वनामकृवित ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी मार्गदर्शन
मराठवाडा विभागात पावसाच्या अनियमित व असमान वितरणामुळे निर्माण होणाऱ्या
पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन, संरक्षित सिंचन,
आंतरमशागत, तण नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना
तातडीने अवलंबाव्यात, असे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील
प्रगतशील शेतकरी श्री. सूरज जयपाल जाधव यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन
व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तसेच
शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’
या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी आभासी
माध्यमातून आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आणि संशोधन संचालक डॉ.
भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात श्री. सूरज जाधव यांनी पावसाच्या खंड काळातील पीक
व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.
आनंद गोरे होते.
मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पर्जन्याधारित व कोरडवाहू असून, हवामान बदलामुळे
पावसाच्या आगमनापासून ते वितरणापर्यंत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाचे
उशिरा आगमन, पेरणीनंतर दीर्घ खंड, कमी
कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड अशा परिस्थितीचा थेट परिणाम
पिकांच्या उगवण, वाढ, फुलोरा आणि दाणे
भरण्याच्या अवस्थेवर होत आहे. त्यामुळे केवळ वार्षिक पर्जन्यमानाचा विचार न करता
पावसाची वेळ, वितरण, तीव्रता आणि
पावसातील खंड यानुसार शेतीविषयक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे
यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तातडीच्या उपाययोजनांवर भर
पावसाच्या खंड काळात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीक व जमिनीतील उपलब्ध
ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे. संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास
पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन करावे. कपाशी, तूर यांसारख्या
पिकांमध्ये पावसाचे पाणी शेतात मुरविण्यासाठी योग्य वेळी सऱ्या काढणे, आंतरमशागत करून जमिनीतील भेगा बुजविणे आणि तण नियंत्रणाला प्राधान्य देणे
आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष व आच्छादनाचा (Mulching) वापर
करावा. पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व रोग
व्यवस्थापनाचा अवलंब करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच आवश्यकतेनुसार
रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला.
पावसाच्या खंडाच्या काळात पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध
ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन अन्नद्रव्यांच्या फवारणीबाबत
कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. उपलब्ध
परिस्थितीनुसार पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी योग्य अन्नद्रव्य
व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
‘अष्टसूत्री’द्वारे पीक संरक्षणाचा संदेश
पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी पीक व जमिनीचे
निरीक्षण, उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन, जलसंधारण,
तण नियंत्रण, आंतरमशागत, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, आच्छादन आणि योग्य
अन्नद्रव्य व्यवस्थापन या अष्टसूत्रीवर विशेष भर द्यावा, असा
संदेश देण्यात आला.
जैविक निविष्ठा, बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा
आदींचा शिफारशीनुसार योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन
करण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते, असेही मार्गदर्शन
करण्यात आले.
दीर्घकालीन नियोजनातून कोरडवाहू शेतीची जोखीम कमी
करण्याचे आवाहन
कोरडवाहू शेतीमध्ये केवळ तातडीच्या उपाययोजना पुरेशा नसून, दीर्घकालीन
हवामान-सक्षम शेतीचे नियोजन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये मृद व
जलसंधारण, बांधबंदिस्ती, चर घेणे,
पीक व पीक पद्धतीचे नियोजन, पीक फेरपालट,
आंतरपीक पद्धती आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांचा समावेश
करावा.
तसेच ‘शिवारातील पाणी शिवारात आणि शेतातील पाणी शेतात’ या संकल्पनेनुसार
विहीर व कूपनलिका पुनर्भरण, शेततळ्यांची उभारणी आणि त्यातील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी कार्यक्षम
वापर करण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची स्वतःची ‘जल बँक’ निर्माण
होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.
‘बियाणे बँक’, ‘अन्नद्रव्य बँक’ आणि ‘अवजारे बँक’ ही
काळाची गरज
शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून
‘बियाणे बँक’ निर्माण करावी. स्वतःच्या शेतासाठी आवश्यक दर्जेदार बियाणे राखून
ठेवणे किंवा तयार करणे यामुळे बियाण्यावरील खर्च कमी होण्याबरोबरच वेळेवर बियाणे
उपलब्ध होण्यास मदत होईल.
शेतावरच शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट इत्यादी तयार करून ‘अन्नद्रव्य
बँक’ विकसित करता येईल. त्याचप्रमाणे वेळेवर शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी ‘अवजारे
बँक’ निर्माण करून बीबीएफ यंत्रे, बूम स्प्रेअर व इतर कृषी
यंत्रांचा सामूहिक वापर केल्यास यंत्रसामग्रीवरील खर्च कमी करता येईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.
एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पन्नाचे विविध स्रोत
हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ एका पिकावर अवलंबून न
राहता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. मुख्य पिकांसोबत भाजीपाला, फळपिके, मसाला पिके, फुलशेती तसेच बांधावर शेवगा, कढीपत्ता यांसारख्या पिकांचा समावेश करावा. यासोबत दुग्ध व्यवसाय, म्हैसपालन, कुक्कुटपालन, रेशीम
उद्योग, अळिंबी उत्पादन आदी पूरक व्यवसाय जोडल्यास
उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होऊन कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करता येते.
शेतकरी गटांच्या माध्यमातून निविष्ठांची सामूहिक खरेदी, कृषी उत्पादनाची
एकत्रित विक्री, प्रक्रिया व मूल्यवर्धन तसेच बाजारपेठेचा
अभ्यास केल्यास उत्पादन खर्च कमी करून शेतमालाला चांगला दर मिळविण्याची संधी
निर्माण होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्याच्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत
शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ‘हवामानानुसार योग्य वेळी योग्य निर्णय’ घेण्याचा संदेश
देण्यात आला. उपलब्ध पाणी, जमीन आणि पिकांची अवस्था यांचा
विचार करून शास्त्रीय व स्थानिक अनुभवाधारित तंत्रज्ञानाचा समन्वय साधल्यास
प्रतिकूल हवामानातही पीक उत्पादनातील जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते,
असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ,
आयोजक तसेच सहभागी शेतकऱ्यांनी सहकार्य केले.








.png)








.jpeg)










.jpeg)
.jpeg)

