Monday, July 27, 2026

वनामकृवितील चार वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थी-प्राध्यापकांशी प्रेरणादायी संवाद

 "हे माझे विद्यापीठ आहे" ही भावना जोपासा.....माननीय कुलगुरुंचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कुलगुरू म्हणून यशस्वी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर कृषि व संलग्न महाविद्यालयांतील पदवी (UG), पदव्युत्तर (PG) व पीएच.डी. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांशी संवाद साधला. विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण, विद्यार्थी कल्याण, संस्थात्मक विकास तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या संवाद कार्यक्रमात विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, राष्ट्रीय अधिस्वीकृती (Accreditation) आणि मानांकन (रँकिंग) अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थी व शिक्षकांच्या सूचना तसेच परस्पर हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात सर्व संचालक, मुख्यालयातील आणि बाहेरील सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रभारी अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच प्राध्यापकांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, दिनांक २५ जुलै २०२२ रोजी जेव्हा त्यांनी परभणीत पहिले पाऊल ठेवले, तेव्हा परभणीशी त्यांचे कोणतेही नाते नव्हते आणि या परिसराविषयी फारशी माहितीही नव्हती. मात्र साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर विद्यापीठ व परभणीतील जनतेशी एकरूप होण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. आपले व्यक्तिमत्त्व सामाजिक असल्यामुळे समाजातील विविध घटकांशी सहज संवाद साधता आला. यामध्ये परभणीतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

परभणीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना त्यांनी "जगात जर्मनी आणि भारतात परभणी" असे अभिमानाने नमूद केले. परभणीची ओळख राष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञ तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांना विद्यापीठात निमंत्रित करण्यात आले. या मान्यवरांनी परभणीबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

नेतृत्वाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, नेतृत्व करताना अहंकार बाळगू नये किंवा पदाचा गर्व करू नये. पद मिळाले म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ किंवा सर्वज्ञानी झालो, असा समज करून घेऊ नये. पद ही समाजसेवा करण्याची एक संधी आहे, अशी भावना ठेवून सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे व मेहनतीने कार्य करावे. "झिरो बार्गेनिंग पॉईंट" या तत्त्वाचे महत्त्व सांगताना त्यांनी "मला काम करू द्या" हा आपला कार्यमंत्र असल्याचे नमूद केले. विद्यापीठात कार्यरत असताना एकदाही कोणत्याही प्रकारचा दबाव जाणवला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कोणत्याही आठवणीशिवाय काम करण्याची वृत्ती विकसित करावी, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवावा आणि चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण तपश्चर्या आवश्यक असते, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठात केवळ ३२ टक्के मनुष्यबळावर अनेक उल्लेखनीय यश संपादन करता आले, ते सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्ती, समर्पण आणि परिश्रमामुळेच शक्य झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी परभणी ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगत येथील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, जनसमुदाय, शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठ परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.

सन २०२२ पूर्वीच्या कार्यापेक्षा मागील चार वर्षांत केलेल्या कार्यातून दहापट अधिक समाधान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील चार वर्षांसाठीही सर्वांना सोबत घेऊन नियोजनबद्ध कार्य करण्यात येईल, जेणेकरून भविष्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कार्य करणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले. कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन आणि समर्पण यांमुळे विद्यापीठाच्या अडचणी कमी झाल्या असून प्रत्येकाने "हे माझे विद्यापीठ आहे" ही भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रकल्पांसाठी परभणी कृषि विद्यापीठाला प्राधान्य दिले जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात संघभावना व कार्यसंस्कृती अधिक बळकट झाली. त्यातून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून (ICAR-NAEAB) '' दर्जाची अधिस्वीकृती मिळाली. तसेच NAHEP प्रकल्पांतर्गत ५१ विद्यार्थ्यां व २४ अधिकारीचे परदेशी प्रशिक्षण, सुमारे रु. १२५ कोटींचे संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, स्वयं (SWAYAM) पोर्टलवरील उल्लेखनीय कार्य, IIRF रँकिंगमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तसेच विद्यापीठातील  अखिल भारतीय समन्वित संशोधन केंद्रांपैकी १० केंद्रांनी देशात प्रथम क्रमांक मिळविल्याचा उल्लेख त्यांनी केला. मागील चार वर्षांत संशोधन, शिक्षण आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला. याबरोबरच माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे कार्य करत असताना प्रयोगशाळेतील साहित्यांचे आधुनिकीकरण, कायमस्वरूपी संग्रहालयाची उभारणी, क्रीडांगणाचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नवीन बसची खरेदी करण्यात आली. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात लक्षणीय बचत झाली असून या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेआरएफ (JRF) परीक्षेत यश मिळविण्यास तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यास मोलाची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने मागील चार वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. सुरुवातीला कमी मनुष्यबळ व अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अनेक शंका उपस्थित होत होत्या; मात्र कुलगुरूंनी अल्पावधीतच परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणला. बदनापूर येथील सौरऊर्जा प्रकल्प, विविध पायाभूत सुविधा तसेच शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विस्तार शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून "एक दिवस माझा माझ्या बळीराजासोबत" आणि ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद यांसारख्या कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित संशोधनाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला तो कोरोनानंतरचा अत्यंत आव्हानात्मक काळ होता. त्यांनी संकटांचे संधीत रूपांतर करत विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक धोरणे राबविली. गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या निर्मितीवर भर दिला तसेच परभणीसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे दहा लाख वृक्षांची लागवड करून हरित विद्यापीठ संकल्पना साकारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची स्वच्छ, पारदर्शक, भेदभावरहित व साधी कार्यपद्धती ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळे विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून अधिस्वीकृतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात यश मिळाले.

प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी माननीय कुलगुरूंच्या गेल्या चार वर्षांतील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली विद्यापीठात झालेल्या शैक्षणिक, संशोधन, विस्तार शिक्षण व पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती दिली. या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी सांगितले की, माननीय कुलगुरूंनी व्यक्तीतील क्षमता ओळखून त्यांना योग्य संधी दिली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करून संस्थेची प्रतिमा उंचावली. कमी मनुष्यबळावरही अनेकपटीने कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यामुळे आज समाजात विद्यापीठाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून सर्वजण सकारात्मक भावनेने कार्य करत आहेत.

विद्यार्थी प्रतिनिधी धीरज कदम आणि सुभाष कुमार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाला सक्षम, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना पालकत्वाची भावना देत सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळे शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रगती साधली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रणजीत चव्हाण आणि डॉ. फारिया खान यांनी केले.







































For English

Sunday, July 26, 2026

वनामकृवित ‘सिल्क अँड मिल्क’ कार्यशाळा; २१ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, ‘मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ अभियानाचा शुभारंभ

 


वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना, , कृषि विभाग, आत्मा, केंद्रीय रेशीम बोर्ड, जिल्हा रेशीम कार्यालय आणि अग्रणी बँक, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिल्क अँड मिल्क’ शेतकरी कार्यशाळा दिनांक २६ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस परभणी जिल्ह्यातील ६०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बाल्य व प्रौढ रेशीम कीटक संगोपन तंत्रज्ञान, तुती लागवड तंत्रज्ञान, उझी माशी व्यवस्थापन, रेशीम उद्योगासाठीच्या विविध शासकीय योजना तसेच दुग्ध व्यवसाय वृद्धीविषयी तज्ज्ञ आणि अनुभवी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटक तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय  ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ हा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तुती लागवडीपासून रेशीम कोष उत्पादन आणि वस्त्रनिर्मितीपर्यंतचा संपूर्ण रेशीम हब परभणी जिल्ह्यात उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी रेशीम उत्पादनासाठी आधुनिक बाजारव्यवस्था विकसित करणे, रेशीम वस्त्रनिर्मितीस चालना देणे, ‘रेशीम भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणे तसेच जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) मार्फत ‘सिल्क अँड मिल्क’साठी स्वतंत्र योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेती आणि दुग्धव्यवसायाची जोड देण्याची गरज अधोरेखित केली. “रेशीम शेतीची आस धरा, लक्ष्मी येईल तुमच्या घरा” या संकल्पनेवर आधारित ‘सिल्क विथ मिल्क’ हे मॉडेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास माननीय पालकमंत्री यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न देणारा आणि रोजगारनिर्मितीस चालना देणारा प्रभावी पूरक व्यवसाय असल्याचे सांगितले. बदलत्या कृषि परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत रेशीम व्यवसायाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे विविधीकरण करत आर्थिक स्वावलंबन आणि शाश्वत प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक यांना ‘सिल्क अँड मिल्क’ प्रकल्पांतर्गत पात्र शेतकऱ्यांना आवश्यक वित्तीय सहाय्य वेळेत उपलब्ध व्हावे, यासाठी कर्ज मंजुरी व वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याचे आवाहन केले. शेतकरी, विद्यापीठ, बँका आणि विविध शासकीय संस्थांमधील समन्वयातून हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण(भाप्रसे) यांनी सांगितले की, पारंपरिक पिकांमधून वर्षातून एकदाच उत्पन्न मिळते आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यात नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, रेशीम उद्योगामध्ये वर्षभरात ८ ते ९ कोषपिके घेता येत असल्यामुळे अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासोबत दुग्ध व्यवसायही स्वीकारावा. परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’मुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याची उदाहरणे त्यांनी यावेळी नमूद केली.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वरराव यांनी बँकेच्या कर्जवाटप धोरणाविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे), संशोधन संचालक  डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक  डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रादेशिक प्रबंधक, एसबीआय श्री. दिनेश झा, श्री. शिवाजी भरोसे, डॉ. केदार खटिंग व श्री. रामचंद्र अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत मेरा रेशीम मेरा अभिमान २.०’ या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अभियानाची माहिती केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ-‘डी’ श्री. अशोक जाधव यांनी दिली. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) -२.० योजनेची घडीपत्रिका प्रकल्प संचालक (आत्मा), परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केली. ग्लोबल विकास ट्रस्टचे श्री. मुक्तेश्वर कडभाने यांनी ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदान योजनांची माहिती दिली.

यावेळी सिल्क अँड मिल्क’ या संकल्पनेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच २१ प्रगतशील शेतकऱ्यांना माननीय पालकमंत्री महोदया व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. रेशीम उद्योगाच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवानिवृत्त रेशीम शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांना सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात ‘सिल्क अँड मिल्क’ संकल्पनेच्या विस्तारासाठी योगदान दिल्याबद्दल श्री. सुनील हट्टेकर, श्री. गोविंद कदम आणि श्री. शंकर वराट यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात जैविक पद्धतीने रेशीम कीटकांवरील नुकसानकारक उझी माशी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल रेशीम संशोधन योजनेचे डॉ. संजोग बोकन व श्री. धनंजय मोहोड यांना केंद्रीय रेशीम बोर्ड आणि रेशीम संचालनालयातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक (रेशीम), छत्रपती संभाजीनगर डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सुनील हट्टेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सागर मिसाळ, श्री. रमेश इक्कर, श्री. दत्ता जटाळे, श्री. परमेश्वर भंडारे आणि श्री. व्यास यांनी विशेष परिश्रम घेतले.