Thursday, June 18, 2026

‘शेतकरी देवो भवः’ भावनेतून संशोधन व तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प येथे दिनांक १८ जून २०२६ रोजी ७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक’ ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.

या बैठकीस संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. संजय पाटील, श्री. दीपक गवळी हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेश तीर्थंकर (लातूर), विद्यापीठातील विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विस्तार कृषि विद्यावेत्ते ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी देवो भवः” ही भावना मांडत विद्यापीठाच्या संशोधन व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान शिफारशी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात कपात आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शनाची आज नितांत आवश्यकता आहे.

सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी, बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी, आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा, पाण्याचा कार्यक्षम वापर करावा तसेच चारा पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन माननीय कुलगुरुंनी केले.

पुढे त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, पुणे येथील कृषि परिषद आणि विविध विभागांमार्फत आयोजित बैठकीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची शिफारस सातत्याने केली जाते. शेतीच्या सर्वांगीण समृद्धीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या संस्थेने चांगले कार्य केल्यास इतर संस्थांनी त्याचा उपयोग करून आपले कार्य पुढे न्यावे, असे सांगत त्यांनी सहकार्याची भावना अधोरेखित केली. तसेच खेत बचाओ अभियान” अंतर्गत जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारत सरकारच्या पीएम प्रणाम’ योजनेचा प्रभावी प्रसार केला जात असून माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर आणि हिरवळीच्या खतांचा अवलंब केल्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठी बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

या मोहिमेत कृषि विभाग, शेतकरी आणि विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकरी देवो भवः” ही भावना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी विद्यापीठ आणि इतर सर्व विभागांनी आपली ताकद ओळखून सहकार्यात्मक भावना, नवोपक्रमशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन एकत्र साधावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नमूद केले की, बायोमिक्स क्षेत्रात विद्यापीठाने उल्लेखनीय कार्य केले असून त्याचे विकेंद्रीकरण करून मराठवाड्यातील इतर केंद्रांपर्यंत ते पोहोचविण्याची आवश्यकता आहे. परभणीबरोबरच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर जिल्हा केंद्रांवर बायोमिक्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी बंधूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीतील चर्चेदरम्यान संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रत्याभरणावर उत्तरे दिली. तसेच भविष्यात या विषयांवर सखोल संशोधन करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रस्तावना सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी करत नमूद केले की, चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेतील शिफारशी तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत विभागामार्फत शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया संकलित केल्या जातात आणि त्यानुसार पुढील हंगामासाठी संशोधनाची दिशा निश्चित केली जाते. तसेच पिकांसंबंधित अडचणी समजून घेऊन हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठीही प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर) व श्री. महेश तीर्थंकर (लातूर) यांनी सादरीकरण करून शेतकऱ्यांचे प्रत्याभरण (feedbacks - प्रत्यक्ष अनुभव) मांडले. तसेच विभागासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली. त्यांनी खजूर, ॲव्होकॅडो, राजमा, ड्रॅगन फ्रूट, देशी कापूस, फळबाग लागवड यांसह विविध विषयांवर संशोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीत विविध विभागीय योजनांची माहिती, तांत्रिक सल्ला, हवामान आधारित पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन, बियाणे उपलब्धता, खत वापर मार्गदर्शन, जलसंधारण आणि शाश्वत शेती या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आशिष बागडे यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी डॉ. डी. एस. मुटकुळे, डॉ. दिलीप हिंगोले, श्री. ढगे, श्री. साळी, श्री. रामेश्वर ठोंबरे तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

वनामकृविद्वारा ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 एल निनोचा विचार करून योग्य पीक निवड केल्यास उत्पादनवाढ शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर खेत बचाओ अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानात स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर भर देण्यात येत असून, मातीचे आरोग्य जपणे, पाणी संवर्धन करणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, पर्यावरण संरक्षण करणे तसेच शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आपली शेती, आपले भविष्य – चला, एकत्र करूया संवर्धन” हा संदेश देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या अधिकारी तसेच शेतकरी यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

याच अभियानांतर्गत विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, एकात्मिक शेती पद्धतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजन करताना संभाव्य एल निनो परिस्थितीचा विचार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य पिकांची निवड करणे आवश्यक आहे. कमी पर्जन्यमान किंवा पावसातील अनिश्चिततेच्या परिस्थितीतही उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य द्यावे. तसेच कापूस पिकाची लागवड शिफारशीत तंत्रज्ञानानुसार करावी. विद्यापीठाने एल निनोच्या पार्श्वभूमीवर विविध पिकांसाठी विकसित केलेल्या पीक नियोजन सूत्रांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनवाढ साध्य करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यापीठ दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करीत असून, शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, योग्य लागवड अंतर, पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी शेंडा खुडणी, लागवडीपूर्वी खतांचे नियोजन, सुधारित वाणांचा वापर तसेच बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या शिफारशींचा अवलंब केल्यास तूर पिकाचे अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी खेत बचाओ अभियान” चे महत्त्व विशद करताना मातीचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच उत्पादनवाढीसाठी जैविक खतांच्या वापराचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी येत्या खरीप हंगामात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या दिसून येणाऱ्या भुंग्यांच्या व्यवस्थापनापासूनच हुमणी नियंत्रणाची सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच पीक संरक्षणासाठी आवश्यकतेनुसारच कीटकनाशकांची फवारणी करावी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास गावातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर यांच्या वतीने बीडीएन-७१६ या तूर वाणाच्या प्रात्यक्षिकासाठी निवडक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे सर्व सभासद तसेच संचालक श्री. दिलीप अंभोरे यांनी विशेष प्रयत्न केले.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘रोपवाटिका व्यवस्थापन व जैविक खत निर्मिती’ प्रशिक्षण यशस्वी

 सामाजिक वनीकरण व नैसर्गिक संसाधन संवर्धन ही काळाची गरज : : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उद्यानविद्या विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात आयोजित रोपवाटिका व्यवस्थापन व जैविक खत निर्मिती’ या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील वनरक्षक, वनपाल आणि विभागीय वन अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार आणि श्रीमती एस. एस. पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वृक्षपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाची आवश्यकता अधोरेखित केली. ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे त्यांनी आपल्या क्षेत्रापैकी किमान ३० टक्के क्षेत्रावर सामाजिक वनीकरण उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षलागवडीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, भूजल पातळी सुधारते, कार्बन शोषण वाढते आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कडुलिंबाच्या वृक्षाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. कडुलिंब हा पर्यावरणपूरक, औषधी गुणधर्मांनी युक्त आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त वृक्ष असून त्याचा वापर नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर तसेच उपलब्ध जागेत कडुलिंबासह इतर उपयुक्त वृक्षांची लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर वाढवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जपावे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावे आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठ आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

विभागीय वन अधिकारी श्रीमती एस. एस. पठाण यांनी प्रास्ताविकातून सामाजिक वनीकरणाचे महत्त्व विशद केले. वाढते हवामान बदल, घटते वनक्षेत्र आणि पर्यावरणीय असंतुलन यांचा विचार करता शेतकऱ्यांनी वृक्षलागवडीला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रोपवाटिका व्यवसाय, दर्जेदार रोपनिर्मिती आणि जैविक खतांचा वापर यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून रोपवाटिका व्यवसाय, जैविक खत निर्मिती आणि सामाजिक वनीकरण उपक्रमांना चालना देण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणामध्ये विविध तज्ज्ञांनी विषयानुरूप मार्गदर्शन केले. डॉ. एस. आर. बरकुले यांनी अभिवृद्धीच्या विविध पद्धती या विषयावर कलम, गुटी, दाबकलम आणि रोपनिर्मितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. भाग्यरेषा गजभिये यांनी जैविक खत निर्मिती व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व, गांडूळखत, कंपोस्ट खत आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाय सांगितले तसेच जैविक खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

डॉ. ए. टी. दौंडे यांनी रोपवाटिकेतील रोग व्यवस्थापन, तर डॉ. दिगंबर पटाईत यांनी रोपवाटिकेतील कीड व्यवस्थापन याविषयी सखोल माहिती दिली. डॉ. ए. एस. लोहकरे यांनी रोपवाटिकेची ओळख व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. बी. एम. कलालंबडी यांनी मध्यवर्ती रोपवाटिकेत अभिवृद्धीच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक सादर केले, तर डॉ. सी. व्ही. आंबाडकर यांनी बायोमिक्स प्रक्रिया केंद्र येथे बायोमिक्स निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील वनरक्षक, वनपाल आणि वन अधिकाऱ्यांमध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, जैविक खत निर्मिती, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी अन्नप्रक्रिया केंद्र, अन्नतंत्र महाविद्यालय येथे भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


















Wednesday, June 17, 2026

वनामकृवितील कृषि महाविद्यालयाच्या रावे उपक्रमाद्वारे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

 मातीचे आरोग्य सुदृढ तरच शेती, पशुधन व मानवाचे आरोग्य निरोगी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम – रावे (RAWE) आणि औद्योगिक संलग्नता २०२६ या उपक्रमांतर्गत तसेच अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या खेत बचाओ अभियान’ या देशव्यापी कार्यक्रमांतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम दि. १७ जून २०२६ रोजी मौजे उजळंबा (ता. जिल्हा परभणी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एल निनोचा प्रभाव, आकस्मिक पीक नियोजन तसेच खेत बचाओ अभियान याविषयी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी खेत बचाओ अभियान’ चे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. मृदेचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ज्याप्रमाणे बालिका आणि महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंब व देशाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य चांगले राहिल्यास मातीतून अंकुरित होणाऱ्या पिकांचे तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पशुधन आणि मानवाचे आरोग्य सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्यामुळे अन्नदाता शेतकरी हा संपूर्ण ब्रह्म आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे नुकसान कसे टाळावे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित होऊ शकते. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, जलसंधारण तसेच आकस्मिक पीक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी बीबीएफ (Broad Bed Furrow - रुंद सरी वरंबा) तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्याचा सल्ला दिला. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि कमी पावसाच्या परिस्थितीत ओलावा टिकून राहतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी मृदा स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, जमिनीचा पोत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब (जैव कार्बन) वाढविणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी रसायनांचा अतिरिक्त वापर टाळून सेंद्रिय खते, शेणखत आणि कंपोस्टचा नियमित वापर करावा. त्यामुळे जमिनीची उर्वरता वाढते. एल निनोच्या संकटाच्या काळात मृदा स्वास्थ्य राखणे आणि रसायनांचा संतुलित वापर करणे हे टिकाऊ शेतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष उपस्थिती असलेले विद्यापीठ रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी रावे अंतर्गत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. उजळंबा गावचे सरपंच श्री. विठ्ठलजी धोतरे आणि उपसरपंच श्री. स. मेहताब स. ईसाक यांनी ग्रामस्थांना खेत बचाओ मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कोरडवाहू शेतीमध्ये एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि योग्य पीक पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.

विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कीड व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानात पिकांवर पडणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कसा रोखावा याविषयी मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्स व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून दुष्काळी परिस्थितीत पिकांची तग धरण्याची क्षमता कशी वाढते यावर माहिती दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा) डॉ. गणेश गायकवाड यांनी माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ प्रा. धनंजय मोहोड यांनी रेशीम उद्योग व तुती लागवडीबाबत माहिती देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमास रावे टास्क फोर्स प्रमुख डॉ. गोदावरी पवार तसेच कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती के. डी. चांदणे यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळंबा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम (RAWE) अंतर्गत शिक्षण घेत असलेले कृषिदूत ची. जयंत भास्कर, मनीष बिष्णोई आणि नरेंद्र बंसिवाल यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांना श्री. प्रभाकर मोगले यांनी सहकार्य केले. या शेतकरी संवाद कार्यक्रमास उजळंबा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Tuesday, June 16, 2026

वनामकृविद्वारा एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम नियोजन विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे  गरजेचे.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जून २०२६ रोजी करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी  सांगितले की, यावर्षी मोसमी पावसाची परिस्थिती अनिश्चित असून शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये. पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे हितावह राहील. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, सेंद्रिय खते, जिवाणू खते, हिरवळीची खते यांचा अधिकाधिक वापर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच जमीन व हवामानाच्या प्रकारानुसार योग्य पीक व पीक पद्धतीची निवड करणे, खतांवरील आणि  एकूण लागवडीवरील खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य हवामान जोखमीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रुंद वरंबा-सरी (Broad Bed and Furrow) पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. खेत बचाव अभियान कार्यक्रमातून खतांचा कमी आणि काटेकोर वापर यावर भर देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

अशा कार्यक्रमात  शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे  गरजेचे असून त्यातून अनेक शंकांचे निरसन होऊन योग्य निर्णय घेण्यास अनेक शेतकरी बंधू भगिनी यांना मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी एल निनो परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उताराला आडवी पेरणी, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तसेच कमी कालावधीची वाण निवडण्याचा सल्ला दिला. पाऊसाचे आगमन ७ जुलै पर्यंत झाल्यास मग उडीद सोयाबीन कपाशी अशी सर्वच पिके घेता येतील. पावसास थोडा उशीर झाल्यास मुग, उडीद आणि भुईमूग या पिकांऐवजी कापशी, तूर, बाजरी, सोयाबीन सूर्यफूल ही पिके आणि आंतरपीक पद्धतीत पिके  घ्यावीत आणि अधिक उशीर झाल्यास तूर,  बाजरी, विविध आंतरपीक पद्धती जसे  एरंडी अधिक धने,  यांसारख्या कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शेत तळे आणि इतर प्रकारे केलेले जल संधारण यातील पाणी पावसाच्या खंड काळात काटेकोर पणे संरक्षित सिंचन म्हणून वापरावे.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. पीक नियोजन, वाण निवड, खत व्यवस्थापन, पावसातील अनिश्चितता, आंतरपीक पद्धती आणि जलसंधारण उपाययोजना यासंदर्भातील प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषी विभाग अधिकारी कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तसेच डॉ. एम. दीन, डॉ. जी. के. गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी बांधवांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रशुद्ध पीक नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी, कृषी तज्ज्ञ व कृषी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.







वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘स्पर्धा मंच’चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात संपन्न

 ध्येय, शिस्त आणि परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व यशस्वी करिअर घडविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘स्पर्धा मंच, परभणी’ चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन वैद्यनाथ वसतिगृह परिसरात दिनांक १६ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच स्पर्धा मंचचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके, उपाध्यक्ष रोहित मोरे, सचिव मारोती सूर्यवंशी व सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र सांगताना, ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. अपयश हे यशाच्या प्रवासातील एक पाऊल मानून विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी अखंड प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. स्पर्धा मंचच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ५०० हून अधिक अधिकारी घडल्याबद्दल त्यांनी मंचाचे विशेष कौतुक केले आणि ही परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांनी आयसीएआर, एआरएस, नेट, गेट तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्याने अभ्यास करावा, असे सांगितले. कृषि क्षेत्रात संशोधक, कृषि शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून उज्ज्वल करिअर घडविण्याच्या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी स्पर्धा परीक्षांमधील बदलत्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांच्या निवास व अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत, अलीकडेच करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि उपक्रमांचा आढावा सादर केला.

या स्पर्धा मंचचेपहिले अध्यक्ष सध्या विद्यापीठात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ.किरण जाधव हे  होते. याप्रसंगी त्यांनीही सुरुवातीचा इतिहास सांगून मागदर्शन केले.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा मंचच्या वतीने माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक व अन्य मान्यवरांचा विद्यापीठासाठी नवीन आकृतिबंधाअंतर्गत अतिरिक्त पदांना मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी वैद्यनाथ वसतिगृहातील उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना स्पर्धा मंचच्या कार्यकर्त्यांनी मंचाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविध उपक्रमांची, यशोगाथांची आणि प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंचाच्या भावी वाटचालीसाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सिद्धेश्वर हत्ते यांनी केले. प्रास्ताविकात स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके यांनी मंचाच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला, तर उपाध्यक्ष रोहित मोरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि यशस्वी करिअर घडविण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचे वातावरण कार्यक्रमभर अनुभवास आले.



वनामकृवि व महाबीज यांच्यात ‘चिया’ वाण विकासासाठी सामंजस्य करार

संशोधन, उत्पादन आणि व्यापारीकरणाच्या समन्वयातून शेती विकास शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांच्यात चिया (Salvia hispanica L.) या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी दिनांक १५ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत, उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रात चिया पिकाखालील क्षेत्र सातत्याने वाढत असताना प्रमाणित बियाण्यांची मागणीही वाढत आहे. मात्र अधिकृत सुधारित वाण उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक आणि कमी गुणवत्तेच्या बियाण्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून विद्यापीठ आणि महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून पांढऱ्या व काळ्या बियांच्या उच्च उत्पादनक्षम चिया वाणांच्या विकासासाठी संशोधन सुरू करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत विविध हवामान परिस्थितींमध्ये बहुस्थळी संशोधन चाचण्या, उत्पादन क्षमता व गुणवत्ता परीक्षण, रोग व किडींचे निरीक्षण, तांत्रिक अहवाल तयार करणे तसेच आशादायी वाणांचे बीज उत्पादन आणि व्यापारीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यापीठ संशोधन, मूल्यांकन व शिफारसी विकसित करेल, तर महाबीजकडून बीज उत्पादन, प्रसार, प्रात्यक्षिके आणि विक्रीची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.

या करारामुळे चिया पिकासाठी राज्यात प्रथमच अधिकृत वाण विकसित होण्यास चालना मिळणार असून उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होणार आहे. संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील हे सहकार्य कृषी क्षेत्रासाठी नवे संधी निर्माण करणारे ठरणार आहे. हा करार पुढील पाच वर्षांसाठी वैध राहणार असून संयुक्त मालकी हक्क, गुणवत्ता नियंत्रण, बीज परवाना आणि व्यापारीकरणाच्या बाबी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

हा करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विभाग प्रमुख तथा उपसंचालक संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री जगदीशसिंग खोकड, जिल्हा व्यवस्थापक श्री रज्जाक शेख यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी देवो भवः’ हा मूलमंत्र देत कृषी संशोधन संस्थांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचे लाभ अंतिम घटक असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कृषी क्षेत्रातील प्रगती ही संशोधन, उत्पादन, विस्तार यंत्रणा आणि व्यापारीकरण यांच्यातील सशक्त समन्वयातून तसेच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यामधून साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठ आणि महाबीज यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादनक्षमता वृद्धिंगत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही संस्थांनी समर्पित भावनेने कार्य करून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या निमित्ताने महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांनी विद्यापीठ परिसराला भेट दिली. विशेष म्हणजे श्री. स्वामी हे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी १९८९ मध्ये बी.एस्सी. (कृषी) तसेच १९९१ मध्ये कृषी अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या पुनर्भेटीमुळे विद्यापीठ परिवारात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामंजस्य करारावरती विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तर महाबीजच्या वतीने गुणनियंत्रण आणि संशोधनाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी एस लहाने यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी संशोधनाधारित नवीन वाणांचा प्रसार, बीज उत्पादन साखळी मजबूत करणे आणि शेतकरी हितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान महाबीजच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प, बियाणे उत्पादन केंद्रे तसेच बायोमिक्स संशोधन व प्रक्रिया केंद्राची पाहणी करून विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधन कार्याचे विशेष कौतुक केले. या सहकार्यामुळे विकसित तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.