Saturday, October 19, 2024

करडई, राजमा आणि जवस लागवड तंत्रज्ञावर ऑनलाईन मार्गदर्शन

 शास्वत उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज: कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या सोळाव्या भागात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शास्वत उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. डॉ. इन्द्र मणि यांनी रबी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी करडई, राजमा आणि जवस या पिकांची लागवड करून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला. त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमातील शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांनी आभार मानले आणि विद्यापीठाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या मार्गदर्शन उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विभागीय कृषि सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी राजमा पिकाच्या लागवडीसाठी बियाणे उपलब्धता आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती दिली.

तांत्रिक सत्रामध्ये हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाच्या अंदाजानुसार शेती नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी करडई, राजमा आणि जवस पिकांच्या लागवडीसाठी पंचसुत्री सांगितली. यात बीजप्रक्रीया, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा समावेश होता असे नमूद केले.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील समस्यांवर प्रश्न विचारले, ज्यांना विद्यापीठातील तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. कार्यक्रमात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Friday, October 18, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या रावे विद्यार्थ्यांनी ग्रामीण कुटुंबियांमध्ये केला तंत्रज्ञानाचा प्रसार

 पालकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष द्यावे.... डॉ. जया बंगाळे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी 'रावे' (ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम) उपक्रमांतर्गत रायपूर (ता. परभणी) येथे शेतकरी कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले. दिनांक ३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी कुटुंबांची कौशल्यवृद्धी करत, त्यांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान अवगत करून दिले. या तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश होता.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रायपूर येथे या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. दत्ता गिरी आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. भीमराव सूर्यतळ उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. जया बंगाळे यांनी रावे उपक्रमात सहभाग घेतलेल्या ग्रामकन्या आणि ग्रामदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कुटुंबांपर्यंत सामुदायिक विज्ञानाचे तंत्रज्ञान पोहोचविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले आणि पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, तसेच नैतिक मूल्यांच्या जपणुकीचे महत्त्व पटवून दिले. तसेच यानिमित्ताने स्कूल कनेक्ट उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कृषी शिक्षणाचे शास्त्रोक्त धडे देखील गिरवावे लागणार असल्याने बालपनापासूनच ते कृषि क्षेत्राकडे आकर्षित होतील असे त्यांनी विशद केले. तसेच कृषि क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्याने त्यांना अनेक नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध राहणार असल्याने त्यांनी कृषि विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रास्तविकात कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी रावे उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संपर्क कुटुंबातील सदस्य ममता मस्के यांनी ग्रामदूत व ग्रामकन्या यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास साध्य झाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शालेय विद्यार्थिनी वैष्णवी बालशंकर हिनेही या उपक्रमातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी आणि रावेच्या ग्रामदूत व ग्रामकन्या यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे रावे परीक्षक डॉ. अश्विनी बिडवे, डॉ. अश्विनी बेद्रे, प्रा. ज्योती मुंडे, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आकांक्षा थोरात यांनी केले.

हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत बियाणे वाटप आणि मार्गदर्शन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA)अंतर्गत रबी हंगामाचे नियोजन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या या कार्यक्रमात उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना या गावांतील एकूण ३८ शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाने विकसित केलेली करडईची पीबीएनएस-८६ (पूर्णा),ज्वारीची परभणी सुपरमोती (एसपीव्ही २४०७) आणि हरभऱ्याची फुले विक्रम ही सुधारीत बियाणे प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी या सुधारीत वाणांचा प्रचार व प्रसार करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता.
मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सोयाबीन काढणीनंतर लगेचच रब्बी पिकांची लागवड करण्याचे महत्त्व सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा वापर आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. रब्बी हंगामात हरभरा + करडई (४:२) आणि रब्बी ज्वारी + हरभरा (२:४) अशा आंतरपीक पद्धतींचा उपयोग शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अे. के. गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धतींच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासारख्या पद्धतींचा वापर करून पिकांना योग्य वेळी पाणी देण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बीज प्रक्रिया, पीक संरक्षण आणि वेळेवर लागवड यांसारख्या पंचसुत्री पद्धतींच्या अवलंबावर भर दिला. मृदशास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी तेलबिया आणि दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुरद व गंधकयुक्त खतांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना डॉ. अे. के. गोरे यांनी केली. शेतकरी ज्ञानोबा धोतरे, शिवाजी दळवे, कृष्णा धोतरे, प्रभाकर धोतरे, आवडाजी गमे तसेच बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. आर. एस. राऊत, श्री एस. पी. काळे, श्री एम. ए. राऊत, श्री व्ही.जे. रिठ्ठे, श्री सादेक शेख, श्री कालीदास खटींग, श्री वसंत जाधव, श्री दिपक भुमरे, आणि प्रदीप मोरे यांनी योगदान दिले.



Wednesday, October 16, 2024

देशाच्‍या राजपत्रात वनामकृविच्‍या पाच पिक वाणांचा समावेश

वाणांचा प्रचार  प्रसार होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईलकुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला. याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६), सोयाबीनचा एमएयुएस-७३१, देशी कपासीचा पीए ८३३, अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार  प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले, त्‍यांनी हे वाण विकसित करण्‍यास योगदान देणारे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ डि. के. पाटीलडॉ एस. पी. मेहत्रे, डॉ.व्ही. के. गीते, डॉ.मोहन धुप्पे आदीसह सर्व संबंधित शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले.  

या वाणातील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तीळाच्या वाणास महाराष्‍ट्र राज्‍याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्‍याची मान्‍यता देण्‍यात आली आहे, तर सोयाबीनच्या वाणास महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरिता मान्‍यता मिळाली आणि देशी कपासीचा वाणास दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडू  या  राज्‍याकरिता लागवडीस मान्‍यता प्राप्‍त झाली. देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे  बीजोत्पादन हे मुख्‍य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्‍याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग यांनी दिली. 

पाच वाणाची थोडक्‍यात माहिती

हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) वाण :  हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणापासून सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १००  दाण्याचे वजन २९  ग्रॅम भरते या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो

सोयाबीनचा एमएयुएस-७३१ वाण: सोयाबीनचा हा वाण लवकर येणारा असून परिपक्वतेसाठी ९४ ते ९८ दिवस लागतात. या वाणाची पाने निमपसरी, गोलाकार व मोठी असतात, शेंगाचे प्रमाण अधिक व गुछ्या मध्ये शेंगा लागतात. तीन दाण्याच्या शेंगाचे अधिक प्रमाण. शेंगा फुटण्यास साठी पंधरा दिवस सहनशीलता आहे. कोरडवाहूसाठी अधिक उत्पादन देणारा, कीड व रोगास प्रतिकरक. १०० ग्राम दाण्याचे वजन १३ ते १५  ग्राम भरते. उत्पादकता २८ ते ३२ क्विंटल प्रती  हेक्टरी एवढी आहे. तेलाचे प्रमाण २०.५ टक्के  तर प्रथिनांचे प्रमाण ४०.५ टक्के आहे.

देशी कपासीचा पीए ८३३ वाण : हा वाण विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पामार्फत विकसित करण्यात आला. या वाणाची उत्पादकता १५ ते १६ क्विंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा ३५ ते ३६  टक्के आहे. धाग्याची लांबी २८ ते २९  मिलिमीटर आहे. १५० ते १६० दिवस कालावधी लागत असून या वाणाची विशेष गुणधर्म म्हणजे सरळ धाग्याची लांबी व मजबुती, रस शोषक किडी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील तसेच पाण्याच्या ताणास देखील सहनशील आहे.

अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ वाण: हा अमेरिकन कापसाचा वाण असून या वाणाची उत्पादकता १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर असून रुईचा उतार ३७ ते ३८ टक्के आहे. धाग्याची लांबी २५ ते २६ मिलिमीटर असून वाणाचा कालावधी १५५ ते १६० दिवसाचा आहे. पाण्याच्या तानास व रस शोषक किडीस सहनशील असून सधन पद्धतीने लागवडीस योग्य आहे.

तीळाचा टीएलटी-१० वाण : तिळाचा टीएलटी १० हा वाण विद्यापीठाच्या लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आला. या वाणामध्ये तेलाचे उत्पादन सरस असून खरीप, रबी व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता शिफारस करण्यात आलेली आहे. कालावधी ९० ते ९५ दिवसाची आहे. उत्पादन हेक्टरी ६ ते ७ क्विंटल येते. १००० बियाचे वजन ३.५ ते ४.० ग्राम भरते, तेलाचे प्रमाण ४५ ते ४७  टक्के आहे.  सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, अल्टरनेरिया व भुरी रोगास प्रतिबंधक याबरोबरच तुडतुडे, पाने गुंडाळणारी व बोंडे पोखरणारी आळी या किडीस सहनशील आहे.

हरभरा वाण -  परभणी चना - १६ (बीडीएनजी २०१८-१६) 

सोयाबीन वाण - एमएयुएस-७३१


देशी कापूस वाण - पीए ८३३ 


अमेरिकन कापूस वाण - एनएच ६७७


तीळ वाण - टीएलटी-१० 


वनामकृवि येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे जागतिक अन्न दिन साजरा

समाजामध्ये पोषक आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात जागतिक अन्न दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत मौजे रायपूर (ता. जि. परभणी) येथील जिल्हा परिषद शाळेत स्वास्थ्यदायी जीवनासाठी अन्नाचे अधिकार याविषयी दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या महाविद्यालयांतर्गत असणाऱ्या अन्न विज्ञान आणि पोषण विभागातील डॉ. अश्विनी बिडवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आहार विषयक शास्त्रोक्त बाबींचा आधार घेत दैनंदिन जीवनातील समतोल आहाराचे महत्व पटवून दिले. तदनंतर या विभागातील प्रा. मानसी बाभूळगावकर यांनी आरोग्यदायी जीवनासाठी भरड धान्याचे आणि सकाळच्या नाश्त्याचे महत्व उपस्थितांना विशद केले. आपल्या दैनंदिन आहारत भरडधान्याला अनन्य साधारण महत्त्व असून त्यामध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि आवश्यक खनिजे विपुल प्रमाणात असतात. भरडधान्यामुळे पाचन क्रिया सुधारून हृदयाचे आरोग्य ही राखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आहारात ज्वारी, बाजरी, भगर, राळे, नाचणी, सामा, कोद्रा, वराई अशा विविध भरडधन्याचा समावेश करणे अतिशय आवश्यक असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. याबरोबरच सकाळचा नाश्ता हा दिवसभराची ऊर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचा असून त्यामुळे शरीराचे आवश्यक पोषण होते आणि पाचन क्रिया सुधारते. याबरोबरच मेंदू सक्रिय होऊन एकाग्रतेत देखिल वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने नाश्ता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रावे अंतर्गत कार्यरत असणारे पदवीपूर्व विद्यार्थी (ग्राम दुत आणि ग्राम कन्या), प्रशालेतील शिक्षका, सौ. वर्षा गनमुखे, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी आणि गावकरी मंडळी सहभागी होते.



शेतकरी व शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण संवाद मालिकेचा १५ वा भाग करडई जवस लागवडीची पंचसुत्री या विषयावर दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे आदीची उपस्थिती होती.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी बंधु-भगिनी यांना केवळ शेतीचे तंत्रज्ञान नव्हे तर त्यांच्या मुलांना शिक्षण शिक्षणाच्या संधी तसेच शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावरही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यादृष्टीने शेती, शेतीपुरक व्यवसाय अशा विषयातील ज्ञान तंत्रज्ञान उपलब्ध करून देवून शेतकरी शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास साधने हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. रबी पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा याबाबतचे तंत्रज्ञान शेतक­यांना उपलबध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी करडई जवस लागवडीची पंचसुत्री यावर माहिती देताना करडई जवस पिकांमध्ये बीजप्रक्रीया, वेळेवर पेरणी, संतुलीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाजारपेठ व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच ते म्हणाले की, करडई पिकात पेरणीस उशीर झाल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो यामुळे वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे. करडई मध्ये परभणी- १२, पीबिएनएस- १५४, पीबिएनएस- ८६, पीबिएनएस- ४० तर जवस पिकाचे एलएसएल-९३, एलएन- १४२ हे वाण लागवडीसाठी वापरावेत.

शेतकरी बंधु-भगिणी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांचे समाधान केले. प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मिटींग, युट्यूब चॅनल, फेसबुक या सामाजिक माध्यामाद्वारे करण्यात आले.