Thursday, March 12, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणार्थ्यांची विद्यापीठातील संशोधन केंद्रांना शैक्षणिक भेट

सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र 

करडई संशोधन केंद्र 
महाराष्ट्र मॅकनायझेशन सेंटर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजितशाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून वनस्पती मायक्रोबायोम, जैव-इनपुट्स तंत्रज्ञान, शाश्वत शेती व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषितंत्रज्ञान याबाबत सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली व अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक १२ मार्च २०२६ रोजी प्रशिक्षणार्थ्यांसाठी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे तसेच मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील करडई बीजोत्पादन प्रक्षेत्रास शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी विद्यापीठात चालू असलेल्या संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

भेटीदरम्यान सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील तसेच करडई संशोधन केंद्राचे करडई पैदासकार व प्रभारी अधिकारी डॉ. राजेश धूतमल यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सेंद्रीय शेती, जैव-इनपुट्सचा वापर, करडई पिकाचे सुधारित तंत्रज्ञान तसेच प्रक्षेत्रावर राबविण्यात येणारे विविध संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.

याबरोबरच महाराष्ट्र मॅकनायझेशन सेंटरचे प्रभारी अधिकारी श्री. संजय मोरे, तांत्रिक अधिकारी इंजि. शिवानंद शिवपुजे व इंजि. गजानन खिस्ते यांनी कृषी यंत्रसामग्रीच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. ट्रॅक्टरची निगा व देखभाल, लहान-मोठ्या दुरुस्तीची तंत्रे, ट्रॅक्टर चालवताना घ्यावयाची काळजी तसेच यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. याशिवाय रुंद वरंबा-सरी टोकण यंत्र, ट्रॅक्टरचलित नांगर तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याबाबतही प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

या शैक्षणिक भेटीमुळे प्रशिक्षणार्थ्यांना संशोधन, प्रात्यक्षिक व आधुनिक कृषितंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून शाश्वत शेतीसाठी मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत उपयुक्त मार्गदर्शन लाभले.

या प्रसंगी विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप तसेच उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.










वनामकृवित ‘मिनी सरस’ विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचा भव्य शुभारंभ

 ‘मिनी सरस’ महोत्सव महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाभदायक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, उमेद अभियान व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन व खाद्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक १२ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदान, काळीकमान येथे आयोजित करण्यात आला असून त्याचा भव्य शुभारंभ दिनांक १२ मार्च रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि जिल्हा परिषद परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर यांच्या हस्ते झाला.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. दीपक दहे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे तसेच त्यांच्या कौशल्याचे व उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करून त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने आयोजित केलेला ‘मिनी सरस’ महोत्सव महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. महिला स्वयंस्फूर्त असतात, मात्र त्यांना योग्य पाठबळाची गरज असते. कृषि विद्यापीठ महिलांना प्रक्रिया उद्योगातील उत्पादन, पॅकेजिंग व विक्री व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी सदैव तत्पर आहे. विशेषतः महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांवर लेबलिंग व योग्य पॅकेजिंग करण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या महोत्सवात परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला बचत गटांनी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले आहेत. खाद्य महोत्सवात मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, हुर्डा पार्टी, भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ, पाणीपुरी चाट तसेच अस्सल मराठवाडी व्हेज व नॉनव्हेज जेवण यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध आहे. याशिवाय सेंद्रिय हळद, विविध डाळी, मसाले, लोणचे, पापड, काजू, बेदाणा, केळी चिप्स यांसारखी घरगुती उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शोभेच्या वस्तू, कापडी पिशव्या, लाकडी कोळपाट, खपली गहू आदी वस्तूही प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

महोत्सवात कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माहितीपर स्टॉल्सचीही मांडणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार आहे. परभणीकरांनी आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला भेट देऊन ग्रामीण महिलांच्या परिश्रमातून तयार झालेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर आणि प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील यांनी केले आहे.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक धनंजय भिसे, विठ्ठल मुळे, गजानन सोनावणे तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील उमेद अभियानाच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.




Wednesday, March 11, 2026

वनामकृवित अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप

सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा  – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक ११ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि सहाय्यक लेखाधिकारी श्री. मोहम्मद यांची विशेष उपस्थिती होती. तसेच नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विद्यापीठ हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. संशोधन व विस्तार कार्यातून विकसित होणारे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषि क्षेत्रात पाण्याचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी शेतीमध्ये पाण्याची बचत व संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, असेही त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ साधावी, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व संशोधन कार्याची माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.

अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत लिंगापूर (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील ग्रामसभेकडून निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते १० तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यापीठाची कृषि दैनंदिनीही शेतकऱ्यांना देण्यात आली.

यावेळी डॉ. सुमंत जाधव (विभाग प्रमुख) व डॉ. विशाल इंगळे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग) यांनी तुषार सिंचन संचाचा योग्य वापर, निगा व देखभाल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा अधिक लाभ होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्तिक गिराम, विलास जाधव, प्रकाश मोते, बाळू रनेर आणि भाले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वनामकृवित जिल्हास्तरीय (परभणी व हिंगोली) आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा अत्यावश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




परभणी व हिंगोली जिल्ह्यातील आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १० मार्च २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील क्रीडांगणावर उत्साहात पार पडले.

या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कृषि तंत्र विद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड, तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे हे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माणसाच्या जीवनातील सर्वांगीण विकासासाठी खेळला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. खेळ ही केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याचे साधन नसून ती व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कृषि तंत्र शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शिक्षणाबरोबरच खेळाच्या क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे. स्पर्धेमुळे जिंकण्याची जिद्द, पराभव स्वीकारण्याची तयारी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी सर्व खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी डॉ. गजेंद्र लोंढे यांनी खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून पंचांनी दिलेले निर्णय नम्रतेने स्वीकारावेत व क्रीडा स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन केले. डॉ. संतोष पिल्लेवाड यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक सादर केले.

या क्रीडा स्पर्धेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १० कृषि तंत्र विद्यालयांतील सुमारे ३०० खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेनंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गजेंद्र लोंढे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश कदम व डॉ. संघर्ष शृंगारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अशोक खिल्लारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. धीरेंद्र गोसावी यांनी केले.

क्रीडा स्पर्धा आयोजन व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नामदेव टारफे, डॉ. शशिशेखर जावळे, श्री. हनुमान बनसोडे, श्री. कुंडलीक पांचाळ, श्री. विठ्ठल रणेर, श्री. सोनवणे, श्री. शिंदे व श्री. अनिल गुरले यांनी परिश्रम घेतले.



















आयसीएआरच्या जनरल बॉडीवर शास्त्रज्ञ सदस्य म्हणून डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची नियुक्ती

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर यांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR- Indian Council of Agricultural Research) या देशातील सर्वोच्च कृषि संशोधन संस्थेच्या जनरल बॉडीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कृष्णराव कौसडीकर यांची शास्त्रज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ ९ मार्च २०२६ ते ८ मार्च २०२९ असा तीन वर्षांचा राहणार आहे.

भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) सोसायटीची जनरल बॉडी ही परिषदेची सर्वोच्च संस्था असून तिचे अध्यक्ष केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री असतात. या संस्थेमध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, नामवंत शास्त्रज्ञ तसेच शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. देशातील कृषि शिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक नियोजनास दिशा देणे, प्रगतीचा आढावा घेणे आणि भावी धोरणे निश्चित करणे ही या संस्थेची प्रमुख जबाबदारी आहे.

या निवडीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. कौसडीकर यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. हरिहर कौसडीकर हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे संशोधन उपसंचालक तसेच मृदविज्ञान विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कृषि शिक्षण, संशोधन, नियोजन, व्यवस्थापन तसेच कृषि विस्तार क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारत सरकारने देशातील ७४ कृषि विद्यापीठांमधून त्यांची या महत्त्वपूर्ण समितीवर निवड केली आहे. कृषि परिषद, पुणे येथे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण विभागाच्या संचालक पदाचा त्यांना अनुभव आहे. तसेच कृषि विद्यापीठातील मृदविज्ञान विषयक शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा देशातील कृषि शिक्षण व संशोधनाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होणार असल्याचे मानले जात आहे.

डॉ. कौसडीकर यांची ही निवड महाराष्ट्र राज्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tuesday, March 10, 2026

मायक्रोबायोम व जैव-इनपुट्स प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींनी ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) यांचे मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) प्रायोजित शाश्वत कृषिसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव-इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना” (Innovations in Plant Microbiome Bio-inputs Culturing Techniques for Sustainable Agriculture) या विषयावरील २१ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (हिवाळी शाळा) दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, तेलंगणा, केरळ, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या सहा राज्यांतील एकूण २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

या प्रशिक्षणार्थींना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नवोन्मेषाला चालना देणारे आणि शाश्वत कृषि विकासासाठी उपयुक्त ड्रोन तंत्रज्ञान” (Drone Technologies for Driving Innovation and Sustainable Agriculture) या विषयावर दिनांक १० मार्च २०२६ रोजी मार्गदर्शन केले.

माननीय कुलगुरूंनी कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योजक आणि शासन (एआयजी – AIG) यांच्यातील समन्वय अत्यावश्यक असल्याचे सांगितले. या समन्वयातून शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान व अवजारांचे संशोधन व विकास केला जातो. त्यानंतर शासनाच्या प्रोत्साहनातून आणि उद्योजकतेच्या माध्यमातून त्या तंत्रज्ञानाचे उत्पादन व प्रसार वाढविता येतो. कोणत्याही तंत्रज्ञानाचे प्रभावी व्यापारीकरण करण्यासाठी एआयजी मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून या कार्यात सहभागी होता आले, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानासाठी आरपीटीओ (RPTO) केंद्राच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासोबतच विविध संस्थांशी सामंजस्य करार करून ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी ड्रोनचे विविध उपयोग तसेच पिकांमध्ये ड्रोनच्या वापरामुळे होणारे फायदे प्रयोगांमधील निष्कर्षांच्या आधारे समजावून सांगितले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानासाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. गजेंद्र जगताप आणि उपसंचालक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांची उपस्थिती होती.





महिला : हक्क, न्याय आणि कृती” विषयावर वनामकृवित व्याख्यान

 महिलांचा सन्मान असलेल्या घरात सुख-समृद्धी नांदते – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 महिलांनी प्रगतीसाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने वागणे आवश्यक – माननीय ॲड. वैशाली डोळस

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय अँड. वैशाली डोळस

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ अंतर्गत कृषि  महाविद्यालय, परभणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी महिला : हक्क, न्याय आणि कृती” या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक १० मार्च २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध व्याख्यात्या माननीय ॲड. वैशाली डोळस उपस्थित होत्या. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, डॉ. नीता गायकवाड तसेच शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार आणि सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. स्मिता खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांविषयी आदर व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, भारत देशाच्या घडणीत अनेक थोर महिलांचा सिंहाचा वाटा आहे आणि आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले मोलाचे योगदान देत आहेत. कौटुंबिक व सामाजिक पातळीवर महिला आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी महिलांना अनेकदा पुरुषांपेक्षा अधिक संघर्ष करावा लागतो. ज्या घरामध्ये महिलांचा सन्मान होतो, त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते. त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येकाने महिलांचा आदर करावा आणि त्यांना शिक्षण व सर्व सोयीसुविधांनी सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठात पूर्वी अल्पसंख्य असलेली विद्यार्थिनींची संख्या आता सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली असून प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक मुलींचा सहभाग आहे. त्यामुळे आजची महिला सक्षम व प्रगत आहेत. कार्यालयामध्ये महिला चांगले काम करत असतील तर त्यांना अधिक जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली पाहिजे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुण्या माननीय ॲड. वैशाली डोळस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी शिक्षणाच्या बळावर आत्मविश्वास वाढवून प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे. समाजातील चुकीच्या प्रथा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. महिलांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवून जबाबदारीने वागले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचार (Domestic Violence) यांसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध समाजाने एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि  महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका नारळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्नेहल शिलेवंत यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोदावरी पवार व डॉ. मीनाक्षी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.