Sunday, July 12, 2026

वनामकृविच्या कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; पावसाच्या खंडकाळात हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत केले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRP on Dryland Agriculture) येथे सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ११ जुलै २०२६ रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध पिकांवरील संशोधन, हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान, मृदा व जलसंधारण उपाययोजना तसेच पिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत  *सविस्तर मार्गदर्शन केले.*

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पावसाचे वितरण अनियमित होत असून, अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड अशी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतींसोबत हवामान अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विशेषतः खरीप हंगामात पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास योग्य व्यवस्थापनाद्वारे पिकांवरील ताण कमी करून उत्पादनातील घट टाळता येते.

त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कोळपणी व निंदणी करून जमिनीच्या भेगा बुजविण्याचा सल्ला दिला. यामुळे जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, तणांचे नियंत्रण होते, मुळांची वाढ सुधारते आणि अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. तसेच कोळपणीनंतर तयार होणारा मातीचा बारीक थर बाष्पीभवन कमी करण्यास मदत करतो.

सेंद्रिय पदार्थ, पीक अवशेष किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन (Mulching) केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तापमान नियंत्रित राहते, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून मातीचे आरोग्य सुधारते, असे त्यांनी सांगितले.

ओलाव्याच्या ताणाचा परिणाम कमी करण्यासाठी १ टक्का पोटॅशियम नायट्रेट (KNO) ची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते, पाने अधिक काळ हिरवी राहतात, प्रकाशसंश्लेषण सुरळीत राहते आणि उत्पादन क्षमता टिकून राहण्यास मदत होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, विहीर किंवा इतर जलस्रोत उपलब्ध आहेत, त्यांनी पावसाच्या खंड काळात संरक्षित सिंचन द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. तसेच जलसंधारण सरी उघडणे, पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त मुरविणे आणि ओलावा संवर्धनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर त्यांनी भर दिला.

पुढे त्यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास, वैज्ञानिक पडताळणी आणि प्रभावी प्रसार आवश्यक आहे. संशोधन, प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने कार्य करावे. शेतकऱ्यांचे शेत हीच खरी प्रयोगशाळा असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, तेथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. १५ ते २० जुलैपर्यंत पेरणी झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी व सूर्यफूल ही पिके घेता येऊ शकतात. त्यानंतर पावसास विलंब झाल्यासव दुष्काळसहिष्णू पिके, जसे तूर, बाजरी, सूर्यफूल, एरंडी, कारळ व तीळ यांना प्राधान्य द्यावे.

जोखीम कमी करण्यासाठी बाजरी + तूर, एरंडी + धने आणि एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा. या पद्धतीमुळे उत्पादनाची जोखीम कमी होते, जमिनीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि शेतकऱ्यांना अधिक स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी माननीय कुलगुरूंनी संशोधन, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे तसेच प्रकल्पावरील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गोरे यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची, हवामान बदलाशी संबंधित संशोधनाची आणि पावसाच्या खंड काळात पिकांचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली.


Saturday, July 11, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तसेच ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक १० जुलै २०२६ सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सर्पमित्र इंजी. वेदांत माळवटकर (परभणी) यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी वैज्ञानिक व उपयुक्त माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्ग व वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना इंजी. श्री. वेदांत माळवटकर यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पांचे पर्यावरणीय महत्त्व, साप आढळल्यास घ्यावयाची योग्य काळजी, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार तसेच करावयाच्या व टाळावयाच्या बाबी याविषयी सविस्तर माहिती दिली. साप हे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सापांना इजा न करता किंवा न मारता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सर्पांविषयी समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. अनिकेत वाईकर तसेच सर्पमित्र श्री. अमोल माने, श्री. अक्षय चोपडे, श्री. शिवप्रसाद देशमुख व श्री. नितीन जवंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रद्धा पवार यांनी केले, तर आभार रोहिणी रासवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मुदिता इंगळे, अंकिता वाघ, यश जाधव आणि आदित्य चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.




Friday, July 10, 2026

पैसा /वाणु (मिलीपीड) किडीची ओळख, नुकसान व व्यवस्थापनाबाबत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

 

वाणु, पैसा यालाच इंग्रजीमध्ये मिलीपीड म्हणतात. मिलीपेड कीटक नसून बहुपाद गटातील (डिप्लोपोडा) प्रासंधिपाद प्राणी आहे. जगभरात 12,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. सहसा ओलसर, जंगले (जिथे पाउस जास्त पडतो) दगडाच्या खाली, मातीमध्ये इ. भागात आढळतात (गवत, पाने, कचरा, कंपोष्ट). काही प्रजाती पुरग्रस्त भागात टिकू शकतात व दोन महीन्यापर्यंत पाण्यात बुडतात. वेगवान हालचाल करु शकत नाहीत आणि बहूतेक प्रजाती सडणा-या वनस्पती सामग्रीवर जगतात. मिलीपीडमध्ये विषारी स्टिनर नसतात परंतू त्यापेकी काही शरीरातल्या छिद्रामधून दुर्गंधीयुक्त रसायने तयार करतात ही रसायने अनेक भक्षकांना दुर ठेवण्यास मदत करतात. धोक्याच्या वेळी मिलीपीड मउ असणा-या शरिराच्या खालच्या बाजुचे संरक्षण करताना कडक असलेल्या वलय उघडीस करून त्याच्या शरीरात घट्ट आवर्त वर्तुळ करतात. बहुतेकदा रात्री नैसर्गीक स्थान सोडतात, आणि पायाच्या साह्याने रेंगाळत वर्षाच्या विशिष्ट विशेषत: शरद ऋतू दरम्यान ते मोठया संख्येने स्थलांतर करू शकतात. वसंत आणि ग्रीष्म ऋतु मध्ये जास्त ओल्या किंवा कोरडया हवामानाच्या अनुषंगाने स्थलांतरीत करतात.

खरिप हंगामामध्ये पैसाचा (वाणु) प्रादुर्भाव अनेक गावांमध्ये विविध पिकावर दिसुन येत आहे. विशेष करून सोयाबीन, कापूस ई. पिकामध्ये प्रादुर्भाव होत आहे. ही कीड निशाचर आहे, रात्रीलाच सक्रिय असते. उगवत असलेल्या बिया, लहान रोपे पूर्ण खाऊन फस्त करतात. यामुळे तूट जास्त प्रमाणात होते, प्रादुर्भाव जास्त झाल्यास दुबार पेरणी करावी लागते. तसेच पीक मोठे झाल्यावर पाने खातात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिकरीत्या सतत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड आणि संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे यांनी सांगितले केले आहे.
पैसा (वाणु) ओळख :
मिलीपीड (हजार लेगर्स असे म्हटले जाते) आपल्या भागात Eurymerodesmus spp. आढळतात. तपकिरी, काळपट रंगाचे असून प्रत्येक शरिराच्या भागाचे दोन किंवा चार पाय असतात. मिलीपीडजवळ खरोखरच हजार पाय नसतात. प्रजातीवर अवलंबून त्याचे पाय ४७ ते १९७  जोडयाचे असतात तर सर्वात जास्त ७५० पाय आहेत. जवळजवळ शरिराचे २५ – १०० भाग (Segments) असतात. शरिराचे डोके आणि इतर शरिर असे दोन भागात विभाजन होते. प्रौढ मिलीपीडची लांबी ०.५ ते ६.५ इंच असते. जेव्हा आपण स्पर्श करतो किंवा विश्रांती घेते तेव्हा बहुतेक मिलीपीड कर्लअप करतात (गोळा होतात) तेव्हा त्यास आपल्या भागात पैसा असे म्हणतात.
जीवनक्रम :
जन्माच्या वेळी मिलीपीडसच्या शरिराचे 6 भाग असतात आणि पायाचे 3 जोडया असतात.

-        जेव्हा कात टाकतात त्यावेळी शरीराचे भाग आणि पाय संख्या वाढतात.

-      नर मिलीपीडसला ७ व्या भागाला पाय नसतात त्या ठिकाणी जननेंद्रिये (Modified legs) असतात तर मादी जननेंद्रिये मिलीपीडसच्या दुस-या पायाच्या जोडीजवळ असते.

-     या किडीची मादी एका वेळेस १० ते ३०० अंडी ओलसर जागेवर घालते. वाणु कीड बहुभक्षी तसेच समूहाने आढळणारी कीड आहे.

-     अंडयामधून अळी बाहेर पडते तेव्हा पाय नसतात जेव्हा पहीली अवस्था असते तेव्हा पाय फुटतात अशा प्रकारे प्रत्येक अवस्थे वेळी पाय फुटतात व शरिराची लांबी कप्याने वाढतात.

-         जास्तीत जास्त २ ते १२ इंच पर्यंत वाढ होते आणि ७ ते १० वर्ष पर्यंत जगतात.
नुकसानीचा प्रकार  :
पैसा (वाणु) निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत करणारी आहे. रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो किंवा त्यांची संख्या जास्त होते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर जाउन पाने कुरतडतात.
एकात्मिक व्यवस्थापन
कीटकासह समस्या ब-याचदा ओल्या हवामानाशी जुळतात मिलीपीडचा प्रवेश कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करणे विशेषत: गवत कापने, ओले गवत, दगड, जमीनीवर ठेवलेल्या वस्तू, बांधावरील गवत इ. काढले पाहीजे.

-   ब-याचदा आर्द्र, घनदाट पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपीडच्या समस्यास कारणीभुत ठरु शकतात.

-     कीड लपण्याच्या जागा जसे की, शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काही काडीकचरा गोळा करून नष्ट करावे वाणी रात्री जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढीगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावे.

-     ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.

-      मिलीपीडस रात्री जास्त सक्रीय असल्या कारणाने शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले मिलीपीड जमा करून मिठाच्या द्रावणात टाकावे.

-       पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्‌या पडून नष्ट होतील.

-       चांगला पाउस पडल्यास या किडींचे नैसर्गीक नियंत्रण होते.

-      किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी ३ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% एसपी १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी

-       ज्या शेतांमध्ये वारंवार या किडीचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसल्फान ६ % दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस १०% दाणेदार किंवा फिप्रोनील (०.३%) ५ किलो प्रति १००  किलो शेणखतात मिसळून १ हेक्टर शेतात पसरवावे (वरील कीटकनाशके शेतक-यांनी शेतावर वापरले असता त्यांच्या अनुभवातून परिणामकारक दिसत आहेत, परंतु CIB&RC लेबल क्लेम नाहीत).

 अधिक महितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक

डॉ. पुरुषोत्तम नेहरकर – ९८२२९३६९८६ किंवा डॉ. अनंत लाड – ९७३०९४८१२८ / ७५८८०८२०२४ 



Thursday, July 9, 2026

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४ : वनामकृविच्या लातूर कृषि महाविद्यालयाचा राज्य व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक

 वनश्री पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या हरित उपक्रमांना नवी ऊर्जा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत प्रदान करण्यात येणारा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४' वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक संस्था संवर्गात महाविद्यालयाने राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४'साठी प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची बैठक माननीय मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ वन अधिकारी व समिती सदस्यांच्या उपस्थितीत दिनांक ९ जून २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे पार पडली. प्राथमिक छाननी समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करून विविध पुरस्कार संवर्गांतील विजेत्यांच्या निवडीस दिनांक ९ जुलै २०२६ रोजी मान्यता देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांतर्गत राज्य व विभागीय स्तरावर व्यक्ती, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत, ग्रामविभाग, जिल्हा आदी विविध संवर्गांमध्ये वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो.

या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मागील चार वर्षांत विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन व हरित उपक्रम सातत्याने राबवून अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. यापूर्वी विद्यापीठाला जागतिक स्तरावरील हरित विद्यापीठ पुरस्कारही मिळाला असून, आता प्राप्त झालेल्या वनश्री पुरस्कारामुळे या कार्याला आणखी प्रतिष्ठा लाभली आहे. त्यांनी या यशाबद्दल लातूर कृषि महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही पर्यावरणपूरक व समाजाभिमुख उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने मागील चार वर्षांत परभणी, लातूर, अंबेजोगाई आणि बदनापूर येथील परिसरात सुमारे ५.८० लाख वृक्षांची लागवड केली आहे. या वृक्षलागवडीत ४० विविध प्रजातींचा समावेश असून त्यामध्ये प्रामुख्याने फळझाडे, औषधी व सुगंधी वनस्पती, फुलझाडे तसेच इमारती लाकूड देणाऱ्या वृक्षप्रजातींचा समावेश आहे.

याशिवाय, विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या ४.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत ५०० मीटर रुंदीचा हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे. तसेच परभणी येथील विद्यापीठ मुख्यालयातील मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या सायळा ब्लॉकमध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुमारे ३० मीटर रुंदी व ९ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात ३४ हेक्टर क्षेत्रावर दोन टप्प्यांत विविध फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येत आहे.

सन २०२६–२७ या वर्षासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने परभणी, अंबेजोगाई, गोळेगाव, जालना आणि बदनापूर येथील विद्यापीठाच्या ६६.४३ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. या अंतर्गत सुमारे ६.५० लाख रोपांची लागवड करण्यात येणार असून, त्यांच्या संरक्षणासाठी ४४.४० किलोमीटर लांबीचे चेन-लिंक तसेच जैविक (बायो) कुंपण उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे विद्यापीठाचा 'हरित विद्यापीठ' हा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आधारे हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, लातूर कृषि महाविद्यालयातील वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमाची सुरुवात सन २००८ मध्ये तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी म्हणून माझ्या पुढाकारातून करण्यात आली. त्यानंतर हा उपक्रम सातत्याने विस्तारत गेला. महाविद्यालय परिसरात २०१८-१९, २०२२-२३ आणि २०२३-२४ या प्रत्येक वर्षी सुमारे ६० हजार, असे एकूण १ लाख ८० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी अस्तित्वात असलेल्या तसेच नव्याने लागवड केलेल्या वृक्षांसह जून २०२६ अखेर महाविद्यालय परिसरात अडीच लाखांहून अधिक वृक्षसंपदा विकसित झाली आहे.

या वृक्षसंपदेमुळे २४ तासात सुमारे १० लाख किलो ऑक्सिजनची निर्मिती होत असून दरवर्षी ६,२५० कार्बन क्रेडिट निर्माण होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच समाजाभिमुख पर्यावरण संवर्धनाचे प्रभावी मॉडेल लातूर कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, महाविद्यालयामार्फत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सातत्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयाने जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्येही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला.

पुढे डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, या उल्लेखनीय यशाचे श्रेय लातूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार  कांबळे तसेच डॉ. व्यंकट जगताप, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. संतोष कांबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजूर बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या सामूहिक प्रयत्नांना जाते.

या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व संशोधक यांनी लातूर कृषि महाविद्यालयाच्या चमूचे अभिनंदन केले.



वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक नियोजन व आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

मागील तीन वर्षांपासून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे राबविला जातो.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून राबविण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे आयोजित केला जातो. त्यानुसार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या १४ चमूंमधील ३१ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शास्त्रज्ञांनी सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने खरीप पिकांच्या सद्यस्थितीतील व्यवस्थापनासह उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, पिकसंरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर, बीजप्रक्रिया, सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन व कापूस पिकांतील तण व्यवस्थापन, सेंद्रिय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, हेक्टरी शिफारशीत बियाण्याचे प्रमाण, खतांचे योग्य ग्रेड, खतांची शिफारशीत मात्रा व वापरण्याची योग्य पद्धत तसेच पशुधन व फळबाग व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

या उपक्रमांतर्गत गंगाखेड (जि. परभणी) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादनातील जोखीम कमी करावी तसेच शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निविष्ठांचा संतुलित वापर करावा, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांचा व शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास प्रतिकूल हवामानातही अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे घेऊन वैज्ञानिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच उत्पादनवाढ साधता येईल. तसेच विद्यापीठामार्फत दर मंगळवार व शुक्रवार आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतीविषयक समस्यांचे तज्ज्ञांकडून निराकरण करून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कृषि माहितीची तसेच विद्यापीठामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या खरीप, रब्बी व महिला शेतकरी मेळाव्यांची माहिती उपस्थितांना दिली. या माध्यमांचा लाभ घेऊन अद्ययावत कृषि तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी यावर्षीच्या संभाव्य प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा वापर सुमारे २५ टक्क्यांनी कमी करून जैविक निविष्ठा, जैविक खते आणि जैविक बुरशीनाशकांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच उत्पादन खर्चातही बचत होईल, असे त्यांनी नमूद केले.

उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर फळबागांचे योग्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच फळबाग संरक्षणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

रोगशास्त्रज्ञ डॉ. आनंद दौंडे यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व विशद करताना जैविक बुरशीनाशकांचा तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी माहिती दिली. तसेच खरीप हंगामात संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देऊन शेतकरी व शेतकरी भगिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, लातूर येथील कृषि महाविद्यालय, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर व परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, खामगाव व बदनापूर) तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, परभणी या संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ आनंद गोरे, डॉ. गजानन गडदे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, डॉ. आनंद दौंडे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. आर. एल. कदम, डॉ. एफ. आर. तडवी, प्रा. के. एल. जगताप, प्रा. अशोक निर्वळ तसेच बीड जिल्ह्याचे कृषी उपसंचालक श्री जाधवर, बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सोबतच कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे शास्त्रज्ञ श्री नरेंद्र जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.







 








Wednesday, July 8, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून वनामकृवित "बीजप्रक्रियेचे महत्त्व व पद्धत" विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन संपन्न

 बीजप्रक्रिया हे शाश्वत व कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञान : संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "बीजप्रक्रियेचे महत्त्व व पद्धत" या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून संपन्न झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते, तर सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे तसेच कीटकशास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक तथा सहायक बीज संशोधन अधिकारी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी बीजप्रक्रियेचे बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार यांनी बीजप्रक्रिया ही निरोगी, जोमदार आणि अधिक उत्पादनक्षम पिकाचा पाया असल्याचे सांगितले. दर्जेदार बियाण्यासोबत शिफारशीनुसार योग्य पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते, रोपांची वाढ सशक्त राहते आणि बीज तसेच जमिनीद्वारे पसरणाऱ्या अनेक रोगांपासून पिकांचे प्रभावी संरक्षण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नियमितपणे करावी, असे आवाहन त्यांनी केले. बीजप्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक व इतर आवश्यक निविष्ठांची योग्य माहिती घेऊन शिफारशीनुसार योग्य क्रमानेच बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोग झाल्यानंतर खर्चिक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया हे सर्वात प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व, आवश्यकता, विविध पद्धती, जैविक बीजप्रक्रिया, आवश्यक सामग्री, बीजप्रक्रियेचा योग्य क्रम, घ्यावयाची काळजी तसेच त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया, रोग व्यवस्थापन आणि सेंद्रीय निविष्ठांबाबत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळविली.

या ऑनलाइन कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी तज्ज्ञांनी सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी तंत्रज्ञान असल्याचे प्रतिपादन केले.






वनामकृविद्वारा स्वच्छता पंधरवडा-२०२६ निमित्त हिमायतबागेत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

 

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवडा-२०२६ निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र (हिमायतबाग) आणि क्षेत्रीय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ जुलै २०२६ रोजी हिमायतबाग येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत हिमायतबाग प्रक्षेत्रावर जांभूळ, आंबा, कांचन, करंज, नारळ आदी विविध वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या रोपांचे दीर्घकालीन संरक्षण आणि संगोपन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक रोपाभोवती संरक्षक जाळ्यांची उभारणी करण्यात आली.

यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, क्षेत्रीय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे संचालक श्री. जयप्रकाश होनराव, उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नाईनवाड, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी श्री. मुकेश बाबू व श्री. राजेश कुमार, कृषी अधिकारी गिरीश सोनवणे व ओंकार पाटील, वरिष्ठ लिपिक संगीता निकम व शेख हाजी, तसेच कृषी सहायक अनिल बखळे व मन्मथ तोडकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त परिसराच्या निर्मितीसाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.