Friday, March 6, 2026

करडई पिकाच्या उत्पादनाबरोबर तेलाच्या प्रमाणालाही महत्त्व देणे आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत करडई शेती दिन व विचारमंथन कार्यक्रम दिनांक ६ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

विचारमंथन सत्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामान परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी सुधारित वाण, शास्त्रोक्त पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन शेती अधिक लाभदायक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.तसेच करडई पिकाच्या उत्पादनाबरोबरच त्यातील तेलाच्या प्रमाणाला महत्त्व देण्यावर विशेष भर दिला. करडई हे आरोग्यदायी तेलबिया पीक असून त्याच्या मूल्यवर्धन व बाजारपेठेच्या संधी वाढविण्यासाठी संशोधन, प्रक्रिया व विपणन यांना चालना देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर हे होते, त्यांनी महाराष्ट्रात करडई पिकाचे क्षेत्रविस्तार व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

या विचारमंथन कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. बी. डी. आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच डॉ. हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळच्या सत्रात शास्त्रज्ञांनी डीबीटी प्रकल्प तसेच ८०० पेक्षा अधिक करडई जर्मप्लाझम ट्रायल्सना भेट देऊन विविध वाणांची पाहणी केली. यावेळी भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर यांनी भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी संशोधन संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, तेलबिया संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कादिर वेल, डॉ. आर. डी. प्रसाद, डॉ. जी. डी. सतीश कुमार, डॉ. बी. एन. मोटागी (कर्नाटक), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. एच. जे. राजपूत व डॉ. संदीप दिघुके यांनीही सहभाग नोंदविला.

यानंतर केंद्रीय शेतावर राबविण्यात येत असलेल्या २५० एकर करडई बीज उत्पादन कार्यक्रमाला शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी मनोली, जांब, वालूर व सोनना (जि. परभणी) येथील सुमारे ५० शेतकरी उपस्थित होते. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून करडई पिकाच्या सुधारित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

शेतकरी–शास्त्रज्ञ संवादादरम्यान डॉ. संतोष शिंदे यांनी शेतकऱ्यांना करडई उत्पादनातील अडचणींबाबत मार्गदर्शन करून त्यांचे निरसन केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धूतमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. ए. शिंदे, डॉ. व्ही. आर. घुगे, डॉ. एस. व्ही. वाघमारे, श्री. व्ही. एम. पांचाळ, डॉ. स्नेहल शिलेवंत व श्री. एम. आर. मगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आर. आर. धूतमल यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. फरिया खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष शिंदे यांनी मानले.







वनामकृविच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन केंद्राला भाकृअपच्या तेलबिया संशोधन संस्थेच्या संचालकांची भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राला दिनांक ६ मार्च २०२६ रोजी भाकृअपच्या हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे (ICAR–Indian Institute of Oilseeds Research) माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर यांनी भेट दिली. यावेळी तेलबिया संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कादिर वेल, डॉ. आर. डी. प्रसाद, डॉ. जी. डी. सतीश कुमार तसेच विद्यापीठाचे डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश धुतमल, डॉ. अनंत लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय संचालक डॉ. आर. के. माथुर म्हणाले की, सेंद्रिय शेतीमालाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. शेतकरी गट तयार करून प्रक्रिया, मूल्यवर्धन व ब्रँडिंग केल्यास शेतीमालाला अधिक चांगला दर मिळू शकतो. तसेच फळे व भाजीपाला पिकांमध्ये प्लास्टिकविरहित मल्चिंगचा वापर करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. आनंद गोरे यांनी केंद्रात सुरू असलेल्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीवरील संशोधन व विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी गांडूळ खत संच, दहा ड्रम थिअरी युनिट तसेच लाल कंधारी गाईंचे एकक यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते, अवशेषमुक्त शेतीमालाचे उत्पादन होते तसेच उत्पादनाची साठवण क्षमता (शेल्फ लाइफ) वाढते, असे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. अनंत लाड यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीतील पीक संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत प्रमुख पाहुण्यांना माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान शेतकरी व शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली तसेच अनुभवांची देवाणघेवाण केली.





पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी ज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

समाजातील एखादी व्यक्ती किती मोठी आहे हे तिच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या वाटपावरून ठरते. स्वतःला मिळालेली ज्ञानाची शिदोरी इतरांसोबत वाटण्यात जी व्यक्ती धन्यता मानते, तीच व्यक्ती समाजाच्या हृदयात स्थान मिळवते. त्याच धर्तीवर शासनाकडून पुरस्काराने सन्मानित झालेल्या शेतकऱ्यांनी किमान दहा शेतकरी आपल्या बरोबरीचे घडवावेत, अशी अपेक्षा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.

ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील कृषि तंत्र विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ६ मार्च २०२६ रोजी आयोजित कृषिधारा जिल्हास्तरीय कृषि महोत्सवात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य व देशात एकीकडे काही प्रगत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेत आहेत. त्यांनी अवलंबलेले तंत्रज्ञान व मिळवलेली माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्व शेतकरी प्रगतीच्या एकाच स्तरावर येऊ शकतील. यासाठी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील तंत्रज्ञान व अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत.

विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून कार्य करत असून माझी ओळख ‘शेतकऱ्यांचा कुलगुरू’ म्हणून झाली आहे, हे माझ्यासाठी नक्कीच भूषणावह आहे. शेतकरी समाजातील एक आदर्श घटक आहे. ते शेतीत उत्तम काम करतात; मात्र त्या कामाची नोंद ठेवत नाहीत. पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्रे व नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयक कामांची वैयक्तिक नोंदवही ठेवण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे होते. यावेळी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, डॉ. संजय पाटील, डॉ. दीप्ती पाटगावकर, आत्मा प्रकल्प संचालक सौ. धनश्री जाधव, उपविभागीय कृषि अधिकारी सौ. अश्विनी पठारे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्ता मुळे, कृषि उपसंचालक श्री. दीपक गवळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

विभागीय कृषि सहसंचालक सुनील वानखेडे म्हणाले की, शेतकरी चांगले उत्पादन घेतात; मात्र विक्री व्यवस्थेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा महोत्सवांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची थेट विक्री करण्याची संधी मिळते आणि त्यातून अधिक उत्पन्नही मिळू शकते.

प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकार काही पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. भरडधान्य, कडधान्य व तेलबिया पिकांचे महत्त्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पटवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सूत्रसंचालन श्री. संजीव साठे यांनी केले, तर आभार उपविभागीय कृषि अधिकारी सौ. अश्विनी पठारे यांनी मानले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. पांडुरंग इनामे, श्री. दादासाहेब शिंदे, शेतकरी शास्त्रज्ञ श्री. यज्ञेश कातबने, श्री. लक्ष्मण आहेर, श्री. बाबासाहेब पडूळ यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









कृषि शिक्षणाबरोबर कौशल्य विकासालाही प्राधान्य द्या – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

बदलत्या काळात कृषि क्षेत्र झपाट्याने आधुनिक होत असून या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, तांत्रिक ज्ञान आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व लिहाखेडीच्या कृषि महाविद्यालयास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी दिनांक ६ मार्च २०२६ रोजी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) व सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे, उपआयुक्त कौशल्य विकास श्रीमती विद्या शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि विज्ञान केंद्राच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ  दीप्ती पाटगावकर आदी मान्यवरांची उपस्थित होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरूंनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कृषि क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अचूक शेती (प्रिसिजन फार्मिंग), जैविक शेती, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल कृषि आणि कृषि स्टार्टअप्स या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा उपयोग शेती आणि कृषि व्यवसायात करण्याची तयारी ठेवावी.

तसेच विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्स विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभावी संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना, नेतृत्वगुण आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ही कौशल्ये विकसित केल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते आणि भविष्यातील करिअरसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते.

उपआयुक्त कौशल्य विकास विद्या शितोळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पदवी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाशी संबंधित प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतात. विविध सरकारी व खासगी संस्थांमार्फत कृषि प्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योग, मशरूम उत्पादन, मधमाशी पालन, शेती आधारित उद्योग आणि कृषि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी कृषि क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

यादरम्यान माननीय कुलगुरूंनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर गहू बीजोत्पादन, ट्रायकोकार्ड निर्मिती प्रयोगशाळा तसेच ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रिया व त्याचा उपयोग याबाबत माहिती घेतली व कार्याचे कौतुक केले.

यावेळी कृषि महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रीनाथ ज्ञानेश्वर चव्हाण याचा येसमिट संस्थेकडून उद्योजकतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थी अभय पालवे याने भारतीय लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय मुळे, कृषि उपसंचालक श्री. दीपक गवळी, कृषि विकास अधिकारी श्री प्रकाश पाटील तसेच कृषितंत्र विद्यालय व राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.








Thursday, March 5, 2026

वनामकृवित जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि माय भारत, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी १८ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांची विचारशक्ती व निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक त डॉ. भगवान आसेवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणीच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पंडित निर्मल, डॉ. कल्याण गांगुर्डे, डॉ. सुरेश भालेराव, डॉ. हर्षा सूर्यवंशी, डॉ. सुरेंद्र रोडगे आणि डॉ. धम्मपाल कांबळे यांनी काम पाहिले. परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे राज्यस्तरीय “विकसित भारत युवा संसद २०२६” साठी खालील विद्यार्थ्यांची निवड केली.

१. वैष्णवी एकनाथ शितळे – उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी
२. गायत्री रंगनाथराव लाड – श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी
३. महेश गणेश लांगे – केकेएम महाविद्यालय, मानवत
४. अभिषेक सुरेश हिवराळे – कृषी महाविद्यालय, परभणी
५. शेजल श्रीकांत काळे – पी.डी. जैन होमिओपॅथिक महाविद्यालय, परभणी

कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढविण्यासह सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्याची संधी मिळाली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.







माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली डफवाडी (ता.परभणी) येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न

 एकात्मिक खत व्यवस्थापनातून जमिनीचे आरोग्य राखण्याचा डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सल्ला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत डफवाडी (ता. जि. परभणी) येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ मार्च २०२६ रोजी संपन्न झाला.

या प्रशिक्षण शिबिरात उपसंशोधन संचालक व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी परिसरातील आंबा, कांदा, गवार व भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने बीज प्रक्रिया, जैविक खते, सेंद्रिय खते, विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करून एकात्मिक खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष आंबा बागेत प्रात्यक्षिकाद्वारे जमिनीचे आरोग्य व पीक पोषणासंबंधी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरणही करून दाखविले. तसेच त्यांनी डफवाडी व उमरी माळ्याची (ता. परभणी) परिसरातील सहभागी शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या सेवा व उपलब्ध कृषि निविष्ठांविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठाच्या अधिकाधिक संपर्कात राहावे, असे आवाहन केले.

मृद विज्ञान विभागातील दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना तसेच प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट करत रासायनिक खतांच्या अति वापराचा जमिनीवर होणारा परिणाम आणि पिकांची उत्पादकता याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी रासायनिक खतांचा संतुलित व मर्यादित वापर, माती परीक्षण आणि जैविक खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या प्रशिक्षण शिबिरात विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते, सेंद्रिय खते व जैविक खतांच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यापीठाद्वारे उत्पादित जैविक खत एनपीके कन्सोरशियम, सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते व विद्राव्य खतांचे प्रतिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना वितरणही करण्यात आले. यावेळी माती परीक्षण, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व जैविक खतांचा योग्य वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

हे शेतकरी प्रशिक्षण शिबिर श्री. नागोराव कांबळे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून फळझाडे व भाजीपाला पिकांतील पोषण व्यवस्थापनासंबंधी समस्यांचे निराकरण करून घेतले. यामध्ये प्रताप नामदेव कांबळे, सिद्धार्थ नागोराव कांबळे, नागोराव शंकर कांबळे, शेख मंजूर शेख अलाउद्दीन, शेख मुश्ताक शेख मंजूर, अन्सार खा अकबर खा, भास्कर साळवे, विकास माने, तुळशीराम मस्के, नारायण मस्के, रामभाऊ मस्के, सीताराम मस्के, प्रविण संभाजी कांबळे, सचिन नारायण कांबळे, ज्ञानोबा कोंडिबा कांबळे, अंकुश पारतकर आदींसह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.





वनामकृवित विद्यार्थ्यांसाठी ‘युथ हॅपिनेस प्रोग्राम’चा शुभारंभ; २१० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन वाढीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत युथ हॅपिनेस प्रोग्राम या विशेष अभ्यासक्रमाचे दिनांक ४ ते ८ मार्च २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

अभ्यासक्रमाचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ मार्च रोजी संपन्न झाले. या वेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, तसेच विद्यापीठाचे माजी वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षक डॉ. सुब्बाराव आणि प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थी अवस्थेत ताण-तणाव कमी करण्याची गरज अधोरेखित करत जीवन जगण्याची कला आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यापीठ विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी समजून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमाद्वारे सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करावा, मन स्थिर ठेवून योग्य दिशेने विचार कसे घडवावेत हे शिकता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच स्वतःही या अभ्यासक्रमातील क्रिया नियमित करत असल्याने मनातील विचारांवर नियंत्रण ठेवता येऊन आनंदी जीवन जगण्यास मदत होत असल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. या अभ्यासक्रमाचे विविध टप्पे असून सध्या विद्यार्थ्यांना मूलभूत अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक निर्णय घेण्यासही मदत होईल, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. सुब्बाराव यांनी सांगितले की, विद्यापीठात आर्ट ऑफ लिव्हिंग उपक्रमाची सुरुवात मे २००२ मध्ये झाली होती. त्या वेळी केवळ २३ जणांनी प्रशिक्षण घेतले होते, ज्यामध्ये या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरूंच्या कुटुंबातील चार सदस्य तसेच विद्यापीठाचे तीन संचालक सहभागी होते. पुढील काळात या उपक्रमाचा विस्तार होत जाऊन विद्यापीठात शंभरहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज या उपक्रमाचा वटवृक्ष होऊन हा दैदीप्यमान कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

श्री. श्रीकांत पंडित यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, या अभ्यासक्रमाद्वारे ऊर्जा विकास, क्षमता वृद्धी, आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण यांचा विकास घडविला जातो. तसेच जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन यश मिळविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे आणि  डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले

सूत्रसंचालन व आभार डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले, तर अनुराग कोंडे यांनी प्रशिक्षक श्री. श्रीकांत पंडित यांचा परिचय करून दिला. या अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांसह कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.