Wednesday, March 25, 2026

खेळातून सर्वांगीण विकास; “खेळ आहे तर सर्व आहे” — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि.

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यापीठस्तरीय कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दि. २५ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, घटक व खाजगी कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य आणि क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना खेळातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे प्रतिपादन केले. “खेळ आहे तर सर्व आहे” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील कृषि तंत्र विद्यालयांतील विद्यार्थी व कर्मचारी यांची परस्पर भेट होऊन विचारांची देवाण-घेवाण होते, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होते तसेच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचे भविष्यातील विकसित भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी खेळाडूंना प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि क्रीडास्पृहा जोपासण्याचा संदेश दिला. शेवटी, सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करून विजयासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, खेळामुळे मानवी आरोग्य सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.

क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, तसेच सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे यांनी तसेच सूत्रसंचालन श्री. अशोक खिल्लारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी केले.

या क्रीडा स्पर्धेत मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांतील ६ घटक कृषि तंत्र विद्यालयांसह एकूण ५१ कृषि तंत्र विद्यालयांच्या जिल्हास्तरावरील विजयी संघांचे सुमारे ४०० खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.






















Tuesday, March 24, 2026

‘शेतकरी देवो भव’ संकल्पनेतून ज्वारी क्षेत्रवाढीसाठी ठोस उपाययोजनांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 वनामकृविच्या ज्वार संशोधन केंद्रात प्रोत्साहनपर कार्यशाळा व अवजारे वाटप कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत ज्वार संशोधन केंद्र व अखिल भारतीय समन्वयित ज्वार सुधार प्रकल्प, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना (एस.सी.एस.पी.) अंतर्गत प्रोत्साहनपर कार्यशाळा व अवजारे वाटप कार्यक्रमाचे दिनांक २४ मार्च २०२६ रोजी आयोजन पशुसंवर्धन यांत्रिकीकरण केंद्राच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे तसेच अ.भा.स. पशु शक्तीचा योग्य वापर योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे उपस्थित होते. यावेळी ज्वार संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे यांचीही उपस्थिती लाभली.

उद्घाटनपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेचे महत्त्व विशद करताना शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज अधोरेखित केली. ज्वार संशोधन केंद्राच्या शतकीय गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत त्यांनी ज्वारी उत्पादनात झालेली वाढ नमूद केली; मात्र मागील काही दशकांत ज्वारीखालील क्षेत्र घटत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बदलते हवामान, बाजारपेठेतील अनिश्चितता, तसेच पिकांच्या निवडीतील बदल ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सखोल कारणमीमांसा करून क्षेत्रवाढीसाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. सुधारित वाणांचा प्रसार, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रक्रिया व मूल्यवर्धनावर भर, तसेच बाजारपेठेशी थेट जोडणी यावर त्यांनी विशेष भर दिला. जनजागृतीसाठी अशा कार्यशाळा, प्रात्यक्षिके व शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. तसेच, मूल्यवर्धन ही काळाची गरज असून ज्वारीपासून विविध पौष्टिक व बाजारपेठाभिमुख उत्पादने तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना संशोधन, विस्तार आणि शेतकरी यांच्यात सुसंवाद व समन्वय वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान अनुसूचित जातीतील ५० लाभार्थी शेतकऱ्यांना शेती अवजारे, विविध निविष्ठा, विद्यापीठ दिनदर्शिका तसेच ज्वारीपासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविकात ज्वारी संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. अंबिका मोरे यांनी केंद्राच्या संशोधन कार्याचा आढावा घेत एस.सी.एस.पी. योजनेअंतर्गत अवजारे वाटपाचा उद्देश स्पष्ट केला. तांत्रिक सत्रात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. गजानन गडदे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. दडके, प्रा. प्रीतम भुतडा व डॉ. प्रशांत अंबिलवादे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. गणपत कोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्वारी संशोधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा प्रसार काळाची गरज; ‘वन हेल्थ’ संकल्पनेवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा भर

सेंद्रिय व नैसर्गिक शेती प्रशिक्षणासाठी वनामकृवि, परभणी येथे दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २४ ते २५ मार्च २०२६ दरम्यान पार पडत असून, उद्घाटन समारंभ दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृह क्र. १८ येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे तसेच प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. अभिषेक घोडके, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे आणि प्रगतशील शेतकरी श्री. रामराव निळे, श्री. कृष्णा गव्हाणे, श्री. प्रतापराव काळे, श्री. गोविंदराव दुधाटे हे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व, रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक झाल्यामुळे अन्नातील अवशेष वाढून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच माती, पाणी व पर्यावरणाचे प्रदूषण वाढत असून जमिनीची सुपीकता घटत आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी “वन हेल्थ” (One Health) या संकल्पनेवर विशेष भर दिला. मानव, प्राणी, जमीन, वनस्पती आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा परस्परसंबंध लक्षात घेऊन सर्वांगीण आरोग्य जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निरोगी मातीमुळे निरोगी पिके व दर्जेदार अन्न तयार होते आणि त्यामुळे मानवी आरोग्य सुधारते,

यामुळे शेतकरीच जगाच्या आरोग्याचे रक्षक आहेत असे त्यांनी नमूद केले. तसेच रासायनिक शेतीमुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांचा नफा कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. याउलट नैसर्गिक शेती पद्धतीत कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य असून जमिनीची गुणवत्ता सुधारते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळूहळू रासायनिक शेतीचा वापर कमी करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व प्रशिक्षण समन्वयक डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिके, तांत्रिक सत्रे व चर्चासत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाणार असून मराठवाडा विभागातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीबाबत जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास माननीय कुलगुरूंनी व्यक्त केला.





Saturday, March 21, 2026

वनामकृविमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद प्रायोजित हिवाळी शाळेचा (प्रशिक्षणाचा) समारोप संपन्न

मायक्रोबायोम प्रशिक्षणातून ज्ञानवृद्धी; शिक्षण-संशोधन-विस्तार समन्वयावर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा भर

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 
माजी कुलगुरू माननीय डॉ. सुभाष पुरी 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय हिवाळी शाळेचा समारोप सोहळा दिनांक २० मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या परिसंवाद सभागृहात उत्साहात पार पडला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि इम्फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉ. सुभाष पुरी होते.

व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही विद्यापीठाची प्रमुख कार्ये असून या सर्वांमध्ये सुसंघटित समन्वय असणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठात हे कार्य यशस्वीपणे राबविले जात असल्यामुळे त्यांनी तिन्ही संचालकांचे अभिनंदन केले.

विद्यापीठात शिक्षण, संशोधन आणि विस्ताराशी संबंधित अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून मायक्रोबायोम तंत्रज्ञानावरील सहा राज्यांतील २५ प्रशिक्षणार्थींना या विद्यापीठात प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींच्या ज्ञानात आणि दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला असून, त्यांनी नवीन कल्पना व तंत्रज्ञान आत्मसात केले. मागील २१ दिवसांत प्रशिक्षणार्थींसोबत अनेकदा संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची झळाळी हेच विद्यापीठाच्या यशाचे खरे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणाविषयी बोलताना त्यांनी पिक संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या वाढते शहरीकरण, अन्नसुरक्षा, पाणीटंचाई आणि हवामान बदल यांसारख्या समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. मात्र, कृषि आणि अवकाश विज्ञान क्षेत्रात भारताने उच्च दर्जाचे कार्य केले असून, त्यामुळे आपण अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी झालो आहोत. या प्रगतीत आणखी वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयजी (AIG) मॉडेलचे विश्लेषण करताना त्यांनी शिक्षण, उद्योग आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच उत्पादनात सातत्य राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी, प्रशिक्षण संपल्यानंतरही कोणतीही मदत हवी असल्यास विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन करून त्यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यापीठात आयसीएआर, सीएम फंड, आरकेव्हीवाय आणि डीएसटी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे मृदा संरक्षण, पीक संरक्षण, शिक्षण, विविध तंत्रज्ञान आणि विस्तार कार्यावर विशेष भर दिला जात आहे. यामुळे विद्यापीठात अनेक प्रकल्प मंजूर होत असून, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मानांकनात विद्यापीठास ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुणे माननीय डॉ. सुभाष पुरी यांनी आपल्या भाषणात शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. ज्ञानाची सतत उजळणी व अद्ययावतता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रशिक्षणामुळे सहा राज्यांतील २५ प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून त्याचा उपयोग पिकांची प्रतिकारशक्ती वाढविणे व उत्पादनवाढीसाठी होईल, असे त्यांनी सांगितले. जैविक कीड नियंत्रण व बायो-एजंट तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आंतरशाखीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी प्रशिक्षणाचे उच्च दर्जाचे नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्षात वापरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अभ्यासिका समन्वयक डॉ. गजेंद्र जगताप यांनी प्रस्तावना सादर करताना प्रशिक्षणाची पार्श्वभूमी मांडली. मागील २१ दिवसांत व्याख्याने, प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना मायक्रोबायोम विषयक सखोल ज्ञान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थींनी १९ व्या दिवशी केलेल्या सादरीकरणामुळे त्यांच्या ज्ञानात उल्लेखनीय वाढ झाल्याचे दिसून आले, असेही त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणार्थी डॉ. सौंदरा राजन (विभाग प्रमुख, केंद्रीय कॉफी संशोधन संस्था, चिकमगळूर, कर्नाटक) यांनी आपल्या मनोगतात ३७ हून अधिक व्याख्याने व प्रक्षेत्र भेटी ज्ञानवर्धक ठरल्याचे सांगितले. तसेच त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजकांनी दिलेल्या उत्तम आदरातिथ्याबद्दल त्यांनी आभार मानले. याबरोबरच डॉ. आर. एस. डावरे (विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र वाशीम) व डॉ. दिव्या राणी (शास्त्रज्ञ, आरएआरएस, तेलंगणा) यांनीही ड्रोन तंत्रज्ञान व इम्पॅक्ट अॅनालिसिससह सर्व व्याख्यानांचे कौतुक केले.

प्रशिक्षणार्थ्यांच्या चार गटांमधून सादरीकरण स्पर्धा दिनांक १८ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गट ‘अ’ ला प्रथम क्रमांक मिळाला. या गटामध्ये डॉ. सौरभ पद्मशाली, डॉ. व्ही. पी. अग्रवाल, डॉ. एन. एस. उयके, डॉ. प्रीतम भुतडा व डॉ. एस. ए. शिंदे यांचा सहभाग होता. तर गट ‘डी’ हा उपविजेता ठरला. या गटामध्ये डॉ. एम ए खान, डॉ. श्रुती के., डॉ. पी. ए. मगरे, डॉ. बी. आर. गजभिये व डॉ. एस. जी. शिंदे यांचा सहभाग होता.

समारोप कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. नीता गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सचिन मोरे, शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांसह सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले, तर आभार डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. समारोप कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, शास्त्रज्ञ व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. एस. एल. बडगुजर,  डॉ. विक्रम घोळवे, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. अनंत दौंडे, डॉ. एम. एस. दडके, श्री. कपिल निर्वळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.


शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
गट ‘अ’ - डॉ. सौरभ पद्मशाली, डॉ. व्ही. पी. अग्रवाल, डॉ. एन. एस. उयके, डॉ. प्रीतम भुतडा व डॉ. एस. ए. शिंदे 
गट ‘डी’ -डॉ. एम ए खान, डॉ. श्रुती के., डॉ. पी. ए. मगरे, डॉ. बी. आर. गजभिये व डॉ. एस. जी. शिंदे

अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप 
सहा राज्यांतील २५ प्रशिक्षणार्थीं

अभ्यासक्रम उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर 

प्रशिक्षणार्थी डॉ. सौंदरा राजन

प्रशिक्षणार्थी डॉ. दिव्या राणी 


प्रशिक्षणार्थी डॉ. आर. एस. डावरे 



प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठीचा चमू