Saturday, June 27, 2026

वनामकृविच्या जिरेवाडी येथील कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या बांधकाम प्रगतीचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी घेतला आढावा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत जिरेवाडी (ता. परळी, जि. बीड) येथे उभारण्यात येत असलेल्या कृषी महाविद्यालय (COA) व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय (COABM) यांच्या बांधकाम कामांची प्रगती तपासण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. २६ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी करत बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान बांधकामाची सद्यस्थिती, स्तंभ, स्लॅब, आरसीसी संरचना, वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच कामाच्या वेळापत्रकाचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी कामाचा वेग आणि गुणवत्ता या दोन्ही बाबींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे नमूद करत, निर्धारित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

याप्रसंगी विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेश चौहान तसेच उपविद्यापीठ अभियंता श्री. डी. डी. टेकाळे उपस्थित होते. त्यांनी माननीय कुलगुरूंना बांधकामाच्या सद्य प्रगतीची माहिती देत आगामी कालावधीत पूर्ण होणाऱ्या पुढील टप्प्यांची रूपरेषा सादर केली.




जिरेवाडी येथे स्वयंचलित हवामान यंत्राचे आमदार श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत शासकीय कृषि व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, जिरेवाडी येथे भारतीय हवामान विभाग (IMD) व भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान यंत्राचे उद्घाटन माजी कृषिमंत्री तथा माननीय आमदार श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिनांक २६ जून २०२६ रोजी संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेशसिंह चौहान (जिरेवडी), डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर), डॉ. संजीव बंटेवाड (अंबाजोगाई), विद्यापीठ उप अभियंता डॉ दयानंद टेकाळे, सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनचे इंजी. रितेश माने, इंजी. प्रसाद इंगळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी केले. त्यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या कृषि व कृषि व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमांची माहिती देत महाविद्यालय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची उपस्थित मान्यवरांना माहिती दिली.

उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना माननीय आमदार धनंजय मुंडे यांनी कृषि व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये शासनाची भूमिका, शासन स्तरावर करण्यात आलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली. तसेच येणाऱ्या काळात हे महाविद्यालय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कृषि शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून नावारूपास यावे, यासाठी विद्यापीठ प्रशासन, प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांनी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे देशातील नावाजलेल्या कृषि विद्यापीठांपैकी एक असून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारे अग्रगण्य कृषि विद्यापीठ आहे. येत्या काळात जिरेवाडी येथे स्थापन होणारे हे महाविद्यालय राज्यासह देशपातळीवर आदर्श कृषि महाविद्यालय म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. अनंत मुंडे व श्री. गोपाळ विग्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण विभाग प्रमुख डॉ. विनोद शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय राठोड, तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. उदय चव्हाण, श्री. वाकडे, श्री. ऋषी धोत्रे, श्री. नागेश दरकसे, श्री. अक्षय कांबळे आणि श्रीमती मोडके उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी प्रा. बाबासाहेब मस्के यांनी केले.












Thursday, June 25, 2026

वनामकृविद्वारा खेत बचाव अभियानांतर्गत सायाळ-खटिंग येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

 रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात देशभर खेत बचाव अभियान” राबविण्यात येत आहे. स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा प्रमुख उद्देश मातीचे आरोग्य संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, पर्यावरण संरक्षण तसेच शाश्वत शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील सायाळ-खटिंग येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम २०२६ तसेच अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आभासी माध्यमातून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचे संतुलन आणि पिकांची उगवणक्षमता यावर प्रतिकूल परिणाम होत असून दीर्घकालीन शेती उत्पादनक्षमतेलाही धोका निर्माण होत आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून शेणखत, गांडूळखत, जैविक खते तसेच इतर सेंद्रिय घटकांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. “स्वस्थ माती, सक्षम शेतकरी आणि समृद्ध भारतया संकल्पनेला बळ देण्यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, पीक फेरपालट, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय कर्ब वाढविणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादन खर्च कमी ठेवून शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक व प्राकृतिक शेती पद्धतींचा स्वीकार, स्थानिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान अंगीकारण्याचा सल्ला देत, भविष्यातील शेती ही मातीच्या आरोग्यावर आधारित असली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी एल-निनो परिस्थिती लक्षात घेऊन पीक नियोजन, विहीर पुनर्भरण आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीनची पेरणी करावी, असे मार्गदर्शन केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि जैविक अन्नद्रव्यांच्या वापरावर भर दिला.

विशेष उपस्थिती असलेले विद्यापीठ रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी रावे अंतर्गत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या ऑनलाइन मार्गदर्शन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. विलास खरगखराटे यांनी एल-निनो परिस्थितीत पर्यायी पिकांची माहिती दिली. डॉ. ए. एस. यू. उमाटे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, डॉ. बी. एन. वाड यांनी पशुधनाची काळजी व लसीकरण, डॉ. स्वाती झाडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगत दर दोन वर्षांनी माती परीक्षण करण्याचा सल्ला दिला. डॉ. विक्रम घोळवे यांनी रोग नियंत्रण व बायोमिक्स, डॉ. आर. एस. जाधव यांनी कीड व्यवस्थापन तर डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास गावच्या सरपंच श्रीमती पद्मिनीबाई खटिंग, उपसरपंच श्री. भगवानराव खटिंग तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिकूच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. मिर्झा आय. ए. बी. आणि डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूत सार्थक धुमाळ, संदीप ढवळे, शिवानी बुरांडे, आदिती बल्लाळ, स्नेह बासेवाड, गायत्री बिरादार, कीर्ती बेले तसेच इतर कृषीदूतांनी विशेष परिश्रम घेतले.















Wednesday, June 24, 2026

मौजे गोलापांगरी येथे दुधना पोल्ट्री फार्मला माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द्र मणि यांची भेट; कृषी कन्या अंकिता मोरे यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक

 

जालना जिल्ह्यातील गोलापांगरी येथील कृषि पदवीधारक कृषि कन्या अंकिता मोरे यांच्या दुधना पोल्ट्री फार्मला माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द्र मणि यांनी भेट देऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण कुक्कुटपालन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अंकिता मोरे व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अंकिता मोरे यांनी घरातील कृषि परंपरा आणि आजीच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत शेवगा लागवडीसोबत मुक्त कुक्कुटपालन पद्धतीवर आधारित कमी खर्चिक व शाश्वत पोल्ट्री मॉडेल विकसित केले आहे. शेतातील उपलब्ध उत्पादनांचा वापर करून कुक्कुटपालन करणारे हे मॉडेल सध्या शेतकरी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या अभिनव प्रयोगाला आतापर्यंत चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायापासून दुरावलेल्या सुमारे १५०० व्यावसायिकांना पुन्हा या व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रेरित करण्यात अंकिता मोरे यांना यश आले आहे.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी दुधना पोल्ट्री फार्मची सविस्तर पाहणी करून प्रकल्पाचा आर्थिक ताळेबंदची माहिती घेतली. तसेच या मॉडेलच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले. कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून या उपक्रमाचा विकास करून भविष्यात उद्योगाभिमुख प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत राहावे व ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भेटीदरम्यान मोरे परिवाराने विकसित केलेल्या व ‘केशवराज’ या नावाने नोंदणीकृत आंबा वाणाचीही माहिती  जाणून घेतली. शेती, फलोत्पादन आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांबद्दल त्यांनी मोरे परिवाराचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी डॉ. भगवान आसेवार (संचालक शिक्षण), डॉ. राकेश अहिरे (संचालक विस्तार शिक्षण), डॉ. एस. डी. सोमवंशी (कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर), डॉ. श्रीकृष्ण सोनुने (कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी), डॉ. राहुल कदम (विषय विशेषज्ञ), डॉ. हनुमंत आगे (विषय विशेषज्ञ) तसेच अंकिता मोरे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

या भेटीमुळे कृषिपूरक उद्योग, ग्रामीण उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांना नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची जालनाच्या माननीय जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल (आयएएस) यांच्याशी सदिच्छा भेट; कृषी तंत्र विद्यालय जालना विकासाबाबत सकारात्मक चर्चा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय श्रीमती अशीमा मित्तल (आयएएस) यांची बुधवार, दिनांक २४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जालना येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीत कृषी तंत्र विद्यालय, जालना येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र (Training and Skill Infrastructure Centre) सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील युवक-युवतींना कृषीपूरक उद्योग, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उद्योजकता विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात करण्यावर भर देण्यात आला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात कृषी शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे सांगितले. या उपक्रमांमुळे ग्रामीण युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी कृषी तंत्र विद्यालय परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, कौशल्याधारित प्रशिक्षणासाठी स्वतंत्र केंद्र विकसित करणे तसेच संस्थेच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. तसेच कृषी तंत्र विद्यालय परिसरातील अतिक्रमण हटवून संस्थेच्या जागेचे संरक्षण व विकासकामांना गती देण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

भेटीदरम्यान शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र अभ्यास डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. हरिहर कौसडीकर, कृषि विज्ञान केंद्र (बदनापूर) चे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी तसेच कृषी तंत्र विद्यालय, जालना चे प्राचार्य डॉ. श्रीकांत सरोदे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची खरपुडी (जि. जालना) येथील कृषि विज्ञान केंद्रास भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खरपुडी (जि. जालना) येथील कृषि  विज्ञान केंद्रास दिनांक २४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी बारवाले, संस्थेचे सचिव कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे, संस्थेचे विश्वस्त तथा कृषिभूषण मा. भगवानदादा काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास देशमुख, कृषि  विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रा. श्रीकृष्ण सोनुने यांच्यासह केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि  विज्ञान केंद्रामार्फत कार्यरत असलेल्या रेशीम हातमाग प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. येथे त्यांनी हातमागावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. तसेच कृषि  विज्ञान केंद्राच्या संपर्कातील प्रगतशील शेतकरी व महिला उद्योजकांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉलची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील केवळ आठवी ते दहावी शिक्षण घेतलेल्या महिला आज आठ दिवसांत १५ ते २० हजार रुपये किमतीची पैठणी साडी तयार करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर रेशीम हातमाग प्रशिक्षण केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले असून, त्याचप्रमाणे मराठवाडा शेती सहाय्य मंडळानेही तितकीच रक्कम खर्च करून महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम कृषि  विज्ञान केंद्रामार्फत सुरू केल्याची माहिती कृषि  विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी दिली.

या प्रशिक्षण केंद्रातून ३० महिलांची पहिली बॅच ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली असल्याची माहिती विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) श्री. अजय मिटकरी यांनी दिली. भविष्यात या महिलांचे नामांकित कंपन्यांसोबत समन्वय (टाय-अप) करून त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी संबंधितांनी सांगितले.








माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषि महाविद्यालयास भेट; विद्यार्थ्यांना दिला परिश्रम, गुणवत्ता आणि संस्कारांचा संदेश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी मान्यताप्राप्त खरपुडी (जि. जालना) येथील डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषि महाविद्यालयास’ माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी बुधवार दिनांक २४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी बारवाले, संस्थेचे सचिव कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे, संस्थेचे विश्वस्त तथा कृषिभूषण मा. भगवानदादा काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. श्रीकृष्ण सोनुने यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थी जीवनात सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, जिज्ञासा आणि प्रामाणिकपणा या गुणांचा अंगीकार केल्यास यश निश्चित मिळते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, संशोधनाभिमुख दृष्टीकोन आणि नवकल्पनांचा स्वीकार करून कृषि क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्याचे आवाहन केले. चांगला विद्यार्थी बनण्याबरोबरच जबाबदार, संवेदनशील आणि राष्ट्रहित जपणारा आदर्श नागरिक बनणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी विद्यापीठ स्तरावर आवश्यक सहकार्य कायम राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.