Thursday, April 23, 2026

वनामकृवि व पोकरा प्रकल्प यांच्यात सामंजस्य करार; हवामान बदलास सक्षम शेतीसाठी संयुक्त उपक्रम

 सामंजस्य करारातून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


मराठवाड्यातील शेती अधिक शाश्वत व हवामान बदलास सक्षम करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प – पोकरा (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp (PoCRA) यांच्यात दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी मुबई येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

हा करार महाराष्ट्रातील प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधन उत्पादकता वाढविण्यासाठी आणि हवामान बदलास प्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी संरक्षणात्मक शेती (Conservation Agriculture for enhancing resource productivity and improving climate resilience in major cropping systems of Maharashtra) या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असून, राज्यातील प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधनांचा कार्यक्षम वापर व हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ पासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुंबई येथे झालेल्या या करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि पोकरा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मीनल करणवाल (भाप्रसे) यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि रसायन आणि मृदा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ हरिहर कौसडीकर दोन्ही संस्थांतील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

या कराराच्या माध्यमातून मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक शेती पद्धती, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व संशोधनात्मक सहकार्य करण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी सांगितले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करत उत्पादनक्षमतेत वाढ साध्य करण्यासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती व दर्जेदार साधनसामुग्रीचा (इनपुट्सचा) लाभ मिळेल. यामुळे केवळ कृषी उत्पादनक्षमता वाढणार नाही तर शेती अधिक लाभदायक, टिकाऊ आणि हवामान बदलास प्रतिरोधक बनण्यास मोठी मदत होईल.

तर पोकरा प्रकल्पाच्या वतीने या सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेती पद्धती आत्मसात करण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हा करार राज्यातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, संशोधन व प्रत्यक्ष शेती यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.



वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ २२ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, माजी विभागप्रमुख डॉ. सुनिता काळे, डॉ. मेधा उमरीकर, माजी प्राध्यापिका डॉ. आशा शेळके तसेच महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष व पदवी अभ्यासक्रमाचे पाल्य प्राध्यापक डॉ. शंकर पुरी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके यांनी मागील साडेचार महिन्यांपासून सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सांभाळला असल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे; तो कमावण्याची कला आत्मसात करा. आई-वडिलांच्या कष्टांची व शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जाणीव ठेवा. उच्च शिक्षण घ्या आणि संतुलित जीवनशैली अवलंबा.

डॉ. राहुल रामटेके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचे कार्य केले आहे. पुढील यशस्वी आयुष्याची इमारत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने व सकारात्मक दृष्टिकोनातून उभी करावी. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ प्रतिक्रिया न देता संयम ठेवावा, लक्ष केंद्रित ठेवून आचरण करावे आणि कठोर परिश्रम घ्यावेत. चार वर्षांत मिळालेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी शिस्त, बंधन व नैतिक मूल्ये जपावीत. तसेच कुटुंबाचा आधार बनून पालक व शिक्षकांचा सन्मान राखावा.

याप्रसंगी महाविद्यालयातील माजी प्राध्यापिका डॉ. सविता काळे, डॉ. मेधा उमरीकर, डॉ. आशा देशमुख तसेच जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ, महाविद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावनिक भावना मांडल्या.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










Monday, April 20, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे भेट; कडधान्य संशोधनातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. १८ एप्रिल २०२६ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेस ( ICAR-Indian Institute of Pulses Research) भेट दिली.

यावेळी भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे रब्बी कडधान्य प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी यांनी माननीय कुलगुरूंचे स्वागत करून संस्थेमध्ये कडधान्य सुधारणा (Pulses Improvement) क्षेत्रात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कडधान्य संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. मनमोहन देव, डॉ. प्रसून वर्मा आणि इतर यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर सखोल चर्चा केली. तसेच त्यांनी तेथील मिनी डाळ मिल व कडधान्य प्रक्रिया युनिटमधील आधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली.

या भेटीदरम्यान हरभरा (Chickpea) व तूर (Pigeonpea) पिकांच्या संशोधन क्षेत्रात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या सहकार्यामुळे कडधान्य उत्पादनवाढ व शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी नमूद केले.




Visit of Hon’ble Vice Chancellor of VNMKV to ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur; Emphasis on Strengthening Collaboration in Pulses Research

The Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited the ICAR–Indian Institute of Pulses Research (IIPR), Kanpur, on April 18, 2026.

On this occasion, Dr. Shailesh Tripathi, Project Coordinator (Rabi Pulses), welcomed the Hon’ble Vice Chancellor and provided a detailed overview of the institute’s work in the field of Pulses Improvement.

Subsequently, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani held a meeting with scientists including Dr. Manmohan Dev, Dr. Prasun Verma, and others, where in-depth discussions were conducted on various aspects of pulses research. He also visited the Mini Dal Mill and pulses processing unit to review the modern machinery installed there.

During the visit, constructive discussions were held regarding strengthening collaboration between ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur and Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth in the research of chickpea and pigeonpea crops. The Hon’ble Vice Chancellor noted that this collaboration would significantly contribute to increasing pulses production and making improved technologies available to farmers.


Friday, April 17, 2026

पाण्याची बचत हिच पाण्याची निर्मिती : जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त वनामकृवीत उपक्रम

पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

“पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती” हा महत्त्वपूर्ण संदेश देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६’ अंतर्गत एकदिवसीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा व जलजागृती कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी  उत्साहात संपन्न झाला.

जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या पंधरवाड्याचा एक भाग म्हणून आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चंद्रशेखर ताटे, श्री. सलीम शेख तसेच श्रीमती लांजेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठातील पाणी व्यवस्थापन योजनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, पिक पद्धती योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. जाधव  व शास्त्रज्ञ डॉ. विशाल इंगळे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पाण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भविष्यातील गरजा लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात होणारी अतिवृष्टीचे योग्य नियोजन केल्यास पूरस्थितीवर मात करता येऊ शकते. या अतिवृष्टीच्या पाण्याचा लाभ घेवून त्याचे कालव्यांद्वारे विविध भागात वळवून शेततळे भरून घेणे तसेच विविध जलसंधारण उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांना व नदीकाठील गावांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जल व्यवस्थापनातील अनेक समस्या सोडविता येतात, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. हरीश आवारी यांनी लाभक्षेत्रातील पाणी वितरण व त्यासाठी आवश्यक शास्त्रीय बाबींचे सादरीकरण केले. डॉ. के. टी. जाधव यांनी पीक पद्धती संदर्भात मार्गदर्शन केले, तर डॉ. विशाल इंगळे यांनी अचूक पाणी नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) चा वापर कसा करता येईल याविषयी माहिती दिली. डॉ. एस. बी. जाधव यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Thursday, April 16, 2026

वनामकृविच्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचाचे वाटप

सूक्ष्म सिंचन म्हणजे पाण्याची बचत, शेतीची समृद्धी आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल! – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, तसेच प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी आणि परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव (ठोंबरे) व करडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जाती (SC SP) उपयोजनेअंतर्गत पिंपळगाव (ठोंबरे), ता. जि. परभणी येथील १० शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती (TSP) उपयोजनेअंतर्गत करडगाव, ता. जि. परभणी येथील ०५ शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते एकूण १५ तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतीमध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपेक्षित केलेल्या सर्वसमावेशक विकासासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग महत्त्वाचा ठरू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. पाणी बिना और ज्ञानी बिना खेती नहीं” या ओळींमधून त्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तुषार व ठिबक सिंचन पद्धती तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाण व तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व संशोधन कार्याची माहिती दिली. तसेच डॉ. सुमंत जाधव (विभाग प्रमुख) व डॉ. विशाल इंगळे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग) यांनी तुषार सिंचन संचाचा योग्य वापर, निगा व देखभाल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे मराठवाड्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा लाभ होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भास्कर सुरनर, श्री. सोनू धुर्वे, श्री. देवेंद्र कुरा, श्री. युवराज भोगील, श्री. विलास जाधव, श्री. प्रकाश मोते, श्री. बाळू रनेर, श्री. महादेव भाले व श्री. संजय देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व परिसरातील अनेक शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





वनामकृविच्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रात सिताफळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

 सिताफळ प्रक्रिया केंद्रामुळे मूल्यवर्धन व उद्योजकतेला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सिताफळ संशोधन केंद्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उभारण्यात आलेल्या सिताफळ संशोधन व प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन  दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय बंटेवाड, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे तसेच प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनानंतर माननीय कुलगुरूंनी प्रक्रिया केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. यामध्ये पल्पर, आईस्क्रीम मेकिंग मशीन, फर्मेंटर, ड्रायर, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड यंत्रणा, ओव्हन, थ्री-टियर कन्वेयर तसेच वॉक-इन कूलर यांचा समावेश आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, सिताफळ हे अल्प कालावधीत येणारे व लवकर खराब होणारे फळ असल्याने त्यावर प्रक्रिया करून आईस्क्रीम, रबडी, कुल्फी, कस्टर्ड पावडर यांसारखे विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यास मोठी संधी आहे. या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी केंद्राच्या स्थापनेपासून (१९९७) आजपर्यंतचा प्रवास सविस्तर मांडला. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेली दर्जेदार रोपे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राकडे जतन केलेल्या २६ विविध जातींची माहितीही त्यांनी दिली. पुढील काळात केवळ उत्पादन वाढीवर भर न देता सिताफळाच्या गराचे मूल्यवर्धन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बालासाहेब चिल्लरगे यांनी केले.






वनामकृविच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रात बीज प्रक्रिया केंद्र व विशेषीकृत शीतगृह प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे संरक्षण व शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रातील सूर्यफूल बियाणे योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘बीज प्रक्रिया केंद्र’ व ‘विशेषीकृत शीतगृह संरचना’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल. आधुनिक साठवण सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य भाव मिळण्यास मदत होईल. अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट होऊन कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या समारंभास विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शेंडे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूरचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, गळितधान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. मोहन धुप्पे यांनी सांगितले की, हा प्रकल्प गळितधान्ये संशोधन केंद्राच्या प्रगतीप्रती असलेली बांधिलकी व शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवितो. भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, सामूहिक मेहनत व संघभावनेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवशंकर पोले, श्री. रविकिरण मोरे, श्री. महेश फड, श्री. रोहित सिंदालकर, श्री. शंभू मिरकड व कु. आरती गायकवाड तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.