Friday, April 3, 2026

वनामकृविच्या बायोमिक्स विक्रीत विक्रमी वाढ; शेतकऱ्यांमध्ये वाढती लोकप्रियता

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे बायोमिक्स संशोधन केंद्रास प्रभावी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्राने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली बायोमिक्स उत्पादनाच्या विक्रीत उल्लेखनीय वाढ साध्य केली आहे. या वाढीमुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नात लक्षणीय भर पडली असून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीतही या उत्पादनाचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येत आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार मराठवाड्यातील विद्यापीठाच्या अनेक कृषि महाविद्यालये तसेच संबंधित जिल्ह्यांतील संशोधन व विस्तार कार्यालयांमार्फत त्या–त्या जिल्ह्यासाठी शेतकरीप्रिय बायोमिक्स या उत्पादनाची विक्री करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला असून परभणी येथे येऊन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या प्रवास खर्चाचीही बचत झाली.

गेल्या चार वर्षांपासून बायोमिक्स उत्पादनाची मागणी व लोकप्रियता शेतकरी वर्गामध्ये सातत्याने वाढत आहे. विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही वाढ स्पष्टपणे दिसून येते. सन २०२२-२३ मध्ये सुमारे रुपये दोन कोटी तेवीस लाखांची विक्री झाली असून १३,८७८ शेतकऱ्यांपर्यंत हे उत्पादन पोहोचले. यामध्ये २१,८५८ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता.

सन २०२३-२४ मध्ये विक्रीत वाढ होऊन रुपये दोन कोटी  चोवीस लाखांपर्यंत पोहोचली. या कालावधीत २२,१२२ शेतकरी आणि २२,०१२ हेक्टर क्षेत्र यामध्ये समाविष्ट झाले.

सन २०२४-२५ मध्ये विक्रीत मोठी झेप घेत रुपये चार कोटी एकोनेंशी लाख इतकी विक्री नोंदविण्यात आली. यामध्ये ५२,६५२ शेतकरी आणि ६२,०४२ हेक्टर क्षेत्राचा समावेश होऊन उत्पादनवाढीस चालना मिळाली.

तर सन २०२५-२६ मध्ये विक्रमी रुपये सहा कोटी सेहचाळीस लाख इतकी विक्री झाली असून ६९,०७९ शेतकऱ्यांपर्यंत पोहोच साधण्यात आली. या माध्यमातून ७३,७५० हेक्टर क्षेत्रावर बायोमिक्स उत्पादनाचा प्रसार करण्यात आला.

बायोमिक्स हे विविध उपयुक्त जैविक घटकांचे मिश्रण असून ते पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, उत्पादनवाढ आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या उत्पादनाच्या वापरामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील खर्चात बचत होत असून पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत आहे.

विद्यापीठाचे बायोमिक्स उत्पादन हे केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील शेतकऱ्यांमध्येही लोकप्रिय ठरत असून “शेतकरीप्रिय उत्पादन” म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे, असे बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सांगितले.

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय गोळेगाव येथे बायोमिक्स विक्री व्यवस्थेचा दिनांक ६ जुलै २०२४ रोजी माननीय कुलगुरूंच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला होता.


बायोमिक्स खरेदीसाठी शेतकरी शेतकऱ्यांची रांग 
बायोमिक्स खरेदीसाठी शेतकरी शेतकऱ्यांची रांग

Record Growth in Sales of VNMKV’s Biomix; Increasing Popularity Among Farmers

Hon'ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani Provides Effective Guidance to the Biomix Research Center

At Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, the Biomix Research Centre has achieved remarkable growth in the sales of Biomix products under the effective guidance of Honorable Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani. This increase has significantly contributed to the university’s revenue, while also playing an important role in enhancing farmers’ productivity.

As per the directives of the Honorable Vice-Chancellor, Biomix products (popular among farmers) were made available for sale through various agricultural colleges of the university across Marathwada, as well as through research and extension offices in respective districts. This initiative saved farmers’ time and reduced travel expenses that would otherwise have been incurred in visiting Parbhani for purchase.

Over the past four years, the demand and popularity of Biomix products have steadily increased among farmers. This growth is clearly reflected in the sales data:

* In 2022–23, sales reached approximately ₹2.23 crore, benefiting 13,878 farmers and covering 21,858 hectares of land.
* In 2023–24, sales increased to ₹2.24 crore, reaching 22,122 farmers and covering 22,012 hectares.
* In 2024–25, sales saw a major jump to ₹4.89 crore, with 52,652 farmers benefiting and coverage expanding to 62,042 hectares.
* In 2025–26, record sales of ₹6.46 crore were achieved, reaching 69,079 farmers and covering 73,750 hectares.

Biomix is a blend of various beneficial biological components that effectively help in pest and disease control, increase crop productivity, and improve soil fertility. Its use reduces dependency on chemical pesticides, thereby lowering costs and promoting environmentally sustainable farming practices.

The university’s Biomix product has gained popularity not only in Marathwada but across Maharashtra and even beyond the state. It has earned recognition as a “farmer-friendly product,” as stated by the Officer-in-Charge of the Biomix Research Centre, Dr. Chandrashekhar Ambadkar.
 

Wednesday, April 1, 2026

कोरडवाहू शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर वनामकृवित मानव संसाधन विकास (HRD) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कोरडवाहू शेतीसाठी एआय व हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे “कोरडवाहू शेती संशोधन व अनुप्रयोग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका” या विषयावर मानव संसाधन विकास (HRD) प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA) अंतर्गत आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संशोधन आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेतीसाठी हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. कोरडवाहू शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविता येते, असे त्यांनी नमूद केले. तसेच वेळेचे नियोजन, यंत्रीकरण आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर हे घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान-तटस्थ तंत्रज्ञानांचा विकास करून ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मर्यादित संसाधनांमध्ये योग्य व्यवस्थापन व पूर्वतयारीचे महत्त्व त्यांनी सांगितले. कोरडवाहू शेतीतील छोटा पेरणी कालावधी, कमी आर्द्रता व अल्प सुपीक माती या अडचणी लक्षात घेता, एआय-आधारित साधने निर्णय प्रक्रियेसाठी व निविष्ठाचा अचूक आणि कमी खर्चात वापर करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि क्षेत्रातील मानव संसाधन विकासाचे महत्त्व अधोरेखित करत, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व प्रगतशील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. राकेश आहिरे यांनी हवामान-आधारित शेती तंत्रज्ञानाचे मूल्यांकन व सुधारणा यावर प्रकाश टाकला.

प्रास्ताविकात प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. तांत्रिक सत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. कैलास डाखोरे यांनी विद्यमान हवामान स्थिती व अंदाज याविषयी माहिती दिली. डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका स्पष्ट केली, तर डॉ. प्रविण कापसे यांनी अध्यापन व संशोधनात एआय साधनांचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले. डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी आर्थिक नियोजन व जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांवर माहिती दिली.

या प्रसंगी कोरडवाहू शेती मध्ये तंत्रज्ञाना प्रसार करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनी यांचा माननीय कुलगुरू यांनी विशेष सत्कार केला.

या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. हिराकांत काळपांडे, विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सुमंत जाधव, उपसंचालक डॉ. जी. पी. जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांचे अनुभव कथन व गटचर्चा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये NICRA व इतर शेतकऱ्यांचा सहभाग होता.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेड़े यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. के. गायकवाड यांनी केले.

प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. घाटुळ, श्री. आवडाजी गमे व श्री. कृष्णा गव्हाणे यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. तेजस्विनी कच्छवे, रिठे, मंगेश राऊत, आघम, भगवत वाघ, सादेक शेख, सुरेश खटिंग, प्रतीक्षा पाटील,  अर्जुन जाधव व अशोक खिल्लारे यांनी विशेष परिश्रम घेतले.










Tuesday, March 31, 2026

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेचा १४ वा दीक्षांत समारंभ संपन्न

संस्कार, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचा संदेश : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या वतीने प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेतील (एलपीपी - Lab Pre-Primary School) विद्यार्थ्यांचा १४ वा दीक्षांत समारंभ दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

पूर्व-प्राथमिक शाळेतील ब्रिज सेक्शन (वय ५ ते ६ वर्षे) मधील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. विशेष अतिथी म्हणून श्रीमती जयश्री मिश्रा तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि एलपीपी शाळेच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रभावना, आदर, प्रेम, बंधुभाव, शिक्षण, चारित्र्य, संस्कार आणि नैतिक मूल्ये जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करत उपदेश दिला. एलपीपी शाळा ही विद्यापीठाच्या अंतर्गत प्रमाणपत्र देणारी शाळा असल्यामुळे केजी ते पीजीपर्यंत शिक्षण देणारे विद्यापीठ म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयोगाधारित आणि नैसर्गिक पद्धतीने शिक्षण दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक यांना देवतुल्य मानून अनुकरण करावे, तसेच शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ प्रमाणपत्रे मिळविण्यापेक्षा चांगले संस्कार मिळविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये कृषि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्रांना भेटी आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी लहान विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले मनोगत पाहून आपणही लहान व्हावे अशी भावना व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आयुष्यात यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच या शाळेतून शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना प्रभावीपणे शिकवल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले.

प्रस्तावना एलपीपी शाळेच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांनी केली. त्यांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा आढावा मांडला.

ऋता भोकरे, अनन्या शिंदे, शुभंकर दैठणकर आणि अवनी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतून केवळ शिक्षणच नव्हे, तर उत्तम नागरिक बनण्यासाठी आवश्यक संस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. योगा, विविध खेळ, कला आणि हसतखेळत शिक्षण यामुळे सर्वांगीण विकास झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एलपीपी शिक्षिका श्रीमती श्रुती औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड व विभाग प्रमुख तथा एलपीपी समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एलपीपी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष शिबिर २०२५-२६ मौजे मुरूंबा, जि. परभणी येथे दिनांक ३० मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले. “युवा शक्तीचा ध्यास – गावाचा विकास” या संकल्पनेवर आधारित या शिबिरात स्वयंसेवकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गावविकासासाठी मोलाचे योगदान दिले.

शिबिराचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. यावेळी डॉ. सुमंत जाधव, डॉ. जी. यू. शिंदे, डॉ. आर. व्ही. शिंदे, डॉ. संजय पवार, डॉ. अनिकेत वायकर, डॉ. गजानन वसु, जि.प. शाळा मुरूंबाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत कदम, श्री. गुट्टे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. रामभाऊ राऊत तसेच श्री. चोपडे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची जाणीव ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.

विशेष शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी ग्रामसर्वेक्षण, स्वच्छता अभियान, प्रबोधन रॅली, योग व आरोग्य जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावातील मंदिर परिसर, शाळा व मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिकमुक्त गाव मोहिम राबवून ग्रामस्थांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करण्यात आले.

योग सत्रामध्ये श्री. श्रीधर कारेगावकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत विविध योगासने शिकवली. तसेच अभय देशमुख व उषादेवी कोठाले यांनी आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून भूकंप, सर्पदंश व आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना प्रात्यक्षिकासह सादर केल्या. स्वच्छता, नशामुक्ती, पाणी बचत व वृक्षारोपण या विषयांवर पोस्टर तयार करून जनजागृती करण्यात आली.

शिबिराच्या समारोप कार्यक्रमास डॉ. आर. टी. रामटेके, डॉ. मधुकर मोरे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. डी. विखे, श्री. गुट्टे सर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली तसेच तयार केलेले पोस्टर जि.प. प्राथमिक शाळा, मुरूंबा यांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी डॉ. रामटेके यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मधुरा बुचाले, अग्नेस दत्ता, प्रेरणा गंगावणे, गायत्री पाटील, नालिंदे गायत्री, गीता टेंगसे व ऐश्वर्या एम. ए. यांनी गीत सादर करून प्रभावी संदेश दिला. तसेच विद्यार्थी गवळी अभिषेक, प्रफुल्ल पवार, अर्जुन ताठे, अभिषेक कुंडलकर तसेच विद्यार्थिनी साक्षी व ऐश्वर्या यांनी तयार केलेले पोस्टर जि.प. प्राथमिक शाळेला भेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी पिडीयार व विठ्ठल झटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिकेत माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच श्री. प्रमोद राठोड व श्री. हनुमंत ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी रा.से.यो. गीत व राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.








Friday, March 27, 2026

वनामकृवित कार्बन क्रेडिट व कार्बन शेती कार्यशाळा; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दालन

 कार्यशाळेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांचे मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (VNMKV) येथे कार्बन क्रेडिट, कार्बन शेती व कार्बन ट्रेडिंग या विषयावर दिनांक २६ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी  परिषद सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील, ग्रो इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उषा बारवाले झेहर आणि संचालक श्री अविनाश सोनी हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कार्बन क्रेडिटचे नोडल अधिकारी तथा संशोधन उपसंचालक डॉ. हरिहर कौसडीकर प्रत्यक्ष उपस्थित होते तर ऑनलाईन माध्यमातून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विनय सहगल, डॉ. आरती भाटिया, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील एकात्मिक शेती पद्धती विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद झा, आदी मान्यवरांची उपस्थिती होती

कार्यशाळेत बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा शतकीय वारसा अधोरेखित करत १९१८ पासून संशोधन केंद्र म्हणून सुरू झालेल्या संस्थेने १९७२ मध्ये विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करून महाराष्ट्रातील विविध हवामान परिस्थितींना अनुरूप संशोधन कार्य केले असल्याचे सांगितले. सध्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदे (ICAR) कडून ‘A’ दर्जा प्राप्त करत राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या साडेतीन वर्षांत हवामान बदल, मृदा आरोग्य व प्रिसिजन शेती या क्षेत्रात सुमारे १५० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प विद्यापीठाने प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र हे हवामान बदलाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे संवेदनशील राज्य असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट ही जोखीम व्यवस्थापनाची प्रभावी संधी ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः २०२४ मधील अतिवृष्टीमुळे गोदावरी तूरसारख्या व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते, याचा संदर्भ देत त्यांनी शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. चांगले परिणाम मिळवण्यासाठी ‘गुड केमिस्ट्री’ (सहकार्य व समन्वय) आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा सदस्य तथा विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी कार्बन क्रेडिट व कार्बन शेती या भविष्याभिमुख विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित उपक्रमांच्या प्रगतीची माहिती जाणून घेत शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या प्रभावी सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच पर्यावरण संरक्षण साध्य करण्यासाठी कार्बन शेतीचा व्यापक प्रसार करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. मराठवाड्यात कार्बन क्रेडिट चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्व संस्था व शास्त्रज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि विद्यापीठातील विविध विभागांतील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी सुचविले.

डॉ. विनय सहगल यांनी मराठवाडा विभागात काम केल्याचा अनुभव सांगत, येथील कार्बन क्रेडिटसाठी पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. डॉ. आरती भाटिया यांनी कार्बन क्रेडिट संदर्भातील विविध मॉडेलची माहिती देताना, विशेषतः काटेकोर व शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर उहापोह केला तर डॉ. प्रमोद झा यांनी कार्बन शेतीतील आव्हानांवर प्रकाश टाकताना, भारतात कार्बन क्रेडिट नोंदणीसाठी सक्षम संस्था कार्यरत नसल्याचे नमूद केले. तसेच परदेशी संस्थांकडून नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते, असे त्यांनी सांगितले.

ग्रो इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उषा बारवाले झेहर तसेच ग्रो इंडिगोच्या तज्ज्ञांनी ग्रो इंडिया संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माध्यमातून पंजाब राज्यात कार्बन क्रेडिट मिळविण्यात यश आले असून अशाच प्रकारचे प्रकल्प देशातील पाच राज्यांत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातही या पद्धतीचे प्रकल्प राबविण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. शेती पद्धतींमध्ये आवश्यक बदल करून हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यास त्या घटेचे रूपांतर कार्बन क्रेडिटमध्ये केले जाते. एक टन CO समतुल्य उत्सर्जन घट म्हणजे एक कार्बन क्रेडिट मानले जाते. ही क्रेडिट्स आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांकडे नोंदवून मोठ्या कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. सध्या ग्रो इंडिगोने सुमारे १० लाख एकर क्षेत्र आणि २ लाख शेतकऱ्यांचा या उपक्रमात समावेश केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत विद्यापीठ व ग्रो इंडिगो यांच्यात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी कार्बन शेती विषयक संशोधन प्रकल्प सुरू करणे, सामंजस्य करार (MoU) करणे, तसेच अभ्यास मंडळ व सल्लागार समित्यांमध्ये तज्ज्ञांचा समावेश करणे यावर चर्चा झाली. कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांच्याकडे डेटा संकलन व विश्लेषणाची जबाबदारी सोपविण्यात आली.

तसेच ‘बायोमिक्स’ सारख्या जैविक इनपुट्सचा वापर वाढवून शाश्वत शेतीला चालना देण्याचेही आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेचा समारोप करताना मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कार्बन शेतीचा मोठ्या प्रमाणावर पायलट प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक व तांत्रिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यशाळेत सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. सचिन मोरे आदी मान्यवरांसह विद्यापीठातील शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.






वनामकृविच्या आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहातील सुविधांची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून पाहणी; कॅन्टीन व व्यायाम सुविधांबाबत सूचना

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भेट दिली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी मुलींच्या वस्तीगृहातील विविध सोयी-सुविधांची सखोल पाहणी करून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यावर भर दिला. विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कॅन्टीनची अद्ययावत व सुसज्ज व्यवस्था निर्माण करावी तसेच आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक सकाळच्या नाश्त्याची नियमित सोय करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

यासोबतच विद्यार्थिनींच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करून त्यांना नियमित व्यायामाची सवय लागावी यासाठी स्वतंत्र व्यायामाची सुविधा निर्माण करावी अथवा विद्यमान व्यायामशाळेत मुलींसाठी दररोज किमान दोन तास राखीव ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वस्तीगृह परिसरात स्वच्छता, सुरक्षितता, पिण्याच्या पाण्याची शुद्ध व्यवस्था, प्रकाशयोजना आणि आवश्यक देखभाल याकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थिनींना अनुकूल व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देत, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचा उद्देश त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भानुदास बोंडे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


वनामकृविच्या आंबेजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणियांची भेट; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत आंबेजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २६ मार्च २०२६ रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी केंद्रातील विविध विकासकामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीताफळ संशोधन केंद्रासाठी प्रस्तावित नवीन इमारतीचे काम गतीने पूर्ण करावे, तसेच जवळील शेततळ्यातील गाळ (सिल्ट) आणून मृदा सुपीकता वाढवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र परिसरात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याचे, वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण करून अतिक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे तसेच केंद्रातील तालुका बीज गुणन केंद्राच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यासाठी नाहरकत मिळविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

याशिवाय सीताफळ प्रक्रिया केंद्रातील अपूर्ण कामे येत्या १४ एप्रिलपूर्वी पूर्ण करावीत, असे सांगून प्रक्रिया युनिटमधील उपकरणांची पाहणी केली. या उपकरणांद्वारे सीताफळ पल्पपासून कुल्फी, रबडी आणि आईस्क्रीम तयार करण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले असल्याची माहिती माननीय कुलगुरूना प्रभारी अधिकारी यांनी यावेळी दिली.

या भेटीतून सीताफळ संशोधन व मूल्यवर्धनाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.