Wednesday, August 19, 2026

वनामकृविच्या कृषी महाविद्यालयात ‘सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ विषयावर कार्यशाळा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विविध वसतिगृहांतील विद्यार्थिनींसाठी सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन दि. १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहांमध्ये करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी, जि. अहिल्यानगर येथील वेलनेस इन्स्ट्रक्टर श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सशक्त युवती घडविण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मनिर्भरता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आहार, विहार, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, योग, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व विशद केले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगाभ्यास यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते, असे त्यांनी सांगितले. युवतींनी शिक्षणासोबतच स्वावलंबन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करून राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध योग, प्राणायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यविषयक प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांसाठी डॉ. सचिन पाठक व श्रीमती सोनी पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योग व आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घेतला.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, वसतिगृह अधीक्षक डॉ. गोदावरी पवार तसेच सहाय्यक वसतिगृह अधीक्षक श्रीमती सुनीता भुरके व श्रीमती अंजली इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यशाळेस कृषि महाविद्यालयातील विविध मुलींच्या वसतिगृहांतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्यदायी जीवनशैली, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांच्या माध्यमातून सक्षम युवती घडविणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सशक्त युवती हीच सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्राची आधारशिला आहे’ या संदेशाने कार्यशाळेची सांगता झाली.








‘माझे घर, माझी बाग’ उपक्रमातून महिलांना परसबाग व घरगुती बागेचे प्रशिक्षण

 वनामकृवितील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्राचा उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय आणि लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माझे घर, माझी बाग’ या उपक्रमाचे आयोजन दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले.

हा उपक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संचालक संशोधन डॉ. भगवान असेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषिरत महिला केंद्राचा घटक समन्वयिका तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कार्यक्रमाचे समन्वयक तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी, मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, लोकमत समूहाच्या समन्वयिका राधिका जोगळेकर तसेच सखी मंचच्या लता साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात लोकमत सखी मंचाच्या सदस्यांना उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी व टोमॅटोच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, लोकमत समूहातर्फे आयोजित ‘माझे घर, माझी बाग’ या स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त सखींचा मान्यवरांच्या हस्ते लोकमत समूहातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी बियाण्यांची निवड, लागवड तंत्रज्ञान तसेच कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादन घेण्याच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. नीता गायकवाड यांनी संतुलित आहारातील भाजीपाल्याचे महत्त्व स्पष्ट करून कुटुंबाच्या आरोग्य व पोषणासाठी घरगुती भाजीपाला उत्पादनाची गरज अधोरेखित केली.

डॉ. पपीता गौरखेडे यांनी मातीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय घटक, कंपोस्ट व सेंद्रिय खतांचे महत्त्व सांगून घरगुती बागेसाठी सुपीक व आरोग्यदायी माती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले.

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रोपवाटीकेत डॉ. बी. एम. कलालवंडी यांनी भाजीपाला उत्पादनाच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी घराच्या उपलब्ध जागेनुसार वाफे, कुंड्या, कंटेनर तसेच इतर माध्यमांचा वापर करून भाजीपाला लागवड कशी करता येते, याबाबत माहिती दिली.

माझे घर, माझी बाग’ या संकल्पनेतून महिलांनी घराच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून पौष्टिक, सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने भाजीपाला तसेच औषधी वनस्पतींची लागवड करावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान घरगुती बागेचे नियोजन, सेंद्रिय खत व कंपोस्ट तयार करणे, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, किचन गार्डन व औषधी वनस्पतींची लागवड, पाणी व्यवस्थापन, तण व कीड नियंत्रण, नियमित देखभाल तसेच उपलब्ध जागेचा प्रभावी वापर याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सहभागी महिलांना सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विविध संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागांच्या संशोधन कार्याचे प्रदर्शन, रोपवाटिका व बागेची पाहणी तसेच विविध पिकांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रांना भेट देण्यात आली. यामधून महिलांना घरगुती बागेसाठी उपयुक्त रोपांची निवड, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन व रोपांची निगा याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली.

घरच्या घरी ताजा, सुरक्षित व विषमुक्त भाजीपाला उपलब्ध झाल्यामुळे कुटुंबाच्या पोषणमूल्यात वाढ होते. तसेच घरगुती बागेमुळे महिलांना बागकामाचा आनंद मिळण्याबरोबरच अतिरिक्त भाजीपाला उत्पादनातून घरगुती खर्चात बचत व संभाव्य आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्य, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी मार्गदर्शकांनी नमूद केले.

या उपक्रमास कृषिरत महिला, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच परिसरातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. महिलांना घराच्या परिसरात उपलब्ध असलेल्या कमी जागेतही नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाला, फळे, फुले व औषधी वनस्पतींची लागवड करता यावी, यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. प्रत्येक घरात पोषणबाग’ ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.













Monday, August 17, 2026

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती सादर करण्याची तसेच विविध कलामाध्यमांतून आपल्या कल्पना व भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.

या विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील सिद्धी संतोष रासवे, रिद्धी माणिक रासवे आणि श्रद्धा प्रभाकर अंबोरे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि कलात्मक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व कलाविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक कौशल्यांना चालना मिळते.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी अभिनंदन करून कौतुक केले. विद्यार्थिनींनी भविष्यातही विविध विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्यांच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहेत.







इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेत शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

 


भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्था (NSRI) येथे आज दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सोयाबीन शेती दिन (फिल्ड डे)’ आणि शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कृषि महाविद्यालय, इंदूरचे अधिष्ठाता डॉ. भरत सिंह तसेच इंदूर जिल्ह्याचे उपसंचालक कृषि श्री. सी. एल. केवडा उपस्थित होते. राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्मृतिचिन्ह प्रदान करीत सत्कार केला.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी अवलंबिलेल्या पद्धती तसेच विविध कृषि तंत्रज्ञानांच्या वापराबाबत शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील थेट संवादातून क्षेत्रीय समस्या, अनुभव आणि संशोधनाधारित उपाययोजनांवर चर्चा झाली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शेतकरी व मान्यवरांनी संस्थेच्या संशोधन प्रक्षेत्राला तसेच

कृषि - व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्राला (अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन सेंटर) भेट दिली. यावेळी संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेली विविध कृषि उत्पादने, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित उपक्रमांची पाहणी करून त्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भा.कृ.अ.प. सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. सुरनर तसेच ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सोयाबीन पिकाचे अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी मराठवाड्यातील प्रातिनिधिक प्रगतिशील शेतकऱ्यांची भेट घडवून आणण्याच्या उद्देशाने शेतकरी प्रतिनिधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी श्री. मंगेश देशमुख आणि उद्यान पंडित श्री. प्रताप काळे यांच्यासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी, कृषि क्षेत्रातील अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषि विद्यापीठे यांच्यातील संवाद अधिक बळकट करून संशोधनातील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा ‘फिल्ड डे’ कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.






Sunday, August 16, 2026

वनामकृविच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; विद्यापीठात चित्रकला प्रदर्शनाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषी महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी  करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनात कृषी महाविद्यालय, परभणी, उद्यानविद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, पाथरी, कृषी महाविद्यालय, सेलू, MGM कृषी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून त्यांच्या कलात्मक कल्पकतेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व निसर्गविषयक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेत असला तरी त्याच्यातील कलागुण आणि सर्जनशीलता त्याला विविध क्षेत्रांत यशस्वी करिअर घडविण्याची संधी देऊ शकते. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी आणि कौशल्यांना योग्य दिशा देत त्यातून भविष्यातील संधी निर्माण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील सर्व वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय, परभणी येथील फाईन आर्ट ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या वतीने अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या हस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे तैलचित्र भेट म्हणून प्रदान करण्यात आले. या कलाकृतीबद्दल माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल सोनकांबळे, डॉ. संघर्ष शृंगारे तसेच फाईन आर्ट ग्रुपच्या विद्यार्थिनी गायत्री बिरादार, स्नेहल बसेवाड, रसिका पवार, श्रुतिका वारे, वैष्णवी शिंदे आणि सिद्धी रासवे यांनी परिश्रम घेतले.









वनामकृविच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या अडचणी व अपेक्षा

 


महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि व संलग्न शाखांमधील विद्यार्थ्यांशी विद्यापीठात दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कठोर मेहनत घ्या, प्रामाणिकपणे कार्य करा, नीती-मूल्यांचे पालन करा आणि आई-वडिलांचा सन्मान करा.” कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषि क्षेत्रासमोरील बदलती आव्हाने लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अपेक्षा त्यांनी समजून घेतल्या.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, परभणी महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. सय्यद इकबाल सय्यद खाजा, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, परभणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. श्रीकांत विटेकर, सेलू नगरपरिषदेचे अध्यक्ष श्री. मिलिंद सावंत, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथुर (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांशी झालेल्या या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्या व अपेक्षा थेट कृषिमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. माननीय कृषिमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत कृषि शिक्षण व शेतकरीहितासाठी गुणवत्तापूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.



माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांची वनामकृविच्या अत्याधुनिक सामायिक व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्रास (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) भेट

 


महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयातील अत्याधुनिक सामायिक व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्रास (कॉमन इन्क्युबेशन सेंटर) दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रामध्ये सुरू असलेल्या उद्योजकता विकास, संशोधन व तंत्रज्ञानविषयक उपक्रमांची पाहणी केली.

भेटीदरम्यान माननीय कृषिमंत्री ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास तसेच शाश्वत शेतीच्या दृष्टीने विकसित करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत त्यांनी आढावा घेतला.

यावेळी विधानसभा सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, मा. आ. श्री. बालाजी कल्याणकर, मा. आ. श्री. राजेश विटेकर, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम व डॉ. हरिहर कौसडीकर तसेच अन्न तंत्र महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी सामायिक उष्मायन केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची, विकसित तंत्रज्ञानाची तसेच शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या माध्यमातून उद्योजकता निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माननीय कृषिमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.

शेतीमालाचे प्रक्रिया व मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासोबतच ग्रामीण भागात रोजगार व उद्योगाच्या संधी निर्माण करण्यासाठी विद्यापीठाच्या सामायिक उष्मायन केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.