Friday, April 10, 2026

वनामाकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र अंतर्गत बलसा ब्लॉकमध्ये दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी “वृक्षारोपण कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्यक्ष खड्डा खणून, रोप लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ विश्वनाथ खंदारे, डॉ दीपक पाटील, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ सुनिल उमाटे तसेच परभणी वन विभागाचे अधिकारी डॉ. आर. पी. नाळे, श्री. जी. पी. ढगे, श्री. एच. एन. जाधवर यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या संकल्पनेवर कार्यरत असून पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देण्यात येईल.

प्रमुख पाहुणे माननीय डॉ. मोहपात्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून ती भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा.

हा कार्यक्रम परभणी येथील सोयाबीन न्यूक्लियस बियाणे उत्पादन केंद्र, बालसा ब्लॉक येथे संपन्न झाला. कार्यक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुंडीकर यांनी केले.






वनामकृवित “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा संपन्न

 

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांचे संदेशाद्वारे मार्गदर्शन


वनामकृविचे  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तारक, विद्यार्थी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय परस्परसंवादी  कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभेच्छा संदेशाद्वारे करण्यात आले. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.

व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. आनंद कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य श्री रवी पतंगे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे,  शिक्षण प्रभारी डॉ रणजीत चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री जयाजी पाईकराव, श्री. भगवान इंगोले, श्री. मधुकर घुगे आणि इतर  मान्यवरांची उपस्थिती होती

माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांनी संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना सांगितले की, रासायनिक घटकांचा पिके, जमीन तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक वाण हे हवामानास अनुकूल व अधिक प्रतिकारक्षम असल्याने त्यांचा वापर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी श्रीमती राहीबाई पोपरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या अनुकरणातून स्थानिक व पर्यावरणपूरक वाणांची निवड करण्याचे आवाहन केले. स्थानिक वाणांचे महत्त्व लक्षात घेता जिल्हास्तरावर स्थानिक वाणांची ‘सीड बँक’ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. या उपक्रमात महाबीजचे योगदान घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्थानिक व देशी वाणांचे ज्ञान आत्मसात करून त्याच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनीला भेट देऊन सहभागी शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे मदत करता येईल यावर चिंतन केले. विद्यापीठाचा शेतकरी देवो भव:” हा केवळ नारा नसून त्या विचारधारेवरच कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पूरस्थिती, दुष्काळ तसेच अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. या प्रदेशात कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक असून किडी व रोगांचा प्रादुर्भावही वाढत आहे. महाराष्ट्र हवामान बदलाच्या दुष्परिणामांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देणे आवश्यक असून, नैसर्गिक शेतीद्वारे जोखीम व्यवस्थापन साधत शाश्वत शेती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जमीन तयार करण्यापासून ते साठवणुकीपर्यंत शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. तसेच संमिश्र पीक पद्धती अवलंबणे अत्यावश्यक असून, यासाठी शेतकऱ्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विद्यापीठ विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन राबवत आहे. याचमुळे शैक्षणिक, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ अग्रस्थानी राहून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.

विद्यापीठाच्या कार्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभत असून, हवामान अंदाजासाठी यंत्रणा व संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करण्यात आले असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.

पूर्वी पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परभणी हे दूरस्थ क्षेत्र असल्याची भावना निर्माण होत असल्याने राष्ट्रीय पातळीवरील मान्यवर व शास्त्रज्ञ येथे येण्यास टाळत होते. मात्र ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करण्यात आला होता. आज डॉ. मोहपात्रा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती ही त्या प्रयत्नांच्या यशाची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरूंच्या ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेचे अभिनंदन करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. उपाशी माणसासाठी देव म्हणजे अन्न असून तेही शुद्ध व गुणवत्तापूर्ण मिळणे आवश्यक आहे; ही गरज कालही होती, आजही आहे आणि भविष्यात अधिक वाढणार आहे, असे त्यांनी नमूद केले. यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असून त्याद्वारे शाश्वत शेती साध्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शाश्वत शेतीसाठी त्यांनी तीन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यामध्ये तंत्रज्ञान हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असावे, सामाजिक दायित्व जपणारे असावे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन करणारे असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेती करताना जमीन व वातावरण प्रदूषित होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बाबी लक्षात घेऊन शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आहारामध्ये गुणवत्ता असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. हवामानानुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशी वाण, सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचे संवर्धन, बचत व प्रभावी अवलंबन करावे, असेही त्यांनी सांगितले.

बियाणे व वाणांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केंद्र सरकारच्या संस्थांमार्फत विविध लाभ दिले जातात, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच माननीय कुलगुरूंच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी श्री. जयाजी पाईकराव, श्रीमती पूजा जमाले, श्री. मधुकर घुगे, श्री. गणेशराव शेंगुळ, श्री. ज्ञानोबा पारडे तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. हरिहर कोरडीकर, डॉ. मधुकर मोरे आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी स्थानिक वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शेतकरी श्री. दिलीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना वाढती लोकसंख्या आणि जैववैविध्याचा विचार करून संकरित वाणांच्या तुलनेत नैसर्गिक वाणांना चालना देण्याची गरज असल्याचे मत मांडले.

सूत्रसंचालन शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पपीता गौरखेडे यांनी मानले.

कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू महोदय, संचालक संशोधन, संचालक विस्तार शिक्षण आणि संचालक शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, उपसंचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (लातूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांच्यासह विविध समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील विद्यापीठांचे विविध विभाग, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकूण ७२४ हून अधिक सहभागी उपस्थित होते, यामध्ये १२४ अधिकारी आणि ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश होता.

 

कृषी प्रदर्शनाचे आयोजन

या कार्यशाळेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध पिकांच्या स्थानिक वाणांचे (लँडरेसेस), पारंपरिक बियाण्यांचे तसेच सुधारित वाणांचे आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. विविध अन्नधान्य पिके, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला पिके, फळपिके तसेच हवामान बदलाशी सुसंगत असलेल्या स्थानिक वाणांची माहिती फलक, नमुने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मांडण्यात आली.

विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे आणि विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील तंत्रज्ञान, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, बियाणे संवर्धन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य सुधारणा तसेच स्थानिक वाणांवर आधारित शाश्वत शेतीचे विविध पैलू शेतकऱ्यांसमोर मांडले. या स्टॉलमध्ये माहितीपत्रके, पोस्टर्स, नमुने आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

तसेच विविध स्वयंसेवी संस्था (NGOs), शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रगत व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारलेले स्टॉल मान्यवर पाहुणे, शेतकरी आणि उपस्थित अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरले. स्थानिक बियाणे संवर्धन, पारंपरिक शेती पद्धती, मूल्यवर्धित उत्पादने तसेच नैसर्गिक शेतीतील यशस्वी प्रयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.






Thursday, April 9, 2026

वनामकृविच्या लिहाखेडी कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कृषि महाविद्यालय तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील अधिकारी व विद्यार्थ्यांसोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार, कृषि महाविद्यालय (बदनापूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित जैविक औषधे व जैविक खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच जैविक कीडनियंत्रण साधनांचा वापर वाढविण्याचे आवाहन करताना बाजरीच्या ‘एएचबी-१२००’ या वाणाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी समस्या सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यावर मात करावी, तसेच उपलब्ध संधींचे सुवर्णसंधीत रूपांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले.

माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा, जैवविविधतेचे महत्त्व ओळखावे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्रातील आव्हानांवर मात करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रारंभी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रकल्पाचा आढावा सादर केला. बैठकीनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. तसेच जैविक औषधे व जैविक खतांच्या संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन विविध जैविक उत्पादनांची माहिती घेण्यात आली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचेही अवलोकन करण्यात आले. या कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, श्री. संतोष ढगे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.








वनामकृविच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्राला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांची भेट

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, फळ संशोधन केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेले विविध फळपिकांचे सुधारित वाण गुणवत्तेच्या दृष्टीने उत्कृष्ट असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये त्यांची मोठी मागणी आहे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधनाला प्राधान्य देत असून भविष्यात अधिक उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व बाजारपेठेतील मागणी पूर्ण करणारे वाण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी आंबा, मोसंबी यांसारखी प्रमुख फळपिके चुनखडीयुक्त जमिनीस अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारे प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यावर कृषि विद्यापीठांनी विशेष भर द्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, जमिनीची घटती सुपीकता आणि पाण्याची टंचाई या पार्श्वभूमीवर फळपिकांसाठी टिकाऊ वाणांची निर्मिती ही काळाची गरज आहे. संशोधनासोबतच विकसित वाणांचे संरक्षण, संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी ही एक मौल्यवान गुंतवणूक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बदनापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, सहायक उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नाईनवाड, वरिष्ठ संशोधन सहायक गिरीश सोनवणे, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शेवटी संशोधन केंद्रातील विविध प्रकल्प, प्रक्षेत्रे व रोपवाटिकांची पाहणी करण्यात आली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशोधनाच्या प्रगतीविषयी माहिती दिली.



वनामकृवित महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम; युवकांनी विचार आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात प्रसिद्ध व्याख्याते श्री. राहुल गिरी यांच्या व्याखानाने झाली.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, व्याख्याते श्री. राहुल गिरी, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. एम. जी. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, अध्यक्ष कार्यक्रम समिती  डॉ. रणजीत चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रभावीपणे नमूद केले की, राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा व विचारांचा सन्मान केल्याने समाजात सकारात्मक जागृती निर्माण होते. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजाला योग्य दिशा मिळते. आजच्या युवकांनी महापुरुषांचे विचार केवळ जाणून घेण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आत्मसात करून आपल्या आचरणात उतरवणे आवश्यक आहे. त्याद्वारे चारित्र्यनिर्मिती, ज्ञानवृद्धी व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, जे राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे त्यांनी असेही अधोरेखित केले की, अशा जयंती उत्सवांना विद्यापीठ स्तरावर अधिक व्यापक, संगठित व प्रेरणादायी स्वरूप देणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय मूल्ये आणि नेतृत्वगुणांची जाणीव अधिक दृढ होईल.

कार्यक्रमात व्याख्याते श्री. राहुल गिरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्याचे सखोल व प्रभावी विवेचन केले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना, सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञान हेच सर्वात प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट केले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विपुल ग्रंथसंपदेतील विचार, त्यांची अफाट विद्वत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती जिंकता येते, हे त्यांनी समर्पक उदाहरणांद्वारे पटवून दिले. तसेच महात्मा फुले यांच्या समतावादी विचारसरणीचा संदर्भ देत त्यांनी युवकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

युवकांनी या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि समाजघडणीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय डॉ. रणजीत चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन रणजीत वडकुते व आशुतोष मध्येवाढ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अनुराधा लाड यांनी केले.










Wednesday, April 8, 2026

वनामकृवित “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” विषयावर कार्यशाळा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तारक, विद्यार्थी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय परस्परसंवादी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण, भारत सरकारचे अध्यक्ष मा. डॉ. त्रिलोचन मोहापात्रा उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यशाळेमध्ये हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी स्थानिक वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेचे आयोजक सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, उपसंचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर आणि कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (लातूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांच्या वतीने या कार्यशाळेस शेतकरी, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sunday, April 5, 2026

व्यवस्थापन, सॉफ्ट स्किल्स आणि सकारात्मकतेचा मंत्र; कृषि व्यवसाय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या चाकूर (जि. लातूर) येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना यशाचा मंत्र दिला.

माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचे येथील असे सांगितले. विद्यार्थी हा संस्थेचा आत्मा आहे. तुम्ही नेहमी आनंदी, उत्साही आणि सकारात्मक राहा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी ‘व्यवस्थापन’ या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, त्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे ते म्हणाले. तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापनाच्या वाढत्या गरजेवर प्रकाश टाकत ‘सॉफ्ट स्किल्स’चे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. संवाद कौशल्य, नेतृत्व, संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकास या गुणांचा अंगीकार केल्यास यश सहज साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी संस्थेतील वसतिगृहाच्या सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची सविस्तर पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या वसतिगृहाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. लवकरच वसतिगृह पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

या वेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. झिरमिरे, श्री. अभिषेक राठोड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.