केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात "विकसित कृषि संकल्प अभियान" राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील मौजे पेडगाव येथे दिनांक ३१ मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी
अभियानातून शाश्वत शेतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, कमी खर्चात अधिक
उत्पादन कसे मिळवता येईल, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, याबरोबरच मृदा आरोग्यात पत्रिकेचे आधारे पीक
व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपारिक तंत्रज्ञान यातून
चांगली पद्धत निवडून त्यावर संशोधन इतर ठिकाणी पोचविणे हे कार्य साध्य होणार आहे. या
अभियानात विद्यापीठ शास्त्रज्ञांचे चमू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या गावात पोहोचत असल्याचे
नमूद केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा
पोत खराब होत असल्याचे सांगून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहनही केले.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठाचा “माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत” हे अभियान
विस्तृत होत आहे. यातून शेतकऱ्यांनी आपले ज्ञान वाढवावे, विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान
शेतकऱ्यांनी आत्मसात करावे, असे सांगत शेतकऱ्यांना त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या शेतीत कसा
प्रभावी वापर करता येईल याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी आधुनिक
तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा शेतीसाठी योग्य उपयोग कसा करता येईल, यावर प्रकाश
टाकला.
नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे डॉ. नरेश
मेश्राम व आर. के. सोनकर यांनी संत्रा, मोसंबी आणि लिंबू
पिकांचे व्यवस्थापन व समस्यांवर मार्गदर्शन केले.
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी खरीप
हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व मशागत, बियाण्यांची निवड, रुंद सरी-वरंबा पद्धत आणि खत व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन कृषी विज्ञान केंद्र, परभणीचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले
यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दिसून आला. ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही यावेळी
दाखविण्यात आले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला.