Sunday, August 2, 2026

वनामकृवित ‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त युवा’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

 व्यसनमुक्त युवकच सक्षम भारताचे भविष्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत नशामुक्त युवा’ या विशेष अभियानाची सुरुवात देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते झाली. या निमित्ताने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पंतप्रधानांनी देशभरातील युवकांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत नशामुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले व युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आले. या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी सर्वांनी नशामुक्तीची शपथ घेतली तसेच विद्यापीठाच्या सलग्न आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातील ६०१२ विद्यार्थ्यांनी माय भारत (My Bharat) पोर्टलवर नोंदणी करून ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ ची प्रतिज्ञा घेवून प्रमाणपत्र प्राप्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. मार्गदर्शनात त्यांनी युवकशक्ती ही विकसित भारताच्या निर्मितीची सर्वात मोठी ताकद असल्याचे अधोरेखित केले. व्यसनाधीनता ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीलाही बाधा आणणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या कोणत्याही प्रकारापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्यसंपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, आत्मसंयम आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासून व्यसनमुक्त, सुदृढ आणि सक्षम भारताच्या उभारणीत प्रत्येक युवकाने सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

प्रमुख पाहुणे तथा विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘नशामुक्त भारत’, शिस्त, वक्तशीरपणा आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर सखोल विचार मांडले. युवा पिढीने व्यसनाधीनतेपासून दूर राहून सुदृढ व निरोगी समाजाच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. सय्यद रहेमान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सुसंस्कृत जीवनशैली आणि चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले. उत्तम संस्कारांचा अंगीकार करून देशाचे आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, विकसित आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी तरुणाईचे निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रारंभी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे तसेच युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी अशा जनजागृतीपर अभियानांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाईट सवयींचे नव्हे, तर चांगल्या विचारांचे, ज्ञानाचे आणि समाजोपयोगी कार्याचे व्यसन जडवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऑनलाईन थेट प्रक्षेपण डॉ. संतोष फुलारी यांनी यशस्वीरीत्या हाताळले. सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मानले.

या अभियानाला विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. शंकर पुरी, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. खंडागळे, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व कृषी महाविद्यालय, परभणी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.











Saturday, August 1, 2026

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अभिवादन

 

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी कुलसचिव श्री. पुरभा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा, साहित्यसंपदेचा तसेच सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना व संघर्षाला आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे वाचा फोडणारे अण्णा भाऊ साठे यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य, लोकजागृती आणि समतामूलक समाजनिर्मितीसाठीच्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.




Friday, July 31, 2026

वनामकृवित एनसीसी छात्रसैनिकांना व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्वाचे धडे

 एनसीसी कॅडेट्स सर्व क्षेत्रात निपुण : ब्रिगेडियर अनुप बरबरे

विद्यार्थी जीवनात शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित होत असल्याने एनसीसी कॅडेट्स सर्वच क्षेत्रात निपुण ठरतात, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे दिनांक ३० जुलै २०२६ रोजी एनसीसीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमास ब्रिगेडियर अनुप बरबरे, कर्नल दिलीप रेड्डी तसेच ‘अब नॉर्मल होम’च्या संचालिका किशोरी पाठक यांनी भेट दिली. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे होते. यावेळी सुभेदार मेजर मोहन सिंग, लेफ्टनंट प्रशांत सराफ (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), सेकंड ऑफिसर बालाजी सूर्यवंशी (एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, परभणी) तसेच ओंकार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमारे ३०० एनसीसी छात्रसैनिक उपस्थित होते. छात्रसैनिकांनी सशस्त्र मानवंदना देऊन मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पुढे मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी विद्यार्थी जीवनातील शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. "शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोणतेही यश संपादन करता येते," असे ते म्हणाले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारीची जाणीव आणि देशसेवेची प्रेरणा विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर किशोरी पाठक यांनी छात्रसैनिकांना दैनंदिन जीवनात योग्य निर्णय कसे घ्यावेत, व्यासपीठावर प्रभावी व लोकाभिमुख संवाद कसा साधावा तसेच सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी, याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक सत्राला छात्रसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेकंड ऑफिसर सोपान सावळे (नवोदय विद्यालय, परभणी) यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, कृषि महाविद्यालय, परभणी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून छात्रसैनिकांना शिस्त, नेतृत्व, निर्णयक्षमता, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे छात्रसैनिकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना अधिक दृढ झाली.



Thursday, July 30, 2026

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास विभागाच्या प्रमुख तथा प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. तसेच महर्षी वेदव्यास यांच्या कार्याची माहिती देत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

आपले आई-वडील, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य हे देखील आपल्या जीवनातील गुरूच असल्याने, त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन करून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ब्रिज सेक्शन व फ्लॉवर्स सेक्शनच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर भाषणे सादर केली. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, July 29, 2026

राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२६ मध्ये वनाकृविला देशात १८ वे स्थान; 'गोल्ड' रेटिंगने गौरव

 यशाबद्दल ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे केले अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान मिळविले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९१.६ गुणांसह 'गोल्ड' रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. ही माहिती ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाला पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.

ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ ही देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचे मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. या मूल्यमापनामध्ये शाश्वत प्रशासन, हरित परिसर, जैवविविधता, हवामान कृती, ऊर्जा कार्यक्षमता, संशोधन व नवोपक्रम, अभ्यासक्रमातील शाश्वतता, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि समाजाभिमुख उपक्रम अशा दहा निकषांवर विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.

विद्यापीठाच्या सादर केलेल्या कागदपत्रांचे, शाश्वत विकास उपक्रमांचे, पर्यावरणीय कामगिरीचे आणि विविध पुराव्यांचे सखोल परीक्षण करून ही मानांकन प्रक्रिया पार पडली. या मानांकनामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शाश्वत विकास, पर्यावरणपूरक कॅम्पस उभारणी आणि हरित शिक्षण क्षेत्रातील कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, विद्यापीठाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शाश्वत विकास उपक्रम, संशोधन सहकार्य आणि परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान आणि 'गोल्ड' रेटिंग प्राप्त होणे ही संपूर्ण विद्यापीठ परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच सर्व हितधारकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, ऊर्जा बचत, जलसंधारण, हरित कॅम्पस निर्मिती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठाने सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. भविष्यातही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने हरित, पर्यावरणपूरक आणि हवामान बदलास सक्षम असे विद्यापीठ उभारण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू.

या यशाबद्दल ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

For english

कृषि हा भारताच्या विकासाचा भक्कम पाया; विद्यार्थ्यांनी कृषि उद्योजकतेकडे वाटचाल करावी" – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या जिरेवाडी (ता. परळी, जिल्हा बीड) येथील शासकीय कृषि महाविद्यालय तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशातील कृषि उत्पादन लोकसंख्येच्या अन्नगरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे होते. मात्र, गेल्या सात दशकांत भारतीय कृषि क्षेत्राने संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज भारत १४० कोटी लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेची यशस्वीपणे पूर्तता करत असून अनेक कृषि व कृषि-आधारित उत्पादनांची निर्यात जगभर करत आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत आज प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने उभा आहे.

या यशाचे श्रेय भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या देशातील विविध कृषि विद्यापीठांना, संशोधन संस्थांना तसेच कृषि शास्त्रज्ञांनी केलेल्या सातत्यपूर्ण संशोधन व नवकल्पना यांच्यासह शेतकऱ्यांच्या कष्टाला जाते, असेही त्यांनी नमूद केले.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये देशभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विद्यापीठाने मिळविलेला हा दर्जा अधिक उंचावण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणासोबतच कृषि व्यवसाय, उद्योजकता आणि व्यवस्थापनाचे ज्ञान देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी जिरेवाडी येथे सन २०२४ मध्ये स्थापन झालेल्या शासकीय कृषि महाविद्यालय व शासकीय कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तत्कालीन कृषिमंत्री तथा आमदार श्री. धनंजय मुंडे यांनी या महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांचा उल्लेख करून महाराष्ट्र शासनाने परिसराच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा विचार करून या संस्थांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार नवीन शासकीय कृषि महाविद्यालये स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. संत कबीर यांच्या दोह्याचा संदर्भ देत शैक्षणिक जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान, शिक्षण विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे, डॉ. गणेश गायकवाड, वरिष्ठ लिपिक श्री. अनंत मुंडे, वरिष्ठ लिपिक श्री. गोपाळ विघ्ने, प्रा. बाबासाहेब मस्के, प्रा. शिवाजी किर्जत, प्रा. इंगोले, ग्रंथपाल श्रीमती मोडके, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, July 28, 2026

सोयाबीन पिवळे पडत आहे? कारणे ओळखा आणि शास्त्रीय पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन करा; वनाकृविच्या तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

 

यावर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या आगमनास विलंब झाला असून पावसाची सुरुवात अनियमित झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सर्वत्र एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झाली. तसेच अनेक भागांमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा कमी असल्याने सोयाबीनची अपेक्षित वाढ होताना दिसून येत नाही. अशा परिस्थितीत जमिनीतील अपुऱ्या आर्द्रतेमुळे व प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनच्या मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे, विशेषतः लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी, सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत पाने पिवळी किंवा पांढरट पडणे (क्लोरोसिस) ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत आणि श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

क्लोरोसिस म्हणजे काय?

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे झाडाकडून पुरेसे शोषण न झाल्यास सोयाबीनमध्ये क्लोरोसिस ही शारीरिक विकृती दिसून येते. ही समस्या केवळ जमिनीत लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे उद्भवत नाही, तर जमिनीत लोह उपलब्ध असूनही ते झाडांना शोषून घेता न आल्यामुळे निर्माण होते.

लक्षणे

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरा हिरव्या राहतात, तर शिरांमधील भाग पिवळा पडतो. सुरुवातीची त्रिदलीय (ट्रायफोलिएट) पाने काही काळ हिरवी राहतात, तर नवीन पानांवर लक्षणे स्पष्ट दिसतात.  हरितद्रव्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.

कारणे

चुनखडीयुक्त व कमी निचऱ्याच्या जमिनीत ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असल्यास लोह पिकांना उपलब्ध स्वरूपात राहत नाही. ते फेरिक स्वरूपात रूपांतरित झाल्यामुळे पिकांना शोषून घेता येत नाही. जमिनीत जास्त ओलावा किंवा मुळांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यास लोहाचे शोषण कमी होते. पावसाची उघडीप, ढगाळ वातावरण व प्रतिकूल मृदा परिस्थितीमुळेही लोहाचे शोषण बाधित होऊ शकते.

एकात्मिक व्यवस्थापन

पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. ईडीटीए चिलेटेड मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड–२) ५० ग्रॅम किंवा ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार ८–१० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. ज्या शेतात अतिरिक्त पाणी साचले असेल तेथील पाण्याचा त्वरित निचरा करून वाफसा स्थिती निर्माण करावी. वापसा आल्यानंतर व पीक ३०–३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.

महत्त्वाच्या सूचना

सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावी होते. शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करू नये. जास्त प्रमाणामुळे पानांवर करपण्याची शक्यता असते. जमिनीचा सामू (पीएच) जास्त असलेल्या शेतात नियमित सेंद्रिय खतांचा वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारण्यास मदत होते. क्लोरोसिसची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना केल्यास प्रकाश संश्लेषण सुरळीत राहून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येते.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.

वनामकृवि संदेश क्रमांक: ०२/२०२६ ( दिनांक: २८ जुलै २०२६)