Monday, June 29, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात राज्यस्तरीय पीजी-सीईटी-२०२६ प्रवेश परीक्षा यशस्वी संपन्न

 


महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय सामायिक पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (PG-CET-2026) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे दिनांक २७, २८ आणि २९ जून २०२६  या कालावधीत अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

तीन दिवस चाललेल्या या परीक्षेमध्ये कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, वनस्पतीशास्त्र, मत्स्यशास्त्र, सामुदायिक विज्ञान तसेच आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान अशा विविध शाखांतील पदव्युत्तर प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी सुमारे १२४२ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

या परीक्षेच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी परीक्षा केंद्रास दिनांक २९ जून २०२६ रोजी भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी परीक्षा केंद्रावरील सर्व व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा तसेच पारदर्शक आणि शिस्तबद्ध परीक्षा प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी परीक्षा कार्यात सहभागी अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, उप कुलसचिव डॉ गजानन भालेराव यांनीही परीक्षा केंद्रास नियमित आणि वेगवेगळ्या कालावधीत भेटी देवून पाहणी केली व परीक्षेवर नियंत्रण ठेवले.

परीक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ पर्यवेक्षकच्या निगराणी आणि नियंत्रणात परीक्षा पार पडली. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. दिलीप झटे तसेच प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. संपूर्ण परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

ही परीक्षा राज्यातील कृषि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, परभणी केंद्रावरील उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.







वनामकृवित १ ते ३ जुलै दरम्यान “सिंचन जल व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ : अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – सिंचन जल व्यवस्थापन विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थान (IIWM – Indian Institute of Water Management) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन जल व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ चे आयोजन दि. १ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. ही कार्यशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे संपन्न होणार आहे.

या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाचे (ICAR-NRM) उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक उपस्थित राहणार आहेत.

तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ. ए. सारंगी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्यासह भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी व शास्त्रज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत देशभरातील कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत सिंचन जल व्यवस्थापन केंद्रांतील शास्त्रज्ञ सहभागी होणार असून सिंचन जल व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरील जल नियोजन तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जल व्यवस्थापन) चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.


Sunday, June 28, 2026

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (MoFPI) आर्थिक सहाय्याने वनामकृविच्या अन्नतंत्र महाविद्यालयात उभारलेल्या कॉमन इन्क्युबेशन सेंटरचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी यांच्या हस्ते उद्घाटन

 कृषिआधारित उद्योगांना प्रोत्साहनासाठी विशेष प्रयत्न : माननीय पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

कॉमन इन्क्युबेशन सेंटरमुळे ग्रामीण उद्योजकतेला नवी चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी 


महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) 
मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर 
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
राज्यसभा सदस्य मा. खा.श्री रामराव वडकुते
लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (MoFPI), नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्याने आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या राज्यस्तरीय नोडल संस्था यांच्या संयुक विद्यमाने विद्यापीठाच्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CIC) चे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी यांच्या शुभहस्ते दिनांक २८ जून २०२६ रोजी संपन्न झाले. यानिमित्ताने माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाचा विशेष कार्यक्रम विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य मा. खा.श्री रामराव वडकुते, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, हे होते. तसेच महाराष्ट्र शासनाचे कृषि प्रक्रिया नियोजन संचालक माननीय श्री विनयकुमार आवटे, माननीय प्रभारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती नतिशा माथुर  (भाप्रसे), माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत (भापोसे), शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

याबरोबरच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ राजेश क्षीरसागर, विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेश तीर्थंकर (लातूर) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री दौलत चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनपर मार्गदर्शनात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. चिराग पासवान जी यांनी आजच्या कार्यक्रमातील उपस्थितांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, विकसित भारत घडविण्यासाठी आपली प्रत्येकाची जबाबदारी वाढत आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी माझ्यावर या मंत्रालयाची जबाबदारी सोपविली असून, मी ती तितक्याच उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडत आहे. आज येथे दिसणारा उत्साह पाहून आपल्यासोबत संवाद साधण्याची इच्छा निर्माण झाली.

ते पुढे म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश असून देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील. सुरुवातीला भारताने उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केले आणि आज आपण उत्पादनामध्ये आत्मनिर्भर तर आहोतच, शिवाय अनेक देशांना निर्यातही करत आहोत. मात्र, या उत्पादनाला मूल्यवर्धन करून अधिक किमतीच्या वस्तूंमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे.

आपल्या परंपरेत पूर्वज दही, पापड, लोणचे यांसारख्या पदार्थांवर घरच्या घरी उत्कृष्ट पद्धतीने प्रक्रिया करत होते. त्याच धर्तीवर आजही आपल्या कृषि उत्पादनांवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग महत्त्वाचा असून त्याला अधिक चालना देण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांकडे जमीनधारणा कमी असते आणि गरजा अधिक असल्यामुळे अनेकदा त्यांना स्वतःकडील माल कमी किमतीत विकावा लागतो. त्यांच्याकडे साठवणुकीची पुरेशी क्षमता नसते. अशा शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करून त्यांच्या उत्पादनावर साठवणूक तसेच प्रक्रिया करून मूल्यवर्धनाद्वारे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.

उद्योग क्षेत्रामध्ये मोठी ताकद असून आपण नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनू शकतो. अन्नप्रक्रिया मंत्रालय उत्पादनापासून विक्रीपर्यंत सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजना राबवत आहे. अन्नधान्याची नासाडी ही एक गंभीर समस्या असून ती टाळण्यासाठी प्रक्रिया करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. प्रक्रिया उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार होणे आवश्यक असून यासाठी राज्य सरकारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्राने PMFME (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना) अंतर्गत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे आणि देशात अग्रगण्य स्थान मिळविले आहे.

आपले कृषि उत्पादन जागतिक स्तरावर निर्यात करण्यासाठी रासायनिक कीटकनाशक आणि खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच गुणवत्तापूर्ण प्रक्रिया उत्पादने तयार करावी लागतील. यासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या खेत बचाव अभियान” सारख्या उपक्रमांचा मोठा लाभ होईल.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात कार्य करा, परंतु आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका. केवळ गुणवत्तायुक्त उत्पादनेच दीर्घकाळ टिकून आपली ओळख निर्माण करतात. अनेक ब्रँड्स वर्षानुवर्षांच्या मेहनतीने उभे राहतात, परंतु लालसेपोटी दर्जामध्ये तडजोड केल्यास अनेक वर्षांची मेहनत काही क्षणात नष्ट होऊ शकते. त्यामुळे स्वतःशी कटिबद्ध राहून गुणवत्ता कायम राखा.

ते म्हणाले की, “मेड इन इंडियाअसलेली प्रत्येक वस्तू सर्व मापदंडांवर परिपूर्ण आणि जागतिक दर्जाची असली पाहिजे. भारतातील शेतकऱ्यांमध्ये जगाची अन्नबँक (Global Food Bank) बनविण्याची क्षमता आहे,” असा विश्वास माननीय पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

शेवटी त्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या विचारातून झाली. कृषि शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि कृषि विस्तार क्षेत्रात त्यांचे अनमोल योगदान आहे. त्यांचा वारसा जपत विद्यापीठाने, विभागाने आणि देशाने आपले नाव अधिक उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री माननीय नामदार श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्रावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यासाठी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी समन्वय साधला जात असून, परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रात कृषिआधारित प्रक्रिया उद्योग उभारावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परभणी जिल्ह्यात दळणवळणाची प्रभावी साधने उपलब्ध असल्याने येथे अधिकाधिक उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री ना. श्री चिराग पासवान जी यांनी भरीव मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार माननीय डॉ. रामराव वडकुते यांनी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी क्लस्टर विकास आणि विक्री व्यवस्थापन व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

खासदार माननीय श्री संजय जाधव यांनी अन्नतंत्र महाविद्यालयाचा इतिहास सांगून, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठे योगदान घडावे यासाठी भरीव मदत करण्याची मागणी केली.

स्वागतपर भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (MoFPI) वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME – Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises) ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच एक जिल्हा – एक उत्पादन” (ODOP) हा महत्त्वपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी, युवक आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात केवळ तीन कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CIC) मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी एक केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाच्या अन्न तंत्र महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CIC) हे ग्रामीण उद्योजकता विकासासाठी समर्पित केंद्र असून, या केंद्राच्या उद्घाटनासाठी राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्ता भरणे यांनी शुभेच्छा पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.

या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री मा. ना. श्री. चिराग पासवान जी यांच्या शुभहस्ते झाले असून ते युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत, त्यांच्या अंगी उत्कृष्ट नेतृत्वगुण आहेत. युवक आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देत त्यांनी विविध नाविन्यपूर्ण योजनांद्वारे उल्लेखनीय कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या विस्तार यंत्रणेद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येत असून, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत २०२१ ते २०२५ या सलग चार वर्षांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीच्या आधारे देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यात सुमारे २,२६० PMFME उद्योग स्थापन करण्यात आले असून त्यामुळे हा जिल्हा देशातील अग्रगण्य जिल्ह्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात कधी नुकसान झाले तरी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून त्याची भरपाई मिळविणारे अनेक शेतकरी आज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. हे सर्व शेतकरी मेहनती आणि कष्टाळू असून यश मिळविण्यासाठी केवळ मेहनत हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मेहनतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाच्या या केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तीन प्रमुख प्रक्रिया लाईन्स उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उसापासून गूळ व द्रवरूप गुळपाक निर्मिती प्रक्रिया लाईन, उसाचा रस व विविध पेय प्रक्रिया लाईन तसेच मसाला प्रक्रिया लाईन यांचा समावेश आहे. या सुविधांच्या माध्यमातून सुरक्षित, दर्जेदार आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती शक्य होत आहे.

या केंद्रात अत्याधुनिक फूड टेस्टिंग लॅबोरेटरी स्थापन करण्यात आली असून उत्पादनांचे पोषणमूल्य, सुरक्षितता आणि शेल्फ लाइफ यांचे वैज्ञानिक विश्लेषण करता येणार आहे. तसेच इच्छुक उद्योजकांना उत्पादन विकास, मानकीकरण, लघुउद्योग व्यवस्थापन, व्यवसाय नियोजन आणि बाजारपेठ विकास याबाबत तांत्रिक मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जात आहे.

आतापर्यंत सुमारे १००० ते १२०० लाभार्थ्यांनी प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला असून त्यामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागात उद्योजकता विकास आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

विद्यापीठाने शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम मनुष्यबळ निर्माण केले असून देशातील २१ राज्यांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ भारताचे लघुरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

संशोधन क्षेत्रातही विद्यापीठ अग्रेसर असून तुरीच्या गोदावरी’ वाणासह सोयाबीन, कापूस, तीळ आदी पिकांमध्ये विद्यापीठाचे उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

बायोमिक्स’ या संशोधनाधारित उत्पादनाच्या माध्यमातून विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत क्रांती घडवून आणली असून हे शेतकरीहिताचे उत्पादन मराठवाड्यासह इतर भागातही लोकप्रिय झाले आहे.

शेतकरी देवो भव:” या भावनेतून विद्यापीठ सातत्याने विस्तार कार्य करत असून या कॉमन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून संशोधन, प्रक्रिया उद्योग आणि विस्तार कार्य अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

संचालक माननीय श्री विनयकुमार आवटे यांनी नमूद केले की, या योजनेअंतर्गत ४२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ३० हजारांहून अधिक लाभार्थी प्रक्रिया उद्योगाशी जोडले गेले आहेत. या प्रक्रिया उद्योगांच्या अधिक सक्षमीकरणासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अनुदानात वाढ करण्याची विनंती त्यांनी केली.

प्रास्ताविकात डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, कॉमन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उद्योगांना नवी दिशा मिळाली आहे. यामध्ये युवक, शेतकरी, महिला आणि लघुउद्योजकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विद्यापीठ सातत्याने प्रगती करत असून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून (ICAR) अधिस्वीकृतीचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच या विद्यापीठाने देशातील सर्वप्रथम अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करण्याचा मान मिळवला आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसह अन्नप्रक्रिया प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), स्वयंसहायता बचत गट आणि युवा उद्योजकांना सक्षम बनविण्याचे कार्य केले आहे. भविष्यातही माननीय केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कॉमन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी, युवक, महिला बचतगट, उद्योजक, स्टार्टअप्स, एफपीओ, सहकारी संस्था आणि संशोधकांना या केंद्राचा मोठा लाभ मिळणार आहे.

अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, योजनेचे लाभार्थी, शेतकरी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच उद्योजक मोठ्या उत्साहात सहभागी झाले.











महाराष्ट्र शासनाचे कृषि प्रक्रिया नियोजन संचालक माननीय श्री विनयकुमार आवटे
शिक्षण संचालक मा. डॉ. भगवान आसेवार
सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ राजेश क्षीरसागर




कॉमन इन्क्युबेशन सेंटर या प्रकल्पाची माहिती

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (MoFPI) यांच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॉमन इन्क्युबेशन सेंटर (CIC) ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठी संधी उपलब्ध करून देत आहे.

परभणी जिल्ह्याच्या ODOP (One District One Product) संकल्पनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या केंद्रासाठी सुमारे ₹329.50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योजकांना आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षण, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे व्यापारीकरण यासाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

या केंद्रामध्ये विविध (तीन)अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी स्वतंत्र प्रक्रिया लाईन्स उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुळ व द्रव गुळ प्रक्रिया लाईन, ऊस रस व पेय प्रक्रिया लाईन, मसाला प्रक्रिया लाईन, तसेच अत्याधुनिक फूड टेस्टिंग लॅबोरेटरी यांचा समावेश आहे.

मसाला प्रक्रिया विभागात हळद, आले, लसूण, मिरची, धणे, जिरे, करी पावडर, मसाला मिक्स यांसारख्या उत्पादनांसाठी वॉशर-कम-पिलर, स्लायसर, रोस्टर, पल्व्हरायझर, ब्लेंडर, डिहायड्रेशन युनिट, पॅकिंग आणि इंडक्शन सीलिंग मशीन उपलब्ध आहेत.

गुळ प्रक्रिया विभागात ऊस क्रशिंग, फिल्ट्रेशन, बॉयलिंग, क्लॅरिफिकेशन, कॉन्सन्ट्रेशन, मोल्डिंग, पॅकेजिंग यासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली असून यामधून गुळ ब्लॉक, काकवी, गुळ पावडर आणि गुळ क्युब्स तयार करता येतात.

ऊस रस व बेव्हरेज प्रक्रिया विभागात ऊस स्वच्छता, रस काढणे, फिल्ट्रेशन, होमोजेनायझेशन, बाटली भरणे, पाश्चरायझेशन आणि लेबलिंग यंत्रणा उपलब्ध असून RTS पेये, बाटलीबंद ऊस रस आणि मिश्रित पेये तयार केली जाऊ शकतात.

याशिवाय फूड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये फायबर अ‍ॅनालायझर, व्हॅक्यूम ओव्हन, pH मीटर, ब्रिक्स-अ‍ॅसिडिटी मीटर, फ्रायिंग ऑईल मॉनिटर, रेफ्रॅक्टो-पोलॅरिमीटर, डीप फ्रीझर, कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट चेंबर यांसारखी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या केंद्रामार्फत दरवर्षी शेकडो शेतकरी, महिला गट, एफपीओ, स्वयं सहायता गट, सहकारी संस्था आणि नवउद्योजकांना प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन दिले जात असून आतापर्यंत जवळपास १००० ते १२०० लाभार्थ्यांना याचा लाभ घेतला आहे. यामुळे स्थानिक कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ ग्रामीण उद्योजकता, अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून हे कॉमन इन्क्युबेशन सेंटरआत्मनिर्भर भारत” आणि “विकसित भारत” संकल्पना साकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.