बुलढाणा
जिल्ह्यातील नांदुरा तालुक्याच्या मौजे खैरा या गावातील प्रगतशील शेतकरी गटाने दिनांक
८ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे भेट देऊन विद्यापीठातील विविध कृषि
तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या शेतकरी गटाने सकाळी सुरवातीला माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट घेतली.
यावेळी माननीय
कुलगुरूंनी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या
शेतीतील अनुभव, अडचणी, पिकांची स्थिती तसेच विद्यापीठाकडून अपेक्षित असलेल्या तंत्रज्ञान व
मार्गदर्शनाबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनीही आपल्या भागातील शेतीविषयक विविध प्रश्न
माननीय कुलगुरूंसमोर मांडले. शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यातील थेट संवादातून कृषि
संशोधनाचा प्रत्यक्ष शेतापर्यंत उपयोग व्हावा, यावर यावेळी
भर देण्यात आला.
शेतकरी हा कृषि
विद्यापीठाच्या कार्याचा केंद्रबिंदू असून,
विद्यापीठातील संशोधन व तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर
पोहोचले पाहिजे, या भावनेतून माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांशी
केलेला हा संवाद विशेष ठरला. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा व
त्यांच्या प्रश्नांना जाणून घेण्याचा आनंद झाल्याची भावना माननीय कुलगुरूंनी
व्यक्त केली.
यानंतर शेतकरी
गटास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या विस्तार शिक्षण गटामार्फत विद्यापीठात
विकसित करण्यात आलेले विविध शेतकरी उपयोगी तंत्रज्ञान, संशोधन केंद्रांमार्फत विकसित वाण व
तंत्रज्ञान तसेच शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर
माहिती देण्यात आली. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर दत्तात्रय पटाईत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी
विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कापूस,
हळद, सोयाबीन आदी पिकांमधील कीड व रोग
व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच कापूस पिकामध्ये फवारणी
करताना येणाऱ्या अडचणी याबाबत डॉ. पटाईत यांनी शास्त्रीय पद्धतीने सविस्तर
मार्गदर्शन केले.
भेटीदरम्यान
शेतकरी गटाने कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनीस भेट देऊन विद्यापीठाने
विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या
विविध वाणांबाबत माहिती घेतल्यानंतर आपल्या भागात या वाणांची लागवड करण्याचा मनोदय
शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाने विकसित केलेले ‘बायोमिक्स’ हे उत्पादन आपण हळद व इतर
फळबागांमध्ये वापरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी
गटाचे प्रमुख तथा प्रगतशील शेतकरी श्री. रवींद्र मापारी यांनी सर्व शेतकऱ्यांच्या
वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू तसेच विद्यापीठातील तज्ज्ञांचे आभार व्यक्त
केले. चिंचोली, ता. जिंतूर येथील
प्रगतशील शेतकरी श्री. किशनराव मोरे यांचीही यावेळी उपस्थिती होती. विद्यापीठातील
तज्ज्ञांकडून मिळालेल्या शास्त्रीय, उपयुक्त आणि
शेतकरी-केंद्रित मार्गदर्शनाबद्दल शेतकरी गटाने समाधान व्यक्त केले.





.jpeg)



.jpeg)
.jpeg)



.jpeg)



.jpeg)
.jpeg)

.jpeg)



.jpeg)










.jpeg)