Thursday, March 5, 2026

वनामकृवित जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि माय भारत, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी १८ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांची विचारशक्ती व निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक त डॉ. भगवान आसेवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणीच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पंडित निर्मल, डॉ. कल्याण गांगुर्डे, डॉ. सुरेश भालेराव, डॉ. हर्षा सूर्यवंशी, डॉ. सुरेंद्र रोडगे आणि डॉ. धम्मपाल कांबळे यांनी काम पाहिले. परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे राज्यस्तरीय “विकसित भारत युवा संसद २०२६” साठी खालील विद्यार्थ्यांची निवड केली.

१. वैष्णवी एकनाथ शितळे – उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी
२. गायत्री रंगनाथराव लाड – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
३. महेश गणेश लांगे – केकेएम महाविद्यालय, मानवत
४. अभिषेक सुरेश हिवराळे – कृषी महाविद्यालय, परभणी
५. शेजल श्रीकांत काळे – पी.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालय, परभणी

कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढविण्यासह सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्याची संधी मिळाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.







माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली डफवाडी (ता.परभणी) येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न

 एकात्मिक खत व्यवस्थापनातून जमिनीचे आरोग्य राखण्याचा डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सल्ला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत डफवाडी (ता. जि. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला.

या प्रशिक्षण शिबिरात उपसंशोधन संचालक व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी परिसरातील आंबा, कांदा, गवार व भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते, सेंद्रिय खते, विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करून एकात्मिक खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष आंबा बागेत प्रात्यक्षिकाद्वारे जमिनीचे आरोग्य व पीक पोषणासंबंधी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरणही करून दाखविले. तसेच त्यांनी डफवाडी व उमरी माळ्याची (ता. परभणी) परिसरातील सहभागी शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या सेवा व उपलब्ध कृषि निविष्ठांविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाच्या अधिकाधिक संपर्कात राहावे, असे आवाहन केले.

मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना तसेच प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट करत रासायनिक खतांच्या अति वापराचा जमिनीवर होणारा परिणाम आणि पिकांची उत्पादकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर, माती परीक्षण आणि जैविक खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या प्रशिक्षण शिबिरात विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते, सेंद्रिय खते व जैविक खतांच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक खत एनपीके कन्सोरशियम, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते व विद्राव्य खतांचे प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना वितरणही करण्यात आले. यावेळी माती परीक्षण, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खतांचा योग्य वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

हे शेतकरी प्रशिक्षण शिबिर श्री. नागोराव कांबळे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून फळझाडे व भाजीपाला पिकांतील पोषण व्यवस्थापनासंबंधी समस्यांचे निराकरण करून घेतले. यामध्ये प्रताप नामदेव कांबळे, सिद्धार्थ नागोराव कांबळे, नागोराव शंकर कांबळे, शेख मंजूर शेख अलाउद्दीन, शेख मुश्ताक शेख मंजूर, अन्सार खा अकबर खा, भास्कर साळवे, विकास माने, तुळशीराम मस्के, नारायण मस्के, रामभाऊ मस्के, सीताराम मस्के, प्रविण संभाजी कांबळे, सचिन नारायण कांबळे, ज्ञानोबा कोंडिबा कांबळे, अंकुश पारतकर आदींसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.





वनामकृवित विद्यार्थ्यांसाठी ‘युथ हॅपिनेस प्रोग्राम’चा शुभारंभ; २१० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन वाढीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत युथ हॅपिनेस प्रोग्राम या विशेष अभ्यासक्रमाचे दिनांक ४ ते ८ मार्च २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

अभ्यासक्रमाचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ मार्च रोजी संपन्न झाले. या वेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, तसेच विद्यापीठाचे माजी वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षक डॉ. सुब्बाराव आणि प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थी अवस्थेत ताण-तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित करत जीवन जगण्याची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यापीठ विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी समजून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमाद्वारे सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा, मन स्थिर ठेवून योग्य दिशेने विचार कसे घडवावेत हे शिकता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच स्वतःही या अभ्यासक्रमातील क्रिया नियमित करत असल्याने मनातील विचारांवर नियंत्रण ठेवता येऊन आनंदी जीवन जगण्यास मदत होत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. या अभ्यासक्रमाचे विविध टप्पे असून सध्या विद्यार्थ्यांना मूलभूत अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक निर्णय घेण्यासही मदत होईल, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. सुब्बाराव यांनी सांगितले की, विद्यापीठात आर्ट ऑफ लिव्हिंग उपक्रमाची सुरुवात मे २००२ मध्ये झाली होती. त्या वेळी केवळ २३ जणांनी प्रशिक्षण घेतले होते, ज्यामध्ये या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूंच्या कुटुंबातील चार सदस्य तसेच विद्यापीठाचे तीन संचालक सहभागी होते. पुढील काळात या उपक्रमाचा विस्तार होत जाऊन विद्यापीठात शंभरहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उपक्रमाचा वटवृक्ष होऊन हा दैदीप्यमान कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

श्री. श्रीकांत पंडित यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, या अभ्यासक्रमाद्वारे ऊर्जा विकास, क्षमता वृद्धी, आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण यांचा विकास घडविला जातो. तसेच जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन यश मिळविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे आणि  डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले

सूत्रसंचालन व आभार डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले, तर अनुराग कोंडे यांनी प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित यांचा परिचय करून दिला. या अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांसह कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.






केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या वाढदिवसानिमित्त वनामकृवि, परभणी येथे “शिव वृक्ष मित्र” विशेष वृक्षारोपण उपक्रम

माननीय ना. श्री. शिवराज सिंह चौहान जी यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भारताचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या वाढदिवसानिमित्त “प्रेम सेवा संकल्प दिवस” म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे “शिव वृक्ष मित्र” वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक ५ मार्च रोजी उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानविद्या विभाग व उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

केंद्रीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी हे निसर्ग व पर्यावरण संरक्षणाला पवित्र सेवा मानतात आणि दररोज एक वृक्ष लावण्याचा प्रेरणादायी संदेश देतात. त्यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन तसेच पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीच्या उद्देशाने उद्यानविद्या विभाग व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रांगणात देशभरातील विविध संस्थांकडून संकलित करण्यात आलेल्या आंब्याच्या ५५ विविध जातींच्या रोपांचा मातृवृक्ष (मदर ब्लॉक) स्थापन करून वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे भविष्यात उत्कृष्ट गुणवत्तेच्या आंबा वाणांच्या संवर्धन व प्रसारास चालना मिळणार आहे.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय कृषि क्षेत्र नवकल्पना, शाश्वतता आणि विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे नमूद केले. त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करत केंद्रीय कृषिमंत्र्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यश लाभो, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कल्याण व कृषि क्षेत्राची प्रगती अधिक वेगाने होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते आंब्याच्या विविध जातींची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर तसेच उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा प्राध्यापक व प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवरांची यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली तसेच समाजात वृक्षसंवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.







Wednesday, March 4, 2026

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीद्वारे भूमातेचे आरोग्य समृद्ध करावे..... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३ मार्च २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे उपक्रम प्रभावीपणे राबवून भूमाता इतकी समृद्ध करावी की बाह्य अन्नघटकांची आवश्यकता भासू नये, असे प्रतिपादन केले. गुजरातमध्ये माननीय राज्यपाल महोदयांच्या प्रेरणेने सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे मॉडेल यशस्वीरीत्या राबविण्यात आले असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठे व माफसू विद्यापीठ यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०२६ महिन्यात महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत टप्प्याटप्प्याने शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून राज्यातील जमिनीचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले व हा उपक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवसारी कृषि विद्यापीठ (गुजरात) अंतर्गत एन. एम. कृषी महाविद्यालयातील कृषीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. के. ए. शाह उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीतील पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पिकांच्या योग्य वाढ व विकासासाठी आवश्यक १७ अन्नद्रव्ये, त्यांचे स्रोत जसे की शेणखत, कंपोस्ट, पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत, वर्मी कंपोस्ट इत्यादींबाबत माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीत पोषक तत्त्वांची पूर्तता करून उत्पादकता व गुणवत्तेत वाढ करण्याचे प्रभावी उपाय त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रातून शेतकरी व सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी तसेच विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम हिंदी भाषेत पार पडला.





Tuesday, March 3, 2026

मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रांना भेट दिली.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित “शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय हिवाळी शाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमास ICAR, नवी दिल्ली येथील सहसंचालक (मानव संसाधन विकास) डॉ. सीमा जग्गी (ऑनलाईन), शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनानुसार व अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे व उद्योगांना शैक्षणिक भेटींचे आयोजन करण्यात आले.

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी नाहेप (NAHEP) केंद्र येथे डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर १ मार्च रोजी विद्यापीठाच्या उती संवर्धन केंद्रास भेट देऊन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. कुलदीप शर्मा व वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. राजकुमार वाडीकर यांनी रोगमुक्त केळी रोपांच्या निर्मितीसाठी उती संवर्धन प्रक्रियेचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

दिनांक २ मार्च रोजी दिवशी रेशीम संशोधन केंद्रास भेट देऊन प्रभारी अधिकारी डॉ. धीरज कदम, डॉ. संजय बोकन व डॉ. धनंजय मोहोड यांनी रेशीम उत्पादन प्रक्रियेची माहिती दिली. तसेच अन्न तंत्र महाविद्यालयातील कॉमन इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत उभारण्यात आलेल्या गुळ उत्पादन केंद्रास भेट देण्यात आली. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी उद्योजकता विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले, तर डॉ. कैलास गाढे यांनी बेकरी उत्पादनातील संधींबाबत माहिती दिली.

या सर्व भेटी दरम्यान विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.

या २१ दिवसीय हिवाळी शाळेमुळे वनस्पती मायक्रोबायोम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीस चालना मिळणार असून संशोधक व प्रशिक्षणार्थींना आधुनिक जैव-इनपुट्स संवर्धन तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान प्राप्त होणार आहे..



नाहेप (NAHEP) केंद्र 



उती संवर्धन केंद्र 





कॉमन इन्क्युबेशन सेंटर






रेशीम संशोधन केंद्र 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभआशीर्वादात धुलीवंदन उत्साहात साजरे




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभआशीर्वाद, प्रेरणादायी उपस्थिती व मार्गदर्शनाखाली धुलीवंदनाचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि रंगतदार वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

या मंगल प्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी माननीय कुलगुरूंना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन धुलीवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अर्पण केल्या. सर्वांनी एकमेकांना रंग लावून बंधुभाव, स्नेह, ऐक्य आणि परस्पर विश्वासाची भावना अधिक दृढ केली. रंगांच्या उधळणीत आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी माननीय कुलगुरूंनी उपस्थित सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देताना सांगितले की, सण-उत्सव हे केवळ आनंद व्यक्त करण्याचे माध्यम नसून परस्पर स्नेह, सहकार्य आणि एकात्मतेची नाळ अधिक दृढ करण्याची सुवर्णसंधी असते. ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून शेतकरी समुदायामध्ये तसेच विद्यापीठ परिवारात सदैव आनंद, सौहार्द, प्रगती, शैक्षणिक उत्कर्ष आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, अशी त्यांनी मंगलकामना व्यक्त केली.

या उत्सवामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. रंगोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठ परिवारातील आपुलकी, एकात्मता, सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाल्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले.