Friday, October 17, 2025

वनामकृविच्या नव्याने विकसित रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’चे वितरण — उत्पादनक्षमतेकडे विद्यापीठाचा अभिनव टप्पा

 ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ ध्येयाची ठोस अंमलबजावणी .... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ज्वारी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या नव्या रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’ या वाणाचे २३० अद्यरेखा प्रात्यक्षिक संच (FLD) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा विभागातील १२ कृषी विज्ञान केंद्रांना (KVKs) शेतकऱ्यांमध्ये वितरणासाठी देण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, तसेच प्रगतशील शेतकरी व विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य श्री. जनार्दन आवरगंड आणि श्री. भीमराव डोंणगापुरे यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी आपल्या मनोगतात म्हटले की, परभणी सुपरदगडी या नवीन वाणामध्ये उच्च उत्पादनक्षमता, गुणवत्तापूर्ण धान्यनिर्मिती व रब्बी हंगामातील अनुकूलता या तीनही गुणांचा समन्वय साधला आहे. या वाणाचा प्रसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे करून त्यांचे उत्पन्न वाढविणे, हा विद्यापीठाचा प्रमुख उद्देश आहे. संशोधनातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्याचे हे पाऊल म्हणजे विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ या ध्येयाची ठोस अंमलबजावणी आहे.

सदर प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २३० शेतकऱ्यांपर्यंत या वाणाचे बीज संच कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. यामुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ, दुष्काळसहिष्णुता, तसेच शेतकऱ्यांचा विश्वासार्ह उत्पन्नाचा पाया अधिक भक्कम होईल. ज्वारी संशोधन केंद्र, परभणीचे हे पुढाकार शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक पाऊल ठरले आहे.








Wednesday, October 15, 2025

वाई (ता. कळमनुरी) येथे शेतकरी बांधवांशी आत्मीय संवाद साधत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे उत्स्फूर्त स्वागत

वनामकृविद्वारा आदिवासी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक व बायोमिक्स वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि संशोधन केंद्र, बदनापूर (जि. जालना) यांच्या अखिल भारतीय संबंधित संशोधन प्रकल्प (रब्बी पिके–हरभरा) तर्फे आदिवासी उपयोजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाई गावातील अनुसूचित जमातीतील १०० शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक, जिवाणू आणि बायोमिक्स यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनापरभणी चना-१६’, ‘फुले विक्रम’, ‘आकाश’ आणि ‘बीडीएनजी -७९८या हरभरा जातींची उच्च प्रतीची बियाणे देण्यात आली. तसेच हळद पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी बायोमिक्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त आनंदात आणि अतिशय आपुलकीने स्वागत केले. माननीय कुलगुरूंनीही समाजातील ज्येष्ठ तसेच तरुण बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, गरजा आणि आकांक्षा जाणून घेतल्या. विद्यापीठ तुमच्याच विकासासाठी कार्यरत आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्वतःला समाजाचा एक घटक मानून आत्मीयतेने हितगुज साधले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे कार्य केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत वाणांची पोच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत होणे, हा आमचा ध्येयधोरणाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सक्रिय सहभागाने लाभ घ्यावा, आपल्या गावात आधुनिक शेती तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून उत्पादनक्षमता वाढवावी आणि लाभदायी तसेच टिकाऊ शेती प्रणालीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि सहकार्य यांच्या बळावर प्रत्येक गाव ‘स्मार्ट गाव’ बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी एकत्रितपणे साकार करावे, असे आवाहन करत माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान स्वीकारून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.

यावेळी गावातील सरपंच सौ. मीरा विलास मस्के, सहयोगी अधिष्ठाता तथा प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. टी. जाधव, कृषि विद्यापीठाचे डॉ. गजानन गडदे, तालुका कृषि अधिकारी के. एम. जाधव, संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. पी. एल. सोनटक्के, डॉ. एन. आर. पतंगे, आणि डॉ. व्ही. एन. गीते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी “हरभरा व तुर पिकांवरील व्यवस्थापन” या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यात शास्त्रज्ञांनी बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, तसेच कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे वाई गावातील शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभरा लागवडीबाबत नवीन तंत्रज्ञानाची जाणीव निर्माण झाली असून, उत्पादनक्षमता वाढीसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.






अतिवृष्टीग्रस्त धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट – शेतकऱ्यांना दिला धीर, रब्बी हंगामासाठी शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन

 

धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

या वेळी माननीय कुलगुरू यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठ आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याबरोबरच त्यांच्यासोबत आलेल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने रब्बी हंगामासाठी तसेच खरडून गेलेल्या जमिनींच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा (Draft) तातडीने तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौर्‍यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अस्सलकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सूर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. सरडे उपस्थित होते. खोंदला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भेटीत सहभागी झाले.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासन आणि विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करत विविध मागण्या मांडून करत आपल्या व्यथा नमूद केल्या.

पाहणी केल्यानंतर माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना सुचवल्या —

तूर पिकासाठी:

सततच्या पावसामुळे वांझ व मर रोग वाढण्याची शक्यता; त्यासाठी डायमिथोएट (रोगर) 20 मिली + मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (रिडोमिल गोल्ड) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स चार लिटर 250 लिटर पाण्यात मिसळून अळवणी द्यावी.

हरभरा पिकासाठी:

पेरणीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेवटच्या कोळपणीपूर्वी चार किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स एक एकर क्षेत्रासाठी वापरावे.

मोसंबी व फळपिकांसाठी:

अतिवृष्टीमुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा/बायोमिक्स चार किलो प्रति 250 लिटर पाण्यात मिसळून आळवणी द्यावी.

सर्व पिकांसाठी:

पिवळेपणा कमी करण्यासाठी 19:19:19 खत 100 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड-2) 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी तसेच 25% खताची अतिरिक्त मात्रा जमिनीतून द्यावी.

माती खरडून गेलेल्या जमिनींसाठी:

सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत किंवा ग्रीन मॅन्युरिंग करावे. कठीण जमिनीवर उन्हाळ्यात तलावातील गाळ टाकून 15–20 सें.मी. सुपीक थर निर्माण करावा.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समस्या आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे, पूरग्रस्त भागातील शेती पुनरुज्जीवनासाठी माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व कृषि विभाग मिळून समन्वयाने कार्य करणार असल्याची माहिती विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी दिली.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून श्री तुळजाभवानी मातेला विद्यापीठ आणि शेतकरी कल्याणासाठी प्रार्थना

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तुळजापूर (जिल्हा धाराशीव) येथील श्री तुळजाभवानी मातेला विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या शांती, समृद्धी आणि संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी देवीचे दर्शन घेत शेतकरी देवो भव:” या भावनेचा उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत आणि समर्पित प्रयत्न करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. माननीय कुलगुरूंनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ, संशोधक, विद्यार्थी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली. या पूजाअर्चेद्वारे त्यांनी शेतकरी सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि नवीन कल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा संदेश दिला.

या प्रसंगी विद्यापीठातील शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी तसेच पडोळी येथील रेशीम क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी श्री बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या पूजनावेळी शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे. त्याच्या प्रगतीतूनच ग्रामीण भारत समृद्ध होईल, असे मत माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या तिन्हींचा संगम साधण्याचे उपस्थितांना आवाहन केले. श्री. तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ आणि राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी माननीय कुलगुरू आणि उपस्थित मान्यवरांनी प्रार्थना करण्यात आली.



Sunday, October 12, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून डीजीसीएची मान्यता

देशातील कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मोलाचे योगदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून, आता विद्यापीठ ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होणार आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठात आता शेतकरी, विद्यार्थी, कृषि अभियंते व संशोधकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणासह ड्रोन पायलटचे अधिकृत लायसन्स प्राप्त करण्याची सुविधा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी विमान वाहतूक संचालनालय मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठांमध्ये वनामकृवि हे एक महत्वपूर्ण विद्यापीठ ठरले आहे, ज्यामुळे मराठवाडा विभागात कृषि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे.

भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य करत कृषि क्षेत्रासाठी ड्रोन वापराच्या मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedures - SOPs) तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी तीन टप्प्यांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात, कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन संचालनाच्या मानक मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. के. अलागुसुंदरम असून, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यांनी संयोजक म्हणून कार्य केले. दुसऱ्या टप्प्यात, माती व पिकांच्या पोषणासाठी ड्रोनद्वारे फवारणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी मानक तयार करण्यात माननीय कुलगुरुंनी प्रमुख भूमिका बजावली. तिसऱ्या टप्प्यात, पिकानुसार विशिष्ट मानक तयार करणे, तसेच विविध पोषणघटक व जमिनीशी संबंधित घटकांचे ड्रोनद्वारे वितरण यासाठी माननीय कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. याशिवाय कृषि क्षेत्रातील अन्य उपक्रमांसाठी (कीटकनाशक आणि द्रव खत फवारणी व्यतिरिक्त) ड्रोनच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यातून भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या वतीने ड्रोनच्या वापरासाठी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या असून, त्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होत असून, यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती अवलंबता येत आहेत.

कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. विद्यापीठात सध्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) याबरोबरच ड्रोन पायलटसाठी सहा महिन्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर या उपक्रमांवर महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. ड्रोन अभ्यासक्रमांतर्गत आतापर्यंत दोन बॅचमधून एकूण २८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. या प्रशिक्षणामध्ये दहावी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर ड्रोन क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण केला किंवा भारतातील अग्रगण्य कंपन्या तसेच शासकीय संस्थांमध्ये रोजगार मिळवला आहे. तसेच मराठवाड्यातील विविध गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली.

विद्यापीठाच्या ड्रोन तंत्रज्ञानाशी कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, नाहेप प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कृषि क्षेत्रात ड्रोनची क्रांती

शेतीमध्ये कीडनाशकांची फवारणी, खत व्यवस्थापन, पीक सर्वेक्षण, नकाशांकन (mapping), उत्पादन अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, पिकांचे आरोग्य निरीक्षण या सर्व कार्यांसाठी ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरी आणि खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढते. DGCA मान्यताप्राप्त अशा प्रशिक्षणामुळे शेतकरी आणि तरुण विद्यार्थ्यांना कृषि-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी दिशा उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत RPTO केंद्रात प्रवेश सुरू असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.

प्रशिक्षणाची रचना व वैशिष्ट्ये

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) येथे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) येथे DGCA ने ठरविलेल्या मानकांनुसार सहा दिवसांचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात पहिल्या १ ते २ दिवसात सैद्धांतिक (वर्ग) प्रशिक्षण, तिसऱ्या दिवसी सिम्युलेटर प्रशिक्षण तर पुढील ४ ते ६ दिवसी प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण व हाताळणी असे प्रशिक्षणाचे टप्पे असतील.

प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर लॅब, प्रशिक्षित तज्ञ शिक्षक, सुरक्षित उड्डाण क्षेत्र, आणि कृषि फवारणीसाठी सुसज्ज ड्रोन उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अधिकृत परवाना प्राप्त होईल.

दूरस्थ पायलट परवाना’ (Remote Pilot Licence) म्हणजे काय?

ज्या प्रमाणे मोटार वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो, तसेच ड्रोन चालविण्यासाठी ‘दूरस्थ पायलट परवाना’ आवश्यक असतो. हा परवाना फक्त DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था (RPTO) मधून अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच मिळतो.

प्रवेशासाठी पात्रता उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान १०वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक तसेच त्याच्याकडे भारतीय ओळख पत्र असणे आवश्यक आहे. 

शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत नवे करिअर मार्ग

ड्रोन प्रशिक्षणाद्वारे कृषि, सर्वेक्षण व मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण, सुरक्षा व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, कृषि पदवीधरांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.

प्रशिक्षणासाठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे प्रमुख तथा सहायक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे यांचाशी संपर्क साधावा. प्रशिक्षण केंद्राचा पत्ता - कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी – 431402, ईमेल: vnmkv.rpto@gmail.com, मोबाईल क्रमांक ९९००९३१२१४ /९०९६९६७१४२.




Saturday, October 11, 2025

रब्बी हंगामाचे नियोजन विषयक “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा निरंतर उपक्रम 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) यांच्या समन्वयातून शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६७ वा भाग रब्बी हंगामाची पूर्वतयारी, नियोजन व पिकांची निवड” या विषयावर आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या संवाद मालिकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सध्या जमिनीत मुबलक ओलावा उपलब्ध आहे. या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून येणाऱ्या रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस आदी पिकांची नियोजनबद्ध लागवड करावी. यामुळे खरीपातील नुकसानीची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. रब्बी हंगामात शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी हवामान स्थितीचा सविस्तर आढावा घेत, त्यानुसार पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन आणि हवामान आधारित सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पिक व पाणी परिस्थितीचा सखोल आढावा घेत, रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई तसेच कांदा, लसण, बटाटा यांसारख्या भाजीपाला पिकांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जिरे, बडीशेप, ओवा, चिया यांसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी, वाण निवड, पेरणी कालावधी व बाजारपेठेतील संधी याबाबतही उपयुक्त माहिती दिली.

प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स हे सेंद्रिय जैवउपचार एकरी ३ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून वापरण्याचे आवाहन केले. तसेच मर रोगाचा प्रतिकारक्षम असलेल्या विद्यापीठाच्या संशोधित वाणांची निवड करण्याचे सुचवले.

डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी रब्बी हंगामातील पशुधनाचे आरोग्य, पोषण व देखभाल यावर मार्गदर्शन केले, तर सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण कुटुंबांमधील संतुलित पोषण, महिलांचे आरोग्य आणि आहार नियोजन यावर उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमात डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. हनुमान गरुड तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई आणि तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ यांनीही आपले विचार मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ, कृ.वि.के. पोखर्णी) यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

या संवाद सत्रात एकूण ७३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राकेश वाडीले (कृ.वि.के. पोखर्णी) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद मालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यांना आत्मनिर्भर व वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे.


कृषिच्या विद्यार्थी प्रवेशात लक्षणीय वाढ — वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत

 शासकीय कृषि महाविद्यालयातील केवळ १२ जागा रिक्त तर अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून, गेल्या तीन शैक्षणिक वर्षांत विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विद्यापीठाचे शासकीय व संलग्न महाविद्यालयांतील प्रवेश आकडेवारीनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एकूण ३४८२ विद्यार्थी प्रवेशित झाले. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ३८७२ वर पोहोचली, तर सर्वात अलीकडील २०२५-२६ शैक्षणिक वर्षात ४०४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

कृषि आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे कोटे वेगवेगळे असतात. त्यानुसार विद्यापीठाच्या शासकीय कृषि महाविद्यालयातील महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या कोट्यातील केवळ १२ जागा रिक्त असून अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या आहेत. इतर संलग्न शाखांतील ८४ जागा रिक्त असून या जागा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कोट्यातून भरल्या जावू शकतात. तसेच खाजगी कृषि आणि संलग्न अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये एकूण ११५७ जागा रिक्त आहेत.

विशेष म्हणजे कृषि अभियांत्रिकी शाखेतील गेल्या वर्षी केवळ ५० जागा भरल्या, त्या या वर्षी ६८ भरल्या असून, अन्न तंत्रज्ञान या शाखेमधील यापूर्वी रिक्त राहत असलेल्या जागादेखील यावर्षी पूर्णतः भरल्या आहेत. ही आकडेवारी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास दर्शविते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषिक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर आपली भक्कम छाप उमटवली आहे. गेल्या दोन वर्षांत संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यामध्ये साधलेल्या प्रगतीमुळे विद्यापीठाने अनेक मानांकने आणि क्रमवारी पटकावले आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने विद्यापीठास प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान केले असून, विद्यापीठाने ३.२१/४ गुणांसह उच्चांकी स्थान मिळवले आहे. तसेच, भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (IIRF) २०२५ मध्ये विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर ३३वा क्रमांक मिळवत एक मानाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय, कृषि विषयक अग्रगण्य संकेतस्थळअ‍ॅग्रीटेल डॉट कॉम’ ने जाहीर केलेल्या देशातील उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम दहा कृषि विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा समावेश केला आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैवतंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेवर विद्यापीठाचा विशेष भर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल सतत वाढत आहे. हे आमच्यासाठी अभिमानास्पद यश आहे. या वाढत्या प्रवेशसंख्येमुळे मराठवाड्यातील कृषि शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वनामकृविच्या मृद विज्ञान विभागात भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा संपन्न

 मृद विज्ञान विभागाच्या विद्यार्थी संशोधन क्षमतेला वाव देणारी प्रबंध स्पर्धा - विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान विभागात नवी दिल्ली येथील भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेच्या वतीनेदिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय मृद विज्ञान संस्था, परभणी शाखेचे अध्यक्ष व विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशित मंडल (भोपाळ), डॉ. आर. डी. चौधरी (भावनगर, गुजरात), आणि डॉ. व्ही. एस. पाटील (राहुरी कृषि विद्यापीठ) उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. हरिहर कौसडीकर यांनी करताना या स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी त्यांनी परभणी शाखेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.शेवटी त्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या वाटा दाखवतात आणि नवीन शास्त्रज्ञ घडविण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन केले.

या स्पर्धेचे तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. आशित मंडल, डॉ. आर. डी. चौधरी आणि डॉ. व्ही. एस. पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उच्च कौतुक करत त्यांना संशोधनातील सखोलता, भाषिक स्पष्टता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन राखण्याचे मार्गदर्शन दिले.

स्पर्धेत आचार्य पदवीच्या एका विद्यार्थिनीने आणि पदव्युत्तर पदवीच्या चार विद्यार्थ्यांनी आपापले प्रबंध सादर केले. सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी मृद विज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, प्रयोगात्मक निष्कर्ष आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा शिफारसी मांडल्या. या स्पर्धेचा निकाल मृद विज्ञानाच्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये, जो लवकरच कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आयोजित होणार आहे, त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेचे सचिव तथा मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी करून दिला, तर आभार डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मानले.

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वायकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. महेश देशमुख, डॉ. संतोष चिकसे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्वाती झाडे, डॉ. शिलेवंत तसेच आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासह श्री. इंगोले, श्री. जोंधळे आणि श्री. साजिद यांनी परिश्रम घेतले.