प्रगतशील शेतकरी श्री. निखिल तेटू यांची सेंद्रिय शेतीतील यशोगाथा – वनामकृविच्या ‘शेतकरी देवो भवः’ उपक्रमाचा सातवा भाग उत्साहात संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भवः’ या
नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेचा सातवा भाग दिनांक ६ मे रोजी विद्यापीठाच्या स्टुडिओत
माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची प्रमुख
उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि
शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या भागात अमरावती जिल्ह्यातील मौजे कुऱ्हा येथील प्रगतशील शेतकरी श्री.
निखिल तेटू यांनी ‘सेंद्रिय शेतीतून उद्योजकता’ या विषयावर आपली प्रेरणादायी यशोगाथा मांडली.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “शासनाच्या पीएम
प्रमाण योजनेतून नैसर्गिक घटकांना चालना दिली जात आहे. विद्यापीठाचा विस्तार विभाग
ही योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहे. 'शेतकरी
देवो भवः' या भावनेतून होणारा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी खुला
संवाद साधण्याचे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात वैविध्यतेतून अधिकाधिक उत्पादन मिळविणे
आवश्यक आहे. हवामानातील
लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेती धोक्याची होत आहे, मात्र विद्यापीठाच्या
सक्षम शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन आणि त्यास शेतकऱ्यांचा उत्साही प्रतिसाद यातून निश्चितच शाश्वत शेती साध्य
होऊ शकते.”
असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मुलाखत वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ.
मीनाक्षी पाटील यांनी केले. श्री. निखिल तेटू यांनी आपल्या सेंद्रिय शेतीतील अनुभव
सांगताना, विद्यापीठ विकसित बायोमिक्सचा वापर, नैसर्गिक
घटकांचे उत्पादन, मित्र किडींचा वापर, आच्छादन,
निंदणी आणि कोळपणी यांसारख्या पर्यावरणपूरक तंत्रांचा अवलंब कसा
फायदेशीर ठरतो, याचे उदाहरण दिले. तणनाशकांचा वापर टाळून
रानभाज्यांचे उत्पादन आणि विक्रीद्वारे अर्थार्जन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी परसबाग भाजीपाला बियाण्याचे गुणवत्तायुक्त बीजकिट तयार केले असून
त्यामार्फत घरासाठी तसेच विक्रीसाठी वैविध्यपूर्ण भाजीपाला उपलब्ध होत आहे.
विद्यापीठाच्या सहकार्याने त्यांनी विक्री व्यवस्थापनाची साखळी देखील उभारली असून, शेतकऱ्यांनी आपल्या
उत्पादनाची माहिती विद्यापीठाला दिल्यास, त्याच्या
विक्रीसाठी सहाय्य केले जाते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी मर रोगाचे कारणे आणि त्याचे
नियंत्रण यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह
कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, गडचिरोली
येथून १०० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून संवादात सक्रिय सहभाग घेतला.