल्ह्यातसिल्क आणि मिल्क’ यांसारखे उपक्रम कार्यान्वित करण्यात आले असून, त्यातून काही शेतकरी वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. शेतीसोबत विविध जोडधंदे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे सर्व माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच विद्यापीठाच्या प्रयत्नांतून घडत असल्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी तग धरणाऱ्या वाणांचे आणि बियाण्यांचे निर्मितीकार्य हाती घेतल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन वेळा कर्जमाफी केली असून, वीजबिलाच्या संदर्भातही शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या  काही शेतकऱ्यांना शून्य वीजबिलाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतीमध्ये गरजेपेक्षा अधिक खते व रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि जमिनीची सुपीकता व प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाच्या सल्ल्यानुसारच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र राज्याने कृषि क्षेत्रात देशाला दिशादर्शक ठरणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचे नमूद केले. ‘महा-ई-पीक पाहणी’ व ‘महाविस्तार’ ॲपसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

शेतकरी देवो भव’ या भावनेतून विद्यापीठाने शेतकऱ्यांना सेवा देण्याचे कार्य केले असून, त्यातून विद्यापीठाला राज्यात प्रथम आणि राष्ट्रीय पातळीवर ३४ वे स्थान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीच्या नियोजनासाठी कृषि विभागाशी समन्वय साधून विद्यापीठ कार्य करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सहकार्याने हवामानाचा अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी विद्यापीठात डॉप्लर रडारची स्थापना करण्याच्या दिशेने कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून परभणीचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक अधोरेखित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि उपलब्ध शास्त्रीय मार्गदर्शनाच्या आधारे रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माननीय पद्मश्री श्री. श्रीरंग देवबा लाड यांनी विद्यापीठाकडून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल विश्वास निर्माण झाल्याचे नमूद केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासारख्या सणाच्या दिवशीही महिला शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमास उपस्थित राहिले, ही विद्यापीठाच्या विस्तार कार्याची पोहोच दर्शविणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असून, या ठिकाणी कृषि विद्यापीठाची स्थापना होणे ही परभणी आणि मराठवाड्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शास्त्रीय ज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय डॉ. एन. जी. पाटील यांनी भारत सरकारच्या डिजिटल कृषि उपक्रमाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरो यांच्यातील सामंजस्य करारातून विकसित करण्यात आलेल्या ‘मराठवाडा जिओपोर्टल’ ची माहिती दिली.

या पोर्टलच्या माध्यमातून जमिनीची क्षमता, भूजल उपलब्धता, मृदेची खतधारण क्षमता यांसह विविध भौगोलिक व मृदाविषयक माहिती उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माती परीक्षणातून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची माहिती मिळते; मात्र जिओ पोर्टलच्या माध्यमातून जमिनीची अधिक सखोल माहिती उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, कृषि व संलग्न यंत्रणा तसेच शासनाला जलसंधारण, पीक नियोजन आणि संसाधन व्यवस्थापनासाठी या पोर्टलचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी सद्यःस्थितीतील हवामान व पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन रब्बी हंगामातील पीक नियोजनाची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमात ‘मराठवाडा जिओ पोर्टल’, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लिखित विविध पुस्तके तसेच महिलांसाठी विकसित करण्यात आलेल्या स्त्री आरोग्य’ या मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

तसेच कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन दालनधारकांशी संवाद साधला व त्यांचे उत्साहवर्धन केले.

अधिष्ठाता तथा ‘मराठवाडा जिओ पोर्टल’चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण वैद्य आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरोचे आरएस-जीआयएस प्रमुख डॉ. जी. पी. ओबी रेड्डी यांनी ‘मराठवाडा जिओ पोर्टल’विषयी सविस्तर माहिती दिली.

स्त्री आरोग्य’ या मोबाईल ॲपची संकल्पना, लेखन व निर्मिती अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या घटक समन्वयिका डॉ. नीता गायकवाड यांनी केली आहे.

कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून सहकार्य करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील पवार तसेच इफकोच्या अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

रब्बी पीक परिसंवादाच्या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यःस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रब्बी तेलबिया, रब्बी ज्वारी, गहू व रब्बी भाजीपाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, तसेच सद्यःस्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयांवर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने करण्यात आली. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध बियाण्यांची माहिती व त्यांचे दर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे आणि बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी मान्यवरांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.





















मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन

शेतकरी हितासाठी हवामानविषयक दीर्घकालीन माहिती व कृषि संशोधनावर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

परभणी, दि. १७ सप्टेंबर २०२६ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या विकासासोबतच मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

संघर्ष, त्याग आणि बलिदानाची स्मृती जपणारा दिवस

पुढे बोलताना माननीय कुलगुरू यांनी नमूद केले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नसून संघर्ष, त्याग आणि बलिदानाची स्मृती जपणारा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबाद संस्थानातील मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग होऊ शकला नव्हता. तत्कालीन निजामाच्या राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी जनजागृती, सत्याग्रह आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ्याचे नेतृत्व केले.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’नंतर हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाले आणि मराठवाडा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनला. या ऐतिहासिक लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याला समृद्ध संतपरंपरा, सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत बहिणाबाई यांच्यासह अनेक संतांनी समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. या भूमीने साहित्य, शिक्षण, समाजसुधारणा तसेच कृषि क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताला प्राधान्य

सध्या मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने विविध पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची आवश्यकता असल्याने अनेक ठिकाणी समाधानकारक व सातत्यपूर्ण पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना केवळ अल्पकालीन पावसाच्या अंदाजाची नव्हे, तर त्यापुढील कालावधीतील हवामानविषयक माहितीचीही आवश्यकता आहे. बदलत्या हवामान परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना योग्य वेळी निर्णय घेता यावेत, यासाठी हवामानविषयक माहिती अधिक प्रभावीपणे आणि सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासंदर्भातील मुद्दा पुणे येथे झालेल्या भारतीय हवामान विभागाच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि संशोधनाच्या ४१ शिफारशींना मान्यता

दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या (जॉइंट ॲग्रेस्को) बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सादर केलेल्या कृषि तंत्रज्ञानाच्या ४२ शिफारशींपैकी ४१ शिफारशींना मान्यता मिळाली. तसेच विद्यापीठाने सादर केलेल्या पाचही वाणांच्या आणि चारही कृषि अवजारांच्या शिफारशींनाही मान्यता मिळाली.

यामध्ये सोयाबीनचा ‘एमएयूएस-७९१’, आंब्याचा ‘राजकेशर (FRSMC-1)’, खरबुजाचा ‘परभणी खरबूज (VNMKVMH-1)’, ‘परभणी दुधी भोपळा (LTRBG-3×4)’ आणि ‘परभणी कारले (VNMKVBGH-01)’ या वाणांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले.

शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी

विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठाला ICAR-NAEAB कडून ‘A’ श्रेणीचे मानांकन प्राप्त झाले असून, IIRF क्रमवारीत महाराष्ट्रातील राज्य कृषि विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक आणि देशात ३४ वे स्थान प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या कार्याचा केंद्रबिंदूविद्यार्थी-केंद्रित शिक्षण, शेतकरी-केंद्रित विस्तार, नवाचार-केंद्रित संशोधन आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन” हा आहे. ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषि प्रसार सेवा अधिक सक्षम करणे, कृषि क्षेत्रातील समस्यांवर उपयुक्त संशोधन करणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान करणे, यावर भर देण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या कृषि विकासासाठी तसेच शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यातही विद्यापीठातील सर्वांनी एकसंघ भावनेने, परस्पर सहकार्याने आणि कोणताही हेवा-दावा, द्वेष अथवा मत्सर न ठेवता कार्य करावे. सामूहिक प्रयत्नांतून विद्यापीठाला उच्च मानांकन मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक माननीय डॉ. एन. जी. पाटील, आरएस - जीआयएसचे प्रमुख डॉ जी. पी. ओबी रेड्डी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रीय छात्र सैनिकांनी छात्र अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माननीय कुलगुरूंना सलामी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने गायक श्री. उदय वाईकर यांनी केले.

शेवटी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी एकजुटीने व आत्मविश्वासाने कार्य करण्याचे आवाहन केले.












Wednesday, September 16, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित विविध कार्यक्रमांचे आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण; स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात सकाळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या भारतातील विलिनीकरणाच्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. या ऐतिहासिक लढ्यात मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuesday, September 15, 2026

सर एम. विश्वेश्वरैय्या यांचे विचार अभियंत्यांनी आत्मसात करणे ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. सर एम. विश्वेश्वरैय्या हे केवळ एक उत्कृष्ट अभियंता नव्हते, तर ते महान दृष्टे, शिस्तप्रिय प्रशासक आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी त्या काळात उभारलेली धरणे, जलसिंचन व्यवस्था आणि औद्योगिक प्रकल्प आजही देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरले आहेत.

काम करताना सर्वोत्तम तेच करा आणि कामात कधीही तडजोड करू नका, हा सर एम. विश्वेश्वरैय्या यांचा जीवनमंत्र आजच्या प्रत्येक अभियंत्याने आपल्या मनात कोरून ठेवला पाहिजे, असेही माननीय कुलगुरूंनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आज आपण अशा युगात जगत आहोत, जिथे तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि हरित तंत्रज्ञानामुळे जगाचे स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत अभियंत्यांची जबाबदारी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. एक कुलगुरू म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो; त्याचबरोबर माझी एक अपेक्षाही आहे. तुम्ही केवळ ‘रोजगार मिळवणारे’ न बनता ‘रोजगार निर्माण करणारे’ उद्योजक बना. तुमच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल, याचा विचार करा. तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरणाचा समतोल राखणे हीदेखील तुमचीच जबाबदारी आहे.

गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद भालेराव यांनी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. नावीन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा, असे त्यांनी सांगितले.

गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे वि.प्र. डॉ. प्रकाश जाधव यांनी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याचा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवकल्पनांवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तांत्रिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश त्यांनी दिला.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी अभियंता दिनाचे महत्त्व विशद केले. समाजाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी प्रास्ताविक केले. अभियंता दिनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कृषि क्षेत्रात अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास विभागप्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. प्रफुल्ल घोंटे, डॉ. पंडित मुंडे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. संदीप पायाळ, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. अश्विनी गावंडे, इंजि. लक्ष्मीकांत राऊतमारे तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी गुलशन कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख डॉ. गोपाल शिंदे यांनी केले, तर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. गजानन वसू, इंजि. अनिल हरकळ, इंजि. काळबांडे, श्री. राजाराम वाघ, श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. रमेश मोहिते, श्री. प्रमोद राठोड तसेच विद्यार्थी राध्येशाम खटींग, सेतेज मेटकर, यश जाधव, संकेत पवार, गणेश बोराडे, यश ढाकणे, राम शेंडगे आदींनी परिश्रम घेतले.











भारतीय ज्ञान प्रणालीतून कृषि क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 हिमाचल प्रदेशातील अर्णी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील अर्णी विद्यापीठ, काठगढ, इंदोरा येथे “भारतीय ज्ञान प्रणाली : गौरवशाली भूतकाळापासून विकसित व आत्मनिर्भर भारत @२०४७” या विषयावर दिनांक ११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप दिनांक १२ सप्टेंबर रोजी झाला. समारोप सत्रासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. अर्णी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) राम किंकर पांडे यांनी त्यांना हे निमंत्रण दिले होते.

यावेळी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि क्षेत्रासाठी भारतीय ज्ञान प्रणाली – २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल (Indian Knowledge System for Agriculture – Pathway towards a Self-Reliant India @2047)” या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारताच्या कृषि क्षेत्राने स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. १९५० च्या अन्नटंचाईच्या परिस्थितीतून भारताने अन्नउत्पादनातील स्वयंपूर्णतेकडे आणि त्यानंतर अन्नसुरक्षितता व अन्न अधिशेष राष्ट्राकडे केलेला प्रवास हा देशाच्या कृषि संशोधन, तंत्रज्ञान, शेतकरी आणि कृषि शिक्षणाच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण परिणाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात बोलताना त्यांनी प्राचीन व शाश्वत भारतीय ज्ञान आणि चिंतनाची समृद्ध परंपरा ही आजच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी (NEP-2020) मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. भारतीय ज्ञान व शिक्षण पद्धतीतील मूल्यांचा आधुनिक शिक्षण व्यवस्थेत प्रभावीपणे समावेश करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षण संस्थांमध्ये “प्राचीन भारतीय ज्ञान केंद्र (Centre for Ancient Indian Knowledge)” सारख्या केंद्रांची स्थापना करून भारतीय ज्ञानपरंपरेतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार त्यांनी मांडला.

प्राचीन भारतातील तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी यांसारख्या जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांचा संदर्भ देताना त्यांनी या संस्थांमध्ये बहुविषयक शिक्षण व संशोधनाला मोठे महत्त्व होते आणि जगभरातून विद्यार्थी व विद्वान तेथे येत असत, असे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांना पुन्हा जागतिक दर्जाची ओळख मिळवून देण्याची दिशा निश्चित झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय ज्ञान प्रणालीचा कृषि क्षेत्राशी असलेला संबंध अधोरेखित करताना त्यांनी पारंपरिक भारतीय कृषि ज्ञान, स्थानिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत शेती आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारतीय ज्ञानपरंपरेतील अनुभवाधारित ज्ञानाला आधुनिक कृषि संशोधनाशी जोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, संसाधनांचे संवर्धन आणि कृषि क्षेत्राची शाश्वतता साध्य होण्यास मदत होईल, असा विचार त्यांनी मांडला.

विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी ज्ञान, संशोधन, शिक्षण, नवोन्मेष आणि भारतीय मूल्यपरंपरा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठांनी केवळ शिक्षण आणि संशोधनापुरते मर्यादित न राहता शेतकरी, समाज आणि राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन ज्ञाननिर्मिती व तंत्रज्ञान हस्तांतरणात अग्रणी भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा, शिक्षण, संस्कृती, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषि, मानवी मूल्ये आणि सामाजिक विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि युवा संशोधकांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवरील शोधनिबंध सादर केले. ऑनलाइन माध्यमातूनही तज्ज्ञांची निमंत्रित व्याख्याने आयोजित करण्यात आली.

कृषि शिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षण प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव तसेच शैक्षणिक नेतृत्वाची व्यापक पार्श्वभूमी असलेले कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन परिषदेसाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक कृषि विज्ञान यांचा समन्वय साधून आत्मनिर्भर कृषि आणि विकसित भारत @२०४७ या संकल्पनेला ज्ञानाधिष्ठित दिशा देण्यास महत्त्वपूर्ण प्रेरणा मिळाली.

परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “Coming together is a beginning; Keeping together is progress; Working together is success” हा संदेश देत ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्नांद्वारे विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी पुढे जाण्याचे आवाहन केले. 


For English