पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
“पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती” हा महत्त्वपूर्ण संदेश देत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६’ अंतर्गत
एकदिवसीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा व जलजागृती
कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभर
राबविण्यात येणाऱ्या या पंधरवाड्याचा एक भाग म्हणून आयोजित कार्यक्रमास
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
करण्यात आले होते.
यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चंद्रशेखर ताटे, श्री. सलीम शेख तसेच श्रीमती लांजेकर मॅडम यांची प्रमुख
उपस्थिती होती. तसेच विद्यापीठातील पाणी व्यवस्थापन योजनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.
हरीश आवारी, पिक पद्धती योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी.
जाधव, सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस.
बी. जाधव व शास्त्रज्ञ डॉ. विशाल इंगळे
यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
पाण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भविष्यातील गरजा लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन व
व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात होणारी अतिवृष्टीचे योग्य नियोजन
केल्यास पूरस्थितीवर मात करता येऊ शकते. या अतिवृष्टीच्या पाण्याचा लाभ घेवून त्याचे
कालव्यांद्वारे विविध भागात वळवून शेततळे भरून घेणे तसेच विविध जलसंधारण उपाययोजना
राबविल्यास शेतकऱ्यांना व नदीकाठील गावांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जल व्यवस्थापनातील अनेक
समस्या सोडविता येतात, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी
वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डॉ. हरीश आवारी यांनी लाभक्षेत्रातील पाणी वितरण व त्यासाठी आवश्यक
शास्त्रीय बाबींचे सादरीकरण केले. डॉ. के. टी. जाधव यांनी पीक पद्धती संदर्भात
मार्गदर्शन केले, तर डॉ. विशाल इंगळे यांनी अचूक पाणी
नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)
चा वापर कसा करता येईल याविषयी माहिती दिली. डॉ. एस. बी. जाधव यांनी
सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
आभार प्रदर्शन श्री. शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचारी,
विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpeg)
.jpeg)

.jpeg)