Saturday, June 29, 2019

मराठवाडयाकरिता चालु आठवडयातील हवामान अंदाज व कृषि सल्‍ला

वनामकृविच्‍या वतीने दर शुक्रवारी व मंगळवारी हवामान अंदाज व कृषि सल्‍ला प्रकाशित होतो 
सविस्‍तर माहितीसाठी पाहा http://www.vnmkv.ac.in/metrology/AAB_Parbhani.pdf

Tuesday, June 25, 2019

कृषिदुतांनी पिकांवरील विविध कीड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी योगदान द्यावे....डॉ राकेश आहिरे

परभणी कृषि महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उदबोधन कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असतो, सदरिल कार्यक्रम राबविण्‍यासाठी उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 19 जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे हे होते तर व्‍यासपीठावर डॉ ए एस कार्ले, डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ के टी आपेट, डॉ ए के गोरे, प्रा कुलदिप शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ राकेश आहिरे म्‍हणाले की, परभणी जिल्‍हयात कापुस हे महत्‍वाचे नगदी पिक असुन कापसावरील बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्याक्रमाच्‍या कृषीदुतांनी व कृषीकन्‍यांनी पुढाकार घ्‍यावा. येणा-या खरिप हंगामात कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी, मक्‍यावरील लष्करी अळी व हुमणी किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणुन  विविध उपाययोजना राबविण्‍यादृष्‍टीने कृषि विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने विशेष अभियान सुरू असुन या अभियानात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यींनी आपले योगदान द्यावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
तांत्रिक सत्रात विविध विषयावर विशेष विषय तज्ञ डॉ के टि आपेट, डॉ डि व्‍ही बैनवाड, डॉ सुनिता पवार, डॉ ए एम कांबळे, डॉ डि आर कदम, डॉ एस आर नागरगोजे, डॉ एस एल वाईकर, डॉ एस जे शिंदे, डॉ ए एस बागडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार प्रा आर सी सावंत यांनी मानले. कार्यक्रमास रावेचे कार्यक्रम अधिकारी डॉ आर जी भाग्‍यवंत, डॉ ए टी शिंदे, डॉ एस पी झाडे, डॉ सी व्‍ही अंबडकर, डॉ ए एम भोसले, डॉ ए जी बडगुजर, डॉ मेघा सुर्यवंशी आदीसह ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.
कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावेअसुन या सत्रातील विद्यार्थांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधन्‍यात येते, हे विद्यार्थ्‍यी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करतात, तसेच विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानावर विविध प्रात्‍यक्षिके आयोजित करतात. यावर्षी महाविद्यालयाचे 212 विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक 25 गांवात कार्य करणार आहेत.

Monday, June 24, 2019

वनामकृविच्‍या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रातील जातीवंत रोपांना मोठी मागणी

तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांनीही केली मोठया प्रमाणात  खरेदी 
सिताफळ हे बदलत्या हवामानात तग धरु शकणारे फळपिक म्हणुन पुढे येत असुन दिवसेंदिवस सिताफळ लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. सिताफळ हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत राहीले नसुन तामिळनाड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदीं राज्यात त्याची व्‍यापारीदृष्‍टया लागवड होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अंबाजोगाई सिताफळ संशोधन केंद्रात यावर्षी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनानुसार सिताफळाची धारुर-६, बालानगर, टिपी-७ आदीसह रामफळ व हनुमान फळाची पन्‍नास हजार जातीवंत रोपे तयार केली असुन विक्रीसाठी प्रतिकलम चाळीस रुपये दराने उपलब्ध आहेत. संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांनाची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन यावर्षी तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांनीही मोठया प्रमाणात रोपांची खरेदी केली आहे. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगाचा विचार करता धारुर-६ व बालानगर या फळांची मागणी असते. सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईक्रीममध्ये मोठया प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली असून सिताफळ लागवडीसाठी शेतक-यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 
रोपांसाठी डॉ गोविंद मुंडे यांच्‍याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.

ऊसाच्या बियाण्यापासुन रोप निर्मिती शक्य........वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे

वनामकृवितील कृषिविद्या विभागात आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनोमी व कृषिविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञानया विषयावर कोईम्बतुर (तामिळनाडू) येथील ऊस पैदास संस्थेचे वरिष्ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांच्‍या व्याख्यान दि. 19 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य मा. डॉ डी एन गोखले व विभाग प्रमुख डॉ वा. नि. नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे यांनी उपस्थित पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्‍यांसोबत अभ्यासक्रमीय सुसंवाद साधून ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करून वर्तमान कालीन व भविष्यातील संशोधनातील अडचणी व त्याचे निरसनात्मक नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली. भविष्यात ऊसाच्या बियाण्यापासुन रोप निर्मिती शक्य होणार असुन यामुळे बेण्यावरील खर्चात बचत होईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पी.के. वाघमारे यांनी केले. विभाग प्रमुख डॉ वा नि नारखेडे व प्रक्षेत्र अधीक्षक प्रा पी के वाघमारे यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावरील ऊस आंतरपीक पध्दतीतील प्रात्याक्षिक व बिजोत्पादनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास डॉ बी व्ही आसेवार, डॉ ए एस कारले, डॉ करंजीकर, डॉ व्ही बी अवसरमल, डॉ आय ए बी मिर्झा, प्रा जी डी गडदे, प्रा एस यू पवार, डॉ मेघा सुर्यवंशी, प्रा ज्योती गायकवाड आदीसह पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Sunday, June 23, 2019

तारूण्‍यभान कार्यशाळा ठरणार तरूण-तरूणीच्या जीवनातील वळणबिंदु.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांची तारूण्‍यभान तीन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

महाविद्यालयीन जीवनातच तरूण-तरूणाच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा विकास होतो, परंतु तरूण-तरूणातील लैगिंकता याबाबीवर शास्‍त्रशुध्‍द भाष्‍य कोणीही करित नाही, त्‍यामुळे अनेक प्रश्‍न अनुत्‍तरीत राहतात व गैरसमज होतात, चुकीच्‍या वाटेवर तरूण–तरूणी भरकटतात, जीवनतील या चुकीला मात्र माफी नसते, त्‍यामुळे प़द्मश्री मा डॉ राणी बंग यांच्‍या सारख्‍या तारूण्‍यभान कार्यशाळेची गरज भासते. ही कार्यशाळा कृषिच्‍या विद्यार्थ्‍यासाठी जीवनाचा वळणबिंदु ठरेल, असे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महावि़द्यालयाच्‍या वतीने दिनांक 20 ते 22 जुन दरम्‍यान तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेच्‍या समारोपाप्रंसगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर ज्‍येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग, श्रीमती उषाताई ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सशक्‍त जीवन जगण्‍यासाठी मा डॉ राणी बंग यांच्‍या सर्च फाउंडेशनचे कार्य निश्चितच तरूणामध्‍ये याबाबतीत मोठी जागृती करीत आहे. स्‍वच्‍छ परिसर, सुंदर परिसर व सुरक्षित परिसर करण्‍याचा विद्यापीठाचा मानस आहे, विद्यापीठ परिसर मुली व महिलांसाठी सुरक्षित करण्‍याच्‍या दृष्‍टीने ही कार्यशाळा निश्चितच उपयोगी ठरले, असे मत व्‍यक्‍त केले.  
ज्‍येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कार्यशाळेत घेतलेले ज्ञान केवळ आपल्‍यापुरते न ठेवता वाटत जा, ज्ञान दिल्‍याने ज्ञान वाढते. तरूणाईची ऊर्जा समाज हितासाठी सकारात्‍मक कार्यासाठी लावा. समाजातील अंधार दुर करण्‍यासाठी ज्ञानाची ज्‍योत बना.
तीन दिवसीय कार्यशाळेत प्रेम व आकर्षण, जोडीदार कसा निवडावा, सुरक्षीत लैगिंकता, व्‍यसनाधिनता, एडस, गुप्‍तरोग, गर्भवस्था, पोषक आहार आदीवर सर्च फाउंडेशनच्‍या संचालिका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांच्‍यासह ज्ञानेश्‍वर पाटील, राजेंद्र इसासरे, सुनंदा खोरगडे आदींनी सादरिकरणाच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन केले तसेच विविध गीत व खेळाच्‍या माध्‍यमातुन जीवन शिक्षणाचे अनेक धडे दिले. समारोपीय कार्यक्रमात अनेक सहभागी प्रशिक्षणार्थीनी कार्यशाळेमुळे लैगिंकता बाबतीत अनेक गैरसमज दुर झाल्‍याचे मत व्‍यक्‍त केले तर अनेकांनी ही कार्यशाळा जीवनातील वळणबिंदुच ठरेल अशी भावना व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ संदिप बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
प्रतिकात्मक ज्ञान ज्योत प्रज्वलीत करतांना

Saturday, June 22, 2019

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने दिनांक २१ जुन रोजी पाचवा आंतरराष्‍ट्रीय योगदिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ हेमांगिणी सरंबेकर, प्राचार्य डॉ ए आर सावते आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्‍य अधिकारी डॉ सुब्‍बाराव योगशिक्षक प्रा दिवाकर जोशी, लिंबाजी शिसोदे, रत्‍नाकर मेतेकर, गजानन कोटलवार, अर्जना घनवट यांच्‍यास आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली.

यावेळी मागदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज धकधकीच्‍या जीवनात मोठा ताण व्‍यक्‍तीवर येत आहे, यामुळे शारीरिक व मानसिक रोगांनी मनुष्‍य ग्रासला जात आहे. योग व आसानांनी मुळे निश्चितच आरोग्‍यपुर्ण जीवन जगणे शक्‍य होईल. योग हा प्रत्‍येकाच्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. विशेषत: महाविद्यालयीन जीवनात तरूणांवर योगाचे संस्‍कार झाले पाहिजे, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे व अशोक खिल्‍लारे यांनी केले तर आभार डॉ ए टी शिंदे यांनी मानले. यावेळी उत्‍कृष्‍ट योग व आसन केल्‍याबाबत निवड अधिकारी व विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी - विद्यार्थ्‍यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थि होते.



Friday, June 21, 2019

वनामकृवित बैलचलित सुधारीत शेती औजारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत असलेल्‍या पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने दि. 20 जुन रोजी बैलचलित सुधारीत शेती औजारे वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या झाले तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. रणजित पाटील, नियंत्रक श्री एन. एस. राठोड, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके आदींची उपस्थिती होती.
सदरिल प्रकल्‍प संपुर्ण राज्‍याकरिता असुन यापुर्वी प्रकल्पाअंतर्गत विकसीत औजारे कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने मराठवाड्यातील आठही जिल्हयातील शेतक-यांना वाटप करण्‍यात आले होते. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या सुचनेप्रमाणे यावर्षी ही औजारे राज्‍यातील इतर भागातील शेतक-यांना वापराकरीता देण्याचे आदेशीत केले होते. त्‍यानुसार विदर्भातील धानोरा जंगम (ता. नांदुरा जि. बुलढाणा), करडा (ता.रिसोड, जि. वाशिम), केशपुर (ता. चिखलदरा जि. अमरावती), तळेगाव रघोजी (ता. आर्वी जि. वर्धा), व खानदेशातील तळवीपाडा (ता. नवापुर जि. नंदुरबार), मराठवाड्यातील आदीवासी बहुल वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली), मंगरूळ (ता जि. परभणी) येथील निवडक शेतक-यांना विविध औजारे व यंत्र वाटप करण्‍यात आली. यात बैलचलीत सौर फवारणी यंत्र, बहुविविध टोकण यंत्र, क्रिडा टोकण यंत्र (तीन फणी), लाकडी ज्यू, हळद काढणी यंत्र (सरीवरंबा पध्दतीकरीता), ऊसास माती लावणे यंत्र, एक बैलचलित सरी पाडणे यंत्र, एक बैलचलित कोळपे, तीन पासेचे कोळपे (बीबीएफकरीता), धसकटे गोळा करण्याचे यंत्र आदी सुधारित अवजारांचा समावेश होता.
मार्गदर्शनांत कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, अल्‍पभुधारक शेतकरी स्‍वत: ट्रक्‍टर विकत घेऊ शकत नाही. वाढती मजुरी, इंधन खर्च, वाढता पिक लागवड खर्च आदींमुळे एकुणच उत्पादन खर्च वाढत आहे, अशा परिस्थितीत बैलचलित सुधारीत शेती अवजारे वापरून यांत्रिकीकरणास चालणा देण्‍याची व बैलशक्तीचा वापर विविध कार्यासाठी वाढण्याची गरज आहे. तसेच सौर उर्जाचे शेतीत वापर करावा लागेल. विद्यापीठ विकसीत बैलचलित अवजारे राज्‍यातील विविध कृषि विज्ञान केंद्राच्या साहाय्याने प्रचार व प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, सदरिल बैलचलित शेती अवजारांचा शेतक-यांनी योग्‍यरित्‍या उपयोग करावा व काही त्रुटी असल्‍यास संशोधकांना कळवाव्‍या, म्‍हणजे अवचारांची उपयुक्‍तता वाढीच्‍या दृष्‍टीने संशोधनाच्‍या आधारे त्‍यात सुधारणा करता येतील.

यावेळी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्रातर्फे आदीवासी उपयोजने अंतर्गत प्रभारी अधिकारी डॉ एस पी म्‍हेत्रे यांच्‍या वतीने मौजे वाई (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील दहा अनुदानतत्‍वावर कडबा कुटी यंत्रांचेही वाटप करण्यात आले. तसेच बैलचलीत तेलघाण्याचे माननीय कुलगुरूच्‍या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तांत्रिक सत्रात प्रा. स्मिता सोलंकी, डॉ आर. टी. रामटेके, प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. पी. . मुंढे, अजय वाघमारे आदींनी यांनी अवजारांबाबत मार्गदर्शन केले तर रेशीम उद्योगावर डॉ सी बी लटपटे व सेंद्रीय शेतीवर डॉ आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाच्या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार प्रा. डी. डी. टेकाळे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, महिला शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते

Thursday, June 20, 2019

बेजबाबदार लैगिंकता कुंटूबाचे व समाजाचे स्‍वास्‍थ बिघडवित आहे......ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग

वनामकृवित तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

चांगला समाज निर्माण करण्‍यासाठी माणसामधील लैगिंक स्‍वास्‍थ जपण्‍याची गरज आहे. तरूण-तरूणी मध्‍ये लैगिंक शिक्षणाची गरज असुन बेजबाबदार लैगिंकता कुंटूबाचे व समाजाचे स्‍वास्‍थ बिघडवित आहे, असे प्रतिपादन ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महावि़द्यालयाच्‍या वतीने दिनांक 20 ते 22 जुन दरम्‍यान तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले, कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर श्रीमती उषाताई ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग पुढे म्‍हणाल्‍या की, आज तरूणां-तरूणीमधील व्‍यक्‍तीमत्‍वातील मुलभुत कच्‍ची बाजु लैंगिकता आहे. तरूण मुलां-मुलींमध्‍ये लैंगिकतेबाबत अनेक गैरसमज आहेत, परंतु या गोष्‍टीवर कोठेही संवाद होत नाही. याबाबत अवैज्ञानिक व खोटी माहिती आहे. आज इंटरनेटच्‍या दुनियेत, आभासी जगात तरूण वावरत आहे. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. काहीजण नैराश्‍यात आत्‍महत्‍याही करित आहेत, आत्‍महत्‍या हा पलायनवाद आहे. जीवनात संकटे येत असतात, संकटे ही माणसांचा मजबुत बनवतात. जीवनातील आनंद कशात आहे, हेच माणसाला समजत नाही, जीवनातील आनंद निघुन जात आहे. माणुसपण हरवत आहे, व्‍यसनाधिनता वाढत आहे. आजही पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, स्‍त्री ही उपभोगाची वस्‍तु नाही, स्‍त्रीचा सन्‍मान करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, महाविद्यालयात अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम हे विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी घेतली जातात, परंतु जीवनातील दुर्लक्षीत असा लैगिंकता याविषयी कोठेही संवाद होत नाही, तरूणाईच्‍या उबंरडयावर अनेकजण भरकटतात, व्‍यक्‍तीमत्‍व विकासातील दुर्लक्षीत अंगाबाबत संवाद होणे गरजेचे आहे, सशक्‍त जीवन जगण्‍यासाठी मा डॉ राणी बंग यांच्‍या सर्च फाउंडेशनचे कार्य निश्चितच तरूणामध्‍ये याबाबतीत मोठी जागृती करीत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ संदिप बडगुजर यांनी मानले. तारूण्‍यभान या तीन दिवसीय कार्यशाळेत सादरिकरण, प्रात्‍याक्षिक व विविध खेळांच्‍या माध्‍यमातुन तरूणांना जीवन शिक्षण देण्‍याचा उपक्रम सर्च फाउंडेशन करणार आहे. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Saturday, June 15, 2019

वनामकृविचा कपाशीचा संकरीत वाण नांदेड-४४ हा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बीटी स्‍वरूपातील पहिला वाण..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित नांदेड-४४ बीटी (बीजी-२) वाणाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

वनामकृविचा लोकप्रिय कपाशीचा संकरीत वाण नांदेड-४४ हा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बीटी स्‍वरूपातील पहिला वाण ठरला असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळ मर्यादीत (महाबीज), अकोला यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने दिनांक १५ जुन रोजी नांदेड-४४ बीटी (बीजी २) वाणाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न झाला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, महाबीजचे महाव्‍यवस्‍थापक (उत्‍पादन) श्री सुरेश फुंडकर, महाबीजचे महाव्‍यवस्‍थापक (विपणन) श्री प्रकाश टाटर, विभागीय व्‍यवस्‍थापक श्री सुरेश गायकवाड, कापुस विशेषतज्ञ डॉ खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, अनेक दिवसापासुन कपाशीच्‍या नांदेड-४४ बीटी वाणाची शेतकरी मोठया आतुरतेने वाट पाहात होते, त्‍याचे बियाणे शेतक-यांच्‍या हाती देतांना विद्यापीठास मोठे समाधान वाटत आहे, ही विद्यापीठ संशोधनातील ऐतिहासिक बाब आहे. यावर्षी या बियाणांची तेविस हजार पॅकेट महाबीजकडुन मराठवाडयाकरिता उपलब्‍ध झाली आहेत. येणा-या काळात नांदेड-४४ बीटी बीजोत्‍पादनासाठी मराठवाडयातील शेतक-यांनी पुढाकार घ्‍यावा, यासाठी लागणारे तांत्रिक पाठबळ विद्यापीठ पुरवील. अनेक वर्ष शेतक-यांच्‍या मनात अधिराज्‍य गाजलेले नांदेड-४४ हे वाण बीटी तंत्रज्ञानाच्‍या युगात लोप पावला होता. परंतु नांदेड-४४ हे वाण बीटी स्‍वरूपात उपलब्‍ध झाल्‍याने त्‍यास पुर्नवैभव प्राप्‍त होईल. या वाणाच्‍या बियाणास शेतक-यांची आजही मोठी मागणी आहे, त्‍यामुळे महाबीजला बियाणाची जाहिरात करण्‍याची गरज नाही. बचत होणा-या जाहिरातीवरील खर्चमधुन बियाण्‍याचे दर कमी केल्‍यास शेतक-यांना त्‍यांचा फायदा होईल. शेतक-यांनी या वाणाची लागवड करतांना एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड दयावी, त्‍यामुळे कमी खर्चात किड नियंत्रण होईल. विद्यापीठ येवढयावरच थांबलेले नसुन लवकरच विद्यापीठ विकसित एनएचएच-७१५ व एनएचएच-२५० हे चांगले उत्‍पादन देणारे कापसाचे वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी महाबीज सोबत करार करण्‍यात येणार आहे. येणा-या ३ ते ४ वर्षात ही वाणेही शेतक-यांना उपलब्‍ध होऊन कापुस बियाणे बाजारातील ४० टक्के हिस्‍सा या वाणाचा असेल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, नांदेड-४४ वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये परभणी कृषि विद्यापीठ व महाबीज यांच्‍यात करार झाला. महा‍बीजचे तत्‍कालीन व्‍यवस्‍थापकीय संचालक मा डॉ शालीग्राम वाणखेडे, माजी कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व सध्‍याच्‍या कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व महा‍बीजचे अधिकारी यांच्‍या अथक परिश्रमामुळे पाच वर्षात नांदेड-४४ बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला. हा दिवस विद्यापीठ संशोधनातील सुवर्ण दिवस ठरला. हा वाण पुर्नबहराची क्षमता असलेला, रसशोषण करणा-या किडीस प्रतिकारकक्षम असलेल वाण असुन कोणत्‍याही परिस्थि‍तीत स्थिर उत्‍पादन देणार आहे. विद्यापीठ प्रक्षेत्रावर या वाणाने बागायती मध्‍ये हेक्‍टरी ३८ क्विंटल तर कोरडवाहु मध्‍ये २३ क्विंटल उत्‍पादन दिले आहे.
श्री सुरेश फुंडकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, यावर्षी मराठवाडया करिता तेविस हजार नांदेड-४४ बीटी बियाण्‍याची पॅकिटे उपलब्‍ध करण्‍यात आली असुन पुढील वर्षी तीन लाख पॅकिटे उपलब्‍ध करण्‍याचे महाबीजचे उदिदष्‍ट आहे. या संकरित बीटी वाणातील नर व मोदी दोन्‍ही मध्‍ये बीटीचा अंतर्भाव करण्‍यात आल्‍यामुळे बीटी जीनचा प्रभाव इतर वाणाच्‍या तुलनेत जास्‍त दिसुन येईल. मराठवाडयात बीजोत्‍पादनाचे लक्ष असल्‍याचेही त्यांनी सांगितले. कापुस विषेशतज्ञ डॉ खिजर बेग यांनी हा वाण पाण्‍याचा ताण सहन करणारा असुन शेतक-यांना कापुस उत्‍पादनात स्‍थैर्यता देण्‍याची ताकत असल्‍याचे सांगितले.
यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नांदेड-४४ बीटी (बीजी-२) वाणाचे लोकार्पण करून निवडक शेतक-यांना पॅकेटचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सुरेश गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा अरविंद पडांगळे यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठ व महाबिजचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Friday, June 14, 2019

ज्ञानाचा उपयोग समाजाच्‍या कल्‍याणासाठी करा.....माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट

परभणी कृषि महाविद्यालया महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न
माणुस हा ज्ञान व कर्मांनी मोठा होतो, त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त ज्ञान संपादन करा, त्‍याचा उपयोग समाजाच्‍या कल्‍याणासाठी करा, असे प्रतिपादन माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने नुकतेच (दिनांक 7 जुन रोजी) महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा व मुलाखतीची तयारी याबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर मार्गदर्शक म्हणुन माजी कृषि आयुक्त डॉ उमाकांतजी दांगट व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव कोकाटे हे उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ पी आर झंवर, डॉ रणजित चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ उमाकांतजी दांगट पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेपरिक्षा ही कार्यक्षम व चांगल्‍या व्‍यक्‍तींची निवड करण्‍यासाठी असते. सातत्‍याने लिखन व वाचन करा, चिंतन करा. कृषि पदवीधरांना शासकिय व खासगी क्षेत्रात मोठया संधी आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीनेच देशाची व मानवाची प्रगती झाली आहे. कृषी संस्‍कृती हीच जीवन पध्‍दती आहे. कोणत्‍याही घटनेकडे एकांगी विचार करू नका, चौफेर विचार करण्‍याची सवय लावा. आपली विवेकबुध्‍दी सतत जागृत ठेवा. ध्‍येय पुर्ण होईपर्यंत लढत रहा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ प्रदिप इंगोले म्हणाले की, बहुतेक कृषिचे विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातुन आलेले असतात तरिही कठोर परिश्रमाच्या आधारे स्पर्धेपरिक्षेत यश संपादन करतात. विद्यार्थ्यांना स्वत:मधील असलेल्या सुप्तगुणांची जाणीव झाली पाहिजे. नौकरी म्हणुन कोणत्याही क्षेत्रात काम करतांना कृषि पदवीधरांनी शेतक-यांना विसरून नये, नौकरी ही शेतक-यांची सेवा करण्याची संधी म्हणुन पाहा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शनात श्री मधुकरराव कोकाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेपरिक्षेची तयारी करतांना जाणीवपुर्वक आपल्या व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. विशेषत: संवाद कौशल्य विकसित करावे, संवादातुनच आपल्या व्यक्तीमत्वाची ओळख होते. मुलाखत ही ज्ञान तपासण्‍यासाठी नसुन तुम्ही माहिती कशी सादर करता, याची परिक्षा असते. स्वत:तील कमतरतेचा बाऊ करू नका, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले तर प्रास्‍ताविक डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ कल्‍याणकर यांनी मानले. प्रशिक्षणात विद्यार्थ्‍यांकडुन मुलाखतीचा सराव घेण्‍यात आला. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

वनामकृवितील किटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेत व वनामकृवितील विभागात होणार ट्रायकोकार्डची निर्मिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि किटकशास्‍त्र विभागातील परोपजिवी किटक संशोधन योजना व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विदयमाने क्रॉपसॅप प्रकल्‍प अंतर्गत जैविक घटक, त्‍यांची निर्मिती व किड व्‍यवस्‍थापनातील उपयुक्‍तता याबाबतचे एक दिवसीय प्रशिक्षण कृषि किटकशास्‍त्र विभाग येथे दिनांक १२ जुन रोजी संपन्‍न झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्‍तम झंवर, जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळाचे प्रभारी अधिकारी श्री. बबन वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शेतक-यांमध्‍ये पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनात जैविक पध्‍दतीबाबत जागरूकता होत आहे, परंतु जैविक निविष्‍ठांची योग्‍य वेळी उपलब्‍धता होत नाही कापुस पिकात ट्रायकोकार्डचा वापर केल्‍यास निश्चितच शेतक-यांना बोंडअळी व्‍यवस्‍थापन चांगला प्रकारे करता येईल. प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी ट्रायकोकार्डची निर्मिती करून येणा-या हंगामात शेतक-यांसाठी उपलब्‍ध करावेत असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले कि, परोपजिवी किटक संशोधन योजनेव्‍दारे शेतक-यांना मोठया प्रमाणात ट्रायकोकार्डची उपलब्‍धता करुन देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल व त्‍याव्‍दारे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचा शेतकरी व्‍यवस्‍थापन करु शकतील.
प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. प्रशिक्षणात डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. एस. एस. धुरगुडे, डॉ. ए. जी. बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करुन ट्रायकोकार्ड निर्मितीची माहिती प्रशिक्षणार्थींना प्रात्‍याक्षिकाद्वारे दिली. वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभागात बायोमिक्‍स, ट्रायकोडर्मा व जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्‍याक्षिक करुन दाखविण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणात शासकीय जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा येथील अधिकारी व कर्मचारी, कृषि विज्ञान केंद्रातील शास्‍त्रज्ञ, विदयापीठातील क्रॉपसॅप प्रकल्‍पातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ आदींनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळ व विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागात ट्रायकोकार्डची निर्मिती करण्‍यात येणार आहे.

Thursday, June 13, 2019

विद्यार्थानी नैराश्यावर मात करत यशासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.... मा डॉ. अशोक ढवण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागातील एमएस्सी (कृषि) पदव्युत्तर विद्यार्थ्याना विभागातर्फे निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर राहुरी येथील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. अशोक कडलग, विभाग प्रमुख डॉ. सय्य्द इस्माईल, डॉ. भगवान सेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यींनी अपयशाने खचुन न जाता, नैराश्यावर मात करत यशासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. जीवनात नेहमीच सकारात्मक विचार ठेवावा. मृदविज्ञान विभागाचा शेतकऱ्यांबरोबर जवळचा संबंध असुन विद्यार्थ्यानी ज्ञानाचा वापर समाजाचा अर्थात शेतकऱ्यांच्या विकासासाठी करावा. प्रमुख पाहुणे डॉ अशोक कडलग यांनी विद्यार्थ्यांचा आयुष्यात मृदा पृथ:करणाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा शेतकऱ्यासांठी उपयोग करावा असे नमुद केलेकार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा डॉ. प्रविण वैद्य यांची नवी दिल्ली येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे सल्लागार म्हणुन तर डॉ. पपीता गौरखेडे डॉ भगवान असेवार यांची हैद्राबाद येथील भारतीय कोरडवाहु शेती सोसायटीच्या संशोधन नियतकालिकेचे कार्यकारी सदस्य म्हणुन निवडी बदल मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन कु. सरपे या हिने केले. कार्यक्रमाविभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.