Friday, July 24, 2026

वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार; बैलचलित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटरची स्थापना

अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच खरा विकास : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत; विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून संस्कार जपावेत : कृषिरत्न माननीय श्री. आबासाहेब मोरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) 
वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम,  संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे, श्रीमती ज्योती भूक्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. अध्यात्म आणि विज्ञान जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरा विकास घडतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठ शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जनसेवा व शेतकऱ्यांची सेवा करण्यास प्राधान्य देत आहे. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेद्वारे आदर्श व दिशादर्शक कार्य उभारले जात असून, या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आदर व्यक्त केला. आपण पुण्याचे कार्य करत आहात. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहात. विकासासाठी शेती आणि शेतकरी यांची निवड करून आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे, असे सांगून त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांचे अभिनंदन केले. या कार्यामागील त्यांची समर्पण भावना व तपश्चर्या उल्लेखनीय असल्याचे सांगताना ते म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अत्यंत कठीण असते; मात्र आपण तपस्वी वृत्तीने हे कार्य करत आहात. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एक तपस्वी आहात, असे आदरयुक्त उद्गार त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांच्याविषयी काढले.

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण आज पुन्हा सत्य ठरत असल्याचे नमूद करून त्यांनी शेतीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून त्याचा मान, सन्मान आणि कल्याण साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच विचारातून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे नामकरण कृषी व किसान कल्याण मंत्रालय असे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून निर्यातीमध्येही महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. याचे श्रेय शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि दिंडोरी प्रणित संस्थेसारख्या सेवाभावी संस्थांना जाते, असे त्यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विषमुक्त, जोखीमरहित, कर्जमुक्त आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी कार्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज झालेला सामंजस्य करार हा केवळ दोन संस्थांमधील करार नसून, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी 'वन हेल्थ (One Health)' या संकल्पनेचाही उल्लेख केला. प्राणी, वनस्पती, मृदा आणि मानव यांचे आरोग्य परस्परांशी निगडित असून सर्वांच्या आरोग्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात ट्रॅक्टरच्या जागी बैलचलित अवजारे आणण्याचा प्रश्न नसून, बैलचलित अवजारांना अधिकाधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पशुशक्तीवर आधारित कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने उत्कृष्ट कार्य केले असून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याच अनुषंगाने बैल संवर्धनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेने विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. तसेच मागील चार वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत असताना शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण आणि शेतकरी हितासाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.

श्री. आबासाहेब मोरे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान श्री स्वामी समर्थ संस्थान आत्मीयतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. शेती स्वावलंबी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेती समृद्ध होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती आणि शेतात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात होती. मात्र, कालांतराने रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ लागले. त्यामुळे वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत. त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असून, प्रत्येक शेतात पशुधन, विशेषतः गायी-गुरे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही वाढला, तरी गाईंशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही. गाय ही अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. गरजेनुसार करण्यात आलेल्या संकरामुळे देशी गाईंची प्रतिकारशक्ती कमी झाली असून, शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गाई-गुरांच्या आजारांवर नियंत्रणासाठी विविध वनस्पती उपयुक्त ठरतात. काही वनस्पतींच्या सान्निध्यामुळेही आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे या विषयावर विद्यापीठाने अधिक मार्गदर्शन करावे, अशी त्यांनी विनंती केली.

देशात पशुधनाच्या शक्तीच्या वापरावर संशोधन करणाऱ्या प्रमुख विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. गाईचे शेण व गोमूत्र हे अत्यंत उपयुक्त असून, शेणामध्ये अनेक लाभदायक सूक्ष्मजीव आढळतात. गोमूत्रापासून तयार केलेल्या जैविक कल्चरचा वापर शेतीत करावा. तसेच तणनाशकांचा वापर टाळून तणांचा उपयोग भाजीपाला, सेंद्रिय खत किंवा औषधी निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

गाईप्रमाणेच बैलांचेही शेतीमध्ये महत्त्व असून, नंदी संवर्धनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे, विशेषतः ट्रॅक्टरच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी नमूद केले. बैलचलित शेती अवजारांचा प्रचार व प्रसार व्हावा, त्यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत आणि सामंजस्य कराराच्या माध्यमातून हे कार्य अधिक वेगाने पुढे न्यावे, अशी त्यांनी विनंती केली. या कार्यामध्ये कोणताही भेदभाव न करता केवळ ज्ञानदानाचा उद्देश असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा. रील्सच्या आभासी विश्वात रमण्यापेक्षा वास्तव जीवनात सक्रिय राहून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. तंत्रज्ञानाचा योग्य व संयमित वापर करावा. ताण-तणाव कमी करण्यासाठी गाई-गुरे आणि नैसर्गिक वातावरणाच्या सान्निध्यात वेळ घालवावा. तसेच आई-वडिलांची निरपेक्ष भावनेने सेवा करून संस्कार जपावेत, असे आवर्जून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचीन ऋषी-मुनींनी कृषीशास्त्राचा कसा विकास केला, याची उदाहरणे देत त्यांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा केवळ सामंजस्य करार नसून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता असून मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा अल्प आहे. तसेच मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के शेती ही पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक यांत्रिकीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यापीठाने ५६ आधुनिक कृषी अवजारे तसेच विविध पिकांसाठी उपयुक्त वाण विकसित केले असून हे तंत्रज्ञान आणि वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सामंजस्य करार आणि कस्टम हायरिंग सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी श्री स्वामी समर्थ संस्थेने घेतलेला पुढाकार इतर संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यापीठाचे संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध व तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात डॉ. दयानंद टेकाळे यांनी सांगितले की, आजच्या कार्यक्रमात दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग पाहून विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील आत्मीय नाते अधिक दृढ झाल्याची प्रचिती येते. माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ "शेतकरी देवो भव:" या भावनेने कार्यरत असून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यास सदैव अग्रक्रम देत आहे. ते पुढे म्हणाले की, गतवर्षी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात गुरुमाऊलींनी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान व बैलचलित कृषी अवजारे पाहिल्यानंतर सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार श्री स्वामी समर्थ संस्थेसोबत दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा सामंजस्य करार ऐतिहासिक ठरला आहे. विद्यापीठाचे बैलचलित कृषी अवजारांचे कस्टम हायरिंग सेंटर महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये स्थापन करण्याचा मानस असून, नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. या कस्टम हायरिंग सेंटरमध्ये ११ बैलचलित कृषी अवजारांचा समावेश असून ती एक किंवा दोन बैलांच्या साहाय्याने चालविता येतील. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री. बालासाहेब शिंदे यांनी सांगितले की, संघर्षातूनच नवी ऊर्जा निर्माण होत असते. शेतीमध्ये यापूर्वी न झालेली अभिनव कामे करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ संस्थेमार्फत २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा या तत्त्वावर कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सुमारे दीड हजार सेवेकरी विविध केंद्रांतून सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सुमारे २० हजार गावांतील संपर्क शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचविले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. बैलचलित कृषी अवजारांच्या वापरामुळे शेतीवरील खर्चात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिंडोरी प्रणित संस्थेमार्फत राबविण्यात येणारे रोजगार, विवाह, मानसिक स्वास्थ्य समुपदेशन तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे यांनी श्री आबासाहेब मोरे यांचा परिचय करून दिला. त्यांनी देशभरातील तालुका, जिल्हा तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच शाकंभरी सीड बँकेच्या परवाना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तांत्रिक सत्रात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत, पावसाच्या खंडकाळात घ्यावयाची काळजी तसेच नैसर्गिक शेती या विषयांवर डॉ. आनंद गोरे व डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.



संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे
ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे
संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे 

प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे यांचा सन्मान 

Thursday, July 23, 2026

वनामकृविच्या परभणी कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या १८० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला असून, या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली.

यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. प्रफुल घंटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. किरण जाधव, पदव्युत्तर शिक्षण प्रभारी प्रा. मकरंद भोगावकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. सुरेश वाईकर, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी डॉ. जय देशमुख, श्री. विजय गारकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान, प्राध्यापक, कर्मचारी तसेच NSS NCC चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान यांनी केले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.







वनामकृवि–सारथी यांच्यात ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत आर्थिक सहाय्यासह डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षणाची संधी


मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यात दिनांक २३ जुलै २०२६ रोजी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) केंद्रामार्फत हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठातर्फे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक (अर्थशास्त्र) डॉ. रणजित चव्हाण तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्री. विवेकानंद भोसले यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सारथी संस्थेच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक श्रीमती आम्रपाली कसोडेकर, प्रकल्प अधिकारी श्री. असलम शेख व श्री. योगेश कुदळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून कराराची औपचारिक पूर्तता करण्यात आली.

सामंजस्य करारानंतर सारथी संस्थेने आपल्या अधिकृत पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आरपीटीओ केंद्रामध्ये डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, कृषि फवारणी, पीक निरीक्षण, अचूक शेती (प्रिसिजन अॅग्रिकल्चर), भू-सर्वेक्षण आदी क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे मराठवाड्यातील युवक-युवती, विद्यार्थी आणि शेतकरी यांना शेतीमध्ये आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमता व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, संशोधन उपसंचालक (पिके) डॉ. सुनिता पवार, ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे, ड्रोन प्रशिक्षक श्री. गोविंद दहिफळे व श्री. शितम लांडगे उपस्थित होते.

यानंतर सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन तेथील प्रशिक्षण सुविधा, उपलब्ध उपकरणे व प्रशिक्षण प्रक्रियेची पाहणी केली.

मराठवाड्यातील सर्व पात्र विद्यार्थी, युवक-युवती आणि शेतकरी यांनी सारथीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे यांनी केले.





वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटरसाठी सामंजस्य करार व नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार असून, त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच अकोला येथील महाबीजचे महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमामुळे बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच नैसर्गिक शेतीचा प्रसार, शाश्वत कृषि पद्धतींचा अवलंब आणि शेतकऱ्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) चे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक)चे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.


वनामकृवित ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा

भारतीय संस्कृती आणि नैसर्गिक शेतीचा आधार देशी गोवंश – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पाच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी विद्यापीठात ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये देशी गोवंशाचे जतन व संवर्धन तसेच संकरीकरणाद्वारे दुग्धोत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत देशी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन व प्रजनन गुणधर्मांवर सातत्याने संशोधन केले जात आहे. सध्या प्रकल्पावर होलदेव व देवणी जातींचे एकूण १६९ गोवंश असून त्यापैकी ८७ शुद्ध देवणी जातीचे आहेत. देशी गायीचे दूध, शेण व गोमूत्र यांचे कृषी, पर्यावरण आणि पोषणदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन शासनाने देशी गोवंशाच्या संवर्धनावर विशेष भर दिला असून देशी गायीस 'राज्यमाता गोमाता' हा दर्जा प्रदान केला आहे.

यानिमित्ताने दुपारच्या सत्रात विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या सभागृहात मराठवाड्यातील पशुपालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे तसेच प्रमुख वक्ते म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास साळुंखे उपस्थित होते. याशिवाय पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, विभागातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मराठवाड्यातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत कृषी व्यवस्थेमध्ये गोवंशाचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केले. त्यांनी भारतीय परंपरेतील गोवंशाचे प्राचीन महत्त्व, गोरज मुहूर्ताचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व, मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या बळकटीकरणामध्ये पशुधनाचे असलेले योगदान यावर सविस्तर विवेचन केले. याशिवाय देशी गोवंशाचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत पशुपालन व्यवसायात महिलांचा सक्रिय सहभाग, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी विद्यापीठाद्वारे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन यासाठीच्या कार्याचे महत्व नमूद केले.

प्रमुख वक्ते डॉ. विश्वास साळुंखे यांनी देशी गोवंशाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, संतुलित आहार व्यवस्थापन, आधुनिक पशुधन व्यवस्थापन, पशू आरोग्य संवर्धन, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच पशुपालकांनी दैनंदिन व्यवस्थापनात घ्यावयाची आवश्यक काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी देशी गोवंशाचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन करून दुग्धोत्पादनासह शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देता येते, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्पामार्फत गेल्या २५ वर्षांपासून शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन तसेच उत्पादन व प्रजनन गुणधर्मांवरील संशोधन सुरू असल्याची माहिती दिली. शेती व पशुधन हे एकमेकांना पूरक असून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पशुधन संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपालक प्रतिनिधी श्री. शिवप्रसाद मारोती कोरे (रा. राणी सावरगाव, ता. गंगाखेड), श्री. परमेश्वर शिवमूर्ती स्वामी (रा. इटोली, ता. जिंतूर), श्री. विजय प्रल्हादराव खिस्ते पाटील (रा. ताडबोरगाव, ता. मानवत) तसेच श्री. रामेश्वर किशनराव मांडगे (रा. बेलवाडी, जि. हिंगोली) यांनी मनोगत व्यक्त करत शाश्वत शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल गोरे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाची भूमिका स्पष्ट केली. संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय देशी गोवंशाचा काटकपणा, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच शेतीतील अवशेष व चारा संसाधनांचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले, तर आभार डॉ. प्रभाकर पडघान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जी. पी. भोसले, श्री. रवी काळे, श्री. विश्वंभर शिंदे, श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव व भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.








माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वनामकृवित वृक्षारोपण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांच्या हस्ते उद्यानविद्या विभाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करून हरित परिसर निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आंब्याच्या विविध जातींची ४५० रोपे व जांभळाची ५० रोपे, अशी एकूण ५०० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला..





वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भा.कृ.अ.प.च्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठातील पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना येथे आयोजित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांवर आधारित कस्टम हायरिंग सेंटर श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) येथे स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी या अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अल्पभूधारक व पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक, कमी खर्चिक व कार्यक्षम शेती अवजारांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी (प्रणित), नाशिक येथील प्रमुख कृषिशास्त्र विभागाचे मा. श्री. आबासाहेब मोरे (कृषिरत्न) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, महाबीज, अकोला येथील महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी, कुलसचिव श्री. पुरषा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) अंतर्गत करण्यात आले असून, संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शास्त्रज्ञ (पशुविज्ञान) डॉ. संदेश देशमुख आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक इंजी. अजय वाघमारे यांनी शेतकरी, कृषि संस्था आणि संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.