हवामानातील सततच्या बदलामुळे होणाऱ्या घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन
आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय
व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेत सोयाबीन पीक लागवडीचे नियोजन या विषयावर
दिनांक १३ मे रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन
मार्गदर्शन संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, तांत्रिक मार्गदर्शक विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे,
सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून २९ मे ते १२ जून दरम्यान शेतकऱ्यांसाठी “विकसित
कृषि संकल्प अभियान” हा विशेष उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय
सहभागी होणार आहे. या उपक्रमात विद्यापीठातील शास्त्रज्ञांची चमू तयार करण्यात
येणार असून त्यांच्यामार्फत ‘पीएम-प्रणाम’ योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार
आहे तसेच पीकनिहाय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित मार्गदर्शन करण्यात येणार
आहे. तसेच १८ मे रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ‘खरीप पीक परिसंवाद
आणि कृषि प्रदर्शनीचे’ आयोजन केले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांचे तसेच प्रगतशील
शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये देखील एकाच ठिकाणी तज्ञ
शास्त्रज्ञांच्या चमूच्या माध्यमातून चर्चा घडवून आणून पिकनिहाय, उद्योजकता विकास,
शेतीस जोडधंदे तसेच वैविधता जपण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल. या
कार्यक्रमात मराठवाड्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे
आवाहन यावेळी त्यांनी केले.
याबरोबरच विद्यापीठात राज्य पातळीवरील संयुक्त संशोधन समितीची
बैठक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील चारही
विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होऊन विविध तंत्रज्ञान, अवजारे आणि शिफारशी विभाग
निहाय देणार आहेत. या सर्व कार्यक्रमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ‘शेतकरी
देवो भव:’ या भावनेतून शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद
केल्रे. यावेळी त्यांनी मराठवाड्यात मागील दोन दिवसात वीज पडून शेतकऱ्यांच्या झालेल्या हानी बद्दल दुःख व्यक्त
केले. तसेच हवामानात सतत बदल होत असल्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी
स्वतःची, कुटुंबाची, पशुधनाची आणि पिकांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तांत्रिक मार्गदर्शनात विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण
गुट्टे यांनी सोयाबीन पीक लागवडीचे नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये
त्यांनी सोयाबीन पिकाचे महत्त्व, पिकास आवश्यक जमीन, हवामान, सोयाबीन पिकाचे विविध
वाण, त्यांची वैशिष्ट्ये, पेरणी करताना बीज प्रक्रिया कशी करावी. याबरोबरच
लागवडीच्या विविध पद्धती, आंतरमशागत, सोयाबीन पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन
अशा विविध बाबीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात १०० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून
प्रश्न विचारले त्यास विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, डॉ. आनंद गोरे यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांचे समाधान केले. प्रास्ताविक
डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार श्रीमती सारीका नारळे यांनी केले. या
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मिटींग, युट्यूब चॅनल,
फेसबुक या सामाजिक माध्यामाद्वारे करण्यात आले.