Wednesday, February 18, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. दादासाहेब शिंदे यांच्या प्रक्षेत्रास भेट; आयएआरआय नवोन्मुख शेतकरी पुरस्काराबद्दल अभिनंदन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन येथील शेतकरी मा. श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांच्या प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

श्री. शिंदे यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२६ साठी जाहीर झालेल्या मानाच्या आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या संपूर्ण प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रक्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या गुलाब शेतीसह जीप्सोलीना व स्नॅपड्रॅगन या नाविन्यपूर्ण फुलपिकांच्या शेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी माननीय कुलगुरू म्हणाले की, हा पुरस्कार अत्यंत मानाचा असून तो मिळणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या प्रसाराची जबाबदारी आणखी वाढते. आज शेतकरी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसत आहे. अशा प्रगतशील शेतकऱ्यांचे कार्य इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी बांधवांशी माननीय कुलगुरूंनी संवाद साधला.

या भेटीप्रसंगी माननीय कुलगुरूंयांच्यासह महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषद, पुणे येथील माजी महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, एमजीएम परिसराचे संचालक श्री. धापके, कृषि विज्ञान केंद्रच्या प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे व डॉ. संजुला भावर यांची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू व विस्तार शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कारासाठीचा अर्ज भारतीय कृषि संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून एका शेतकऱ्याची निवड करण्यात येते. त्यानुसार, महाराष्ट्रातून यावर्षीच्या पुरस्कारासाठी  श्री. दादासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क शेतकरी असून त्यांनी फुलशेती, फळबाग लागवड, जैविक निविष्ठा निर्मिती, शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर, सुधारित व शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब, जिल्ह्यात नाविन्यपूर्ण फुलपिकांची लागवड, पॉलिहाऊसमधील फुलशेती, मृदा व जलसंधारणाचे उत्कृष्ट नियोजन यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.

यासोबतच त्यांनी विद्यार्थी व समाजातील विविध घटकांना वेळोवेळी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केव्हीके तसेच जिल्ह्यातील विविध विभागांसोबत नियमितपणे कार्य करून इतर शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी त्यांना २०२६ चा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित पुसा कृषि विज्ञान मेला दरम्यान देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.








शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच – माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न; वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. शेती विकासासाठी अजूनही अधिक खोलवर जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. शेतीच्या विविध कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर असून, त्यांच्या श्रमांमध्ये बचत होईल असे संशोधन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच झाली आहे. कृषि विभागामार्फत सध्या ५० हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन व इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी” या उपक्रमांतर्गत फुले कृषि महोत्सव–२०२६ (थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शन) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषि परिषदेच्या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे), कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले व डॉ. शिल्पा पाटील, पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले की, विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून केली जाणार आहे. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरावर विद्यापीठाचा विशेष भर राहील. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची दालने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. फुले कृषि महोत्सवामध्ये आयोजित विविध पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स तसेच महाबीज व कृषि विभागाच्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रदर्शनादरम्यान माननीय कृषिमंत्री तसेच कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), प्राध्यापक, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच १२ हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

सौजन्य – डॉ. सचिन सदाफळ, जनसंपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी 





पीक विविधतेद्वारे शाश्वत शेतीकडे वाटचाल : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या फळबाग संशोधन केंद्रात शेतकरी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग संशोधन केंद्र (हिमायत बाग) येथे पीक विविधता पथदर्शी प्रकल्प तसेच एकात्मिक फलोत्पादन व रोपवाटिका विकास कार्यक्रम याअंतर्गत शेतकरी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्तपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते.

अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत एकात्मिक शेती पद्धती योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पीक विविधता पथदर्शी प्रकल्पाच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पीक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करताना, केवळ एकाच पिकावर अवलंबून राहिल्यास हवामान बदलामुळे होणारे नुकसान अधिक तीव्र स्वरूपाचे होते, असे स्पष्ट केले. कापूस किंवा सोयाबीनसारख्या सलग लागवड होणाऱ्या पिकांऐवजी पर्यायी पिकांचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पीक पद्धतीत संपूर्ण बदल न करता लहान-लहान सुधारणा करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवणे तसेच पर्यावरणपूरक शेती करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतावरच संशोधन प्रयोग राबविणे ही काळाची गरज असून भविष्यातील संशोधन त्या दृष्टीने व्हावे, असे त्यांनी सूचित केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या कापूस, मका व सोयाबीन ही प्रमुख पिके असून पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी भुईमूग, बाजरी, रब्बी ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांचे क्षेत्र लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी उपयुक्त पीक पद्धती सुचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी रब्बी ज्वारी व करडईसारख्या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा शेती पद्धती विकसित करण्यावर भर दिला. डॉ. एस. बी. पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विविध आंतरपीक व पीक पद्धतींचा आढावा सादर केला, तर डॉ. संजय पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन विकासाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण जाधव, मुख्य कृषी विद्यावेत्ता (एकात्मिक शेती पद्धती योजना) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. रवी नायनवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. सुदाम शिराळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी अधिकारी व संशोधक उपस्थित होते.




 

Tuesday, February 17, 2026

बारामती कृषि विज्ञान केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; शेतकरीहितासाठी परस्पर सहकार्यावर भर

 कृषि विकास प्रतिष्ठानचे माननीय चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांनी केले स्वागत

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे भेट दिली. या प्रसंगी कृषि विकास प्रतिष्ठान, बारामती चे माननीय चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांनी माननीय कुलगुरूंचे स्वागत केले. माननीय कुलगुरूंसमवेत कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे तांत्रिक सल्लागार डॉ. ए. के. मिश्रा उपस्थित होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख समन्वयक डॉ. डी. ए. शिंदे, संचालक श्री. निलेश नलावडे, विषय विशेषज्ञ प्रा. एस. व्ही. करंजे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या वाढीव उत्पादनाबाबत केंद्रातील शास्त्रज्ञांनी माहिती दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे विकसित तुरीच्या ‘गोदावरी’ वाणावर करण्यात आलेल्या AI आधारित प्रयोगांत उत्कृष्ट उत्पादन मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच AI आधारित ऊस व मका पिकांवरील प्रयोगांची माहितीही माननीय कुलगुरूंना देण्यात आली.

याशिवाय कृषि विज्ञान केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या रोपवाटिका, गोवंश संवर्धन व गुणवत्ता वृद्धी यांसारख्या उपक्रमांची माननीय कुलगुरूंनी पाहणी केली. या भेटीदरम्यान शेतकरी सेवेसाठी परस्पर सहकार्य, विद्यापीठीय तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच विविध सहकार्यात्मक उपक्रम राबविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

दरम्यान तांत्रिक सल्लागार डॉ. ए. के. मिश्रा यांनी पावसावर अवलंबून (रेनफेड) क्षेत्रांच्या विकासासाठी राष्ट्रीय पावसावर आधारित क्षेत्र प्राधिकरण (NRAA) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या सहकार्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचून उत्पादनक्षमता व उत्पन्नवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








Visit of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani to Krishi Vigyan Kendra, Baramati; Emphasis on Mutual Collaboration for Farmers’ Welfare

Warm welcome extended by Hon’ble Chairman of Krushi Vikas Pratisthan, Shri Rajendra Pawar

Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Prof. (Dr.) Indra Mani, visited the Krushi Vigyan Kendra, Baramati on 17 February 2026. On this occasion, Hon’ble Chairman of Agriculture Development Trust, Baramati, Shri Rajendra Pawar, extended a warm welcome to the Hon’ble Vice Chancellor.

Dr. A. K. Mishra, Technical Advisor to the National Rainfed Area Authority under the Ministry of Agriculture and Farmers Welfare, was present along with the Hon’ble Vice Chancellor. Also present were Dr. D. A. Shinde, Senior Scientist and Head of the Krushi Vigyan Kendra, Shri Nilesh Nalawade, Director, Subject Matter Specialist Prof. S. V. Karanje, and other dignitaries.

During the visit, the Hon’ble Vice Chancellor reviewed in detail various activities being implemented through the Krushi Vigyan Kendra. Scientists of the center shared information on the increased crop productivity achieved by farmers through innovative experiments based on Artificial Intelligence (AI). It was highlighted that AI-based experiments conducted on the ‘Godavari’ pigeon pea variety developed by Vasantrao Naik Marathwada Agricultural University have resulted in excellent yields. Information was also shared on AI-based experimental work on sugarcane and maize crops.

In addition, the Hon’ble Vice Chancellor inspected various initiatives undertaken by the Krushi Vigyan Kendra, including nurseries, cattle breeding, and genetic quality improvement programs. Detailed discussions were held on mutual cooperation for farmer services, dissemination of university technologies, training programs, joint certificate courses, and the implementation of collaborative initiatives.

Meanwhile, Technical Advisor Dr. A. K. Mishra provided comprehensive information on various programs being implemented under the National Rainfed Area Authority (NRAA) for the development of rainfed regions.

It was expressed with confidence that this collaboration will effectively deliver modern technologies to farmers, thereby significantly enhancing productivity and farmers’ income.



Monday, February 16, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत तरोडा येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या सहाय्याने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तरोडा (ता. व जि. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिरात परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून ऊसाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बेने प्रक्रिया, जैविक खते व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याविषयी मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जमिनीचे आरोग्य व पीक पोषणाशी संबंधित शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरणही करण्यात आले.

मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना व प्रशिक्षण शिबिराची प्रस्तावना मांडत रासायनिक खतांच्या वापराचा जमिनीवरील परिणाम आणि पिकांची उत्पादकता याबाबत माहिती दिली. रासायनिक खतांचा संतुलित व कमी वापर, माती परीक्षणाचे महत्त्व आणि जैविक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य कसे सुधारता येईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कौसडीकर यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण शिबिरात केवळ जैविक खतांचे महत्त्व विशद करण्यात आले नाही, तर विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक खत (एनपीके कन्सोरशियम), सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त व विद्राव्य खते प्रतिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्याचबरोबर या जैविक खतांचा योग्य वापर, पद्धत व प्रमाण याबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

तरोडा परिसरातील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना विद्यापीठातील सेवा व उपलब्ध निविष्ठांची माहिती देत कृषि विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर श्री. उद्धव शेळके यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सध्याच्या रब्बी हंगामातील पिकांतील पोषणविषयक समस्यांचे निराकरण करून घेतले.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ग्लोबल विकास ट्रस्टला भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथील ग्लोबल विकास ट्रस्टला भेट दिली. यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.

ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक कृषी विषयक उपक्रम राबविण्यात येत असून, त्यांना विद्यापीठाकडून तांत्रिक पाठबळ पुरविण्यात येत आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्यात यापूर्वी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

या भेटीदरम्यान भविष्यात संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. फळबाग लागवड वाढविणे, रेशीम उद्योगास चालना देणे तसेच शेतीतील वैविध्यता जपण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर मान्यवरांमध्ये एकमत झाले. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited Global Development Trust.

 

The Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, visited the Global Development Trust at Sirsaala (Taluka Parli, District Beed) on 16 February 2026. On this occasion, the Trust’s Founder President, Mayank Gandhi, welcomed him.

Through the Global Development Trust, several agriculture-related initiatives are being implemented in various villages of Parli taluka, for which technical support is being provided by the University. A Memorandum of Understanding has already been signed earlier between Vasantrao Naik Marathwada Agricultural University and the Global Development Trust.

During the visit, detailed discussions were held on undertaking joint initiatives in the future. The dignitaries reached a consensus on working together to promote orchard development, boost sericulture, and preserve diversification in agriculture. It was expressed that this collaboration would help increase farmers’ income and accelerate sustainable development in rural areas.


वनामकृवित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ निमित्त भव्य आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंतीचे सुवर्ण जयंती दिक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  हे राहणार. त्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येणार असुन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठातील विद्यार्थीप्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले आहे.