Saturday, September 5, 2026

ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून कृषि अभियंत्यांनी भविष्य घडवावे : डॉ. शिवकुमार व्यास

 


विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या व्याख्यानासाठी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत कृषि अभियंत्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. व्यास यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये (इग्नू) उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि प्रेरणादायी संवादाच्या उपलब्ध संधींची माहिती दिली.

यावेळी डॉ. शिवकुमार व्यास यांनी महाविद्यालयातील विविध प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील सुविधा व उपलब्ध पायाभूत सुविधांची पाहणी केली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील अद्ययावत पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक वातावरणाचे कौतुक केले.

त्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि टीएएफई, चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटरला भेट देऊन तेथील कृषि यांत्रिकीकरणाशी संबंधित विविध उपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. शिवकुमार व्यास म्हणाले की, शिक्षण म्हणजे केवळ पदवी संपादन करणे किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे साधन नसून, ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी करण्याची क्षमता विकसित करण्याची प्रक्रिया आहे. कृषि अभियांत्रिकी, मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी, औष्णिक अभियांत्रिकी तसेच शिक्षण व शैक्षणिक प्रशासन या विविध क्षेत्रांत काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांनी नेहमी ‘का?’, ‘कसे?’ आणि ‘यापेक्षा अधिक चांगले काय करता येईल?’ असे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत.

नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा, आव्हाने स्वीकारण्याची तयारी आणि समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय ही यशाची महत्त्वाची सूत्रे आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ आपल्या विषयाचे ज्ञान पुरेसे नाही. त्यासोबतच बहुविषयक दृष्टिकोन, सर्जनशीलता, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि समाजाच्या गरजा समजून घेण्याची क्षमता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा संबंध समाज, उद्योग, शेती आणि राष्ट्राच्या विकासाशी जोडला पाहिजे. अपयशाला घाबरू नका; प्रत्येक अडचण ही शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनविण्याची संधी असते. शिक्षकांकडून केवळ माहिती घेण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा, प्रश्न विचारा, चर्चा करा आणि स्वतःच्या कल्पना मांडण्याचे धाडस करा, असे आवाहन त्यांनी केले.

आपल्या करिअरबरोबरच समाजासाठी उपयुक्त असे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान, प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि आव्हानात्मक काम स्वीकारण्याची तयारी असेल तर कोणतीही समस्या असाध्य नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते; ती ओळखून विकसित करावी आणि देशाच्या प्रगतीसाठी तिचा उपयोग करावा, असे डॉ. व्यास यांनी नमूद केले.

तसेच, इग्नूच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध मुक्त, लवचिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या संधींचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘आयुष्यभर शिकत राहणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे’ या दृष्टिकोनातून आजीवन शिक्षणाची वृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांविषयी माहिती दिली. राष्ट्राच्या विकासामध्ये कृषि अभियांत्रिकीचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कृषि यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, अचूक शेती आणि शाश्वत कृषि विकासामध्ये कृषि अभियंत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दत्तात्रय पाटील आणि डॉ. अनिल हरकळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण लाभले.





वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात साजरा

 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘परभणी ब्रँड’ म्हणून घडविण्यासाठी योगदान द्यावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. शिक्षक हे केवळ ज्ञानदानाचे कार्य न करता विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे उपस्थित होते.

कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. राजेश कदम, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन आदर व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यापीठातील सर्व शिक्षकवृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शिक्षकांची भूमिका अत्यंत व्यापक आहे. ‘टीचर’, ‘लेक्चरर’ आणि ‘प्रोफेसर’ ही शिक्षकांची विविध रूपे असली तरी त्या सर्वांचे मूलभूत कार्य ज्ञानदान आणि व्यक्तिमत्त्व विकास हेच आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान तत्त्वज्ञ आणि प्राध्यापक होते. त्यांच्या जन्मदिनाचे शिक्षक दिन म्हणून स्मरण केले जाते, ही शिक्षक व्यवसायाच्या गौरवाची बाब आहे.

शिक्षण हे केवळ पुस्तके व पदव्यांपुरते मर्यादित नसते. जीवनातील विविध घटना, परिस्थिती, अनुभव आणि व्यक्ती यांच्याकडूनही माणूस सातत्याने शिकत असतो. शिक्षक ही केवळ एखादी व्यक्ती नसून एखादे बालक, घटना, परिस्थिती अथवा जीवनातील अनुभवदेखील शिक्षकाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले. भारताच्या परंपरेत औपचारिक शिक्षण न घेतलेले अनेक संत आणि गुरु होऊन गेले असून, कबीरदास यांचे उदाहरण यासाठी देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्षणातून ज्ञान प्राप्त होते, ज्ञानातून विनम्रता येते आणि विनम्रतेतून पात्रता निर्माण होते. पात्रतेच्या बळावर यश, समृद्धी आणि उत्तम कर्म साध्य करता येते व त्यातून जीवनात समाधान प्राप्त होते, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीमध्ये सतत शिकण्याची आणि पुढे जाण्याची भूक असणे आवश्यक आहे. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मला सर्व काही येते’ असे वाटते, त्या दिवसापासून त्याची प्रगती थांबते. धन म्हणजे केवळ पैसा नसून यश, गौरव आणि पद यांचाही त्यामध्ये समावेश होतो. मात्र, पद आणि प्रतिष्ठेमुळे स्वभावात बदल होऊ न देता त्याचा उपयोग लोकहितासाठी केला पाहिजे. आपल्यापेक्षा पद मोठे समजू नये, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षक कसा राहतो, कसा बोलतो आणि कसा वागतो, याचे अनुकरण विद्यार्थी करीत असतात. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःच्या आचरणातून उच्च आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून चारित्र्यवान बनावे आणि ‘परभणी ब्रँड’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, यासाठी प्रत्येक शिक्षकाने योगदान द्यावे, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बाल्य, शिक्षकत्व आणि पालकत्व असे तीन गुण आढळून येतात. बाल्यगुणामध्ये हट्टाची प्रवृत्ती असते, शिक्षकत्वामध्ये चुका शोधून त्यात सुधारणा करण्याची वृत्ती असते, तर पालकत्वामध्ये सतत मार्गदर्शन व काळजी करण्याचा गुण असतो. या सर्व गुणांमध्ये योग्य संतुलन राखल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि यशस्वी जीवन जगता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्याच्या दुःखात आनंद न मानता दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आणि सुखात आनंदी होण्याची वृत्ती जोपासणे, हीच खरी शिक्षणाची शिकवण आहे. मनात द्वेष न ठेवता सद्भावना आणि सांघिक वृत्तीने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुरतीच शिक्षकांची जबाबदारी मर्यादित नसून, शेतकरीदेखील आपले विद्यार्थी आहेत, या भावनेतून कृषि ज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सर्वांनी करावे, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी केले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी शिक्षक दिन हा शिक्षकांचा सन्मान आणि गौरव करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात घरातून आई-वडिलांकडून होते. शालेय शिक्षण शिक्षकांकडून मिळते; मात्र जीवन कसे जगावे, याचे मार्गदर्शनही शिक्षकच करतात. ज्ञान महत्त्वाचे असले तरी त्याचा योग्य उपयोग करण्याचे शहाणपण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शिक्षक हा उत्साही, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा असावा, असे सांगितले. कृषि क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी असून, ती सोडविण्यासाठी गुरुजनांकडून मिळालेले ज्ञान आणि तंत्रज्ञान कृषि विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि समाजापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठामध्ये कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मागणारे न बनता रोजगारनिर्मिती करणारे बनावे, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या व्यवसायाशी पूर्ण समर्पण ठेवून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि सतत नावीन्याशी जोडलेले राहावे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे यश हीच शिक्षकांना मिळणारी सर्वांत मोठी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचे महत्त्व विशद केले. व्यक्तीची जडणघडण आई-वडिलांपासून सुरू होते आणि पुढील औपचारिक शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. केवळ शिक्षकच नव्हे, तर पालक, वरिष्ठ आणि जीवनात मार्गदर्शन करणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु असते. त्यामुळे सर्वांप्रती आदरभाव ठेवावा, असे त्यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी शिक्षक दिनाच्या महत्त्वावर मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या सान्निध्यातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि मार्गदर्शनाचा उल्लेख केला.

डॉ. प्रवीण कापसे यांनी आदर्श शिक्षकाची संकल्पना स्पष्ट करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षांत विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा आणि विविध क्षेत्रांतील यशाचा आढावा घेतला. माननीय कुलगुरू हे राष्ट्रीय पातळीवरील उच्च दर्जाचे मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय कुलगुरू यांचे विद्यार्थी तथा कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. विशाल इंगळे यांनी माननीय कुलगुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

माननीय कुलगुरू यांचे स्वीय सचिव श्री. बालाजी डोईजड यांनी गुरुजनांप्रती आदर व्यक्त करणारे गीत सादर केले. विद्यार्थिनी शुभांगी शुक्ला यांनी प्रसिद्ध गायक मन्ना डे यांच्या तू प्यार का सागर है’ या गीताच्या सादरीकरणातून गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त केला. विद्यार्थी शुभम कुमार, शिवम राज आणि वैष्णवी बांगर यांनीही आपल्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कृषि महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी आराध्या सिंग आणि शुभांगी शुक्ला यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन, ज्ञान आणि प्रेरणा ही समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले. कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, संवेदनशील आणि ज्ञानसमृद्ध विद्यार्थी घडविणाऱ्या विद्यापीठातील सर्व शिक्षकांना यावेळी शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.















पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन व हाती घ्यावयाच्या उपाययोजना

 वनामकृविच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे आवाहन

मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण, पावसातील खंड आणि बदलत्या हवामान परिस्थितीमुळे पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर तसेच पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाच्या खंड काळात उपलब्ध जमिनीतील ओलावा, पाणी, अन्नद्रव्ये आणि चारा यांचे काटकसरीने व कार्यक्षम व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पुढील उपाययोजनांचा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले अखिल भारतीय कोरडवाहू प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ . गणेश गायकवाड, डॉ. पपीता गौरखेडे यांनी दिला आहे.

१. पिकांची सद्यस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे

पिकांची वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे यांचे नियमित निरीक्षण करावे.

हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने सर्व शेतांसाठी एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकांमध्ये सकाळच्या वेळी पाने कोमेजणे, पानांचा रंग बदलणे किंवा वाढ मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास ओलावा संवर्धन, संरक्षित सिंचन, आच्छादन, हलक्या कोळपण्या, अन्नद्रव्याची फवारणी, साध्या पाण्याची फवारणी,   जल संधारण सारी काढणे यापैकी शक्य असेल अशा आवश्यक उपाययोजना कराव्यात.

२. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संरक्षित सिंचन द्यावे

सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावे.

विशेषतः फुलोरा, शेंगा/बोंडांची निर्मिती, दाणे भरणे किंवा फळवाढ यांसारख्या संवेदनशील अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

ठिबक व तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतींचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा. सकाळी किंवा सायंकाळी सिंचन पाणी द्यावे याचा प्रयत्न करावा.

३. पावसाचे प्रत्येक थेंब शेतात अडवून जमिनीत मुरवावा

पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल, यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात.

विशेषतः कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारण सऱ्या काढून पावसाचे पाणी मुराविण्याचा  उपाय करावा आणि पडणारे पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरेल किंवा अडवावे अशा सऱ्या काढाव्यात. उपलब्ध परिस्थितीनुसार सरी-वरंबा, कंटूर सऱ्या, बांधबंदिस्ती, इत्यादी उपायांचा अवलंब करावा. शेततळे, नाला बांध, पाझर तलाव, विहिरी, कूप नलिका, येथील उपलब्ध पाणी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून काटकसरीने वापरावे.

पावसाचा प्रत्येक थेंब – शेताच्या बांधात व जमिनीच्या पोटात” या दृष्टिकोनातून जलसंधारण करावे.

४. तण नियंत्रणाला प्राधान्य द्यावे

पावसाच्या खंड काळात पिकांबरोबर तणेही जमिनीतील उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे.

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचे वेळीच नियंत्रण केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते. जिथे शक्य आहे तिथे उपट तण करावे.

५. पिकांच्या अवस्थेनुसार आंतरमशागत करून ओलावा टिकवावा

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते.आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीची परिस्थिती व पीक अवस्था लक्षात घेऊन योग्य वेळी कोळपणी किंवा इतर आंतरमशागतीची साधने वापरावीत. फळबागेत यावर भर द्यावा.

६. कीड व रोगांचे नियमित निरीक्षण व एकात्मिक व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नियमित पिकांची पाहणी करून किडींचा प्रादुर्भाव, किडीची संख्या, रोगांची लक्षणे आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तेथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षीथांबे, चिकट सापळे, फेरोमोन सापळे इत्यादींचा वापर करावा. कीड आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यानंतरच संबंधित पिकासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. अनावश्यक व अवाजवी कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात.

७. आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा

पिकांच्या ओळींमध्ये उपलब्ध पीक अवशेष, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास आणि कालांतराने सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर करावा.

८. पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळे मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) यांची फवारणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करता येते. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. मात्र फवारणी करताना पिकाची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच अन्नद्रव्यांची निवड, मात्रा व फवारणीची वेळ निश्चित करावी. याशिवाय साध्या पाण्याची फवारणी करता येते. यामुळे ३ते ४ दिवस पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.

९. जैविक निविष्ठांचा वापर करावा

पावसाच्या खंड काळात पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरतो. उपलब्धतेनुसार व शिफारशीनुसार बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा इत्यादींचा वापर करावा. तसेच पिअक्न्च्य अवस्थेनुसार आणि विशेषकरून फळ पिकात  शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.

१०. पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे

पावसाच्या खंड काळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी व क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम/लुसर्नसारखी योग्य हंगामी चारा पिके तसेच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी.

उपलब्ध हिरवा चारा योग्य अवस्थेत कापून वाळवून hay (हे ) तयार करणे किंवा योग्य पद्धतीने silage मुरघास  तयार करून साठवणे उपयुक्त ठरते. यामुळे पुढील पावसाच्या खंड काळात चाऱ्याची उपलब्धता राखता येते.

११. उपलब्ध चाऱ्याचे पौष्टिक मूल्य व उपयोगिता वाढवावी

चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्यास उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचा पौष्टिक व कार्यक्षम वापर करावा. कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचे योग्य आकारात चाफिंग (कुट्टी) केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणे सुलभ होते. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्यवर्गीय चारा यांचे संतुलित मिश्रण करावे.

गरजेनुसार पशुवैद्यकीय/पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण व आवश्यक पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित, कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही.

१२. फळबागेत विशेष पीक व्यवस्थापन करावे

पावसाच्या खंड काळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे फळबागेतील झाडांचे व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे.

ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर

फळबागेत उपलब्ध असल्यास ठिबक सिंचनास प्राधान्य द्यावे. झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. उपलब्ध पाण्यानुसार सिंचनाचे नियोजन करून अनावश्यक पाणी वापर टाळावा.

सकाळी किंवा सायंकाळी सिंचन करावे

पावसाच्या खंड काळात शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी सिंचन करावे. या वेळेत तापमान तुलनेने कमी असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तीव्र उष्णतेच्या वेळी सिंचन टाळणे योग्य ठरते.

फळझाडांच्या आळ्यात आच्छादन करावे

झाडांच्या बुंध्याभोवती व मुळांच्या परिसरात सेंद्रिय आच्छादन करावे. यासाठी उपलब्ध पीक अवशेष, वाळलेले गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थ वापरता येतात. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि तणांची वाढ कमी होण्यास मदत होते. मात्र आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिकटून ठेवू नये, कारण त्यामुळे बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

फळबागेत रोग व्यवस्थापन

पावसातील खंडानंतर आर्द्रता व तापमानातील बदलांमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करावी. सुकलेल्या, रोगग्रस्त फांद्या व पाने काढून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी. बोर्डोपेस्टचा वापर विशेषतः छाटणीच्या जखमा, खोडावरील जखमा किंवा संबंधित बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या भागावर संबंधित फळपिकासाठी शिफारशीत पद्धतीने करावा. बोर्डोपेस्ट तयार करण्याची पद्धत व प्रमाण पिकानुसार बदलू शकते; त्यामुळे कृषी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार योग्य प्रमाणातच वापर करावा. फळबागेत अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळून एकात्मिक रोग व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे.

१३. फळबागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन व झाडांवरील ताण कमी करावा

पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत देणे टाळावे. झाडांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

आवश्यकतेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्णीय अन्नद्रव्य फवारणी करता येते. मात्र पाण्याचा तीव्र ताण असताना किंवा अतिउष्णतेच्या परिस्थितीत फवारणी न करता योग्य वेळ निवडावी.

१४. पुढील पावसासाठी शेत तयार ठेवावे

पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्याने शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.

शेतातील बांध मजबूत करणे, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळे आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावे.

१५. शेततळे  बशिभावान कमी करण्याचे उपाय;

तापमान वाढल्यावर (ऑक्टोबर महिन्यापासून) किंवा उन्हाच्या लाटा असल्यास शेततळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी सीटायल अल्कोहोल २० मिलीग्राम प्रती चौरस मीटर यानुसार दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर वापरावे.

महत्त्वाचे आवाहन

पावसाच्या खंड काळात कोणतीही उपाययोजना सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतांसाठी एकसारखी लागू होत नाही. पिकाची वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

विशेषतः अन्नद्रव्यांची फवारणी, कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक निविष्ठा, बोर्डोपेस्ट तसेच चारा प्रक्रिया यांचा वापर संबंधित पिकासाठी शिफारशीत पद्धतीने आणि कृषी/पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावा.

पावसाचा खंड म्हणजे केवळ संकट नव्हे; योग्य नियोजन, उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन, काटकसरीचे सिंचन, जलसंधारण, पीक संरक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चारा नियोजन यांच्या माध्यमातून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षम वापर करा, पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा आणि पिके व पशुधनाचे शाश्वत व्यवस्थापन करावे असे शेतकरी बांधवांना आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पा तर्फे करण्यात आले आहे.





Friday, September 4, 2026

वनामकृविच्या बदनापूर कृषी महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड; पहिल्याच फेरीत ३० टक्के विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय एमसीएईआर पीजी-सीईटी (MCAER PG-CET) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयातील एकूण ११२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३४ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. पहिल्या फेरीतील निवडीचे प्रमाण सुमारे ३० टक्के इतके राहिले आहे.

निवड झालेल्या ३४ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांना अनुवंशशास्त्र व वनस्पती पैदास (Genetics and Plant Breeding – GPB) या कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या व उच्च मागणी असलेल्या विषयात महाराष्ट्रातील विविध कृषी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळाला आहे.

महाविद्यालयाचा हा निकाल अत्यंत कौतुकास्पद मानला जात असून, या उल्लेखनीय यशामुळे शासकीय कृषी महाविद्यालय, बदनापूरचे नाव कृषी शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा उंचावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक तथा शासकीय कृषी महाविद्यालय, बदनापूरचे माजी अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे तसेच संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची जिद्द आणि प्राध्यापकांचे दर्जेदार मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. हा निकाल महाविद्यालयाच्या गौरवात भर घालणारा असून, भविष्यात हे विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ म्हणून देशाच्या कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कापूस संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून पाहणी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन व विकासात्मक उपक्रमांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस संशोधन केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याची पाहणी करून केंद्राच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली. कापूस पिकावरील संशोधन, विविध प्रात्यक्षिके तसेच केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

या भेटीदरम्यान केंद्राच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाचीही माननीय कुलगुरूंनी प्रत्यक्ष पाहणी केली. बांधकामाचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित कालावधीत पूर्ण करण्याबाबत त्यांनी विद्यापीठाच्या अभियंत्यांना आवश्यक सूचना दिल्या.

कापूस संशोधन केंद्राच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून संशोधन व विस्तार कार्याला चालना देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. केंद्राच्या भविष्यातील विकासात्मक कामांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी कापूस विशेषज्ञ डॉ. विजयकुमार चिंचाणे तसेच कापूस संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


वनामकृवितर्फे संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीकडे ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर

 दापोली येथे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान ‘५४ वी जॉइंट ॲग्रेस्को’; कृषि संशोधन व नवीन तंत्रज्ञानावर होणार मंथन

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये विकसित झालेल्या विविध संशोधन निष्कर्षांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व शिफारशींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या बैठकीचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील सर विश्वेश्वरराव सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठांचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे हे राहणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीसाठी विविध पिकांचे वाण, पीक उत्पादन तंत्रज्ञान, कृषि अवजारे तसेच कृषि क्षेत्राशी संबंधित अन्य विषयांवरील एकूण ४२ तंत्रज्ञान शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे सादर करण्यात येणाऱ्या शिफारशींमध्ये वाण प्रसारणासंदर्भात सोयाबीनची एक, आंब्याची एक आणि भाजीपाला पिकांच्या तीन अशा एकूण पाच शिफारशींचा समावेश आहे. तसेच कृषि अवजारांशी संबंधित चार शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

विविध तंत्रज्ञानविषयक शिफारशींमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या पाच, पशुविज्ञान व दुग्धशास्त्राच्या सात, सामाजिक शास्त्राच्या आठ, पीक संरक्षणाच्या सात, कृषि अभियांत्रिकीच्या दोन, मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व जैवतंत्रज्ञानाच्या बारा तसेच डिजिटल कृषि क्षेत्रातील एका शिफारशीचा समावेश आहे.

मराठवाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विषयांवरील संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञान शिफारशी आधुनिक, उपयुक्त आणि शाश्वत कृषि पद्धतींच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

दरम्यान, दापोली येथे होणाऱ्या जॉइंट ॲग्रेस्को बैठकीत विविध पिकांवरील संशोधन, नवीन व सुधारित वाण, पीक व्यवस्थापन पद्धती, कृषि यांत्रिकीकरण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत कृषि तंत्रज्ञानावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

राज्यातील कृषि क्षेत्रासमोरील हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच बदलती बाजारपेठ या आव्हानांचा विचार करून कृषि संशोधन अधिक शेतकरीकेंद्रित करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.

राज्यातील कृषि संशोधनाला अधिक परिणामकारक दिशा देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधनाधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी ही संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक अर्थात जॉइंट ॲग्रेस्को–२०२६’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


सायाळ येथे दहा दिवसीय रेशीम प्रशिक्षणातील शेतकऱ्यांना वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; रेशीमपासून पैठणी निर्मितीसह मूल्यवर्धनावर भर

 शेतकऱ्यांनी उत्पादकाबरोबर उद्योजकही बनावे


शेतकऱ्यांनी केवळ शेतीतून उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता उत्पादित मालावर प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि थेट विक्री करून उद्योजक बनण्याची गरज आहे. शेतकरी व महिला शेतकरी गटांनी एकत्रित येऊन रेशीम शेतीला उद्योगाची जोड द्यावी. मराठवाड्यातील रेशीम कोष एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारावेत आणि रेशीमपासून पैठणीसारखी दर्जेदार वस्त्रे तयार करावीत. या संपूर्ण प्रक्रियेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे प्रतिपादन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

सायाळ (ता. लोहा, जि. नांदेड) येथील ढगे पाटील फार्म हाऊस येथे सुरू असलेल्या दहा दिवसीय रेशीम प्रशिक्षण कार्यक्रमाला दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महिला शेतकरी गट, शेतकरी गट तसेच प्रशिक्षणार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) कृषि व जलसंसाधन विभागातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवकुमार व्यास उपस्थित होते.

पुढे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, आपल्याला उद्योजक बनायचे असेल, तर शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन ते केवळ बाजारात विकण्याऐवजी त्यापासून धागा, वस्त्रे आणि विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली पाहिजेत. संपूर्ण मराठवाड्यातील रेशीम उत्पादन एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारण्याची क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे.

विशेषतः महिला शेतकऱ्यांनी रेशीमपासून पैठणीसारखी पारंपरिक आणि उच्च मूल्याची वस्त्रे तयार करण्याच्या दिशेने पुढे यावे. यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी धान्य, भाजीपाला आणि विविध पिकांचे उत्पादन घेतो; मात्र त्याला समाधानकारक भाव मिळत नाही. दुसरीकडे ग्राहकांनाही तोच माल अधिक किमतीत खरेदी करावा लागतो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही समाधान होत नाही. यामागे बाजारपेठेतील मध्यस्थांची साखळी हे प्रमुख कारण असल्याचे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल शक्य तितका थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी शेतकरी गट, महिला गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सायाळ हे प्रगतिशील गाव असून लोहा तालुका लोहासारखाच मजबूत आहे. मी सायाळ येथे आतापर्यंत तीन वेळा आलो असून प्रत्येक वेळी शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्यांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे मला विशेष आवडते. मराठवाड्यातील शेतकरी एकमेकांना सोबत घेऊन पुढे जातात, याचा मला मनापासून अभिमान आहे, असे गौरवोद्गार माननीय कुलागुरुनी काढले.

शेतकऱ्यांना एकत्रित करून प्रशिक्षण देणे, त्यांना विद्यापीठाशी जोडणे तसेच कृषी विभाग आणि विद्यापीठातील उपलब्ध तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे - पाटील  यांच्यासारख्या प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांची जिल्ह्याला आणि तालुक्याला गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘‘तू आणि ती’’ दोघेही एकत्र आले, तर कोणतीही क्रांती घडवून आणता येते. महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास रेशीम शेतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणता येईल. मराठवाड्यातील महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या रेशमापासून स्वतःची साडी तयार करावी, ही संकल्पना मला विशेष आवडेल, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

यासाठी मराठवाड्यातील महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून रेशीमपासून वस्त्रनिर्मिती, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ या विषयांवर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नवनवीन तंत्रज्ञान, नवीन पिके तसेच अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये विविधता आणणे आणि उत्पादनाबरोबरच बाजारपेठेचाही विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू यांचे ढगे पाटील फार्म हाऊस येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा, सायाळ येथील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून त्यांचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागताचे माननीय कुलगुरूंनी कौतुक केले. पूर्वी महिलांना शिक्षणाच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत्या; मात्र आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सुमारे ६० टक्के विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. हे बदलत्या भारताचे सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

यावेळी रेशीम कार्यालयाचे श्री. अभय कुलकर्णी, परिसरातील प्रगतिशील शेतकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकरी महिला गट, कृषीप्रधान ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, प्रशिक्षक शिवप्रसाद माळवटकर, व्यंकटराव ढगे, संभाजी ढगे, सुदाम पाटील ढगे, मदन पाटील ढगे, ज्ञानोबा हौसाजी जामगे, डी. जी. जामगे, बालाजी जामगे, चांदोजी जामगे, ज्ञानोबा येवले, पवन किरवले, मनोज जाधव, अर्जुन पवार, काशिनाथ जामगे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.