Tuesday, September 8, 2026

पावसाच्या खंड काळात पीक व्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घ्या – तज्ज्ञांचे आवाहन

 वनामकृवित ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी मार्गदर्शन

मराठवाडा विभागात पावसाच्या अनियमित व असमान वितरणामुळे निर्माण होणाऱ्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, आंतरमशागत, तण नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना तातडीने अवलंबाव्यात, असे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील प्रगतशील शेतकरी श्री. सूरज जयपाल जाधव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’ या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात श्री. सूरज जाधव यांनी पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद गोरे होते.

मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पर्जन्याधारित व कोरडवाहू असून, हवामान बदलामुळे पावसाच्या आगमनापासून ते वितरणापर्यंत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाचे उशिरा आगमन, पेरणीनंतर दीर्घ खंड, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड अशा परिस्थितीचा थेट परिणाम पिकांच्या उगवण, वाढ, फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेवर होत आहे. त्यामुळे केवळ वार्षिक पर्जन्यमानाचा विचार न करता पावसाची वेळ, वितरण, तीव्रता आणि पावसातील खंड यानुसार शेतीविषयक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तातडीच्या उपाययोजनांवर भर

पावसाच्या खंड काळात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीक व जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे. संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन करावे. कपाशी, तूर यांसारख्या पिकांमध्ये पावसाचे पाणी शेतात मुरविण्यासाठी योग्य वेळी सऱ्या काढणे, आंतरमशागत करून जमिनीतील भेगा बुजविणे आणि तण नियंत्रणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष व आच्छादनाचा (Mulching) वापर करावा. पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला.

पावसाच्या खंडाच्या काळात पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन अन्नद्रव्यांच्या फवारणीबाबत कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. उपलब्ध परिस्थितीनुसार पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

अष्टसूत्री’द्वारे पीक संरक्षणाचा संदेश

पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी पीक व जमिनीचे निरीक्षण, उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन, जलसंधारण, तण नियंत्रण, आंतरमशागत, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, आच्छादन आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन या अष्टसूत्रीवर विशेष भर द्यावा, असा संदेश देण्यात आला.

जैविक निविष्ठा, बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदींचा शिफारशीनुसार योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

दीर्घकालीन नियोजनातून कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याचे आवाहन

कोरडवाहू शेतीमध्ये केवळ तातडीच्या उपाययोजना पुरेशा नसून, दीर्घकालीन हवामान-सक्षम शेतीचे नियोजन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये मृद व जलसंधारण, बांधबंदिस्ती, चर घेणे, पीक व पीक पद्धतीचे नियोजन, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांचा समावेश करावा.

तसेच ‘शिवारातील पाणी शिवारात आणि शेतातील पाणी शेतात’ या संकल्पनेनुसार विहीर व कूपनलिका पुनर्भरण, शेततळ्यांची उभारणी आणि त्यातील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची स्वतःची ‘जल बँक’ निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

बियाणे बँक’, ‘अन्नद्रव्य बँक’ आणि ‘अवजारे बँक’ ही काळाची गरज

शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून ‘बियाणे बँक’ निर्माण करावी. स्वतःच्या शेतासाठी आवश्यक दर्जेदार बियाणे राखून ठेवणे किंवा तयार करणे यामुळे बियाण्यावरील खर्च कमी होण्याबरोबरच वेळेवर बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.

शेतावरच शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट इत्यादी तयार करून ‘अन्नद्रव्य बँक’ विकसित करता येईल. त्याचप्रमाणे वेळेवर शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी ‘अवजारे बँक’ निर्माण करून बीबीएफ यंत्रे, बूम स्प्रेअर व इतर कृषी यंत्रांचा सामूहिक वापर केल्यास यंत्रसामग्रीवरील खर्च कमी करता येईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.

एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पन्नाचे विविध स्रोत

हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ एका पिकावर अवलंबून न राहता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. मुख्य पिकांसोबत भाजीपाला, फळपिके, मसाला पिके, फुलशेती तसेच बांधावर शेवगा, कढीपत्ता यांसारख्या पिकांचा समावेश करावा. यासोबत दुग्ध व्यवसाय, म्हैसपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, अळिंबी उत्पादन आदी पूरक व्यवसाय जोडल्यास उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होऊन कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करता येते.

शेतकरी गटांच्या माध्यमातून निविष्ठांची सामूहिक खरेदी, कृषी उत्पादनाची एकत्रित विक्री, प्रक्रिया व मूल्यवर्धन तसेच बाजारपेठेचा अभ्यास केल्यास उत्पादन खर्च कमी करून शेतमालाला चांगला दर मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्याच्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हवामानानुसार योग्य वेळी योग्य निर्णय’ घेण्याचा संदेश देण्यात आला. उपलब्ध पाणी, जमीन आणि पिकांची अवस्था यांचा विचार करून शास्त्रीय व स्थानिक अनुभवाधारित तंत्रज्ञानाचा समन्वय साधल्यास प्रतिकूल हवामानातही पीक उत्पादनातील जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, आयोजक तसेच सहभागी शेतकऱ्यांनी सहकार्य केले.






हवामान बदलास अनुकूल व शाश्वत कापूस उत्पादनासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

देशी कापूस संशोधनातील वनामकृविच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक; ‘अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट’ (AIG) मॉडेलला पसंती

इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशन (ICDA) यांच्या वतीने मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रातील कापूस–वस्त्रोद्योग मूल्यसाखळी अधिक शाश्वत, हवामान बदलास अनुकूल आणि कमी कार्बन उत्सर्जनाची करण्यासाठी संशोधन संस्था, उद्योग, शासन, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच इतर सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशन (ICDA) यांच्या वतीने महाराष्ट्रात हवामान बदलास अनुकूल व कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित कापूस–वस्त्रोद्योग मूल्यसाखळी विकसित करण्यासंदर्भात मुंबई येथे दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील मॅकिया (MACCIA) संस्थेच्या आर. बेदमुथा सभागृहात आयोजित या बैठकीतील ‘Role of Farm Groups, Supply Chains and Supporting Ecosystem to Build Carbon-Neutral Traceable Supply Chains in Maharashtra’ या विषयावरील दुसऱ्या परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या मित्रा (MITRA) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रवीण परदेशी (सेवानिवृत्त भाप्रसे), माजी कृषी आयुक्त तथा व्हीएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री उमाकांत दांगट (सेवानिवृत्त भाप्रसे), आयसीडीएचे अध्यक्ष श्री हेमंत राजपूत तसेच ग्रँट थॉर्न्टन भारतचे सोशल पार्टनर श्री चेतन भक्कड यांच्यासह कापूस व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन व विस्तार कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. विशेषतः देशी कापसाच्या संशोधन व विकासातील विद्यापीठाच्या उल्लेखनीय उपलब्धींची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. तसेच विद्यापीठाने सुचविलेल्या अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट’ (AIG) या समन्वित कार्यप्रणालीचेही मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल कापूस उत्पादनासाठी संशोधन संस्था, उद्योग आणि शासन यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व संबंधित भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणून सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून कापूस क्षेत्रासमोरील आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले.

परिसंवादामध्ये हवामान बदलास अनुकूल कापूस वाण, उच्च घनता लागवड पद्धती (HDPS), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM), एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), संवर्धन शेती, नत्रयुक्त खतांचा कमी व कार्यक्षम वापर, ‘त्रिशूल’ तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, खत-सिंचन (फर्टिगेशन) तंत्रज्ञान तसेच यांत्रिकीकरण आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करण्याबरोबरच कापूस उत्पादनापासून वस्त्रोद्योगापर्यंत पारदर्शक व शोधण्यायोग्य (Traceable) मूल्यसाखळी विकसित करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था, संशोधन संस्था आणि विस्तार यंत्रणा यांच्या माध्यमातून हवामान-स्मार्ट तसेच कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित कापूस उत्पादन पद्धतींचा व्यापक प्रसार करण्याची गरज परिसंवादात अधोरेखित करण्यात आली.

या परिसंवादात विविध शेतकरी गट, पुरवठा साखळीतील घटक, वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, संशोधन संस्थांचे अधिकारी व शास्त्रज्ञ तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कापूस क्षेत्र अधिक स्पर्धात्मक, शाश्वत आणि जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार विकसित करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.




वनामकृवि शास्त्रज्ञांचे कपाशीवरील फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

सद्यस्थितीत मराठवाड्यात अनेक ठिकाणी कपाशी पिकावर फुलकिडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीची प्रौढ अवस्था व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूस खरवडून रस शोषतात. परिणामी पाने सुरुवातीला पांढुरकी होऊन नंतर तपकिरी पडतात. तसेच पाने व फुलकळ्या आकसून झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची नियमित पाहणी करून फुलकिडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता ओळखावी व प्रभावी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अनंत लाड, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर तसेच डॉ. राजरतन खंदारे आणि डॉ. योगेश मात्रे यांनी शेतकऱ्यांना फुलकिडीच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले आहे.

फुलकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन

फुलकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा—

  • पिकामध्ये नियमित अंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावे. तसेच नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.
  • प्रति हेक्टरी १० ते १२ निळे चिकट सापळे लावावेत. तसेच ढालकीडा व क्रायसोपा यांसारख्या मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन ३०० पीपीएमची ५० मिली मात्रा प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुलकिडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यानंतर प्रति लिटर पाण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी—
    • स्पिनेटोरम ११.७ टक्के एससी – ०.८४ मिली
    • आयसोसायक्लोसेरम ९.२ टक्के डीसी – १.२ मिली
    • फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्यूजी – ०.२५ ग्रॅम
    • डायफेन्थुरॉन ५० टक्के डब्ल्यूपी – १.२ ग्रॅम
    • फिप्रोनील ८० टक्के डब्ल्यूजी – १.५ ग्रॅम
    • डायफेन्थुरॉन ४०.१ टक्के + असिटामिप्रिड ३.९ टक्के डब्ल्यूपी – १ ग्रॅम
    • टॉल्फेनपायरॅड १५ ईसी – २ मिली
    • फ्लोनीकॅमीड ५० टक्के डब्ल्यूजी – ०.३ ग्रॅम
    • थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी – ०.२ ग्रॅम
    • फिप्रोनील १५ टक्के + फ्लोनीकॅमीड १५ टक्के डब्ल्यूडीजी – ०.८ ग्रॅम
    • फिप्रोनील ५ टक्के + बुप्रोफेझिन २० टक्के एससी – २ मिली

वरीलपैकी एका कीटकनाशकाची निवड करून आलटून-पालटून फवारणी करावी, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या अथवा नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपाद्वारे फवारणी करताना हे प्रमाण तीनपट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फवारणीदरम्यान हातमोजे, तोंडावर मास्क आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्म्याचा वापर करावा तसेच कीटकनाशकांचा वापर करताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन क्रॉपसॅप प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी केले आहे.





Monday, September 7, 2026

क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वनामकृवित अभिवादन

 


क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी त्यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, चाकूर (जि. लातूर) येथील पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे तसेच विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याची माहिती वाचून दाखविली व त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

यावेळी उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी तसेच एनएसएस स्वयंसेवकांना युवा कार्य व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ (VBYLD 2027) या प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

ही प्रश्नमंजुषा मेरा युवा भारत’ (MY Bharat) पोर्टलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी केवळ पाच मिनिटांचा वेळ देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी अथवा लॉगिन करून आपला सहभाग नोंदवावा. या उपक्रमात सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी आणि विशेषतः एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर आपले विचार आणि नेतृत्वगुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, पात्र एनएसएस स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन संचलन–२०२७ साठी एनएसएस पथकाचा भाग होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

याबाबत मेरा युवा भारत कार्यालयाचे कक्ष अधिकारी श्री. गजानन गाडेकर व समन्वयक श्री. दीपक खुळे यांनी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी सर्व पदवीपूर्व विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

प्रश्नमंजुषा व नोंदणीसाठी : MY Bharat – VBYLD 2027 Portal







Sunday, September 6, 2026

व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीगमध्ये वनामकृविच्या कृषि महाविद्यालय, गोळेगावच्या शाश्वत धारणकरची दमदार निवड

नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स संघाने तब्बल ५ लाख रुपयांना केले करारबद्ध; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील विद्यार्थी तथा प्रतिभावान व्हॉलीबॉलपटू शाश्वत धारणकर यांची प्रतिष्ठेच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीग (VCL) साठी निवड झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या कामगिरीची दखल घेत नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स (Namma Bengaluru Smashers – NBS) या संघाने त्यांना तब्बल ५ लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कृषि महाविद्यालय, गोळेगाव तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शाश्वत धारिणकर हे कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत. शिक्षणासोबतच खेळाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर त्यांनी व्हॉलीबॉल क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता प्रतिष्ठेच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीगमध्ये झालेली त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि गुणवत्तापूर्ण खेळाची पावती मानली जात आहे.

नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स संघाकडून तब्बल ५ लाख रुपयांच्या करारावर निवड होणे ही शाश्वत धारणकर यांच्यासाठीच नव्हे, तर कृषि महाविद्यालय, गोळेगाव आणि विद्यापीठ परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामीण व कृषि शिक्षणाच्या परिसरातून राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवत त्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडेपणाचा आदर्श निर्माण केला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत धारणकर यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच कृषि महाविद्यालय, गोळेगावचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी शाश्वत धारणकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही शाश्वत धारणकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीगमध्ये मिळालेली ही संधी शाश्वत धारणकर यांच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, आगामी काळातही ते आपल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास विद्यापीठ परिवाराने व्यक्त केला आहे.




Saturday, September 5, 2026

ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून कृषि अभियंत्यांनी भविष्य घडवावे : डॉ. शिवकुमार व्यास

 


विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत कृषि अभियंत्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. व्यास यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये (इग्नू) उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि प्रेरणादायी संवादाच्या उपलब्ध संधींची माहिती दिली.

यावेळी डॉ. शिवकुमार व्यास यांनी महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील सुविधा व उपलब्ध पायाभूत सुविधांची पाहणी केली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील अद्ययावत पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक वातावरणाचे कौतुक केले.

त्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि टीएएफई, चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटरला भेट देऊन तेथील कृषि यांत्रिकीकरणाशी संबंधित विविध उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. शिवकुमार व्यास म्हणाले की, शिक्षण म्हणजे केवळ पदवी संपादन करणे किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे साधन नसून, ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया आहे. कृषि अभियांत्रिकी, मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी, औष्णिक अभियांत्रिकी तसेच शिक्षण व शैक्षणिक प्रशासन या विविध क्षेत्रांत काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांनी नेहमी ‘का?’, ‘कसे?’ आणि ‘यापेक्षा अधिक चांगले काय करता येईल?’ असे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत.

नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा, आव्हाने स्वीकारण्याची तयारी आणि समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय ही यशाची महत्त्वाची सूत्रे आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ आपल्या विषयाचे ज्ञान पुरेसे नाही. त्यासोबतच बहुविषयक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि समाजाच्या गरजा समजून घेण्याची क्षमता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा संबंध समाज, उद्योग, शेती आणि राष्ट्राच्या विकासाशी जोडला पाहिजे. अपयशाला घाबरू नका; प्रत्येक अडचण ही शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची संधी असते. शिक्षकांकडून केवळ माहिती घेण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा, प्रश्न विचारा, चर्चा करा आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याचे धाडस करा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या करिअरबरोबरच समाजासाठी उपयुक्त असे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान, प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि आव्हानात्मक काम स्वीकारण्याची तयारी असेल तर कोणतीही समस्या असाध्य नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते; ती ओळखून विकसित करावी आणि देशाच्या प्रगतीसाठी तिचा उपयोग करावा, असे डॉ. व्यास यांनी नमूद केले.

तसेच, इग्नूच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध मुक्त, लवचिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधींचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘आयुष्यभर शिकत राहणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे’ या दृष्टिकोनातून आजीवन शिक्षणाची वृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांविषयी माहिती दिली. राष्ट्राच्या विकासामध्ये कृषि अभियांत्रिकीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कृषि यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, अचूक शेती आणि शाश्वत कृषि विकासामध्ये कृषि अभियंत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दत्तात्रय पाटील आणि डॉ. अनिल हरकळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण लाभले.