Friday, September 11, 2026

शेती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा बैलपोळा वनामकृवित उत्साहात साजरा

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीतील महत्त्वपूर्ण सण असलेल्या बैलपोळ्यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र आणि कृषि विद्या विभागासह विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रीय कार्यालयांमध्ये दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी बैलपोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विद्यापीठ परिसरातील बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी कापड, गोंडे व मणीमाळांनी आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच बैलांच्या शिंगांना विविध रंग लावून पारंपरिक पद्धतीने त्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शेती, बैल, पाऊस, जमीन आणि निसर्ग यांचा परस्परांशी अतिशय घट्ट संबंध आहे. बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी निसर्गाशी असलेले आपले नाते जपण्यासोबतच शेतीच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शेतीच्या कामात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे महत्त्वपूर्ण स्थान असून, त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बैलपोळ्यानिमित्त त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र आणि कृषि विद्या विभागात अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून त्यांना नैवेद्य खाऊ घालण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पशुसंवर्धन विभागातील डॉ. नरेंद्र कांबळे, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. दत्ता बैनवाड, श्री. शैलेश मुंडे, श्री. प्रशांत गटशिरले, श्री. सोनटक्के, श्री. परमेश्वर गायकवाड तसेच कृषि विद्या विभागातील डॉ. मेघा जगताप, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. आशा चव्हाण, डॉ. ज्योती गायकवाड, श्री. शहाजी ढोले यांच्यासह दोन्ही विभागांतील विद्यार्थी व मजूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याबरोबरच विद्यापीठाच्या मुख्यालयासह कार्यक्षेत्रातील विविध कार्यालये व प्रक्षेत्रांमध्येही बैलपोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.





Thursday, September 10, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात वनामकृविच्या करडई वाणांचा राष्ट्रीय ब्रीडर बियाणे वाटपात दबदबा

राष्ट्रीय स्तरावरील १६१.३३ क्विंटलपैकी ८४.५ क्विंटल बियाणे वनामकृविच्या वाणांचे; ५२.३८ टक्के वाटा


भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या तेलबिया विभागामार्फत रब्बी २०२६–२७ हंगामासाठी करडईसह विविध तेलबिया पिकांच्या ब्रीडर बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्याची गुणवत्ता, बियाणे वितरणाचा मागोवा घेण्याची व्यवस्था तसेच निर्धारित मुदतीत बियाणे उचलण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने (वनामकृवि) करडई पिकाच्या संशोधन आणि ब्रीडर बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, संशोधनाला दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि भक्कम प्रशासकीय पाठबळ यामुळे विद्यापीठाच्या करडई संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक मान्यता मिळत असल्याचे या वाटपातून अधोरेखित झाले आहे.

रब्बी २०२६–२७ हंगामासाठी देशभरात करडई पिकासाठी एकूण १६१.३३ क्विंटल ब्रीडर बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी तब्बल ८४.५ क्विंटल म्हणजेच ५२.३८ टक्के ब्रीडर बियाणे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई वाणांचे आहे. राष्ट्रीय स्तरावरील एकूण ब्रीडर बियाणे वाटपापैकी निम्म्याहून अधिक वाटा वनामकृविच्या वाणांना मिळणे ही विद्यापीठाच्या करडई संशोधनाची राष्ट्रीय स्तरावरील स्वीकारार्हता, गुणवत्ता आणि प्रभाव अधोरेखित करणारी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

वनामकृविच्या करडई वाणांना मिळालेले ब्रीडर बियाणे वाटप

विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई वाणांमध्येपीबीएनएस १५४(परभणी सुवर्णा) या सन २०२३ मध्ये अधिसूचित वाणासाठी ४८ क्विंटल, पीबीएनएस १८४ या सन २०२२ मध्ये अधिसूचित वाणासाठी २८.५ क्विंटल, तरपीबीएनएस – १२(परभणी कुसुम) या सन २००७ मध्ये अधिसूचित वाणासाठी ८ क्विंटल ब्रीडर बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्येपरभणी सुवर्णा’ या अलीकडेच अधिसूचित झालेल्या वाणाला मिळालेले ४८ क्विंटलचे सर्वाधिक ब्रीडर बियाणे वाटप विशेष उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांच्या गरजा आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या या वाणाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेली मागणी ही त्याची उपयुक्तता आणि स्वीकारार्हता अधोरेखित करणारी आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने संशोधन, गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती आणि शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान प्रसाराला सातत्याने प्राधान्य दिले आहे. विद्यापीठ प्रशासन, करडई संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञ तसेच बियाणे उत्पादन व संबंधित कामकाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वनामकृविच्या करडई वाणांना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात ब्रीडर बियाणे वाटप मिळणे शक्य झाले आहे.

करडई संशोधनातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी करडई संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, वनामकृविच्या करडई वाणांना मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील हा मोठा वाटा विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सुरू असलेल्या शेतकरीहितैषी, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक कृषि संशोधनाची पावती आहे. भविष्यात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर करडईसह विविध तेलबिया पिकांसाठी अधिक उत्पादक, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत वाण विकसित करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांना या यशामुळे निश्चितच बळ मिळेल.

विद्यापीठाच्या करडई संशोधनाची ही उल्लेखनीय कामगिरी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली संशोधनाला मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि संस्थात्मक पाठबळ यांचे फलित असल्याचे करडई पैदासकार डॉ. आर. आर. धुतमल आणि माजी करडई पैदासकार डॉ. एस. बी. घुगे यांनी नमूद केले.

या वाणांच्या विकासामध्ये माजी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, करडई पैदासकार डॉ. आर. आर. धुतमल, माजी करडई पैदासकार डॉ. एस. बी. घुगे तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधन प्रयत्नांमुळे वनामकृविच्या करडई वाणांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.


पीबीएनएस १५४(परभणी सुवर्णा) 

पीबीएनएस १८४
पीबीएनएस – १२(परभणी कुसुम)


Wednesday, September 9, 2026

वनामकृवितील कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या औद्योगिक कार्यानुभव प्रशिक्षणास प्रारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चार आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणास दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रारंभ झाला. हे प्रशिक्षण दिनांक ८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नामांकित ठिबक सिंचन कंपनी नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. शिवाजी सांगळे उपस्थित होते. कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरीश आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणात कृषि महाविद्यालयातील अंतिम सत्राचे एकूण ८० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कृषिशी संबंधित उद्योग, प्रक्रिया उद्योग, कृषि सेवा संस्था तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. संजय पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्व-उन्नती साधून रोजगार व उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाची आजच्या स्पर्धात्मक युगातील गरज स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाचा गांभीर्याने व पूर्ण क्षमतेने लाभ घेऊन भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीलाही प्राधान्य द्यावे, असे सांगून महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी यावर्षी विशेष डिजिटल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मेहनत व सातत्याने प्रयत्न केल्यास त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय पूर्णपणे सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. हरीश आवारी यांनी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची कृषि व कृषि उद्योगातील वाढती भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळात तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. शिवाजी सांगळे यांनी चार आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची रूपरेषा स्पष्ट केली. पाण्याचे काटेकोर व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचे महत्त्व त्यांनी विशद केले. तसेच ठिबक सिंचन प्रणाली, त्यातील विविध साहित्य, तंत्रज्ञान आणि नेटाफिम कंपनीच्या कार्यपद्धतीची विद्यार्थ्यांना माहिती करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिर्झा बेग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. मिर्झा बेग, डॉ. जाधव, डॉ. बरकुळे, डॉ. अमोल जाधव तसेच संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





करडगाव येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

 शेतकरी देवो भव’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांशी संवाद; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा

हवामान बदलाच्या परिस्थितीत ‘त्रिशूल तंत्रज्ञान’ आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. हरीश आवारी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा अभिनव कृषि विस्तार उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, प्रक्षेत्र भेटी, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात.

या उपक्रमांतर्गत दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी करडगाव (ता. व जि. परभणी) येथे शेतकरी संवाद व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध विषयांवरील तज्ज्ञ मार्गदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्रिशूल तंत्रज्ञान’ आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवणे, सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपाद्वारे त्याचा उपसा करणे आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना गरजेनुसार पाणी देणे, या तीन बाबी त्रिशूल तंत्रज्ञानाचे प्रमुख घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादनक्षमता वाढविता येते. तुरीसारख्या पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ६० टक्क्यांपर्यंत पाणी बचत होऊ शकते. त्यामुळे पारंपरिक पाट सिंचनाच्या तुलनेत उपलब्ध पाण्यात सुमारे दोन ते अडीच पट अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते, असे डॉ. आवारी यांनी सांगितले. कमी पाण्यात येणारी तसेच बाजारपेठेत चांगली मागणी आणि दर असलेली पिके निवडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तुरीचे उत्पादन घेऊन एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याचे अनुभव विविध शेतकऱ्यांनी घेतले असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन केले.

कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे यांनी पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच सुखा रक्षक’ ॲपचा वापर याबाबत मार्गदर्शन केले.

सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे यांनी सिंचन व्यवस्थापन व ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री. भास्कर सुरनर यांनी पिकांवरील कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील सहाय्यक लेखाधिकारी, संशोधन व उपनियंत्रक श्री. नामदेवराव वल्लमवाड यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने केले. यावेळी ४८ शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माऊली खिस्ते यांनी केले.

कार्यक्रमानंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्र भेट देऊन विविध पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमात अशोक किसनराव मुंढे, अमोल यशवंतराव भिसे, दत्तराव रामराव मुंढे, सुरेश रामचंद्र वल्लमवाड, अर्जुन दगडीराम वल्लमवाड, सूर्यकांत मुरलीधर वल्लमवाड, सुदाम उत्तमराव मुंढे, कोंडीबा मुंडे, विनायक मुंढे, शिवाजी दगडीराम वल्लमवाड, दिलीप बाबुराव कुलकर्णी, अजय आसाराम वल्लमवाड, रावसाहेब बाबुराव मुंढे, माऊली नामदेवराव खिस्ते, महेश सुदामराव मुंढे यांच्यासह करडगाव येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.






५४ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीला दापोलीत उत्साहात प्रारंभ; कृषि संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर

 

राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये विकसित झालेल्या संशोधन तंत्रज्ञानांचा आढावा घेण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय केला जात आहे.

बैठकीचा उद्घाटन समारंभ दिनांक ९ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरत गोगावले होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव माननीय डॉ. परिमल सिंह (भाप्रसे), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ), डॉ. संजय भावे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), डॉ. शरद गडाख (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) आणि डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ) यांच्यासह महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य श्री. विनायक काशिद, कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रभावी कृषि संशोधनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. चारही कृषि विद्यापीठांनी परस्पर समन्वयातून संशोधन व विस्तार कार्याला अधिक गती देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री माननीय ना. श्री. भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी कृषि क्षेत्रातील सर्व घटकांनी कटिबद्धतेने कार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र फलोत्पादन क्षेत्रात देशात आघाडीवर असून, कृषि विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार कार्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कृषि विद्यापीठांतील संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कृषि राज्यमंत्री राज्यमंत्री माननीय ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी कृषि विद्यापीठांच्या संशोधन कार्याचे कौतुक करताना कोकणातील आंबा व काजू लागवड क्षेत्राच्या विकासात विद्यापीठाच्या संशोधनाचे योगदान अधोरेखित केले. प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार कृषि विकासाचे नियोजन करून देशाच्या कृषि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांनी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत वनामकृविच्या संशोधन कार्याला अधोरेखित स्थान

या राज्यस्तरीय बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचे प्रभावी प्रतिनिधित्व झाले. हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान, शेतकरीकेंद्रित संशोधन आणि कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या कृषिविषयक एकूण ५५ प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचाउत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांना यावर्षीचाउत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारा ठरला.

बैठकीदरम्यान मान्यवरांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या बांबू प्रक्रिया, रबर लागवड आणि मसाला पिके आदी प्रक्षेत्रांना भेट देऊन तेथील संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

या तीन दिवसीय बैठकीस वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्यासह विद्यापीठातील सुमारे ५० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. राज्यातील अन्य तीन कृषि विद्यापीठांमधील जवळपास ३०० शास्त्रज्ञ व अधिकारी अशा एकूण ३५० हून अधिक शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांच्या सहभागाने विविध कृषि संशोधन विषयांवर सखोल विचारमंथन होत आहे.


५४ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीत वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांचा ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्काराने गौरव

राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये विकसित करण्यात आलेल्या विविध संशोधन निष्कर्षांचा आढावा घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे.

या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीचा उद्घाटन समारंभ दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री माननीय ना. श्री. भरत गोगावले हे होते, कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव डॉ. परिमल सिंग (भाप्रसे), पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ), माननीय डॉ. संजय भावे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), माननीय डॉ. शरद गडाख (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) व माननीय डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ), महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य माननीय श्री. विनायक काशिद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांचा ‘उत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. कृषि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य, संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभदायी तंत्रज्ञान व वाण उपलब्ध करून देण्यासाठी दिलेले योगदान तसेच कृषि संशोधनाला प्रभावी दिशा देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. भगवान आसेवार यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले.

डॉ. भगवान आसेवार यांच्या या सन्मानाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. भगवान आसेवार यांच्या या गौरवामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

यापूर्वीही डॉ. भगवान आसेवार यांनी कोरडवाहू शेती, पीके आणि पीक पद्धती, पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कृषी हवामानशास्त्र आणि वातावरण बदल या क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष संशोधनाची दखल घेऊन त्यांना नवी दिल्ली येथी भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वारा कोरडवाहू शेती संशोधन आणि त्याचे अवलंबन याकरिता वसंतराव नाईक पुरस्काराने २०१८ मध्ये गौरविण्यात आले.





Tuesday, September 8, 2026

पावसाच्या खंड काळात पीक व्यवस्थापनासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घ्या – तज्ज्ञांचे आवाहन

 वनामकृवित ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी मार्गदर्शन

मराठवाडा विभागात पावसाच्या अनियमित व असमान वितरणामुळे निर्माण होणाऱ्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन, संरक्षित सिंचन, आंतरमशागत, तण नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना तातडीने अवलंबाव्यात, असे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथील प्रगतशील शेतकरी श्री. सूरज जयपाल जाधव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन’ या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात श्री. सूरज जाधव यांनी पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आनंद गोरे होते.

मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पर्जन्याधारित व कोरडवाहू असून, हवामान बदलामुळे पावसाच्या आगमनापासून ते वितरणापर्यंत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाचे उशिरा आगमन, पेरणीनंतर दीर्घ खंड, कमी कालावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड अशा परिस्थितीचा थेट परिणाम पिकांच्या उगवण, वाढ, फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेवर होत आहे. त्यामुळे केवळ वार्षिक पर्जन्यमानाचा विचार न करता पावसाची वेळ, वितरण, तीव्रता आणि पावसातील खंड यानुसार शेतीविषयक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तातडीच्या उपाययोजनांवर भर

पावसाच्या खंड काळात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीक व जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे. संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांच्या संवेदनशील अवस्थेत सिंचन करावे. कपाशी, तूर यांसारख्या पिकांमध्ये पावसाचे पाणी शेतात मुरविण्यासाठी योग्य वेळी सऱ्या काढणे, आंतरमशागत करून जमिनीतील भेगा बुजविणे आणि तण नियंत्रणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष व आच्छादनाचा (Mulching) वापर करावा. पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला.

पावसाच्या खंडाच्या काळात पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन अन्नद्रव्यांच्या फवारणीबाबत कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. उपलब्ध परिस्थितीनुसार पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

अष्टसूत्री’द्वारे पीक संरक्षणाचा संदेश

पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी पीक व जमिनीचे निरीक्षण, उपलब्ध पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन, जलसंधारण, तण नियंत्रण, आंतरमशागत, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, आच्छादन आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन या अष्टसूत्रीवर विशेष भर द्यावा, असा संदेश देण्यात आला.

जैविक निविष्ठा, बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा आदींचा शिफारशीनुसार योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

दीर्घकालीन नियोजनातून कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करण्याचे आवाहन

कोरडवाहू शेतीमध्ये केवळ तातडीच्या उपाययोजना पुरेशा नसून, दीर्घकालीन हवामान-सक्षम शेतीचे नियोजन आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये मृद व जलसंधारण, बांधबंदिस्ती, चर घेणे, पीक व पीक पद्धतीचे नियोजन, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांचा समावेश करावा.

तसेच ‘शिवारातील पाणी शिवारात आणि शेतातील पाणी शेतात’ या संकल्पनेनुसार विहीर व कूपनलिका पुनर्भरण, शेततळ्यांची उभारणी आणि त्यातील पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांची स्वतःची ‘जल बँक’ निर्माण होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

बियाणे बँक’, ‘अन्नद्रव्य बँक’ आणि ‘अवजारे बँक’ ही काळाची गरज

शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून ‘बियाणे बँक’ निर्माण करावी. स्वतःच्या शेतासाठी आवश्यक दर्जेदार बियाणे राखून ठेवणे किंवा तयार करणे यामुळे बियाण्यावरील खर्च कमी होण्याबरोबरच वेळेवर बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल.

शेतावरच शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट इत्यादी तयार करून ‘अन्नद्रव्य बँक’ विकसित करता येईल. त्याचप्रमाणे वेळेवर शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी ‘अवजारे बँक’ निर्माण करून बीबीएफ यंत्रे, बूम स्प्रेअर व इतर कृषी यंत्रांचा सामूहिक वापर केल्यास यंत्रसामग्रीवरील खर्च कमी करता येईल, असे मार्गदर्शन करण्यात आले.

एकात्मिक शेती पद्धतीमुळे उत्पन्नाचे विविध स्रोत

हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता शेतकऱ्यांनी केवळ एका पिकावर अवलंबून न राहता एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. मुख्य पिकांसोबत भाजीपाला, फळपिके, मसाला पिके, फुलशेती तसेच बांधावर शेवगा, कढीपत्ता यांसारख्या पिकांचा समावेश करावा. यासोबत दुग्ध व्यवसाय, म्हैसपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, अळिंबी उत्पादन आदी पूरक व्यवसाय जोडल्यास उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होऊन कोरडवाहू शेतीची जोखीम कमी करता येते.

शेतकरी गटांच्या माध्यमातून निविष्ठांची सामूहिक खरेदी, कृषी उत्पादनाची एकत्रित विक्री, प्रक्रिया व मूल्यवर्धन तसेच बाजारपेठेचा अभ्यास केल्यास उत्पादन खर्च कमी करून शेतमालाला चांगला दर मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्याच्या पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता हवामानानुसार योग्य वेळी योग्य निर्णय’ घेण्याचा संदेश देण्यात आला. उपलब्ध पाणी, जमीन आणि पिकांची अवस्था यांचा विचार करून शास्त्रीय व स्थानिक अनुभवाधारित तंत्रज्ञानाचा समन्वय साधल्यास प्रतिकूल हवामानातही पीक उत्पादनातील जोखीम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, आयोजक तसेच सहभागी शेतकऱ्यांनी सहकार्य केले.