Friday, May 1, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा

राज्याच्या गौरवशाली परंपरेसोबत कृषि व शिक्षण क्षेत्रातील प्रगतीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन दिनांक  १ मे २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रीडा प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमानिमित्त बोलताना माननीय कुलगुरूंनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक परंपरा अत्यंत समृद्ध असून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व विविध विकास प्रक्रियांमध्ये राज्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक वारसा मोठा असून राष्ट्रविकासात राज्याचे योगदान अनमोल आहे. संत, वीर, राष्ट्रपुरुष, देशभक्त, योद्धे व समाजसुधारकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत अनेक महान व्यक्तिमत्त्वे घडली. महाराष्ट्रातील संत व समाजसुधारकांच्या कार्याचा आज संपूर्ण देश आदर्श घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच कृषी, अभियांत्रिकी, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती साधली असून कृषी क्षेत्रात राज्य देशाला दिशादर्शक ठरत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला असून राज्यपातळीवर अग्रगण्य स्थान मिळवले आहे. मागील तीन वर्षांत विद्यापीठाच्या दहा संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच विविध पुरस्कार व पदकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा अधिक उंचावली असून आर्थिक सहाय्य मिळण्यासही मदत होत आहे.

विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर अशा विविध क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत असून सध्याच्या अलनिनो संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विद्यापीठ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातील नकारात्मकतेचा प्रभाव स्वतःवर पडू न देता सकारात्मकतेने पुढे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनुष्यबळ कमी असतानाही विद्यापीठसातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन यावर भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले.








Thursday, April 30, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांना निरोप

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण विकास साधावा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) २०२२-२०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक ३० एप्रिल २०२६  रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. एस. डी. विखे, २०२२ बॅचचे समुपदेशक डॉ. एम. आर. मोरे व डॉ. व्ही. के. इंगळे उपस्थित होते.

या समारंभात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, चार वर्षे कृषि अभियांत्रिकीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आता हे विद्यार्थी शेती क्षेत्रात नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ड्रोन, ठिबक सिंचन, स्मार्ट शेती अशा तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे कृषि अभियंते ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके म्हणाले की, चार वर्षांत महाविद्यालयात संपादन केलेल्या ज्ञान व कौशल्याचा वापर पदवीधरांनी शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी करावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. तसेच त्यांनी माजी शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि) डॉ. उदय खोडके, माजी विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके व प्रभारी शिक्षण प्रा. विवेकानंद भोसले यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन केले.

विद्यार्थ्यांच्या वतीने ऋषीतिलक सातोनकर, समर्थ असुतकर, अंशिका राऊत, साक्षी क्षीरसागर व रोहित कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुरुवातीला प्रथम वर्षांच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मोहिनी चापके, श्रद्धा देशमुख व मुदिता इंगळे यांनी केले. डॉ. एस. डी. विखे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिकेत वाइकर व डॉ. गजानन वसू यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. रविंद्र शिंदे तसेच प्राध्यापक डॉ. प्रमोदिनी मोरे, प्रा. दत्तात्रेय पाटील, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. शैलजा देशवेना, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून बाभुळगाव येथे संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती अभियान

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प व भाकृअप - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था - क्रिडा, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील बाभुळगाव येथे “संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती अभियान” माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना मृदा आरोग्य सुधारणा, पीक उत्पादनवाढ व शेतीचा खर्च कमी करण्यासाठी संतुलित पोषण व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे हा होता.

यावेळी अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कोरडवाहू शेतीमध्ये संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करून मृदा परीक्षणावर आधारित खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होण्यासाठी तसेच दिर्घकालीन मृदा सुपीकता टिकवण्यासाठी मृदा परीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. या मध्ये सेंद्रीय खतांचा वापर, जिवाणू खतांचा वापर, पिक अवशेष व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती यावर भर देण्याचे आव्हान केले. याशिवाय येत्या खरीप हंगामात हवामान बद्लानुरूप तंत्रज्ञान उदा. वेळेवर मशागत, योग्य वाणांची निवड, बी. बी. एफ. तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर भर द्यावा असे सांगीतले.  डॉ. पी. एच. गौरखेडे, कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) यांनी स्थानिक उपलब्ध सेंद्रिय संसाधने, हिरवळीचे खत व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांचे महत्त्व सांगून मृदा उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.

श्रीमती ज्योती चांदणे (कृषी सहाय्यक), कृषी विभाग श्री. एस. एन. शेख (वरिष्ठ संशोधन सहयोगी) व श्री. एस. एम. खाटिंग (यंग प्रोफेशनल-वन) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सेंद्रिय खतांचा व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे टिकवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम कृषी विभाग, परभणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. या अभियानात २६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सर्व शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन पद्धती अवलंबण्याबाबत उत्सुकता दर्शविली.

कार्यक्रमादरम्यान शास्त्रज्ञांनी बाभुळगाव प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे यांच्या शेतावर भेट देऊन विविध शेती उपक्रमांची माहिती दिली. पशुखाद्यासाठी मुरघास (सायलेज) तयार करण्याची पद्धत, तण नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या आंतरमशागत प्रक्रिया, तसेच पीक अवशेष जमिनीत मिसळून मृदा सुपीकता, सूक्ष्मजीव व सेंद्रिय अन्नद्रव्य वाढविण्याचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. तसेच श्री. शिवाजी दळवे यांच्या शेतावरील संत्रा बागेलाही या वेळी भेट देण्यात दिली. याप्रसंगी फळबाग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन व मृदा आरोग्य टिकविण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पी. एच. गौरखेडे, कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदाशास्त्र) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. एन. शेख (वरिष्ठ संशोधन सहयोगी) व श्री. एस. एम. खाटिंग (यंग प्रोफेशनल-वन) यांनी पुढाकार घेतला.




Friday, April 24, 2026

वनामकृवित शाश्वत शेती व नैसर्गिक शेतीविषयक विभागस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

शाश्वत शेतीसाठी विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण उपक्रम; नैसर्गिक शेतीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानांतर्गत “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या संकल्पनेवर आधारित विभागस्तरीय कार्यशाळा दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातील दीक्षांत सभागृहात उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी आयुक्तालय, पुणे येथील आत्माचे संचालक तथा निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक माननीय श्री. सुनील बोरकर उपस्थित होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दौलत चव्हाण तसेच लातूर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रगतशील शेतकरी व तज्ञ मंडळी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, आजच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांचा उस्फूर्त सहभाग दिसून आला असून सभागृह पूर्ण क्षमतेने भरले, याबद्दल आयोजक व शेतकरी बांधवांचे त्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र हे शेती विकासासाठी देशाला दिशा देणारे राज्य आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील माननीय मुख्यमंत्री व कृषिमंत्री शेतकऱ्यांना देत असलेल्या सन्मानाचा उल्लेख केला. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करत असून, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी “माझा एक दिवस माझा बळीराजासोबत” तसेच आठवड्यातून दोन दिवस “ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद” असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय दरवर्षी तीन मोठ्या शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करून शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे. आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शनाद्वारे नैसर्गिक शेतीचे ज्ञान वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात शाश्वत शेतीसाठी माननीय राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून, याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ व ‘पोकरा’ (POCRA) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान अनुकूल व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा हे सर्व घटक एकत्रितपणे कार्य करत आहेत. नैसर्गिक पिकांसाठी विद्यापीठाकडून पीकनिहाय मानके देण्यात येत असून, यामुळे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीस चालना मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, जनतेलाही शुद्ध व पौष्टिक अन्न उपलब्ध होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

पुणे येथील आत्माचे संचालक तथा निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक माननीय श्री. सुनील बोरकर यांनी सांगितले की, निसर्गाने सर्व जीवांना जगण्याचा अधिकार दिला आहे आणि निसर्गातील संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळून सेंद्रिय पर्यायांचा वापर करावा. त्यांनी गुलाबी बोंड अळीचे उदाहरण देत सांगितले की, तिच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपायांपेक्षा निंबोळी अर्कासारखे सेंद्रिय उपाय अधिक प्रभावी ठरतात. यामुळे अंडी व अळी दोन्हींचे नियंत्रण होते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा अभ्यास करून नैसर्गिक व सेंद्रिय तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळा हे ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर यांनी केली. सूत्रसंचालन आत्मा, परभणीच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती स्वाती घोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी केले.

कार्यशाळेत नैसर्गिक शेतीची संकल्पना, तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, मृदा व जलसंवर्धन तसेच उत्पादनाच्या विपणन व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हवामानानुसार पिकांचे नियोजन व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रात्यक्षिके व पॅनल चर्चेचे आयोजनही करण्यात आले होते. प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे शेअरिंग करून इतरांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती मिळून त्यांच्या उत्पन्नवाढीस निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




Thursday, April 23, 2026

वनामकृवि व पोकरा प्रकल्प यांच्यात सामंजस्य करार; हवामान बदलास सक्षम शेतीसाठी संयुक्त उपक्रम

 सामंजस्य करारातून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


मराठवाड्यातील शेती अधिक शाश्वत व हवामान बदलास सक्षम करण्याच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प – पोकरा (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Prakalp (PoCRA) यांच्यात दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी मुबई येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

हा करार महाराष्ट्रातील प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधन उत्पादकता वाढविण्यासाठी आणि हवामान बदलास प्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी संरक्षणात्मक शेती (Conservation Agriculture for enhancing resource productivity and improving climate resilience in major cropping systems of Maharashtra) या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असून, राज्यातील प्रमुख पिक पद्धतींमध्ये संसाधनांचा कार्यक्षम वापर व हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता वाढविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. वर्ष २०२६ पासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुंबई येथे झालेल्या या करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि पोकरा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मीनल करणवाल (भाप्रसे) यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि रसायन आणि मृदा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ हरिहर कौसडीकर दोन्ही संस्थांतील वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

या कराराच्या माध्यमातून मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन, कमी खर्चिक व पर्यावरणपूरक शेती पद्धती, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व संशोधनात्मक सहकार्य करण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी सांगितले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करत उत्पादनक्षमतेत वाढ साध्य करण्यासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती व दर्जेदार साधनसामुग्रीचा (इनपुट्सचा) लाभ मिळेल. यामुळे केवळ कृषी उत्पादनक्षमता वाढणार नाही तर शेती अधिक लाभदायक, टिकाऊ आणि हवामान बदलास प्रतिरोधक बनण्यास मोठी मदत होईल.

तर पोकरा प्रकल्पाच्या वतीने या सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेती पद्धती आत्मसात करण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हा करार राज्यातील कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, संशोधन व प्रत्यक्ष शेती यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.



वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ २२ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, माजी विभागप्रमुख डॉ. सुनिता काळे, डॉ. मेधा उमरीकर, माजी प्राध्यापिका डॉ. आशा शेळके तसेच महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष व पदवी अभ्यासक्रमाचे पाल्य प्राध्यापक डॉ. शंकर पुरी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके यांनी मागील साडेचार महिन्यांपासून सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सांभाळला असल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे; तो कमावण्याची कला आत्मसात करा. आई-वडिलांच्या कष्टांची व शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जाणीव ठेवा. उच्च शिक्षण घ्या आणि संतुलित जीवनशैली अवलंबा.

डॉ. राहुल रामटेके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचे कार्य केले आहे. पुढील यशस्वी आयुष्याची इमारत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने व सकारात्मक दृष्टिकोनातून उभी करावी. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ प्रतिक्रिया न देता संयम ठेवावा, लक्ष केंद्रित ठेवून आचरण करावे आणि कठोर परिश्रम घ्यावेत. चार वर्षांत मिळालेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी शिस्त, बंधन व नैतिक मूल्ये जपावीत. तसेच कुटुंबाचा आधार बनून पालक व शिक्षकांचा सन्मान राखावा.

याप्रसंगी महाविद्यालयातील माजी प्राध्यापिका डॉ. सविता काळे, डॉ. मेधा उमरीकर, डॉ. आशा देशमुख तसेच जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ, महाविद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावनिक भावना मांडल्या.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.










Monday, April 20, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे भेट; कडधान्य संशोधनातील सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. १८ एप्रिल २०२६ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेस ( ICAR-Indian Institute of Pulses Research) भेट दिली.

यावेळी भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथे रब्बी कडधान्य प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी यांनी माननीय कुलगुरूंचे स्वागत करून संस्थेमध्ये कडधान्य सुधारणा (Pulses Improvement) क्षेत्रात केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कडधान्य संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ डॉ. मनमोहन देव, डॉ. प्रसून वर्मा आणि इतर यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर सखोल चर्चा केली. तसेच त्यांनी तेथील मिनी डाळ मिल व कडधान्य प्रक्रिया युनिटमधील आधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली.

या भेटीदरम्यान हरभरा (Chickpea) व तूर (Pigeonpea) पिकांच्या संशोधन क्षेत्रात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या सहकार्यामुळे कडधान्य उत्पादनवाढ व शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी नमूद केले.




Visit of Hon’ble Vice Chancellor of VNMKV to ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur; Emphasis on Strengthening Collaboration in Pulses Research

The Hon’ble Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited the ICAR–Indian Institute of Pulses Research (IIPR), Kanpur, on April 18, 2026.

On this occasion, Dr. Shailesh Tripathi, Project Coordinator (Rabi Pulses), welcomed the Hon’ble Vice Chancellor and provided a detailed overview of the institute’s work in the field of Pulses Improvement.

Subsequently, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani held a meeting with scientists including Dr. Manmohan Dev, Dr. Prasun Verma, and others, where in-depth discussions were conducted on various aspects of pulses research. He also visited the Mini Dal Mill and pulses processing unit to review the modern machinery installed there.

During the visit, constructive discussions were held regarding strengthening collaboration between ICAR–Indian Institute of Pulses Research, Kanpur and Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth in the research of chickpea and pigeonpea crops. The Hon’ble Vice Chancellor noted that this collaboration would significantly contribute to increasing pulses production and making improved technologies available to farmers.