Wednesday, July 22, 2026

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महसूलपासून आरोग्यापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली

 शेतकऱ्यांशी थेट संवादातून आधुनिक शेतीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध – माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण





नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' परभणीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत लाभार्थ्यांना योजनांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभवितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नागरिकाभिमुख उपक्रम, आधुनिक शेती, कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प व्यक्त केला.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिनांक २२ जुलै २०२६ रोजी संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा श्रीमती लता वाकळे, महापौर माननीय श्री. सय्यद इक्बाल सय्यद खाजा, कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, कृषितज्ज्ञ पद्मश्री श्री. श्रीरंग देवबा लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नताशा माथूर, उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी राज्य शासनाने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित अडचणी तत्परतेने सोडविण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील दळणवळणाची प्रमुख रक्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेल्या जिल्ह्यातील अनेक पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचणे, कृषि मालाची वाहतूक करणे आणि ग्रामीण दळणवळण अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होत आहे.

महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विशेषतः एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, त्यांना आवश्यक मार्गदर्शन व शासकीय सेवाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर नागरिकांनी आभा कार्ड तयार करून घ्यावे, विविध आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन गणना फॉर्म वेळेत भरावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पद्मश्री श्रीरंग लाड यांनी कापूस पिकासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रशुद्ध पद्धतीने कापूस लागवड करावी. तसेच महिला शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने व सक्षमपणे शेती करत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक उत्पादन व आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सांगितले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. 'पोलीस आपल्या दारी' हा उपक्रम पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा असल्याचे सांगून सुरक्षित, शांततामय व गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नगरसेवक केदार खटींग, जिल्हा परिषद गटनेते दिलीप देशमुख, सुरेश भुमरे व शिवाजी भरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अर्जुन पाटील, नारायण राऊत आणि शुभांगी सर्जे या लाभार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' उद्दिष्टे व महत्त्व विषद केले. यावेळी विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओ तसेच भूमिअभिलेख अधिकारी सुनील मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नागरिकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉल प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.
(सौजन्य – जिल्हा माहिती अधिकारी, परभणी)


















वनामकृविद्वारा "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" विषयावरील ऑनलाइन मार्गदर्शन संपन्न

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि हवामान-अनुकूल शेतीवर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" या विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, सध्याच्या अनिश्चित पावसाच्या परिस्थितीत विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांनी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतभेटी घ्याव्यात. प्रत्यक्ष पीक परिस्थिती, मृदेतील ओलावा आणि हवामान अंदाजाचा सखोल अभ्यास करून पीकनिहाय व परिस्थितीनुसार शास्त्रीय मार्गदर्शन करावे. उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संरक्षी सिंचन, सूक्ष्म सिंचन पद्धती आणि पाण्याचा प्रत्येक थेंब पिकासाठी उपयुक्त ठरेल अशा उपाययोजनांवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यासोबतच कमी खर्चातील, स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पीक अवशेषांचे आच्छादन, अंतरमशागत, मृदा ओलावा संवर्धन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच कोरडवाहू शेतीतील हवामान-अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य सल्ला देऊन उत्पादनातील जोखीम कमी करणे, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठाची संशोधन व विस्तार यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्य करावी, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या भागात सध्या पावसाचा खंड आहे, तेथे पिकांमध्ये हलकी कोळपणी व अंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा, तणांचे प्रभावी व्यवस्थापन करावे, १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून पिकावरील ताण कमी करावा, पिकांमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षी सिंचन द्यावे.

तसेच ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, त्या ठिकाणी तूर, बाजरी, सूर्यफूल आणि एरंडी यांसारख्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, तूर + बाजरी, तूर + एरंडी तसेच एरंडी + धने या आंतरपीक पद्धतींचा अवलंब केल्यास बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादनाचा धोका कमी होऊन शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाभुळगाव (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार,  कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. वसंत सूर्यवंशी तसेच कृषि विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव ऑनलाइन सहभागी झाले होते.

यावेळी सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन, पावसाच्या खंडाचा पिकांवरील परिणाम, सुरुवातीच्या व मध्य अवस्थेतील पिकांचे व्यवस्थापन, कमी पावसातील ताण व्यवस्थापन, मृदा ओलावा संवर्धन तंत्रज्ञान, जलसंधारण उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.




Sunday, July 19, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील पेरणी व वृक्षलागवड कामांचा आढावा घेतला

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १९ जुलै २०२६ रोजी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्यासमवेत विद्यापीठातील विविध संशोधन प्रक्षेत्रांना भेट देऊन खरीप हंगामातील पेरणी तसेच वृक्षलागवड कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील सोयाबीन न्यूक्लियस ब्लॉक, वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या वृक्षलागवड क्षेत्रासह खानापूर '' '' प्रक्षेत्र तसेच शेंद्रा '' प्रक्षेत्राला भेट देऊन सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या पेरणीची, पीक व्यवस्थापनाची आणि वृक्षलागवडीच्या प्रगतीची पाहणी केली.

माननीय कुलगुरूंनी संबंधित प्रक्षेत्रांवरील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पावसाच्या परिस्थितीनुसार पिकांची योग्य निगा राखणे, वेळेवर आंतरमशागत करणे, संशोधन प्रक्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे व्यवस्थापन कायम ठेवणे तसेच वृक्षलागवडीची नियमित देखभाल करून लागवड केलेल्या रोपांचे शंभर टक्के संवर्धन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी विविध प्रक्षेत्रांवरील पेरणीची सद्यस्थिती, संशोधन प्रयोगांची अंमलबजावणी तसेच वृक्षलागवड मोहिमेच्या प्रगतीची माहिती माननीय कुलगुरूंना दिली. विद्यापीठाच्या संशोधन प्रक्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सर्व कामे सुरू असून खरीप हंगामातील विविध संशोधन प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, सोयाबीन संशोधन केंद्राचे  प्रभारी अधिकारी डॉ. सुनिल उमाटे तसेच संबंधित प्रक्षेत्रांवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणीमुळे संशोधन प्रक्षेत्रांवरील पेरणी, संशोधन उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 




Saturday, July 18, 2026

वनामकृवित ‘उद्यम विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात

‘परभणी ग्रोथ हब’च्या माध्यमातून कृषि उद्योगांना नवी दिशा : राज्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) तथा सेवा भारती, देवगिरी (जि. परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोझियम हॉलमध्येउद्यम विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कृषि क्षेत्रातील उद्योग, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि रोजगारनिर्मिती या विषयांवर या कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव ,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर तसेच चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेसचे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे, रांजणी (जि. धाराशिव) येथील नॅचरल उद्योग समूहाचे प्रकल्प समन्वयक श्री श्रीपाद ठोंबरे, वसमत येथील भूमी न्यूट्रास्युटिकल्सचे श्री अतिश साळुंखे, फ्लेवोसीस इंडियाचे खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ श्री सतीश भोरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनले पाहिजेत. कृषिआधारित उद्योगांच्या माध्यमातून परभणी तसेच मराठवाड्यातील स्थलांतर थांबविणे शक्य आहे. शेतीला प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसायांची जोड दिल्याशिवाय शेती अधिक लाभदायक होणार नाही. एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'परभणी ग्रोथ हब' या संकल्पनेअंतर्गत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यात 'सिल्क अँड मिल्क' या संकल्पनेवर आधारित पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषिआधारित उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन व शासनाचे सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. कृषि पदवीधरांनी शेतीकडे उद्योजकीय दृष्टीने पाहावे, कारण शेतीतूनही मोठे उद्योग उभे राहू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजकासाठी गंभीरता, विनम्रता, सहनशीलता आणि सातत्य हे गुण अत्यावश्यक आहेत. मराठवाड्यात कृषिआधारित उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, परभणी जिल्ह्याची सुपीक जमीन, सक्षम मनुष्यबळ आणि कृषि संशोधनाची मजबूत पार्श्वभूमी ही मोठी ताकद आहे. "परभणी फर्स्ट" हा विकासाचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी गटांनी शेतीमालाच्या सामूहिक विक्रीची यशस्वी व्यवस्था उभी केली आहे. वसमत तालुक्यात करवंदासारख्या वनउत्पादनावर प्रक्रिया उद्योग सुरू असून, विद्यापीठाला अलीकडेच चार महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प मंजूर झाले आहेत. या संशोधनाचा लाभ उद्योग, शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ. राजेश क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील कॉमन इन्क्युबेशन सेंटरची सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन (Value Addition) केल्यास अधिक नफा कसा मिळविता येतो, याविषयी मार्गदर्शन केले. मूल्यवर्धित उत्पादनांमुळे शेतमालाला अधिक बाजारमूल्य प्राप्त होते, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही मोठी संधी उपलब्ध होते, असे त्यांनी सांगितले.

उद्योजक श्री. श्रीपाद ठोंबरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील दुष्काळी भागात दुग्धव्यवसाय हा शाश्वत उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना मिळाल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ऊस उत्पादकांना अधिक दर मिळत असून, शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून उर्जादाताही आहे, असे ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी उद्योगांनी खेड्यांकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री.अतिश साळुंखे यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधींचा वेध घेताना तंत्रज्ञानाधारित कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची वाढती गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील युवकांनी नवकल्पना, प्रक्रिया उद्योग आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. सतीश भोरकडे यांनी अडचणी या संधी निर्माण करण्याचे माध्यम असतात. चिकाटी, सातत्य आणि नावीन्यपूर्ण विचार यांच्या बळावर यशस्वी उद्योग उभा राहू शकतो, असे प्रतिपादन केले.

डॉ. उमेश कांबळे यांनी 'उद्यम विकसित मराठवाडा मिशन'ची भूमिका स्पष्ट करताना उद्योजकता विकासासाठी मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्योग–शैक्षणिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातून उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि शासन यांच्यात समन्वय निर्माण करून स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राहुल रामटेके, विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी, सेवा भारती परभणीचे पदाधिकारी श्री. बोराळकर, श्री. संजय जोशी व श्री. करभाजन, जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ. उमेश कांबळे यांनी मानले.

















बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान : शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम

 कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम


बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड होय. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक व रोजगाराच्या युगात विद्यार्थ्यांसमोर विविध शाखांतील असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ पारंपरिक विचारांवर किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, कौशल्ये, करिअरच्या संधी आणि भविष्यातील रोजगारक्षमतेचा सर्वांगीण विचार करूनच अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी यांच्या आधारे घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया ठरू शकतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान उपलब्ध अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये, त्यामधील करिअरच्या संधी आणि संबंधित क्षेत्रातील भविष्यातील मागणी यांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेणे हितावह ठरेल.

यामध्ये करिअरच्या नव्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच कृषि शिक्षणांतर्गत हा चार वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. इयत्ता १२ वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्रदान केली जाते. सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला करिअरच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

कृषि विद्यापीठांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असून महाराष्ट्र शासनाने सन २०२१ मध्ये शासन निर्णयाद्वारे सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाला कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमांप्रमाणेच समकक्ष दर्जा प्रदान केला आहे.

तसेच बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान ह्या दोन्ही पदव्या एकच असल्याबाबत महाराष्ट्र शासनाचा आदेश (जीआर) निर्गमित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे महाराष्ट्र शासनाने माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तसेच महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव यांच्या स्वाक्षरीने आदेश दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी (संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०२१३१६०४४२९९०१) निर्गमीत केला. यामध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी. एससी गृह विज्ञान / B.Sc. Home Science, बी.एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या सर्व अभ्यासक्रमांच्या पदव्या एकच असल्याने बी.एससी (गृह विज्ञान) / B.Sc. (Home Science) पदवी प्राप्त उमेदवारांना भरती प्रक्रिया प्रक्रियेत ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या, त्या बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science व बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उमेदवारांना उपलब्ध राहतील, असे नमूद केले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक-आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळविली आहे. तसेच योगेश्वरी सतिशराव पवार, जान्हवी रंगराव उक्कलगावकर आणि स्वाती बाळासाहेब पवार या तीन विद्यार्थिनींची प्रतीक्षा यादीत (Waiting List) निवड झाली आहे.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच सक्षम प्राधिकरणामार्फत आयोजित एमएचटी-सीईटी, जेईई किंवा नीट या प्रवेश परीक्षांपैकी कोणतीही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमासाठी मुला - मुली दोघांनाही प्रवेश खुला आहे. शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच शुल्कासंदर्भातील शासनाच्या सर्व सवलती या अभ्यासक्रमालाही लागू आहेत.

करिअरच्या विविध संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचे सखोल प्रशिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

याशिवाय जिल्हा रुग्णालये, दवाखाने, क्रीडा विभाग, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), रेल्वे विभाग तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये आहारतज्ज्ञ, महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हिअर मॉडिफिकेशन थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, बँका, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH), आयसीएमआर-एनआयएन (ICMR-NIN) आदी संस्थांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

उद्योजकतेच्या संधी

स्किल इंडिया मिशनला अनुसरून या अभ्यासक्रमामध्ये स्टार्टअप आणि स्वयंरोजगारालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या दर्जेदार पूर्वप्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, इंटेरिअर डिझाइनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हस्तकला (हँडीक्राफ्ट्स) युनिट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझाइनिंग यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम केले जाते.

तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लँडस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझाइनिंग, निवासी व व्यावसायिक इमारती, दवाखाने, मॉल्स यांच्यासाठी गार्डन डिझाइनिंग, पुष्परचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको-टुरिझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्मिती, हाऊसकीपिंग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, कंपन्यांमधील पब्लिक रिलेशन ऑफिसर (PRO) तसेच मार्केटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षण व नोकरीच्या संधी

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीए अभ्यासक्रमासाठी पात्र असून त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेच्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येतो.

याशिवाय स्पेशल एज्युकेशन, स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन, इंटेरिअर डिझाइनिंग, फॅशन डिझाइनिंग, स्कूल काउन्सेलिंग आदी विषयांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थी यशस्वी करिअर घडवू शकतात.

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठीही पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संधी

किशोर न्याय मंडळ (JJB), केंद्रीय समाजकल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ (UNICEF), युएनडीपी (UNDP), युएसडी, एफएओ (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही सामुदायिक विज्ञान पदवीधरांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाची व्यापक व्याप्ती, रोजगारक्षमतेच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या क्षमता लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

 प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/cap_2026-27           www.mcaer.org

 डॉ. नीता गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, भ्रमणध्वनी : ७७७४८४१६४९

डॉ. शंकर पुरी, विषय प्रमुख, भ्रमणध्वनी : ९३२६१०६०३६

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी