Saturday, January 10, 2015

जनुकीयदृष्‍टया परिवर्तीत पीके शेतक-यांच्‍या फायदयाचीच.......कुलगुरू मा.डॉ.बी.व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवीत जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधी एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन 

कार्यशाळेचे उद्घाटनाप्रसंगी दिपप्रज्‍वलन करतांना मानोलीचे प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे, कुलगुरू मा बी व्‍यंकटेश्वरलु, डॉ ओ पी गोवीला, डॉ विभा आहुजा, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ अशोक ढवण, डॉ बी बी भोसले आदी

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
विविध देशात जनुकीय परिवर्तीत पीके ही किड व रोग प्रतिकारक, तणनाशकाशी मुकाबला करणारी, शेतमाल टिकावुपणा व पोषणमुल्‍य वृध्‍दी अशा विविध गुणधर्मांनी संपन्‍न अशी विकसित करण्‍यात आली असुन यामुळे उत्‍पादनवाढ, पर्यावरणाचा समतोल व मशागतीच्‍या खर्चात कपात होऊन शेतक-यांना फायदयाचीच आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेड, नवी दिल्‍ली यांचे संयुक्‍त विद्यमाने दि ९ जानेवारी रोजी जनुकीयदृष्‍टया सुधारित पीकांसंबधीच्‍या विविध पैलुंवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर जनुक अभियांत्रिकी मान्‍यता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला, नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापिका डॉ विभा आहुजा, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की राज्‍यातील शेतक-यांनी बी टी कापसाला मोठा प्रतिसाद दिला असुन स्‍वत: शेतकरी डोळसपणे तंत्रज्ञान अवलंब करित असुन आपआपल्‍या स्‍तरावर तंत्रज्ञानात बदल करीत आहेत. मराठवाडयातील जालना व औरंगाबाद जिल्‍हयात मोठया प्रमाण विविध पीकांचे बियाणे निर्मिती होऊन देशातील अनेक राज्‍यात त्‍याची विक्री होते. मराठवाडयातील कापुस व सोयाबीन ही मुख्‍य जिरायती पीके असुन अनिश्चित हवामानामुळे पीकांची उत्‍पादकता कमी झाली आहे. वनामकृविनेही महाबीजशी साम्‍यजंस्‍य करार केला असुन कपाशीच्‍या एएचएच-४४ (नांदेड-४४)  वाण हे लवकरच जनुकीयदृष्‍टया परिवर्तीत करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
जनुक अभियांत्रिकी मान्‍यता समितीचे सदस्‍य डॉ ओ पी गोवीला आपल्‍या भाषणात म्‍हणाले, तंत्रज्ञानाच्‍या जोरावर देशात हरितक्रांती होऊन अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झाला, परंतु गेली काही वर्षात अन्‍नधान्‍याचे उत्‍पादनात अपेक्षीत वाढ दिसुन येत नाही. यासाठी जैवतंत्रज्ञानाचा आधार आपणास घ्‍यावा लागेल. कपाशीत बोंडअळयाच्‍या नियंत्रणासाठी अमर्याद रासायनिक किटकनाशकाच्‍या फवारण्‍या करून अळींचे नियंत्रण होत नव्‍हते, परंतु बी टी वाणामुळे फवारण्‍या कमी होऊन शकल्‍या, कपाशीत रसशोषण करणा-या किडींना प्रतिकारक वाणासाठीचे संशोधन सुरू आहे. तसेच विविध पीकांत पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणारे जनुकियदृष्‍टया सुधारत वाण येणार असुन यामुळे कमी पाण्‍यात चांगले उत्‍पादन आपणास मिळु शकेल.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले, की देशात जनुकीयदृष्‍टया सुधारित पिकांच्‍या चाचणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहीला आहे. जनुकीय परिवर्तीत पीकांबाबत शेतक-यांत व समाजात समज व गैरसमज निर्माण झाले असुन ते दुर करण्‍यासाठी व समाजात जागृती होण्‍यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सुत्रसंचालन मेघा उमरीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ जी के लोंढे यांनी केले.
सदरिल कार्यशाळेत नवी दिल्‍ली येथील बायोटेक कंसोर्टियम इंडिया लिमिटेडच्‍या मुख्‍य सरव्‍यवस्‍‍थापीका डॉ विभा आहुजा यांनी भारतातील जनुकीय परिवर्तीत पिकांकरिता नियामक पध्‍दतीची माहिती दिली तर डॉ पजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष गहुकर यांनी जनुकीय परिवर्तीत पीकांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. राष्‍ट्रीय पोषण संस्‍थेचे शास्त्रज्ञ डॉ बी दिनेश कुमार यांनी जनुकीय परिवर्तीत पीके व मानवाच्‍या अन्‍नसुरक्षीततावर प्रकाश टाकला तर पुणे येथील राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्‍या मुख्‍य शास्‍त्रज्ञा डॉ विद्या गुप्‍ता यांनी जनुकीय परिवर्तीत पिकांच्‍या विकासातील विविध अवस्‍थेबाबत माहिती दिली. महिको कंपनीचे संशोधक डॉ नरेंद्र नायर यांनी महीको कंपनीचे जनुकीय परिवर्तीत पिकाच्‍या वाण निर्मितीतील भुमिका विषद केली. कार्यशाळेत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी व महिला शेतकरी, कृषि विभागातील कर्मचारी, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना डॉ ओ पी गोवीला

प्रास्‍ताविक करतांना डॉ दत्‍तप्रसाद वासकर

शेतक-यांच्‍या उन्‍नतीसाठी सामुदायिक प्रयत्‍नांची गरज...... मा ना श्री बबनराव लोणीकर


राज्‍यातील शेतक-यांच्‍या होणा-या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासन, राज्‍याचा कृषि विभाग, जिल्‍हा परिषदेचे कृषि विभाग, सामाजिक संस्‍था व कृषि विद्यापीठ या सर्वांनी सामुदायिकरित्‍या शेतक-यांच्‍या उन्‍नतीसाठी कार्य करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्‍वच्‍छतामंत्री मा ना श्री बबनराव लोणीकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ये‍थे दि ९ जानेवारी रोजी विद्यापीठातील वरिष्‍ठ अधिकारी व कर्मचा-यांच्‍या बैठकीत मार्गदर्शन करतांना केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, माजी आमदार अॅड विजयराव गव्‍हाणे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव आदींसह विद्यापीठातील वरिष्‍ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना मा ना श्री बबनराव लोणीकर पुढे म्‍हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेले बदनापुर येथील संशोधन केंद्राने विकसित केलेल्‍या तुर पीकाचे विविध वाण आज संपुर्ण राज्‍यात व देशात पोहचले आहे. शेतकरी आज ढोबळ पध्‍दतीने शेती करीत नसुन शेतक-यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे.  विद्यापीठाचे आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या बांधावर गेले पाहीजे. कृषि विद्यापीठाचे महत्‍व जनतेला समजले पाहिजे. कृषि विद्यापीठ हे शेतक-यासाठी शक्‍तीस्‍थान व आदर्श ठरली पाहिजे, अशी यापेक्षा यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केले. शासन दरबारी कृषि विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले. मा अॅड विजयराव गव्‍हाणे विद्यापीठाचे कृषि संशोधन व शिक्षण बळकट करण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. यावेळी कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाच्‍या कार्याबाबत माहिती देतांना सांगितले, की विद्यापीठाचे तुरच्‍या विविध वाणासह सोयाबीनचे एमएयुएस-१६२ हे वाण शेतक-यांमध्‍ये मोठया्प्रमाणात प्रचलित होत असुन यावर्षी कृषि विभागाच्‍या सहकार्याने सोयाबीनमध्‍ये रूंद वरंबा व सरी पध्‍दतीचा मोठा प्रसार करण्‍यात आला त्‍याचा लाभ शेतक-यांना झाला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतक-यांना दुष्‍काळास्थितीत दिलासा देण्‍यासाठी राबविण्‍यात येत असलेल्‍या विद्यापीठाच्‍या उमेद उपक्रमाची माहिती दिली तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी मोसमी संशोधनाबाबत माहिती दिली. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी कृषि शिक्षणाबाबत तर कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी विद्यापीठाच्‍या कार्यक्षेत्र व कार्याबाबत माहि‍ती दिली. याप्रसंगी विद्यापीठाची कृषि दैनंदिनी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते मा. ना बबनराव लोणीकर यांना भेट देण्‍यात आली. याबैठकीस विद्यापीठाचे विविध म‍हाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.  

Friday, January 9, 2015

हवामान बदलाचा राज्‍यातील शेतीवर मोठा परिणाम.............. डॉ अंजली पारसनीस

वनामकृवित जागतिक मृदा वर्षानिमित्‍त व्‍याख्‍यानाचे आयोजन

वाढता कार्बन डॉय ऑक्‍साइड, नायट्रोजन ऑक्‍साइड व मिथेन वायु आदींचे उत्‍सर्जन हे हवामान बदलाचे मानव निर्मित मुख्‍य कारण असुन हवामान बदलामुळे अनियमीत पाऊस व तापमानाचा राज्‍यातील शेतीवर मोठा परिणाम होत आहे, असे प्रतिपादन द एनर्जी अॅन्‍ड रिर्सोस इन्स्टिटुटच्‍या सहयोगी संचालिका डॉ अंजली पारसनीस यांनी केले.
     युनोच्‍या अन्‍न व कृषि संस्‍थेने २०१५ हे वर्ष जागतिक मृदा वर्ष म्‍हणुन घोषीत केले असुन त्‍या निमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाच्‍या वतीने हवामान बदलाचा महा‍राष्‍ट्रातील शेतीवर परिणाम’ यावर दि ६ जानेवारी रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डी बी देवसरकर, गोळेगाव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिकी महावि‍द्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए एस कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ अंजली पारसनीस पुढे म्‍हणाल्‍या, की हवामानातील बदलामुळे पीकांवरील किड व रोगांचा प्रादुर्भाव असुन पीकांची उत्‍पादकतेत घट होत आहे. पर्जन्‍यमानाच्‍या बाबतीत इस्राईलपेक्षा राज्‍यातील पर्जन्‍य हे आठ पटीने जास्‍त असुन सुयोग्‍य पाणी व्‍यवस्‍थापनाव्‍दारे पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणे आवश्‍यक आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. अध्‍यक्षीय भाषणास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी हवामान बदला व शेती यावर मोठया प्रमाणात संशोधनाची गरज असल्‍याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ विलास पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ हरिहर कौसडीकर यांनी व आभार प्रदर्शन डॉ सुरेश वाईकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Thursday, January 8, 2015

प्राचार्य डॉ विलास पाटील हे शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवागौरव पुरस्कारांनी सन्‍मानित


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठानचा विभागीय स्तरावरील सन २०१४-१५ चा शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवागौरव पुरस्कारांनी दि ३ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे पुरस्‍कार वितरण सोहळात विधान परिषदचे उपसभापती मा ना वसंतरावजी डावखरे यांच्‍या हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी माजी उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री मा आ राजेश टोपे होते तर मा आ सतिश चव्‍हाण, मा आ विक्रम काळे, डॉ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी आर माने, डॉ सुधीर गव्‍हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी आणि मृदविज्ञानातील मागील २५ वर्षात केलेल्‍या योगदानाबद्दल डॉ विलास पाटील यांना हा पुरस्कार देण्‍यात आला असुन त्यांनी माती परीक्षण, दूरस्थसंवेदन, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन यावर विशेष संशोधन केले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक संशोधन लेख त्यांनी सादर केले असुन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. त्‍यांनी जर्मनी, फ्रांस, नेदरलँ, बेल्जियम, तुर्की, इस्रायल, इंग्लंड, थायलंड आदी देशाचे अभ्‍यासदौरे केले असून या देशातील वैज्ञानिकाबरोबर काम केले आहे. जमिनीची सुपीकता पिक उत्पादन या विषयाचे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाचे संयुक्त संशोधन समितीचे समन्वयक म्हणून शेतक-यांसाठी उपयुक्‍त अशा त्‍यांच्‍या १५ पेक्षा जास्त कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या आहेत. जमिनीचे आरोग्य, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कृषीमध्ये दूरस्थ संवेदनाचा उपयोग, पिक उत्पादन, जमिनीची उत्पती तिचे गुणधर्म विषयावर १५० पेक्षा जास्त लेख लिहून प्रसिध्‍द केले असुन अनेक कार्यक्रमात त्‍यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सामाजिक जाणीव ठेवून विद्यापीठातील विद्यार्थ्यांत व समाजामहात्मा गांधीजीचे विचार पोचविण्याचे कार्य त्‍यांनी केले आहे. त्याच्या या कार्याचे माजी पंतप्रधान मा श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी कौतुक करून प्रषतीपत्र देवून गौरविले आहे.