Sunday, May 24, 2026

मौजे तरोडा येथे माती परीक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ मे रोजी माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन मौजे तरोडा येथे करण्यात आले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी दत्‍तक शेतकऱ्यांच्या शेतातून वैज्ञानिक पद्धतीने मातीचे नमुने संकलित केले. मातीचा नमुना घेताना शेतातील विविध ठिकाणांहून ठराविक खोलीपर्यंत माती घेण्याची पद्धत, नमुना स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच योग्य पद्धतीने नमुना परीक्षणासाठी पाठविल्यास अचूक अहवाल मिळण्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. संकलित नमुने पुढील परीक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, योग्य खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत तसेच पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माती परीक्षण ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. पिल्लेवाड तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख व डॉ. आशा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले तर उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना शेतकरी बांधवाकडुन अनेक गोष्‍टी प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी या उपक्रमातुन होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत मौजे तरोडा, सोन्‍ना आणि सुरपिंंपरी ही तीन गांवे दत्‍तक घेतली असुन येथे विविध कृषि कार्यक्रम, कृषि प्रात्‍यक्षिक राबविण्‍यात येणार आहेत. 



मौजे सूरपिंपरी येथे माती परीक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत दिनांक २२ मे रोजी माती परीक्षण उपक्रमाचे आयोजन मौजे सूरपिंपरी येथे करण्यात आले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी २३ शेतकऱ्यांच्या शेतातून वैज्ञानिक पद्धतीने मातीचे नमुने संकलित केले. मातीचा नमुना घेताना शेतातील विविध ठिकाणांहून ठराविक खोलीपर्यंत माती घेण्याची पद्धत, नमुना स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच योग्य पद्धतीने नमुना परीक्षणासाठी पाठविल्यास अचूक अहवाल मिळण्याचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. संकलित नमुने पुढील परीक्षणासाठी कृषी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, योग्य खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत तसेच पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “माती परीक्षण ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालंबडी, मृदा शास्त्र विषयतज्ञ डॉ. पिल्लेवाड तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख व डॉ. आशा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तर उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना शेतकरी बांधवाकडुन अनेक गोष्‍टी प्रत्‍यक्ष शिकण्‍याची संधी या उपक्रमातुन होते. उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत मौजे तरोडा, सोन्‍ना आणि सुरपिंंपरी ही तीन गांवे दत्‍तक घेतली असुन येथे विविध कृषि कार्यक्रम, कृषि प्रात्‍यक्षिक राबविण्‍यात येणार आहेत. 

Saturday, May 23, 2026

वनामकृविचा कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठीची पूर्वतयारी आणि पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनासाठी सल्ला

एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे दक्षतेने नियोजन करावे : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असून यावर्षी देशासह राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, काही भागांत पावसाचे दीर्घकालीन तर काही ठिकाणी कमी ते मध्यम कालावधीचे खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, खरीप हंगामाचे नियोजन शेतकऱ्यांनी दक्षतेने करणे आवश्यक आहे. कमी कालावधीत येणारी व कमी पाण्यावर तग धरणारी पिके आणि वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया केल्यास उगवण सुधारण्यासह रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनातील जोखीम कमी करता येईल. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. तसेच पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास कमी पावसामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. तसेच, कृषी विद्यापीठाच्या शिफारशी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

विद्यापीठाचा सल्ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडेडॉ. गणेश गायकवाड आणि डॉ. मधुकर मोरे यांच्या सल्यानुसार संदेश देण्यात येतो की, मराठवाडा विभागात सर्वसाधारणपणे चार प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती आढळून येतात. यात पावसाचे उशिरा आगमन, पावसाचे उशिरा निर्गमन, पावसाचे आगमन आणि निर्गमन वेळेवर परंतु पिक वाढीच्या अवस्थेत पावसाचे खंड आणि चौथी परिस्थिती म्हणजे संततधार आणि अतिवृष्टी अशा चार प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती आढळून येतात.

सर्वसाधारणपणे वरील चार प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती आणि मागील काही वर्षातील जास्त आणि कमी पावसाच्या वर्षांचा अनुभव तसेच यावर्षी हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज लक्षात घेवून सर्वसाधारण, अधिक आणि कमी पाऊस अशा सर्वच परिस्थितीचा विचार करून येत्या खरप हंगामाचे नियोजन करावे लागेल.  यामध्ये पूर्व तयारी आणि जी परिस्थिती येईल त्यानुसार त्यावेळी त्या त्या उपाययोजना कराव्या लागतील. यामध्ये पहिला भाग हंगामाची पूर्व तयारी आणि दुसरा भाग म्हणजे पावसाच्या आगमनानुसार पिकांची करावयाची निवड आणि  पीक नियोजन आणि व्यवस्थापन.

पूर्वतयारी मध्ये अनेक बाबींचा समावेश होतो: यात सर्वसाधारण, अधिक आणि कमी पाऊस अशा सर्वच परिस्थितीचा विचार करून येत्या खरप हंगामाचे नियोजन करता येते. यामध्ये हंगामापूर्वी करावयाचे मृद व जल संधारणाचे उपचार महत्वाचे आहेत. मृद व जल संदर्भातील कृषी अभियांत्रिकी उपाय म्हणजे पावसाचे पाणी अडवणे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, मातीची धूप रोखणे, जमिनीत पाणी मुरवणे, भूजल पुनर्भरण वाढवणे आणि अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे यासाठी बांधकाम, संरचना, यांत्रिक साधने व अभियांत्रिकी तत्त्वांवर आधारित उपाययोजना करणे होय. हे उपाय प्रामुख्याने शेताची उतारस्थिती, मातीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाण्याचा प्रवाह, नाल्यांची स्थिती आणि पाणलोट क्षेत्र लक्षात घेऊन केले जातात. कृषी शास्त्रीय व जैविक उपायांबरोबर हे उपाय केल्यास मृद व जलसंधारण अधिक प्रभावी होते. यामध्ये  शेत बंध (मातीचे बंध, दगडी बंध, गावात्युक्त बंध), समोच्च रेषेनुसारबंध (कंटूर बंडिंग),घळी नियंत्रण, दगडी जाळीचे/ गॅबियन बंधारे, अधिक उतार असेल तर धाळीचे बांध, डोंगर उतारावर सलग समतल चर, योग्य अंतरावर चर घेणे, बांध बंधीस्ती,सरी वरंबा बांधणी, रुंद वरंबा सारी पद्धत,बंद सरी,शेततळे,नाला बांध, सिमेंट नाला बांध,विहीर पुनर्भरण, कूप नलिका पुनर्भरण, पाझर तलाव,   इत्यादी उपचार किंवा  उपाय हे पावसाच्या प्रवाहाला अडवण्यासाठी, मुराविण्यासाठी, जलसंधारण, जमिनीची धूप कमी होण्यासाठी अवलंबिले जातात.

मुलस्थानी जल संधारण उपायांमध्ये : समतल मशागत, समोच्च रेषेनुसारबंध (कंटूर) मशागत,खोल नांगरट, बंदिस्त सरी वरंबे,रुंद वरंबा सरी पद्धत, सरी  वरंबा पद्धत, आंतरमशागत करून धूळ आच्छादन, आच्छादनाचा वापर, अंतर पिक पद्धती, पट्टा पिक पद्धत,पिक अवशेष जमिनीत ठेवून मृद व जल संधारण, , अत्यादी उपाय किंवा उपचार हे थेट शेतात केले जातात जेणेकरून पावसाचे पाणी पडेल तिथेच जमिनीत मुरविले जाते. मूलस्थानी जलसंधारणाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. लस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते त्याच ठिकाणी अडवून जमिनीत मुरविण्याची प्रक्रिया. यामुळे शेती, मृदा आणि पर्यावरण या तिन्हींचा समतोल राखला जातो.

मृद व जल संधारणासाठी कृषी शास्त्रीय उपचार: मृद व जल संधारणासाठी कृषी शास्त्रीय उपचार (Agronomical Measures) म्हणजे शेतीतील अशा पद्धती ज्या मातीची धूप कमी करतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरवतात आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात. हे उपाय कमी खर्चिक, सोपे आणि शाश्वत असतात. प्रमुख कृषी शास्त्रीय उपचार पुढीलप्रमाणे आहेत :

१. आडवी नांगरट (Contour Farming):

२. समतल सरी-वरंबे (Broad Bed and Furrow / BBF):

३. पट्टा पद्धतीने पीक लागवड (Strip Cropping):

४. आच्छादन शेती (Mulching) :

५. मिश्रपीक / आंतरपीक पद्धती (Mixed / Inter Cropping):

६. आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा: यामध्ये पावसाच्या आगमानानुसार पिकांची निवड आणि पेरणी करावी. पावसाचे आगमन लांबल्यास काही पिकांची पेरणी कमी करून इतर पिंकांची निवड पेरणीसाठी करावी. मान्सूनचे  १५ जून ते ०७ जुलै दरम्यान आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. परंतु  मान्सून ३० जून पर्यंत किंवा ७ जुलै पर्यंत आला नाही, म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. उदा : पाऊस ८ जुलै पर्यंत पाऊस लांबला आणि त्याचे आगमन ०८ जुलै  ते १५ जुलै  दरम्यान झाल्यास  मुग, उडीद, भुईमुग पिकांऐवजी  कापूस, सोयाबीन, तुर, संकरीत ज्वारी, संकरीत बाजरी, तीळ, सुर्यफुल ही पिके घ्यावी लागतील. अशाप्रकारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाने दिलेल्या आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा

७. पीक फेरपालट (Crop Rotation): दरवर्षी वेगवेगळी पिके बदलून घेणे म्हणजेच पिक फेर पालट होय. यामुळे जमिनीची सुपीकता टिकते.मृदा आरोग्य सुधारते व धूप कमी होते. कीड व रोगाचे  व्यवस्थापन होते.

८. आच्छादित पिके (Cover Crops):  यामध्ये जमिनीवर आच्छादन देणारी पिके (उदा. शेंगवर्गीय) घेतात. पावसाच्या थेंबांचा थेट मातीवर परिणाम कमी होतो आणि त्यामुळे मातीची धूप कमी होते.

९. सेंद्रिय खतांचा वापर : शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत वापरल्यास सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून मातीची जलधारण क्षमता वाढते.मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. माती भुसभुशीत राहते व धूप कमी होते. तसेच पिकांसाठी समतोल अन्नद्रव्य पुरवठा होतो.

१०.  खोल नांगरट (Deep Ploughing): उन्हाळ्यात खोल नांगरट केल्यास जमिनीचा कडक थर फुटतो व पाणी मुरण्यास मदत होते आणि मातीची धूप कमी होते. तण व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

११. वेळेवर पेरणी:  पावसाच्या सुरुवातीला पुरेसा पाऊस झाल्यास लगेच योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते व मोकळी जमीन कमी राहते.धूप कमी होते.आणि

१२. योग्य वाणाची निवड: खरीप पिकांच्या विविध कमी कालावधीच्या आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणाची निवड लागवडी साठी करावी.

१३. समतलीकरण (Land Leveling): शेत समतल केल्यास पाणी समान पसरते. पाणी साचणे व वाहून जाणे कमी होते.  सिंचनाची कार्यक्षमता वाढते.

१४. संरक्षित सिंचन: शेततळे , विहीर पुनर्भरण , कूप नलिका पुनर्भरण याद्वारे पावसाचे खंड पडल्यास एक ते दोन संरक्षित सिंचनाची सोय करावी. यामुळे पिक वाढ आणि उत्पादन वाढते. यासाठी आधुनिक सिंचन पद्धती उदा. तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी वापरावेत. मृद व जल संधारणासाठी कृषी शास्त्रीय उपचार हे कमी खर्चिक, शेतकरीस सुलभ आणि परिणामकारक उपाय आहेत. या उपायांमुळे मातीची धूप कमी होते, पाण्याची जमिनीतील मुरणक्षमता वाढते, जमिनीची सुपीकता टिकते आणि पीक उत्पादनात वाढ होते.

शाश्वत शेतीसाठी हे उपाय अत्यंत उपयुक्त आहेत.

जैविक उपचार (Biological Measures): यामध्ये जैविक बांध: बांधांवर खस गवत, अंजन किंवा सुबाभूळ यांसारखी झाडे लावली जातात, ज्यामुळे बांध फुटत नाहीत आणि मातीची धूप थांबते. तसेच आंतरपीक पद्धत: मूग, उडीद किंवा सोयाबीन यांसारखी पिके घेतल्याने जमिनीवर हिरवे आच्छादन राहते. 

पाणी साठवण्याचे उपाय:  शेततळे: पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यासाठी शेतात तळे बांधले जाते, ज्याचा उपयोग पीक वाचवण्यासाठी (संरक्षित सिंचन) केला जातो. याशिवाय विहीर पुनर्भरण आणि कुपनलिका पुनर्भरण यांच्या माध्यमातून पावसाचे पडणारे आणि वाहून जाणारे पाणी विहीर आणि कुपनलिका  यांच्या  ठिकाणी जमिनीत मुरवून विहीर आणि कुपनलिका  यांच्या पाण्याची पातळी वाढविता येते.

अशाप्रकारे वरील पूर्व तयारीसह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाने दिलेल्या आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा:

येता खरीप हंगाम शेतकरी बंधु भगिनींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून मागील काही वर्षात आलेल्या अनुभवातून यापुढील काळात शेतीचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. यावर्षी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोड्या कमी प्रमाणातील पावसाचे प्रमाण दिले असून जुलै आणि ऑगस्ट-सप्टेबर मध्ये कुठे कमी तर कुठे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मान्सूनचे  १५ जून ते ०७ जुलै दरम्यान आगमन झाल्यास सर्व खरीप पिके घेता येतात. परंतु  मान्सून ३० जून पर्यंत किंवा ७ जुलै पर्यंत आला नाही, म्हणजे पावसात एक आठवड्याने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. उदा : पाऊस ८ जुलै पर्यंत पाऊस लांबला आणि त्याचे आगमन ०८ जुलै  ते १५ जुलै  दरम्यान झाल्यास  मुग, उडीद, भुईमुग पिकांऐवजी  कापूस, सोयाबीन, तुर, संकरीत ज्वारी, संकरीत बाजरी, तीळ, सुर्यफुल ही पिके घ्यावी लागतील.

पेरणी योग्य पावसाचा आगमन कालावधी

कोणती पिके घ्यावीत

कोणती पिके घेवू नयेत

१५ जून ते ३० जून

सर्व खरीप पिके

 

०१ जुलै ते ०७ जुलै

सर्व खरीप पिके

- - - - -

०८ जुलै ते १५ जुलै

कापूस, संकरीत ज्वारी, संकरीत  बाजरी, सोयाबीन ,तूर, तीळ व सुर्यफुल

भुईमूग, मूग व उडीद

१६ जुलै ते ३१ जुलै

सुर्यफुल, तूर, संकरीत  बाजरी,एरंडी, कारळ, तीळ,  सोयाबीन + तूर (४:२), बाजरी + तूर (३:३), एंरडी + धने (१:१), एरंडी + तूर

कापूस, सं ज्वारी, भूईमुग

०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

सं बाजरी, सुर्यफुल, तूर,एरंडी, तीळ,  एंरडी + धने (१:१), एरंडी + तूर

कापूस, संकरीत ज्वारी, भुईमूग,सोयाबीन  

१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट

सं बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी + धने, एरंडी +तूर आणि  धने

कापूस, संकरीत ज्वारी, भुईमूग आणि तीळ

 

घ्यावयाची काळजी : सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीस पाऊस न झाल्यास घाबरून न जाता  पेरणीयोग्य पाऊस होण्याची (७५ ते १०० मिलीमीटरवाट पाहावी व पेरणीयोग्य पाऊस झाल्या नंतर प्रत्येक पिकासाठी दिलेल्या कालावधी नुसार  पिकाची पेरणी करावी. सर्वसाधारण परिस्थीतीमध्ये तसेच उशिरा पेरणीसाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.

पेरणीयोग्य पाऊस ७५ ते १०० मिमी पूर्ण झाल्याशिवाय पेरणी करू नये.

मध्यम ते भारी जमिनीत कपाशीची सोबतच तुर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.

हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरीता दुबार पीक पध्दतीचा अवलंब करावा (मुग- रब्बी ज्वारी, संकरीत ज्वारी-करडई/हरभरा, सोयाबीन- हरभरा)

मध्यम जमिनीत सूर्यफुल, तुर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.

हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळ, एरंडी, सारखी पिके घ्यावीत.

प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा सोयाबीन , तूर, मुग, उडीद अशा अनेक पिकामध्ये घरचे बियाणे वापरु शकतो. पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणी साठी वापरता येते परंतु यासाठी घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी) व बीज प्रक्रीया करुनच पेरणी करावी. 

प्रत्येक पिकामध्ये शिफारशीनुसार कीटकनाशके बुरशीनाशके, जिवाणू संवर्धने व मित्र बुरशी संवर्धनाची बीज प्रक्रीया करुनच पेरणी करावी.

पेरणी करतांना योग्य अंतरावर व खोलीवर पेरणी करावी (उदा. सोयाबीन पिकामध्ये ५ ते ६ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करु नये) हेक्टरी योग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे. हेक्टरी योग्य रोपांची/झाडांची संख्या ठेवावी.

वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे जेणेकरुन अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सूर्यप्रकाश यासाठी पिकांना तणाकडून स्पर्धा होणार नाही तसेच किड व रोगांना तणामुळे आश्रय मिळणार नाही.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांच्या शिफारस मात्रेसोबतच शिफारस केलेली सेंद्रीय खतांची मात्रा द्यावी किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रीय खताचा वापर करावा जेणे करुन जमिनीचे जैविक, भौतिक व जैविक गुणधर्म राखण्यास मदत होईल, आवश्यक जिवाणूंची संख्या वाढेल) सेंद्रीय कर्ब वाढेल इत्यादी यातून जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म योग्य राहून पीक उत्पादनात वाढ होईल. (पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्याचा समतोल व उपलब्धता वाढेल, जमिनीचे तापमान राखण्यास मदत होईल,जीवाणूंची संख्या वाढेल, इत्यादी.)

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. यामुळे एकीकडे खर्चात बचत होईल, दुसरीकडे रासायनिक किटक नाशकांच्या संतुलीत वापरामुळे किड व रोगांची प्रतिकार क्षमता वाढणार नाही, व पर्यावरण संतुलन राखुन उत्पादनात वाढ होईल उदा. सापळा पिके, जैविक किटकनाशके, आंतर पीक पध्दती, पक्षी थांबे, विविध प्रकारचे सापळे इत्यादी.

कोरडवाहू शेतीमध्ये खालील सर्वसाधारण बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

१.     पेरणी योग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी

२.     जमीन व हवामान या नुसार पिकांची व पिक पद्धतींची निवड

३.     एकाच पिकावर अवलंबून न राहता पिक विविधीकरण अवलंब करणे

४.     कोरडवाहू क्षेत्रासाठी पिकांचे कमी कालावधीमध्ये येणारे वाण यांची निवड करणे  

५.     रुंद वरंबा सारी किंवा बेड पद्धतीचा अवलंब करावा.

६.     आंतर पिक पद्धतीचा अवलंब करणे , आच्छादनाचा, वापर करावा.

७.     पिक फेरपालट व सेंद्रिय खतांचा, एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापनाचा अवलंब करणे

८.     जल व मृद संधारण उपायांचा अवलंब करणे

९.     संरक्षित सिंचन व जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणारे तंत्रज्ञान यांचा अवलंब करावा

१०. प्रामुख्याने कोरडवाहू शेतीमध्ये एकूण तीन प्रकारे पिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे यामध्ये

अ)   दीर्घकालीन उपाय

ब)    पूर्वतयारी


ऐनवेळचे किंवा तातडीचे उपाय (पिकाच्या सुरूवातीच्या वाढीच्या अवस्थेला, मध्य अवस्थेत व शेवटच्या  अवस्थेत)

अधिक माहितीसाठी संपर्क

डॉ. आनंद गोरे

प्रभारी अधिकारी

अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषि नगर, परभणी - ४३१ ४०२

मो.क्र.: ९५८८६४८२४२