Tuesday, February 3, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार

 ३३ वर्षांच्या विद्यापीठ सेवेनंतर डॉ. मदन पेंडके यांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. मदन पेंडके हे दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या सेवाकार्यपूर्ती व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण  वैद्य, डॉ. शिवाजीराव शिंदे, डॉ. विश्वनाथ खंदारे, मृदा व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरीहर कौसडीकर, उपसंचालक संशोधन डॉ. गजेंद्र जगताप, तसेच डॉ. मदन पेंडके कुटुंबीय श्रीमती मंजिरी पेंडके व कु. ईशा पेंडके उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते डॉ. मदन पेंडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी डॉ. पेंडके यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील जिद्द, चिकाटी, प्रामाणिक परिश्रमशीलता व सदैव सकारात्मक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक प्रतिमेला भरीव योगदान लाभले असून विद्यापीठाची ओळख अधिक उजळण्यास मोलाची मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. पेंडके यांनी आपल्या कर्तृत्वातून सहकाऱ्यांसह तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण केला असून त्यांचा अनुभव व मार्गदर्शन भविष्यातही समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अखेरीस, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान व यशस्वी वाटचालीसाठी माननीय कुलगुरूंनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. पेंडके यांनी कोरडवाहू शेती संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. शेततळ्यांचे आकारमान निश्चिती, मुळस्थानी जलसंधारण पद्धती, हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती तसेच विहीर व कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. मेघा जगताप, डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील व डॉ. अनिकेत वाईकर यांनीही आपल्या भाषणांतून डॉ. पेंडके यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडले.

कृषि विद्यापीठातील ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक (कृषि अभियांत्रिकी), वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा व जलसंधारण), उपसंचालक (संशोधन), संशोधन संपादक तसेच कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी म्हणून प्रभावी कार्य केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. मदन पेंडके यांनी विद्यापीठातील ३३ वर्षांच्या सेवेत शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त होत असल्याने वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

या कार्यक्रमास कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मधुकर मोरे यांनी केले.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा अकोला येथील राज्यस्तरीय मृदविज्ञान परिसंवादात उज्ज्वल ठसा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने उत्कृष्ट संशोधनास तीन राज्यस्तरीय पारितोषिके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील मृदविज्ञान विभागाने अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मृदविज्ञान परिसंवादात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने मृदविज्ञान विभागातील ७ शास्त्रज्ञ व १५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सक्रिय सहभाग नोंदविला. या परिसंवादात विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाच्या आचार्य (पीएच.डी.) पदवीच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांपैकी निकिता परदेशी, प्रियांका नखाते व ओमकार भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी राज्यस्तरीय पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे ओमकार भोसले यांचे मार्गदर्शक असून, डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रियांका नखाते यांना तसेच डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी निकिता परदेशी यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले. तसेच पदव्युत्तर पदवीदरम्यान संशोधनात सहभागी असलेल्या इतर मार्गदर्शक शास्त्रज्ञांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

या यशामध्ये डॉ. प्रविण वैद्य यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, परिसंवादात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेले प्रोत्साहन तसेच मृदविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सततचा पाठपुरावा यांचा विशेष वाटा आहे. याशिवाय दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी सादरीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरण करणे शक्य झाले.

या राज्यस्तरीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील मृदविज्ञान विषयाचे आचार्य व पदव्युत्तर स्तरावरील सुमारे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तीन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी निवड होणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल राज्यातील मृदविज्ञान परिवारातर्फे, तसेच कृषि विद्यापीठाच्या विविध स्तरांतून, परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्सच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे व मृदविज्ञान विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.


Monday, February 2, 2026

विद्यार्थ्यांना औद्योगिक व व्यावसायिक अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ची निवड

उद्योग–शैक्षणिक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्यविकासाला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

नवीन शैक्षणिक धोरण–२०२० मधील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थ्यांच्या कौशल्याधिष्ठित शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ (Professor of Practice) या पदावर उद्योग, सेवा व व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवी व नामवंत तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे.

यासंदर्भात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य (पीएच.डी.) स्तरावरील विद्यार्थ्यांना औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव शैक्षणिक प्रक्रियेशी प्रभावीपणे जोडला जाणार आहे. यामुळे अध्यापन, संशोधन व विस्तार कार्य अधिक व्यवहाराभिमुख, नाविन्यपूर्ण व उद्योगाभिमुख होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्यविकासास चालना मिळेल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवसंशोधनाची वृत्ती व समस्या-आधारित विचारक्षमता विकसित होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल. परिणामी, विद्यापीठातून तयार होणारे मनुष्यबळ समाज व उद्योगक्षेत्राच्या गरजांना समर्थपणे प्रतिसाद देणारे ठरेल.

याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांचा कार्यकाळ एक वर्षाचा असून हे पद मानद स्वरूपाचे राहील. सदर पद ‘फंक्शनल पोस्ट’ म्हणून कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून संबंधित तज्ज्ञ विद्यापीठातील अध्यापन प्रक्रियेला बळकटी देतील. ते अध्यापन सहाय्य, अभ्यासक्रम समृद्धी, कौशल्यविकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण, उद्योग–संवाद वृद्धिंगत करणे, तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व उद्योजकतेस चालना देणारे व्यावसायिक मार्गदर्शन देण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांची स्पर्धात्मक क्षमता वाढीस लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या विद्वत परिषद व कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनुसार विविध विद्याशाखांमध्ये ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ म्हणून पुढीलप्रमाणे तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. कृषि विद्याशाखा – डॉ. अनिल रमेश माजगांवकर, डॉ. नरेंद्रकुमार प्रकाश पाटील; अन्नतंत्रज्ञान विद्याशाखा – डॉ. प्रबोध एस. हळदे, डॉ. उमेश कांबळे; कृषि अभियांत्रिकी विद्याशाखा – डॉ. सय्यद इस्माईल, श्री. चंद्रकांत पुरारे; सामुदायिक विज्ञान विद्याशाखा – श्रीमती आशा शिवाजीराव भिसे, डॉ. मेघा बागुल; उद्यानविद्या विद्याशाखा – श्री. अभयकुमार बाजीराव कालुंके, श्री. गणेश बाबर; कृषि जैवतंत्रज्ञान विद्याशाखा – डॉ. योगिता अरुण देशमुख; कृषि व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखा – श्री. विजयकुमार चोले, श्री. अमोल मारुती धवन; तसेच पशु व दुग्ध व्यवसाय विद्याशाखा – श्री. बालासाहेब परसराम गित्ते, श्री. माणिक प्रभुजी रासवे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे यांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ उपक्रमामुळे विद्यापीठ व उद्योग क्षेत्र यांच्यात सुसंवाद व सहकार्य वृद्धिंगत होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक गरजांनुसार सक्षम घडविण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

To provide students with industrial and professional exposure, Vasantrao Naik Marathwada Agricultural University has appointed a “Professor of Practice.”

 

Through industry–academia collaboration, comprehensive skill development of students will be promoted – Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani.

 

In accordance with the guidelines of the New Education Policy–2020, experienced and renowned experts from industry, services, and professional sectors have been appointed as “Professors of Practice” at Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, to promote skill-based education among students.

In this regard, Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani stated that this initiative will effectively integrate practical exposure from the industrial and professional sectors with the academic process for undergraduate, postgraduate, and doctoral (Ph.D.) students of the University. This will make teaching, research, and extension activities more practice-oriented, innovative, and industry-focused, thereby promoting the overall skill development of students.

He further emphasized that the initiative will foster entrepreneurship, an innovative mindset, and problem-based thinking among students, significantly enhancing their employability. Consequently, the human resources developed by the University will be well-equipped to respond effectively to the needs of society and the industry sector.

Providing further details, Director of Instruction Dr. Bhagwan Asewar stated that the tenure of the appointed experts will be for one year and the positions will be on an honorary basis. These posts will function as “functional posts.” Through this initiative, the concerned experts will strengthen the teaching–learning process of the University. They will make significant contributions in academic support, curriculum enrichment, skill development and capacity-building training, strengthening industry–academia interaction, and providing professional guidance to students to enhance employability and promote entrepreneurship. This, he explained, will not only ensure the holistic development of students but also enhance their competitive capabilities.

As per the approval of the University’s Academic Council and Executive Council, the following experts have been appointed as “Professors of Practice” in various faculties:

  • Faculty of Agriculture – Dr. Anil Ramesh Majgaonkar, Dr. Narendrakumar Prakash Patil
  • Faculty of Food Technology – Dr. Prabodh S. Halde, Dr. Umesh Kamble
  • Faculty of Agricultural Engineering – Dr. Syed Ismail, Shri Chandrakant Purare
  • Faculty of Community Science – Smt. Asha Shivajirao Bhise, Dr. Megha Bagul
  • Faculty of Horticulture – Shri Abhaykumar Bajirao Kalunke, Shri Ganesh Babar
  • Faculty of Agricultural Biotechnology – Dr. Yogita Arun Deshmukh
  • Faculty of Agribusiness Management – Shri Vijaykumar Chole, Shri Amol Maruti Dhavan
  • Faculty of Animal and Dairy Science – Shri Balasaheb Parsaram Gite, Shri Manik Prabhuji Rasve

For the effective implementation of this initiative, Dr. Sachin More, Head of the Department of Agricultural Economics, has been appointed as the Nodal Officer. It is expected that the “Professor of Practice” initiative will strengthen dialogue and collaboration between the University and the industry sector, thereby helping to equip students with skills aligned to contemporary needs.




Sunday, February 1, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ज्वारी संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्रास भेट देऊन तेथील चालू संशोधन उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान ज्वारी पिकातील नवीन वाण व संकरीत (हायब्रिड) विकास, उत्पादनक्षमता वाढविणारे संशोधन तसेच ज्वार विविधता पॅनेल (Sorghum Diversity Panel) अंतर्गत सुरू असलेल्या संशोधन कार्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली.

माननीय कुलगुरूंनी ज्वारी पिकाचे बदलत्या हवामानातील महत्त्व अधोरेखित करताना, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे, कीड-रोग प्रतिकारक्षम व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे वाण विकसित करण्यावर भर दिला. तसेच संशोधन हे केवळ प्रयोगशाळा किंवा शेतमर्यादित न राहता, त्याचे निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान पदव्युत्तर (पीजी) व पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून शेतकरीकेंद्रित, समस्या-आधारित व व्यवहार्य संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत माननीय कुलगुरूंनी महत्वपूर्ण  मार्गदर्शन केले. संशोधन, विस्तार व शेतकरी यांच्यात सुसूत्रता निर्माण होणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी श्रीमती जयश्री मिश्रा, ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी व ज्वार पैदासकार डॉ. अंबिका मोरे, कृषि सहायक श्री इंगळे तसेच संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली.

माननीय कुलगुरूंच्या या प्रेरणादायी व मार्गदर्शक भेटीमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ज्वारी संशोधन केंद्राच्या वतीने त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास भेट

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रावर सुरू असलेल्या विविध संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी माननीय कुलगुरूंनी करडई पिकाच्या वाणनिर्मिती कार्यक्रमात विशेष रुची दाखवून एफ–१ संकरांची निर्मिती व मूल्यांकन, तसेच विभाजन पिढ्यांची प्रगती व निवड प्रक्रियेबाबत सखोल माहिती घेतली. तसेच जैवतंत्रज्ञान विभाग (DBT) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या नेटवर्क प्रकल्पातील कार्यवाहीचाही त्यांनी आढावा घेतला.

यासोबतच ४०० विदेशी व देशी गुणविशेषाधारित करडई ओळींच्या मूल्यांकनाची पाहणीही माननीय कुलगुरूंनी केली. करडई पिकामध्ये अधिक तेलांश असलेले, जैविक ताणतणावांना प्रतिकारक्षम तसेच लवकर पक्व होणारे वाण विकसित करण्याबाबत त्यांनी संशोधकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनामुळे करडई संशोधनास निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल यांनी व्यक्त केला. तसेच या प्रकल्पांतर्गत २५० विविध करडई जर्मप्लाझम ओळींचे फिनोटायपिंग कार्य सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. माननीय कुलगुरूंच्या भेटीबद्दल व प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल केंद्रातील शास्त्रज्ञांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. व्ही. आर. घुगे उपस्थित होते.



Saturday, January 31, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘आविष्कार–२०२६’ संशोधन स्पर्धेत संशोधन सादरीकरण

विद्यार्थ्यांच्या संशोधन सादरीकरणाला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; आत्मविश्वास व सकारात्मकतेचा संदेश

सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला


महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रतजी यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.

आविष्कार–२०२६’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेअंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आल्या —

१) मानविकी, भाषा व ललित कला

२) वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

३) शुद्ध विज्ञान

४) कृषि व पशुसंवर्धन

५) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

६) वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

सदर स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी ८६७ संशोधक विद्यार्थ्यांचे पोस्टर (भित्तीपत्रके), मॉडेल्स व विविध प्रयोगांचे सादरीकरण घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रयोग दालनास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली.

यावेळी त्यांच्या समवेत आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर) आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी) उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी भित्तीपत्रके, मॉडेल्स व प्रयोगांच्या सादरीकरण दालनास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षकांसमोर सादरीकरण करताना नेमकी व मुद्देसूद मांडणी करावी, पूर्वतयारी ठेवून आत्मविश्वासपूर्ण उत्तरे द्यावीत तसेच विचार व शब्द यांचा योग्य समन्वय साधावा, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संशोधन कारकिर्दीची सुरुवात असून भविष्यात त्याचा निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनात सहभाग घेऊन संशोधन सादर केल्याबद्दल त्यांनी सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्या निवास, भोजन, सुरक्षितता व इतर सोयीसुविधांबाबतही माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी आनंदी व तणावमुक्त जीवन जगावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. स्पर्धेत सहभागी होताना निकालाची चिंता न करता संपूर्ण क्षमतेने सादरीकरण करावे, असे आवाहन करत अनेक सादरीकरणांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन स्पष्टपणे दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले. अशा संशोधन विषयांचा विद्यापीठ पातळीवरही विचार करून निवड करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. या माध्यमातून मराठवाडा विभागातील शैक्षणिक व संशोधन संस्कृती अधिक बळकट होईल, अशी आशा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

पोस्टर (भित्तीपत्रके, मॉडेल्स व विविध प्रयोग) सादरीकरणाचे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विषय गटात पदवी (UG) मधून १५, पदव्युत्तर (PG) मधून १२ आणि पोस्ट पीजी (PPG) मधून १० — अशा सरासरी ३७ विद्यार्थ्यांची पोडियम सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. यामध्ये मानविकी, भाषा व ललित कला (३७), शुद्ध विज्ञान (३७), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (३७), वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा (३९), वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र (३९) तसेच कृषि व पशुसंवर्धन (४२) अशा एकूण २३१ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता.

दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी पोस्टर सादरीकरणातून निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे पोडियम सादरीकरण घेण्यात आले. पोडियम सादरीकरणाच्या प्रारंभी माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परीक्षकांची बैठक पार पडली.

या बैठकीस संमेलनाचे सहनिमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ आविष्कार प्रभारी तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर), सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य (परभणी), संमेलनाच्या Oversee and Study the Organisation उपसमितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ. सुनील पाटील, संमेलनाच्या वित्त व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा बाटू विद्यापीठ, लोणेरे येथील डॉ. संजय खोब्रागडे, पोडियम समितीचे अध्यक्ष डॉ. गजानन भालेराव यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील परीक्षक समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान डॉ. सुनील पाटील यांनी पोडियम सादरीकरणात अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

पोडियम सादरीकरणाचे मूल्यांकन संबंधित विषयांतील राष्ट्रीय पातळीवरील प्रत्येकी सहा तज्ज्ञ परीक्षकांच्या चमूने केले. सहा विषय गटातून प्रत्येकी आठ, अशा एकूण ४८ संशोधक विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार तर सहाही गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६ विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३० हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले

प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त विद्यार्थी

मानविकी, भाषा व ललित कला विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या इनामदार झफीराह झहीर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच पणगेकर मनश्री यांनी प्रथम पुरस्कार मिळवला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नवले मनीषा यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रणव सुनील कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या बाणे चैताली यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या जैन वीरा सुनील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शुद्ध विज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या वर्मा प्रमोद यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्याच परमार ऑस्टिन अश्विन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या मिश्रा राहुल मनोजकुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या तिवारी अनुज कुमार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर एचएसएनसी विद्यापीठाच्या अमान मिर्झा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अजिंक्य पोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या विश्वकर्मा दिवाकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या शेख माझ मोहम्मद यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पोस्ट पीजी स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रोशन चांदवाणी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला.

वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र विभागामध्ये पदवीपूर्व स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या क्षीरसागर चिन्मयी यांनी प्रथम पुरस्कार मिळवला. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या काटकर मयुरेश यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तसेच पोस्ट पीजी स्तरावर मुंबई विद्यापीठाच्या नाथानी खुशाली यांनी प्रथम क्रमांक मिळवला.




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेत विजेत्यांचे पारितोषिक वितरण संपन्न

सुरवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण 

आविष्कार’ संशोधन स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह

प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २८ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित आविष्कार–२०२६ अंतर्गत १८ वे महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन सादरीकरण संपन्न झाले.  या संशोधन स्पर्धेत विजेत्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी पारितोषिके वितरीत करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित पवार यांच्या प्रतिमेस वंदन करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे वाचन सभागृहात करण्यात आले.

बक्षीस वितरणास अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते.  व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह, प्रगतशील शेतकरी पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड, लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, माननीय राज्यपाल नियुक्त देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सदस्य डॉ. प्रिया गेडाम, डॉ. दयाराम पवार, डॉ. विलास अवारी, डॉ. विनायक धुलप तसेच वित्त समितीचे सदस्य डॉ. संजय खोब्रागडे व डॉ. जयंत चौधरी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि डॉ. विश्वनाथ खंदारे यांची उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माननीय राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) यांचे प्रधान सचिव माननीय डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से.), माननीय राज्यपालांच्या शिक्षण विभागाचे अवर सचिव माननीय श्री. विकास कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, माननीय राज्यपाल नियुक्त वित्त व्यवस्थापन उपसमितीचे अध्यक्ष श्री. विकास देसाई, डॉ. चारुशीला गायके तसेच श्री. बोधीकिरण सोनकांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले.

या संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील कृषि  व अकृषि अशा एकूण २६ विद्यापीठांतील ९०७ संशोधक विद्यार्थी नोंदणी केली होती या पैकी ८६७ संशोधक विद्यार्थी त्यांचे संघ व्यवस्थापक व विद्यार्थी कल्याण संचालक, संपूर्ण भारतातून त्या त्या विषयातील (३६ तज्ञ) परीक्षक अशा एकूण १३० प्रतिनिधीसह विविध विद्यापीठांचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १५०० हून अधिक सहभागी झाले. यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक, सातारा, अमरावती, अकोला, जळगाव, नांदेड, राहुरी, सोलापूर, गडचिरोली आदी भागांतील विद्यापीठांनी सहभाग नोंदविला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण विद्यापीठात शोककळा पसरल्याची भावना व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून केवळ संशोधक विद्यार्थ्यांच्या औपचारिक संशोधन स्पर्धा घेण्यात आल्याचे नमूद केले. आजचा बक्षीस वितरण समारंभ हा सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. ए. के. सिंग (भात पिके तज्ज्ञ) आणि पद्मश्री डॉ. श्रीरंग (दादा) लाड (कापूस तज्ज्ञ) यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘आविष्कार’ हा संपूर्ण कार्यक्रम माननीय लोकभवन यांच्या रूपरेषेनुसार व त्यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आल्याचे नमूद करताना माननीय कुलगुरूंनी या स्पर्धेत सादर करण्यात आलेले संशोधन प्रकल्प अत्यंत उच्च दर्जाचे असल्याचे सांगितले. अनेक प्रकल्प इतके दर्जेदार होते की प्रथम व द्वितीय क्रमांक निश्चित करताना परीक्षकांनाही संभ्रम निर्माण झाला. तरीही देशभरातून सहभागी झालेल्या ३६ विविध परीक्षकांच्या सखोल निरीक्षणानंतर ठरलेल्या निकषांनुसार निकाल जाहीर करण्यात आला.

‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची परंपरा स्वामी विवेकानंद यांच्या १२ जानेवारी जन्मदिनी त्यांच्या विचारांची युवकांमध्ये रुजवणूक करण्याच्या उद्देशाने, माननीय लोकभवन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे. मात्र परभणी येथे निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत घेण्यास माननीय लोकभवन यांनी अनुमती दिल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नवोपक्रमशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘आविष्कार’ हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी एकत्र येऊन आपले संशोधन सादर करीत असल्यामुळे त्यांची संशोधक वृत्ती विकसित होत असून ज्ञानवृद्धीस चालना मिळत आहे.

विद्यार्थ्यांना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, केवळ विद्या प्राप्त केल्याने ज्ञान मिळते; मात्र विद्वान होण्यासाठी विनम्रता आवश्यक आहे. मिळवलेल्या ज्ञानाचा समाजहितासाठी योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात विद्यार्थ्यांच्या हातात अनेक महत्त्वपूर्ण संस्थांची जबाबदारी येऊ शकते, त्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पद्मश्री माननीय डॉ. ए. के. सिंह यांनी सुरवातीला माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सांगितले की, ‘आविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. याबद्दल त्यांनी माननीय लोकभवन कार्यालयाप्रती आदर व्यक्त केला. तसेच विद्यापीठासाठी भूषण ठरलेले व सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख करत गुणगौरव केला. शेवटी त्यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात अधिक जोमाने कार्य करावे याबरोबरच दूरदृष्टी, कठोर मेहनत, पक्का निश्चय व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

पद्मश्री माननीय डॉ. श्रीरंग (दादा) लाड यांनी माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करून पुढे नमूद केले की, चिंतनातूनच संशोधन आपोआप घडते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात किंवा शेतीमध्ये नियमित भेटी देऊन सूक्ष्म निरीक्षण करावे. अशा निरीक्षणामुळे विविध बाबी समजून येतात आणि त्यातून चिंतनास चालना मिळते. त्यांनी आपल्या संशोधनातून सध्या कापूस पिकामध्ये ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित केले असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात मराठवाड्याचे भूषण असलेल्या शाळू ज्वारी या पिकावर संशोधन करून अधिक उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.या संशोधन वृत्तीमुळेच आज खेड्यातील संशोधक शेतकरी अशा व्यासपीठावर उभा राहून आपल्याशी संवाद साधतो; यातच खरे यश दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनीही माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून पुढे नमूद केले की, आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यापीठाचे अभिनंदन केले. आविष्कार संशोधन संमेलनाची सुरुवात सन २००६ मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले व त्याची संकल्पना स्पष्ट केली. सध्या नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात असले तरी महाराष्ट्राने सन २००६ मध्येच लोकभवन कार्यालयाच्या माध्यमातून आंतरशाखीय (Interdisciplinary) दृष्टिकोन स्वीकारून सहा विविध विषयगट एकत्र आणले. विद्यार्थ्यांना आपले संशोधन सादर करण्याचे तसेच एकमेकांचे विचार ऐकण्याचे प्रभावी व्यासपीठ म्हणजेच ‘आविष्कार’ संशोधन संमेलन असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले नाहीत त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने कार्य करावे व पुढील काळात यश संपादन करावे. मिळालेल्या पुरस्काराचा खरा आनंद तो समाज व राष्ट्राच्या हितासाठी उपयोगात आणल्यासच आहे. विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी व उद्योजक बनावे, हेच ‘आविष्कार’मध्ये सहभाग घेतल्याचे खरे यश असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून स्पर्धेच्या आयोजनाची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की ज्ञान व संशोधन सादर करण्यासाठी ही एक मोठी व महत्त्वपूर्ण स्पर्धा असून, त्यातून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी निश्चितच लाभ होईल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य विकसित होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की जिज्ञासू वृत्ती ही यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे. यश त्वरित मिळत नाही, त्यासाठी सातत्य आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी जिज्ञासू वृत्ती ठेवावी, सातत्याने प्रयत्न करावेत आणि स्वतःवर विश्वास ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून माननीय राज्यपाल नियुक्त ‘आविष्कार’ देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, या संशोधन स्पर्धेतून निवडलेल्या प्रकल्पांचे भविष्यात स्वतंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

प्रास्ताविकात आविष्कार समितीचे सह-निमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम यांनी माननीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे महत्त्व विशद केले. तसेच दिनांक २८ जानेवारी रोजी सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ औपचारिक स्पर्धेचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी माननीय लोकभवन कार्यालयाने नियुक्त केलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक श्री. सुनील निंभोरे यांनी आपले अभिप्राय व्यक्त करून भावना मांडल्या.

 ‘Innovation, Invention, Discovery’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. 

आविष्कार–२०२६ संशोधन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय लोकभवन कार्यालयाचे समिती सदस्य, आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सह निमंत्रक तथा आजोजन सचिव डॉ. राजेश कदम, विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव व दयानंद मोरे यांनी केले, तर आभार डॉ. राजेश कदम यांनी मानले.

 

‘आविष्कार–२०२६’ अंतर्गत संशोधन सादरीकरणासाठी पुढीलप्रमाणे सहा प्रमुख विषय गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली.

१. मानविकी, भाषा व ललित कला

२. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा

३. शुद्ध विज्ञान

४. कृषि व पशुसंवर्धन

५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान

६. वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र

सदरील स्पर्धा पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच  पोस्ट पीजी (PPG) या तीन स्तरांमध्ये आयोजित करण्यात आली. दिनांक २९ जानेवारी रोजी भित्तीपत्रके, मॉडेल्स, विविध प्रयोग सादरीकरण तर दिनांक ३० जानेवारी रोजी पोडियम सादरीकरण घेण्यात आले. या सर्वांचे परीक्षण सबंधित विषयातील तज्ज्ञ परीक्षाकाद्वारे करण्यात आले. प्रत्येक ६ गटातून प्रत्येकी ८ प्रमाणे एकूण ४८ विद्यार्थांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार तर ६ गटातून प्रत्येकी २ प्रमाणे एकूण ३६ विद्यार्थांना प्रोत्साहन पुरस्कार असे एकूण ८४ पुरस्कार देण्यात आले.

यामध्ये पदवी (UG) व पदव्युत्तर (PG) स्तरासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये ३५ हजार, ३० हजार व २५ हजार इतकी फेलोशिप पुढील संशोधनासाठी एक वर्षाकरिता देण्यात येणार आहे. तसेच पोस्ट पीजी (PPG) स्तरासाठी प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे रुपये १ लाख २० हजार व रुपये १ लाख इतकी फेलोशिप दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान करण्यात येणार आहे.

याबरोबरच विश्वनाथ शंकरभाई दलवाई सर्वोत्तम चॅम्पियनशिपचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त करून विजेता संघ ठरला तर ॲड त्रिंबक माधव चांदे उपविजेते फिरते चषक पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. सर्व सहाही विविध विषयातील गटाचे फिरते चषक मुंबई विद्यापीठाने प्राप्त केले.


आविष्कार समितीचे निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार 

माननीय राज्यपाल नियुक्त ‘आविष्कार’ देखरेख समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील 

आविष्कार समितीचे सह-निमंत्रक तथा आयोजन सचिव डॉ. राजेश कदम 

बामू विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक श्री. सुनील निंभोरे