Thursday, July 23, 2026

वनामकृविच्या परभणी कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दिनांक २३ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या १८० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत प्रत्येकाने वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी महाविद्यालय परिसरात १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला असून, या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात या कार्यक्रमातून करण्यात आली.

यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. प्रफुल घंटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. किरण जाधव, पदव्युत्तर शिक्षण प्रभारी प्रा. मकरंद भोगावकर, पदवी शिक्षण प्रभारी डॉ. दिलीप झटे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. सुरेश वाईकर, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) अधिकारी डॉ. जय देशमुख, श्री. विजय गारकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान, प्राध्यापक, कर्मचारी तसेच NSS NCC चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पात्रीकर व डॉ. फरिया खान यांनी केले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.







वनामकृवि–सारथी यांच्यात ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

 मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत आर्थिक सहाय्यासह डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षणाची संधी


मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यात दिनांक २३ जुलै २०२६ रोजी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) मान्यताप्राप्त रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) केंद्रामार्फत हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठातर्फे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन उपसंचालक (अर्थशास्त्र) डॉ. रणजित चव्हाण तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता श्री. विवेकानंद भोसले यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सारथी संस्थेच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक श्रीमती आम्रपाली कसोडेकर, प्रकल्प अधिकारी श्री. असलम शेख व श्री. योगेश कुदळे उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून कराराची औपचारिक पूर्तता करण्यात आली.

सामंजस्य करारानंतर सारथी संस्थेने आपल्या अधिकृत पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील आरपीटीओ केंद्रामध्ये डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, कृषि फवारणी, पीक निरीक्षण, अचूक शेती (प्रिसिजन अॅग्रिकल्चर), भू-सर्वेक्षण आदी क्षेत्रांतील प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे मराठवाड्यातील युवक-युवती, विद्यार्थी आणि शेतकरी यांना शेतीमध्ये आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमता व कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, संशोधन उपसंचालक (पिके) डॉ. सुनिता पवार, ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे, ड्रोन प्रशिक्षक श्री. गोविंद दहिफळे व श्री. शितम लांडगे उपस्थित होते.

यानंतर सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन तेथील प्रशिक्षण सुविधा, उपलब्ध उपकरणे व प्रशिक्षण प्रक्रियेची पाहणी केली.

मराठवाड्यातील सर्व पात्र विद्यार्थी, युवक-युवती आणि शेतकरी यांनी सारथीमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे यांनी केले.





वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटरसाठी सामंजस्य करार व नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात येणार असून, त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच अकोला येथील महाबीजचे महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. या उपक्रमामुळे बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच नैसर्गिक शेतीचा प्रसार, शाश्वत कृषि पद्धतींचा अवलंब आणि शेतकऱ्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) चे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे तसेच श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक)चे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.


वनामकृवित ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा

भारतीय संस्कृती आणि नैसर्गिक शेतीचा आधार देशी गोवंश – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पाच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी विद्यापीठात ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये देशी गोवंशाचे जतन व संवर्धन तसेच संकरीकरणाद्वारे दुग्धोत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत देशी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच उत्पादन व प्रजनन गुणधर्मांवर सातत्याने संशोधन केले जात आहे. सध्या प्रकल्पावर होलदेव व देवणी जातींचे एकूण १६९ गोवंश असून त्यापैकी ८७ शुद्ध देवणी जातीचे आहेत. देशी गायीचे दूध, शेण व गोमूत्र यांचे कृषी, पर्यावरण आणि पोषणदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन शासनाने देशी गोवंशाच्या संवर्धनावर विशेष भर दिला असून देशी गायीस 'राज्यमाता गोमाता' हा दर्जा प्रदान केला आहे.

यानिमित्ताने दुपारच्या सत्रात विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या सभागृहात मराठवाड्यातील पशुपालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे तसेच प्रमुख वक्ते म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वास साळुंखे उपस्थित होते. याशिवाय पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, विभागातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मराठवाड्यातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत कृषी व्यवस्थेमध्ये गोवंशाचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केले. त्यांनी भारतीय परंपरेतील गोवंशाचे प्राचीन महत्त्व, गोरज मुहूर्ताचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व, मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या बळकटीकरणामध्ये पशुधनाचे असलेले योगदान यावर सविस्तर विवेचन केले. याशिवाय देशी गोवंशाचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत पशुपालन व्यवसायात महिलांचा सक्रिय सहभाग, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी विद्यापीठाद्वारे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन यासाठीच्या कार्याचे महत्व नमूद केले.

प्रमुख वक्ते डॉ. विश्वास साळुंखे यांनी देशी गोवंशाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता, संतुलित आहार व्यवस्थापन, आधुनिक पशुधन व्यवस्थापन, पशू आरोग्य संवर्धन, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाययोजना तसेच पशुपालकांनी दैनंदिन व्यवस्थापनात घ्यावयाची आवश्यक काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी देशी गोवंशाचे वैज्ञानिक पद्धतीने संगोपन करून दुग्धोत्पादनासह शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देता येते, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यापीठातील संकरीत गो-पैदास प्रकल्पामार्फत गेल्या २५ वर्षांपासून शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन तसेच उत्पादन व प्रजनन गुणधर्मांवरील संशोधन सुरू असल्याची माहिती दिली. शेती व पशुधन हे एकमेकांना पूरक असून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पशुधन संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपालक प्रतिनिधी श्री. शिवप्रसाद मारोती कोरे (रा. राणी सावरगाव, ता. गंगाखेड), श्री. परमेश्वर शिवमूर्ती स्वामी (रा. इटोली, ता. जिंतूर), श्री. विजय प्रल्हादराव खिस्ते पाटील (रा. ताडबोरगाव, ता. मानवत) तसेच श्री. रामेश्वर किशनराव मांडगे (रा. बेलवाडी, जि. हिंगोली) यांनी मनोगत व्यक्त करत शाश्वत शेतीसाठी पशुधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल गोरे यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाची भूमिका स्पष्ट केली. संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय देशी गोवंशाचा काटकपणा, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच शेतीतील अवशेष व चारा संसाधनांचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले, तर आभार डॉ. प्रभाकर पडघान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जी. पी. भोसले, श्री. रवी काळे, श्री. विश्वंभर शिंदे, श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव व भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.








माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वनामकृवित वृक्षारोपण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांच्या हस्ते उद्यानविद्या विभाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करून हरित परिसर निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आंब्याच्या विविध जातींची ४५० रोपे व जांभळाची ५० रोपे, अशी एकूण ५०० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला..





वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भा.कृ.अ.प.च्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठातील पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना येथे आयोजित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांवर आधारित कस्टम हायरिंग सेंटर श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) येथे स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी या अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अल्पभूधारक व पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक, कमी खर्चिक व कार्यक्षम शेती अवजारांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी (प्रणित), नाशिक येथील प्रमुख कृषिशास्त्र विभागाचे मा. श्री. आबासाहेब मोरे (कृषिरत्न) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, महाबीज, अकोला येथील महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी, कुलसचिव श्री. पुरषा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) अंतर्गत करण्यात आले असून, संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शास्त्रज्ञ (पशुविज्ञान) डॉ. संदेश देशमुख आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक इंजी. अजय वाघमारे यांनी शेतकरी, कृषि संस्था आणि संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


वनामकृवितील संकरीत गो-पैदास प्रकल्पात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ‘शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन’

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. २२ जुलै २०२६ रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन करण्यात आले.

संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये या भागातील देशी जातीच्या गायींचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढविणे तसेच देशी गोवंशाचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने करण्यात आली. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी ही देशी जात दुहेरी उपयुक्ततेसाठी (दुग्धोत्पादन व शेतीकाम) विशेष ओळखली जाते. सध्या या प्रकल्पावर होलदेव व देवणी जातींचा मिळून एकूण १६९ गोवंश असून, त्यापैकी ८७ जनावरे शुद्ध देवणी जातीची आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र. पविआ-१०२५/प्र.क्र. ११५/पदुम-३, दि. १३ जून २०२५ नुसार राज्यात दरवर्षी २२ जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशी गायीच्या दुधाचे पोषणमूल्य तसेच शेण व गोमूत्राचे कृषि आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन गायीस कामधेनू असे संबोधले जाते. महाराष्ट्रात देवणी, लाल कंधारी, खिल्लार, डांगी, कोकण कपिला, गवळाऊ व कठाणी अशा विविध देशी गोवंशाच्या जाती आढळतात. मात्र, देशी गोवंशाच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. २० सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार देशी गायीस राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित केले आहे.

यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुद्ध देवणी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच देशी गोवंशाचे संवर्धन हे शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. के. लोंढे, सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. प्रभाकर पडघान, डॉ. रमेश पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवी काळे, कृषि सहाय्यक श्री. विश्वंभर शिंदे, पशुधन पर्यवेक्षक श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.