Saturday, April 11, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वनामकृवित १८ तास सलग अभ्यास उपक्रम; शिक्षण व पंचशील आचरणाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 


भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपले जीवन अधिक समृद्ध करावे. पंचशीलाच्या आचरणातून चांगले वर्तन विकसित होते आणि त्यामुळे समाजात सन्माननीय ओळख निर्माण होते. राष्ट्राची प्रगती ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीवर अवलंबून असते, त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आणि ज्ञानार्जनाच्या तीव्र जिद्दीमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता, ती अध्ययनाचा दिवस म्हणून साजरी करावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

भारताचे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ ग्रंथालयात दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग १८ तास अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू बोलत होते.

पुढे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी मानवकल्याणासाठी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले. शिक्षणामुळे व्यक्ती शीलवान बनते. तसेच गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशील तत्त्वांचे पालन केल्यास व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. गौतम बुद्ध यांच्या तत्त्वांचे पालन जपान, थायलंड येथे प्रभावीपणे केले जाते, त्यामुळे हे देश प्रगतीपथावर आहेत; आपणही या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष कदम यांनी मानले. या उपक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.







वनामकृविच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; ३५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यापीठाचा विकास; देशात प्रथम स्थानासाठी सक्रिय सहभागाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन




वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, परभणी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर माजी विद्यार्थी माननीय श्री. बालाजी पाटील खतगावकर, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. सुनील चव्हाण, श्री. अशोक शिनगारे श्री. अंकुश चव्हाण, श्री रामभाऊ घाडगे, श्री मिलिंद सावंत, श्री किसनराव जावळे, श्री केशव वाबळे डॉ. पुरुषोत्तम झंवर तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. रणजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते

माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने दरवर्षी पाच माजी विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याने यावर्षी माननीय उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव माननीय श्री. बालाजी पाटील खतगावकर तसेच माननीय खासदार श्री. रवींद्र चव्हाण यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यापीठ परिसरात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून माजी विद्यार्थी संघटनेच्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी संघटनेचा  स्नेहमेळावा आयोजित करण्याचे स्वप्न आज पूर्ण झाल्याबद्दल त्यांना विशेष आनंद होत आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्था आणि परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या देशातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आल्या असून, याचे प्रमुख श्रेय या संस्थांतील माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला जाते. संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यापीठ ही आपली दुसरी आई असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे, असे सांगून त्यांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य वसतिगृहाचे उदाहरण दिले. शेतीविषयक समस्या कृषीचा विद्यार्थीच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, आणि या विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रभर प्रशासकीय सेवांमधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कृषी विद्यापीठांचे देशाच्या अन्नसुरक्षेत मोठे योगदान असून, एकेकाळी ४० कोटी लोकसंख्येला अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता; आज १४० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करून देत भारत निर्यातही करत आहे. याचे श्रेय देशातील ७४ कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या ११३ संशोधन संस्थांना जाते.

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठांच्या कार्यासाठी विशिष्ट रचना असून ‘महाविस्तार एआय’ अॅपच्या माध्यमातून राज्यातील शेती देशाला दिशा देत आहे, असे त्यांनी सांगितले. मागील दोन वर्षांत विद्यापीठाने चार नवीन महाविद्यालये सुरू केली असून विविध प्रकल्प प्राप्त झाले आहेत. यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने मोठी मदत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

विद्यापीठाने ‘अ’ दर्जा प्राप्त करत पायाभूत सुविधांच्या विकासासह शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यावर भर दिला आहे. विद्यापीठाची नऊ संशोधन केंद्रे देशात प्रथम क्रमांकावर कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

शेवटी, विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि देशात प्रथम स्थान मिळवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. तसेच विद्यापीठात मनुष्यबळाची कमतरता असल्याने भरती प्रक्रिया राबविण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

श्री बालाजी पाटील खतगावकर यांनी सांगितले की, पूर्वी विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंटे होत असत; मात्र सध्या परिस्थिती सकारात्मक बदललेली असून, ग्रंथालयात जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होत असल्याचे ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला.

आपले अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाकडून विद्यार्थ्यांनी केवळ कृषी क्षेत्रातच करिअर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असे आणि स्पर्धा परीक्षांकडे काही प्रमाणात विरोधही होता. परंतु घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत यश संपादन केले.

सध्या जल व मृदा व्यवस्थापनाशी संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या असून, त्या सोडविण्याचे कार्य करण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील विद्यार्थी ‘ॲग्रीकॉस’ (Agricoss) या संकल्पनेतून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठामुळे अनेक मोठ्या संधी प्राप्त झाल्या असल्याचे सांगत, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आज माजी विद्यार्थी मेळाव्याचे रोपटे लावले असून, ते भविष्यात वटवृक्षात रूपांतरित व्हावे यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून, विद्यापीठातील गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःचे जीवन योग्य दिशेने घडवता आले, असे सांगितले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु” या प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांनी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहनही केले. सध्याच्या घडीला जमीन कमी होत चाललेली आहे, प्रदूषण वाढत आहे आणि जीवनशैलीत मोठे बदल होत आहेत; या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

श्री रवींद्र चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना नमूद केले की, त्या विद्यापीठाने आपल्याला ओळख दिली असून, त्याच विद्यापीठात सत्कार-सन्मान झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मतदारसंघातील सर्व कार्यक्रम सुरू असतानाही या ठिकाणची ओढ लागल्याने आपण येथे सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले. आम्ही या विद्यापीठाचे प्रॉडक्ट आहोत,” असे सांगत त्यांनी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रथम प्रवेश केल्यापासून ते आज व्यासपीठावरून भाषण करतानाच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. “रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते म्हणजे ॲग्रीकॉस,” असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक जिंकण्यात ॲग्रीकॉस मित्रपरिवाराचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कृषी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. याबरोबरच, जिल्हास्तरावर १० ते १५ विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट सेल तयार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सुचवले. तसेच, महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या नूतनीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी स्वतःकडून एक लाख रुपयांच्या निधीचे योगदान जाहीर केले. पुढील स्नेहमेळावा वसतिगृहासमोरच आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

श्री सुनील चव्हाण यांनी नमूद केले की, होस्टेल हे संस्कार करण्याचे स्थान असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होस्टेलमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते आणि जीवन जगण्याची कला अवगत होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होस्टेलमधील जीवन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आपण ज्या खोल्यांमध्ये राहिलो त्या खोल्यांचे नूतनीकरण करून त्यांना अद्ययावत करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषी शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मी या विद्यापीठातून घडलेलो असून, त्यासाठी काहीतरी परत देण्याची माझी भावना आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने आयोजित केलेला आजचा स्नेह मेळावा हा नात्यांना उजाळा देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राध्यापकांचा गुणगौरव करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांमधून जीवन जगण्याची कला शिकल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी विद्यापीठाने विक्री व्यवस्थापन, हवामानाचा अचूक अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणावरील तंत्रज्ञान विकास यावर भर द्यावा, असे आवाहन केले. कृषी शिक्षण हे सर्व गुणांनी संपन्न आणि सर्वोच्च असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असेही आवाहन केले.

श्री आनंद चोंदे यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांची सहकारी संस्था स्थापन करून दीड कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश मिळाले आहे. तसेच विद्यापीठातील दगडी वसतिगृहाला ‘हेरिटेज’ स्वरूप देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यामुळे संपूर्ण देशाला या विद्यापीठातून दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाची शासकीय स्तरावरील कामे पदवीधर विद्यार्थ्यांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

श्री वामन कदम यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव सांगितले. यावेळी त्यांनी श्री उमाकांत दांगट यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. तसेच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात ‘इंद्रधनुष्य’ इमारतीसह पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विकासाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी माननीय माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील तसेच माजी महासंचालक श्री भागडे यांनी शुभेच्छा व संदेश पाठविले आहेत.

श्री मिलिंद सावंत यांनी विद्यापीठाने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याची सुरुवात केल्याबद्दल आभार मानून अभिनंदन केले. “एग्रीकॉस”ची ताकद यामुळे दिसून येते आणि परस्पर सहकार्य वाढते, असे त्यांनी सांगितले. कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुधा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना सहकार्याची गरज असते, आणि ती या संघटनेद्वारे पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठानेही माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री रवी पतंगे यांनी विद्यापीठाने मागील काही वर्षांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर नियुक्तीसाठी कृषी पदवीधरांचाच विचार करावा आणि त्यासाठी संघटनेच्या वतीने ठराव करून शासनस्तरावर मंजुरी घ्यावी, असे प्रतिपादन केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी माजी विद्यार्थी संघटनेची पार्श्वभूमी व स्वरूप स्पष्ट केले. विद्यापीठाने महाराष्ट्रात ६४ हून अधिक आयएएस, आयपीएस तसेच उच्चपदस्थ अधिकारी घडवले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील सध्याच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावाही त्यांनी मांडला.

प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. माजी विद्यार्थी श्री कणके, डॉ. वडनेरकर तसेच श्री ओम सिसोदिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांचा वारसा जपत नवीन पिढीने आपले जीवन घडवावे, असे आवाहन केले.

सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी केले. या स्नेह मेळाव्याचा उद्देश माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि सध्याचे विद्यार्थी असे एकूण ३५० हून अधिक जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.














Friday, April 10, 2026

वनामाकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र अंतर्गत बलसा ब्लॉकमध्ये दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी “वृक्षारोपण कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्यक्ष खड्डा खणून, रोप लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ विश्वनाथ खंदारे, डॉ दीपक पाटील, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ सुनिल उमाटे तसेच परभणी वन विभागाचे अधिकारी डॉ. आर. पी. नाळे, श्री. जी. पी. ढगे, श्री. एच. एन. जाधवर यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या संकल्पनेवर कार्यरत असून पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देण्यात येईल.

प्रमुख पाहुणे माननीय डॉ. मोहपात्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून ती भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा.

हा कार्यक्रम परभणी येथील सोयाबीन न्यूक्लियस बियाणे उत्पादन केंद्र, बालसा ब्लॉक येथे संपन्न झाला. कार्यक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुंडीकर यांनी केले.






वनामकृवित “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा संपन्न

 

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांचे संदेशाद्वारे मार्गदर्शन


वनामकृविचे  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तारक, विद्यार्थी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय परस्परसंवादी  कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभेच्छा संदेशाद्वारे करण्यात आले. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.

व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. आनंद कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य श्री रवी पतंगे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे,  शिक्षण प्रभारी डॉ रणजीत चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री जयाजी पाईकराव, श्री. भगवान इंगोले, श्री. मधुकर घुगे आणि इतर  मान्यवरांची उपस्थिती होती

माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांनी संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना सांगितले की, रासायनिक घटकांचा पिके, जमीन तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक वाण हे हवामानास अनुकूल व अधिक प्रतिकारक्षम असल्याने त्यांचा वापर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी श्रीमती राहीबाई पोपरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या अनुकरणातून स्थानिक व पर्यावरणपूरक वाणांची निवड करण्याचे आवाहन केले. स्थानिक वाणांचे महत्त्व लक्षात घेता जिल्हास्तरावर स्थानिक वाणांची ‘सीड बँक’ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. या उपक्रमात महाबीजचे योगदान घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्थानिक व देशी वाणांचे ज्ञान आत्मसात करून त्याच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनीला भेट देऊन सहभागी शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे मदत करता येईल यावर चिंतन केले. विद्यापीठाचा शेतकरी देवो भव:” हा केवळ नारा नसून त्या विचारधारेवरच कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पूरस्थिती, दुष्काळ तसेच अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. या प्रदेशात कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक असून किडी व रोगांचा प्रादुर्भावही वाढत आहे. महाराष्ट्र हवामान बदलाच्या दुष्परिणामांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देणे आवश्यक असून, नैसर्गिक शेतीद्वारे जोखीम व्यवस्थापन साधत शाश्वत शेती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जमीन तयार करण्यापासून ते साठवणुकीपर्यंत शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. तसेच संमिश्र पीक पद्धती अवलंबणे अत्यावश्यक असून, यासाठी शेतकऱ्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विद्यापीठ विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन राबवत आहे. याचमुळे शैक्षणिक, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ अग्रस्थानी राहून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.

विद्यापीठाच्या कार्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभत असून, हवामान अंदाजासाठी यंत्रणा व संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करण्यात आले असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.

पूर्वी पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परभणी हे दूरस्थ क्षेत्र असल्याची भावना निर्माण होत असल्याने राष्ट्रीय पातळीवरील मान्यवर व शास्त्रज्ञ येथे येण्यास टाळत होते. मात्र ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करण्यात आला होता. आज डॉ. मोहपात्रा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती ही त्या प्रयत्नांच्या यशाची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरूंच्या ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेचे अभिनंदन करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. उपाशी माणसासाठी देव म्हणजे अन्न असून तेही शुद्ध व गुणवत्तापूर्ण मिळणे आवश्यक आहे; ही गरज कालही होती, आजही आहे आणि भविष्यात अधिक वाढणार आहे, असे त्यांनी नमूद केले. यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असून त्याद्वारे शाश्वत शेती साध्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शाश्वत शेतीसाठी त्यांनी तीन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यामध्ये तंत्रज्ञान हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असावे, सामाजिक दायित्व जपणारे असावे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन करणारे असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेती करताना जमीन व वातावरण प्रदूषित होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बाबी लक्षात घेऊन शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आहारामध्ये गुणवत्ता असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. हवामानानुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशी वाण, सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचे संवर्धन, बचत व प्रभावी अवलंबन करावे, असेही त्यांनी सांगितले.

बियाणे व वाणांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केंद्र सरकारच्या संस्थांमार्फत विविध लाभ दिले जातात, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच माननीय कुलगुरूंच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी श्री. जयाजी पाईकराव, श्रीमती पूजा जमाले, श्री. मधुकर घुगे, श्री. गणेशराव शेंगुळ, श्री. ज्ञानोबा पारडे तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. हरिहर कोरडीकर, डॉ. मधुकर मोरे आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी स्थानिक वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शेतकरी श्री. दिलीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना वाढती लोकसंख्या आणि जैववैविध्याचा विचार करून संकरित वाणांच्या तुलनेत नैसर्गिक वाणांना चालना देण्याची गरज असल्याचे मत मांडले.

सूत्रसंचालन शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पपीता गौरखेडे यांनी मानले.

कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू महोदय, संचालक संशोधन, संचालक विस्तार शिक्षण आणि संचालक शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, उपसंचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (लातूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांच्यासह विविध समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील विद्यापीठांचे विविध विभाग, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकूण ७२४ हून अधिक सहभागी उपस्थित होते, यामध्ये १२४ अधिकारी आणि ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश होता.

 

कृषी प्रदर्शनाचे आयोजन

या कार्यशाळेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध पिकांच्या स्थानिक वाणांचे (लँडरेसेस), पारंपरिक बियाण्यांचे तसेच सुधारित वाणांचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. विविध अन्नधान्य पिके, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला पिके, फळपिके तसेच हवामान बदलाशी सुसंगत असलेल्या स्थानिक वाणांची माहिती फलक, नमुने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मांडण्यात आली.

विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे आणि विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील तंत्रज्ञान, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, बियाणे संवर्धन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य सुधारणा तसेच स्थानिक वाणांवर आधारित शाश्वत शेतीचे विविध पैलू शेतकऱ्यांसमोर मांडले. या स्टॉलमध्ये माहितीपत्रके, पोस्टर्स, नमुने आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

तसेच विविध स्वयंसेवी संस्था (NGOs), शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रगत व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारलेले स्टॉल मान्यवर पाहुणे, शेतकरी आणि उपस्थित अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरले. स्थानिक बियाणे संवर्धन, पारंपरिक शेती पद्धती, मूल्यवर्धित उत्पादने तसेच नैसर्गिक शेतीतील यशस्वी प्रयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.






Thursday, April 9, 2026

वनामकृविच्या लिहाखेडी कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कृषि महाविद्यालय तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील अधिकारी व विद्यार्थ्यांसोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार, कृषि महाविद्यालय (बदनापूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित जैविक औषधे व जैविक खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच जैविक कीडनियंत्रण साधनांचा वापर वाढविण्याचे आवाहन करताना बाजरीच्या ‘एएचबी-१२००’ या वाणाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी समस्या सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यावर मात करावी, तसेच उपलब्ध संधींचे सुवर्णसंधीत रूपांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले.

माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा, जैवविविधतेचे महत्त्व ओळखावे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्रातील आव्हानांवर मात करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रारंभी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रकल्पाचा आढावा सादर केला. बैठकीनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. तसेच जैविक औषधे व जैविक खतांच्या संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन विविध जैविक उत्पादनांची माहिती घेण्यात आली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचेही अवलोकन करण्यात आले. या कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, श्री. संतोष ढगे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.








वनामकृविच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्राला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांची भेट

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, फळ संशोधन केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेले विविध फळपिकांचे सुधारित वाण गुणवत्तेच्या दृष्टीने उत्कृष्ट असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये त्यांची मोठी मागणी आहे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधनाला प्राधान्य देत असून भविष्यात अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणारे वाण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी आंबा, मोसंबी यांसारखी प्रमुख फळपिके चुनखडीयुक्त जमिनीस अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारे प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यावर कृषि विद्यापीठांनी विशेष भर द्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, जमिनीची घटती सुपीकता आणि पाण्याची टंचाई या पार्श्वभूमीवर फळपिकांसाठी टिकाऊ वाणांची निर्मिती ही काळाची गरज आहे. संशोधनासोबतच विकसित वाणांचे संरक्षण, संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी ही एक मौल्यवान गुंतवणूक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बदनापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, सहायक उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नाईनवाड, वरिष्ठ संशोधन सहायक गिरीश सोनवणे, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शेवटी संशोधन केंद्रातील विविध प्रकल्प, प्रक्षेत्रे व रोपवाटिकांची पाहणी करण्यात आली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशोधनाच्या प्रगतीविषयी माहिती दिली.