Thursday, August 13, 2026

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमातून ५२५ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद; ४४ शास्त्रज्ञांकडून कृषि तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून बदलत्या हवामानात शेतीचे नियोजन करा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा अभिनव कृषि विस्तार उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्रे, प्रक्षेत्र भेटी, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादात राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या १४ चमूंमधील ४४ शास्त्रज्ञांनी विविध गावांमध्ये भेटी देऊन सुमारे ५२५ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी खरीप पीक व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, नैसर्गिक व एकात्मिक शेती, कृषिपूरक व्यवसाय, आहार व पोषण तसेच कृषि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) येथे आयोजित कार्यक्रमास ५२ शेतकरी उपस्थित होते. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, चालू हंगामात सुदैवाने एल निनोचा फार मोठा परिणाम जाणवला नाही. पाऊस काही प्रमाणात कमी असला तरी उपलब्ध पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांचे योग्य नियोजन करून शास्त्रीय पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, चांगला शेतकरी असेल तरच तो चांगला कृषि शास्त्रज्ञ होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. भविष्यात अधिकाधिक सक्षम कृषि शास्त्रज्ञ निर्माण झाल्यास मराठवाड्यातील शेतीच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल. बदलत्या हवामान परिस्थितीत विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतीमध्ये चांगले उत्पादन घेणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. विद्यापीठाच्या शिफारशी व तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास उत्पादनवाढ साध्य करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच येत्या १५ ऑगस्ट रोजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आयोजित कृषि मेळाव्यास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण कृषि प्रयोगांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असून, यासाठी लवकरच काही संस्थांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राकेश अहिरे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या नवकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांचा इतर शेतकऱ्यांमध्येही प्रसार होऊन कृषि क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतीविषयक समस्या उद्भवल्यास विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध होणाऱ्या कृषि तंत्रज्ञानविषयक माहितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी हळद, कापूस व ऊस पिकांतील खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पिकांची गरज, जमिनीची सुपीकता आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी सोयाबीन पिकावरील येलो मोझॅक, हळद पिकावरील कंदमाशी तसेच उसावरील पाकोळी किडीचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. किडी व रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या शेतांमध्ये एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार शिक्षण तज्ज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांची उपस्थिती होती.

विविध जिल्ह्यांमध्ये उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सय्यदपूर येथे मार्गदर्शन व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील बोरखेड, पाचेगाव, चुंबळी व तळे पिंपळगाव येथे मार्गदर्शन, चर्चासत्रे व प्रक्षेत्र भेटी घेण्यात आल्या. या कार्यक्रमांना एकूण ८२ शेतकरी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील शेवगा, ता. अंबड येथे ४७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. लातूर जिल्ह्यातील उटी खुर्द येथे खरीप पीक व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून ६२ शेतकरी उपस्थित होते.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ व श्रीपतरायवाडी येथे सोयाबीन पिकातील कीड नियंत्रण तसेच एकात्मिक शेती पद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात तीन अधिकारी आणि ८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

याशिवाय वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे डाळ मिल, प्रमुख पिके व किडींचे व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील बोथी येथे प्रमुख पिके व किडींचे व्यवस्थापन, तर सिल्लोड तालुक्यातील वरखेडी येथे आंबा बागेला भेट देऊन केसर आंब्याच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील माळी हंडरगुळी येथे एकात्मिक शेती पद्धतीची पाहणी करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सनपुरी येथे पावसाळ्यातील आहार तसेच शेती कामात सामाजिक माध्यमांचा वापर यावर मार्गदर्शन करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील माथा येथे हळद व सोयाबीन पिकांबाबत मार्गदर्शन, जालना जिल्ह्यातील गेवराई येथे प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन, तसेच कृषि विज्ञान केंद्र, परभणीच्या वतीने पालम येथे नैसर्गिक शेती, पोषणातून शेती आणि कृषिपूरक व्यवसायांच्या माध्यमातून उद्योजकता विकास या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विविध केंद्रे व महाविद्यालयांचा व्यापक सहभाग

विद्यापीठाच्या विविध विस्तार शिक्षण केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे तसेच महाविद्यालयांच्या संयुक्त सहभागातून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील विविध अधिष्ठाता, प्राचार्य, शास्त्रज्ञ, कृषि तज्ज्ञ आणि विस्तार कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान व मार्गदर्शन प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी योगदान दिले.

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथून डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. बस्वराज पिसुरे आणि डॉ. संजुला भावर यांनी सहभाग घेतला. कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथून डॉ. हनुमान गरुड व डॉ. तुकेश सुरपाम, तर कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर येथून डॉ. आर. एल. कदम व डॉ. एस. आर. धांडगे यांनी सहभाग नोंदविला.

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर येथून विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, तसेच कृषि महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. दिगंबर पेरके यांच्यासह डॉ. ज्योती देशमुख, डॉ. अनंत शिंदे आणि डॉ. दयानंद मोरे यांनी सहभाग घेतला.

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई येथून विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे आणि तालुका कृषि अधिकारी श्री. विजय पवार यांनी सहभाग घेतला.

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र व राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर तसेच कृषि महाविद्यालय, लिहाखेडी यांच्या वतीने संशोधन उपसंचालक डॉ. सूर्यकांत पवार आणि डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी सहभाग नोंदविला. फळ संशोधन केंद्र येथून प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी सहभाग घेतला.

कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथून प्रभारी अधिकारी डॉ. विजयकुमार चिंचाने, डॉ. बस्वराज भेदे आणि डॉ. अरविंद पांडागळे यांनी सहभाग घेतला. गळीत धान्य संशोधन केंद्र येथून प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुपे, डॉ. शिवशंकर पोले, डॉ. अशोक घोटमुकुले आणि श्रीमती पौर्णिमा सिरसाठ यांनी सहभाग नोंदविला.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथून सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी सहभाग घेतला. कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथून सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. डी. एच. सारंग, कृषि विद्यावेत्ता डॉ. आर. एस. जाधव आणि डॉ. व्ही. एस. मनवर यांनी सहभाग घेतला.

कृषि महाविद्यालय, बदनापूर येथून सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. के. पाटील, डॉ. एन. डी. देशमुख, डॉ. ए. एल. सुरडकर आणि डॉ. एस. व्ही. पवार यांनी सहभाग घेतला. तसेच कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथून अरुणा खरवडे यांनी सहभाग नोंदविला.

या व्यापक सहभागामुळे विद्यापीठाच्या विविध केंद्रांमार्फत उपलब्ध असलेले कृषि तंत्रज्ञान, संशोधनाधारित माहिती आणि शेतकरी मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली. विद्यापीठातील विविध विभाग, कृषि विज्ञान केंद्रे आणि संशोधन संस्थांमधील समन्वयातून शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमामुळे विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यात थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा व समस्यांनुसार तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.


































Wednesday, August 12, 2026

समावेशक नवकल्पनांतून विकसित भारताची उभारणी; वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय नवोपक्रम प्रतिष्ठानमध्ये सामंजस्य करार

तंत्रज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा लाभ महत्त्वाचा; संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा —  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

सामंजस्य करार 
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

एनआयएफचे संचालक माननीय डॉ. अरविंद रानडे

विकसित भारत २०४७च्या संकल्पनेला गती देण्यासाठी ग्रामीण भागातील नवकल्पना, स्थानिक ज्ञान आणि शेतकरी-केंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन–इंडिया (एनआयएफ - NIF), गांधीनगर यांच्यामध्ये परभणी येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि एनआयएफचे संचालक माननीय डॉ. अरविंद रानडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सामंजस्य कराराच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारत २०४७ साठी समावेशक नवकल्पना’ (Inclusive Innovations for Viksit Bharat 2047) या विशेष व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आला. करारानुसार दोन्ही संस्थांच्या सहकार्याने समावेशक नवोपक्रम परिसंस्था विकसित करणे, विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या नवकल्पनांचा शोध घेणे, त्यांचे दस्तऐवजीकरण, पडताळणी व प्रमाणीकरण करणे, नवकल्पकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे तसेच सामाजिक गरजांवर आधारित संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर, आचार्य व पदव्युत्तर संशोधकांना एनआयएफच्या सहकार्याने ग्रामीण नवकल्पना, मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास आणि समाजाच्या अपूर्ण गरजांवर संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवकल्पकांना मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पनांचे बाजारपेठेसाठी उपयुक्त समाधानांमध्ये रूपांतर करण्यासाठी सहकार्य करता येणार आहे. नवोपक्रम, उद्योजकता विकास आणि बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थापनाबाबत संयुक्त कार्यशाळाही आयोजित करता येणार आहेत.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्याशी जोडलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांप्रती आदर व्यक्त केला. एनआयएफसोबत सुरुवातीपासून असलेला संबंध आणि या संस्थेचे सक्षम नेटवर्क विद्यापीठासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन प्रकल्प आणि संशोधकांच्या नवकल्पनांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या शेतावरील जोखीम कमी करणारे संशोधन उभारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी तंत्रज्ञानाचा लाभ अधिक महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करत त्यांनी संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी आणि समाजाच्या गरजा असाव्यात, असे प्रतिपादन केले.

सहज व सरळ जीवनापेक्षा स्पर्धात्मक वातावरणातून सक्षमता निर्माण होते, असे सांगून माननीय कुलगुरूंनीप्रश्नांना प्रश्न म्हणून संबोधले, तर त्यांची उत्तरे शोधणे अधिक सोपे जाते,” या कार्यपद्धतीचा विद्यापीठात अवलंब केला जात असल्याचे नमूद केले. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नवकल्पना-आधारित संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या चारही बाबींवर भर दिल्यामुळे विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर अनेक उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. नजीकच्या काळात विद्यापीठातील नोकरभरतीची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्यासाठी सक्षम उत्तराधिकारी तयार करावा, जेणेकरून संस्थेचे कार्य सातत्याने पुढे चालू राहील, असे आवाहन त्यांनी केले.

एनआयएफचे संचालक डॉ. अरविंद रानडे यांनी ‘Inclusive Innovation for Viksit Bharat’ या विषयावर मार्गदर्शन करताना नवकल्पक संशोधक हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळाची जमेची बाजू असून, या लोकसंख्यात्मक लाभाचा प्रभावी उपयोग करण्याची गरज आहे. भारतीय समाजरचनेत ग्रामीण लोकसंख्येचा मोठा वाटा असून, मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे विकसित भारत २०४७चे स्वप्न साकारण्यासाठी उत्पादकता, भारतीय ओळख व गौरवशाली परंपरा, क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (resilience) यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन संशोधन उपक्रम हे शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असावेत, असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. कृषी, जल व स्वच्छता, आरोग्य व पोषण, ऊर्जा व पर्यावरण तसेच जीवनमान उंचावणे या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या Indigenous Knowledge आणि स्थानिक तंत्रज्ञानामध्ये अनेक समस्यांची व्यावहारिक उत्तरे दडलेली आहेत. देशातील शेतकरी, कारागीर आणि ग्रामीण नवकल्पकांकडे असलेल्या या ज्ञानाला मागील २५ वर्षांत एनआयएफने पुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एनआयएफच्या कार्यपद्धतीचे सविस्तर विश्लेषण केले.

व्हीएआरडी विभाग प्रमुख डॉ. राकेश माहेश्वरी यांनी नवकल्पक संशोधक नाविन्यपूर्ण कल्पना व संशोधन घेऊन येत असल्याचे सांगितले. या नवकल्पनांना शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त, सुलभ आणि व्यवहार्य बनविण्याची आवश्यकता आहे. नवकल्पकांच्या संशोधनाला बौद्धिक संपदा हक्कांतर्गत संरक्षण देणे, योग्य नोंदणीसाठी मदत करणे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असून, एनआयएफ या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. त्यांनी संशोधनातील नवकल्पनांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. मोहन मुक्ताजी लांब, चिंचपूर (ता. धारूर, जि. बीड) आणि श्री. संभाजी शिराळे, पेठ शिवणी (ता. पालम, जि. परभणी) या नवकल्पक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार संशोधन उपसंचालक डॉ. सुनीता पवार यांनी मानले तर संशोधन उपसंचालक डॉ. प्रभाकर पडघन आणि संशोधन संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  या विशेष व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, आचार्य व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी घेतला.

सामंजस्य करारानुसार दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त कार्यशाळा, प्रशिक्षण, संशोधन व विद्यार्थी-शोधक विनिमय कार्यक्रम राबविण्यासह संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचीही तरतूद आहे. कराराची मुदत पाच वर्षांची असून, दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण व शेतकरी-केंद्रित नवकल्पनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार 
व्हीएआरडी विभाग प्रमुख डॉ. राकेश माहेश्वरी
संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण 


For English

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातर्फे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे दिनांक १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक १२ ऑगस्ट रोजी कृषि महाविद्यालय परिसरात परिसर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हरियाली अमावस्येनिमित्त दिनांक १२ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन आणि हरित व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी  यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते तसेच संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या उपस्थितीत आणि कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कृषि महाविद्यालय परिसरात १० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी एक झाड मा के नाम’ हा पर्यावरणपूरक संदेश दिला. कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, त्यापैकी आतापर्यंत ३५० वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती दिली. लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. सचिन मोरे, डॉ. हरिहर कौसडीकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. सुरेश वाईकर, श्री. विजय गारकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. संतोष ठोंबरे, श्री. श्रीनिवास भारती आणि डॉ. सुवर्णा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.








वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाद्वारे हरियाली अमावस्या निमित्त वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) यांच्या संयुक्त विद्यमाने हरियाली अमावस्येनिमित्त दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हरियाली अमावस्येच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन तसेच हरित व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालय परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमातून प्रत्येकाने किमान एक रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे’ हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासोबतच पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हरित परिसर निर्मिती आणि शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

यानिमित्त बोलताना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ. नीता गायकवाड यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन, वृक्षांचे महत्त्व तसेच शाश्वत व निरोगी जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, पाणी व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच स्वच्छ हवा, मृदासंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.एक विद्यार्थी–एक रोप” ही संकल्पना जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून आजचे रोप म्हणजे उद्याची हिरवीगार सावली हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामूहिक जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

हरियाली अमावस्या वृक्षारोपण अभियानातूनएक रोप लावा, एक झाड जगवा आणि हरित, निरोगी व शाश्वत भविष्यासाठी योगदान द्या” असा प्रभावी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.