Saturday, August 29, 2026

कृषि अभियांत्रिकीच्या मौखिक सादरीकरणात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची बाजी

आयईआय–२०२६’ राष्ट्रीय अधिवेशनात सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन




डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजित ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे दिनांक २७ व २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाला. या राष्ट्रीय अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार पटकावून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना होती. देशभरातून सुमारे ५०० शेतकरी तसेच १०० संशोधक व प्राध्यापक या राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले. विविध विषयांवर सुमारे १०० संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शाश्वत व हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले.

सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

राष्ट्रीय अधिवेशनातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधनाचे प्रभावी मौखिक सादरीकरण केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार (Best Oral Presentation Award) प्रदान करण्यात आले. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी दिनेश वसंतराव कदम, रीना बी. चौधरी, मंगेश मोहिते आणि सैनी, तर पदवीपूर्व विद्यार्थी स्नेहा शर्मा, पार्वती आणि आभा सिंग यांचा समावेश आहे.

या यशाबरोबरच वनामकृविच्या २५ हून अधिक संशोधकांनी संबंधित लेखक व सहलेखक म्हणून विविध संशोधन निबंधांमध्ये योगदान दिले. तसेच अधिवेशनातील उल्लेखनीय संशोधन व तांत्रिक योगदानाबद्दल विद्यापीठाशी संबंधित १८ संशोधकांचा गौरव करण्यात आला.

वनामकृविच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित अधिवेशनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच संबंधित अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व मार्गदर्शकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या राष्ट्रीय परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप केंद्र प्रमुख फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यानी समन्वय व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर सहभाग नोंदविला. यातिल निवडक संशोधन प्रबंधांचे स्प्रिंजर (Springer) मधे प्रकाशित होतील.

मौखिक संशोधन लेख सदरीकरणात कृषि अभियांत्रिकी-महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके. डॉ. सुमंत जाधव, डॉ. व्ही. के. विखे, डॉ. जयभाये , डॉ. पांडित मुंडे, सहायक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाटील, अभियंता विशाल काळबांडे, अभियंता गीता भूमरे, अनिश शहाणे, साक्षम पंडितकर, अभिषेक कदम, रामप्रसाद भांड व गांगुर्डे, तसेच मृदाशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ तथा कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच विस्तार शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे यांचा यांचा सहभाग होता

एमआयटी, छत्रपती-संभाजीनगरचे संचालक प्रा. डॉ. निलेश पाटील, अधिवेशनाचे निमंत्रक तथा प्राचार्य प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे, प्रा. डॉ. नारायण गटकल, प्रा. प्रतीक पोद्दार आणि एमआयटीच्या संपूर्ण चमूने अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले त्या बद्दल सर्व मा कुलगुरु यानी अभिनंदन व आभार व्यक्त केले.























हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व संसाधन संवर्धनाची सांगड आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृवित ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ विषयावर अभिनव व्याख्यान

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. एस. भास्कर


नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हे शाश्वत कृषी विकासाचे मूलभूत अंग असून, भविष्यातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संसाधन संवर्धन आणि हवामान-अनुकूल कृषी पद्धती यांचा प्रभावी समन्वय करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषिशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी, परभणी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावर दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित अभिनव व्याख्यानात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक (कृषिशास्त्र, कृषिवनशास्त्र व हवामान बदल) डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि कृषिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. एस. भास्कर म्हणाले की, हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता मृदा, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व कार्यक्षम वापर करून शाश्वत शेतीला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी हवामान-स्मार्ट कृषी तंत्रज्ञान तसेच संसाधन संवर्धनाच्या पद्धतींचा प्रभावी अवलंब करणे काळाची गरज आहे. त्यांनी हवामान बदलामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. तसेच मृदा व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, संसाधनांची उत्पादकता वाढविणे आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृषी पद्धतींचा अवलंब याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हवामान-स्मार्ट व शाश्वत शेतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संसाधन संवर्धन यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हे अभिनव व्याख्यान ज्ञानवर्धक आणि संवादात्मक ठरले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा जगताप यांनी केले. शेवटी कृषिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. बी. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन आणि हवामान-अनुकूल शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे अभिनव व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरले.







वनामकृवितील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वितरण

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वितरण; पाण्याचा कार्यक्षम वापर व शाश्वत शेतीवर भर


हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामानास अनुकूल करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप उपक्रमामध्ये निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधींना  दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी तुषार सिंचन संचांचे वितरण माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी सहाय्यक संचालक डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. प्रवीण वैद्य, कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रभारी अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ असून, शेतकऱ्यांच्या गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संशोधन होणे आवश्यक आहे.” हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चाच्या, स्थानिक परिस्थितीला अनुकूल आणि शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा तंत्रज्ञानांच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे.

विकसित तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी ‘शेतकरी ते शेतकरी’ संवाद वाढविणे आवश्यक असून, तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये शेतकरी दूत आणि कृषी मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम आणि काटेकोर वापर ही काळाची गरज असून, पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. उपलब्ध संसाधनांचा काटेकोर वापर हाच शाश्वत शेतीचा आधार असल्याचे स्पष्ट करून, गरजेनुसार खतांचा वापर, शेततळे व इतर उपलब्ध जलस्रोतांतील पाण्याचा कार्यक्षम वापर, सौरऊर्जेचा अवलंब आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘त्रिशूल’ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. एस. भास्कर यांनी हवामान बदल ही व्यापक आणि बहुआयामी संकल्पना असल्याचे सांगून, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन तसेच अल्पकालीन उपाययोजनांचा समन्वयाने अवलंब करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. शेती आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, आवश्यक सुविधा आणि प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार यांनी मृदा व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोरडवाहू शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब कार्यक्षमतेने वापरणे आवश्यक असून, जलसंधारणासोबतच आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याची उत्पादकता वाढविता येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलानुरूप उपक्रमाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाधारित प्रसाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापूस संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत जाधव यांनी केले.

हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील सोन्ना आणि बाभुळगाव येथील अनुसूचित प्रवर्गातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते तुषार सिंचन संचांचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री. दिलीप टोंगराज, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. अन्सीराम वाव्हळे, श्री. आवडाजी गमे, श्री. अशोक कांबळे, श्री. सुधाकर वाव्हळे, श्री. गौतम वाव्हळे, श्री. मधुकर वाव्हळे, श्री. रामकिशन वाव्हळे, श्री. लक्ष्मण उबाळे आणि श्री. तुळशीराम टोंगराज यांचा समावेश होता.

कार्यक्रमानंतर शेतकरी प्रतिनिधींनी अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन व बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी पावसाच्या खंडाच्या काळात पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना, पिकांची पाण्याची गरज, उपलब्ध ओलाव्याचे व्यवस्थापन, तुषार सिंचनाचा कार्यक्षम वापर, मृदा व जलसंधारण तसेच हवामान बदलाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. पपीता गौरखेडे, श्री. सुरेश खटिंग आणि श्री. रिठे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना पाणी वाचवा, संसाधने जपा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोरडवाहू शेती अधिक सक्षम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.








Friday, August 28, 2026

वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवर यांनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन प्रक्षेत्राची पाहणी केली. यावेळी कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांची उपस्थित होती.

या भेटीदरम्यान डॉ. भगवान आसेवार यांनी प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या विविध प्रयोगांची पाहणी केली. सोयाबीन बियाणे उत्पादन, मका तसेच इतर खरीप पिकांवरील प्रयोगांची त्यांनी माहिती घेतली. प्रकल्पातील संबंधित शास्त्रज्ञांशी संवाद साधून विविध प्रयोगांची सद्यस्थिती, प्रगती आणि त्यातून अपेक्षित निष्कर्ष याबाबत जाणून घेतले.

प्रक्षेत्राची पाहणी केल्यानंतर खरीप पिकांच्या एकूण स्थितीबाबत डॉ. भगवान आसेवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने चिंता निर्माण करणारे आहे. मात्र, प्रक्षेत्रावरील पिकांची सद्यस्थिती पाहता आतापर्यंत झालेला पाऊस समाधानकारक आहे. येथून पुढेही पावसाची कृपा राहून सर्वांची चिंता दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

यानंतर झालेल्या संवादात सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचा व कामकाजाचा आढावा सादर केला. विद्यापीठामार्फत बायोमिक्स, ट्रायकोकार्ड, जैविक खते आदींच्या माध्यमातून विकसित कृषि तंत्रज्ञान व जैविक निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकरी या जैविक निविष्ठांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रक्षेत्रास भेट देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील विविध विषयांचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. यामध्ये वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील, डॉ. सुरेखा कदम, कीटकशास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव मुटकुळे तसेच प्रक्षेत्रावर कार्यरत निरीक्षण व मदतनीस सोपान माने, बाबासाहेब लघाने आदींचा समावेश होता.






Thursday, August 27, 2026

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रास कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन व विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी केसर आंबा गुणवत्ता केंद्रात नवीन ट्रॅक्टर व कृषि अवजारांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. आधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा वापर वाढवून फळपिकांमधील उत्पादनक्षमता, कार्यक्षमता व गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने अशा सुविधांचे महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

माननीय कुलगुरूंनी फळ संशोधन केंद्रातील विविध प्रक्षेत्रे, संरक्षित शेतीविषयक सुविधा तसेच संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. केंद्रामार्फत सुरू असलेल्या संशोधन कार्याची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रभावी प्रसार करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही फळ संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रातील संशोधन कार्याचा आढावा घेतला. विविध फळपिकांवरील संशोधन, तंत्रज्ञान विकास, प्रक्षेत्रावरील उपक्रम आणि भविष्यातील संशोधनाच्या दिशा याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील तसेच केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



कृषिच्या शाश्वत विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर; कृषि अभियंत्यांचे ३८ वे राष्ट्रीय अधिवेशन सुरू, दोन दिवस विविध तांत्रिक सत्रे

कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून शाश्वत व अचूक शेतीला चालना देणे काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजितद इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ यास गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), छत्रपती संभाजीनगर येथे सुरुवात झाली.शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना असून, देशभरातून सुमारे ५०० शेतकरी आणि १०० संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी यांच्या वतीने दिनांक २७ व २८ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्राचे अध्यक्ष अभियंता विजय कांबळे, आयईआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अभियंता मनीष कोठारी, कृषि अभियांत्रिकी विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्रा. (डॉ.) नेमीचंद्रप्पा एम., एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा आणि अधिवेशनाचे निमंत्रक प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अधिवेशनात शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले. ते म्हणाले की, अभियांत्रिकी हे भविष्यातील कृषि विकासाचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे क्षेत्र असून, कृषि अभियांत्रिकीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. २१व्या शतकातील अभियंत्यांना कृषि क्षेत्रासोबतच जैवशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शेतकरी आणि विद्यार्थी हे कृषि क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करून माननीय कुलगुरूंनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातशेतकरी देवो भव’ या भावनेतून शेतकरी-केंद्रित विस्तार कार्याला, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. युवक हे राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख आधार असल्याने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक आहे.

भविष्यातील शेतीसाठी अचूक व शाश्वत शेती (Precision and Sustainable Agriculture) यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. अचूक शेतीमुळे नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, उत्पादनवाढ आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य करता येते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास न करता ती पुढील पिढीकडे अधिक सक्षम स्वरूपात सुपूर्द करणे हीच विकासाची खरी कसोटी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी यांच्यापृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागवू शकते; मात्र प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही’ या विचाराचा संदर्भ देत विकासाच्या प्रक्रियेत मानवी गरजा आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांच्यात समतोल राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारताने कृषि क्षेत्रात मोठी प्रगती साधली असून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेपासून विविध कृषि उत्पादनांच्या निर्यातीपर्यंत देशाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, भविष्यात भाजीपाला व फळपिकांचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाणे आणि शेतीतील जोखीम कमी करणे ही महत्त्वाची आव्हाने आहेत.

शेतकऱ्यांना केवळ तंत्रज्ञान नको, तर त्यांच्या समस्यांचे समाधान देणारे तंत्रज्ञान हवे, असे स्पष्ट करून तंत्रज्ञान विकास हा शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडला गेला पाहिजे, असे कुलगुरूंनी सांगितले. प्रभावी आंतरपीक पद्धती, अचूक शेती, हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान तसेच जोखीम कमी करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हवामान बदलामुळे निर्माण होणारी अनिश्चितता ही शेतीतील ‘न्यू नॉर्मल’ ठरत आहे. त्यामुळे कृषि अभियांत्रिकीच्या माध्यमातून हवामान-सक्षम, संसाधन कार्यक्षम आणि शाश्वत शेती विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार तसेच आयईआय यंग इंजिनिअर्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेश तुळशीराम ठोकळ यांचे स्मृती व्याख्यान झाले. शुक्रवारी विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि विशेष तांत्रिक कार्यक्रम होणार असून, समारोप सत्रात अधिवेशनातून पुढे आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी अंतिम करण्यात येणार आहेत.

१०० संशोधनपर लेखांचे पाच तांत्रिक सत्रांत सादरीकरण

परिसंवादासाठी देशभरातून सुमारे १०० संशोधनपर लेख प्राप्त झाले असून, त्यांचे पाच तांत्रिक सत्रांमध्ये प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान, अचूक शेती, स्मार्ट सिंचन, कृषि यांत्रिकीकरण, मृदा व जलसंधारण, हवामान बदल, जैवकोळसा, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत कृषि विकास या विषयांवर तज्ज्ञांकडून मंथन होणार आहे.

वनामकृविच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रीय परिसंवादास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके तसेच फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सहभागी झाले. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी मानवी झा आणि पद्मश्री उगिना यांनीही सहभाग नोंदवून त्यांच्या संशोधनाचे सारांश सादर केले.

कुलगुरूंच्या विशेष व्याख्यानानंतर कृषि अभियांत्रिकीतील भविष्यातील उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष चर्चा झाली. अधिवेशनातून हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्य आणि वाढता उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांवर व्यावहारिक व तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांना दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.