Sunday, February 15, 2026

वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; मृदा आरोग्य व पोषणमूल्य अभ्यासावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवरांनी भेट दिली. या भेटीत विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे यांचा समावेश होता.

मान्यवरांनी केंद्रातील सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील विविध संशोधन प्रयोगांची पाहणी केली. यामध्ये भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांवरील संशोधन, हरभरा+करडई व हरभरा+जवस आंतरपीक पद्धती, रबी ज्वारी आदी पिकांवरील प्रयोगांचा समावेश होता. तसेच भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (आयसीएआर) प्रायोजित नैसर्गिक शेती मॉडेल फार्मलाही त्यांनी भेट दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब (Soil Organic Carbon) मध्ये होणारे हळूहळू सकारात्मक बदल तसेच शेतमालाच्या पोषणमूल्यातील सुधारणा यांचा शास्त्रीय अभ्यास करण्यावर भर दिला. पारंपरिक शिफारस केलेल्या ‘पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस’ची तुलना नैसर्गिक शेतीतील नवीन इनपुट्ससोबत करून उत्पादनासह इतर लाभांचे सखोल मूल्यांकन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी शेतकरी वापरत असलेल्या विविध शेती पद्धतींचे स्पष्ट परिभाषण व दस्तऐवजीकरण करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच नवीन शिफारस केलेल्या उपाययोजनांशी तुलना करून अतिरिक्त लाभांचा अभ्यास करावा आणि नैसर्गिक शेतीखाली विविध वाणांचे परीक्षण व मूल्यांकन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सेंद्रिय संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रातील संशोधन व प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ पपीता गौरखेडे, यांनी नैसर्गिक शेती मॉडेल फार्मवरील उपक्रमांचे सादरीकरण केले. या भेटीप्रसंगी डॉ. विवेक घुगे, डॉ. तेजस्विनी कच्छवे यांच्यासह संशोधक, शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





ज्वारी संशोधन अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व आंतरविभागीय सहकार्य आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ अंतर्गत कार्यरत ज्वारी संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्रीय पाहणी भेट देण्यात आली. या वेळी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सहयोगी संचालक (बियाणे)डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ज्वारीतील पोषणमूल्याशी संबंधित गुणधर्मांचे अचूक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड देणाऱ्या व उद्योगांच्या गरजांनुसार उपयुक्त ठरणाऱ्या वाणांच्या विकासावर संशोधन केंद्राने लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून ज्वारीस बाजारपेठेत मागणी वाढून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच अन्नतंत्रज्ञान व कृषि  अभियांत्रिकी विभागांशी समन्वय साधून विकसित होणारी तंत्रज्ञाने व्यवहार्य, वापरास सुलभ आणि शेतकरी-केंद्रित असावीत, अशा सूचना माननीय कुलगुरूंनी दिल्या.

या पाहणीदरम्यान ज्वारी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याचा आढावा घेण्यात आला. मार्गदर्शन करताना प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी विद्यमान ज्वारी जनुकसंपदेतील (germplasm) विशिष्ट व उच्च मूल्याच्या गुणवैशिष्ट्यांचे संवर्धन, मूल्यमापन आणि शोध घेण्याची नितांत गरज अधोरेखित केली. प्रजनन प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रगत फिनोटायपिंग व जीनोटायपिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच सध्याच्या ज्वारी उत्पादनातील अडथळे दूर करण्यासाठी जैवतंत्रज्ञान तज्ज्ञांशी सहकार्य वाढवावे, अशी ठाम शिफारस त्यांनी केली.

या भेटीमुळे ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुढील स्तरावर संशोधन कार्य नेण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा व प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.




वनामकृविच्या बायोमिक्स संशोधनामुळे शाश्वत शेतीला नवी दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र येथील जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी भेट दिली.

या प्रसंगी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, संचालक बियाणे संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला या पिकांमध्ये विक्रमी उत्पादन साध्य झाले असून हे शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीतील मित्र बुरशी व मित्र जिवाणूंची संख्या वाढून वनस्पतींची पोषणक्षमता, रोगप्रतिकारशक्ती व उत्पादनक्षमता सुधारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बायोमिक्सचे उत्पादन व प्रसार अधिक व्यापक स्तरावर वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी जैवतंत्रज्ञानाधारित इनपुट्समुळे खर्चात बचत, जमिनीची सुपीकता टिकवणे आणि दीर्घकालीन उत्पादनवाढ साध्य होते, असे प्रतिपादन केले. संशोधन–विस्तार–शेतकरी या त्रिसूत्रीचा प्रभावी समन्वय साधल्यास मराठवाड्यातील शेती अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या बायोमिक्सची ख्याती शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढत असून, वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढलेला आहे. भविष्यात शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व क्षेत्रीय चाचण्या वाढवून तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या भेटीदरम्यान बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केंद्रातील संशोधन कार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण व शेतकऱ्यांच्या शेतात बायोमिक्सच्या वापरामुळे झालेल्या उत्पादनवाढीबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी बायोमिक्स विभागातील श्री कपिल निर्वंळ, श्री राम रनेर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.




वनामकृविच्या करडई संशोधन केंद्रास मान्यवरांची भेट; आधुनिक जैवतंत्रज्ञानावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या करडईवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) केंद्रास दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी भेट दिली.

या भेटीदरम्यान मान्यवरांनी केंद्रावर सुरू असलेल्या करडई पिकाच्या संशोधन उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या केंद्रावर पैदास (Breeding) २१, अग्रोनॉमी ६, रोगशास्त्र ८ अशा चाचण्या सुरू असून ८०० हून अधिक जर्मप्लाझम संग्रह उपलब्ध आहे. सुमारे ४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिक व चाचणी प्रयोग राबविले जात आहेत.

करडई पिकातील सुधारित वाणनिर्मिती, रोग-किड व्यवस्थापन, उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान, तेलगुणवत्ता सुधारणा तसेच हवामान बदलास अनुरूप संशोधन या बाबींवर मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जैवतांत्रिक हस्तक्षेप, बियाणे शुद्धता राखणे आणि संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण यावर अधिक भर देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी करडई पिकाचे महत्त्व अधोरेखित करून संशोधन निष्कर्ष थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. तर प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादनक्षमता वाढविणे व ताणतणाव-सहनशील वाण विकसित करण्यासाठी संशोधन अधिक बळकट करण्याचा सल्ला दिला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संचालक (बियाणे) तथा वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, करडई पैदासकार तथा प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल, शास्त्रज्ञ डॉ. संतोष शिंदे आदी उपस्थित होते. केंद्राच्या भविष्यातील संशोधन दिशा, आंतरसंस्थात्मक सहकार्य आणि शेतकरीहिताच्या विविध उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली.




कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञानाधारित प्रगत संशोधन संसाधने व तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या लातूर येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” विषयावरील विचारमंथन कार्यशाळा संपन्न

शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी जनुकीय पातळीवरील अचूक संशोधन आवश्यक – प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे जैवतंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या पुरस्कृत “कृषि विकासासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान संसाधने व तंत्रज्ञान” या विषयावर दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह उपस्थित होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, गळीत धान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विचारमंथन कार्यशाळेत विद्यापीठातील पीक पैदास, वनस्पतीशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र व कीटकशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक तसेच पदव्युत्तर विद्यार्थी असे एकूण ४१ संशोधक सहभागी झाले होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वाढती लोकसंख्या, हवामान बदल आणि मर्यादित नैसर्गिक संसाधने यांचा विचार करता कृषि विकासासाठी जैवतंत्रज्ञान, जीनोम व जनुक बदल तसेच प्रगत संशोधन साधनांचा प्रभावी वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादनात वाढ, कीड व रोग प्रतिकारशक्ती विकसित करणे तसेच पौष्टिक अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे शक्य झाले असून हे शाश्वत शेतीसाठी अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह यांनी सहभागी संशोधकांना मार्गदर्शन केले. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून डीएनए पातळीवर आधारित जनुकीय विकसित पिके, आण्विक जैवतंत्रज्ञानाधारित पीक प्रजनन प्रणाली, कमी कालावधीत अपेक्षित सुधारणा साध्य करण्यासाठी डीएनए मार्करचा वापर, प्रयोगशाळेत डीएनए पातळीवर वाणांची अचूक तपासणी, जैवतंत्रज्ञानाधारित रोग निदान प्रणाली तसेच हवामान-स्मार्ट पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी जीनोम एडिटिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व पर्यावरणपूरक कृषि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले.

संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मराठवाड्यातील विविध पिकांमधील समस्या व त्यावर जैवतंत्रज्ञानाधारित संशोधनाची आवश्यकता याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच सर्व संशोधकांनी जनुकीय पातळीवरील संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विविध पिकांमध्ये अपेक्षित सुधारणा कशा साधता येतील, यावर सखोल चर्चा करण्यात आली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील विविध संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी जनुकीय पातळीवर पिकांतील विविध गुणधर्म ओळखून त्यांचे प्रचलित वाणांमध्ये रूपांतर करून नवीन वाणांची निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जिनोमिक्स फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात जैवतंत्रज्ञान विषयक अत्याधुनिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अच्युत भरोसे यांनी केले. सूत्रसंचालन कु. श्रावणी नवले व विवेक वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. योगेश भगत यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सारिका भालेराव, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. रमेश ढवळे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. दिप्ती वानखडे, सुरेखा आंबटवाड, सुरेश बिरादार, वीरभद्र दुरुगकर, अश्विनी गरड, अभिजित देशमुख, प्रतीक्षा जाधव, किशोर घोळवे, अंकिता इंगवले, प्रथमेश पवार, विनोद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.






शिवव्याख्यानातून विद्यार्थ्यांना दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी शिवव्याख्यान; प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली प्रेरणादायी शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ख्यातनाम शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्लांट बायोटेक्नॉलॉजी येथील जैवतंत्रज्ञान विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक डॉ. नागेंद्र कुमार सिंह तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या विचारांतून सांगितले की, साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ व लोककल्याणकारी विचार समाजमनात तेवते ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासारखे अभ्यासू, संशोधक वृत्तीचे व प्रभावी वक्ते सातत्याने करीत आहेत. शिवचरित्र केवळ इतिहासापुरते मर्यादित न राहता ते मूल्यशिक्षण, नेतृत्वगुण, शिस्त, धैर्य व नैतिकतेचा आदर्श म्हणून आजच्या पिढीसमोर मांडणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. युवापिढीने शिवविचार आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी वैयक्तिक जीवनासह सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी करावी, असे आवाहन करत त्यांनी कार्यक्रमाच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशा प्रकारची प्रेरणादायी व्याख्याने वारंवार आयोजित करणे अत्यंत आवश्यक असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा व मूल्यांची जाणीव होते.

यावेळी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी शिवकालीन इतिहासाची वर्तमान काळाशी सांगड घालत मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन, त्यांची दृष्टी, तसेच वेळ, भावना आणि पैसा यांचा योग्य उपयोग करणारा व्यक्ती निश्चितच यशस्वी होतो, असा यशाचा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आत्मविश्वासाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही गोष्टीला नकार न देता ‘हे शक्य आहे’ या आत्मविश्वासातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत दाबके यांनी केले, तर आभार प्रदर्शन वामन काळबांडे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य 
कार्यक्रम समिती अध्यक्ष डॉ. रणजीत चव्हाण 




 

Friday, February 13, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रम; शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या निर्देशानुसार करण्यात येते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवून, विद्यापीठापासून दूर असलेल्या भागांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहोचविण्याच्या उद्देशाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ९ चमूंमधील २५ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ३५० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील कार्यक्रमास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अशा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ केवळ कृषि तंत्रज्ञान पुरविण्यापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सातत्याने कार्य करत आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय यंत्रणांचे सहकार्यही घेतले जाईल. विद्यापीठ शेतकरी देवो भवः’ या तत्त्वावर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद करून, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विविध योजना व सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. राकेश अहिरे यांनी सोयाबीन, तूर, कापूस व हळद या मराठवाड्यातील प्रमुख पिकांच्या अधिक उत्पादनासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी कापसाची घनपद्धतीने लागवड, सुधारित वाणांचा वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाचा महिला मेळावा (३ जानेवारी), खरीप (१८ मे) व रब्बी (१७ सप्टेंबर) या शेतकरी मेळाव्यांची माहिती देत, बियाणे व निविष्ठा विक्री, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कृषि प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच व्हॉट्सअॅप हेल्पलाईन, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनेल, ब्लॉग व ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे विद्यापीठ शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी हळद लागवड तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन तसेच लागवड पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळदीतील कंदमाशी व्यवस्थापन, कापूस लागवड तंत्रज्ञान व कीटकनाशकांचा सुरक्षित वापर याविषयी माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, बदनापूर, खामगाव) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, प्रा. किशोर जगताप, डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन धांडगे, श्री. मधुकर मांडगे, तसेच कृषि विभागाचे अधिकारी श्री. आनंद नंदनवरे, श्री. सचिन उबाळे व श्री. उदय देवळणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे ऑनलाइन मार्गदर्शन   

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे मौजे पुसेगाव (ता. सेनगावजि. हिंगोली) येथे मार्गदर्शन करताना 
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मौजे पुसेगाव (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथे प्रक्षेत्र भेट  
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना  
सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, मौजे काटे पिंपळगाव तालुका गंगापूर येथे महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना 


उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत मौजे पुसेगाव येथे मार्गदर्शन करताना 
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत प्र सुर्यवंशी मौजे औसा, जि लातूर येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना 


 कृषि विज्ञान केंद्र, खामगावचे शास्त्रज्ञ डॉ. बी. बी. गायकवाड आणि प्रा. के. एल. जगताप मौजे राक्षसभुवन ता. गेवराई येथे प्रक्षेत्र भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना