Friday, July 31, 2026

वनामकृवित एनसीसी छात्रसैनिकांना व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्वाचे धडे

 एनसीसी कॅडेट्स सर्व क्षेत्रात निपुण : ब्रिगेडियर अनुप बरबरे

विद्यार्थी जीवनात शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारल्यास कोणतेही ध्येय सहज साध्य करता येते. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित होत असल्याने एनसीसी कॅडेट्स सर्वच क्षेत्रात निपुण ठरतात, असे प्रतिपादन ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे दिनांक ३० जुलै २०२६ रोजी एनसीसीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमास ब्रिगेडियर अनुप बरबरे, कर्नल दिलीप रेड्डी तसेच ‘अब नॉर्मल होम’च्या संचालिका किशोरी पाठक यांनी भेट दिली. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे होते. यावेळी सुभेदार मेजर मोहन सिंग, लेफ्टनंट प्रशांत सराफ (श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी), सेकंड ऑफिसर बालाजी सूर्यवंशी (एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, परभणी) तसेच ओंकार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सुमारे ३०० एनसीसी छात्रसैनिक उपस्थित होते. छात्रसैनिकांनी सशस्त्र मानवंदना देऊन मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पुढे मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर अनुप बरबरे यांनी विद्यार्थी जीवनातील शिस्त आणि सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. "शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोणतेही यश संपादन करता येते," असे ते म्हणाले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, वेळेचे व्यवस्थापन, जबाबदारीची जाणीव आणि देशसेवेची प्रेरणा विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर किशोरी पाठक यांनी छात्रसैनिकांना दैनंदिन जीवनात योग्य निर्णय कसे घ्यावेत, व्यासपीठावर प्रभावी व लोकाभिमुख संवाद कसा साधावा तसेच सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी, याबाबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक सत्राला छात्रसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेकंड ऑफिसर सोपान सावळे (नवोदय विद्यालय, परभणी) यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, कृषि महाविद्यालय, परभणी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून छात्रसैनिकांना शिस्त, नेतृत्व, निर्णयक्षमता, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आले. मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे छात्रसैनिकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना अधिक दृढ झाली.



Thursday, July 30, 2026

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास विभागाच्या प्रमुख तथा प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. तसेच महर्षी वेदव्यास यांच्या कार्याची माहिती देत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

आपले आई-वडील, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य हे देखील आपल्या जीवनातील गुरूच असल्याने, त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वंदन करून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ब्रिज सेक्शन व फ्लॉवर्स सेक्शनच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर भाषणे सादर केली. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका संध्या देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, July 29, 2026

राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२६ मध्ये वनाकृविला देशात १८ वे स्थान; 'गोल्ड' रेटिंगने गौरव

 यशाबद्दल ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे केले अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान मिळविले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९१.६ गुणांसह 'गोल्ड' रेटिंग प्रदान करण्यात आले आहे. ही माहिती ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाला पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.

ग्रीन मेंटर्सतर्फे आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ ही देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचे मूल्यमापन करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे. या मूल्यमापनामध्ये शाश्वत प्रशासन, हरित परिसर, जैवविविधता, हवामान कृती, ऊर्जा कार्यक्षमता, संशोधन व नवोपक्रम, अभ्यासक्रमातील शाश्वतता, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि समाजाभिमुख उपक्रम अशा दहा निकषांवर विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.

विद्यापीठाच्या सादर केलेल्या कागदपत्रांचे, शाश्वत विकास उपक्रमांचे, पर्यावरणीय कामगिरीचे आणि विविध पुराव्यांचे सखोल परीक्षण करून ही मानांकन प्रक्रिया पार पडली. या मानांकनामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शाश्वत विकास, पर्यावरणपूरक कॅम्पस उभारणी आणि हरित शिक्षण क्षेत्रातील कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, विद्यापीठाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शाश्वत विकास उपक्रम, संशोधन सहकार्य आणि परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला राष्ट्रीय ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR)-२०२६ मध्ये देशात १८ वे स्थान आणि 'गोल्ड' रेटिंग प्राप्त होणे ही संपूर्ण विद्यापीठ परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच सर्व हितधारकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, ऊर्जा बचत, जलसंधारण, हरित कॅम्पस निर्मिती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठाने सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे. भविष्यातही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने हरित, पर्यावरणपूरक आणि हवामान बदलास सक्षम असे विद्यापीठ उभारण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करू.

या यशाबद्दल ग्रीन मेंटर्स संस्थेने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

For english

कृषि हा भारताच्या विकासाचा भक्कम पाया; विद्यार्थ्यांनी कृषि उद्योजकतेकडे वाटचाल करावी" – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या जिरेवाडी (ता. परळी, जिल्हा बीड) येथील शासकीय कृषि महाविद्यालय तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी देशातील कृषि उत्पादन लोकसंख्येच्या अन्नगरजा पूर्ण करण्यासाठी अपुरे होते. मात्र, गेल्या सात दशकांत भारतीय कृषि क्षेत्राने संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि वैज्ञानिक शेतीच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज भारत १४० कोटी लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेची यशस्वीपणे पूर्तता करत असून अनेक कृषि व कृषि-आधारित उत्पादनांची निर्यात जगभर करत आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत भारत आज प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीने उभा आहे.

या यशाचे श्रेय भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या देशातील विविध कृषि विद्यापीठांना, संशोधन संस्थांना तसेच कृषि शास्त्रज्ञांनी केलेल्या सातत्यपूर्ण संशोधन व नवकल्पना यांच्यासह शेतकऱ्यांच्या कष्टाला जाते, असेही त्यांनी नमूद केले.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये देशभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विद्यापीठाने मिळविलेला हा दर्जा अधिक उंचावण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणासोबतच कृषि व्यवसाय, उद्योजकता आणि व्यवस्थापनाचे ज्ञान देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी जिरेवाडी येथे सन २०२४ मध्ये स्थापन झालेल्या शासकीय कृषि महाविद्यालय व शासकीय कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तत्कालीन कृषिमंत्री तथा आमदार श्री. धनंजय मुंडे यांनी या महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांचा उल्लेख करून महाराष्ट्र शासनाने परिसराच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा विचार करून या संस्थांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार नवीन शासकीय कृषि महाविद्यालये स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. संत कबीर यांच्या दोह्याचा संदर्भ देत शैक्षणिक जीवनात गुरुचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान, शिक्षण विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे, डॉ. गणेश गायकवाड, वरिष्ठ लिपिक श्री. अनंत मुंडे, वरिष्ठ लिपिक श्री. गोपाळ विघ्ने, प्रा. बाबासाहेब मस्के, प्रा. शिवाजी किर्जत, प्रा. इंगोले, ग्रंथपाल श्रीमती मोडके, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, July 28, 2026

सोयाबीन पिवळे पडत आहे? कारणे ओळखा आणि शास्त्रीय पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन करा; वनाकृविच्या तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

 

यावर्षी अल निनोच्या पार्श्वभूमीवर मान्सूनच्या आगमनास विलंब झाला असून पावसाची सुरुवात अनियमित झाली. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सर्वत्र एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झाली. तसेच अनेक भागांमध्ये आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा कमी असल्याने सोयाबीनची अपेक्षित वाढ होताना दिसून येत नाही. अशा परिस्थितीत जमिनीतील अपुऱ्या आर्द्रतेमुळे व प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनच्या मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे, विशेषतः लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण व्यवस्थित होत नाही. परिणामी, सोयाबीनच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत पाने पिवळी किंवा पांढरट पडणे (क्लोरोसिस) ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत आणि श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

क्लोरोसिस म्हणजे काय?

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याचे झाडाकडून पुरेसे शोषण न झाल्यास सोयाबीनमध्ये क्लोरोसिस ही शारीरिक विकृती दिसून येते. ही समस्या केवळ जमिनीत लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे उद्भवत नाही, तर जमिनीत लोह उपलब्ध असूनही ते झाडांना शोषून घेता न आल्यामुळे निर्माण होते.

लक्षणे

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरा हिरव्या राहतात, तर शिरांमधील भाग पिवळा पडतो. सुरुवातीची त्रिदलीय (ट्रायफोलिएट) पाने काही काळ हिरवी राहतात, तर नवीन पानांवर लक्षणे स्पष्ट दिसतात.  हरितद्रव्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.

कारणे

चुनखडीयुक्त व कमी निचऱ्याच्या जमिनीत ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असल्यास लोह पिकांना उपलब्ध स्वरूपात राहत नाही. ते फेरिक स्वरूपात रूपांतरित झाल्यामुळे पिकांना शोषून घेता येत नाही. जमिनीत जास्त ओलावा किंवा मुळांना ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यास लोहाचे शोषण कमी होते. पावसाची उघडीप, ढगाळ वातावरण व प्रतिकूल मृदा परिस्थितीमुळेही लोहाचे शोषण बाधित होऊ शकते.

एकात्मिक व्यवस्थापन

पाण्याचा ताण पडल्यास तुषार सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. ईडीटीए चिलेटेड मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड–२) ५० ग्रॅम किंवा ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार ८–१० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. ज्या शेतात अतिरिक्त पाणी साचले असेल तेथील पाण्याचा त्वरित निचरा करून वाफसा स्थिती निर्माण करावी. वापसा आल्यानंतर व पीक ३०–३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.

महत्त्वाच्या सूचना

सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावी होते. शिफारशीत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करू नये. जास्त प्रमाणामुळे पानांवर करपण्याची शक्यता असते. जमिनीचा सामू (पीएच) जास्त असलेल्या शेतात नियमित सेंद्रिय खतांचा वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारण्यास मदत होते. क्लोरोसिसची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना केल्यास प्रकाश संश्लेषण सुरळीत राहून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येते.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.

वनामकृवि संदेश क्रमांक: ०२/२०२६ ( दिनांक: २८ जुलै २०२६)





शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रवृत्त करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मौजे आळंद (ता. फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयोजित कृषि मेळाव्यात आवाहन

आजच्या घडीला कृषि व्यवसायासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी तसेच कृषि क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, बदनापूर आणि फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आळंद (ता. फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे दिनांक २८ जुलै २०२६ रोजी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यास ते ऑनलाइन मार्गदर्शन करत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत देशात अग्रेसर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कच्चा शेतीमाल थेट बाजारपेठेत विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतीतून अधिक उत्पन्न मिळविणे शक्य होईल. कृषि क्षेत्रात उद्योजकता विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध असून, भविष्यात या क्षेत्रासाठी कृषि शिक्षण घेतलेल्या तरुणांची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पाल्यांना कृषि शिक्षणासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच त्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय कृषि महाविद्यालये कार्यरत असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आळंद गावचे सरपंच श्री. कैलास गायके, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शाहीन अरेब शेख उपस्थित होते. यावेळी कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता तथा 'गोदावरी' तूर वाणाचे जनक डॉ. दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, सहाय्यक प्राध्यापक (रोगशास्त्र) डॉ. संतोष पवार, आणि सहाय्यक प्राध्यापक (कृषिशास्त्र) डॉ. पी. जी. चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यात आले-हळद व मका पिकांतील किडी व रोगांचे व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन, खरीप हंगामातील विविध पिकांचे शास्त्रशुद्ध नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब तसेच जैविक खतांचा प्रभावी वापर या विषयांवर शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून तांत्रिक माहिती दिली. मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी रावे समन्वयक डॉ. एन. डी. देशमुख व डॉ. एस. आर. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील सातव्या सत्रातील (RAWE) कृषिदूत दिलीप दळवी, प्रसाद गदादे, अनिकेत सरडे, प्रतीक शिंदे, चैतन्य लोखंडे, आश्विन चौधरी, शिवराज वैद्य, सिद्धेश्वर राऊत, आदित्य गिराम, अनिकेत गायकवाड आणि कल्याण नागलोत यांनी सक्रिय सहभाग घेऊन शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.

सूत्रसंचालन दिलीप दळवी यांनी केले, तर आभार चैतन्य लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमास कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. माधवराव जाधव, गावचे सहाय्यक कृषि अधिकारी श्री. कैलास चौधरी, कृषिमित्र श्री. जहीर पठाण यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी, युवक आणि कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Monday, July 27, 2026

वनामकृवितील चार वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थी-प्राध्यापकांशी प्रेरणादायी संवाद

 "हे माझे विद्यापीठ आहे" ही भावना जोपासा.....माननीय कुलगुरुंचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कुलगुरू म्हणून यशस्वी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कृषि व संलग्न महाविद्यालयांतील पदवी (UG), पदव्युत्तर (PG) व पीएच.डी. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, विद्यार्थी कल्याण, संस्थात्मक विकास तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या संवाद कार्यक्रमात विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, राष्ट्रीय अधिस्वीकृती (Accreditation) आणि मानांकन (रँकिंग) अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थी व शिक्षकांच्या सूचना तसेच परस्पर हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात सर्व संचालक, मुख्यालयातील आणि बाहेरील सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रभारी अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच प्राध्यापकांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, दिनांक २५ जुलै २०२२ रोजी जेव्हा त्यांनी परभणीत पहिले पाऊल ठेवले, तेव्हा परभणीशी त्यांचे कोणतेही नाते नव्हते आणि या परिसराविषयी फारशी माहितीही नव्हती. मात्र साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर विद्यापीठ व परभणीतील जनतेशी एकरूप होण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. आपले व्यक्तिमत्त्व सामाजिक असल्यामुळे समाजातील विविध घटकांशी सहज संवाद साधता आला. यामध्ये परभणीतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

परभणीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना त्यांनी "जगात जर्मनी आणि भारतात परभणी" असे अभिमानाने नमूद केले. परभणीची ओळख राष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांना विद्यापीठात निमंत्रित करण्यात आले. या मान्यवरांनी परभणीबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

नेतृत्वाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, नेतृत्व करताना अहंकार बाळगू नये किंवा पदाचा गर्व करू नये. पद मिळाले म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ किंवा सर्वज्ञानी झालो, असा समज करून घेऊ नये. पद ही समाजसेवा करण्याची एक संधी आहे, अशी भावना ठेवून सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे व मेहनतीने कार्य करावे. "झिरो बार्गेनिंग पॉईंट" या तत्त्वाचे महत्त्व सांगताना त्यांनी "मला काम करू द्या" हा आपला कार्यमंत्र असल्याचे नमूद केले. विद्यापीठात कार्यरत असताना एकदाही कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कोणत्याही आठवणीशिवाय काम करण्याची वृत्ती विकसित करावी, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवावा आणि चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण तपश्चर्या आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठात केवळ ३२ टक्के मनुष्यबळावर अनेक उल्लेखनीय यश संपादन करता आले, ते सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्ती, समर्पण आणि परिश्रमामुळेच शक्य झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी परभणी ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगत येथील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, जनसमुदाय, शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठ परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.

सन २०२२ पूर्वीच्या कार्यापेक्षा मागील चार वर्षांत केलेल्या कार्यातून दहापट अधिक समाधान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील चार वर्षांसाठीही सर्वांना सोबत घेऊन नियोजनबद्ध कार्य करण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कार्य करणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि समर्पण यांमुळे विद्यापीठाच्या अडचणी कमी झाल्या असून प्रत्येकाने "हे माझे विद्यापीठ आहे" ही भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्पांसाठी परभणी कृषि विद्यापीठाला प्राधान्य दिले जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात संघभावना व कार्यसंस्कृती अधिक बळकट झाली. त्यातून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून (ICAR-NAEAB) '' दर्जाची अधिस्वीकृती मिळाली. तसेच NAHEP प्रकल्पांतर्गत ५१ विद्यार्थ्यां व २४ अधिकारीचे परदेशी प्रशिक्षण, सुमारे रु. १२५ कोटींचे संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, स्वयं (SWAYAM) पोर्टलवरील उल्लेखनीय कार्य, IIRF रँकिंगमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तसेच विद्यापीठातील  अखिल भारतीय समन्वित संशोधन केंद्रांपैकी १० केंद्रांनी देशात प्रथम क्रमांक मिळविल्याचा उल्लेख त्यांनी केला. मागील चार वर्षांत संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला. याबरोबरच माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे कार्य करत असताना प्रयोगशाळेतील साहित्यांचे आधुनिकीकरण, कायमस्वरूपी संग्रहालयाची उभारणी, क्रीडांगणाचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नवीन बसची खरेदी करण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात लक्षणीय बचत झाली असून या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेआरएफ (JRF) परीक्षेत यश मिळविण्यास तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यास मोलाची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने मागील चार वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सुरुवातीला कमी मनुष्यबळ व अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अनेक शंका उपस्थित होत होत्या; मात्र कुलगुरूंनी अल्पावधीतच परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणला. बदनापूर येथील सौरऊर्जा प्रकल्प, विविध पायाभूत सुविधा तसेच शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विस्तार शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून "एक दिवस माझा माझ्या बळीराजासोबत" आणि ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद यांसारख्या कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित संशोधनाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला तो कोरोनानंतरचा अत्यंत आव्हानात्मक काळ होता. त्यांनी संकटांचे संधीत रूपांतर करत विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक धोरणे राबविली. गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या निर्मितीवर भर दिला तसेच परभणीसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे दहा लाख वृक्षांची लागवड करून हरित विद्यापीठ संकल्पना साकारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची स्वच्छ, पारदर्शक, भेदभावरहित व साधी कार्यपद्धती ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळे विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून अधिस्वीकृतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात यश मिळाले.

प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी माननीय कुलगुरूंच्या गेल्या चार वर्षांतील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यापीठात झालेल्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण व पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती दिली. या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंनी व्यक्तीतील क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी दिली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करून संस्थेची प्रतिमा उंचावली. कमी मनुष्यबळावरही अनेकपटीने कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यामुळे आज समाजात विद्यापीठाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून सर्वजण सकारात्मक भावनेने कार्य करत आहेत.

विद्यार्थी प्रतिनिधी धीरज कदम आणि सुभाष कुमार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाला सक्षम, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पालकत्वाची भावना देत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती साधली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रणजीत चव्हाण आणि डॉ. फारिया खान यांनी केले.







































For English