Wednesday, August 12, 2026

समावेशक नवकल्पनांतून विकसित भारताची उभारणी; वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय नवोपक्रम प्रतिष्ठानमध्ये सामंजस्य करार

तंत्रज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाचा लाभ महत्त्वाचा; संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा —  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

सामंजस्य करार 
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

एनआयएफचे संचालक माननीय डॉ. अरविंद रानडे

विकसित भारत २०४७च्या संकल्पनेला गती देण्यासाठी ग्रामीण भागातील नवकल्पना, स्थानिक ज्ञान आणि शेतकरी-केंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन–इंडिया (एनआयएफ - NIF), गांधीनगर यांच्यामध्ये परभणी येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि एनआयएफचे संचालक माननीय डॉ. अरविंद रानडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सामंजस्य कराराच्या निमित्ताने विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारत २०४७ साठी समावेशक नवकल्पना’ (Inclusive Innovations for Viksit Bharat 2047) या विशेष व्याख्यानाचे आयोजन  करण्यात आला. करारानुसार दोन्ही संस्थांच्या सहकार्याने समावेशक नवोपक्रम परिसंस्था विकसित करणे, विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या नवकल्पनांचा शोध घेणे, त्यांचे दस्तऐवजीकरण, पडताळणी व प्रमाणीकरण करणे, नवकल्पकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे तसेच सामाजिक गरजांवर आधारित संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर, आचार्य व पदव्युत्तर संशोधकांना एनआयएफच्या सहकार्याने ग्रामीण नवकल्पना, मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास आणि समाजाच्या अपूर्ण गरजांवर संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवकल्पकांना मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पनांचे बाजारपेठेसाठी उपयुक्त समाधानांमध्ये रूपांतर करण्यासाठी सहकार्य करता येणार आहे. नवोपक्रम, उद्योजकता विकास आणि बौद्धिक संपदा हक्क व्यवस्थापनाबाबत संयुक्त कार्यशाळाही आयोजित करता येणार आहेत.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या स्थापनेपासून संस्थेच्या कार्याशी जोडलेल्या सर्व व्यक्ती व संस्थांप्रती आदर व्यक्त केला. एनआयएफसोबत सुरुवातीपासून असलेला संबंध आणि या संस्थेचे सक्षम नेटवर्क विद्यापीठासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन प्रकल्प आणि संशोधकांच्या नवकल्पनांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या शेतावरील जोखीम कमी करणारे संशोधन उभारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी तंत्रज्ञानाचा लाभ अधिक महत्त्वाचा आहे, असे स्पष्ट करत त्यांनी संशोधनाचा केंद्रबिंदू शेतकरी आणि समाजाच्या गरजा असाव्यात, असे प्रतिपादन केले.

सहज व सरळ जीवनापेक्षा स्पर्धात्मक वातावरणातून सक्षमता निर्माण होते, असे सांगून माननीय कुलगुरूंनीप्रश्नांना प्रश्न म्हणून संबोधले, तर त्यांची उत्तरे शोधणे अधिक सोपे जाते,” या कार्यपद्धतीचा विद्यापीठात अवलंब केला जात असल्याचे नमूद केले. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नवकल्पना-आधारित संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या चारही बाबींवर भर दिल्यामुळे विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर अनेक उल्लेखनीय यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. नजीकच्या काळात विद्यापीठातील नोकरभरतीची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रत्येकाने आपल्या कार्यासाठी सक्षम उत्तराधिकारी तयार करावा, जेणेकरून संस्थेचे कार्य सातत्याने पुढे चालू राहील, असे आवाहन त्यांनी केले.

एनआयएफचे संचालक डॉ. अरविंद रानडे यांनी ‘Inclusive Innovation for Viksit Bharat’ या विषयावर मार्गदर्शन करताना नवकल्पक संशोधक हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणावर तरुण मनुष्यबळाची जमेची बाजू असून, या लोकसंख्यात्मक लाभाचा प्रभावी उपयोग करण्याची गरज आहे. भारतीय समाजरचनेत ग्रामीण लोकसंख्येचा मोठा वाटा असून, मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे विकसित भारत २०४७चे स्वप्न साकारण्यासाठी उत्पादकता, भारतीय ओळख व गौरवशाली परंपरा, क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (resilience) यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन संशोधन उपक्रम हे शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असावेत, असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. कृषी, जल व स्वच्छता, आरोग्य व पोषण, ऊर्जा व पर्यावरण तसेच जीवनमान उंचावणे या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या Indigenous Knowledge आणि स्थानिक तंत्रज्ञानामध्ये अनेक समस्यांची व्यावहारिक उत्तरे दडलेली आहेत. देशातील शेतकरी, कारागीर आणि ग्रामीण नवकल्पकांकडे असलेल्या या ज्ञानाला मागील २५ वर्षांत एनआयएफने पुढे आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एनआयएफच्या कार्यपद्धतीचे सविस्तर विश्लेषण केले.

व्हीएआरडी विभाग प्रमुख डॉ. राकेश माहेश्वरी यांनी नवकल्पक संशोधक नाविन्यपूर्ण कल्पना व संशोधन घेऊन येत असल्याचे सांगितले. या नवकल्पनांना शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त, सुलभ आणि व्यवहार्य बनविण्याची आवश्यकता आहे. नवकल्पकांच्या संशोधनाला बौद्धिक संपदा हक्कांतर्गत संरक्षण देणे, योग्य नोंदणीसाठी मदत करणे आणि त्यांच्या तंत्रज्ञानाला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असून, एनआयएफ या दिशेने महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले. त्यांनी संशोधनातील नवकल्पनांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. मोहन मुक्ताजी लांब, चिंचपूर (ता. धारूर, जि. बीड) आणि श्री. संभाजी शिराळे, पेठ शिवणी (ता. पालम, जि. परभणी) या नवकल्पक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार संशोधन उपसंचालक डॉ. सुनीता पवार यांनी मानले तर संशोधन उपसंचालक डॉ. प्रभाकर पडघन आणि संशोधन संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  या विशेष व्याख्यानाचा लाभ विद्यापीठातील विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, आचार्य व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी घेतला.

सामंजस्य करारानुसार दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त कार्यशाळा, प्रशिक्षण, संशोधन व विद्यार्थी-शोधक विनिमय कार्यक्रम राबविण्यासह संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचीही तरतूद आहे. कराराची मुदत पाच वर्षांची असून, दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण व शेतकरी-केंद्रित नवकल्पनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार 
व्हीएआरडी विभाग प्रमुख डॉ. राकेश माहेश्वरी
संशोधन उपसंचालक डॉ. रणजीत चव्हाण 


For English

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातर्फे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे दिनांक १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत दिनांक १२ ऑगस्ट रोजी कृषि महाविद्यालय परिसरात परिसर स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हरियाली अमावस्येनिमित्त दिनांक १२ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन आणि हरित व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी  यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कृषि महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते तसेच संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या उपस्थितीत आणि कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कृषि महाविद्यालय परिसरात १० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी एक झाड मा के नाम’ हा पर्यावरणपूरक संदेश दिला. कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, त्यापैकी आतापर्यंत ३५० वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती दिली. लागवड केलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. सचिन मोरे, डॉ. हरिहर कौसडीकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. सुरेश वाईकर, श्री. विजय गारकर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ. संतोष ठोंबरे, श्री. श्रीनिवास भारती आणि डॉ. सुवर्णा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.








वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाद्वारे हरियाली अमावस्या निमित्त वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रमाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) यांच्या संयुक्त विद्यमाने हरियाली अमावस्येनिमित्त दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हरियाली अमावस्येच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन तसेच हरित व शाश्वत भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालय परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमातून प्रत्येकाने किमान एक रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे’ हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासोबतच पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हरित परिसर निर्मिती आणि शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

यानिमित्त बोलताना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ. नीता गायकवाड यांनी या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन, वृक्षांचे महत्त्व तसेच शाश्वत व निरोगी जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन, पाणी व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी वृक्ष हे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच स्वच्छ हवा, मृदासंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.एक विद्यार्थी–एक रोप” ही संकल्पना जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

वृक्षारोपणाच्या माध्यमातून आजचे रोप म्हणजे उद्याची हिरवीगार सावली हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सामूहिक जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

हरियाली अमावस्या वृक्षारोपण अभियानातूनएक रोप लावा, एक झाड जगवा आणि हरित, निरोगी व शाश्वत भविष्यासाठी योगदान द्या” असा प्रभावी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.



Tuesday, August 11, 2026

उसावरील पायरीला (पाकोळी) किडीचा वाढता प्रादुर्भाव : वेळीच करा एकात्मिक व्यवस्थापन

 वनामकृविच्या तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन

सध्याच्या पावसाळी हंगामात ढगाळ वातावरण, वारंवार होणारा रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे काही भागातील उसामध्ये पायरीला (पाकोळी) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. या किडीची पिल्ले व प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेत असल्याने पानांची हिरवेपणा कमी होऊन पाने पिवळसर व निस्तेज होतात. त्याचबरोबर किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट गोड पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पानांची अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. पायरीला किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत, तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच योग्य एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. गजानन गडदे आणि श्री. मधुकर मांडगे या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.

किडीची ओळख आणि जीवनक्रम –

या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते, एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यावर मेणचट दोऱ्यासारखे आवरण असते. अंडी अवस्था तापमान व ऋतुमानानुसार बदलते. उष्ण हंगामात अंडी अवस्था साधारणतः ७ ते १२ दिवसांची, तर थंड व प्रतिकूल परिस्थितीत २० ते ४१ दिवसांपर्यंत असू शकते. हिवाळ्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीत थंडीपासून अंड्याचे संरक्षण व्हावे यासाठी पानाच्या आतल्या आवरणामध्ये अंडी घातली जातात. अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात आणि शरीरावर मेणचट आवरण असते. पिल्लावस्थेचा कालावधी देखील तापमान व ऋतुमानानुसार मोठ्या प्रमाणात बदलतो. तर प्रौढ फिकट पिवळसर रंगाची व पाचरीच्या आकाराची असतात. पायरीला किडींचे प्रौढ वातावरणानुसार १४ ते २०० दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात तसेच नरापेक्षा मादी काही काळ जास्त जिवंत राहते. अशाप्रकारे कीड एका वर्षात ३ ते ४ पिढ्या पूर्ण करते.

हवामानाचा प्रभाव

ही कीड वर्षभर सक्रिय असते; परंतु पायरीला किडीच्या वाढीसाठी उबदार व दमट वातावरण पोषक ठरते. पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, वारंवार होणारा रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे या किडीची संख्या वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने या काळात उसाचे नियमित निरीक्षण करावे. अतिउष्ण व कोरड्या वातावरणात किडीची संख्या कमी होते.

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे

या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही उसाच्या पानातील रस शोषण करतात,परंतु पिल्लं जास्त प्रमाणात नुकसान करतात. पानातील रस शोषण केल्याने उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात, तसेच हि किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ तिच्या शरीरातून बाहेर सोडते त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. अशा उसापासून तयार केलेली साखर आणि गूळ कमी दर्जाचा मिळतो. वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास उसाच्या उत्पादनात घट होते तर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उताऱ्यात घट होते.

पर्यायी खाद्य वनस्पती

 गहू, मका, ज्वारी, बाजरी, ओट, बार्ली, इतर तृणधान्ये आणि गवतवर्गिय तणे

निरीक्षण व आर्थिक नुकसानीची पातळी

पिकाचे नियमितपणे किमान आठवड्यातून एकदा निरीक्षण करावे. शेतातील विविध भागांतून उसाची बेटे/कांडे निवडून त्यावरील पानांवर पायरीला किडीची पिल्ले, प्रौढ व अंडीपुंज यांची नोंद घ्यावी. सरासरी ३ ते ५ पिल्ले किंवा प्रौढ प्रति पान अथवा १ अंडीपुंज प्रति पान आढळल्यास व्यवस्थापनाच्या उपाययोजना सुरू कराव्यात. निरीक्षण करताना शेताच्या बांधालगतचा भाग तसेच पिकाच्या आतील भागातील झाडे यांचा समावेश करावा.

एकात्मिक व्यवस्थापन

पिकाची फेरपालट करावी.

ज्याठिकाणी पायरीला किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला असेल त्या ठिकाणी खोडवा ऊस घेण्याचे टाळावे कारण खोडवा पीक किडीसाठी सतत उपलब्ध खाद्य वनस्पती म्हणून काम करू शकते आणि पायरीला किडीची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते.

उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.

लागवड करताना बेण्यास क्लोरोपारीफॉस २०% या कीटकनाशकाची ०२ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात बेणे प्रक्रिया करून मगच लागवड करावी.

आंतरपीक म्हणून बटाटे,कांदा, टरबूज, काकडी, सोयाबीन, चवळी, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करावी.

पीक तन विरहित ठेवावे आणि पर्याय खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात.

उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.

नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. नत्राचा अतिरेक टाळून माती परीक्षण व पिकाच्या गरजेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. जास्त नत्रामुळे कोवळी व रसाळ वाढ वाढू शकते आणि रसशोषक किडींच्या वाढीस अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

खोडवा उसामध्ये खालची दोन पाने काढून टाकावी कारण किडीद्वारे अंडी देण्यासाठी या पानांना प्राधान्य दिले जाते.

जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल.

पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करावीत.

निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवावा.

वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीचा वापर ४० ग्रॅम/१० लिटर पाणी या प्रमाणात करावा.  तसेच या जैविक बुरशीच्या उत्पादनाची गुणवत्ता, जिवंत बीजाणूंची संख्या आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार ही मात्रा बदलू शकते. त्यामुळे उपलब्ध नोंदणीकृत उत्पादनाचा वापर त्यावरील शिफारशीनुसार करावा.

इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे व इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे जेणेकरून नैसर्गिकरित्या किडींचे व्यवस्थापन होईल त्याकरीता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. पायरीला किडीच्या शेतामध्ये इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका चे पांढरे कोष, ढालकिडे, भक्षक भुंगेरे, क्रायसोपा व इतर नैसर्गिक शत्रू मोठ्या प्रमाणात आढळत असल्यास त्यांचे संरक्षण करावे आणि अनावश्यक रासायनिक फवारणी टाळावी.

उपलब्ध झाल्यास इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे ४००० ते ५००० कोष अथवा ४ ते ५ लाख अंडी शेतामध्ये सोडावीत. पायरीला किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपर्यंत पोहोचल्यास उपलब्धतेनुसार ही जैविक नियंत्रणाची उपाययोजना करावी. इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका हा पायरीला किडीच्या पिल्ले व प्रौढांवर बाह्यपरजीवी म्हणून कार्य करतो.

ज्या उसामध्ये मित्र कीटकांची संख्या जास्त दिसून येत असेल त्या शेतातील पाचट जाळू नये.

रासायनिक व्यवस्थापनाकरिता क्लोरोपायरीफॉस २० टक्के ६०० मिली प्रति एकर फवारावे. जैविक, यांत्रिक व इतर एकात्मिक उपाययोजनांनंतरही पायरीला किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त राहिल्यासच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. फवारणीपूर्वी संबंधित उत्पादनाच्या अद्ययावत लेबलवरील पीक, किडीची शिफारस, मात्रा, पाणी प्रमाण व प्रतीक्षा कालावधी तपासूनच वापर करावा.

            आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी मात्र मित्रकीटकांची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी. रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा किडीची संख्या, आर्थिक नुकसानीची पातळी आणि शेतातील मित्रकीटकांची स्थिती विचारात घेऊनच करावा.

फवारणी करताना घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची काळजी

वरील कीटकनाशकांसोबत इतर कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळू नयेत

एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी करू नये.

फवारणीसाठी स्वच्छ पाणी व शिफारशीनुसार पाण्याचे प्रमाण वापरावे

कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

फवारणी करताना मास्क, हातमोजे इ. संरक्षक साधनांचा वापर करावा.

        अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा. (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून)

वनामकृवि संदेश क्रमांक –०३/२०२६ (११ ऑगस्ट २०२६)





सायाळा ब्लॉकमध्ये औषधी, सुगंधी व विविध प्रजातींच्या २.२५ लाख रोपांच्या लागवडीचा शुभारंभ; वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचा हरित उपक्रम

 पर्यावरण संवर्धनासोबत पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सामाजिक वनीकरण विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित औषधी वनस्पती व सुगंधी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा’ शुभारंभ आज दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम विद्यापीठातील सायाळा ब्लॉक, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रालगत आयोजित करण्यात आला.

औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांसोबत पर्यायी व अधिक उत्पन्नक्षम पिकांचा पर्याय उपलब्ध करून देणे तसेच पर्यावरण संवर्धन व हरित क्षेत्रवाढीस चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींना वाढती मागणी असल्याने त्यांच्या शास्त्रीय व व्यावसायिक लागवडीमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतून नवे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालकडॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कृषी विद्या विभाग प्रमुख तथा मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे तसेच सहयोगी संचालक (बियाणे) व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती एस. एस. पठाण तसेच सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भूषण जगन्नाथराव गजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत एकूण १० हेक्टर क्षेत्रापैकी ७.५० हेक्टर क्षेत्रावर तब्बल २ लाख २५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये औषधी वनस्पती, जंगली वनस्पती, फळझाडे, फुलझाडे तसेच इतर विविध रोपांचा समावेश आहे.

औषधी वनस्पतींमध्ये मोह, बेहडा, अर्जुन, कडुनिंब, हिरडा, शमी, रक्तचंदन, आवळा, बेल, कढीपत्ता आणि मेहंदी यांचा समावेश आहे. फळझाडांमध्ये चिंच, आंबा, जांभूळ, फणस, सीताफळ, चारोळी, डाळिंब, लिंबू आणि करवंद या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. जंगली वनस्पतींमध्ये वड, उंबर, साग, बीजा, शिरस आणि सीताअशोक यांचा समावेश आहे. फुलझाडांच्या रोपांमध्ये तामण, पारिजातक, स्वस्तिक, कणेरी, चमेली, मोगरा, जास्वंद, गुलाब, रातराणी, मधुमालती, मोती मोगरा आणि बोगनवेल यांचा समावेश आहे. तसेच इतर रोपांमध्ये आलामुंडा, कुंदा, मिलिस्टोमा, अनंता, सदाफुली, रातराणी, शेवगा आणि हादगा यांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून औषधी व सुगंधी वनस्पतींच्या शाश्वत लागवडीबाबत जनजागृती करण्यासोबतच पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या पिकांच्या लागवड, व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या तसेच उत्पन्नवाढीच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील आणि सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात परभणी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह सहभाग घेतला.





Monday, August 10, 2026

सोयाबीन प्रक्रिया व मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी आणि मराठवाडा शेती विकास प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन’ या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १० ऑगस्ट रोजी अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी येथे उत्साहात संपन्न झाले. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १० ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्षस्थानावरून बोलताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे पुरेसे नाही, तर उत्पादित कृषिमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे तसेच काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि शासन यांनी परस्पर समन्वयाने एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांनी शेती क्षेत्रात केवळ उत्पादन वाढविणे महत्त्वाचे नसून उत्पादित कृषिमालाचे योग्य विपणन व प्रभावी वितरण व्यवस्था याकडेही विशेष लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

अपर जिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद करून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मराठवाडा शेती विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अन्नतंत्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. मनोज लोहिया यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने आणि शेतकरी कुटुंबातील युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगारनिर्माते बनले पाहिजे. यामुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळेल.

या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन मूल्यवर्धनाचे महत्त्व तसेच या क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षणादरम्यान सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान व मूल्यवर्धन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची विविध तांत्रिक तसेच प्रात्यक्षिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

कार्यक्रमास सेवानिवृत्त न्यायाधीश श्री. शंकर ढवळे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, अन्नतंत्र महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता, महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, शेतकरी प्रशिक्षणार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वतीने अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विजया पवार यांनी कार्यक्रम समन्वयिका म्हणून कार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले, तर डॉ. अनुप्रिता जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

या प्रशिक्षणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन प्रक्रिया, मूल्यवर्धन, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाच्या विविध संधींबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे.







६ हजारांहून अधिक कृषि विद्यार्थ्यांना २१.३५ कोटींची शिष्यवृत्ती; राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आधारित थेट लाभ हस्तांतरण (NSP-DBT) प्रणालीचा केंद्रीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या हस्ते शुभारंभ

कृषि शिक्षणात व्यावहारिक प्रशिक्षण, नवोपक्रम आणि संशोधनाला प्राधान्य देण्याचे केंद्रीय कृषिमंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांचे आवाहन

कृषि विद्यार्थ्यांसाठी NSP-DBT प्रणाली महत्त्वपूर्ण पाऊल – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


कृषि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री. शिवराज सिंह चौहान जी यांच्या हस्ते आज दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय कृषि अनुसंधान परिषद–भारतीय कृषि अनुसंधान संस्था (ICAR-IARI), पूसा, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) आधारित थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून देशभरातील ६ हजारांहून अधिक कृषि विद्यार्थ्यांना एकूण २१.३५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती/फेलोशिपची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. सन २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांनाही या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी कृषि शिक्षणातील व्यावहारिक प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ वर्गातील शिक्षणातून कृषि क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होणार नाहीत; प्रत्यक्ष शेतातील प्रशिक्षण, प्रयोग आणि अनुभवाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना प्रभावी कृषि कौशल्ये प्राप्त होतात, असे त्यांनी नमूद केले. कृषि विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संशोधन, नवोपक्रम, स्टार्टअप आणि उद्योजकता या क्षेत्रांतही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषि क्षेत्रातील अन्नसुरक्षा, पोषणसुरक्षा आणि उपजीविका सुरक्षा यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आवश्यक असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री माननीय श्री. शिवराज सिंह चौहान जी यांनी सांगितले. पूर्वी नोकरी आणि उद्योगधंद्याला प्राधान्य देऊन जे काही करू शकत नाहीत त्यांनी शेती करावी, अशी मानसिकता होती; मात्र आता जे सर्व काही करू शकतात, त्यांनी शेती करावी, अशी सकारात्मक भूमिका समाजात निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि व संलग्न शाखांतील विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी भविष्यात विद्यार्थ्यांनी ही भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन केले. शेत, शेतकरी आणि विज्ञान यांच्या समन्वयातूनच देशाची अन्नसुरक्षा आणि आत्मनिर्भरता अधिक बळकट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NSP-DBT प्रणालीमुळे शिष्यवृत्ती वितरण अधिक पारदर्शक

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल आधारित थेट लाभ हस्तांतरण (NSP-DBT) प्रणालीमुळे शिष्यवृत्ती वितरणामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमता वाढणार असून, विद्यार्थ्यांना आवश्यक वेळी आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमादरम्यान देशभरातील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यांवर अल्पावधीत शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. या प्रक्रियेमुळे शासनाची पारदर्शक आणि विद्यार्थी-केंद्रित कार्यपद्धती अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांच्या मनोबलात वाढ होऊन त्यांना शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाकडे अधिक जोमाने वळण्यास प्रेरणा मिळणार आहे.

माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून अन्नसुरक्षा, पोषणसुरक्षा आणि शेतकरी उत्पन्नसुरक्षा यांना प्राधान्य दिले जात असल्याचेही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नमूद केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन आणि शेतकऱ्यांचे अथक परिश्रम यामुळे देशाची अन्नधान्य उत्पादन क्षमता अधिक मजबूत झाली आहे. कृषि विद्यार्थ्यांनी केवळ रोजगाराच्या संधींपुरते मर्यादित न राहता देशाच्या कृषि विकासासाठी मोठी उद्दिष्टे ठेवून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, हरियाली अमावस्येच्या निमित्ताने देशभरातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संस्थांमध्ये कृषि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करून कृषि विकासासोबतच पर्यावरण संवर्धन हीदेखील सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री. भागीरथ चौधरी जी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माननीय महासंचालक डॉ. मांगीलाल जाट, सचिव श्री. ज्ञानेंद्र त्रिपाठी, उपमहासंचालक डॉ. यशपाल सिंह मलिक, संचालक डॉ. सी. श्रीनिवास राव यांच्यासह ICAR IARIचे वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. देशभरातील हजारो विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सक्रिय सहभाग

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे विशेष निमंत्रित म्हणून सहभागी झाले. त्यांनी कार्यक्रमात ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदविला.

या उपक्रमाबाबत बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, NSP-DBT प्रणाली ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम पारदर्शकपणे आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रणालीमुळे कृषि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम नियमितपणे आणि वेळेत उपलब्ध होणार असून, मानवी हस्तक्षेपामुळे होणारी दिरंगाई तसेच विविध स्तरांवरील अनावश्यक प्रशासकीय प्रक्रिया कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, शिष्यवृत्ती वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम होऊन विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विद्यापीठाचे ICAR नोडल अधिकारी डॉ. सचिन मोरे यांच्यासह विद्यापीठातील विविध शाखांमधील ICAR शिष्यवृत्तीचे २५० हून अधिक लाभार्थी विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.

राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या NSP-DBT प्रणालीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत आणि थेट त्यांच्या बँक खात्यावर मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि नवोपक्रमातील सहभागाला निश्चितच चालना मिळणार आहे.


For English