Thursday, February 19, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांतून समाज व विद्यार्थ्यांनी घडवावे उज्ज्वल भविष्य - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय कुलगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत करून प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी श्री. संघर्ष शृंगारे, विद्यार्थी प्रतिनिधी तथा उत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण अनेक प्रेरणादायी मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. असे महान व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी माता जिजाबाई यांच्यासारखी संस्कारक्षम माता लाभणे आवश्यक आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय कार्य केले. त्यांनी रुजवलेली स्वराज्याची भावना आजही आपण अंगीकारली पाहिजे. पुढे ते म्हणाले की, येत्या चार वर्षांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला चारशे वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर ४०० वा, ५०० वा आणि अनंत काळापर्यंत त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावरून हे सिद्ध होते की महान कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण अनंतकाळ केले जाते. म्हणूनच समाजहितासाठी महान कार्य करण्याचे गुण आपण सर्वांनी अंगीकारावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात संरक्षण, आरोग्य, मान-सन्मान, शेतकरी कल्याण यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था होती. त्यांच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता. हे सर्व आदर्श गुण आजच्या समाजाने अंगीकारण्याची गरज आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कार्यपद्धती देशाला दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, उज्ज्वल जीवनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारावेत. विद्यापीठातील विद्यार्थी ऊर्जावान असून विविध महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थीच करतात, हे कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांनी सर्व महाविद्यालयाचे जिमखाना विभाग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदमार्फत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती आत्मसात करून ती संपूर्ण देशात पोहोचवावी, असे आवाहन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूरच्या आदिलशाही व मुघल सत्तेला आव्हान देत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. ते कुशल प्रशासक, गनिमी कावा तंत्राचे जनक तसेच भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राज्यात सर्व धर्म व समाजघटकांना समान सन्मान मिळत होता, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत सांगितले की, शिवाजी महाराजांचे आचरण पावलोपावली केल्यास जीवन सुखकर व यशस्वी होईल.

यावेळी सभागृहात विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. तसेच विद्यार्थिनी साक्षी इंगळे यांनी केलेल्या शिवगर्जना आणि ऋतुजा वारे हिने केलेल्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह संचारला. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांच्या वतीने आयोजित स्पर्धांमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वामन काळबांडे व आशुतोष मदेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले.

विद्यापीठाच्या मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर शिवजयंती उत्सव साजरा करून विद्यापीठाच्या मुख्य कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















वनामकृविद्वारा मानवत येथे ‘करडई शेती दिन’ उत्साहात संपन्न

करडई मधील ३४ टक्के तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प व हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करडई पिकावरील प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘करडई शेती दिन’ मानवत येथे उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम मानवत येथील आंबेगाव रोडवरील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. डी. प्रसाद, कृषि विद्यावेत्ता डॉ. संजीव मलय्या तसेच शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा एन. डी. उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव” हा संदेश देत संशोधनाधिष्ठित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या करडई पिकामध्ये ३४ टक्के तेलाचे प्रमाण असलेले वाण उपलब्ध असून, भविष्यात ते ३८ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताचे शेतकरी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे व सक्षम शास्त्रज्ञांमुळे जागतिक स्तरावर अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा सन्मान हाच शेतीचा सन्मान असून, शेतकऱ्यांना भेटल्यावर देव आपोआप भेटतो, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले. याप्रसंगी माननीय कुलगुरूंच्या हस्ते उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी संशोधनाधिष्ठित शेतीचे महत्त्व, विस्तार सेवांची भूमिका तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आर. डी. प्रसाद यांनी करडई पिकावरील रोगांची ओळख व त्यांचे निदान याविषयी माहिती दिली, तर डॉ. संजीव मलय्या यांनी करडई पिकासाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत व संतुलित खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश धुतमल यांनी केले. यावेळी तज्ज्ञांनी करडई पिकातील सुधारित वाण, आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य पेरणी पद्धत, संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल शिलेवंत व डॉ. संतोष शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवत येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोपाळराव मंत्री व श्री. प्रतापराव सोरकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, परभणी येथील डॉ. घुगे, श्री. पांचाळ, श्री. मगर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तांत्रिक माहितीचा लाभ घेतला.








वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमशाली जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या धाडसी मोहिमा, कुशल प्रशासन, लोककल्याणकारी धोरणे तसेच रयतेच्या हितासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख नेतृत्व हे आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणासोबतच चारित्र्यनिर्माण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे कार्य करावे, तसेच भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. नीता गायकवाड, जिमखाना उपाध्यक्ष तथा विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी, कक्ष अधिकारी श्रीमती सारिका हवालदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या लेझीम पथकाने प्रभावी सादरीकरण केले. यानंतर अपूर्वा लांडगे यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

महाविद्यालयाचे विद्यार्थी गौरव नारतम व श्रावणी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार श्रावणी डोके व गौरव नरताम यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.









Wednesday, February 18, 2026

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. दादासाहेब शिंदे यांच्या प्रक्षेत्रास भेट; आयएआरआय नवोन्मुख शेतकरी पुरस्काराबद्दल अभिनंदन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिंदोन येथील शेतकरी मा. श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांच्या प्रक्षेत्रास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

श्री. शिंदे यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२६ साठी जाहीर झालेल्या मानाच्या आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या संपूर्ण प्रक्षेत्राची पाहणी केली. प्रक्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या गुलाब शेतीसह जीप्सोलीना व स्नॅपड्रॅगन या नाविन्यपूर्ण फुलपिकांच्या शेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी माननीय कुलगुरू म्हणाले की, हा पुरस्कार अत्यंत मानाचा असून तो मिळणे ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या प्रसाराची जबाबदारी आणखी वाढते. आज शेतकरी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर यश मिळताना दिसत आहे. अशा प्रगतशील शेतकऱ्यांचे कार्य इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढे येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी बांधवांशी माननीय कुलगुरूंनी संवाद साधला.

या भेटीप्रसंगी माननीय कुलगुरूंयांच्यासह महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषद, पुणे येथील माजी महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, एमजीएम परिसराचे संचालक श्री. धापके, कृषि विज्ञान केंद्रच्या प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे व डॉ. संजुला भावर यांची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू व विस्तार शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे यांचा पुरस्कारासाठीचा अर्ज भारतीय कृषि संशोधन केंद्र, नवी दिल्ली येथे सादर करण्यात आला होता. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून एका शेतकऱ्याची निवड करण्यात येते. त्यानुसार, महाराष्ट्रातून यावर्षीच्या पुरस्कारासाठी  श्री. दादासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

श्री. दादासाहेब दौलतराव शिंदे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क शेतकरी असून त्यांनी फुलशेती, फळबाग लागवड, जैविक निविष्ठा निर्मिती, शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर, सुधारित व शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब, जिल्ह्यात नाविन्यपूर्ण फुलपिकांची लागवड, पॉलिहाऊसमधील फुलशेती, मृदा व जलसंधारणाचे उत्कृष्ट नियोजन यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.

यासोबतच त्यांनी विद्यार्थी व समाजातील विविध घटकांना वेळोवेळी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी केव्हीके तसेच जिल्ह्यातील विविध विभागांसोबत नियमितपणे कार्य करून इतर शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी त्यांना २०२६ चा आयएआरआय इन्नोव्हेटिव्ह फार्मर (आयएआरआय नवोन्मुख शेतकरी) पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पुसा, नवी दिल्ली येथे आयोजित पुसा कृषि विज्ञान मेला दरम्यान देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.








शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच – माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न; वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. शेती विकासासाठी अजूनही अधिक खोलवर जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. शेतीच्या विविध कामांमध्ये महिला भगिनी अग्रेसर असून, त्यांच्या श्रमांमध्ये बचत होईल असे संशोधन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांमुळेच झाली आहे. कृषि विभागामार्फत सध्या ५० हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन व इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी” या उपक्रमांतर्गत फुले कृषि महोत्सव–२०२६ (थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शन) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. तुषार पवार, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषि परिषदेच्या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा–उंटवाल (भाप्रसे), कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले व डॉ. शिल्पा पाटील, पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले की, विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून केली जाणार आहे. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरावर विद्यापीठाचा विशेष भर राहील. तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची दालने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. फुले कृषि महोत्सवामध्ये आयोजित विविध पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स तसेच महाबीज व कृषि विभागाच्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेटी दिल्या. प्रदर्शनादरम्यान माननीय कृषिमंत्री तसेच कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), प्राध्यापक, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच १२ हजारांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

सौजन्य – डॉ. सचिन सदाफळ, जनसंपर्क अधिकारी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी 





वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातील नव्या पशु आहार प्रकल्पास भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी महात्मा गांधी मिशन संचलित कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एमजीएम कृषि विज्ञान केंद्रातील पशुखाद्य निर्मिती युनिटला भेट दिली.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी प्रकल्पातील विविध कार्यपद्धती, पशुखाद्य निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, कच्च्या मालाचे व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन यांची सविस्तर पाहणी केली. युनिटमध्ये तयार होणारे संतुलित पशुखाद्य दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आणि जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी खर्चात दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि पशुपालन व्यवसाय अधिक नफ्यात आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ. के. ए. धापके (संचालक, एमजीएम हिल्स, गांधेली), डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण (प्राचार्य—एमजीएम कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय), श्री. काकासाहेब सुकासे (प्रभारी—वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), डॉ. श्रीकांत खुपसे (विषयतज्ज्ञ—पशु व्यवस्थापन) यांच्यासह कृषि विज्ञान केंद्रातील इतर विषयतज्ज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी युनिटच्या कार्यपद्धतींबाबत सविस्तर माहिती सादर केली.

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन माननीय कुलगुरू व संचालकांनी दिले, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पीक विविधतेद्वारे शाश्वत शेतीकडे वाटचाल : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या फळबाग संशोधन केंद्रात शेतकरी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग संशोधन केंद्र (हिमायत बाग) येथे पीक विविधता पथदर्शी प्रकल्प तसेच एकात्मिक फलोत्पादन व रोपवाटिका विकास कार्यक्रम याअंतर्गत शेतकरी, अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी संयुक्तपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते.

अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत एकात्मिक शेती पद्धती योजनेद्वारे राबविण्यात आलेल्या पीक विविधता पथदर्शी प्रकल्पाच्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पीक विविधतेचे महत्त्व अधोरेखित करताना, केवळ एकाच पिकावर अवलंबून राहिल्यास हवामान बदलामुळे होणारे नुकसान अधिक तीव्र स्वरूपाचे होते, असे स्पष्ट केले. कापूस किंवा सोयाबीनसारख्या सलग लागवड होणाऱ्या पिकांऐवजी पर्यायी पिकांचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पीक पद्धतीत संपूर्ण बदल न करता लहान-लहान सुधारणा करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवणे तसेच पर्यावरणपूरक शेती करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतावरच संशोधन प्रयोग राबविणे ही काळाची गरज असून भविष्यातील संशोधन त्या दृष्टीने व्हावे, असे त्यांनी सूचित केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या कापूस, मका व सोयाबीन ही प्रमुख पिके असून पूर्वी मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी भुईमूग, बाजरी, रब्बी ज्वारी, मूग, उडीद आदी पिकांचे क्षेत्र लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक श्री. प्रकाश देशमुख यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी उपयुक्त पीक पद्धती सुचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी रब्बी ज्वारी व करडईसारख्या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील यांनी शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा शेती पद्धती विकसित करण्यावर भर दिला. डॉ. एस. बी. पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी विविध आंतरपीक व पीक पद्धतींचा आढावा सादर केला, तर डॉ. संजय पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन विकासाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण जाधव, मुख्य कृषी विद्यावेत्ता (एकात्मिक शेती पद्धती योजना) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. रवी नायनवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. सुदाम शिराळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी अधिकारी व संशोधक उपस्थित होते.