Thursday, June 4, 2026

आयआयआरएफ २०२६ रँकिंगमध्ये वनामकृविला राज्यात १ ला, राष्ट्रीय स्तरावर ३४ वा क्रमांक

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वनामकृविचे राष्ट्रीय यश

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (IIRF – Indian Institutional Ranking Framework) २०२६ च्या भारतातील कृषि व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात महाराष्ट्रात १ला तर राष्ट्रीय स्तरावर ३४वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. नवी दिल्ली येथील आयआयआरएफ सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल रिसर्च (ICIR) तर्फे ही रँकिंग जाहीर करण्यात आली असून, विद्यापीठाला ३ जून २०२६ रोजी अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

आयआयआरएफ ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांची स्वतंत्र व संशोधनाधिष्ठित मूल्यांकन प्रणाली मानली जाते. विविध शैक्षणिक निकष, संशोधन कार्य, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सुविधा आणि विस्तार उपक्रमांच्या आधारे विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यात येते. केंद्रीय, राज्य, अभिमत व खासगी विद्यापीठांच्या स्वतंत्र गटांमध्ये ही रँकिंग जाहीर केली जाते. कृषि व उद्यानविद्या विद्यापीठांच्या श्रेणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मिळविलेले हे स्थान विशेष मानाचे मानले जात आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना विद्यापीठ परिवाराने व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, शिक्षण, संशोधन, विस्तार आणि नवोपक्रम क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण कार्याची ही पावती आहे. विद्यापीठातील शिक्षक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे यश प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच विद्यापीठाच्या कार्यकारी व विद्वत परिषदेच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० अवलंबून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासास चालना देत त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी शैक्षणिक प्रगती साधली आहे. तसेच सन २०२५ – २६ मध्ये विद्यापीठाद्वारा परिसर मुलाखतींचे आयोजन करून जवळपास १८० विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याची नोंदही घेण्यात आली.

मागील काही वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, वसतिगृहांची दुरुस्ती, अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण, सीएसआर निधीतून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम आणि ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’ची स्थापना करण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीचे अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए (BSMA) अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाकडून दिनांक १६ मे २०२५ रोजी विद्यापीठास अधिस्वीकृतीसाठी उच्चांकी ३.२१ गुण प्राप्त झाले असून, त्यास ‘ए-ग्रेड’ उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच विद्यापीठाच्या १० संशोधन केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे.

याशिवाय बाह्यस्त्रोत निधीतून सुरू असलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार, ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा शेतकरी उपक्रम, ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, तसेच विद्यापीठाने विकसित केलेले नवीन पीक वाण, अवजारे व तंत्रज्ञान यांच्या प्रभावी विस्तारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कार्याला अधिक गती मिळाली आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम आयआयआरएफ रँकिंगमध्ये दिसून आला आहे.

या यशामध्ये शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

या सर्व संबंधित माहितीचे संकलन व सादरीकरण शिक्षण संचालनालयातील तांत्रिक अधिकारी तथा विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे आणि तांत्रिक अधिकारी डॉ. गणपत कोटे यांनी केले.

या यशामुळे विद्यापीठ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



वनामकृवि बीज प्रक्रिया केंद्रात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते नव्या ट्रकचे उद्घाटन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रामध्ये नव्याने खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक ट्रकचे लोकार्पण दि. ४ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ट्रकचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, संशोधन उपसंचालक तथा विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. हरिहर कौसडीकर, प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

नवीन ट्रकच्या समावेशामुळे बीज वाहतूक, साठवण आणि वितरण प्रक्रिया अधिक गतिमान होणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांचा वेळेत पुरवठा करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या बीज उत्पादन उपक्रमांना अधिक बळकटी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या बीज उत्पादन व प्रक्रिया कार्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचविण्यासाठी आधुनिक सुविधांचा वापर वाढविण्यावर भर दिला. नवीन वाहनामुळे बीज प्रक्रिया केंद्राच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन विद्यापीठाच्या कृषि विकासातील योगदानाला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नव्या ट्रकची पाहणी करून विद्यापीठाच्या बीज उत्पादन व वितरण व्यवस्थेला मिळालेल्या या नव्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बीज प्रक्रिया केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच बीज उत्पादन व प्रक्रिया विभागाशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वनामकृविच्या उत्तरा मुलींच्या वसतिगृहामध्ये माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थिनींसोबत संवाद साधत सुविधांची पाहणी



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या उत्तरा मुलींच्या वसतिगृह येथे दिनांक ३ जून २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत वसतिगृहामधील विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि महाविद्यालय परभणीचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. प्रविण वैद्य, प्रगतशील आंबा उत्पादक तथा प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतदादा वरपूडकर, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, वसतिगृहातील सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, भोजन व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींविषयी माहिती घेतली. विद्यार्थिनींनीही विविध समस्या व सूचना मान्यवरांसमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय उत्तरा मुलींच्या वसतिगृहाच्या सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.





Wednesday, June 3, 2026

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे रावराजुर येथे “खेत बचाओ अभियान” अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणात मृदा आरोग्य, एल-निनो व कार्बन क्रेडिटवर मार्गदर्शन

 जमिनीचे आरोग्य टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज : डॉ. हरिहर कौसडीकर



माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या “खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे रावराजुर, ता. पालम, जि. परभणी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचेठाचेनाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनखाली विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.

यावेळी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अभय जाधव, परभणीचे विख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केदार खटिंग, रावराजुर गावचे श्री अशोकरावजी शिंदे, तसेच प्राणा कंपनीचे श्री. ध्रुव साकोरे यांच्यासह पंचक्रोशीतील सुमारे २०० शेतकरी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले की, जमिनीचे आरोग्य टिकवून संतुलित पीक पोषण करणे ही काळाची गरज आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य खत व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कमी करावा. तसेच पिकांच्या संतुलित पोषणासाठी उपलब्ध विविध पर्यायांची माहितीही त्यांनी दिली. याबरोबरच, विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून शास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पिकांची निवड करावी आणि पेरणी कोणत्या कालावधीत करावी, याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण खरीप हंगामातील संभाव्य पर्जन्यमानाबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

यानंतर डॉ. अभय जाधव यांनी फेरसाळ लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. केदार खटिंग यांनी मानवी आरोग्यासाठी मातीचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

यावेळी श्री. ध्रुव साकोरे यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील माहिती देऊन, प्राणा कंपनीसोबत समन्वय साधून शेतकऱ्यांनी कार्बन क्रेडिटचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. हेमचंद्र शिंदे यांनी केले, तर प्राध्यापक नितीन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याच कार्यक्रमात डॉ. हरिहर कौसडीकर आणि डॉ. केदार खटिंग यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांच्या माती परीक्षणाचे अहवाल वितरित करण्यात आले.







Tuesday, June 2, 2026

वाल्हा येथे “खेत बचाओ अभियान”चा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते शुभारंभ : मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांना वैज्ञानिक मार्गदर्शन

 



माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या “खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे वाल्हा (ता. बदनापूर, जि. जालना) येथे अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचा शुभारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते दिनांक २ जून २०२६ रोजी करण्यात आला.

यावेळी वाल्हा गावचे सरपंच श्री. कोल्हे, उपसरपंच श्री. सचिन घाडगे, माजी सभापती पंचायत समिती श्री. संजयजी जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. बद्रीभाऊ पठारे, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषी महाविद्यालय बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. डी. के. पाटील, सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे प्रमुख डॉ. सोमवंशी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, २०० हून अधिक शेतकरी तसेच रावेचे १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय व जैविक खतांचा अवलंब तसेच शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे ही काळाची गरज असून मृदा परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य खत व्यवस्थापन स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रे व कृषि प्रसार यंत्रणा गावागावांत जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणार आहेत. अभियानांतर्गत मृदा परीक्षण, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका, संतुलित खत व्यवस्थापन तसेच पिकनिहाय शिफारसींबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला.









वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनांक ३१ मे २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास प्रकल्प संचालक प्रा. अभिजित संघई तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन केले. शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. अभिजित संघई यांनी “तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तंबाखूमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्यविषयक समस्या, कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकार यांसारख्या गंभीर आजारांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तंबाखूचे व्यसन केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीलाही घातक ठरते, असे त्यांनी नमूद केले. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीताने करण्यात आली. प्रास्ताविकात डॉ. सुभाष विखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात तंबाखूविरोधी शपथ घेण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन परिसरात जनजागृती केली. “तंबाखूला द्या नकार, निरोगी जीवनाचा करा स्वीकार” तसेच “व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत” अशा घोषणांद्वारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविण्यात आले. पदयात्रेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मुदिता इंगळे यांनी केले, तर आभार आर्या चोपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. शंकर शामार्थी, श्री. प्रमोद राठोड, श्री. हनुमंत ढगे, श्री. रमेश मोहीते, श्री. माणिक खटींग तसेच विद्यार्थी यश जाधव, श्रद्धा पवार, गीता दुधाटे, संकेत पवार, गणेश बोराडे आणि स्वराज ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.








 

Monday, June 1, 2026

वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम

 

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत समुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक १ जून २०२६ रोजी तंबाखू व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करून तंबाखूमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यांसारख्या गंभीर व्याधी उद्भवतात, त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी तंबाखूमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना तंबाखू व इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. त्यांनी युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच समाजातही जनजागृती करून तंबाखूविरोधी चळवळ अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसरात “तंबाखूला नकार – आरोग्याला होकार” हा संदेश देत जनजागृती करण्यात आली.