Wednesday, April 15, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांची भेट

 विकास कामांबाबत सकारात्मक व फलदायी चर्चा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांच्यामध्ये कृषि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सखोल व सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा व शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुलींच्या वसतिगृहाचा वरचा मजला बांधकाम, सुसज्ज रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक जिम, प्रशस्त सभागृह तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी संरक्षण भिंत उभारणी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व कामांसाठी आवश्यक प्रस्तावांची तातडीने पूर्तता करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिले. त्यास प्रतिसाद देत माननीय आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांनी या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, उप-अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. खंदारे, सीताफळ संशोधन केंद्राचे डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अनुदानातून तयार करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मुलींच्या वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, सुविधा व शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.





Tuesday, April 14, 2026

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; विचारांचे वर्षभर आचरण करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण, दीपप्रज्वलन व धूपार्पण करून करण्यात आली.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वामन काळबांडे आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते, असे नमूद केले. त्यांच्या जन्माच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांच्या कठोर राजवटीखाली भारतीय जीवन अत्यंत कठीण झाले होते. १८६० ते १९०० या चाळीस वर्षांच्या कालावधीत भारतात अनेक थोर महापुरुषांचा जन्म झाला आणि त्याच काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्म झाला. यावरून असे दिसून येते की, जेव्हा समाजाला पीडा होते, तेव्हा महान विभूतींचा जन्म होतो.

पूर्वी समाजात अनेक रूढी-परंपरा होत्या, ज्या अज्ञानाचे परिणाम होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हे अज्ञान दूर करून जनतेचे कल्याण साधले. त्यांनी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्वतः अत्यंत उच्च शिक्षण घेतले आणि “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतीय संविधानाची अतुलनीय निर्मिती केली. याशिवाय त्यांनी कृषी, अर्थव्यवस्था, जलसंधारण, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, महिलांचे अधिकार, विषमता आणि अस्पृश्यता निर्मूलन अशा विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत सामाजिक क्रांती घडवून आणली.

सध्याच्या युगात शाश्वत शेती आणि आत्मनिर्भरता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, आणि या विचारांचे बीज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच पेरले होते, असे त्यांनी नमूद केले. आज जगात अनेक ठिकाणी अशांतता असली तरी आपण शांततेत आहोत, याचे श्रेय महामानवांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आपल्या समाजाला जाते, असेही त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्राचा अभिमान आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

तथागत भगवान बुद्धांचे शिक्षण संपूर्ण जगासाठी आदर्श आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या पंचशील तत्त्वांचा स्वीकार केला होता, आणि आपण सर्वांनीही त्यांचे आचरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. थायलंड आणि जपान हे बौद्धधर्म स्वीकारलेले देश शांत आणि प्रगत राष्ट्रे आहेत, तसेच त्या देशांत भारतीयांना सन्मानाचे स्थान दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी विद्यापीठात महामानवांच्या जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे वर्षभर आचरण करावे, असे सांगून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे प्रतिपादन केले. पूर्वी समाजातील अनेकांचा आवाज दाबला जात होता; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अन्यायाविरुद्ध उभे राहत परिवर्तन घडवून आणले आणि दडपलेला आवाज बुलंद केला. त्यांनी स्वतः अनेक संघर्ष सहन करत समाजसुधारणेसाठी कार्य केले व मानवाला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा मिळवून दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यासोबतच पंचशीलाचे अनुकरण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रस्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करून महामानवांच्या विचारांचे आणि पंचशीलाचे आचरण जीवनात करावे, असे सांगितले.

याप्रसंगी डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी याचना सादर केली, तर पूज्य भदंत मुदितनंद थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे अनुग्रहण करून आशीर्वाद गाथा दिली. तसेच त्यांनी देश बळकट करण्यासाठी पंचशीलाच्या आचरणाचे महत्त्व स्पष्ट केले. पंचशीलाच्या आचरणातून विद्यापीठ, देश आणि संपूर्ण समाज प्रगल्भ होईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी महाविद्यालयातील ऋतुजा वारे विद्यार्थिनीने परखड शब्दांत व जोशपूर्ण भावनेत आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगताने आणि लेझीम पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी आशुतोष मदेवाड आणि वेदांत दापके यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मानले.

यासोबतच विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांनी आपापल्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले, तसेच विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीस्तरीय समितीचे अध्यक्ष वामन काळपांडे, उपाध्यक्ष गोविंद दराडे, कोषाध्यक्ष सुमेध कांबळे, सचिव चंद्रशेखर खुनेवाड व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.












Monday, April 13, 2026

वनामकृविद्वारा सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथे तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाचे भूमिपूजन

तीळ बियाणे केंद्रामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व उत्पादनवाढीला चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोमनाथपूर (ता. उदगीर, जिल्हा लातूर) येथील कृषि संशोधन केंद्रात राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत (२०२५-२६ ते २०२९-३०) मंजूर तीळ बियाणे केंद्रासाठी बीज प्रक्रिया व साठवणूक गृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खाद्यतेल पिकांच्या उत्पादनवाढीसाठी शुद्ध व दर्जेदार बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या तीळ बियाणे केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता वाढून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होईल. तसेच, राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हे केंद्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, शुद्ध व प्रमाणित तीळ बियाणे उपलब्ध होणार असून, त्यातून उत्पादनवाढीसोबतच त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच, स्थानिक स्तरावर बीज प्रक्रिया व साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाल्याने बियाण्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे सुलभ होणार आहे.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, कृषि महाविद्यालय (लातूर) चे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषि व्यवस्थापन महाविद्यालय (चाकूर) चे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रभारी अधिकारी प्रा. सुधीर सूर्यवंशी यांनी तीळ बियाणे केंद्र स्थापन करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, या केंद्रामुळे गुणवत्तापूर्ण बियाण्यांची निर्मिती, प्रक्रिया व साठवणूक यामध्ये मोठी सुधारणा होऊन शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अमोल सुनेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भगवान कांबळे, श्री. जोगदंड, श्री. प्रमोद कांबळे तसेच कंत्राटदार श्री. साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.






Sunday, April 12, 2026

वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात पालवी ऍग्रोद्वारे परीसर मुलाखत; २७ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रभावी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालवी ऍग्रो, पुणे या नामांकित कृषी उद्योग संस्थेच्या वतीने दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी परीसर मुलाखत (कॅम्पस इंटरव्ह्यू) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या पुढाकाराने पार पडला.

या निवड प्रक्रियेसाठी पालवी ऍग्रो कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांची सखोल मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण तसेच उद्यानविद्या, आधुनिक शेती तंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील ज्ञानाची कसून पडताळणी करण्यात आली. विशेष म्हणजे, उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.

या प्रक्रियेत एकूण २७ पदवीधर व ०५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तसेच महाविद्यालयातील उच्च दर्जाच्या शिक्षण व प्रशिक्षणाची प्रचिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी विशेष अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्पर्धात्मक युगात सक्षमपणे उभे राहतात, असे नमूद केले.

प्लेसमेंट अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी व डॉ. आनंद दौंडे यांच्यासह डॉ. वैशाली भगत, डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते, प्रा. शम्मा पठाण व इतर प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.

या यशस्वी उपक्रमामुळे उद्यानविद्या महाविद्यालयाने उद्योग-शिक्षण दुवा अधिक बळकट करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.






नोकरी शोधणारे नव्हे, तर निर्माण करणारे बना : वनामकृविच्या गोळेगाव कृषी महाविद्यालयात माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयास वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयीन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी त्यांनी प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. आपल्या प्रेरणादायी भाषणात ते म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये व उद्योजकता आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. “नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे बना,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमातील सातव्या सत्रातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत इंडस्ट्रियल अटॅचमेंट व व्हिलेज अटॅचमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीतील समस्या, तंत्रज्ञानाचा वापर व शेतकऱ्यांच्या गरजा समजून घ्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ व संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या शिफारशींचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आठव्या सत्रातील अनुभवातून शिक्षण कार्यक्रमाच्या (Experiential Learning Programme) मॉडेल अंतर्गत हँड्स-ऑन प्रशिक्षण, कौशल्य विकास, उत्पादन प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन व्यवस्थापन या घटकांवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग उभारावेत, असे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात स्टार्टअप्स, अॅग्री-उद्योजकता व नवकल्पनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

भविष्यात पारंपरिक नोकऱ्यांच्या संधी कमी होत चालल्या असून, नव्या तंत्रज्ञानावर आधारित कृषी व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, कृषी सेवा केंद्रे व डिजिटल कृषी यांसारख्या क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य व नवोन्मेषाच्या बळावर स्वतःसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे ध्येय ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण विभागाचे डॉ. प्रवीण राठोड, डॉ. डी. एच. सारंग यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दिशा मिळाली असून कृषी क्षेत्रातील संधींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.




वनामकृविच्या बदनापूर कृषि महाविद्यालयात ऑयस्टर मशरूम प्रयोगशाळा इमारतीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

 मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, बदनापूर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली पुरस्कृत ‘अनुभवातून शिक्षण’ प्रकल्पांतर्गत “आयस्टर अळंबी बीज उत्पादन आणि लागवड प्रयोगशाळा इमारती” चे भूमिपूजन गुरुवारी दि. ९ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, डॉ. सुर्यकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले की, मशरूम शेती हा कमी जागेत, अत्यल्प पाण्यात व कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारा अत्यंत लाभदायक व शाश्वत व्यवसाय आहे. बदलत्या हवामान परिस्थितीतही हा व्यवसाय सहजपणे करता येतो, ही त्याची मोठी जमेची बाजू आहे.  ते पुढे म्हणाले की, या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे मराठवाड्यातील ग्रामीण युवक, महिला बचत गट तसेच शेतकरी बांधवांना कमी गुंतवणुकीत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यामुळे केवळ आर्थिक उत्पन्न वाढणार नाही, तर ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक बळकट होईल. तसेच, मशरूम उत्पादनासोबत त्याचे प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि विपणनाच्या संधी निर्माण होऊन कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे बदनापूर परिसर मशरूम उत्पादन व प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील यांनी व्यक्त केला. तर प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष पवार यांनी माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका (अर्न व्हाईल यू लर्न) या उपक्रमांतर्गत ही प्रयोगशाळा पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑयस्टर मशरूमचे बीज (स्पॉन) तयार करणे, लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व विपणन यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या च्या ‘अनुभवातून शिक्षण’ या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कृषि पदवीचे शिक्षण घेतानाच त्यांच्यामध्ये उद्योजकता विकासीत बनवणे हा आहे, असे सांगितले.

भूमिपूजन सोहळ्यासाठी उप-अभियंता इंजि. श्री. सुहास धारासुरकर व शाखा अभियंता इंजि. श्री. शेख अहेमद शेख हुसेन, बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, कंत्राटदार श्री कृष्णा जी. उत्तरवार यांच्यासह कृषी महाविद्यालय बदनापूर येथील प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





वनामकृविच्या वर्षा मुलींच्या वस्तीगृहात सलग १८ तास वाचन कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन

महान व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शातून विद्यार्थ्यांनी घडवावा सर्वांगीण विकास : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वर्षा मुलींच्या वस्तीगृहात सकाळी सहा वाजल्यापासून सलग १८ तास वाचन कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार तसेच वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या महान व्यक्तिमत्त्वांचे गुणवैशिष्ट्ये अभ्यासून त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दररोज १८ तास ज्ञानार्जन करत असत आणि त्यांना वाचनाची विशेष आवड होती. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अधिकाधिक वेळ अभ्यास करून वैयक्तिक प्रगती साधावी, असे त्यांनी नमूद केले.

तसेच महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमांमुळेच शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली असून आज शिक्षण घराघरात पोहोचले आहे, असेही त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समता, बंधुता आणि सहिष्णुता या मूल्यांचा अवलंब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करावा, असा संदेश त्यांनी दिला.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील खोटेपणा, भेदभाव, गरिबांचे शोषण आणि जातीयवाद दूर करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश समाजाला दिला.

वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांना आत्मसन्मान मिळवण्यासाठी उच्च शिक्षणाबरोबरच आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन वस्तीगृह अधीक्षिका डॉ. वीणा भालेराव, श्रीमती रेखा लाड, श्रीमती गंगा ढगे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी पंडित आणि ऋतुजा कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.