Wednesday, August 5, 2026

वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाच्या स्वच्छता पंधरवडा उपक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; व्यसनमुक्त जीवनाचा दिला संदेश

 


विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने दोन महत्त्वाच्या बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पहिली म्हणजे स्वतःच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी, तर दुसरी म्हणजे पूर्णतः निर्व्यसनी जीवनशैलीचा स्वीकार. स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त विद्यार्थीच भविष्यात सुदृढ, सुसंस्कृत आणि प्रगत समाज घडविण्यात प्रभावी योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.ते

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमानिमित्त राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP) येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते कृषी पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

पुढे त्यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ अभियान नसून जीवनशैली आहे, तर निर्व्यसनता ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये जोपासली, तर विकसित भारताच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहील. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी पंजाब नॅशनल बँक आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, कृषी उद्योजकता, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव, तसेच कृषी उद्योग उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर माननीय कुलगुरूंनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. बीजोत्पादन कार्यक्रम, जैविक कीडनियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेली जैविक औषधे, जैवखते, ट्रायकोकार्ड निर्मिती, तसेच शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या विविध संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दीप्ती पाटगावकर, प्रा. दत्तात्रय मुळे, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. आशिष बागडे, डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे, डॉ. रामेश्वर ठोंबरे तसेच अधिकारी, वैज्ञानिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.