Sunday, June 14, 2026

खेत बचाव अभियानांतर्गत राणीसावरगाव येथे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या खेत बचाओ अभियान” अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजना) यांच्या वतीने मौजे राणीसावरगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे दिनांक १२ जून २०२६ रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केली.

या कार्यक्रमामध्ये योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध बैलचलित सुधारित कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना भेट देण्यात आली. गोशाळेमध्ये गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणारे शेणखत, गो-अमृत यांसारख्या सेंद्रिय उत्पादनांचा शेतीमध्ये वापर करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करावे, असे प्रतिपादन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. तसेच योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित बैलचलित अवजारांचा वापर करून इंधनावरील खर्च कमी करता येतो व शेती अधिक किफायतशीर बनविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेचे संचालक श्री शिवदास कोरे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे, टेक्निशियन श्री मंगेश खाडे तसेच राणीसावरगाव येथील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या अवजारांचा वापर केल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मोठी मदत होत असल्याचे आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांमध्ये शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.





संतुलित खत वापर व खरीप पीक व्यवस्थापनाबाबत वनामकृवित शेतकरी जागरूकता कार्यक्रम

 

बदलते हवामान, जमिनीचे खालावत चाललेले आरोग्य, वाढता लागवड खर्च तसेच रासायनिक निविष्ठांच्या अयोग्य वापराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापर, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA) यांच्या वतीने दिनांक ८ जून २०२६ रोजी “संतुलित खत वापर व खरीप पिकांचे व्यवस्थापन” या विषयावर विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉकवर एकदिवसीय शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. परिसरातील अनेक शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाढते उत्पादन खर्च, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमिनीची घटती सुपीकता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे संतुलित खत व्यवस्थापन व सुधारित शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच एल-निनोच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. रासायनिक खतांचा अतिरेक जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा समावेश आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर डॉ. तेजस्विनी कच्छ्वे यांनी सेंद्रिय शेती आणि मृदा आरोग्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व जैविक घटकांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. शेणखत, गांडूळखत, हिरवळीची खते आणि जैविक खतांचा नियमित वापर केल्यास जमिनीची सुपीकता, जलधारण क्षमता आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे त्यांनी सांगितले.

श्री. सुरेश खटिंग यांनी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व विशद केले. हवामान बदलामुळे निर्माण होणारी जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धती, पशुपालन, फळबाग, कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी खरीप पीक नियोजन, खत व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, सेंद्रिय खतांचे प्रमाण आणि कोरडवाहू शेतीतील विविध तांत्रिक बाबींविषयी प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्यासह डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. तेजस्विनी कच्छ्वे आणि श्री. सुरेश खटिंग यांनी विशेष परिश्रम घेतले. संतुलित खत वापर, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




Saturday, June 13, 2026

वनामकृविच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या विकासकामांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून आढावा; गुणवत्तापूर्ण व वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आज दिनांक १३ जून २०२६ रोजी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रामध्ये सुरू असलेल्या नवीन बांधकामांसह विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांचा सर्वांगीण विकास आणि संशोधन सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी संशोधन केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकाम प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या गुणवत्ता, गती आणि नियोजनाचा आढावा घेतला. तसेच केंद्र परिसरातील अंतर्गत रस्ते, हरित परिसर विकास, पायाभूत सुविधा उभारणी तसेच इतर विकासकामांचा सखोल आणि चिकित्सक आढावा घेऊन संबंधित अधिकारी व अभियंत्यांना आवश्यक सूचना दिल्या.

कापूस पिकावरील संशोधन अधिक प्रभावी होण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, संशोधन केंद्रांची कार्यक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा लाभ अधिक वेगाने पोहोचविणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे माननीय कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले. केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देत भविष्यातील विकास आराखड्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. बसवराज भेदे तसेच केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, June 11, 2026

वनामकृविच्या ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमासह ‘खेती बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविले

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह ११ चमूंनी मराठवाडाभर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन आयोजित केला जातो. यावेळी या उपक्रमासोबतच केंद्र शासन पुरस्कृतखेती बचाओ अभियान” देखील प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन केंद्रे, कृषि व संलग्न महाविद्यालये, विस्तार शिक्षण केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे तसेच कृषि विभागाच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत दिनांक १० जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या ११ चमूंच्या माध्यमातून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विद्यापीठाचे २५ शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाचे १४ अधिकारी-कर्मचारी यांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ४७० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने मौजे खांबेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे व डॉ. दिगंबर पटाईत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनीखेती बचाओ अभियान” चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अवशेष उत्पादित धान्यामध्ये राहून नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, पेरणीची घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी शेती करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा. विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या वाणांचा, विविध तंत्रज्ञानांचा, बीजप्रक्रिया तसेच बायोमिक्स, रायझोबियम आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस निश्चितच मदत होईल.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये खरीपातील कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मातीचे आरोग्य तसेच यावर्षीच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पीक नियोजन व व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाचे अनियमित वितरण, पावसास होणारा उशीर, पावसातील खंड आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य पीक निवड, कमी कालावधीच्या वाणांचा वापर, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, मृदा व जलसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच रुंद वरंबा-सरी (Broad Bed and Furrow - BBF) पद्धतीचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा सुलभ होतो, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, मुळांची वाढ चांगली होते तसेच पिकांची वाढ आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते. बदलत्या हवामान परिस्थितीत ही पद्धत कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सेंद्रिय खते व जीवाणू खतांचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि महाविद्यालय (लातूर), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालय, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई व परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, खामगाव व तुळजापूर), एकात्मिक शेती पद्धती, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. आनंद गोरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. टी. बी. सुरपाम, डॉ. गणेश मंडलिक, डॉ. एफ. आर. तडवी, डॉ. एस. आर. धांडगे, श्री. अरबाड बी. के., श्री. मधुकर मांडगे, श्री. एस. आर. रोडे, कृषि विज्ञान केंद्र, दिघोळअंबा (अंबाजोगाई) येथील प्रा. नरेंद्र जोशी, श्री. जाधव तसेच कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.




















वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची रॉयल फर्टिलायझर्स अँड केमिकल्समध्ये निवड.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सेलच्या वतीने दिनांक ४ मे २०२६ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीत रॉयल फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये कृषि महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची विक्री अधिकारी (Sales Officer) पदासाठी अंतिम निवड करण्यात आली. त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

ही संपूर्ण निवड प्रक्रिया विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली.

मुलाखत प्रक्रियेस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश सावगावे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक श्री. शेख सुरज, विक्री अधिकारी श्री. रामभाऊ पवार तसेच श्री. सय्यद जुबैर उपस्थित होते. या निवड प्रक्रियेत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. गुणवत्ता, संवादकौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारे अंतिम निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कनिष्क गायकवाड, चंद्रशेखर खुनेवाड, केदार परातकर, कृष्णकांत पोतदार, मोहन फुलवारे, रोहित चव्हाण आणि संकेत दळवी यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांची विक्री अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या गुणवत्ता, कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या आधारे करण्यात आली आहे. या यशस्वी निवड प्रक्रियेत प्लेसमेंट सेलच्या सदस्य सचिव डॉ. अनुराधा लाड तसेच संपूर्ण टीमचे विशेष योगदान लाभले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी अभिनंदन केले. या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास चालना मिळाली आहे.


Wednesday, June 10, 2026

राज्य शासनाकडून वनामकृविसह चारही कृषि विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता

 पदरचना पुनर्रचनेमुळे विद्यापीठाच्या विकासाला नवी दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पदुम विभागाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या आस्थापनेवरील पूर्वीच्या ७३५ नियमित पदांमध्ये वाढ करून ८९० नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या ४५ पदांसह एकूण ९३५ पदांचा समावेश करण्यात आला आहे. हा शासन निर्णय १० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आकृतिबंधासंदर्भातील आवश्यक माहिती वेळोवेळी शासनास सादर केली.

माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने २० मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली होती. त्यानुसार शासनाने गट-अ व गट-ब संवर्गातील नियमित ३६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे आभार मानले. ते म्हणाले की, या निर्णयामुळे विद्यापीठातील अध्यापन, संशोधन, विस्तार शिक्षण व प्रशासकीय कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असून मनुष्यबळ नियोजनाला बळकटी मिळणार आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये आवश्यकतेनुसार पदरचना सुसंगत करण्यात येणार असल्याने शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गट-क व गट-ड संवर्गातील नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असून त्यासंदर्भातील आदेश नंतर निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.




Monday, June 8, 2026

वनामकृविच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ६ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाचे सहाय्यक वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव व डॉ. किशोर कौसाडीकर तसेच कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्या, वसतिगृहातील सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या सूचना, समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली, आत्मविश्वास वृद्धी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक आणि सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या एसआरएफ व नेट परीक्षांच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच या परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट रँक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी केले.

नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवचैतन्य व प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.