Sunday, July 26, 2026

वनामकृवित ‘सिल्क अँड मिल्क’ कार्यशाळा; २१ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ अभियानाचा शुभारंभ

 


वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना, , कृषि विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय आणि अग्रणी बँक, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिल्क अँड मिल्क’ शेतकरी कार्यशाळा दिनांक २६ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस परभणी जिल्ह्यातील ६०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बाल्य व प्रौढ रेशीम कीटक संगोपन तंत्रज्ञान, तुती लागवड तंत्रज्ञान, उझी माशी व्यवस्थापन, रेशीम उद्योगासाठीच्या विविध शासकीय योजना तसेच दुग्ध व्यवसाय वृद्धीविषयी तज्ज्ञ आणि अनुभवी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटक तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय  ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ हा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तुती लागवडीपासून रेशीम कोष उत्पादन आणि वस्त्रनिर्मितीपर्यंतचा संपूर्ण रेशीम हब परभणी जिल्ह्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी रेशीम उत्पादनासाठी आधुनिक बाजारव्यवस्था विकसित करणे, रेशीम वस्त्रनिर्मितीस चालना देणे, ‘रेशीम भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणे तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत ‘सिल्क अँड मिल्क’साठी स्वतंत्र योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेती आणि दुग्धव्यवसायाची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. “रेशीम शेतीची आस धरा, लक्ष्मी येईल तुमच्या घरा” या संकल्पनेवर आधारित ‘सिल्क विथ मिल्क’ हे मॉडेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास माननीय पालकमंत्री यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणारा आणि रोजगारनिर्मितीस चालना देणारा प्रभावी पूरक व्यवसाय असल्याचे सांगितले. बदलत्या कृषि परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत रेशीम व्यवसायाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे विविधीकरण करत आर्थिक स्वावलंबन आणि शाश्वत प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक यांना ‘सिल्क अँड मिल्क’ प्रकल्पांतर्गत पात्र शेतकऱ्यांना आवश्यक वित्तीय सहाय्य वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी कर्ज मंजुरी व वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याचे आवाहन केले. शेतकरी, विद्यापीठ, बँका आणि विविध शासकीय संस्थांमधील समन्वयातून हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण(भाप्रसे) यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांमधून वर्षातून एकदाच उत्पन्न मिळते आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यात नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, रेशीम उद्योगामध्ये वर्षभरात ८ ते ९ कोषपिके घेता येत असल्यामुळे अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासोबत दुग्ध व्यवसायही स्वीकारावा. परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’मुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी नमूद केली.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वरराव यांनी बँकेच्या कर्जवाटप धोरणाविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे), संशोधन संचालक  डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक  डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रादेशिक प्रबंधक, एसबीआय श्री. दिनेश झा, श्री. शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटिंग व श्री. रामचंद्र अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अभियानाची माहिती केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ-‘डी’ श्री. अशोक जाधव यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) -२.० योजनेची घडीपत्रिका प्रकल्प संचालक (आत्मा), परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली. ग्लोबल विकास ट्रस्टचे श्री. मुक्तेश्वर कडभाने यांनी ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदान योजनांची माहिती दिली.

यावेळी सिल्क अँड मिल्क’ या संकल्पनेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच २१ प्रगतशील शेतकऱ्यांना माननीय पालकमंत्री महोदया व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. रेशीम उद्योगाच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त रेशीम शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांना सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ संकल्पनेच्या विस्तारासाठी योगदान दिल्याबद्दल श्री. सुनील हट्टेकर, श्री. गोविंद कदम आणि श्री. शंकर वराट यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात जैविक पद्धतीने रेशीम कीटकांवरील नुकसानकारक उझी माशी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल रेशीम संशोधन योजनेचे डॉ. संजोग बोकन व श्री. धनंजय मोहोड यांना केंद्रीय रेशीम बोर्ड आणि रेशीम संचालनालयातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक (रेशीम), छत्रपती संभाजीनगर डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सुनील हट्टेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सागर मिसाळ, श्री. रमेश इक्कर, श्री. दत्ता जटाळे, श्री. परमेश्वर भंडारे आणि श्री. व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले.














Saturday, July 25, 2026

वनामकृविद्वारा नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटरसाठी अवजारांचे वितरण

 वनामकृवि - श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिंडोरी) यांचा संयुक्त उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP) – पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रणीत, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिनांक २४ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात वृक्षारोपण, सुधारित शेती अवजारे संग्रहालयाचे उद्घाटन तसेच सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम,  संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे, संशोधन शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते नारळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या सुधारित शेती अवजारे संग्रहालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या संग्रहालयात पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फवारणी, प्लास्टिक आच्छादन, उसास माती चढविणे तसेच काढणीपर्यंतच्या विविध शेती कामांसाठी विकसित करण्यात आलेली एकबैल व दोनबैल चालित सुधारित शेती अवजारे आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्रत्येक अवजारासमोर त्याची वैशिष्ट्ये, उपयोग, तांत्रिक माहिती व छायाचित्रांसह माहितीफलक लावण्यात आले आहेत. संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करत हे संग्रहालय शेतकरी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर सामंजस्य करारानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या कस्टम हायरिंग सेंटरसाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते कृषिरत्न श्री. आबासाहेब मोरे यांच्याकडे सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.

वितरित करण्यात आलेल्या ११ सुधारित बैलचलित शेती अवजारांमध्ये बैलचलित सौरऊर्जा फवारणी यंत्र, बैलचलित स्लरी अंथरणी यंत्र, खत व बी टोकण यंत्र, धसकटे गोळा करणारे यंत्र, तीन पासांचे खत कोळपे, सुधारित बैलगाडी जू, एकबैल चालित खत व बी टोकण यंत्र, एकबैल चालित वखर, बैलचलित प्लास्टिक आच्छादन यंत्र, बैलचलित उसास माती चढविण्याचे यंत्र तसेच इतर सुधारित अवजारांचा समावेश होता.

अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता बैलचलित सुधारित शेती अवजारे ही काळाची गरज आहे. कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून ही अवजारे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतील. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत, श्रमात घट आणि शाश्वत शेतीला मोठी चालना मिळेल.

प्रमुख अतिथी कृषिरत्न श्री. आबासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामार्फत या अवजारांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करून नैसर्गिक शेतीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पदाधिकारी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी आधुनिक बैलचलित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.












Friday, July 24, 2026

वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार; बैलचलित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटरची स्थापना

अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच खरा विकास : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत; विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून संस्कार जपावेत : कृषिरत्न माननीय श्री. आबासाहेब मोरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) 
वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम,  संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे, श्रीमती ज्योती भूक्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. अध्यात्म आणि विज्ञान जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरा विकास घडतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठ शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जनसेवा व शेतकऱ्यांची सेवा करण्यास प्राधान्य देत आहे. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेद्वारे आदर्श व दिशादर्शक कार्य उभारले जात असून, या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आदर व्यक्त केला. आपण पुण्याचे कार्य करत आहात. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहात. विकासासाठी शेती आणि शेतकरी यांची निवड करून आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे, असे सांगून त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांचे अभिनंदन केले. या कार्यामागील त्यांची समर्पण भावना व तपश्चर्या उल्लेखनीय असल्याचे सांगताना ते म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अत्यंत कठीण असते; मात्र आपण तपस्वी वृत्तीने हे कार्य करत आहात. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एक तपस्वी आहात, असे आदरयुक्त उद्गार त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांच्याविषयी काढले.

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण आज पुन्हा सत्य ठरत असल्याचे नमूद करून त्यांनी शेतीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून त्याचा मान, सन्मान आणि कल्याण साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच विचारातून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे नामकरण कृषी व किसान कल्याण मंत्रालय असे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून निर्यातीमध्येही महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. याचे श्रेय शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि दिंडोरी प्रणित संस्थेसारख्या सेवाभावी संस्थांना जाते, असे त्यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विषमुक्त, जोखीमरहित, कर्जमुक्त आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी कार्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज झालेला सामंजस्य करार हा केवळ दोन संस्थांमधील करार नसून, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी 'वन हेल्थ (One Health)' या संकल्पनेचाही उल्लेख केला. प्राणी, वनस्पती, मृदा आणि मानव यांचे आरोग्य परस्परांशी निगडित असून सर्वांच्या आरोग्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात ट्रॅक्टरच्या जागी बैलचलित अवजारे आणण्याचा प्रश्न नसून, बैलचलित अवजारांना अधिकाधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पशुशक्तीवर आधारित कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने उत्कृष्ट कार्य केले असून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याच अनुषंगाने बैल संवर्धनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेने विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. तसेच मागील चार वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत असताना शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण आणि शेतकरी हितासाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.

श्री. आबासाहेब मोरे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान श्री स्वामी समर्थ संस्थान आत्मीयतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. शेती स्वावलंबी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेती समृद्ध होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती आणि शेतात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात होती. मात्र, कालांतराने रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ लागले. त्यामुळे वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत. त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असून, प्रत्येक शेतात पशुधन, विशेषतः गायी-गुरे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही वाढला, तरी गाईंशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही. गाय ही अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. गरजेनुसार करण्यात आलेल्या संकरामुळे देशी गाईंची प्रतिकारशक्ती कमी झाली असून, शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गाई-गुरांच्या आजारांवर नियंत्रणासाठी विविध वनस्पती उपयुक्त ठरतात. काही वनस्पतींच्या सान्निध्यामुळेही आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे या विषयावर विद्यापीठाने अधिक मार्गदर्शन करावे, अशी त्यांनी विनंती केली.

देशात पशुधनाच्या शक्तीच्या वापरावर संशोधन करणाऱ्या प्रमुख विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. गाईचे शेण व गोमूत्र हे अत्यंत उपयुक्त असून, शेणामध्ये अनेक लाभदायक सूक्ष्मजीव आढळतात. गोमूत्रापासून तयार केलेल्या जैविक कल्चरचा वापर शेतीत करावा. तसेच तणनाशकांचा वापर टाळून तणांचा उपयोग भाजीपाला, सेंद्रिय खत किंवा औषधी निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

गाईप्रमाणेच बैलांचेही शेतीमध्ये महत्त्व असून, नंदी संवर्धनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे, विशेषतः ट्रॅक्टरच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी नमूद केले. बैलचलित शेती अवजारांचा प्रचार व प्रसार व्हावा, त्यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत आणि सामंजस्य कराराच्या माध्यमातून हे कार्य अधिक वेगाने पुढे न्यावे, अशी त्यांनी विनंती केली. या कार्यामध्ये कोणताही भेदभाव न करता केवळ ज्ञानदानाचा उद्देश असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा. रील्सच्या आभासी विश्वात रमण्यापेक्षा वास्तव जीवनात सक्रिय राहून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. तंत्रज्ञानाचा योग्य व संयमित वापर करावा. ताण-तणाव कमी करण्यासाठी गाई-गुरे आणि नैसर्गिक वातावरणाच्या सान्निध्यात वेळ घालवावा. तसेच आई-वडिलांची निरपेक्ष भावनेने सेवा करून संस्कार जपावेत, असे आवर्जून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचीन ऋषी-मुनींनी कृषीशास्त्राचा कसा विकास केला, याची उदाहरणे देत त्यांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा केवळ सामंजस्य करार नसून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता असून मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा अल्प आहे. तसेच मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के शेती ही पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक यांत्रिकीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यापीठाने ५६ आधुनिक कृषी अवजारे तसेच विविध पिकांसाठी उपयुक्त वाण विकसित केले असून हे तंत्रज्ञान आणि वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सामंजस्य करार आणि कस्टम हायरिंग सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी श्री स्वामी समर्थ संस्थेने घेतलेला पुढाकार इतर संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यापीठाचे संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध व तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात डॉ. दयानंद टेकाळे यांनी सांगितले की, आजच्या कार्यक्रमात दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग पाहून विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील आत्मीय नाते अधिक दृढ झाल्याची प्रचिती येते. माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ "शेतकरी देवो भव:" या भावनेने कार्यरत असून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यास सदैव अग्रक्रम देत आहे. ते पुढे म्हणाले की, गतवर्षी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात गुरुमाऊलींनी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान व बैलचलित कृषी अवजारे पाहिल्यानंतर सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार श्री स्वामी समर्थ संस्थेसोबत दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा सामंजस्य करार ऐतिहासिक ठरला आहे. विद्यापीठाचे बैलचलित कृषी अवजारांचे कस्टम हायरिंग सेंटर महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये स्थापन करण्याचा मानस होता, त्यानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा (राणीसावरगाव ता. गंगाखेड), श्री. सिद्धीगिरी कृषी विज्ञान केंद्र, (कन्हेरी कोल्हापूर), गो विज्ञान अनुसंधान केंद्र (देवळापार, नागपूर) आणि श्री. स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन ट्रस्ट ( दिंडोरी, नाशिक) येथे स्थापन करण्यात आले आहेत. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. या कस्टम हायरिंग सेंटरमध्ये ११ बैलचलित कृषी अवजारांचा समावेश असून ती एक किंवा दोन बैलांच्या साहाय्याने चालविता येतील. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री. बालासाहेब शिंदे यांनी सांगितले की, संघर्षातूनच नवी ऊर्जा निर्माण होत असते. शेतीमध्ये यापूर्वी न झालेली अभिनव कामे करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ संस्थेमार्फत २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा या तत्त्वावर कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सुमारे दीड हजार सेवेकरी विविध केंद्रांतून सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सुमारे २० हजार गावांतील संपर्क शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचविले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. बैलचलित कृषी अवजारांच्या वापरामुळे शेतीवरील खर्चात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिंडोरी प्रणित संस्थेमार्फत राबविण्यात येणारे रोजगार, विवाह, मानसिक स्वास्थ्य समुपदेशन तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे यांनी श्री आबासाहेब मोरे यांचा परिचय करून दिला. त्यांनी देशभरातील तालुका, जिल्हा तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच शाकंभरी सीड बँकेच्या परवाना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तांत्रिक सत्रात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत, पावसाच्या खंडकाळात घ्यावयाची काळजी तसेच नैसर्गिक शेती या विषयांवर डॉ. आनंद गोरे व डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.



संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे
ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे
संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे 

प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे यांचा सन्मान 

Thursday, July 23, 2026

वनामकृविच्या परभणी कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या १८० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला असून, या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली.

यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. प्रफुल घंटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. किरण जाधव, पदव्युत्तर शिक्षण प्रभारी प्रा. मकरंद भोगावकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. सुरेश वाईकर, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी डॉ. जय देशमुख, श्री. विजय गारकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान, प्राध्यापक, कर्मचारी तसेच NSS NCC चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान यांनी केले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.