Wednesday, June 17, 2026

वनामकृवितील कृषि महाविद्यालयाच्या रावे उपक्रमाद्वारे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

 मातीचे आरोग्य सुदृढ तरच शेती, पशुधन व मानवाचे आरोग्य निरोगी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम – रावे (RAWE) आणि औद्योगिक संलग्नता २०२६ या उपक्रमांतर्गत तसेच अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या खेत बचाओ अभियान’ या देशव्यापी कार्यक्रमांतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम दि. १७ जून २०२६ रोजी मौजे उजळंबा (ता. जिल्हा परभणी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एल निनोचा प्रभाव, आकस्मिक पीक नियोजन तसेच खेत बचाओ अभियान याविषयी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी खेत बचाओ अभियान’ चे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. मृदेचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ज्याप्रमाणे बालिका आणि महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंब व देशाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य चांगले राहिल्यास मातीतून अंकुरित होणाऱ्या पिकांचे तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पशुधन आणि मानवाचे आरोग्य सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्यामुळे अन्नदाता शेतकरी हा संपूर्ण ब्रह्म आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे नुकसान कसे टाळावे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित होऊ शकते. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, जलसंधारण तसेच आकस्मिक पीक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी बीबीएफ (Broad Bed Furrow - रुंद सरी वरंबा) तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्याचा सल्ला दिला. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि कमी पावसाच्या परिस्थितीत ओलावा टिकून राहतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी मृदा स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, जमिनीचा पोत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब (जैव कार्बन) वाढविणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी रसायनांचा अतिरिक्त वापर टाळून सेंद्रिय खते, शेणखत आणि कंपोस्टचा नियमित वापर करावा. त्यामुळे जमिनीची उर्वरता वाढते. एल निनोच्या संकटाच्या काळात मृदा स्वास्थ्य राखणे आणि रसायनांचा संतुलित वापर करणे हे टिकाऊ शेतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष उपस्थिती असलेले विद्यापीठ रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी रावे अंतर्गत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. उजळंबा गावचे सरपंच श्री. विठ्ठलजी धोतरे आणि उपसरपंच श्री. स. मेहताब स. ईसाक यांनी ग्रामस्थांना खेत बचाओ मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कोरडवाहू शेतीमध्ये एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि योग्य पीक पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.

विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कीड व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानात पिकांवर पडणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कसा रोखावा याविषयी मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्स व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून दुष्काळी परिस्थितीत पिकांची तग धरण्याची क्षमता कशी वाढते यावर माहिती दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा) डॉ. गणेश गायकवाड यांनी माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ प्रा. धनंजय मोहोड यांनी रेशीम उद्योग व तुती लागवडीबाबत माहिती देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमास रावे टास्क फोर्स प्रमुख डॉ. गोदावरी पवार तसेच कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती के. डी. चांदणे यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळंबा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम (RAWE) अंतर्गत शिक्षण घेत असलेले कृषिदूत ची. जयंत भास्कर, मनीष बिष्णोई आणि नरेंद्र बंसिवाल यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांना श्री. प्रभाकर मोगले यांनी सहकार्य केले. या शेतकरी संवाद कार्यक्रमास उजळंबा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Tuesday, June 16, 2026

वनामकृविद्वारा एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम नियोजन विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे  गरजेचे.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन” या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जून २०२६ रोजी करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी  सांगितले की, यावर्षी मोसमी पावसाची परिस्थिती अनिश्चित असून शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये. पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे हितावह राहील. हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, सेंद्रिय खते, जिवाणू खते, हिरवळीची खते यांचा अधिकाधिक वापर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच जमीन व हवामानाच्या प्रकारानुसार योग्य पीक व पीक पद्धतीची निवड करणे, खतांवरील आणि  एकूण लागवडीवरील खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य हवामान जोखमीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रुंद वरंबा-सरी (Broad Bed and Furrow) पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. खेत बचाव अभियान कार्यक्रमातून खतांचा कमी आणि काटेकोर वापर यावर भर देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

अशा कार्यक्रमात  शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे  गरजेचे असून त्यातून अनेक शंकांचे निरसन होऊन योग्य निर्णय घेण्यास अनेक शेतकरी बंधू भगिनी यांना मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी एल निनो परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उताराला आडवी पेरणी, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, तसेच कमी कालावधीची वाण निवडण्याचा सल्ला दिला. पाऊसाचे आगमन ७ जुलै पर्यंत झाल्यास मग उडीद सोयाबीन कपाशी अशी सर्वच पिके घेता येतील. पावसास थोडा उशीर झाल्यास मुग, उडीद आणि भुईमूग या पिकांऐवजी कापशी, तूर, बाजरी, सोयाबीन सूर्यफूल ही पिके आणि आंतरपीक पद्धतीत पिके  घ्यावीत आणि अधिक उशीर झाल्यास तूर,  बाजरी, विविध आंतरपीक पद्धती जसे  एरंडी अधिक धने,  यांसारख्या कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय शेत तळे आणि इतर प्रकारे केलेले जल संधारण यातील पाणी पावसाच्या खंड काळात काटेकोर पणे संरक्षित सिंचन म्हणून वापरावे.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. पीक नियोजन, वाण निवड, खत व्यवस्थापन, पावसातील अनिश्चितता, आंतरपीक पद्धती आणि जलसंधारण उपाययोजना यासंदर्भातील प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषी विभाग अधिकारी कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तसेच डॉ. एम. दीन, डॉ. जी. के. गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी बांधवांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रशुद्ध पीक नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी, कृषी तज्ज्ञ व कृषी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.







वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ‘स्पर्धा मंच’चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात संपन्न

 ध्येय, शिस्त आणि परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व यशस्वी करिअर घडविण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘स्पर्धा मंच, परभणी’ चा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन वैद्यनाथ वसतिगृह परिसरात दिनांक १६ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत तसेच स्पर्धा मंचचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके, उपाध्यक्ष रोहित मोरे, सचिव मारोती सूर्यवंशी व सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र सांगताना, ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. अपयश हे यशाच्या प्रवासातील एक पाऊल मानून विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी अखंड प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. स्पर्धा मंचच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे ५०० हून अधिक अधिकारी घडल्याबद्दल त्यांनी मंचाचे विशेष कौतुक केले आणि ही परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांनी आयसीएआर, एआरएस, नेट, गेट तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्याने अभ्यास करावा, असे सांगितले. कृषि क्षेत्रात संशोधक, कृषि शास्त्रज्ञ, कृषि अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून उज्ज्वल करिअर घडविण्याच्या संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी स्पर्धा परीक्षांमधील बदलत्या प्रवाहांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि वेळेचे व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांच्या निवास व अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत, अलीकडेच करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि उपक्रमांचा आढावा सादर केला.

या स्पर्धा मंचचेपहिले अध्यक्ष सध्या विद्यापीठात कार्यरत असलेले शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ.किरण जाधव हे  होते. याप्रसंगी त्यांनीही सुरुवातीचा इतिहास सांगून मागदर्शन केले.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा मंचच्या वतीने माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक व अन्य मान्यवरांचा विद्यापीठासाठी नवीन आकृतिबंधाअंतर्गत अतिरिक्त पदांना मंजुरी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी वैद्यनाथ वसतिगृहातील उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सकारात्मक शैक्षणिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.

गेल्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना स्पर्धा मंचच्या कार्यकर्त्यांनी मंचाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविध उपक्रमांची, यशोगाथांची आणि प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंचाच्या भावी वाटचालीसाठी अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सिद्धेश्वर हत्ते यांनी केले. प्रास्ताविकात स्पर्धा मंचचे अध्यक्ष रोहित कुडके यांनी मंचाच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला, तर उपाध्यक्ष रोहित मोरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि यशस्वी करिअर घडविण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचे वातावरण कार्यक्रमभर अनुभवास आले.



वनामकृवि व महाबीज यांच्यात ‘चिया’ वाण विकासासाठी सामंजस्य करार

संशोधन, उत्पादन आणि व्यापारीकरणाच्या समन्वयातून शेती विकास शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांच्यात चिया (Salvia hispanica L.) या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी दिनांक १५ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत, उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्रात चिया पिकाखालील क्षेत्र सातत्याने वाढत असताना प्रमाणित बियाण्यांची मागणीही वाढत आहे. मात्र अधिकृत सुधारित वाण उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक आणि कमी गुणवत्तेच्या बियाण्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून विद्यापीठ आणि महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून पांढऱ्या व काळ्या बियांच्या उच्च उत्पादनक्षम चिया वाणांच्या विकासासाठी संशोधन सुरू करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत विविध हवामान परिस्थितींमध्ये बहुस्थळी संशोधन चाचण्या, उत्पादन क्षमता व गुणवत्ता परीक्षण, रोग व किडींचे निरीक्षण, तांत्रिक अहवाल तयार करणे तसेच आशादायी वाणांचे बीज उत्पादन आणि व्यापारीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यापीठ संशोधन, मूल्यांकन व शिफारसी विकसित करेल, तर महाबीजकडून बीज उत्पादन, प्रसार, प्रात्यक्षिके आणि विक्रीची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.

या करारामुळे चिया पिकासाठी राज्यात प्रथमच अधिकृत वाण विकसित होण्यास चालना मिळणार असून उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होणार आहे. संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील हे सहकार्य कृषी क्षेत्रासाठी नवे संधी निर्माण करणारे ठरणार आहे. हा करार पुढील पाच वर्षांसाठी वैध राहणार असून संयुक्त मालकी हक्क, गुणवत्ता नियंत्रण, बीज परवाना आणि व्यापारीकरणाच्या बाबी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

हा करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विभाग प्रमुख तथा उपसंचालक संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री जगदीशसिंग खोकड, जिल्हा व्यवस्थापक श्री रज्जाक शेख यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी देवो भवः’ हा मूलमंत्र देत कृषी संशोधन संस्थांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचे लाभ अंतिम घटक असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कृषी क्षेत्रातील प्रगती ही संशोधन, उत्पादन, विस्तार यंत्रणा आणि व्यापारीकरण यांच्यातील सशक्त समन्वयातून तसेच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देण्यामधून साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठ आणि महाबीज यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादनक्षमता वृद्धिंगत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही संस्थांनी समर्पित भावनेने कार्य करून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या निमित्ताने महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांनी विद्यापीठ परिसराला भेट दिली. विशेष म्हणजे श्री. स्वामी हे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी १९८९ मध्ये बी.एस्सी. (कृषी) तसेच १९९१ मध्ये कृषी अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या पुनर्भेटीमुळे विद्यापीठ परिवारात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामंजस्य करारावरती विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तर महाबीजच्या वतीने गुणनियंत्रण आणि संशोधनाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी एस लहाने यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी संशोधनाधारित नवीन वाणांचा प्रसार, बीज उत्पादन साखळी मजबूत करणे आणि शेतकरी हितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान महाबीजच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प, बियाणे उत्पादन केंद्रे तसेच बायोमिक्स संशोधन व प्रक्रिया केंद्राची पाहणी करून विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधन कार्याचे विशेष कौतुक केले. या सहकार्यामुळे विकसित तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





Sunday, June 14, 2026

वनामकृविच्या पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेद्वारे खेत बचाव अभियानांतर्गत नैसर्गिक शेती व बैलचलित सुधारित अवजारांचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी  यांच्या नेतृत्वात देशभर राबविण्यात येत असलेल्या खेत बचाओ अभियान” अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजना) यांच्या वतीने मौजे इट, ता. गेवराई, जि. बीड येथे गुगळा देवी ऑरगॅनिक फार्मिंग शेतकरी गटामार्फत शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ व संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केली.

कार्यक्रमामध्ये योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या विविध बैलचलित सुधारित कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

मार्गदर्शन करताना संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी सांगितले की, शेतामध्ये उपलब्ध पशुधनापासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या गांडूळ खताचा वापर वाढवून रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसेच योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित बैलचलित अवजारांचा वापर केल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होऊन शेतीचा उत्पादन खर्च कमी करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गुगळा देवी शेतकरी गटाचे प्रमुख श्रीरामप्रसाद डोईफोडे यांच्यासह गटातील सर्व शेतकरी सभासद उपस्थित होते. तसेच योजनेचे पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे आणि टेक्निशियन श्री मंगेश खाडे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित अवजारांचा वापर केल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यात मदत झाली असून नैसर्गिक शेती पद्धती अवलंबण्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्याचे अनुभव व्यक्त केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली, अशी माहिती आयोजकांनी दिली.










खेत बचाव अभियानांतर्गत राणीसावरगाव येथे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या खेत बचाओ अभियान” अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजना) यांच्या वतीने मौजे राणीसावरगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे दिनांक १२ जून २०२६ रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केली.

या कार्यक्रमामध्ये योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध बैलचलित सुधारित कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना भेट देण्यात आली. गोशाळेमध्ये गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणारे शेणखत, गो-अमृत यांसारख्या सेंद्रिय उत्पादनांचा शेतीमध्ये वापर करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करावे, असे प्रतिपादन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. तसेच योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित बैलचलित अवजारांचा वापर करून इंधनावरील खर्च कमी करता येतो व शेती अधिक किफायतशीर बनविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेचे संचालक श्री शिवदास कोरे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे, टेक्निशियन श्री मंगेश खाडे तसेच राणीसावरगाव येथील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या अवजारांचा वापर केल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मोठी मदत होत असल्याचे आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांमध्ये शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.





संतुलित खत वापर व खरीप पीक व्यवस्थापनाबाबत वनामकृवित शेतकरी जागरूकता कार्यक्रम

 

बदलते हवामान, जमिनीचे खालावत चाललेले आरोग्य, वाढता लागवड खर्च तसेच रासायनिक निविष्ठांच्या अयोग्य वापराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापर, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA) यांच्या वतीने दिनांक ८ जून २०२६ रोजी “संतुलित खत वापर व खरीप पिकांचे व्यवस्थापन” या विषयावर विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉकवर एकदिवसीय शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. परिसरातील अनेक शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाढते उत्पादन खर्च, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमिनीची घटती सुपीकता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे संतुलित खत व्यवस्थापन व सुधारित शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच एल-निनोच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संतुलित खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. रासायनिक खतांचा अतिरेक जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जैविक खतांचा समावेश आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर डॉ. तेजस्विनी कच्छ्वे यांनी सेंद्रिय शेती आणि मृदा आरोग्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व जैविक घटकांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. शेणखत, गांडूळखत, हिरवळीची खते आणि जैविक खतांचा नियमित वापर केल्यास जमिनीची सुपीकता, जलधारण क्षमता आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे त्यांनी सांगितले.

श्री. सुरेश खटिंग यांनी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व विशद केले. हवामान बदलामुळे निर्माण होणारी जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धती, पशुपालन, फळबाग, कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी खरीप पीक नियोजन, खत व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, सेंद्रिय खतांचे प्रमाण आणि कोरडवाहू शेतीतील विविध तांत्रिक बाबींविषयी प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्यासह डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. तेजस्विनी कच्छ्वे आणि श्री. सुरेश खटिंग यांनी विशेष परिश्रम घेतले. संतुलित खत वापर, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.