Saturday, April 30, 2022

मौजे उजळंबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्‍मण धोतरे यांना क्रीडा हैद्राबादचा उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कार

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या ३८ व्‍या वर्धापन दिनी दिनांक २५ एप्रिल रोजी श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांना हैद्राबाद येथे “उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ गुरूबच्‍चन सिंग, हैद्राबाद येथील क्रीडा संचालक डॉ व्‍ही के सिंग, माजी कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु, प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम (AICRPDA-NICRA) ही योजना सन २०११ पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्‍हातील मौजे बाभुळगाव आणि मौजे उजळांबा या कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर कोरडवाहू तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पीक प्रात्यक्षिके घेण्यात येतात. यात मौजे उजळांबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्मण धोतरे यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञानांच्या मार्गदर्शनानुसार रुंद वरंबा सरी - बीबीएफ पध्दतीने सोयाबीन पेरणी, सोयाबीनच्या ४ ओळीनंतर बळीराम नांगराने सऱ्या पाडणे, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आदी कोरडवाहू तंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्पादनात भरिव अशी वाढ झाली. यामुळे सदरिल कोरडवाहु तंत्रज्ञानाचा अवलंब गावातील तसेच शेजारील गावातील इतर शेतकरी बांधवानीही अवलंब करित आहेत. त्याबद्दल श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांची उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कारांसाठी निवड झाली. कोरडवाहु कृषि तंत्रज्ञानाबाबत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्य शास्रज्ञ डॉ वासुदेव नारखेडे आणि कृषि अभियंता डॉ मदन पेंडके यांनी श्री धोतरे यांना वेळो‍वेळी मार्गदर्शन केले. या पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, मुख्य शास्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपिता गोरखेडे आदींनी श्री लक्ष्‍मण धोतरे यांचे अभिनंदन केले.

Friday, April 29, 2022

तुळजापुर (उस्‍मानाबाद) येथे कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रआणि  उस्मानाबाद कृषि विभागातील आत्मा कृषि विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान भागीदारीप्राथमिकता हमारी अंतर्गत तुळजापूर कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 26 एप्रिल रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले होते. अध्यक्षस्थानी आत्मा, उस्मानाबादचे प्रकल्प उपसंचालक श्री.किरवले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन तुळजापूरचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), डॉ. के. . खाडे, तालुका कृषि अधिकारी श्री.संजय जाधव, विद्यापीठ शास्ञज्ञ डॉ. रमेश पाटील, डॉ. संदेश देशमुख, शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार, केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ विजयकुमार जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्याच्या सुरूवातीला भारत सरकार चे कृषिमंञी मा. श्री. नरेंद्र तोमर यांनी देशातील विविध कृषि विज्ञान केंद्रांतंर्गत उपस्थित शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. खाडे म्हणाले की, शेतकरी हा देशातील सर्वात मोठया बँकेचा व्यवस्थापक असून त्याने शेतीशी आधरित जोडधंद्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे एक ते दोन वर्षात दुपटीपेक्षा जास्तीची वाढ होवू शकते. अशा प्रकारची क्षमता इतर कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये नाही. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुधन आधारित जोडधंद्याकडे वळावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. संदेश देशमुख म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्मित बैलचलित विविध शेती अवजारांची माहिती घेवून त्यांचा वापर आपल्या शेतीत करावा तसेच सदरील बैलचलीत अवजारे ही ट्रॅक्टर चलीत अवजारांपेक्षा स्वस्त असून सोबतच त्यामुळे पेट्रोल-डिझेल या इंधनाची देखील गरज भासत नाही. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत जोडधंद्यांची निवड करताना सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन डॉ.रमेश पाटील यांनी केले. उस्मानाबाद जिल्हयातील शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार भाषणात म्हणाले की, जिल्हयातील प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी महाराष्ट्राच्या बाहेर 8-9 राज्यांमध्ये त्यांनी पोहचवली असून, त्यासाठी सतत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आदि राज्यातून उस्मानाबादी शेळीला प्रचंड मागणी असल्‍याचे सांगुन त्यांनी त्‍यांच्‍या गोटबँक या मोहिमे विषयीस माहिती दिली. श्री.संजय जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तर श्री.किरवले यांनी आत्मांतर्गत विविध प्रकल्पांची माहिती दिली

कार्यक्रमात जिल्हयातील कृषि पुरक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विविध शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या आदिंचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्मान करण्यात आला. प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्वयक श्री. विजयकुमार जाधव यांनी केले. सुञसंचालन शास्ञज्ञ प्रा.वर्षा मरवाळीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्ण झगडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.भगवान आरबाड, प्रा.गणेश मंडलिक, प्रा.अपेक्षा कसबे, डॉ.नकुल हारवाडीकर, श्री.शिवराज रूपनर, आत्म्याचे श्री. राहूल लोंढे यांनी प्रयत्न केले.

Friday, April 22, 2022

वनामकृविचा २४ वा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न

आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे ..... माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी

वसुंधरेचे रक्षण करण्‍याची जबाबदारी आपल्‍या सर्वाची...... कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीधारक नौकरी देणारे उद्योजक व्‍हावेत ........ कुलगुरू मा डॉ नरेंद्र सिंह राठ

दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी ४२३२ स्‍नातकांना केले विविध पदवीने अनुग्रहीत 


देशाला स्‍वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत अन्‍नधान्‍याबाबत आयातदार देश होता. कृषि तंत्रज्ञानाच्‍या जोरावर अन्‍नधान्‍यात वाढ करून देशात हरितक्रांती झाली, आज भारत अन्‍नधान्‍यात निर्यातदार देश झाला आहे, सर्व कृषि संशोधनातुन शक्‍य झाले. आज शेजारील देशात अन्‍नाची कमतरता आहे. आत्‍मनिर्भर भारत निर्माण करण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ दिनांक २२ एप्रिल रोजी उत्‍साहात संपन्‍न झाला, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी भुसे हे उपस्थित होते तसेच उदयपुर (राजस्‍थान) येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. नरेंद्र सिंह राठौर यांनी उपस्थित राहुन दीक्षांत भाषण केले. स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, मफुकृविचे कुलगुरू मा डॉ प्रशांतकुमार पाटील, डॉ पंदेकृविचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, राष्‍ट्रीय डांळिब संशोधन केंद्राचे संचालक डॉ राजीव मराठे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय राज्‍यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी पूढे म्‍हणाले की, शेती हेच जीवनाचा आधार असुन अन्‍न हे ब्रम्‍ह आहे. युवकांनी संत महात्‍मांपासुन आदर्श घेऊन समर्पित भावनाने आपल्‍या ज्ञानाचा उपयोग देश व समाज कल्‍याणासाठी करावा. कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान असुन विद्यापीठातील डिजिटल शेतीवर आधारित प्रकल्‍प अत्‍यंत चांगला उपक्रम आहे.   

मार्गदर्शनात कृषिमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे  म्‍हणाले की, आज वसुंधरा दिवस आहे, वसुंधरेचे रक्षण करण्‍याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. शेती पुढे अनेक समस्‍या असुन कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानास अनूकूल कृषि तंत्रज्ञान निर्मिती करावी. गेल्‍या पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे उन्नत वाण, यंत्रे व औजारे विकसित केले असुन अनेक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत, याचा लाभ शेतकरी बांधवांंना होत आहे. कृषिच्‍या पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य केले पाहिजे. जागतिकस्‍तरावर डिजिटल शेतीचे वारे वाहत आहे,  देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव व ड्रोन यंत्राचा वापर वाढणार असुन यात मनुष्‍यबळ निर्मितीचे कार्य परभणी कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पात कार्य चालु आहे, आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या शेतमाल अधिक भाव मिळावा याकरिता महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषि विभागाव्‍दारे  विकेल ते पिकेल उपक्रम राबविण्‍यात येत आहे, शेतकरी बांधवाचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. शेतमालावर कृषि प्रक्रिया करून मुल्‍यवर्धनावर भर दिला जात आहे. महाराष्‍ट्र सरकार २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करित आहे. शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. कृषी विभागाच्या ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. महिला बचत गट आणि शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांना बळ देण्‍याचे कार्य शासन करित आहे. आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, या पदवीधारक मुलींनीही शेतकरी महिला सक्षमीकरणाकरिता योगदान दयावे, शालेय स्‍तरावर कृषि विषयाचा समावेश करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दिक्षांत भाषणात मा डॉ नरेंद्रसिंग राठौड म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाने पन्नास वर्षांचा संस्मरणीय प्रवास पूर्ण केला असुन कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्ताराच्या माध्‍यमातुन कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे. कृषि क्षेत्रातील कुशल मनुष्‍यबळाची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार शिक्षण देण्‍याची जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे. जागतिक स्‍पर्धेत कृषि विद्यापीठे उतरली पाहिजेत शेती पुढे हवामान बदलाचे मोठे आव्‍हान उभे असुन संशोधनाच्‍या माध्‍यमातुन याची दाहकता कमी करता येईल. कृषि विद्यापीठातील संशोधनाची प्राध्‍यान्‍यक्रम ठरवावे लागतील, कृषि शिक्षण आणि उद्योग क्षेत्र संबंध वाढीवर भर दयावा लागेल. जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता, हवामान बदल, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षता, सकल देशांतर्गत उत्पादन वाढ आदींचा विचार करून कृषि अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. कृषि निविष्‍ठांचा कार्यक्षम वापर करून उत्पादकता आणि नफा वाढवणे हे संशोधनाचे उद्दीष्‍ट असले पाहिजे. डिजीटल तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम शिक्षण प्रणालीच्‍या माध्‍यमातुन अध्यापन-अध्‍यायनाची गुणवत्ता सुधारावी लागेल. विद्यार्थ्यांमध्‍ये महाविद्यालयीन अभ्‍यासक्रमातच उद्योजकतेची बीजे रोवली गेली पाहिजे. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स, सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्तामशीन लर्निंग, ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आदीचा वापर वाढणार असुन अभ्‍यासक्रमात याचा समावेश करावा लागेल.

स्‍वागतपर भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या पन्‍नास वर्षातील कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचा आढावा मांडला. समारंभात माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी यांनी २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत केले. यात विविध विद्याशाखेतील ३८४२ स्‍नातकांना पदवी, ३५९ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ४९ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले. 

दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन केले तसेच माननीय कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांच्‍या शुभ हस्‍ते बायोमिक्‍स निर्मिती केंद्राच्‍या नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे आणि डॉ विणा भालेराव यांनी केले. समारंभास शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारीकर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात सन २०२०-२१ मधील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे आणि पारितोषिकांचे मानकरी स्‍नातकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.

यात पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्‍नातक केसोजी रावली(कृषि), आदिती बचाटे (अन्‍नतंत्र), श्रध्‍दा पाटील(कृषि अभियांत्रिकी), पुजा सिंगनाळे (गृहविज्ञान), प्रिया भुसारेडी(उद्यानविद्या),शुभम सांळुखे (कृषि जैवतंत्रज्ञान), आकाश देवमारे (एमबीए कृषी)आदींनी गौरविण्‍यात आले तर पदवी अभ्‍यासक्रमातील विद्यापीठ सुवर्ण पदकाचे मानकरी स्‍नातक अंकुश दुर्गा (कृषि), श्रीया लाला (अन्‍नतंत्र), अलंका भोसले (कृषि अभियांत्रिकी), मानसी बाभुळगावकर (सामुदायिक विज्ञान), नुरीन अदिबा (उद्यानविद्या), प्रतिक्षा जाधव (कृषि जैवतंत्रज्ञान), विशाल साळुंखे (एबीएम कृषी) आदींना गौरविण्‍यात आले. दात्‍या कडुन देण्‍यात येणा-या पारितोषिकांचे मानकरी स्‍नातक केसोजू रावली, दिग्विजय धामा, श्रीया लाला, मयंक पांडे, रम्‍याश्री पी एम, शुभम गटकळ, प्रतिक्षा करपे आदींचा गौरव करण्‍यात आला. रोख पुरस्‍काराचे मानकरी स्‍नातक – संजय तोडमल, गोपिका आर, दिग्विजय धामा, प्रितम पाटील, शुभांगी आवटे, नवल मोहंमद चाऊस, वर्षा यंचेवाड, अलंका भोसले आदींना गौरविण्‍यात आले.

दीक्षांत भाषण करतांना कुलगुरू मा डॉ नरेंद्र सिंह राठड 


स्‍वागतपर भाषण करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण 









सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहाचे उदघाटन

दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल यांनी नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन केले
बायोमिक्‍स निर्मिती केंद्राचे उदघाटन करतांना