Monday, February 23, 2026

कृषि शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश : एआय फार ॲग्री (AI4Agri) जागतिक परिषदेत तज्ज्ञांची सखोल चर्चा

कृषि शिक्षणात एआय समावेशासाठी तातडीच्या कृतीची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन


दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषि शिक्षण, संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) प्रभावीपणे समाविष्ट करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. एआय फार ॲग्री (AI4Agri) २०२६ जागतिक परिषद आणि गुंतवणूक शिखर परिषदे अंतर्गत आयोजित कृषि शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य प्रवाहिकीकरण : कौशल्ये, नवोन्मेष, इनक्युबेशन आणि संस्थात्मक रूपांतरण” (Mainstreaming Artificial Intelligence in Agricultural Education: Skills, Innovation, Incubation and Institutional Transformation) या विषयावरील गोलमेज चर्चासत्रात हे विचार मांडण्यात आले.

या चर्चासत्राचे आयोजन महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, हे सत्र इंडिया एआय  इम्पॅक्ट समीट २०२६ (India AI Impact Summit 2026) शी संलग्न उपक्रम म्हणून पार पडले. कार्यक्रमाचे संयोजन एआय फार ॲग्री संशोधन नेटवर्क (AI4Agri Research Network -AI4ARN) अंतर्गत करण्यात आले.

मुख्य भाषणात हैद्राबाद येथील हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट - ICRISAT – International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) माननीय महासंचालक डॉ. हिमांशु पाठक यांनी कृषि शिक्षणात एआय, डेटा सायन्स व डिजिटल तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित होतील, असे प्रतिपादन केले.

या चर्चासत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रीस्तोलचे माननीय कुलगुरू प्रा. इव्हलिन वेल्च, व्हीजेटीआयचे  प्रा. फारूक काझी, तसेच आयसीएआर – नार्मचे डॉ. रामसुब्रमणियन यांनी अभ्यासक्रम सुधारणा, प्राध्यापक प्रशिक्षण व आंतरशाखीय अध्यापनाच्या गरजेवर सविस्तर मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने परिवर्तन घडवून आणले असून, उच्च कृषि शिक्षण संस्थांनी या बदलांना सामोरे जाण्यासाठी तातडीने व धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 तसेच आयसीएआरच्या सहाव्या डीन समितीच्या शिफारसीनुसार पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ६ ते १० श्रेयांक (क्रेडिट्स) MOOCs/ऑनलाईन अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर “कृषि क्षेत्रातील एआयया विषयावर ६–१० क्रेडिट्सचे MOOCs अभ्यासक्रम विकसित करून शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हे अभ्यासक्रम यूजीसी मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत ठेवून SWAYAM व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्यास देशभरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच उच्च दर्जाच्या शैक्षणिक सामग्री निर्मितीसाठी प्रत्येक कृषि विद्यापीठात प्रोफेशनल MOOC डेव्हलपमेंट लॅब स्थापन करण्याची गरज असून, त्यामध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ, व्हिडिओ एडिटिंग सुविधा, एआय-आधारित कंटेंट क्रिएशन टूल्स, एलएमएस इंटिग्रेशन व प्रशिक्षित मनुष्यबळ असावे, असे मत व्यक्त करण्यात आले. अभ्यासक्रम रचना, तांत्रिक मार्गदर्शन व उद्योगस्नेही केस स्टडीसाठी आघाडीच्या एआय उद्योग भागीदारांशी सहकार्य केल्यास गुणवत्ता व व्यावहारिक उपयुक्तता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विद्यापीठांसाठी स्वतंत्र एआय एकत्रीकरण अर्थसंकल्प उपलब्ध करून देणे, विभागस्तरावर एआय सॉफ्टवेअर लायसन्स, संशोधन साधने, डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म व क्लाऊड संगणन संसाधनांसाठी निधी देणे अत्यावश्यक असल्याचे यांनी नमूद केले.

दुसरा विषय अनुभवाधारित शिक्षण, सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा व संयुक्त अध्यापन याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, थायलंड येथील आशियन तंत्रज्ञान संस्था, नेदरलँड्स येथील वागेनीनगन युनिव्हर्सिटी आणि संशोधन संस्था   (Wageningen University & Research), तसेच आय आय टी खरगपूर येथील तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

तिसऱ्या विषयात कृषि विद्यापीठांमध्ये इनक्युबेशन केंद्रांची स्थापना, स्टार्टअप संस्कृतीचा विकास व उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, तसेच पुणे येथील कृषि परिषदेच्या माननीय महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (आयएएस) यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.

या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. सुनील डी. गोरंटीवार यांनी केले. प्रारंभी त्यांनी कृषि क्षेत्रात एआयच्या वाढत्या उपयोगावर तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या गरजेवर प्रकाश टाकला.

चर्चेच्या शेवटी कृषि शिक्षणात एआय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासक्रम सुधारणा, कौशल्य विकास कार्यक्रम, डिजिटल पायाभूत सुविधा व स्टार्टअप–आधारित उपक्रम राबविण्याबाबत शिफारसी मांडण्यात आल्या. या उपक्रमामुळे भविष्यात कृषि क्षेत्रात एआय–आधारित रोजगार व नवोन्मेषाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

एआय फार ॲग्री (AI4Agri) २०२६ जागतिक परिषद आणि गुंतवणूक शिखर परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजेंद्र जगताप तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व विद्यार्थी उपस्थित होते.




Integration of Artificial Intelligence in Agricultural Education: In-depth Deliberations by Experts at the AI4Agri Global Conference

 

Urgent Need for Immediate Action to Integrate AI in Agricultural Education: Assertion by Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

On 23 February 2026, experts expressed the view that strategic changes are essential for the effective integration of Artificial Intelligence (AI) in the fields of agricultural education, research, and innovation. These views were shared during a roundtable discussion on the theme “Mainstreaming Artificial Intelligence in Agricultural Education: Skills, Innovation, Incubation and Institutional Transformation”, organized under the AI4Agri 2026 Global Conference and Investment Summit.

This discussion session was organized at the initiative of the Government of Maharashtra and was conducted as an associated program of the India AI Impact Summit 2026. The event was coordinated under the AI4Agri Research Network (AI4ARN).

In the keynote address, Dr. Himanshu Pathak, Director General of the International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics (ICRISAT), Hyderabad, emphasized that integrating AI, data science, and digital technologies into the agricultural education curriculum would help develop employment-oriented skills among students.

During this discussion session, the Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University Prof. (Dr.) Indra Mani, the Hon’ble Vice-Chancellor of the University of Bristol Professor Evelyn Welch, VJTI’s Dr. Faruk Kazi, and ICAR–National Academy of Agricultural Management’s Dr. Ramasubramanian provided detailed guidance on the need for curriculum reforms, faculty training, and interdisciplinary teaching.

Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, stated that Artificial Intelligence (AI) technology is bringing about unprecedented transformation across the world, and that higher agricultural education institutions must take immediate and strategic steps to respond to these changes. He further noted that, in accordance with the National Education Policy (NEP) 2020 and the recommendations of the Indian Council of Agricultural Research Sixth Deans’ Committee, 6 to 10 credits of MOOCs/online courses have been made mandatory for undergraduate students.

In this context, he emphasized the need to develop MOOCs carrying 6–10 credits on the theme “AI in Agriculture” and implement them from the academic year 2026–27. He also stated that making these courses available on the SWAYAM platform, in alignment with University Grants Commission guidelines, would benefit students across the country.

He further expressed that, for the creation of high-quality academic content, there is a strong need to establish a professional MOOC development laboratory in every agricultural university, equipped with recording studios, video editing facilities, AI-based content creation tools, LMS integration, and trained manpower. He added that collaboration with leading AI industry partners for curriculum design, technical guidance, and industry-oriented case studies would significantly enhance both quality and practical relevance.

Going forward, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani also stressed the importance of providing a dedicated AI integration budget for agricultural universities, along with department-level funding for AI software licenses, research tools, data analytics platforms, and cloud computing resources, which he described as absolutely essential.

The second theme focused on experiential learning, shared digital infrastructure, and joint teaching. In this session, views were shared by Hon’ble Vice-Chancellor Dr. Sharad Gadakh of Dr. Panjabrao Deshmukh Krushi Vidyapeeth, experts from the Asian Institute of Technology, Wageningen University & Research, and Indian Institute of Technology Kharagpur.

Under the third theme, which addressed the establishment of incubation centers in agricultural universities, development of a startup culture, and strengthening industry–university collaboration, Hon’ble Vice-Chancellor Dr. Vilas Kharche of Mahatma Phule Krushi Vidyapeeth, along with Hon’ble Director General Mrs. Varsha Ladda-Untwal (IAS) of the Agricultural Council, provided valuable guidance and suggestions.

The session was moderated by Dr. Sunil D. Gorantiwar. In his opening remarks, he highlighted the growing application of Artificial Intelligence (AI) in the agricultural sector and emphasized the need for developing a skilled workforce to effectively harness these technologies.

At the conclusion of the discussion, recommendations were presented to mainstream AI in agricultural education through curriculum reforms, skill development programmes, strengthening of digital infrastructure, and promotion of startup-based initiatives. The participants expressed confidence that these measures would foster AI-driven employment opportunities and innovation in the agricultural sector in the future.

During the AI4Agri 2026 Global Conference and Investment Summit, Vasantrao Naik Marathwada Agricultural University was represented by Dr. Bhagwan Asewar, Director of Instruction; Dr. Rakesh Ahire, Director of Extension Education; Dr. Suryakant Pawar, Associate Director of Research; Dr. Gajendra Jagtap, along with senior scientists from various departments of the university and students.


Friday, February 20, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान “व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींवर (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि जॉब ऑपर्च्युनिटीज)” या विषयावर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम भाकृअप एससी-एसपी (ICAR SC-SP) अनुदानांतर्गत, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या व शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

प्रशिक्षणाचा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामेटेके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर उद्घाटन शिवाजी कॉलेज, परभणीचे रजिस्ट्रार श्री. विजय मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रभारी प्राचार्य प्रा. विवेकानंद भोसले, प्रशिक्षण समन्वयक डॉ. मधुकर मोरे व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

तीन दिवसांच्या प्रशिक्षणात व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्ये, SWOT विश्लेषण, ग्रुप डायनॅमिक्स व टीम बिल्डिंग, शिस्त व आचरण, करिअरच्या संधी, कॅम्पस इंटरव्ह्यूची तयारी, उच्च शिक्षण व प्लेसमेंट आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. विशाला पटणम, डॉ. पंडित निर्मळ, डॉ. प्रविण कापसे, श्री. शेखर अष्टिकर, डॉ. मधुकर मोरे, श्री. रामेश्वर चिलवंत (पुणे), डॉ. सुभाष विखे, प्रा. विवेकानंद भोसले, कन्सल्टंट डॉ. उपेंद्र सोनटक्के (मुंबई), प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी व्याख्याने दिली.

कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा होता. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेऊन त्यांच्या अनुभवांचे विश्लेषण करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम सहभागींसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, असे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

समारोप समारंभात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.







वनामकृविच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी शिवजन्मोत्सव २०२६ साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या भव्य पालखी मिरवणुकीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्वागत केले





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२६ निमित्त शिवजन्मोत्सव २०२६ विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १३ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये, ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यापीठ ग्रंथालयाजवळ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उपाध्यक्ष जिमखाना डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले महाविद्यालयाचे लेझिम पथक यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत केले. त्यानंतर माननीय कुलगुरू यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक संपन्न झाली. पुढे महाविद्यालयाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आकर्षक कवायतींसह लेझिम प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या शिवगर्जनेसह झालेल्या आगमनामुळे तसेच महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण वातावरण रोमांचकारी व प्रेरणादायी झाले.

कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या महाराष्ट्राशी आणि शिवरायांच्या विचारांशी असलेली नाळ अधोरेखित केली. याबाबत माननीय कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

कृषि महाविद्यालयाच्या शिवजन्मोत्सवाची सुरुवात १३ फेब्रुवारी रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने झाली. याच दिवशी दुपारी शिवशाहीर राजन सरवदे यांचा पोवाडा सादर करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा, १५ फेब्रुवारी रोजी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रश्नमंजुषा व दुपारी बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. १७ फेब्रुवारी रोजी प्रा. डॉ. प्रशांत कोठे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले, तर १८ फेब्रुवारी रोजी व्याख्याते श्री. गणेश शिंदे यांनी शिवचरित्रावर मार्गदर्शन केले.

उत्सवाचा मुख्य दिवस १९ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम पार पडला, तर सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

या शिवजन्मोत्सवाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. स्वाती झाडे, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. धीरज पाथ्रीकर, श्री. विजय गारकर, ०२२ बॅच व समस्त दगडी परिवार यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव २०२६ समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे, उपाध्यक्ष योगेश पुरी, कोषाध्यक्ष रणजित वडकुते व सचिव मोहन फुलवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला असून, संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.







Thursday, February 19, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांतून समाज व विद्यार्थ्यांनी घडवावे उज्ज्वल भविष्य - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय कुलगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत करून प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी श्री. संघर्ष शृंगारे, विद्यार्थी प्रतिनिधी तथा उत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण अनेक प्रेरणादायी मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. असे महान व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी माता जिजाबाई यांच्यासारखी संस्कारक्षम माता लाभणे आवश्यक आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय कार्य केले. त्यांनी रुजवलेली स्वराज्याची भावना आजही आपण अंगीकारली पाहिजे. पुढे ते म्हणाले की, येत्या चार वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला चारशे वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर ४०० वा, ५०० वा आणि अनंत काळापर्यंत त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावरून हे सिद्ध होते की महान कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण अनंतकाळ केले जाते. म्हणूनच समाजहितासाठी महान कार्य करण्याचे गुण आपण सर्वांनी अंगीकारावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात संरक्षण, आरोग्य, मान-सन्मान, शेतकरी कल्याण यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था होती. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. हे सर्व आदर्श गुण आजच्या समाजाने अंगीकारण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कार्यपद्धती देशाला दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, उज्ज्वल जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारावेत. विद्यापीठातील विद्यार्थी ऊर्जावान असून विविध महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात, हे कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांनी सर्व महाविद्यालयाचे जिमखाना विभाग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती आत्मसात करून ती संपूर्ण देशात पोहोचवावी, असे आवाहन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूरच्या आदिलशाही व मुघल सत्तेला आव्हान देत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ते कुशल प्रशासक, गनिमी कावा तंत्राचे जनक तसेच भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व समाजघटकांना समान सन्मान मिळत होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सांगितले की, शिवाजी महाराजांचे आचरण पावलोपावली केल्यास जीवन सुखकर व यशस्वी होईल.

यावेळी सभागृहात विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. तसेच विद्यार्थिनी साक्षी इंगळे यांनी केलेल्या शिवगर्जना आणि ऋतुजा वारे हिने केलेल्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह संचारला. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांच्या वतीने आयोजित स्पर्धांमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वामन काळबांडे व आशुतोष मदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.

विद्यापीठाच्या मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर शिवजयंती उत्सव साजरा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















वनामकृविद्वारा मानवत येथे ‘करडई शेती दिन’ उत्साहात संपन्न

करडई मधील ३४ टक्के तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प व हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करडई पिकावरील प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘करडई शेती दिन’ मानवत येथे उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम मानवत येथील आंबेगाव रोडवरील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. प्रसाद, कृषि विद्यावेत्ता डॉ. संजीव मलय्या तसेच शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा एन. डी. उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव” हा संदेश देत संशोधनाधिष्ठित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या करडई पिकामध्ये ३४ टक्के तेलाचे प्रमाण असलेले वाण उपलब्ध असून, भविष्यात ते ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे शेतकरी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे व सक्षम शास्त्रज्ञांमुळे जागतिक स्तरावर अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सन्मान हाच शेतीचा सन्मान असून, शेतकऱ्यांना भेटल्यावर देव आपोआप भेटतो, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. याप्रसंगी माननीय कुलगुरूंच्या हस्ते उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी संशोधनाधिष्ठित शेतीचे महत्त्व, विस्तार सेवांची भूमिका तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आर. डी. प्रसाद यांनी करडई पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे निदान याविषयी माहिती दिली, तर डॉ. संजीव मलय्या यांनी करडई पिकासाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत व संतुलित खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश धुतमल यांनी केले. यावेळी तज्ज्ञांनी करडई पिकातील सुधारित वाण, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत, संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. संतोष शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवत येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री व श्री. प्रतापराव सोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, परभणी येथील डॉ. घुगे, श्री. पांचाळ, श्री. मगर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तांत्रिक माहितीचा लाभ घेतला.








वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा

 शिवकाळ आणि आजचा भारत” विषयावर प्रा. अरविंद सगर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रा. अरविंद सगर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. धैर्य, संघटन कौशल्य व स्वराज्याची संकल्पना आजच्या युवकांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शनपर भाषणात प्रा. अरविंद सगर यांनी शिवकाळ आणि आजचा भारत” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास विसरता कामा नये, असे सांगत युवकांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवून नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थिनी कु. मोदीता इंगळे, कु. आरती शिंदे तसेच विद्यार्थी यशराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा उल्लेख करत देशप्रेम, शिस्त व संघभावना या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. सुमंत जाधव यांनी करून दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, शिवजन्म पाळणा उत्सव, छावा संगमेश्वर आदी ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण केले. ढोल व लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढली.

व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. विवेकानंद भोसले, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. सुमंत जाधव व डॉ. प्रमोदिनी मोरे उपस्थित होते. तसेच डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. शैलजा देशवेना यांचीही उपस्थिती होती. विद्यार्थी सतेज मेटकर, अथर्व घुगे, राम शेडगे, संकेत पवार, समर्थ असूटकर, अभिषेक गवळी तसेच जिमखाना विभागातील श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड, श्री. शंकर शामार्थी व श्री. हनुमंत ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किंजल मोरे व कु. शिवानी डोईजड यांनी केले, तर आभार प्रदर्शन राधेश्याम खंटीग यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक शोभिवंत व संस्मरणीय ठरला.










वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) SC-SP अनुदानांतर्गत व्यक्तिमत्त्व विकास व रोजगार संधींसाठी सॉफ्ट स्किल्स” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान यशस्वीरीत्या संपन्न झाला असून समारोप मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी शुभेच्छा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून रोजगारक्षम युवक घडविण्यास यामुळे निश्चितच मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सामुदायिक विस्तार व संपर्क व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडली.

तीन दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास वाढ, नेतृत्वगुण विकास, निर्णयक्षमता, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर तसेच रोजगाराच्या विविध संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ वीणा भालेराव आणि अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. उद्घाटन सत्रानंतर पहिल्या दिवशी व्यक्तिमत्त्व व संवाद कौशल्य वृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम यांनी करिअर विकासासाठी प्रभावी संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच प्रा. डॉ. पंडित निर्मल यांनी व्यक्तिमत्त्व विकासात भाषेची भूमिका उलगडून सांगितली. दुपारच्या सत्रात व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक श्री. शेखर आष्टिकर व शिवाजी महाविद्यालयाचे कुलसचिव विजय मोरे यांनी सॉफ्ट स्किल्स वृद्धीबाबत मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी पुण्याचे सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक श्री रामेश्वर चिलवंत यांनी अवचेतन मनाची शक्ती व न्यूरोप्लॅस्टिसिटी या विषयावर सखोल कार्यशाळा घेतली. यानंतर माननीय कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कपसे यांनी व्यक्तिमत्त्वाचे SWOT विश्लेषण व डिजिटल साधनांचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. वीणा भालेराव यांनी समुदायाशी नातेसंबंध वृद्धीवर व्याख्यान दिले.

तिसऱ्या दिवशी डॉ. शिवा ऐथाळ यांनी स्पष्ट विचारसरणी व निर्णयक्षमतेसाठी आवश्यक कौशल्यांवर प्रकाश टाकला. त्यानंतर डॉ. नीता गायकवाड यांनी सॉफ्ट स्किल्स व रोजगार संधी यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत अभिप्राय नोंदविला. समारोप सत्रात विकास क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. उपेंद्र सोनटक्के यांनी व्यावसायिक व वैयक्तिक यशासाठी सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले. या कार्यक्रमातून प्रभावी संवाद, निर्णयक्षमता तसेच रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास होऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी अधिक सक्षम करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.