Saturday, August 8, 2026

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी गटाची वनामकृविमध्ये भेट; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याशी साधला संवाद

 

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या मौजे खैरा या गावातील प्रगतशील शेतकरी गटाने दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे भेट देऊन विद्यापीठातील विविध कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या शेतकरी गटाने सकाळी सुरवातीला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट घेतली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून  शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शेतीतील अनुभव, अडचणी, पिकांची स्थिती तसेच विद्यापीठाकडून अपेक्षित असलेल्या तंत्रज्ञान व मार्गदर्शनाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनीही आपल्या भागातील शेतीविषयक विविध प्रश्न माननीय कुलगुरूंसमोर मांडले. शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील थेट संवादातून कृषि संशोधनाचा प्रत्यक्ष शेतापर्यंत उपयोग व्हावा, यावर यावेळी भर देण्यात आला.

शेतकरी हा कृषि विद्यापीठाच्या कार्याचा केंद्रबिंदू असून, विद्यापीठातील संशोधन व तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाहिजे, या भावनेतून माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांशी केलेला हा संवाद विशेष ठरला. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा व त्यांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा आनंद झाल्याची भावना माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

यानंतर शेतकरी गटास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या विस्तार शिक्षण गटामार्फत विद्यापीठात विकसित करण्यात आलेले विविध शेतकरी उपयोगी तंत्रज्ञान, संशोधन केंद्रांमार्फत विकसित वाण व तंत्रज्ञान तसेच शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर दत्तात्रय पटाईत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कापूस, हळद, सोयाबीन आदी पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच कापूस पिकामध्ये फवारणी करताना येणाऱ्या अडचणी याबाबत डॉ. पटाईत यांनी शास्त्रीय पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान शेतकरी गटाने कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनीस भेट देऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या विविध वाणांबाबत माहिती घेतल्यानंतर आपल्या भागात या वाणांची लागवड करण्याचा मनोदय शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स’ हे उत्पादन आपण हळद व इतर फळबागांमध्ये वापरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी गटाचे प्रमुख तथा प्रगतशील शेतकरी श्री. रवींद्र मापारी यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू तसेच विद्यापीठातील तज्ज्ञांचे आभार व्यक्त केले. चिंचोली, ता. जिंतूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. किशनराव मोरे यांचीही यावेळी उपस्थिती होती. विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मिळालेल्या शास्त्रीय, उपयुक्त आणि शेतकरी-केंद्रित मार्गदर्शनाबद्दल शेतकरी गटाने समाधान व्यक्त केले.






लिंबूवर्गीय फळपिकांच्या संशोधन व विकासाला मिळणार नवी दिशा; मराठवाड्यातील लिंबूवर्गीय फळपिकांच्या विकासाला चालना

 वनामकृवि, परभणी आणि भाकृअप–केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर यांच्यात सामंजस्य करार


लिंबूवर्गीय फळपिकांच्या क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान विकास, ज्ञानाची देवाणघेवाण आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद–केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (ICAR–Central Citrus Research Institute), नागपूर यांच्यात दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या सामंजस्य करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि भाकृअप–केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूरचे माननीय संचालक डॉ. दिलीप घोष यांनी संबंधित संस्थांच्या वतीने स्वाक्षऱ्या केल्या.

या करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधन व विकास सहकार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त होणार असून, लिंबूवर्गीय फळपिकांच्या उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ता, कीड-रोग व्यवस्थापन, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य, पोषण व्यवस्थापन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन प्रणाली यांसारख्या विविध क्षेत्रांत संयुक्तपणे कार्य करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प व विकासात्मक उपक्रम राबविणे, संशोधन निष्कर्ष व तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण, अत्याधुनिक संशोधन सुविधा व तज्ज्ञ मनुष्यबळाचा परस्पर उपयोग, क्षमता विकास कार्यक्रम, प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन तसेच विद्यार्थी, संशोधक व शास्त्रज्ञांचे परस्पर शैक्षणिक व तांत्रिक संवाद वाढविण्यात येणार आहेत. तसेच लिंबूवर्गीय फळपिकांशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार करण्यासाठी प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि विस्तार उपक्रम संयुक्तपणे राबविण्याच्या दृष्टीनेही या करारामुळे नवीन मार्ग खुले होणार आहेत.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मराठवाड्यातील विविध भागांमध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी आदी लिंबूवर्गीय फळपिकांना मोठी क्षमता असून, हवामानातील बदल, अनियमित पर्जन्यमान, पाणीटंचाई, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाची गरज यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाची आवश्यकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सदर सामंजस्य करार मराठवाड्यातील लिंबूवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

यासाठी दोन्ही संस्थांकडे उपलब्ध असलेली तज्ज्ञता, संशोधन सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा परस्पर समन्वय साधल्यामुळे लिंबूवर्गीय फळपिकांवरील संशोधनाला निश्चितच नवी दिशा मिळेल. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यातून उत्पादन, उत्पादकता व गुणवत्तेत वाढ घडवून आणणे हा या सहकार्याचा महत्त्वाचा उद्देश आहे.

त्यांनी पुढे नमूद केले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात अधिक उत्पादन, संसाधनांचा कार्यक्षम वापर, शाश्वत बाग व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. या दृष्टीने केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर यांच्यासोबतचे सहकार्य विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार कार्याला अधिक बळकटी देणारे ठरेल.

शेतकरी, विद्यार्थी व संशोधकांना थेट लाभ

या सामंजस्य कराराचा लाभ लिंबूवर्गीय फळ उत्पादक शेतकरी, विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि विस्तार कार्यकर्ते यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच संशोधकांना राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि संयुक्त संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दोन्ही संस्थांच्या परस्पर सहकार्यामुळे नवीन संशोधन संकल्पना, तंत्रज्ञान निर्मिती, ज्ञानाचा प्रसार, कौशल्य विकास आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांना निश्चितच चालना मिळेल. विशेषतः लिंबूवर्गीय फळपिकांच्या शाश्वत व हवामान-सक्षम उत्पादन प्रणाली विकसित करण्यासाठी हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या सामंजस्य करारामुळे संशोधनातून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीकडे जाणाऱ्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, लिंबूवर्गीय फळपिकांच्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हे सहकार्य एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे.

या कराराची संपूर्ण प्रक्रिया नागपूर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद–केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था येथे पार पडली. यावेळी माननीय कुलगुरूंचे विशेष कार्यासन अधिकारी तथा कृषि रसायन व मृदा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.








For english

Thursday, August 6, 2026

माननीय राज्यमंत्री नामदार ॲड श्री. आशिष जायस्वाल यांची वनामकृविच्या बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट व पाहणी

 महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर (जि. जालना) येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी सदिच्छा भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा तसेच कृषि प्रदर्शन स्टॉलची पाहणी केली.

यावेळी माननीय राज्यमंत्र्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील बायोमिक्स प्रयोगशाळेत भेट देऊन तेथे तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक उत्पादनांची तसेच त्यांच्या उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. केंद्रामार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध द्रवरूप जैविक खतांचे दर, गुणवत्ता व उत्पादन प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. जैविक खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता व आरोग्य सुधारते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटून नफा वाढण्यास मदत होते, या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यानंतर त्यांनी माती आरोग्य पत्रिका तयार करण्याची प्रक्रिया व अन्नद्रव्य व्यवस्थापनासंदर्भातील कामकाजाची पाहणी केली. कृषि प्रदर्शन स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेली विविध जैविक उत्पादने, विस्तार साहित्य व आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेत त्यांनी ही उत्पादने व तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील जंगली पिकांच्या जातींच्या संवर्धनासाठी विकसित करण्यात आलेल्या बागेलाही भेट दिली. तसेच त्यांनी संशोधन केंद्रामार्फत विकसित करून शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारित वाणांची माहिती त्यांनी जाणून घेतली. विशेषतः तूर पिकातील 'गोदावरी' वाण तसेच हरभरा पिकातील 'परभणी चणा-१६' या वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. तसेच तूर, मुग व उडीद या पिकांच्या जंगली जातींचे संवर्धन, त्यांचे जनुकीय महत्त्व आणि भविष्यातील वाण विकासामधील योगदान याविषयीही त्यांनी माहिती घेतली.

भेटीदरम्यान माननीय राज्यमंत्र्यांनी कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून कृषि संशोधन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान तसेच कृषि क्षेत्रातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुर्यकांत पवार, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिनकुमार सोमवंशी, विषय विशेषज्ञ डॉ. सचिन धांडगे (पीक संरक्षण, डॉ. राहुल कदम (विस्तार शिक्षण), डॉ. दिपाली कांबळे कृषिविद्या, प्रा. फारुक तडवी (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मा. राज्यमंत्र्यांना विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. विष्णू गीते, डॉ. प्रशांत पगार, डॉ. नितीन पतंगे तसेच इतर शास्त्रज्ञ व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.








वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारीणी सदस्यांची बैठक

माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांची प्रमुख उपस्थिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माजी विद्यार्थी हे विद्यापीठाचे खरे दूत असून, त्यांच्या अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा लाभ विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला मिळणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उद्योजकता, नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे संघटन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, संशोधन सहकार्य तसेच समाजाभिमुख उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त व स्मार्ट (SMART) प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.), प्रा. रामभाऊ घाटगे, माजी कार्यकारी परिषद सदस्य श्री. अनंतराव चोंदे, कृषि उद्योजक श्री. महेश पी. देशमुख, माजी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील कार्यरत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी विविध विधायक सूचना मांडल्या. भविष्यात माजी विद्यार्थ्यांचे व्यापक आणि प्रभावी जाळे उभारून विद्यार्थी, संशोधक आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










मराठवाड्यात देशी बीज संवर्धनाला नवी दिशा; वनामकृवित बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेचा शुभारंभ

देशी वाणांचे जनुक संवर्धक शेतकरी हे समाजाचे, देशाचे खरे मित्र – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

मराठवाड्यात देशी बीज संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची गरज - माजी कृषी आयुक्त माननीय डॉ. उमाकांत दांगट (से.नि.भा.प्र.से.)

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी कृषी आयुक्त माननीय डॉ. उमाकांत दांगट (से.नि.भा.प्र.से.)

महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) च्या संचालक पूनम पाटे  (भा.व.से.)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय "मराठवाडा बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेचा” उद्घाटन समारंभ दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७५ हून अधिक बीज संवर्धक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन ६ व ७ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात करण्यात आले. तसेच यानिमित्त मराठवाड्यातील बीज संवर्धक शेतकऱ्यांच्या विविध जनुकाचे प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध दहा तांत्रिक सत्राच्या माध्यमातून शेतकरी, विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि मंडळाचे तसेच बायफ संस्थेच्या अधिकाऱ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, देशी वाणांचे जनुक संवर्धन करणारे शेतकरी हे महाराष्ट्राचे, देशाचे आणि समाजाचे खरे मित्र आहेत. वाढत्या मानवी गरजा आणि संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळे गेल्या शतकात जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. जैवविविधतेचे संशोधन, संकलन, जतन, संवर्धन आणि प्रसार करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या कार्यात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठ परिसरही जैवविविधतेने समृद्ध असून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनस्पती, पशुधन आणि मत्स्य संपदेतील जनुकीय विविधतेचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. विद्यापीठाचे लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने या क्षेत्रात कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी कृषि आयुक्त तथा स्मार्ट प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांनी देशी बीज संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय असल्याचे सांगितले. निसर्गाने निर्माण केलेली जैवविविधता मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आली असून "जगा आणि जगू द्या" ही संकल्पना स्वीकारून जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मराठवाड्याचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेतकरी स्वतः उत्कृष्ट बियाण्यांची निवड व संवर्धन करत असत, ती परंपरा पुन्हा सुरू करून उत्पादन खर्च कमी करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकरी हेच खरे देशी बीज संवर्धक शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले. हवामान बदलामुळे पर्जन्यमानातील अनिश्चितता वाढत असून अशा परिस्थितीत देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यापीठाच्या लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामार्फत जनुक संवर्धनाचे कार्य सुरू असून विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी दहा केंद्रांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती त्यांनी दिली. जैवविविधतेचे संवर्धन हे शाश्वत शेती, पोषण सुरक्षा आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) च्या संचालक  पूनम पाटे (भा.व.से.) यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्याचा परिचय करून दिला. जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्याचा उल्लेख करत देशी बियाणे हीच आपली खरी ओळख आणि भविष्यातील अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प अधिकारी श्री. रवींद्र वानखडे (से.नि.भा.व.से.) यांनी मंडळाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांचा आढावा घेत कार्यशाळा बीज संवर्धन चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव यांनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला असला तरी जैवविविधतेच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष गेले नसल्याची खंत व्यक्त केली. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बायफतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

बायफचे संशोधक श्री संजय पाटील यांनी देशी बियाणे हे शेतीचा आत्मा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करून त्यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जनुकीय विविधता, जीआय मानांकन प्राप्त पिकांचे संवर्धन आणि देशी वाणांच्या साठवणूक तंत्रज्ञानावर कार्यशाळेत सखोल विचारमंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभागीय वनाधिकारी रूपाली सावंत यांनी केले. 


संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार
प्रकल्प अधिकारी श्री. रवींद्र वानखडे (से.नि.भा.व.से.)
बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव
बायफचे संशोधक श्री संजय पाटील



वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास भेट; भविष्यातील विकासासाठी दिले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्यातील वनामकृविच्या मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथे दिनांक ५ ऑगष्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन उपक्रम, प्रायोगिक क्षेत्रे, रोपवाटिका तसेच मोसंबी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याची पाहणी केली. बदनापूर येथील हे संशोधन केंद्र विद्यापीठाच्या प्रमुख संशोधन केंद्रांपैकी एक असून त्याची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली आहे.

यावेळी माननीय कुलगुरूंनी संशोधन केंद्रातील रोपवाटिका, दर्जेदार रोपनिर्मिती, सुधारित मोसंबी वाणांचे संवर्धन, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधन परिणामांच्या प्रभावी प्रसाराबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांनी संशोधक व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना मोसंबी उत्पादनातील गुणवत्ता वाढ, हवामान बदलाशी सुसंगत संशोधन, रोग व कीड व्यवस्थापन, जलकार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची लागवड सामग्री निर्मिती तसेच शेतकरी-केंद्रित संशोधनाला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात मोसंबी संशोधन केंद्र हे देशातील एक उत्कृष्ट संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

भेटीदरम्यान बदनापूर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ दीपक पाटील, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप,  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रात राबविण्यात येणारे विविध संशोधन प्रकल्प, उपलब्धी आणि आगामी विकास आराखड्याची माहिती माननीय कुलगुरूंना सादर केली. संशोधन केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने सहकार्य मिळेल, असा विश्वासही माननीय कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला.





Wednesday, August 5, 2026

पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धतीवर वनामकृविचा वेबिनार उत्साहात संपन्न

 शेतीला पूरक व्यवसाय स्वीकारून जोखीम कमी करावी : संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

शेतीसमोरील वाढती आव्हाने, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अस्थिरता यावर शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देशाने "पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धती" या विषयावर विशेष ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. हा वेबिनार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक  ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी झाले.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट आणि उत्पादन खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. शेतीला पूरक व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू शकतात तसेच जोखीम कमी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

मुख्य वक्ते डॉ. आनंद कारले, माजी मुख्य कृषिविद्यावेत्ता व प्रभारी अधिकारी, अभ्यास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांनी पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीची संकल्पना, शेतीपुढील सध्याची आव्हाने, शाश्वत शेतीचे विविध प्रकार, एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व, कृषीपूरक व्यवसाय तसेच एक हेक्टर एकात्मिक शेती मॉडेलचे अर्थशास्त्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, फळबाग, भाजीपाला उत्पादन व इतर पूरक व्यवसायांचा समन्वय साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट आणि उत्पादन खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. शेतीला पूरक व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू शकतात तसेच जोखीम कमी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी सौ. मीरा जगदाळे (आपटी, जि. अहिल्यानगर) यांनी एकात्मिक शेतीचा स्वतःचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. भाजीपाला, डाळी, फळपिके, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांचा समन्वय साधून त्यांनी आपल्या शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अनुभवामुळे सहभागी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष लाभ समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. डॉ. आनंद गोरे यांनी समन्वयक, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रीतम भुतडा यांनी आभार मानले.

या वेबिनारमध्ये राज्यभरातील शेतकरी, कृषी विद्यार्थी, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक तसेच कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.