Friday, March 27, 2026

वनामकृवित कार्बन क्रेडिट व कार्बन शेती कार्यशाळा; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दालन

 कार्यशाळेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV) येथे कार्बन क्रेडिट, कार्बन शेती व कार्बन ट्रेडिंग या विषयावर दिनांक २६ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी  परिषद सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील, ग्रो इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उषा बारवाले झेहर आणि संचालक श्री अविनाश सोनी हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कार्बन क्रेडिटचे नोडल अधिकारी तथा संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर प्रत्यक्ष उपस्थित होते तर ऑनलाईन माध्यमातून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विनय सहगल, डॉ. आरती भाटिया, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील एकात्मिक शेती पद्धती विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद झा, आदी मान्यवरांची उपस्थिती होती

कार्यशाळेत बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा शतकीय वारसा अधोरेखित करत १९१८ पासून संशोधन केंद्र म्हणून सुरू झालेल्या संस्थेने १९७२ मध्ये विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून महाराष्ट्रातील विविध हवामान परिस्थितींना अनुरूप संशोधन कार्य केले असल्याचे सांगितले. सध्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदे (ICAR) कडून ‘A’ दर्जा प्राप्त करत राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या साडेतीन वर्षांत हवामान बदल, मृदा आरोग्य व प्रिसिजन शेती या क्षेत्रात सुमारे १५० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प विद्यापीठाने प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र हे हवामान बदलाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे संवेदनशील राज्य असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट ही जोखीम व्यवस्थापनाची प्रभावी संधी ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः २०२४ मधील अतिवृष्टीमुळे गोदावरी तूरसारख्या व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते, याचा संदर्भ देत त्यांनी शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. चांगले परिणाम मिळवण्यासाठी ‘गुड केमिस्ट्री’ (सहकार्य व समन्वय) आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी कार्बन क्रेडिट व कार्बन शेती या भविष्याभिमुख विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित उपक्रमांच्या प्रगतीची माहिती जाणून घेत शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या प्रभावी सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच पर्यावरण संरक्षण साध्य करण्यासाठी कार्बन शेतीचा व्यापक प्रसार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. मराठवाड्यात कार्बन क्रेडिट चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्व संस्था व शास्त्रज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि विद्यापीठातील विविध विभागांतील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी सुचविले.

डॉ. विनय सहगल यांनी मराठवाडा विभागात काम केल्याचा अनुभव सांगत, येथील कार्बन क्रेडिटसाठी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. डॉ. आरती भाटिया यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील विविध मॉडेलची माहिती देताना, विशेषतः काटेकोर व शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर उहापोह केला तर डॉ. प्रमोद झा यांनी कार्बन शेतीतील आव्हानांवर प्रकाश टाकताना, भारतात कार्बन क्रेडिट नोंदणीसाठी सक्षम संस्था कार्यरत नसल्याचे नमूद केले. तसेच परदेशी संस्थांकडून नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते, असे त्यांनी सांगितले.

ग्रो इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उषा बारवाले झेहर तसेच ग्रो इंडिगोच्या तज्ज्ञांनी ग्रो इंडिया संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माध्यमातून पंजाब राज्यात कार्बन क्रेडिट मिळविण्यात यश आले असून अशाच प्रकारचे प्रकल्प देशातील पाच राज्यांत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातही या पद्धतीचे प्रकल्प राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. शेती पद्धतींमध्ये आवश्यक बदल करून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यास त्या घटेचे रूपांतर कार्बन क्रेडिटमध्ये केले जाते. एक टन CO समतुल्य उत्सर्जन घट म्हणजे एक कार्बन क्रेडिट मानले जाते. ही क्रेडिट्स आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांकडे नोंदवून मोठ्या कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. सध्या ग्रो इंडिगोने सुमारे १० लाख एकर क्षेत्र आणि २ लाख शेतकऱ्यांचा या उपक्रमात समावेश केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत विद्यापीठ व ग्रो इंडिगो यांच्यात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी कार्बन शेती विषयक संशोधन प्रकल्प सुरू करणे, सामंजस्य करार (MoU) करणे, तसेच अभ्यास मंडळ व सल्लागार समित्यांमध्ये तज्ज्ञांचा समावेश करणे यावर चर्चा झाली. कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांच्याकडे डेटा संकलन व विश्लेषणाची जबाबदारी सोपविण्यात आली.

तसेच ‘बायोमिक्स’ सारख्या जैविक इनपुट्सचा वापर वाढवून शाश्वत शेतीला चालना देण्याचेही आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेचा समारोप करताना मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कार्बन शेतीचा मोठ्या प्रमाणावर पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक व तांत्रिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यशाळेत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. सचिन मोरे आदी मान्यवरांसह विद्यापीठातील शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.






वनामकृविच्या आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहातील सुविधांची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून पाहणी; कॅन्टीन व व्यायाम सुविधांबाबत सूचना

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भेट दिली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी मुलींच्या वस्तीगृहातील विविध सोयी-सुविधांची सखोल पाहणी करून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यावर भर दिला. विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कॅन्टीनची अद्ययावत व सुसज्ज व्यवस्था निर्माण करावी तसेच आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक सकाळच्या नाश्त्याची नियमित सोय करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

यासोबतच विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करून त्यांना नियमित व्यायामाची सवय लागावी यासाठी स्वतंत्र व्यायामाची सुविधा निर्माण करावी अथवा विद्यमान व्यायामशाळेत मुलींसाठी दररोज किमान दोन तास राखीव ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वस्तीगृह परिसरात स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था, प्रकाशयोजना आणि आवश्यक देखभाल याकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थिनींना अनुकूल व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देत, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा उद्देश त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भानुदास बोंडे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


वनामकृविच्या आंबेजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणियांची भेट; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत आंबेजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी केंद्रातील विविध विकासकामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीताफळ संशोधन केंद्रासाठी प्रस्तावित नवीन इमारतीचे काम गतीने पूर्ण करावे, तसेच जवळील शेततळ्यातील गाळ (सिल्ट) आणून मृदा सुपीकता वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र परिसरात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याचे, वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करून अतिक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच केंद्रातील तालुका बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यासाठी नाहरकत मिळविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय सीताफळ प्रक्रिया केंद्रातील अपूर्ण कामे येत्या १४ एप्रिलपूर्वी पूर्ण करावीत, असे सांगून प्रक्रिया युनिटमधील उपकरणांची पाहणी केली. या उपकरणांद्वारे सीताफळ पल्पपासून कुल्फी, रबडी आणि आईस्क्रीम तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले असल्याची माहिती माननीय कुलगुरूना प्रभारी अधिकारी यांनी यावेळी दिली.

या भेटीतून सीताफळ संशोधन व मूल्यवर्धनाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



Thursday, March 26, 2026

वनामकृविच्या उद्यानविद्या विभागात ८ एकर क्षेत्रावर फुलपिक संशोधन व व्यावसायिक फुलशेतीस प्रारंभ

 फुलशेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मोठी संधी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या विभागामार्फत ८ एकर क्षेत्रावर विविध फुलपिकांची लागवड करून फुलपिक संशोधन व व्यावसायिक फुलशेती उपक्रमास दिनांक २५ मार्च २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत झेंडू, गलांडा (गेलार्डिया), अॅस्टर, गुलछडी, निशिगंध, शेवंती आणि गुलाब यांसारख्या विविध फुलपिकांची लागवड करण्यात आली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत पॉलीहाऊस व शेडनेटमध्ये गुलाबाच्या १० उत्कृष्ट वाणांची लागवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभाग प्रमुख  डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी फुलशेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा एक प्रभावी व शाश्वत पर्याय असल्याचे अधोरेखित केले. मराठवाडा विभागातील अनुकूल हवामान व बाजारपेठेतील वाढती मागणी लक्षात घेता फुलपिकांच्या लागवडीला मोठा वाव असून, शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत फुलशेतीकडे वळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तसेच संशोधनाधिष्ठित शेतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, अचूक सिंचन पद्धती व कीड-रोग व्यवस्थापन यांचा अवलंब केल्यास उत्पादनात व गुणवत्तेत लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच मूल्यवर्धन, साठवण व विपणन साखळी मजबूत करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी सांगितले की, या फुलपिकांवर आचार्य (Ph.D.), पदव्युत्तर (PG) व पदवी (UG) स्तरावरील विद्यार्थी संशोधन करणार असून यामुळे फुलशेती क्षेत्रात नवे तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल.

यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची जिवा प्रकल्पांतर्गत बाबुळगाव – गंगणबीड जलसंधारण क्षेत्रास भेट

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जिवा प्रकल्पांतर्गत बाबुळगाव – गंगणबीड (ता. कंधार, जिल्हा नांदेड) जलसंधारण क्षेत्राला दिनांक २५ मार्च २०२६ रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बायो-इनपुट रिसोर्स सेंटर (BRC) चे उद्घाटन केले तसेच शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

या भेटीस पशुसंवर्धन यांत्रिकीकरण विभागाचे प्रभारी डॉ. दयानंद टेकाळे, मृदा विज्ञान विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार तसेच आयसीएआर-एआयसीआरपी (युएई), आयसीएआर-सीआयएई, भोपाळचे माजी प्रकल्प समन्वयक डॉ. महाराणी दिन उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांचे प्रयत्न, संस्कृती संवर्धन मंडळाच्या पुढाकाराचे तसेच वॉसान (WASSAN) आणि आरआरए नेटवर्कच्या तांत्रिक सहकार्याचे कौतुक केले. नैसर्गिक शेती (NF) अंतर्गत सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या श्रीमती सुमन बोरोळे या महिला शेतकऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कापूस आधारित पीक विविधीकरण मॉडेलचे आर्थिक व कार्यप्रदर्शन मूल्यांकनासह सहभागात्मक पद्धतीने अभ्यास करणे, तसेच बायो-इनपुट रिसोर्स सेंटर (BRC) चे प्रणालीबद्ध मूल्यमापन करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सूचनांचे त्यांनी स्वागत केले. नैसर्गिक शेतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी विद्यापीठ, राज्य शासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून बहु-घटक भागीदारी बळकट करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच प्रकल्पाच्या सामाजिक घटकांना अधिक बळकटी देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.










मानोली येथे ज्वार पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथील ज्वार संशोधन केंद्रातर्फे अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्प, हैद्राबाद यांच्या सहकार्याने आद्य रेषीय ज्वार पीक प्रात्यक्षिक अंतर्गत मानोली (ता. मानवत, जि. परभणी) येथे बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या सहकार्याने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्वार संशोधन केंद्राच्या प्रभारी डॉ. अंबिका मोरे होत्या.

अध्यक्षीय भाषणात समारोपात डॉ. अंबिका मोरे यांनी ज्वार संशोधन केंद्राच्या कार्याचा आढावा घेत सध्याच्या बदलत्या काळात शेतकऱ्यांनी ज्वारीच्या मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले.

यावेळी ज्वार संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी व वरिष्ठ ज्वार रोग शास्त्रज्ञ डॉ. तुकाराम गरुड तसेच माजी प्रभारी अधिकारी व वरिष्ठ ज्वार पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्वार पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. परमेश्वर निर्वळ, प्रगतीशील शेतकरी श्री. रामभाऊ शिंदे तसेच आद्य रेषीय ज्वार पीक प्रात्यक्षिकाचे लाभार्थी व सहआयोजक श्री. मदन महाराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १०० शेतकरी उपस्थित होते.

मेळाव्याच्या प्रारंभी प्रास्ताविक ज्वार कृषि  विद्या शास्त्रज्ञ प्रा. प्रितम भुतडा यांनी केले. सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रशांत आंबिलवादे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. महेश दडके, ज्वार रोग शास्त्रज्ञ यांनी केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी ज्वार संशोधन केंद्रातील श्री. परसराम शिंदे, श्री. कृष्णा देशमुख, श्री. मोहसिन यांच्यासह मानोली येथील शेतकरी श्री. मदन महाराज शिंदे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.






Wednesday, March 25, 2026

खेळातून सर्वांगीण विकास; “खेळ आहे तर सर्व आहे” — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि.

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धां उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यापीठस्तरीय कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दि. २५ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, घटक व खाजगी कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य आणि क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना खेळातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे प्रतिपादन केले. “खेळ आहे तर सर्व आहे” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील कृषि तंत्र विद्यालयांतील विद्यार्थी व कर्मचारी यांची परस्पर भेट होऊन विचारांची देवाण-घेवाण होते, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होते तसेच संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचे भविष्यातील विकसित भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी खेळाडूंना प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि क्रीडास्पृहा जोपासण्याचा संदेश दिला. शेवटी, सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करून विजयासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, खेळामुळे मानवी आरोग्य सुधारते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.

क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्यानंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, उपकुलसचिव (विद्या) डॉ. गजानन भालेराव, तसेच सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

माननीय कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे यांनी तसेच सूत्रसंचालन श्री. अशोक खिल्लारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी केले.

या क्रीडा स्पर्धेत मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांतील ६ घटक कृषि तंत्र विद्यालयांसह एकूण ५१ कृषि तंत्र विद्यालयांच्या जिल्हास्तरावरील विजयी संघांचे सुमारे ४०० खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.