तंत्रज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा लाभ महत्त्वाचा; संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

विकसित भारत २०४७च्या संकल्पनेला गती देण्यासाठी ग्रामीण भागातील नवकल्पना, स्थानिक ज्ञान आणि
शेतकरी-केंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन–इंडिया
(एनआयएफ - NIF), गांधीनगर यांच्यामध्ये परभणी येथे दिनांक १२
ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि आणि एनआयएफचे संचालक माननीय डॉ. अरविंद रानडे यांच्या उपस्थितीत करण्यात
आला.
सामंजस्य कराराच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारत २०४७ साठी समावेशक
नवकल्पना’ (Inclusive
Innovations for Viksit Bharat 2047) या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आला. करारानुसार दोन्ही संस्थांच्या सहकार्याने
समावेशक नवोपक्रम परिसंस्था विकसित करणे, विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या
नवकल्पनांचा शोध घेणे, त्यांचे दस्तऐवजीकरण, पडताळणी व प्रमाणीकरण करणे, नवकल्पकांना मार्गदर्शन व
प्रशिक्षण देणे तसेच सामाजिक गरजांवर आधारित संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार
आहेत.
या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर, आचार्य
व पदव्युत्तर संशोधकांना एनआयएफच्या सहकार्याने ग्रामीण नवकल्पना, मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास आणि समाजाच्या अपूर्ण गरजांवर
संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवकल्पकांना
मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पनांचे बाजारपेठेसाठी उपयुक्त समाधानांमध्ये रूपांतर
करण्यासाठी सहकार्य करता येणार आहे. नवोपक्रम, उद्योजकता विकास
आणि बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थापनाबाबत संयुक्त कार्यशाळाही आयोजित करता येणार आहेत.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नॅशनल इनोव्हेशन
फाउंडेशनच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्याशी जोडलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांप्रती
आदर व्यक्त केला. एनआयएफसोबत सुरुवातीपासून असलेला संबंध आणि या संस्थेचे सक्षम नेटवर्क
विद्यापीठासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन प्रकल्प आणि संशोधकांच्या
नवकल्पनांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या शेतावरील
जोखीम कमी करणारे संशोधन उभारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी तंत्रज्ञानाचा लाभ अधिक महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करत त्यांनी संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी आणि समाजाच्या गरजा असाव्यात,
असे प्रतिपादन केले.
सहज व सरळ जीवनापेक्षा स्पर्धात्मक वातावरणातून सक्षमता निर्माण होते, असे सांगून माननीय
कुलगुरूंनी “प्रश्नांना प्रश्न म्हणून संबोधले, तर त्यांची उत्तरे शोधणे अधिक सोपे जाते,” या कार्यपद्धतीचा
विद्यापीठात अवलंब केला जात असल्याचे नमूद केले. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण,
नवकल्पना-आधारित संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार
कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या चारही बाबींवर भर दिल्यामुळे विद्यापीठाने
राष्ट्रीय पातळीवर अनेक उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. नजीकच्या
काळात विद्यापीठातील नोकरभरतीची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी
नमूद केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्यासाठी सक्षम उत्तराधिकारी तयार करावा,
जेणेकरून संस्थेचे कार्य सातत्याने पुढे चालू राहील, असे आवाहन त्यांनी केले.
एनआयएफचे संचालक डॉ. अरविंद रानडे यांनी ‘Inclusive Innovation for Viksit Bharat’ या विषयावर मार्गदर्शन करताना नवकल्पक संशोधक हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे
आधारस्तंभ असल्याचे सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळाची जमेची बाजू
असून, या लोकसंख्यात्मक लाभाचा प्रभावी उपयोग करण्याची गरज आहे.
भारतीय समाजरचनेत ग्रामीण लोकसंख्येचा मोठा वाटा असून, मोठ्या
प्रमाणावर अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे विकसित भारत २०४७चे स्वप्न साकारण्यासाठी
उत्पादकता, भारतीय ओळख व गौरवशाली परंपरा, क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (resilience) यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन संशोधन उपक्रम हे शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांवर
आधारित असावेत, असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. कृषी, जल व स्वच्छता,
आरोग्य व पोषण, ऊर्जा व पर्यावरण तसेच जीवनमान
उंचावणे या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताच्या Indigenous Knowledge आणि स्थानिक तंत्रज्ञानामध्ये
अनेक समस्यांची व्यावहारिक उत्तरे दडलेली आहेत. देशातील शेतकरी, कारागीर आणि ग्रामीण नवकल्पकांकडे असलेल्या या ज्ञानाला मागील २५ वर्षांत एनआयएफने
पुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी
एनआयएफच्या कार्यपद्धतीचे सविस्तर विश्लेषण केले.
व्हीएआरडी विभाग प्रमुख डॉ. राकेश माहेश्वरी यांनी नवकल्पक संशोधक नाविन्यपूर्ण
कल्पना व संशोधन घेऊन येत असल्याचे सांगितले. या नवकल्पनांना शास्त्रज्ञांनी शास्त्रीय
दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त, सुलभ आणि व्यवहार्य बनविण्याची आवश्यकता आहे. नवकल्पकांच्या
संशोधनाला बौद्धिक संपदा हक्कांतर्गत संरक्षण देणे, योग्य नोंदणीसाठी
मदत करणे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन
देणे आवश्यक असून, एनआयएफ या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य करीत
असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. त्यांनी
संशोधनातील नवकल्पनांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण
वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल
रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड आदी मान्यवर
उपस्थित होते.
यावेळी श्री. मोहन मुक्ताजी लांब, चिंचपूर (ता. धारूर, जि. बीड) आणि श्री. संभाजी शिराळे, पेठ शिवणी (ता. पालम,
जि. परभणी) या नवकल्पक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार संशोधन उपसंचालक
डॉ. सुनीता पवार यांनी मानले तर संशोधन उपसंचालक डॉ. प्रभाकर पडघन आणि संशोधन संचालनालयातील
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या विशेष व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, आचार्य व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी
घेतला.
सामंजस्य करारानुसार दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त कार्यशाळा, प्रशिक्षण, संशोधन व विद्यार्थी-शोधक विनिमय कार्यक्रम राबविण्यासह संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचीही तरतूद आहे. कराराची मुदत पाच वर्षांची असून, दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण व शेतकरी-केंद्रित नवकल्पनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
For English

.jpeg)

.jpeg)

.jpeg)






.jpeg)


.jpeg)
.png)
.png)


.jpeg)



.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
