Thursday, May 28, 2026

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘सीएचएआय सन्माननीय फेलो’ आणि ‘आजीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

 

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री. नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) तसेच ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) या प्रतिष्ठेच्या दुहेरी राष्ट्रीय पुरस्कारांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना गौरविण्यात आले. हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

कृषि शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. विशेषतः कृषी शिक्षणातील गुणवत्ता वृद्धी, संशोधनाला चालना, शेतकरी हिताच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सीएचएआय (CHAI) संस्थेने हा सन्मान जाहीर केला.

‘सीएचएआय सन्माननीय फेलो पुरस्कार-२०२६’ (CHAI-Honoured Fellow Award-2026) हा पुरस्कार भारतीय कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील नेतृत्व व उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो, तर ‘सीएचएआय आजीवन गौरव पुरस्कार-२०२६’ (CHAI-Lifetime Recognition Award-2026) हा पुरस्कार संशोधन, शैक्षणिक नेतृत्व आणि कृषी शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान केला जातो.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित करणे तसेच शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य प्रगत पद्धतीने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत अनेक अभिनव उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांसाठी उद्योगसहभागी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना अमेरिका, दक्षिण आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध संस्थांमध्ये विद्यापीठीन व्याख्याते म्हणून कार्य करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून उच्चांकी ३.२१ गुणांसह ‘ए ग्रेड’ हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २५ जुलै २०२२ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI), नवी दिल्ली येथून कृषि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर व आचार्य पदवी संपादन केली आहे. अल्पावधीतच त्यांनी शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी गती दिली आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘भारतरत्न सी. सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ए.एस.ए.बी.ई. (ASABE) चा ‘प्रेसिडेन्शियल सायटेशन पुरस्कार’, जलसंपदा मंत्रालयाचा ‘भूजल संवर्धन पुरस्कार’, भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI) चा ‘सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार’, तसेच आय.ए.ए.बी.ई. (IAABE) व आय.एस.ए.ई. (ISAE) फेलोशिप, ‘भारतीय अभियंता संस्था’चा ‘विख्यात अभियंता पुरस्कार – २०२४’ आणि ‘वर्षातील कुलगुरू – उत्कृष्ट नेतृत्वासाठी पुरस्कार – २०२५’ यांचा समावेश आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवोन्मेष केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या दृष्टीकोनातून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे केवळ मराठवाड्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राचा गौरव वाढला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर व्यापक दखल घेण्यात आली आहे.

या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, “हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिवाराच्या सामूहिक कार्य, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव आहे. आधुनिक कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. ‘शेतकरी देवो भवः’ या मूल्याला केंद्रस्थानी ठेवून कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान, हवामान अनुरूप शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशेने विद्यापीठ सातत्याने कार्यरत राहील. हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने आणि नव्या उमेदीने शेतकरी कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल.”

या यशाबद्दल विद्यापीठाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठ म्हणून आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.










वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ राष्ट्रीय पुरस्कार

हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी  यांच्या शुभहस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्ली येथील कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन्स ऑफ इंडिया (CHAI) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV), परभणी यास ‘इन्स्टिट्युशनल फेलो ऑफ CHAI-2026’ (Institutional Fellow of CHAI-2026) हा प्रतिष्ठेचा सन्मान हरियाणाचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री नायब सिंह सैनी जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी हरियाणा राज्यातील महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठ (MPHU), करनाल येथे दिनांक २८ मे २०२६ रोजी आयोजित १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारला.

कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील उल्लेखनीय योगदान तसेच उद्यानविद्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला हा सन्मान बहाल करण्यात आला आहे असे CHAI चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंह यांनी नमूद केले.

यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, हा पुरस्कार विद्यापीठाने मराठवाड्यातील शेती विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात नव्या उमेदीने विद्यापीठाच्या कार्यात भर पडून विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यास चालना मिळेल. तसेच, याद्वारे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे कल्याण साधले जाईल.

सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने गेल्या पाच दशकांत कृषि शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान प्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यापीठाने विविध पिकांच्या १६० हून अधिक वाणांची निर्मिती, ६० पेक्षा अधिक शेती अवजारे विकसित करणे तसेच ११०० हून अधिक कृषि तंत्रज्ञान व शिफारसी विकसित केल्या आहेत. हवामान बदल, कोरडवाहू शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत शेती यावर विद्यापीठ विशेष भर देत आहे.

विद्यापीठाकडे १६ सलग्न आणि ४० मान्यताप्राप्त महाविद्यालये असून याद्वारे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी प्रदान केली जाते. विद्यापीठाने याद्वारे तब्बल १.२७ लाख कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण केले आहे.  १९ संशोधन केंद्रे, २३ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP), तसेच विस्तृत कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे कार्यरत असून शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे केले जात आहे. डिजिटल कृषि, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृषि यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतही विद्यापीठ सक्रियपणे कार्यरत आहे.

या सन्मानामुळे विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला मोठी दखल मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.







Tuesday, May 26, 2026

एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी कृषि व संलग्न विभागांनी समन्वयातून काम करण्याची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग 

यंदाच्या खरीप हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता शेती क्षेत्रात हवामान अनुरूप नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी नांदेड येथे “शेतीच्या आकस्मिक नियोजनासाठी जनजागृती बैठक” दिनांक २५ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा - CRIDA) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग उपस्थित होते.

बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ‘क्रीडा’चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषि विभाग, पशुसंवर्धन, जलसंधारण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद यांसह विविध संलग्न विभागांचे वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. राजेश कदम, श्री. दत्तकुमार कळसाईत, डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, डॉ. एस. के. बल, डॉ. मनोरंजन कुमार, डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. कृष्णा अंभोरे, डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. वसंत सूर्यवंशी, श्री. भानुदास पेंडकर,, डॉ पपीता गौरखेडे, डॉ. बस्वराज भेदे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांची सेवा करणे, त्यांना उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि संकटकाळात त्यांना पाठबळ देणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी अतिवृष्टी, अल्पवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांकडे लक्ष वेधले. हवामान बदल हे संकट नसून त्यामध्येही संधी शोधण्याची आवश्यकता असल्याचे सांगत अतिरिक्त पाण्याचा संचय करून त्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या आकस्मिक आराखड्यानुसार शेतीचे नियोजन करावे. अनेकदा आधुनिक यंत्रसामग्रीची कमतरता असतानाही शेतकरी कष्टपूर्वक शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. ‘शेतकरी ते शेतकरी’ तंत्रज्ञान प्रसार ही अत्यंत प्रभावी पद्धत असून त्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होऊ शकतो.

यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या माननीय श्री. दादा लाड यांच्या कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शेतकऱ्यांसाठी योगदान देण्याची गरज व्यक्त करत टीका व मूल्यमापन ही सुधारणेची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित व्यापक बैठका आणि एकात्मिक सभांचे आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अशा कार्यक्रमांचे आयोजन केवळ नांदेडपुरते मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्यात व्हावे, असे ते म्हणाले. एल-निनोसारख्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कृषी व संलग्न विभागांनी परस्पर समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माननीय कुलगुरूंनी खरीप हंगामात विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील, अशी ग्वाही देत विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असे सांगितले.

‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग यांनी नांदेड जिल्ह्यात सरासरी ९९० मिमी पाऊस पडत असून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान, शेततळे आणि जलसंधारण उपायांचा अवलंब आवश्यक असल्याचे सांगितले. तालुकानिहाय जमीन प्रकार आणि पावसातील बदल लक्षात घेऊन पिके व पीकपद्धती निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.

प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी स्वागत करून मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचा प्रदेश असल्याने विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यापीठाच्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाची माहिती दिली.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दत्तकुमार कळसाईत यांनी कृषी विभागाच्या आकस्मिक नियोजनाची माहिती देताना प्रत्येक तालुक्यात हवामान आधारित पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या पावसाबाबत अंदाज व्यक्त केला. ‘क्रीडा’चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांनी २०२६ मध्ये प्रशांत महासागरात मध्यम तीव्रतेची एल-निनो स्थिती राहण्याची शक्यता असल्याने हंगामाच्या मध्यात पावसात खंड पडू शकतो, असे सांगितले. विद्यापीठाचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी जूनमध्ये सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामानानुसार चार टप्प्यांचे पीक नियोजन सुचविले. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घ्यावीत. पाऊस उशिरा आल्यास बाजरी, सूर्यफूल, तूर यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, कापूस + उडीद, बाजरी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पेरणीपूर्वी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, मृद व जलसंधारण, रुंद वरंबा-सरी पद्धत, कमी कालावधीचे वाण आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी विद्यावेता यांनी एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी घरचे बियाणे, बीज उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया, बीबीफ चा वापर अशी  त्रिसूत्री सांगितली. विविध तालुक्यातून आलेले शेतकरी श्री. रत्नाकर  ढगे, श्री. अडकीने , श्री, भगवान इंगोले, श्रीमती सुषमा देव  अशा अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न विभागांचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ तसेच विविध संशोधन केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सुरेश खटींग, श्री. व्ही.जे. रिठ्ठे, श्री. अमर राऊत व अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी येथील तसेच कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, येथील  सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.



















For English

Monday, May 25, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंडो-जर्मन टूल रूममध्ये प्रतिष्ठित प्रशिक्षणाची संधी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या (CAET) कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, तेरा विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर इंडो-जर्मन टूल रूम (IGTR), छत्रपती संभाजीनगर येथे प्रतिष्ठित ‘इन-प्लांट’ प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

या प्रशिक्षणामध्ये बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) च्या आठ विद्यार्थ्यांना चार महिन्यांचे (६०० तास) तर एम.टेक. (कृषि अभियांत्रिकी) च्या पाच विद्यार्थ्यांना एक महिन्यांचे (९६ तास) औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण २५ मे २०२६ पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना कॅड, कॅम, (सीआरइओ / सीएटीआयए / युनिग्रफिक) (CAD/CAM (CREO/CATIA/Unigraphics), टूल डिझाईन, सीएनसी (CNC) प्रोग्रामिंग व मशिनिंग, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, पीएलसी, एससीएडीए (PLC, SCADA), थ्री-डी प्रिंटिंग तसेच लो-कॉस्ट ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना एमएसएमई, सारथी व महाज्योती या केंद्र व राज्य शासनाच्या संस्थांकडून प्रायोजकत्व उपलब्ध झाले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्कासह इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे.

या यशामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांची प्रेरणा आणि कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ यू. शिंदे तसेच आयजीटीआर, छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशिक्षण) श्री. जयेश बागुल यांचे विशेष मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रयत्न लाभले. विभागातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाचेही मोलाचे योगदान राहिले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रभारी डॉ. मोरे, डॉ. डी. व्ही. पाटील, यूजी प्रभारी डॉ. देशवेना तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम कृषि अभियंते घडविण्याच्या तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची वनामकृविच्या नांदेड येथील विकासकामांची पाहणी; गुणवत्तापूर्ण बांधकामावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र तसेच शासकीय कृषि महाविद्यालय परिसरातील सुरू असलेल्या नवीन बांधकाम कामांची दिनांक २५ मे २०२६ रोजी पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, विद्यापीठ उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शास्त्रज्ञ डॉ अरविंद पांडागळे आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते तसेच प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी बांधकाम स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन इमारतींच्या गुणवत्तेबाबत, कामाच्या गतीबाबत तसेच नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. कापूस संशोधन केंद्र व शासकीय कृषि महाविद्यालय येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन शैक्षणिक व संशोधन सुविधांमुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी बांधकामातील सुरक्षितता, दर्जेदार साहित्याचा वापर आणि परिसर विकास यावर विशेष भर देत कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्यापीठाच्या विकासकामांमुळे कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पाहणी दौऱ्यादरम्यान बांधकामाच्या विविध टप्प्यांची माहिती संबंधित विभागाकडून माननीय कुलगुरूंना सादर करण्यात आली.






Sunday, May 24, 2026

मौजे तरोडा येथे माती परीक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ मे रोजी माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन मौजे तरोडा येथे करण्यात आले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दत्‍तक शेतकऱ्यांच्या शेतातून वैज्ञानिक पद्धतीने मातीचे नमुने संकलित केले. मातीचा नमुना घेताना शेतातील विविध ठिकाणांहून ठराविक खोलीपर्यंत माती घेण्याची पद्धत, नमुना स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच योग्य पद्धतीने नमुना परीक्षणासाठी पाठविल्यास अचूक अहवाल मिळण्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. संकलित नमुने पुढील परीक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, योग्य खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत तसेच पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माती परीक्षण ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. पिल्लेवाड तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख व डॉ. आशा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले तर उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना शेतकरी बांधवाकडुन अनेक गोष्‍टी प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी या उपक्रमातुन होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत मौजे तरोडा, सोन्‍ना आणि सुरपिंंपरी ही तीन गांवे दत्‍तक घेतली असुन येथे विविध कृषि कार्यक्रम, कृषि प्रात्‍यक्षिक राबविण्‍यात येणार आहेत. 



मौजे सूरपिंपरी येथे माती परीक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ मे रोजी माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन मौजे सूरपिंपरी येथे करण्यात आले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी २३ शेतकऱ्यांच्या शेतातून वैज्ञानिक पद्धतीने मातीचे नमुने संकलित केले. मातीचा नमुना घेताना शेतातील विविध ठिकाणांहून ठराविक खोलीपर्यंत माती घेण्याची पद्धत, नमुना स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच योग्य पद्धतीने नमुना परीक्षणासाठी पाठविल्यास अचूक अहवाल मिळण्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. संकलित नमुने पुढील परीक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, योग्य खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत तसेच पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माती परीक्षण ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. पिल्लेवाड तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख व डॉ. आशा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तर उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना शेतकरी बांधवाकडुन अनेक गोष्‍टी प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी या उपक्रमातुन होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत मौजे तरोडा, सोन्‍ना आणि सुरपिंंपरी ही तीन गांवे दत्‍तक घेतली असुन येथे विविध कृषि कार्यक्रम, कृषि प्रात्‍यक्षिक राबविण्‍यात येणार आहेत.