Thursday, November 23, 2023

कृषी अवजारांची व उपकरणांची योग्‍य निगा राखण्‍याची गरज ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवि व सि.एन.एच. उन्नत कौशल प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित कृषी अवजारांच्या योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्ष‌णास प्रारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व सि.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू. हॉलंड), नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यामातून शेतकरी व ग्रामीण युवक यांचे करिता सुधारित कृषी अवजारांचा योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्ष‌णाचे दिनांक २२ नोंव्‍हेंबर ते २४ नोव्‍हेंबर दरम्‍यान कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. 

प्रशिक्ष‌ण कार्यक्रमाचा उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते करण्‍यात आले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉ.उदय खोडके व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर कृषी यंत्र व शक्ती विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, न्यू हॉलंड कंपनीचे व्यवस्थापक श्री. सचिन पाटील व विद्यत इ ईतर उर्जा विभागाचे विभागप्रमुख डॉ.राहुल रामटेके हे व्यासपीठावर उपस्थित होते.  

अध्यक्षीय समारोप कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी कल्‍याणाकरिता कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्‍यांनी सामाजिक दायित्‍व निधी उपलब्‍ध करून दिला असुन शेतक-यांपर्यंत ज्ञान व कौशल्‍य पो‍होचविण्‍याचे कार्य विद्यापीठ करित आहे. यांत्रिकीकरण शेतीचा अविभाज्य अंग असून निविष्टांचा योग्य वापर करून हवामानाच्या बदलात देखिल शाश्‍वत उत्पादन घेता येते. यांत्रिकीकरणामुळे मजुरी वरचे खर्च, काबाडकष्ट कमी होऊन आर्थिक उन्नती साधता येते. शेतातील उपकरणे व अवजारे यांची योग्‍य निगा व देखभाल करण्‍याची गरज असुन त्‍यामुळे उपकरणांचे आयुष्यमान वाढते.

प्रकल्पाचे नोडल ऑफिसर संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, खाजगी कंपनीच्‍या माध्‍यमातुन असा प्रकल्‍प राबविणारे वनामकृवि हे राज्‍यातील पहिलेच विद्यापीठ असुन शेतीत लागणारे भांडवल कमी करण्‍यावर प्रशिक्षणात भर देण्‍यात येत आहे. तर संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाच्‍या विस्तार कार्याची माहिती देऊन कृषि यांत्रिकीकरणाच्‍या प्रसाराकरिता विद्यापीठ प्रयत्‍न करित असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कृषी यंत्र व शक्ती विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी यांनी यांत्रिकीकरणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मधुकर मोरे यांनी केले तर आभार डॉ.एस.डी.विखे यांनी मानले. प्रशिक्ष‌ण  कार्यक्रमाचे नियोजन डॉ. स्मिता सोळंकी व डॉ.पंडित मुंडे व त्यांचे सर्व  सहकारी यांनी केले.

कार्यक्रमांतर्गत उपस्थितीत शेतकरी बांधवांनी विद्यापीठाबद्दलचे आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रशिक्ष‌ण कार्यक्रमास ८० शेतकरी, महिला शेतकरी, व ग्रामीण युवक यांनी उपस्थिती नोंदवली.  सदर प्रशिक्षण विद्यापीठ व सि.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू. हॉलंड), नवी दिल्ली यांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यामातून राबविण्‍यात येत असुन या प्रशिक्ष‌ण कार्यक्रमातून निर्माण झालेले प्रशिक्ष‌क हे कृषी यांत्रीकीकरणाचे राजदूत (Brand Ambasaador) पुढे काम करणार आहेत. येत्‍या दोन वर्षात ६० प्रशिक्ष‌ण कार्यक्रम विद्यापीठामार्फत पूर्ण करण्यात येणार असुन  मराठवाडयातील १५०० पेक्षा जास्त प्रशिक्षीत यांत्रिकीकरण राजदूत निर्माण होणार आहेत. कार्यक्रमासाठी शेतकरी, महिला शेतकरी, ग्रामीण युवक, वृत्तपत्र प्रतिनिधी, विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.









Thursday, November 2, 2023

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरडधान्य फराळ निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

जगभर २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषणामध्ये भरडधान्यांना असणारे महत्व लक्षात घेऊन त्यांचे नामकरण " श्री अन्न" असे करण्यात आले आहे. याच अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाअंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि उमेद, माहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, परभणी यांचे संयुक्त विद्येमाने अन्न विज्ञान आणि पोषण विभागात जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता समूहास दिनांक ३० ऑक्‍टोबर रोजी श्री अन्न फराळ निर्मिती यावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी व्यक्तीच्या दैनंदिन आहारात भरडधान्य जसे की, ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे, भगर इत्यादींचा समावेश असणे अतिशय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थीना दिवाळी सणानिमित्त भरडधान्याचे विविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री केल्यास महिला प्रशिक्षणार्थीना आर्थिक लाभ मिळण्याची संधी असून त्यासाठी शासनाद्वारे निश्चित प्रयत्न केले जातील असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विशद केले.

प्रशिक्षणा दरम्यान विविध भरडधान्य पाककृती जसे की, शाही चकली, शाही शेव, शाही शंकरपाळे, शाही खस्ता पुरी, शाही मठरी, शाही लाडू आणि शाही चिवडा यासारखा दिवाळीचा शाही (पौष्टिक) फराळ निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबर प्रशिक्षणार्थींना या पदार्थासाठी विक्री करण्यासाठी आकर्षक पॅकींग कौशल्यातही पारंगत करण्यात आले. सदरील प्रशिक्षण हे ‘सण आला दिवाळीचा- फराळ शाही मिलेटस’ या घोषवाक्यावर आधारित घेण्यात आलेले असून दैनंदिन आहारातील भरडधान्याचा ग्रामीण विभागातही प्रचार होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील डॉ. जया बंगाळे यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षणादरम्यान परिचित करून देण्यात आलेल्या विविध फराळांची माहिती पुस्तिका प्रशिक्षणार्थीना देण्यात आली. या कार्यक्रमाचा लाभ ऐकून ४० महिलांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमासाठी आवश्यक ते मार्गदर्शन डॉ. वीणा भालेराव विभाग, प्रमुख अन्न विज्ञान आणि पोषण विभाग यांनी केले. तसेच डॉ. कल्पना लहाडे आणि  डॉ. अश्विनी बिडवे शिक्षण सहयोगी यांनी या प्रशिक्षण कार्क्रमात शिकवल्या जाणाऱ्या पाककृतींची निवड आणि त्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम पहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील पदव्युत्तर तसेच आचार्य पदवीचे विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी श्री दिपक दहे, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद, श्री धंनजय भिसे, जिल्हा व्यवस्थापक विपणन, श्री विठ्ठल मुळे, जिल्हा व्यवस्थापक उपजिविका, परभणी यांची विशेष उपस्थिती होती.





निक्रा प्रकल्‍पांतर्गत रबी हंगामातील पिक नियोजन चर्चासत्र संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प येथील हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत (निक्रा प्रकल्‍प) दिनांक १८ ऑक्‍टोबर रोजी रबी हंगामाचे नियोजन यावर चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास निक्रा प्रकल्‍पात संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजनेसाठी निवडलेल्या उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना या गावामधील ३८ शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. चर्चासत्रा रबी ज्वारी, हरभरा व करडई या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यापीठ विकसित करडईचे पीबीएनएस-१२, ज्वारीचे परभणी ज्योती, हरभरा पिकाचे आकाश या सुधारीत वाणाच्‍या बियाणे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाकरिता वितरीत करण्यात आले. हवामान बदलानुरुप परिस्थितीत या पिकांच्या वाणांचा अभ्यास शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शनात मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे म्‍हणाले की, सोयाबीन काढणीनंतर लगेच रब्बी पिकांची जमिनीतील ओलावा उडून जाण्यापूर्वी लागवड करावी. विद्यापीठ विकसित वाणांच्या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा. रब्बी पिकांमध्ये आंतरपीक पध्दतीचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला देऊन त्‍यांनी हरभरा अधिक करडई, रब्बी ज्वार अधिक हरभरा या आंतरपीक पध्‍दतीबाबत मागदर्शन केले. कृषि अभियंता डॉ. एम. एस. पेंडके यांनी ठिबक सिचंन व तुषार सिंचन पध्‍दतीबाबत मार्गदर्शन करतांना पिकांना पीक फुलोऱ्यावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी देण्‍याचा सलला दिला. वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. अे. के. गोरे म्‍हणाले की, तेलबिया व दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुरद व गंधकयुक्त खतांचा वापर करावा. याशिवाय रब्बी पिकांमध्ये वेळेवर पेरणी, लागवडीचे अंतर रब्बी ज्वारी व करडई ४५ सें.मी तर कोरडवाहू हरभरा ३० सें.मी. तर बागायत हरभरा ४५ सें. मी. अंतरावर लागवड करावी, बीज प्रक्रिया, वेळेवर पीक संरक्षण व संरक्षीत सिंचन पंचसुत्रीचा अवलंब करावा असे सांगितले. सुत्रसंचालन मृदशास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी केली.

कार्यक्रमास सरंपच (बाभुळगाव) श्रीमती सपना रामदास दळवे, सरंपच (उजळांबा) श्री विठ्ठलराव धोतरे, व सोन्नाचे सरंपच श्री बाळासाहेब देशमुख आदीसह दत्‍तक गांवातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा. आर. एस. राऊत, श्रीमती ए. एस. गुंजकर, एस. पी. काळे, एम. ए. राऊत, व्ही.जे. रिठ्ठे, आर.बी. तुरे, एम. डी. गवळी, एस. एस. सुर्यवंशी, एस. एन. शेख, डी. एस. भुमरे आदींनी परिश्रम घेतले.