Thursday, August 6, 2026

माननीय राज्यमंत्री नामदार ॲड श्री. आशिष जायस्वाल यांची वनामकृविच्या बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट व पाहणी

 महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर (जि. जालना) येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी सदिच्छा भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा तसेच कृषि प्रदर्शन स्टॉलची पाहणी केली.

यावेळी माननीय राज्यमंत्र्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील बायोमिक्स प्रयोगशाळेत भेट देऊन तेथे तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक उत्पादनांची तसेच त्यांच्या उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. केंद्रामार्फत उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध द्रवरूप जैविक खतांचे दर, गुणवत्ता व उत्पादन प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. जैविक खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता व आरोग्य सुधारते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटून नफा वाढण्यास मदत होते, या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यानंतर त्यांनी माती आरोग्य पत्रिका तयार करण्याची प्रक्रिया व अन्नद्रव्य व्यवस्थापनासंदर्भातील कामकाजाची पाहणी केली. कृषि प्रदर्शन स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आलेली विविध जैविक उत्पादने, विस्तार साहित्य व आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेत त्यांनी ही उत्पादने व तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील जंगली पिकांच्या जातींच्या संवर्धनासाठी विकसित करण्यात आलेल्या बागेलाही भेट दिली. तसेच त्यांनी संशोधन केंद्रामार्फत विकसित करून शेतकऱ्यांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारित वाणांची माहिती त्यांनी जाणून घेतली. विशेषतः तूर पिकातील 'गोदावरी' वाण तसेच हरभरा पिकातील 'परभणी चणा-१६' या वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. तसेच तूर, मुग व उडीद या पिकांच्या जंगली जातींचे संवर्धन, त्यांचे जनुकीय महत्त्व आणि भविष्यातील वाण विकासामधील योगदान याविषयीही त्यांनी माहिती घेतली.

भेटीदरम्यान माननीय राज्यमंत्र्यांनी कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून कृषि संशोधन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान तसेच कृषि क्षेत्रातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुर्यकांत पवार, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिनकुमार सोमवंशी, विषय विशेषज्ञ डॉ. सचिन धांडगे (पीक संरक्षण, डॉ. राहुल कदम (विस्तार शिक्षण), डॉ. दिपाली कांबळे कृषिविद्या, प्रा. फारुक तडवी (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मा. राज्यमंत्र्यांना विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. विष्णू गीते, डॉ. प्रशांत पगार, डॉ. नितीन पतंगे तसेच इतर शास्त्रज्ञ व कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.








वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकारीणी सदस्यांची बैठक

माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांची प्रमुख उपस्थिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माजी विद्यार्थी हे विद्यापीठाचे खरे दूत असून, त्यांच्या अनुभव, ज्ञान आणि कौशल्याचा लाभ विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला मिळणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि उद्योजकता, नवोपक्रम, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच उद्योग–विद्यापीठ सहकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे संघटन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, संशोधन सहकार्य तसेच समाजाभिमुख उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी कृषि आयुक्त व स्मार्ट (SMART) प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.), प्रा. रामभाऊ घाटगे, माजी कार्यकारी परिषद सदस्य श्री. अनंतराव चोंदे, कृषि उद्योजक श्री. महेश पी. देशमुख, माजी विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील कार्यरत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी विविध विधायक सूचना मांडल्या. भविष्यात माजी विद्यार्थ्यांचे व्यापक आणि प्रभावी जाळे उभारून विद्यार्थी, संशोधक आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










मराठवाड्यात देशी बीज संवर्धनाला नवी दिशा; वनामकृवित बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेचा शुभारंभ

देशी वाणांचे जनुक संवर्धक शेतकरी हे समाजाचे, देशाचे खरे मित्र – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

मराठवाड्यात देशी बीज संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची गरज - माजी कृषी आयुक्त माननीय डॉ. उमाकांत दांगट (से.नि.भा.प्र.से.)

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी कृषी आयुक्त माननीय डॉ. उमाकांत दांगट (से.नि.भा.प्र.से.)

महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) च्या संचालक पूनम पाटे  (भा.व.से.)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय "मराठवाडा बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेचा” उद्घाटन समारंभ दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७५ हून अधिक बीज संवर्धक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन ६ व ७ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात करण्यात आले. तसेच यानिमित्त मराठवाड्यातील बीज संवर्धक शेतकऱ्यांच्या विविध जनुकाचे प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध दहा तांत्रिक सत्राच्या माध्यमातून शेतकरी, विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि मंडळाचे तसेच बायफ संस्थेच्या अधिकाऱ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, देशी वाणांचे जनुक संवर्धन करणारे शेतकरी हे महाराष्ट्राचे, देशाचे आणि समाजाचे खरे मित्र आहेत. वाढत्या मानवी गरजा आणि संसाधनांच्या अतिरेकी वापरामुळे गेल्या शतकात जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. जैवविविधतेचे संशोधन, संकलन, जतन, संवर्धन आणि प्रसार करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या कार्यात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठ परिसरही जैवविविधतेने समृद्ध असून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनस्पती, पशुधन आणि मत्स्य संपदेतील जनुकीय विविधतेचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. विद्यापीठाचे लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने या क्षेत्रात कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माजी कृषि आयुक्त तथा स्मार्ट प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉ. उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांनी देशी बीज संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय असल्याचे सांगितले. निसर्गाने निर्माण केलेली जैवविविधता मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आली असून "जगा आणि जगू द्या" ही संकल्पना स्वीकारून जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मराठवाड्याचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेतकरी स्वतः उत्कृष्ट बियाण्यांची निवड व संवर्धन करत असत, ती परंपरा पुन्हा सुरू करून उत्पादन खर्च कमी करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकरी हेच खरे देशी बीज संवर्धक शास्त्रज्ञ असल्याचे सांगितले. हवामान बदलामुळे पर्जन्यमानातील अनिश्चितता वाढत असून अशा परिस्थितीत देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यापीठाच्या लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामार्फत जनुक संवर्धनाचे कार्य सुरू असून विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी दहा केंद्रांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती त्यांनी दिली. जैवविविधतेचे संवर्धन हे शाश्वत शेती, पोषण सुरक्षा आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) च्या संचालक  पूनम पाटे (भा.व.से.) यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्याचा परिचय करून दिला. जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कार्याचा उल्लेख करत देशी बियाणे हीच आपली खरी ओळख आणि भविष्यातील अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प अधिकारी श्री. रवींद्र वानखडे (से.नि.भा.व.से.) यांनी मंडळाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांचा आढावा घेत कार्यशाळा बीज संवर्धन चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव यांनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला असला तरी जैवविविधतेच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष गेले नसल्याची खंत व्यक्त केली. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बायफतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

बायफचे संशोधक श्री संजय पाटील यांनी देशी बियाणे हे शेतीचा आत्मा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करून त्यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जनुकीय विविधता, जीआय मानांकन प्राप्त पिकांचे संवर्धन आणि देशी वाणांच्या साठवणूक तंत्रज्ञानावर कार्यशाळेत सखोल विचारमंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभागीय वनाधिकारी रूपाली सावंत यांनी केले. 


संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार
प्रकल्प अधिकारी श्री. रवींद्र वानखडे (से.नि.भा.व.से.)
बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव
बायफचे संशोधक श्री संजय पाटील



वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास भेट; भविष्यातील विकासासाठी दिले मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्यातील वनामकृविच्या मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर येथे दिनांक ५ ऑगष्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध संशोधन उपक्रम, प्रायोगिक क्षेत्रे, रोपवाटिका तसेच मोसंबी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याची पाहणी केली. बदनापूर येथील हे संशोधन केंद्र विद्यापीठाच्या प्रमुख संशोधन केंद्रांपैकी एक असून त्याची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली आहे.

यावेळी माननीय कुलगुरूंनी संशोधन केंद्रातील रोपवाटिका, दर्जेदार रोपनिर्मिती, सुधारित मोसंबी वाणांचे संवर्धन, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधन परिणामांच्या प्रभावी प्रसाराबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांनी संशोधक व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना मोसंबी उत्पादनातील गुणवत्ता वाढ, हवामान बदलाशी सुसंगत संशोधन, रोग व कीड व्यवस्थापन, जलकार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची लागवड सामग्री निर्मिती तसेच शेतकरी-केंद्रित संशोधनाला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात मोसंबी संशोधन केंद्र हे देशातील एक उत्कृष्ट संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

भेटीदरम्यान बदनापूर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ दीपक पाटील, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप,  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्रात राबविण्यात येणारे विविध संशोधन प्रकल्प, उपलब्धी आणि आगामी विकास आराखड्याची माहिती माननीय कुलगुरूंना सादर केली. संशोधन केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने सहकार्य मिळेल, असा विश्वासही माननीय कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला.





Wednesday, August 5, 2026

पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धतीवर वनामकृविचा वेबिनार उत्साहात संपन्न

 शेतीला पूरक व्यवसाय स्वीकारून जोखीम कमी करावी : संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

शेतीसमोरील वाढती आव्हाने, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील अस्थिरता यावर शाश्वत उपाय शोधण्याच्या उद्देशाने "पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धती" या विषयावर विशेष ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. हा वेबिनार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक  ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार प्रमुख उपस्थित म्हणून सहभागी झाले.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट आणि उत्पादन खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. शेतीला पूरक व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू शकतात तसेच जोखीम कमी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

मुख्य वक्ते डॉ. आनंद कारले, माजी मुख्य कृषिविद्यावेत्ता व प्रभारी अधिकारी, अभ्यास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांनी पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीची संकल्पना, शेतीपुढील सध्याची आव्हाने, शाश्वत शेतीचे विविध प्रकार, एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व, कृषीपूरक व्यवसाय तसेच एक हेक्टर एकात्मिक शेती मॉडेलचे अर्थशास्त्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, फळबाग, भाजीपाला उत्पादन व इतर पूरक व्यवसायांचा समन्वय साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची घट आणि उत्पादन खर्चात वाढ यांसारख्या सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. शेतीला पूरक व्यवसायांचा अवलंब करून शेतकरी उत्पन्नात स्थैर्य आणू शकतात तसेच जोखीम कमी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी सौ. मीरा जगदाळे (आपटी, जि. अहिल्यानगर) यांनी एकात्मिक शेतीचा स्वतःचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. भाजीपाला, डाळी, फळपिके, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांचा समन्वय साधून त्यांनी आपल्या शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अनुभवामुळे सहभागी शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धतीचा प्रत्यक्ष लाभ समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले. डॉ. आनंद गोरे यांनी समन्वयक, तर डॉ. मीनाक्षी पाटील यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रीतम भुतडा यांनी आभार मानले.

या वेबिनारमध्ये राज्यभरातील शेतकरी, कृषी विद्यार्थी, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक तसेच कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

'स्वच्छता पंधरवडा' आणि 'नशामुक्ती अभियान' निमित्त लिहाखेडी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; स्वच्छता, निर्व्यसनता व वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

 कृषि शिक्षणासोबत आदर्श गुणांची जोपासना करा : शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे

कृषि शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आदर्श गुण, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची जोपासना करावी. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेची सवय अंगीकारून पूर्णतः निर्व्यसनी जीवन जगावे, तसेच किमान पाच झाडे लावून त्यांचे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. ते दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषि महाविद्यालयात 'स्वच्छता पंधरवडा' आणि 'नशामुक्ती अभियान' अंतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, आज देशात आणि राज्यात व्यसनाधीनतेमुळे अनेकांची जीवने उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. व्यसन ही समाजाला लागलेली घातक कीड असून तिचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. नशा ही शेवटी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे नुकसान करते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल, तर तिला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

याबरोबरच ते म्हणाले की, विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख कार्ये असली तरी आदर्श कृषि पदवीधर घडविणे हेच विद्यापीठाचे अंतिम ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित कृषि व्यावसायिक घडविण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक उत्तरदायित्वही जोपासावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी आणि सुदृढ जीवनशैली स्वीकारून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.

विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाचे कृषि महाविद्यालय स्थापन करण्यामागील विद्यापीठ व शासनाची भूमिका स्पष्ट केली. या प्रक्रियेत प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रशासकीय स्तरावर मोलाचे सहकार्य केल्यामुळेच महाविद्यालयाच्या उभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. सचिन मोरे, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. कलालबंडी, डॉ. दत्ता मुळे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष बागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष ढगे यांनी केले.

कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे तसेच कृषि विज्ञान केंद्रातील डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजुला भावर, डॉ. बसवराज पिसुरे यांच्यासह उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.





वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाच्या स्वच्छता पंधरवडा उपक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; व्यसनमुक्त जीवनाचा दिला संदेश

 


विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने दोन महत्त्वाच्या बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पहिली म्हणजे स्वतःच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी, तर दुसरी म्हणजे पूर्णतः निर्व्यसनी जीवनशैलीचा स्वीकार. स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त विद्यार्थीच भविष्यात सुदृढ, सुसंस्कृत आणि प्रगत समाज घडविण्यात प्रभावी योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.ते

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमानिमित्त राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP) येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते कृषी पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

पुढे त्यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ अभियान नसून जीवनशैली आहे, तर निर्व्यसनता ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये जोपासली, तर विकसित भारताच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहील. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी पंजाब नॅशनल बँक आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, कृषी उद्योजकता, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव, तसेच कृषी उद्योग उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर माननीय कुलगुरूंनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. बीजोत्पादन कार्यक्रम, जैविक कीडनियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेली जैविक औषधे, जैवखते, ट्रायकोकार्ड निर्मिती, तसेच शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या विविध संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दीप्ती पाटगावकर, प्रा. दत्तात्रय मुळे, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. आशिष बागडे, डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे, डॉ. रामेश्वर ठोंबरे तसेच अधिकारी, वैज्ञानिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.