Wednesday, September 29, 2021

कृषी विकासात कृषि अभियंत्याचे महत्वपूर्ण योगदान .... कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण

नामकृवितील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये प्रतिपादन

हवामान बदलांमुळे दिवसेंदिवस शेतीक्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडत असुन या बदलांना सामोरे जाण्यासाठी कृषि अभियांत्रिकीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतीक्षेत्रात ड्रोन, रोबोट, आयओटी, आयसीटी आदीसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजे आहे. शेतीची उत्पादन क्षमता व शेतकऱ्याचे उत्पनं वाढीसाठी मृद व जलसंधारण, आधुनिक व कार्यक्षम सिंचन पध्द्तींचा अवलंब, शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतीमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन या कामात कृषि अभियंत्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवयांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने कृषी विकासात कृषी अभियांत्रिकीचे स्थान व कृषी अभियंत्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे सत्राचे आयोजन करण्यात आले होते, या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात ते  बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील गोरंटीवार हे सहभागी झाले होते तर  कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुंबईच्या रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे, अहमदनगरचे गट विकास अधिकारी श्री संदीप वायाळ, लातुरचे विक्रीकर अधिकारी श्री व्यंकट शिंदे, नाशिकचे उदयोजक श्री दीपक भापकर, आयआयटी खरपूर येथील संशोधक श्री सुयोग खोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ. सुनील गोरंटीवार यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर याविषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. यासाठी त्यानी रिमोट सेंसीग, कृषी क्षेत्रात वापरता येणारे विविध मोबाईल अप, हवामानाची माहिती, ड्रोन रोबोतंत्रज्ञानाचा पाणी व्यवस्थापणात उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील काही गावे डिजीटल शेतीकडे वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रास्‍ताविकात डॉ. उदय खोडके म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थांचे मार्गदर्शन विद्यार्थांना अत्यंत प्रेरणादायी ठरते. थोर अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमात्वातील प्रामाणिकपणा, नैतीकता व प्रात्याक्षिक संकल्पना विद्यार्थांनी आपल्या अंगी बाळगावी असा सल्‍ला त्‍यांनी दिला. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. हरीश आवारी आणि प्रा. दत्तात्रय पाटिल यांनी करूं दिला. सूत्रसंचालन डॉ. रविन्द्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा. मधुकर मोरे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक कर्मचारी तसेच आजीव माजी विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

वेबिणार मध्‍ये रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे यांनी कृषि अभियांत्रिकी पदविधरांना खाजगी क्षेत्रात काम करतांना जिद्द व चिकाटी आवश्‍यक असल्याचे सांगितले. कृषि अभियंत्याचे ग्रामीण विकासात योगदान याविषयी बोलताना श्री संदीप वायाळ यांनी मार्गदर्शन केले. श्री व्यंकट शिंदे यांनी कृषि अभियंत्यांना वित्त आणि कर प्रणाली या क्षेत्रात तसेच बँकिग क्षेत्रात उपलबध असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. नाशिकच्या रेझोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक श्री दीपक भापकर यांनी स्वताचे उदाहरण देऊन उसतोड कामगाराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक या जीवन प्रवासाचे कथन केले. माजी विद्याथी श्री सुयोग खोसे यांनी विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षाची तयारी व कृषी अभियंत्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.  

            

Friday, September 17, 2021

थेट शेतकरी उत्‍पादक ते उपभोक्‍ता यातील साखळी मजबुत करावी लागेल......ज्‍येष्‍ट शास्‍त्रज्ञ मा डॉ योगेंद्र नेरकर

वनामकृवि आयोजित ऑनलाईन रब्‍बी शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

पिक उत्‍पादन वाढीकरिता शुध्‍द व दर्जेदार बियाणे आवश्‍यक आहे. आज शेतकरी मोठया प्रमाणात शेतमाल उत्‍पादन घेत आहे, परंतु शेतमालास अपेक्षित मोबादला प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवाना मिळत नाही, त्‍याकरिता उत्‍पादक ते उपभोक्‍ता यातील दरी कमी करावी लागेल, थेट उत्‍पादक शेतकरी व उपभोक्‍ता यांतील साखळी मजबुत करावी लागेल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्‍येष्‍ट शास्‍त्रज्ञ मा डॉ योगेंद्र नेरकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍ययांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन रबी शेत‍करी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग हे उपस्थित होते व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ योगेंद्र नेरकर पुढे म्‍हणाले की, कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीत समाजास शेती व शेतकरी यांचे महत्‍व पटले आहे. आज मनुष्‍य आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अधिक सजग झाला असुन पौष्‍टीक अन्‍नासाठी आग्रही झाला आहे. अन्‍न पोषणात ज्‍वारीचे मोठे महत्‍व असुन परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले परभणी मोती व सुपर मोती शेतक-यांच्‍या पसंतीस उतरले आहेत. जागतिकरणामुळे शेतीतही स्‍पर्धो वाढली आहे, जमिनीची उत्‍पादकता टिकविणे, शेतीत कमी खर्चात जास्‍त उत्‍पादन व नफा मिळविणे आवश्‍यक आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न केवळ दुप्‍पट करून न थांबता अनेक पटीने वाढीसाठी प्रयत्‍न करावे लागतील. शेतकरी व शेती यांची प्रतिष्‍ठा वाढली पाहिजे. गट शेती, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या यामाध्‍यमातुन प्रगती होत आहे. शेती यांत्रिकीकरणावर भर दयावा लागेल, कृषि अभियांत्रिकी विभागाने यावर अधिक संशोधन करण्‍याची गरज आहे. शेतीत ड्रोनचा फवारणीकरिता वापर तसेच ज्‍वारीच्‍या कणसावरील पक्षी उडविण्‍यासाठी होऊ शकतो. आज नॅनो युरिया बाजारात उपलब्‍ध होत आहे, यामुळे खतांची कार्यक्षमता वाढण्‍यास मदत होणार आहे. जैविक खते, जैविक किटकनाशके, कामगंध सापळे आदी निविष्‍ठा शेतक-यांपर्यंत पोहचल्‍या पाहिजेत. आज शेतकरी स्‍वत: शेतात अधिकाधिक उत्‍पादन घेत आहे. महाराष्‍ट्रात काही भागात अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, सद्यस्थितीत जमिनीत ओल चांगली असुन रबी हंगामात याचा फायदा होऊ शकतो, असे ते म्‍हणाले.  

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावातही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य थांबलेले नाही. ऑनलाईन माध्‍यमातुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाच्‍या सातत्‍याने संपर्कात आहेत. ऑनलाईन माध्‍यमामुळे विद्यापीठ तंत्रज्ञान केवळ मराठवाडयातील शेतकरी बांधवा पर्यंतच नव्‍हे तर संपुर्ण राज्‍यात तसेच इतर राज्‍यातील मराठी भाषिक भागात पोहचत आहे. परभणी कृषि विद्यापीठ निर्मिती बायोमिक्‍स तसेच जैविक खतांची मागणी वाढत आहे. विद्यापीठात डिजिटल शेती प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धन यावर विद्यापीठ काम करित आहे. शेतीतील बारकाव्‍याचा अभ्‍यास करून नवनवीन तंत्रज्ञान देण्‍यासाठी विद्यापीठ कटिबध्‍द आहे. गेल्‍या तीन वर्षापासुन परभणी कृषि विद्यापीठ निर्मित बियाणे, जैविक खते, जैविक किटकनाशके व बुरशीनाशके केवळ परभणी मुख्‍यालयी उपलब्‍ध न करता, विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, महाविद्यालये येथे उपलब्‍ध करून देण्‍यात आले, या विकेंद्रित विक्री सुविधेस शेतक-यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रबी पिकांचे विद्यापीठ निर्मित बियाणे सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवडयात मराठवाडयात विविध ठिकाणी उपलब्‍ध होणार असल्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

विशेष अतिथी मा डॉ लाखन सिंग म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव काळात परभणी कृषि विद्यापीठाने आयोजित केलेल्‍या विविध ऑनलाईन कार्यक्रमास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. परभणी विद्यापीठ विकसित तुरीच्‍या बीडीएन ७११ हा वाण मोठया प्रमाणात मराठवाडयातच नव्‍हे तर संपुर्ण राज्‍यात प्रचलित झाला आहे. कृषि विभाग, कृषि विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने कृषि तंत्रज्ञान विस्‍तार कार्य अधिक गतिमान होत आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ डि बी देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या वाणाची माहिती देऊन शेतकरी बांधवांनी रब्‍बी हंगामात उगवण शक्‍ती तपासुन स्‍वत:च्‍या घरचे बियाणे वापरण्‍याचा सल्‍ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले.

मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात ज्‍वार लागवडीवर डॉ एल एन जावळेहरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटीलजवस लागवडीवर डॉ एम के घोडकेकरडई लागवडीवर डॉ जी डी गडदेगहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे, अतिवृष्‍टीच्‍या पार्श्‍वभुमीवर पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, ई पीक पाहणी व नोदंणी वर श्री आनंद कदम आदींनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस बी पवार, डॉ के टी आपेट, डॉ ए व्‍ही गुटटे, डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, डॉ डी डी पटाईत आदींनी उत्‍तरे दिली. ऑनलाईन मेळावा यशस्‍वीतेसाठी नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ अविनाश काकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी आदींनी काम पाहिले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव व कृषि विभागातील कृषि अधिकारी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. 

भारतीय पशुवैद्यक परिषदेचे पशुवैद्यक शास्‍त्रज्ञांची पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेस भेट


Thursday, September 16, 2021

विद्यापीठ उत्‍पादित रब्‍बी पिकांचे बियाणे विक्रीकरिता उपलब्‍ध होणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रब्बी शेतकरी मेळाव्याचे तसेच बियाणे विक्रीचे आयोजन करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षी रब्बी मेळावा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हरभरा, करडई, गहू, जवस, सूर्यफूल, रब्बी ज्‍वारी आदी रबी पिकांचे विद्यापीठ उत्पादित विविध वाण पेरणीसाठी उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने विद्यापीठ अंतर्गत मराठवाड्यात कार्यरत असलेले कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालयात सप्‍टेबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवडयात उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. यात औरंगाबाद, बदनापुर (जिल्हा जालना), खामगाव (जिल्हा बीड), तुळजापूर (जिल्हा उस्मानाबाद) येथील कृषी विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, गोळेगाव (जिल्हा हिंगोली)आंबेजोगाई (जिल्हा बीड) येथील कृषी महाविद्यालय विविध रबी पिकांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिनांक २२ सप्‍टेंबर रोजी पासुन परभणी मुख्‍यालयी असलेल्‍या बीज प्रक्रिया केंद्रावर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.

महिला सक्षमीकरणावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्‍न

विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प गृहविज्ञान पाटोदा (जि बीड) येथील वसंतदादा पाटील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्‍टेंबर रोजी सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण तक्रार कक्षामार्फत महिला सक्षमीकरण यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बळीराम राख हे होते तर प्रमुख वक्त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (मानव विकास) प्रा. निता गायकवाड, उपप्राचार्य डॉ. किशोर मचाले, पदव्यूत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार आदींचा सहभाग होता.   

मार्गदर्शनात प्रमुख वक्त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (मानव विकास) प्रा. निता गायकवाड यांनी महिला सक्षम होणे ही आज काळाची गरज असुन आधुनिक काळात महिला सक्षमीकरणाचे पैलू गतकाळापेक्षा वेगळे आहेत. आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदि क्षेत्रांमध्ये महिलांना त्यांचा अधिकार भुमिका बजावण्याची संधी दिली गेली पाहिजे. महिलांच्या संरक्षणार्थ  असलेल्या विविध कायदे, भारतीय राज्‍यटनेने भारतीय दंड संहितेचे संदर्भ देऊन सविस्तर माहिती दिली. केंद्र शासनाच्या पुरस्‍कृत महिलांसाठी असलेल्या राष्ट्रीय आहार मिशन, पंतप्रधान उज्वला योजना, तिहेरी तलाक कायदा याचीही माहिती सांगितली. सुत्रसंचालन डॉ. ज्योती क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ. अनिता धारासूरकर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.