Saturday, July 4, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वनामकृविच्या दोन रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थांना (RPTO – Remote Pilot Training Organization) मान्यता प्रदान केली

शेतीचे आधुनिकीकरण आणि डिजिटल कृषिला गती देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दिशेने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे तसेच शेती अधिक सुरक्षित, अचूक आणि शाश्वत बनविणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (NAHEP) अंतर्गत डिजिटल शेती, ड्रोन, रोबोटिक्स आणि स्वयंचलित कृषि यंत्रांवरील संशोधनाला मोठी चालना मिळाली आहे. पीक निरीक्षण, कीड व रोग व्यवस्थापन, खत आणि कीटकनाशकांची अचूक फवारणी, मृदा विश्लेषण, बियाणे पेरणी तसेच पीक आरोग्य मूल्यांकन अशा विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर विकसित करण्यात येत आहे.

ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीतील निविष्ठांचा काटेकोर वापर शक्य होत असून खत, पाणी आणि कीटकनाशकांचा अपव्यय लक्षणीयरीत्या कमी होतो. मोठ्या क्षेत्रावर अल्पावधीत फवारणी करता येत असल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होते. तसेच विषारी कीटकनाशकांच्या थेट संपर्कापासून शेतकरी व शेतमजुरांचे संरक्षण होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

देशात कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण आणि प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) तयार करण्यातही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने विविध उच्चस्तरीय समित्यांच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सोयाबीन, कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई आणि तीळ या दहा प्रमुख पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणीची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली. या मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधांचे योग्य प्रमाण, ड्रोनची उड्डाण उंची, उड्डाणाचा वेग, नोजलचा प्रकार, हवामानाची अनुकूल परिस्थिती तसेच पर्यावरण संरक्षणासंबंधी सविस्तर शिफारसी करण्यात आल्या आहेत.

परभणी कृषि विद्यापीठाने अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठ तसेच विविध अग्रगण्य ड्रोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळ दिले आहे. संशोधनासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध करून दिले असून विद्यार्थी व प्राध्यापकांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, ब्राझील तसेच इतर देशांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून परभणी येथे भारतातील पहिला १८० दिवसीय कृषि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या आतापर्यंतच्या दोन बॅचमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळाले असून सध्या तिसरी बॅच सुरू आहे. तसेच विद्यापीठाने ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर सुरू करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह भाडेतत्त्वावर ड्रोन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या सर्व उपक्रमांमुळे विद्यापीठाने कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA), नवी दिल्ली यांनी विद्यापीठाच्या दोन रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO – Remote Pilot Training Organization) प्रशिक्षण केंद्रांना मान्यता प्रदान केली आहे. यापैकी पहिले केंद्र कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२५ पासून कार्यरत आहे. तर दुसऱ्या केंद्राला २३ जून २०२६ रोजी मान्यता मिळाली असून ते विद्यापीठाच्या NAHEP–DFSRDA सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरू करण्यात येत आहे. या केंद्राला सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या मान्यतेमुळे विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), स्वयं-सहाय्यता बचत गट तसेच ग्रामीण युवकांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करून भारतीय शेती अधिक आधुनिक, सुरक्षित आणि स्पर्धात्मक बनविण्याच्या दिशेने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. संशोधन, प्रशिक्षण, राष्ट्रीय धोरणनिर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत प्रसार या सर्व स्तरांवर त्यांनी केलेले कार्य भारतीय कृषि क्षेत्रासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारे ठरत आहे.

शेतीत ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची स्थापना

सन २०२० मध्ये देशातील काही भागांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. त्यानंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासंदर्भातील संशोधनात्मक कार्याला गती देण्यात आली. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत शेतीत ड्रोनच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी विविध तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आली. प्रथम डॉ. के. अलगुसुंदरम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे समन्वयक म्हणून माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यानंतर ड्रोनद्वारे मृदा व पीक अन्नद्रव्यांच्या वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा अहवाल कृषि मंत्रालयाने स्वीकारला.

यानंतर जुलै २०२२ मध्ये विविध पिकांवर ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने दहा प्रमुख पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणीसंदर्भातील प्रमाणित कार्यपद्धती तयार करून मसुदा अहवाल मंत्रालयाकडे सादर केला. या मसुदा अहवालाचे २० एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

सध्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनद्वारे विविध स्वरूपातील मृदा व पीक अन्नद्रव्यांच्या वापरासाठी सुधारित प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्याचे कार्य सुरू असून, भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा सुरक्षित, वैज्ञानिक आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी ही समिती सातत्याने कार्यरत आहे.





वनामकृवित सिंचन जल व्यवस्थापनावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या द्विवार्षिक कार्यशाळेचा समारोप

 वॉटर आर्मी’ म्हणून कार्य करण्याचे शास्त्रज्ञांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – सिंचन जल व्यवस्थापन विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थान (IIWM – Indian Institute of Water Management) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ३ जुलै २०२६ दरम्यान आयोजित सिंचन जल व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ चा समारोप दिनांक ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉल येथे झाले.

समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे आभासी माध्यमाद्वारे माद्यामाद्वारे सहभागी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ. ए. सारंगी हे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जल व्यवस्थापन) चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात द्विवार्षिक कार्यशाळा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) तसेच भुवनेश्वर येथील सिंचन जल व्यवस्थापन संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

या कार्यशाळेतून पुढे आलेल्या निष्कर्षांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, विविध तांत्रिक सत्रांच्या अध्यक्ष व तज्ज्ञांनी प्रत्येक संशोधन प्रकल्पासाठी स्पष्ट ध्येय, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि अपेक्षित निष्कर्ष निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन सकारात्मकतेने स्वीकारून सर्वांनी कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

शेतकरी कल्याणासाठी सिंचन जल व्यवस्थापनावरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनामध्ये पाणी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले. एका ठिकाणी ९० टक्के क्षेत्र हळद पिकाखाली असून संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली असल्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, अशाच प्रकारे इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) यांच्या माध्यमातून सिंचन जलाचा कार्यक्षम वापर करण्यासाठी अधिकाधिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. तसेच शेतकऱ्यांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण होऊन त्यांच्या कौशल्यवृद्धीस चालना मिळावी, असेही त्यांनी सांगितले.

घरगुती वापरासह सर्व स्तरांवर पाण्याचा काटेकोर वापर करून पाण्याची नासाडी टाळण्यासाठी जल साक्षरता होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी या प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी ‘वॉटर आर्मी’ म्हणून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेतून पुढे आलेल्या संशोधन शिफारशी शेतकरी हितासाठी निश्चितच लाभदायक ठरतील, असा विश्वास व्यक्त करून कार्यशाळेतील सूचना व शिफारशींचे योग्य दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आयोजक व सर्व सहभागींचे अभिनंदन केले.

जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ. ए. सारंगी म्हणाले की, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांनी शेतकरी विकासासाठी सुचविलेले शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र आणि शासन म्हणजेच Academia – Industry – Government या त्रिस्तरीय समन्वयाचे महत्त्व आणि सिंचन जल व्यवस्थापनासाठीचे ‘त्रिशूल मॉडेल’ अत्यंत प्रभावी असून ते देशातील इतर सर्व संशोधन केंद्रांनीही अवलंबावे.

संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान प्रसारासाठी त्यांनी चार बाबींना विशेष महत्त्व दिले. त्यामध्ये माहिती संकलन व डेटा पॉलिसी (Data Policy), संवाद धोरण (Communication Policy), स्त्री-पुरुष समानता धोरण (Gender Policy) तसेच माध्यमांद्वारे निरीक्षण, मूल्यमापन व परिणाम विश्लेषण (Media Monitoring, Evaluation and Impact Analysis) यांचा समावेश आहे.

विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचे योग्य मोजमाप करून त्याचे परिणाम विश्लेषणाच्या आधारे नियोजन आराखडे तयार करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा किती व कसा प्रभाव पडला आहे, याची माहिती सादर करावी तसेच प्रभावी तंत्रज्ञान विकसित करून त्याची शासनस्तरावर नोंद करावी. त्यामुळे शेतकरी कल्याणाच्या योजना अधिक प्रभावीपणे आखता येतील. शेवटी त्यांनी सर्व संशोधन केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पुढील वर्षाचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, सर्व संशोधन व विस्तार यंत्रणेचे अंतिम लाभार्थी शेतकरीच आहेत. त्यामुळे प्रत्येक संशोधन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उपयोगाचे तंत्रज्ञान विकसित करणारे असावे. पाण्याची बचत, संचय, संवर्धन आणि न्याय्य वापर याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. परभणी विद्यापीठाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावर विहीर व बोअरवेल पुनर्भरणाची प्रभावी कामे केली असून त्याचा लाभ आजही संरक्षित सिंचनासाठी होत आहे. या तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या कार्यशाळेतून पुढे आलेल्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तांत्रिक सत्रातील निष्कर्ष सत्रांचे अध्यक्ष तथा तज्ज्ञ डॉ. उदय घोडके, डॉ. एस. डी. गोरंटीवार, डॉ. डी. के. शर्मा, डॉ. के. एन. तिवारी, आणि डॉ. एस. के. गुप्ता यांनी सादर केले.

यावेळी त्यांनी संशोधन केंद्रांच्या शिफारशींचा प्रत्यक्ष कितपत लाभ झाला, याचे मूल्यांकन करावे तसेच शेतकऱ्यांच्या यशोगाथा संकलित करून प्रभावी तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करावा, असे सुचविले. तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या भाषेत उपलब्ध करून द्यावे. दर्जेदार तंत्रज्ञान विकसित करून निविष्ठांचा खर्च कमी करण्यावर भर द्यावा. हवामान बदल लक्षात घेऊन विविधतेवर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सध्या बहुतांश संशोधन कृषी विद्याशाखेशी निगडीत असल्याने बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारून अचूक सिंचन उपकरणे विकसित करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. संशोधन करताना स्पष्ट उद्दिष्टे, कार्ययोजना, विश्वसनीय माहिती आणि परिणामांचे दस्तऐवजीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच यशस्वी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी इतर राज्यांमध्येही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या संशोधन शिफारशींना मान्यता देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी संयुक्त संशोधन परिषद आयोजित केली जाते. अशा प्रकारची प्रणाली इतर राज्यांनीही स्वीकारावी, असे त्यांनी सुचविले.

प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती यांनी कार्यशाळेचा अहवाल सादर करताना सांगितले की, या कार्यशाळेत विविध संशोधन संस्था, उद्योग प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. विविध तांत्रिक सत्रांमध्ये सखोल चर्चा करून त्यातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष व शिफारशी निश्चित करण्यात आल्या.

प्रामुख्याने विकसित तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे कार्य करावे, पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून अधिक नफा मिळविण्याचे मार्गदर्शन करावे, उच्च दर्जाचे संशोधन लेख, पेटंट्स आणि नियोजन आराखडे तयार करावेत तसेच संशोधन केंद्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे व शेतकरीहिताचे असावे, अशा प्रमुख शिफारशी या कार्यशाळेतून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

सहभागी शास्त्रज्ञांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाने दिलेल्या सहकार्य, उत्कृष्ट नियोजन आणि उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच माननीय कुलगुरू, भुवनेश्वर येथील संचालक आणि आयोजकांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आभार डॉ. हरीश आवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील सिंचन जल व्यवस्थापनचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य लाभल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.





Friday, July 3, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दुसऱ्या ड्रोन प्रशिक्षण केंद्रास डीजीसीए, नवी दिल्लीची मान्यता

भारतातील एकमेव पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण,२१-दिवसीय प्रोफेशनल प्रमाणपत्र देणाऱ्या विद्यापीठाची आणखी एक भरारी; आता विद्यापीठातील हे दुसऱ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता

कृषि  तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषि  क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA), नवी दिल्ली यांनी विद्यापीठातील नाहेप–डीएफएसआरडीए (NAHEP–DFSRDA) सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरू होणाऱ्या दुसऱ्या रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO – Remote Pilot Training Organization) ड्रोन प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान केली आहे.

विद्यापीठातील हे दुसरे अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र असून, यापूर्वीचे केंद्र कृषि  अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आता विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ड्रोन नियम, २०२१ मधील नियम ३९ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या Certificate of Authorization नुसार या केंद्रास रोटरक्राफ्ट–RPAS प्रकारातील स्मॉल व मीडियम वर्गाच्या ड्रोनसाठी VLOS (Visual Line of Sight) अंतर्गत दिवस व रात्र प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळाली आहे.

या प्रमाणपत्राचा तपशील RPTO Authorization No. : RPTO202600120, मंजुरी दिनांक : २३ जून २०२६ वैधता कालावधी : २३ जून २०२६ ते २२ जून २०३६ असा आहे. ही मान्यता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे सहसंचालक श्री. मनीष कुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, ही मान्यता त्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण फलित मानली जात आहे. या मान्यतेमुळे विद्यार्थी, संशोधक, शेतकरी युवक तसेच कृषि  उद्योजकांना अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेऊन आधुनिक कृषि  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मान्यता प्राप्त कृषि  विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असून, मराठवाडा विभागाच्या कृषि  तंत्रज्ञान विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

सध्या कृषि  क्षेत्रात ड्रोनचा वापर पीक संरक्षण फवारणी, खत व्यवस्थापन, सर्वेक्षण, पीक निरीक्षण, नकाशांकन तसेच अचूक शेती (Precision Farming) यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला प्राप्त झालेली ही मान्यता मराठवाडा तसेच राज्यातील कृषि  शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

या केंद्राचे अकाउंटेबल मॅनेजर (Accountable Manager) म्हणून नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे हे कार्यभार सांभाळणार आहेत.

प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे नमूद केले की, नाहेप–डीएफएसआरडीए हा भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेला प्रकल्प असून, सन २०१९ ते २०२३ या कालावधीत विविध उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत १५,००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना प्रशिक्षण, संशोधन व लघु प्रकल्पांसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून, विद्यापीठाच्या तांत्रिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्राने एग्रीबॉट, एग्रीड्रोन, एग्री-एजीव्ही, सेन्सर प्रणाली, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), डीप लर्निंग आणि डेटा सायन्स या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य, देश व विदेशातील ५५ हून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी येथे १ ते ३ महिन्यांच्या कालावधीत संशोधन व प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या माध्यमातून १५० हून अधिक संशोधन प्रबंध व पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह जागतिक स्तरावरील संशोधन समित्या, परिषद व कार्यशाळांमध्ये नेतृत्व करत या केंद्राने विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने भारतातील पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असून, आतापर्यंत झालेल्या दोन बॅचमध्ये १०० टक्के प्लेसमेंट साध्य झाले आहे. सध्या तिसरी बॅच सुरू होत आहे. सन २०३६ पर्यंतच्या नियम व अटींच्या अधीन राहून हे केंद्र कार्यरत राहण्यास मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशिक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

या केंद्राच्या उभारणीस आरपी ड्रोन लिमिटेड यांनी सहभाग नोंदवून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डीडीजी श्री. विनय चौरसिया व श्री. सुरेंद्र पंडिता यांनी प्रत्यक्ष तपासणी करून मान्यतेची शिफारस केली असून, सहसंचालक श्री. मनीष कुमार यांनी विद्यापीठास शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांनीदेखील या केंद्राच्या स्थापनेबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता तसेच सर्व अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हे यश संपादन झाले.

या यशाबद्दल शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तसेच डिजिटल एक्स्टेंशन तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. शंकर पुरी यांनी प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Thursday, July 2, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांना भावपूर्ण निरोप

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सत्कार




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयामार्फत दिनांक २ जुलै २०२६ रोजी संशोधन संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. खिजर बेग यांच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम अखिल भारतीय समन्वित पशुधन यांत्रिकीकरण संशोधन प्रकल्प (AICRP on Mechanisation in Animal Husbandry) सभागृहात पार पडला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विद्यापीठातील सर्व संचालक, कुलसचिव, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक, सर्व सहयोगी अधिष्ठाता तसेच संशोधन कार्यालयातील प्रभारी अधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच कठीण बाब आहे. मात्र कौटुंबिक गरजांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विद्यापीठ सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय पातळीवरील संशोधनाधारित प्रकल्प तयार करताना या विद्यापीठाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते आणि त्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे.

विद्यापीठाने वाण विकास, गुणवत्तापूर्ण रोप निर्मिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले असून या कार्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले. मात्र त्यांच्या इच्छेनुसार ते पुढील वाटचालीसाठी जात असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठातून सेवा पूर्ण करून अथवा इतर कारणांनी बाहेर पडताना आपल्या जाण्यामुळे विद्यापीठाच्या कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कामकाज थांबणार नाही, अशी कार्यपद्धती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.

डॉ. खिजर बेग यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना ते स्वच्छ मनाचे, कर्तव्यदक्ष आणि सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. आज सर्वांच्या उपस्थितीत झालेला उत्स्फूर्त सन्मान हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतेही यश हे समर्पित भावनेतून केलेल्या कार्यातूनच सिद्ध होते आणि अशा व्यक्तींची आठवण भविष्यात कायम राहते, असेही ते म्हणाले.

डॉ. खिजर बेग यांनी भविष्यातही विद्यापीठाशी समन्वय ठेवून जोडलेले राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत कुलगुरूंनी त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकारकीर्दीसाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, व्यक्ती सेवानिवृत्त होतात; मात्र विद्यापीठाची प्रगती कधीही थांबणार नाही.

सत्काराला उत्तर देताना डॉ. खिजर बेग म्हणाले की, याच विद्यापीठातून त्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण केली असून विद्यापीठाची एकूण २६ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. काम करण्याची आवड सुरुवातीपासूनच होती; मात्र मागील चार वर्षांत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात कामाचा वेग वाढला आणि सातत्यपूर्ण काम करण्याची सवय अधिक दृढ झाली.

कौटुंबिक कारणांमुळे विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत असून पुढे एका चांगल्या ठिकाणी कार्य करण्याची संधी मिळत आहे. या निवडीमध्ये देखील परभणी कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्वांना जिद्द, आवड आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

विद्यापीठात मनुष्यबळ कमी असतानाही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य तसेच पायाभूत सुविधा विकासामध्ये मागील चार वर्षांत उच्च दर्जाचे काम झाले आहे. सध्या विद्यापीठात आयोजित होणारे विविध कार्यक्रम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडतात. तसेच राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्या दहा संशोधन केंद्रांना प्रथम क्रमांक मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ते म्हणाले की, भविष्यात कुठेही कार्यरत असलो तरी विद्यापीठाशी समन्वय ठेवून कार्य करत राहणार असून विद्यापीठ परिवाराकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, आज झालेला सन्मान हा डॉ. खिजर बेग यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात कापूस आणि सोयाबीन वाण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे शेतकरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

कुलसचिव श्री. पुराभा काळे यांनी सांगितले कि, डॉ. खिजर बेग हे विद्यापीठाच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. कुलसचिव कार्यालयातील विविध निवड प्रक्रियेत त्यांनी निवड समितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाबद्दल खंत वाटत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केले.

प्रस्ताविकात उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण यांनी सांगितले की, माननीय कुलगुरू यांच्या निर्देशानुसार विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचा सन्मान विद्यापीठाच्या वतीने करण्यात यावा तसेच माननीय कुलगुरूंच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून भविष्यात दर महिन्याला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. वीणा भालेराव यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन उपसंचालक संशोधन डॉ. सुनीता पवार यांनी केले.

यावेळी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ नीता गायकवाड,विभागप्रमुख, संशोधन योजनांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; एससी-एसपी प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाचे उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे दि. २ जुलै २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली येथील मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव तसेच प्रशिक्षण तज्ज्ञ तथा प्रमुख प्रशिक्षक श्री राजीव पंडित उपस्थित होते.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उपयोजना (SC-SP) अंतर्गत कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावरील दोन दिवसीय ऑफलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजच्या काळातील परवलीचे शब्द बनले असून दैनंदिन जीवनात त्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषि क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून कृषि पदवीधरांनी या ज्ञानाचा अंगीकार करून महाविद्यालयीन जीवनात कौशल्य विकासावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठीच कृषि महाविद्यालयाने हे उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे.

महाविद्यालयातील इंटरनेट व इन्व्हर्टर सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा तसेच अर्थशास्त्र विभागातील प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी प्रभावीपणे उपयोग व्हावा. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील हे प्रशिक्षण भविष्यात सातत्याने सुरू ठेवावे. तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर भर देऊन उद्योजक बनावे आणि नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी आजच्या डिजिटल युगात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास कसा करावा आणि आव्हानांना कसे सामोरे जावे यावर प्रभावी मार्गदर्शन केले. मोबाईल आणि सोशल मीडिया हे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारे मोठे माध्यम बनले असून महाविद्यालयीन जीवन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे. या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील नवनवीन कौशल्ये विकसित केली पाहिजेत. ही कौशल्ये भविष्यात स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

व्यक्तिमत्त्व विकासात संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी, प्राध्यापकांशी आणि सहकाऱ्यांशी उत्तम संवाद साधायला शिकले पाहिजे. संकोच किंवा भीती न बाळगता संवाद साधल्यास विचारांची देवाणघेवाण होते, आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी नमूद केले की, व्यक्तिमत्त्व विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे तसेच भविष्यातील करिअर घडविण्यास मोठा लाभ होणार आहे. याशिवाय जेआरएफ, एसआरएफ (JRF, SRF) आणि विविध स्पर्धा परीक्षांविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालयात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच २०० एकर प्रक्षेत्रावरील अंतरमशागतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लघु ट्रॅक्टरचे, मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक बैलचलित कृषि अवजारांचे, जनावरांसाठी नव्याने बांधलेल्या गोठ्याचे तसेच सेरिकल्चर (रेशीमशेती) युनिटचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली.

याशिवाय चार डिजिटल वर्गखोल्या, डिजिटल प्रयोगशाळा, इंटरनेट व इन्व्हर्टर सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा आणि अर्थशास्त्र प्रयोगशाळेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर माननीय कुलगुरूंनी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दशरथ सारंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुंडलिक वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमास डॉ. शंकर नरवाडे, प्रा. वैशाली बासटेवाड, डॉ. राहुल भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. आर. एफ. ठोंबरे, डॉ. ज्योती गायकवाड, श्री चंद्रकांत ताटीकोंडलवार, श्री सलीम पठाण, श्री नाईक, श्री आडे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रक्षेत्रावरील चालक, मजूर वर्ग आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Wednesday, July 1, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत आहारतज्ज्ञ पदावर निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थिनींचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या पदवीप्राप्त विद्यार्थिनी कीर्ती यशवंत घुमरे, मृणाली शिवदास तोंडारे, गायत्री बालमुकुंद काबरा आणि स्वाती केशवराव शिंदे यांची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र शासन अंतर्गत आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड झाली आहे. तर योगेश्वरी सतिशराव पवार आणि जान्हवी रंगराव उक्कलगावकर या दोन विद्यार्थीनी प्रतीक्षा यादी मध्ये आहेत

या पदासाठी कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी.एस्सी. गृह विज्ञान (B.Sc. Home Science), बी.एस्सी. (ऑनर्स) गृह विज्ञान [B.Sc. (Hons.) Home Science] तसेच बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान [B.Sc. (Hons.) Community Science] या अभ्यासक्रमांच्या पदव्या शैक्षणिक पात्रता म्हणून ग्राह्य धरण्यात आल्या.

मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी स्पर्धा परीक्षा दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारण्यात आले असून परीक्षा एकूण २०० गुणांची होती. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी (Merit) व त्यानंतरच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या आधारे करण्यात आली.

या विद्यार्थिनींच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणातून मिळालेले हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या नव्या संधींबाबत उत्साह वाढला आहे.

या यशामागे विद्यापीठ प्रशासनाचे विशेष योगदान राहिले आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक तांत्रिक बाबींचे निराकरण केले होते.

विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, यांच्यासह सर्व माजी अधिष्ठाता, माजी विभागप्रमुख, माजी प्राध्यापक आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी यशस्वी विद्यार्थिनींनी भावना व्यक्त करत सांगितले की, तांत्रिक बाबींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयाने दिलेले अनमोल सहकार्य, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि खंबीर पाठिंबा याशिवाय हे यश संपादन करणे कठीण झाले असते.

ही निवड सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची, विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीची आणि विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टिकोनाची साक्ष देणारी ठरली आहे.