Monday, March 9, 2026

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे व पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात प्रेरणादायी संवाद

 समाज विचारांनी समृद्ध झाला पाहिजे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पद्मश्री सन्मानित सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्मिता कोल्हे आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांचा अधिकारी व विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्यासह शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंतराव जामकर, सामारीतनस (SAMARITANS) सेवाभावी संस्थेचे श्री. रामकुमार व श्री. दामोदर आदी मान्यवर उपस्थित होते.

संवाद कार्यक्रमात डॉ. स्मिता कोल्हे व डॉ. रवींद्र कोल्हे यांनी ग्रामीण आरोग्य सेवा, सामाजिक बांधिलकी तसेच आदिवासी व ग्रामीण भागातील विकासासाठी केलेल्या कार्याबाबतचे अनुभव विद्यार्थ्यांशी व अधिकारी वर्गाशी शेअर केले. मेळघाटातील दुर्गम भागात राहून आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य देशभरात आदर्श मानले जाते. विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने विद्यापीठाच्या वतीने या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आव्हानांचा स्वीकार करणारी व्यक्तीच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होते. कोल्हे दांपत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. परस्परांच्या साथीने व धैर्याने केलेले कार्य नक्कीच यशस्वी होते, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, सात्विकता आणि अहंकारविरहित कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, समाज केवळ पैसा, शक्ती किंवा शिक्षणाने नव्हे तर विचारांनी समृद्ध झाला पाहिजे. विद्यापीठात सध्या ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असून अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे त्यांना भावनिक व सामाजिकदृष्ट्या समृद्ध होण्याची संधी मिळते. हा कार्यक्रम श्री. हेमंतराव जामकर व डॉ. रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून आयोजित करता आला, यामुळे त्यांचे माननीय कुलागुरुनी आभार मानले.

यावेळी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील आदिवासी समाजामध्ये केलेल्या कार्याचा अनुभव सांगितला. सुरुवातीला महिलांच्या अनेक समस्या होत्या. त्यावर चिंतन करून सामाजिक परिवर्तनाची उभारणी करण्यात आली. वैयक्तिक आयुष्यातील सुखसोयी असूनही समाधान मिळत नसल्याने त्यांनी समाजकार्यात उतरून आदिवासी समाजासोबत राहून त्यांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा प्रयत्न केला.

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी आदिवासी समाजातील महिलांचे अधिकार, त्यांच्या संस्कृतीतील वैशिष्ट्ये तसेच आरोग्य, शिक्षण व शेती विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. आदिवासी समाजात महिलांना अनेक अधिकार असून पंचायत व्यवस्थेत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. रामकुमार यांनी सामारीतनस संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.








Sunday, March 8, 2026

इएलपी मॉड्यूलला कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; विद्यार्थ्यांना कृषि उद्योजकतेबाबत मार्गदर्शन

 वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून कोबीवर्गीय व पालेभाज्यांचे दर्जेदार उत्पादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण कार्यक्रमांतर्गत (ELP – Experiential Learning Programme) पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये कोबीवर्गीय व पालेभाज्या पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्याचा यशस्वी उपक्रम राबविला आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इएलपी (ELP) मॉड्यूल प्रभारी डॉ. अंशुल लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे चालू आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सदर इएलपी (ELP) मॉड्यूलला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पॉलिहाऊस व शेडनेटमधील पिकांची पाहणी करून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या दर्जेदार उत्पादनाचे कौतुक केले. तसेच उत्पादन व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन, खर्च नियंत्रण आणि प्रभावी विपणन तंत्राचा अवलंब करून या मॉड्यूलमधून अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात कृषि उद्योजकतेच्या दृष्टीने अशा प्रयोगशील उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी अधिक व्यापक प्रमाणात अवलंब करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत महाविद्यालयामध्ये राबविण्यात येत असलेले इएलपी (ELP) मॉड्यूल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन, व्यवस्थापन व विपणनाचा मौल्यवान अनुभव मिळत असून भविष्यात याच अनुभवाच्या आधारे ते यशस्वी कृषि उद्योजक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कमीत कमी रासायनिक निविष्ठांचा वापर करून पॉलिहाऊस व शेडनेटमध्ये पत्ताकोबी, लालकोबी, फ्लॉवर तसेच विविध पालेभाज्या यांची तांत्रिक पद्धतीने लागवड करून त्यांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. उत्पादित भाजीपाल्याची विक्री विद्यापीठ परिसर तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्टॉल लावून थेट ग्राहकांना करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लागवडीपासून उत्पादन व्यवस्थापन, काढणी, विक्री व विपणन व्यवस्थापनापर्यंतची प्रत्यक्ष माहिती मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती व्यवस्थापन, विपणन कौशल्य आणि भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त अनुभव मिळत आहे.

इएलपी (ELP) मॉड्यूलमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन तसेच ग्राहकांशी थेट संवाद साधण्याचा अनुभव मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होत आहे. या यशस्वी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी दर्जेदार उत्पादन घेऊन ELP कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले असून हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सदर उपक्रमास महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी वर्गांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.










Saturday, March 7, 2026

वनामकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड कार्यक्रमाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, वन विभाग जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र अंतर्गत सायळा ब्लॉकमधील गट क्रमांक ३१ ते ४५ आणि ९१ ते १०३ या परिसरात विविध फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे वनक्षेत्र विकसित करण्यासाठी वर्ष २०२५–२६ साठी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते दिनांक ७ मार्च २०२६ रोजी करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सुमारे ३० मीटर रुंदी आणि ९ किलोमीटर लांबीच्या परिसरात एकूण २४.०० हेक्टर क्षेत्रावर (दोन टप्प्यात) विविध फळझाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि विद्यापीठ परिसर अधिक हरित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून तो सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भूमिपूजन करून वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपांचे प्रतीकात्मक लागवड करण्यात येऊन पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ विश्वनाथ खंदारे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हिराकांत काळपांडे, हरिहर कौसडीकर, सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ आनंद गोरे,  तसेच जिंतूर वनपरिक्षेत्राचे एसीएफ श्री ढगे, आरएफओ श्री नागरगोजे, श्रीमती मंगल गोरे, श्री आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवड ही पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून, विद्यापीठ आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील हरित क्षेत्र वाढविण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास वन विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राष्ट्रीय पातळीवरील पशुसंवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्पात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘सर्वोत्कृष्ट केंद्र’ पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात वनामकृविला एकूण आठ  ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – पशुधन यांत्रिकीकरण (AICRP on Mechanization of Animal Husbandry) या केंद्रास संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वर्ष २०२४–२५ साठीसर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक ७ ते ८ मार्च २०२६ रोजी पंतनगर (उत्तराखंड) येथील जी. बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आयोजित अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – पशुधन यांत्रिकीकरण (AICRP on MAH) च्या वार्षिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला.

पशुधन यांत्रिकीकरण क्षेत्रात विद्यापीठाने केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार विद्यापीठाच्या केंद्राला प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या यशाच्या शिखरावर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून मागील चार वर्षांत विद्यापीठाला मिळालेल्या सात पुरस्कारांनंतर हा आठवा ‘सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प (केंद्र)’ पुरस्कार ठरला आहे.

या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, संशोधन प्रकल्पाच्या माजी प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेतीस उपयुक्त व शेतकरीप्रिय यंत्रे आणि अवजारांचा विकास झाला असून त्यामुळे केंद्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यामुळे केंद्राची नावलौकिकता वाढून आज हे यश संपादन करता आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच माननीय कुलगुरूंनी संपूर्ण संशोधन पथकाचे अभिनंदन करत सांगितले की, पशुधन क्षेत्रात आधुनिक यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी आणि पशुपालकांना अधिक कार्यक्षम व किफायतशीर उपाय उपलब्ध करून देण्याचे कार्य विद्यापीठ सातत्याने करत आहे. या पुरस्कारामुळे संशोधन कार्याला अधिक प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हा मानाचा पुरस्कार जी. बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. एम. एस. चौहान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) च्या कृषि अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस. एन. झा तसेच भोपाळ येथील केंद्रीय अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी आर मेहता, भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्था अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प – पशुधन यांत्रिकीकरणचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. पी. सिंग, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी अभियांत्रिकीचे सहाय्यक संचालक डॉ. के. पी. सिंग आणि नवी दिल्ली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक (पशुविज्ञान) डॉ. हेमांद्री यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील चार वर्षांपासून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि नियमित मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक तसेच पशुधन अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे हे यशस्वी फलित आहे.

हा पुरस्कार विद्यापीठाच्या वतीने अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प - पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण या योजनेचे प्रमुख डॉ. दयानंद टेकाळे (संशोधन अभियंता), डॉ. संदेश देशमुख (पशुशास्त्रज्ञ) आणि इंजी. अजय वाघमारे (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक) यांनी स्विकारला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक तसेच पशुधन अभियांत्रिकी विभागातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


Vasantrao Naik Marathwada Agricultural University Receives National Level ‘Best Centre’ Award in Mechanization of Animal Husbandry Project

 

Under the leadership of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, VNMKV, Parbhani has received total eight ‘Best Research Centre’ Awards

 

Vasantrao Naik Marathwada Agricultural University’s All India Coordinated Research Project – Mechanization of Animal Husbandry (AICRP on MAH) center has been conferred the “Best Centre Award” for the year 2024–25 in recognition of its outstanding research contribution. The award was presented during the inaugural ceremony of the Annual Workshop of AICRP on Mechanization of Animal Husbandry, held on 7–8 March 2026 at G. B. Pant University of Agriculture and Technology, Pantnagar, Uttarakhand.

This prestigious award was conferred on the university’s centre in recognition of the significant research work carried out by the university in the field of animal husbandry mechanization. With this achievement, another feather has been added to the university’s crown of success, and it marks the eighth “Best Research Project (Centre)” award received by the University in the last four years, following the seven awards received earlier.

Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani stated that this achievement is the result of the tireless efforts of Dr. Smita Solanki, the former Principal Investigator of the research project. Due to her dedicated work, several farmer-friendly and agriculture-useful machines and implements were developed, which significantly contributed to the overall development of the centre. As a result, the reputation of the centre has increased, leading to the attainment of this success.

The Hon’ble Vice Chancellor also congratulated the entire research team and stated that the university has been consistently working to develop modern mechanization and technologies in the livestock sector, providing more efficient and cost-effective solutions to farmers and livestock keepers. He further expressed confidence that this award will serve as a strong motivation for future research activities.

The prestigious award was presented by the Hon’ble Vice Chancellor Dr. M. S. Chauhan of G. B. Pant University of Agriculture and Technology. On this occasion, Dr. S. N. Jha, Deputy Director General (Agricultural Engineering) of Indian Council of Agricultural Research, Dr. C. R. Mehta, Director of Central Institute of Agricultural Engineering, Dr. S. P. Singh, Project Coordinator of the All India Coordinated Research Project on Mechanization of Animal Husbandry under Central Institute of Agricultural Engineering, Dr. K. P. Singh, Assistant Director (Agricultural Engineering) of Indian Council of Agricultural Research, New Delhi, and Dr. Hemandri, Assistant Director (Animal Science) of Indian Council of Agricultural Research, New Delhi, were prominently present.

This achievement is the successful outcome of the leadership and continuous guidance of Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani over the past four years, to the collective efforts of Director of Research Dr. Khizar Baig, the former Director of Research, and the scientists and staff of the Department of Livestock Engineering.

On behalf of the university, the award was received by Dr. Dayanand Tekale (Research Engineer), Dr. Sandesh Deshmukh (Animal Scientist), and Engg. Ajay Waghmare (Senior Technical Assistant), who are associated with the All India Coordinated Research Project on Mechanization of Animal Husbandry.

This notable achievement has been widely appreciated at all levels, recognizing the joint efforts of Director of Research Dr. Khizar Baig, former Directors of Research, and the scientists and staff of the Department of Livestock Engineering.

वनामकृवि येथे “शेती आणि ग्रामीण परिवर्तन” विषयावरील संकल्पोत्तर वेबिनारचे थेट प्रक्षेपण

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर “शेती आणि ग्रामीण परिवर्तन” या विषयावर भारतीय कृषि अनुसंधान परिषदद्वारा आयोजित करण्यात आलेल्या विशेष संकल्पोत्तर वेबिनारचे थेट प्रक्षेपण दिनांक ६ मार्च २०२६ रोजी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (ATIC), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आले. या वेबिनारमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेती, ग्रामीण विकास तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमास विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विशाल अवसरमल, डॉ. एस. पी. कौसल्ये, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. अनंत लाड, सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रीतम भुतडा तसेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दिपाली सवंडकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण ८३ सहभागी (शेतकरी व अधिकारी) उपस्थित राहून वेबिनारचा लाभ घेतला. वेबिनारमध्ये शेती क्षेत्रातील नवीन संधी, शासकीय योजना तसेच ग्रामीण परिवर्तनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





रासायनिक निविष्ठांचा वापर कमी करून जैविक शेतीला प्राधान्य द्यावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा नैसर्गिक शेती व ऊस पाचट व्यवस्थापनावर शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे दिनांक ६ मार्च २०२६ रोजी ८८ वा शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, बीड श्री. सुभाष साळवे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामती येथील भा.कृ.अनु.प.– राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या शास्त्रज्ञा डॉ. एलीजा प्रधान आणि अंबाजोगाई येथील कृषि विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा वापर कमी करून जास्तीत जास्त जैविक निविष्ठांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल आणि जमिनीचे आरोग्यही अबाधित राहील. यासाठी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देणे आवश्यक असून या दृष्टीने विद्यापीठ विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. एलीजा प्रधान यांनी ऊस पिकातील पाचट व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते, सेंद्रिय कर्ब घटतो तसेच पर्यावरणाचे प्रदूषण होते, असे त्यांनी सांगितले. पाचट न जाळता ते जमिनीत कुट्टी करून कुजविल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये व सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते, बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि तणांचे नियंत्रण होते, असे अनेक फायदे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. अरुण गुट्टे यांनी मार्गदर्शन करताना ऊस पाचटाचे महत्त्व तसेच बायोमिक्स व जैविक खते यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर शेतीची शाश्वतता टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त करत या विषयावर आणखी कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे उपस्थित तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी दिली.

सूत्रसंचालन डॉ. हनुमान गरुड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. किशोर जगताप, डॉ. तुकेश सुरपाम, प्रा. गणेश मंडलिक, श्री. दीपक इंगळे, श्री. गजेंद्र आढावे, श्री. दत्तप्रसाद वीर यांच्यासह कृषी विद्यापीठ व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






Friday, March 6, 2026

करडई पिकाच्या उत्पादनाबरोबर तेलाच्या प्रमाणालाही महत्त्व देणे आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम दिनांक ६ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

विचारमंथन सत्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी सुधारित वाण, शास्त्रोक्त पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेती अधिक लाभदायक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.तसेच करडई पिकाच्या उत्पादनाबरोबरच त्यातील तेलाच्या प्रमाणाला महत्त्व देण्यावर विशेष भर दिला. करडई हे आरोग्यदायी तेलबिया पीक असून त्याच्या मूल्यवर्धन व बाजारपेठेच्या संधी वाढविण्यासाठी संशोधन, प्रक्रिया व विपणन यांना चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर हे होते, त्यांनी महाराष्ट्रात करडई पिकाचे क्षेत्रविस्तार व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

या विचारमंथन कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच डॉ. हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रात शास्त्रज्ञांनी डीबीटी प्रकल्प तसेच ८०० पेक्षा अधिक करडई जर्मप्लाझम ट्रायल्सना भेट देऊन विविध वाणांची पाहणी केली. यावेळी भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर यांनी भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संशोधन संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, तेलबिया संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कादिर वेल, डॉ. आर. डी. प्रसाद, डॉ. जी. डी. सतीश कुमार, डॉ. बी. एन. मोटागी (कर्नाटक), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. एच. जे. राजपूत व डॉ. संदीप दिघुके यांनीही सहभाग नोंदविला.

तसेच मध्यवर्ती प्रक्षेत्रावर राबविण्यात येत असलेल्या २५० एकर करडई बीज उत्पादन कार्यक्रमाला मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी भेट दिली. या ठिकाणी मध्यवर्ती प्रक्षेत्राचे  प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे यांनी करडई बिजोत्पादना बद्दल सखोल माहिती दिली. यावेळी मनोली, जांब, वालूर व सोनना (जि. परभणी) येथील सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून करडई पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

शेतकरी–शास्त्रज्ञ संवादादरम्यान डॉ. संतोष शिंदे यांनी शेतकऱ्यांना करडई उत्पादनातील अडचणींबाबत मार्गदर्शन करून त्यांचे निरसन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धूतमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. ए. शिंदे, डॉ. व्ही. आर. घुगे, डॉ. एस. व्ही. वाघमारे, श्री. व्ही. एम. पांचाळ, डॉ. स्नेहल शिलेवंत व श्री. एम. आर. मगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आर. आर. धूतमल यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. फरिया खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष शिंदे यांनी मानले.