Saturday, July 18, 2026

वनामकृवित ‘उद्यम विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात

‘परभणी ग्रोथ हब’च्या माध्यमातून कृषि उद्योगांना नवी दिशा : राज्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेस (CASMB) तथा सेवा भारती, देवगिरी (जि. परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोझियम हॉलमध्येउद्यम विकसित मराठवाडा मिशन’ अंतर्गत उद्योग–शैक्षणिक संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कृषि क्षेत्रातील उद्योग, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि रोजगारनिर्मिती या विषयांवर या कार्यक्रमात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव ,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर तसेच चेंबर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसेसचे सरचिटणीस डॉ. उमेश कांबळे, रांजणी (जि. धाराशिव) येथील नॅचरल उद्योग समूहाचे प्रकल्प समन्वयक श्री श्रीपाद ठोंबरे, वसमत येथील भूमी न्यूट्रास्युटिकल्सचे श्री अतिश साळुंखे, फ्लेवोसीस इंडियाचे खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ श्री सतीश भोरकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) माननीय ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनले पाहिजेत. कृषिआधारित उद्योगांच्या माध्यमातून परभणी तसेच मराठवाड्यातील स्थलांतर थांबविणे शक्य आहे. शेतीला प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसायांची जोड दिल्याशिवाय शेती अधिक लाभदायक होणार नाही. एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'परभणी ग्रोथ हब' या संकल्पनेअंतर्गत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले असून, परभणी जिल्ह्यात 'सिल्क अँड मिल्क' या संकल्पनेवर आधारित पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषिआधारित उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन व शासनाचे सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. कृषि पदवीधरांनी शेतीकडे उद्योजकीय दृष्टीने पाहावे, कारण शेतीतूनही मोठे उद्योग उभे राहू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजकासाठी गंभीरता, विनम्रता, सहनशीलता आणि सातत्य हे गुण अत्यावश्यक आहेत. मराठवाड्यात कृषिआधारित उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, परभणी जिल्ह्याची सुपीक जमीन, सक्षम मनुष्यबळ आणि कृषि संशोधनाची मजबूत पार्श्वभूमी ही मोठी ताकद आहे. "परभणी फर्स्ट" हा विकासाचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उद्योग, शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी गटांनी शेतीमालाच्या सामूहिक विक्रीची यशस्वी व्यवस्था उभी केली आहे. वसमत तालुक्यात करवंदासारख्या वनउत्पादनावर प्रक्रिया उद्योग सुरू असून, विद्यापीठाला अलीकडेच चार महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प मंजूर झाले आहेत. या संशोधनाचा लाभ उद्योग, शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ. राजेश क्षीरसागर यांनी महाविद्यालयातील कॉमन इन्क्युबेशन सेंटरची सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन (Value Addition) केल्यास अधिक नफा कसा मिळविता येतो, याविषयी मार्गदर्शन केले. मूल्यवर्धित उत्पादनांमुळे शेतमालाला अधिक बाजारमूल्य प्राप्त होते, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही मोठी संधी उपलब्ध होते, असे त्यांनी सांगितले.

उद्योजक श्री. श्रीपाद ठोंबरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील दुष्काळी भागात दुग्धव्यवसाय हा शाश्वत उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना मिळाल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. इथेनॉल निर्मितीमुळे ऊस उत्पादकांना अधिक दर मिळत असून, शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून उर्जादाताही आहे, असे ते म्हणाले. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी उद्योगांनी खेड्यांकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री.अतिश साळुंखे यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधींचा वेध घेताना तंत्रज्ञानाधारित कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची वाढती गरज अधोरेखित केली. ग्रामीण भागातील युवकांनी नवकल्पना, प्रक्रिया उद्योग आणि स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. सतीश भोरकडे यांनी अडचणी या संधी निर्माण करण्याचे माध्यम असतात. चिकाटी, सातत्य आणि नावीन्यपूर्ण विचार यांच्या बळावर यशस्वी उद्योग उभा राहू शकतो, असे प्रतिपादन केले.

डॉ. उमेश कांबळे यांनी 'उद्यम विकसित मराठवाडा मिशन'ची भूमिका स्पष्ट करताना उद्योजकता विकासासाठी मराठवाड्यात विविध जिल्ह्यांमध्ये उद्योग–शैक्षणिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातून उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि शासन यांच्यात समन्वय निर्माण करून स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राहुल रामटेके, विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी, सेवा भारती परभणीचे पदाधिकारी श्री. बोराळकर, श्री. संजय जोशी व श्री. करभाजन, जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ. उमेश कांबळे यांनी मानले.

















बी.एस्सी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान : शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम

 कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रम


बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढील शिक्षणासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड होय. आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक व रोजगाराच्या युगात विद्यार्थ्यांसमोर विविध शाखांतील असंख्य अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ पारंपरिक विचारांवर किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, कौशल्ये, करिअरच्या संधी आणि भविष्यातील रोजगारक्षमतेचा सर्वांगीण विचार करूनच अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी यांच्या आधारे घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया ठरू शकतो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान उपलब्ध अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये, त्यामधील करिअरच्या संधी आणि संबंधित क्षेत्रातील भविष्यातील मागणी यांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेणे हितावह ठरेल.

यामध्ये करिअरच्या नव्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक विज्ञान (कम्युनिटी सायन्स) हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील चार कृषि विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच कृषि शिक्षणांतर्गत हा चार वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. इयत्ता १२ वी नंतर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स ही पदवी प्रदान केली जाते. सामान्य पदवीपेक्षा ऑनर्स पदवीला करिअरच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.

कृषि विद्यापीठांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असून महाराष्ट्र शासनाने सन २०२१ मध्ये शासन निर्णयाद्वारे सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाला कृषि विद्यापीठातील इतर पदवी अभ्यासक्रमांप्रमाणेच समकक्ष दर्जा प्रदान केला आहे.

तसेच बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान ह्या दोन्ही पदव्या एकच असल्याबाबत महाराष्ट्र शासनाचा आदेश (जीआर) निर्गमित करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे महाराष्ट्र शासनाने माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तसेच महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव यांच्या स्वाक्षरीने आदेश दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी (संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०२१३१६०४४२९९०१) निर्गमीत केला. यामध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या बी. एससी गृह विज्ञान / B.Sc. Home Science, बी.एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science / बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या सर्व अभ्यासक्रमांच्या पदव्या एकच असल्याने बी.एससी (गृह विज्ञान) / B.Sc. (Home Science) पदवी प्राप्त उमेदवारांना भरती प्रक्रिया प्रक्रियेत ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या, त्या बी. एससी (ऑनर्स) गृह विज्ञान / B.Sc. (Hons) Home Science व बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान / B. Sc. (Hons) Community Science या  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उमेदवारांना उपलब्ध राहतील, असे नमूद केले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) अंतर्गत वैद्यकीय शिक्षण, संशोधन व औषधी द्रव्ये विभागामार्फत आहारतज्ज्ञ (Dietitian) पदासाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संगणक-आधारित परीक्षा (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून आहारतज्ज्ञ (Dietitian) या प्रतिष्ठित पदावर निवड मिळविली आहे. तसेच योगेश्वरी सतिशराव पवार, जान्हवी रंगराव उक्कलगावकर आणि स्वाती बाळासाहेब पवार या तीन विद्यार्थिनींची प्रतीक्षा यादीत (Waiting List) निवड झाली आहे.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच सक्षम प्राधिकरणामार्फत आयोजित एमएचटी-सीईटी, जेईई किंवा नीट या प्रवेश परीक्षांपैकी कोणतीही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.

या अभ्यासक्रमासाठी मुला - मुली दोघांनाही प्रवेश खुला आहे. शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच शुल्कासंदर्भातील शासनाच्या सर्व सवलती या अभ्यासक्रमालाही लागू आहेत.

करिअरच्या विविध संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचे सखोल प्रशिक्षण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रात उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

याशिवाय जिल्हा रुग्णालये, दवाखाने, क्रीडा विभाग, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), रेल्वे विभाग तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये आहारतज्ज्ञ, महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हिअर मॉडिफिकेशन थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, बँका, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (IIPH), आयसीएमआर-एनआयएन (ICMR-NIN) आदी संस्थांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

उद्योजकतेच्या संधी

स्किल इंडिया मिशनला अनुसरून या अभ्यासक्रमामध्ये स्टार्टअप आणि स्वयंरोजगारालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना स्वतःच्या दर्जेदार पूर्वप्राथमिक शाळा, पाळणाघरे, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र, इंटेरिअर डिझाइनिंग, बेकरी व कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हस्तकला (हँडीक्राफ्ट्स) युनिट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझाइनिंग यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम केले जाते.

तसेच अन्न प्रक्रिया व साठवणूक, हेल्थ क्लब, लँडस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझाइनिंग, निवासी व व्यावसायिक इमारती, दवाखाने, मॉल्स यांच्यासाठी गार्डन डिझाइनिंग, पुष्परचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको-टुरिझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्मिती, हाऊसकीपिंग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, कंपन्यांमधील पब्लिक रिलेशन ऑफिसर (PRO) तसेच मार्केटिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षण व नोकरीच्या संधी

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीए अभ्यासक्रमासाठी पात्र असून त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (NAARM) संस्थेच्या बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेता येतो.

याशिवाय स्पेशल एज्युकेशन, स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन, इंटेरिअर डिझाइनिंग, फॅशन डिझाइनिंग, स्कूल काउन्सेलिंग आदी विषयांतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करूनही विद्यार्थी यशस्वी करिअर घडवू शकतात.

या अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठीही पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संधी

किशोर न्याय मंडळ (JJB), केंद्रीय समाजकल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ (UNICEF), युएनडीपी (UNDP), युएसडी, एफएओ (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही सामुदायिक विज्ञान पदवीधरांसाठी करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाची व्यापक व्याप्ती, रोजगारक्षमतेच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या क्षमता लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

 प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/cap_2026-27           www.mcaer.org

 डॉ. नीता गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, भ्रमणध्वनी : ७७७४८४१६४९

डॉ. शंकर पुरी, विषय प्रमुख, भ्रमणध्वनी : ९३२६१०६०३६

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी








 

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी सुवर्णकाळ; शासकीय सेवेत वाढत्या संधी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सन १९८६ मध्ये कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्याशाखेतील पदवीधर शासकीय सेवेसह सिंचन (इरिगेशन) कंपन्या, पाणलोट विकास कार्यक्रम, कृषि प्रक्रिया उद्योग, कृषि अवजारे व यंत्रसामग्री निर्मिती उद्योग, ट्रॅक्टर व संबंधित उद्योग, बीजप्रक्रिया केंद्रे, अपारंपरिक ऊर्जा साधनांशी संबंधित उद्योग, कृषि स्थापत्य क्षेत्र तसेच इतर विविध कृषिपूरक क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.

महाराष्ट्र शासनाने मृद व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध दिनांक  २७ मे २०२६ रोजी मंजूर केला आहे. या सुधारित आकृतीबंधामध्ये कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेस सुमारे ४० टक्के पदांना मान्यता देण्यात आली असून, त्यांची संख्या २,३९५ इतकी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध योजना तसेच मृद व जलसंधारणाशी संबंधित कामे अधिक गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यास मदत होणार असून, या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस मोठी चालना मिळणार आहे.

याशिवाय, राज्यातील कृषि विद्यापीठांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास दिनांक १० जून २०२६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी सुमारे २५० ते ३०० कृषि अभियंत्यांना सेवासंधी उपलब्ध होणार आहेत.

सध्या सहाव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशींनुसार कृषि अभियांत्रिकीचा नवीन अभ्यासक्रम राबविण्यात येत असून, मॉडेल अॅक्ट-२०२३ नुसार शैक्षणिक पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कृषि अभियांत्रिकी पदवीधरांसाठी शासकीय सेवेमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

माननीय केंद्रीय कृषिमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्रात कृषि अभियांत्रिकीचा स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचा उल्लेख केला आहे. हा संवर्ग अस्तित्वात आल्यानंतर कृषि अभियंत्यांसाठी शासकीय सेवेत आणखी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंधही लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा असून, त्यामध्येही कृषि अभियंत्यांसाठी विविध पदांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी पदांच्या संवर्गनिहाय सुधारित आकृतीबंधास दिनांक १६ जून २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्येही कृषि अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करता कृषि अभियंत्यांना मृद व जलसंधारण विभाग, कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ तसेच इतर शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कृषि अभियांत्रिकी या विद्याशाखेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

म्हणूनच विद्यार्थ्यांनी कृषि अभियांत्रिकी या विद्याशाखेला प्राधान्याने प्रवेश घेऊन कृषि क्षेत्रात कार्य करण्याचे आपले स्वप्न साकार करावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारतीय व महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्यासाठी योगदान द्यावे. तसेच "उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी" या आपल्या पारंपरिक ब्रीदवाक्याला आधुनिक संदर्भात नव्याने अर्थ प्राप्त करून देत कृषि क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापनेची उद्दिष्टे

१.     आचार्य पदवी (कृषि अभियांत्रिकी) तीन वर्षांचा, पदव्युत्तर पदवी (कृषि अभियांत्रिकी) दोन वर्षांचा तसेच बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी) चार वर्षांचा अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण व अद्ययावत करणे.

२.     कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेतील सर्व विषयांमध्ये संशोधन व विकासाची कामे हाती घेऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे.

३.     कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात अल्पकालीन व दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.

४.     विद्यार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रम व कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे.

५.     विस्तार शिक्षणांतर्गत शेतकरी मेळावे, कृषि अवजारांचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन, मृद व जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, विद्युत व ऊर्जा व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित करणे.

महाविद्यालयातील कार्यरत विभाग

१.     सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग

२.     मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग

३.     कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग

४.     अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभाग

५.     कृषि स्थापत्य अभियांत्रिकी विभाग

६.     कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभाग

७.     मूलभूत विज्ञान व संगणकशास्त्र विभाग

कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेची वैशिष्ट्ये

कृषि क्षेत्रातील आधुनिक संशोधनाद्वारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारी ही एक महत्त्वपूर्ण विद्याशाखा आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत, कमी मनुष्यबळात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे कार्य ही विद्याशाखा करते.

मृदा व जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, आधुनिक सिंचन पद्धती, पाणलोट क्षेत्र विकास, पावसाच्या पाण्याचे संवर्धन व कार्यक्षम व्यवस्थापन, तसेच "एक स्रोत – एक शेततळे" यांसारख्या संकल्पनांच्या विकासामध्ये या विद्याशाखेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शाश्वत शेतीसाठी मृदा व जलसंवर्धनाच्या विविध तांत्रिक उपाययोजना विकसित करून त्यांचा प्रसार केला जातो.

मूलभूत विज्ञान व संगणकशास्त्राची जोड असल्यामुळे विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), मशीन लर्निंग, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सेन्सर तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि डिजिटल शेती व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.

कृषि स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत हरितगृह तंत्रज्ञान, टिश्यू कल्चर, शाश्वत शेती, दुग्धव्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन तसेच कृषि पायाभूत सुविधांच्या नियोजनासंबंधी ज्ञान दिले जाते. अपारंपरिक ऊर्जा अभियांत्रिकी विभागामार्फत सौर, बायोगॅस, जैवऊर्जा व इतर नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा शेतीमध्ये प्रभावी वापर करण्याचे तंत्र विकसित केले जाते. ऊर्जा निर्मिती आणि अन्न उत्पादन यांचा समन्वय साधणाऱ्या तंत्रज्ञानावरही संशोधन केले जाते.

कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामार्फत कापणीनंतरचे तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, धान्य साठवण, मूल्यवर्धन, ऊर्जा व्यवस्थापन तसेच कृषि उत्पादनांच्या प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या विकासावर भर दिला जातो.

आजच्या काळात कृषि क्षेत्रातील यांत्रिकीकरणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आधुनिक कृषि यंत्रांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

आधुनिक अभ्यासक्रम व संशोधन

कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल क्रांतीची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात अनेक आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अचूक शेती (Precision Agriculture), डेटा विश्लेषण (Data Analytics), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, रिमोट सेन्सिंग, ड्रोन तंत्रज्ञान, उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण (Satellite Imagery) तसेच डिजिटल फार्म व्यवस्थापन प्रणाली (Digital Farm Management Platform) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश असून त्यानुसार संशोधनाची दिशा निश्चित करण्यात येत आहे.

संशोधन व कौशल्य विकास प्रकल्प

सध्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कृषि यंत्रसामग्री निर्मिती, प्रशिक्षण व चाचणी केंद्र कार्यरत आहे.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि सीएनएच इंडस्ट्रियल (CNH Industrial) यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत कौशल्य विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत कृषि यांत्रिकीकरणासंदर्भात ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या अर्थसहाय्याने भरड धान्य व इतर धान्यांपासून नाविन्यपूर्ण मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या संशोधनाचा प्रकल्प सुरू आहे. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित स्मार्ट हायड्रोपोनिक्स या भविष्यातील नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानावरही संशोधन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

खाजगी उद्योगांसोबत भागीदारीचे प्रभावी धोरण तयार करून कृषि-आधारित उद्योगसमूहांशी सामंजस्य करार (MoU) करणे, तसेच कृषि यांत्रिकीकरण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी सहकार्याची सांगड घालून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभव, इंटर्नशिप आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. या अनुषंगाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत नाहेप (NAHEP) संशोधन प्रकल्पामार्फत ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित २१ दिवसांचे तसेच ६ महिन्यांचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.

शेतकरी बांधवांना ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करता यावा यासाठी विद्यापीठामार्फत विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोनद्वारे पीक फवारणीची २० प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांना माफक दरात ड्रोनद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने Wow Go Green या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून, त्याद्वारे भाडेतत्त्वावर ड्रोन फवारणीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना ड्रोन उड्डाण प्रशिक्षण, ड्रोन संचालन कौशल्य तसेच आवश्यक परवाना (License) प्राप्त करण्यासाठी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे आरपीटीओ (RPTO) प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हॅकथॉन पुणे–२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विविध पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच महाविद्यालयातील आचार्य पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. विशाल काळबांडे यांना अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान प्राप्त झाला आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची विविध नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये परिसर मुलाखतीद्वारे (Campus Placement) प्रतिष्ठित पदांवर निवड होत आहे.

महाविद्यालयाचा परिसर निसर्गरम्य असून, आधुनिक अभ्यासक्रमानुसार सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे व सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच उच्चशिक्षित, अनुभवी व संशोधनाभिमुख प्राध्यापकवृंद विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शन देत आहेत.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात डिजिटल व शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपकरणांच्या विकासाकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'सक्षम केंद्र' महाराष्ट्र शासनाच्या अर्थसहाय्याने मंजूर झाले आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात आले असून, या संशोधन केंद्राचे कार्य लवकरच सुरू होणार आहे.

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषि विकास व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना अधिकाधिक सेवासंधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृषि अभियांत्रिकीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने प्रत्येक राज्यात कृषि अभियांत्रिकीचा स्वतंत्र संवर्ग स्थापन करण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे भविष्यात मृद व जलसंधारण, सिंचन विकास, जलव्यवस्थापन तसेच कृषि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रांत कृषि अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

सध्याच्या काळात कृषि अभियंत्यांना त्यांच्या ज्ञान व कौशल्याच्या बळावर नवसंजीवनी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संवर्ग अस्तित्वात आल्यास पदसंख्येत वाढ होईल. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक शेती (Precision Farming), ड्रोन तंत्रज्ञान, स्वयंचलित कृषि यंत्रणा, स्मार्ट सिंचन व्यवस्था आणि डिजिटल कृषि या नव्या क्षेत्रांमध्येही कृषि अभियंत्यांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शासनाच्या विविध योजनांमध्ये नवीन पदनिर्मिती झाल्यामुळे कृषि अभियंत्यांसाठी सेवेच्या संधी अधिक व्यापक होतील.

कृषि अभियांत्रिकीचे आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय शेतीत प्रभावीपणे वापरले गेले, तर भारतीय शेती अधिक समृद्ध, उत्पादक आणि शाश्वत होईल. कृषि अभियंत्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास निश्चितच हातभार लागेल. त्यामुळे भारतीय शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी कृषि अभियंत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

याच अनुषंगाने, उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कृषि अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेऊन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कृषि विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राहुल रामटेके (मोबाईल क्रमांक ७५८८०८२८६५ ) किंवा कृषि अभियंता श्री लक्ष्मीकांत राउतमारे (मोबाईल क्रमांक ९४०४४९४८६६) यांच्याशी संपर्क साधावा.