Wednesday, July 15, 2026

मराठवाड्यातील हवामान बदल व पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर वनामकृवित पत्रकार परिषद

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब ही काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मराठवाड्यात सध्या हवामान बदल व पावसाच्या खंडामुळे उद्भवलेल्या विविध कृषि समस्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य आणि दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही पत्रकार परिषद विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम सभागृह (हॉल क्र. १८) येथे संपन्न झाली.

पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडण्याची परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींबरोबरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य पीक व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील संभाव्य घट टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीतील भेगा बुजवाव्यात. त्यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा भुसभुशीत थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष अथवा काडीकचऱ्याचे आच्छादन (मल्चिंग) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते. ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) द्रावणाची फवारणी करावी. त्यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंडकाळात संरक्षित सिंचनाचा अवलंब करावा. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारणासाठी सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, त्याची शास्त्रीय पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाच्या माध्यमातून विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आणि सूर्यफूल ही पिके घेता येतील. त्यानंतरही पावसास विलंब झाल्यास तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ आणि तीळ यांसारख्या दुष्काळसहिष्णू पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या प्रगती, संशोधन, विस्तारकार्य तसेच दैनंदिन कामकाजाचा आढावाही पत्रकारांसमोर मांडला.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची माहिती दिली. संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी पावसाच्या खंडामुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा सादर केला. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी 'एल निनो' या हवामान घटनेविषयी माहिती देत त्याचे संभाव्य परिणाम आणि आगामी पावसाचा अंदाज स्पष्ट केला. विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी मराठवाड्यातील पिकांची सद्यस्थिती, आवश्यक उपाययोजना तसेच आकस्मिक पीक नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

पत्रकार परिषदेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड तसेच मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी केले. पत्रकार परिषदेस विविध मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











वनामकृविच्या बदनापूर कृषि महाविद्यालयास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांचे यश, अनुभवाधारित शिक्षण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांचे केले विशेष कौतुक

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे नवनियुक्त शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी बदनापूर येथील कृषि महाविद्यालयास दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सदिच्छा भेट देऊन महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशाबद्दल आणि परिसरात राबविण्यात येणाऱ्या वृक्षसंवर्धन उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

भेटीदरम्यान डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयात अनुभवातून शिक्षण (ELP) अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या मधुमक्षिका पालन व कुक्कुटपालन प्रकल्पांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या मान्यतेने महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या आळंबी उत्पादन व प्रशिक्षण प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी करून त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर डॉ. ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे सांगून त्यांनी हरित परिसर निर्मितीसाठी महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

यानंतर त्यांनी महाविद्यालयातील बीजोत्पादन कार्यक्रम, पीक प्रात्यक्षिके, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, विविध अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच इतर शैक्षणिक सुविधा यांची पाहणी केली. उपलब्ध सुविधा, प्रयोगशाळा आणि प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व कौशल्याधारित शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रयोगाधारित शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेत स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन तसेच कृषी उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा. ज्ञानाबरोबरच कौशल्य, नवोन्मेषी विचार आणि सामाजिक बांधिलकी जोपासल्यास भविष्यात सक्षम कृषी व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता येईल.

महाविद्यालयातून दरवर्षी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होत असल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाची सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हे इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यापीठाचे बियाणे सहयोगी संचालक तथा कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे तसेच तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







वनामकृविद्वारा खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रासायनिक, यांत्रिक व जैविक उपायांचा समन्वय साधून तण व्यवस्थापन करा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


खरीप हंगामात तण नियंत्रण हे पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आला. मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी, कृषि पदवीधर तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले की, खरीप हंगामात पावसामुळे तणांची वाढ झपाट्याने होते. वेळेवर आणि योग्य पद्धतीने तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात २० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक, यांत्रिक, सांस्कृतिक व जैविक उपायांचा समन्वय साधून एकात्मिक तण व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यापीठ तण व्यवस्थापन विषयावर सातत्याने संशोधन करत असून, नवीन तंत्रज्ञान, तणनाशकांचा शास्त्रोक्त वापर तसेच शेतीतील यांत्रिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. तण व्यवस्थापन करताना पीक-तण स्पर्धेचा महत्त्वाचा कालावधी लक्षात घेऊन सुरुवातीच्या अवस्थेतच तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या तण व्यवस्थापन ॲपचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकरी बांधवांना केले. तणनाशकांचा वापर नेहमी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. बाबू येवले, कृषि तज्ज्ञ, ग्लोबल विकास ट्रस्ट, परळी यांनी तण व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर व उदाहरणाधारित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात तणांचे विविध प्रकार – गवताळ, रुंदपर्णी व इतर तणांची ओळख तसेच तणांचा प्रसार – बियाणे, हवा, पाणी व शेती अवजारांद्वारे होणारा प्रसार, याबरोबरच तणांचे दुष्परिणाम – अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाशासाठी पिकांशी होणारी स्पर्धा तसेच कीड व रोगांना मिळणारा आश्रय, एकात्मिक तण व्यवस्थापन – प्रतिबंधात्मक, सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक व रासायनिक उपाययोजनांचा समन्वित वापर. तणनाशकांच्या वापरातील दक्षता – योग्य वेळ, मात्रा व सुरक्षितता उपाय. तण व्यवस्थापनातील यांत्रिकीकरण – कोळपणी, खुरपणी यंत्रे व आधुनिक अवजारांचा वापर यावर चर्चेमध्ये भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आनंद गोरे, प्रमुख अन्वेषक यांनी केले, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे शास्त्रीय व समाधानकारक उत्तरे देवून निरसन केले.




Tuesday, July 14, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत तांत्रिक अधिकारी तथा कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सचिन मोरे हे होते.  यावेळी त्यांनी महाविद्यालयातील कायमस्वरूपी प्रदर्शनी, संग्रहालय, आहार चिकित्सालय तसेच विविध प्रयोगशाळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संवादादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडीलबंधूंनी या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केल्यामुळे सन १९८२ पासून त्यांचा या महाविद्यालयाशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. या महाविद्यालयाने व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले असून, या संस्थेशी असलेल्या संपर्कामुळे आपले व्यक्तिमत्त्व साधे, सरळ आणि स्वच्छ घडले, हीच आज आपली खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळत असते. त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. समाधानाने कार्य करण्याची सवय असल्यास प्रकृती निरोगी राहते आणि आनंदी जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयात परस्पर सहकार्याच्या भावनेतून सांघिक पद्धतीने कार्य केल्यास अधिक चांगले परिणाम साध्य होतात, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

नवीन अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, सामुदायिक विज्ञान क्षेत्रात कार्य करणारे आपण सर्व भविष्यातील सक्षम आधारस्तंभ आहात. त्यामुळे प्रत्येकाने शिस्तबद्ध राहून नियम व वेळेचे काटेकोर पालन करावे. तसेच नैतिक मूल्ये जपावीत, मोठ्यांचा आदर व सन्मान करावा आणि ही मूल्ये आपल्या आचरणातून जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.

हे महाविद्यालय कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असल्याने सेवाभाव, सहकार्य, शिस्त आणि नैतिकता हे गुण प्रत्येकाच्या अंगी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास आपल्या पाल्य प्राध्यापकांच्या माध्यमातून अथवा महाविद्यालयाच्या प्रशासनामार्फत माझ्यापर्यंत संपर्क साधू शकता. आवश्यक असल्यास थेट माझ्याशीही संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.

आपल्या पूर्वीच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी नुकताच लातूर कृषि महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या 'वनश्री पुरस्काराची' यशोगाथा सांगितली. या पुरस्कारानिमित्त त्यांच्या मूळ गाव बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे उंदरी येथील मित्रांनी त्यांचे तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी परभणी येथे येऊन भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या मूळ गावी येथे भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिल्याचा उल्लेख केला.

यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा व सद्यस्थितीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्ष तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.











Sunday, July 12, 2026

वनामकृविच्या कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRP on Dryland Agriculture) येथे सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध पिकांवरील संशोधन, हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान, मृदा व जलसंधारण उपाययोजना तसेच पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत  *सविस्तर मार्गदर्शन केले.*

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींसोबत हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विशेषतः खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील घट टाळता येते.

त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीच्या भेगा बुजविण्याचा सल्ला दिला. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा बारीक थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन (Mulching) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते, असे त्यांनी सांगितले.

ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) ची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषण सुरळीत राहते आणि उत्पादन क्षमता टिकून राहण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा इतर जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचन द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारण सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर त्यांनी भर दिला.

पुढे त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक आहे. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी व सूर्यफूल ही पिके घेता येऊ शकतात. त्यानंतर पावसास विलंब झाल्यासव दुष्काळसहिष्णू पिके, जसे तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ व तीळ यांना प्राधान्य द्यावे.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी माननीय कुलगुरूंनी संशोधन, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे तसेच प्रकल्पावरील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गोरे यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची, हवामान बदलाशी संबंधित संशोधनाची आणि पावसाच्या खंड काळात पिकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली.


Saturday, July 11, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तसेच ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक १० जुलै २०२६ सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सर्पमित्र इंजी. वेदांत माळवटकर (परभणी) यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी वैज्ञानिक व उपयुक्त माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्ग व वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना इंजी. श्री. वेदांत माळवटकर यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पांचे पर्यावरणीय महत्त्व, साप आढळल्यास घ्यावयाची योग्य काळजी, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार तसेच करावयाच्या व टाळावयाच्या बाबी याविषयी सविस्तर माहिती दिली. साप हे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सापांना इजा न करता किंवा न मारता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सर्पांविषयी समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. अनिकेत वाईकर तसेच सर्पमित्र श्री. अमोल माने, श्री. अक्षय चोपडे, श्री. शिवप्रसाद देशमुख व श्री. नितीन जवंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रद्धा पवार यांनी केले, तर आभार रोहिणी रासवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मुदिता इंगळे, अंकिता वाघ, यश जाधव आणि आदित्य चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.




Friday, July 10, 2026

पैसा /वाणु (मिलीपीड) किडीची ओळख, नुकसान व व्यवस्थापनाबाबत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

 

वाणु, पैसा यालाच इंग्रजीमध्ये मिलीपीड म्हणतात. मिलीपेड कीटक नसून बहुपाद गटातील (डिप्लोपोडा) प्रासंधिपाद प्राणी आहे. जगभरात 12,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. सहसा ओलसर, जंगले (जिथे पाउस जास्त पडतो) दगडाच्या खाली, मातीमध्ये इ. भागात आढळतात (गवत, पाने, कचरा, कंपोष्ट). काही प्रजाती पुरग्रस्त भागात टिकू शकतात व दोन महीन्यापर्यंत पाण्यात बुडतात. वेगवान हालचाल करु शकत नाहीत आणि बहूतेक प्रजाती सडणा-या वनस्पती सामग्रीवर जगतात. मिलीपीडमध्ये विषारी स्टिनर नसतात परंतू त्यापेकी काही शरीरातल्या छिद्रामधून दुर्गंधीयुक्त रसायने तयार करतात ही रसायने अनेक भक्षकांना दुर ठेवण्यास मदत करतात. धोक्याच्या वेळी मिलीपीड मउ असणा-या शरिराच्या खालच्या बाजुचे संरक्षण करताना कडक असलेल्या वलय उघडीस करून त्याच्या शरीरात घट्ट आवर्त वर्तुळ करतात. बहुतेकदा रात्री नैसर्गीक स्थान सोडतात, आणि पायाच्या साह्याने रेंगाळत वर्षाच्या विशिष्ट विशेषत: शरद ऋतू दरम्यान ते मोठया संख्येने स्थलांतर करू शकतात. वसंत आणि ग्रीष्म ऋतु मध्ये जास्त ओल्या किंवा कोरडया हवामानाच्या अनुषंगाने स्थलांतरीत करतात.

खरिप हंगामामध्ये पैसाचा (वाणु) प्रादुर्भाव अनेक गावांमध्ये विविध पिकावर दिसुन येत आहे. विशेष करून सोयाबीन, कापूस ई. पिकामध्ये प्रादुर्भाव होत आहे. ही कीड निशाचर आहे, रात्रीलाच सक्रिय असते. उगवत असलेल्या बिया, लहान रोपे पूर्ण खाऊन फस्त करतात. यामुळे तूट जास्त प्रमाणात होते, प्रादुर्भाव जास्त झाल्यास दुबार पेरणी करावी लागते. तसेच पीक मोठे झाल्यावर पाने खातात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिकरीत्या सतत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड आणि संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे यांनी सांगितले केले आहे.
पैसा (वाणु) ओळख :
मिलीपीड (हजार लेगर्स असे म्हटले जाते) आपल्या भागात Eurymerodesmus spp. आढळतात. तपकिरी, काळपट रंगाचे असून प्रत्येक शरिराच्या भागाचे दोन किंवा चार पाय असतात. मिलीपीडजवळ खरोखरच हजार पाय नसतात. प्रजातीवर अवलंबून त्याचे पाय ४७ ते १९७  जोडयाचे असतात तर सर्वात जास्त ७५० पाय आहेत. जवळजवळ शरिराचे २५ – १०० भाग (Segments) असतात. शरिराचे डोके आणि इतर शरिर असे दोन भागात विभाजन होते. प्रौढ मिलीपीडची लांबी ०.५ ते ६.५ इंच असते. जेव्हा आपण स्पर्श करतो किंवा विश्रांती घेते तेव्हा बहुतेक मिलीपीड कर्लअप करतात (गोळा होतात) तेव्हा त्यास आपल्या भागात पैसा असे म्हणतात.
जीवनक्रम :
जन्माच्या वेळी मिलीपीडसच्या शरिराचे 6 भाग असतात आणि पायाचे 3 जोडया असतात.

-        जेव्हा कात टाकतात त्यावेळी शरीराचे भाग आणि पाय संख्या वाढतात.

-      नर मिलीपीडसला ७ व्या भागाला पाय नसतात त्या ठिकाणी जननेंद्रिये (Modified legs) असतात तर मादी जननेंद्रिये मिलीपीडसच्या दुस-या पायाच्या जोडीजवळ असते.

-     या किडीची मादी एका वेळेस १० ते ३०० अंडी ओलसर जागेवर घालते. वाणु कीड बहुभक्षी तसेच समूहाने आढळणारी कीड आहे.

-     अंडयामधून अळी बाहेर पडते तेव्हा पाय नसतात जेव्हा पहीली अवस्था असते तेव्हा पाय फुटतात अशा प्रकारे प्रत्येक अवस्थे वेळी पाय फुटतात व शरिराची लांबी कप्याने वाढतात.

-         जास्तीत जास्त २ ते १२ इंच पर्यंत वाढ होते आणि ७ ते १० वर्ष पर्यंत जगतात.
नुकसानीचा प्रकार  :
पैसा (वाणु) निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो किंवा त्यांची संख्या जास्त होते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.
एकात्मिक व्यवस्थापन
कीटकासह समस्या ब-याचदा ओल्या हवामानाशी जुळतात मिलीपीडचा प्रवेश कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करणे विशेषत: गवत कापने, ओले गवत, दगड, जमीनीवर ठेवलेल्या वस्तू, बांधावरील गवत इ. काढले पाहीजे.

-   ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपीडच्या समस्यास कारणीभुत ठरु शकतात.

-     कीड लपण्याच्या जागा जसे की, शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काही काडीकचरा गोळा करून नष्ट करावे वाणी रात्री जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढीगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावे.

-     ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.

-      मिलीपीडस रात्री जास्त सक्रीय असल्या कारणाने शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले मिलीपीड जमा करून मिठाच्या द्रावणात टाकावे.

-       पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्‌या पडून नष्ट होतील.

-       चांगला पाउस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.

-      किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी ३ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% एसपी १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी

-       ज्या शेतांमध्ये वारंवार या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसल्फान ६ % दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस १०% दाणेदार किंवा फिप्रोनील (०.३%) ५ किलो प्रति १००  किलो शेणखतात मिसळून १ हेक्टर शेतात पसरवावे (वरील कीटकनाशके शेतक-यांनी शेतावर वापरले असता त्यांच्या अनुभवातून परिणामकारक दिसत आहेत, परंतु CIB&RC लेबल क्लेम नाहीत).

 अधिक महितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक

डॉ. पुरुषोत्तम नेहरकर – ९८२२९३६९८६ किंवा डॉ. अनंत लाड – ९७३०९४८१२८ / ७५८८०८२०२४