Saturday, October 26, 2019

परभणी येथील वनामकृवि, हैद्राबाद येथील क्रीडा व पुणे येथील रोहीत कृषि इंडस्‍ट्रीज यांच्‍यात सामंजस्‍य करार

बाजारात लवकरच उपलब्‍ध होणार पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र 
हैद्राबाद येथील कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र (क्रीडा) यांचे मुळ डिझाइन असलेले चार फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कृषि यंत्र व शक्‍ती विभागाने संशोधनाच्‍या आधारे सुधारणा करून मराठवाडयातील कोरडवाहु शेतीसाठी उपयुक्‍त पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र (फोर इन वन) विकसीत केले. सदरिल यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने व्‍यावसा‍यिकरित्‍या तयार करण्‍याचे अधिकार पुणे येथील रोहित कृषि इंडस्ट्रिज यांना देण्‍यात आले. याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैद्राबाद (क्रिडा) व रोहीत कृषि इंडस्ट्रीज, पुणे यांच्‍यात दिनांक २३ ऑक्‍टोबर रोजी सामंजस्य करार क्रीडा हैद्राबाद येथे करण्‍यात आला. यावेळी माजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्वरलु, कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, क्रीडा संस्‍थेचे संचालक डॉ रविंद्र चारी, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु एम खोडके, सदरील यंत्र विकसीत करणारे पशुशक्तीचा योग्य वापर योजनाच्‍या संशोधिका डॉ स्मिता सोलंकी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक अजय वाघमार, शास्‍त्रज्ञ डॉ आय श्रीनिवासन, डॉ आडके, रोहीत कृषि इंडस्ट्रिजचे कार्यकारी संचालक रोहीत कदम, डॉ एम. एस. पेंडके, सचिन कवडे आदींची उपस्थिती होती.
पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्राचे फायदे
मराठवाडा विभागातील ८७ टक्के क्षेत्र हे पावसावर अवलंबुन असुन हवामान बदलामुळे पावसाचे आगमन, वितरण तसेच निर्गमन यामध्ये बराचसा बदल आढळुन येत आहे. याचा परिणाम कोरडवाहू शेतीवर मागील काही वर्षात दिसुन येत आहे, यासाठी पडणा-या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करून त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणेही आवश्यक आहे. मराठवाडा विभागात मध्यम ते भारी जमिनीचे प्रमाण अधिक आहे. अशा वेळी पडणा-या पावसाचे प्रमाण व तीव्रता तसेच जमिनीचा प्रकार यासर्व बाबी लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रूंद वरंबा सरी पध्दत म्‍हणजेच बीबीएफ पध्दतीने केल्यास फायदेशीर ठरते. कोरडवाहू शेतीसाठी रूंद वरंबा सरी पध्दत एक अत्यंत उपयोगी व हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान ठरले आहे. तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपुर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीर ठरते. या पध्‍दती मुळे पावसाचे पाणी स-यांमध्ये मुरते, त्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात याचा लाभ होतो व त्याची तीव्रता कमी होते. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने टॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारा माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल.
या सर्व बाबीं लक्षात घेऊन क्रीडा, हैद्राबाद व वनामकृवि, परभणी यांनी पाच फणी बीबीएफ फवारणी व रासणीसह बीबीएफ; (रूंद वरंबा सरी) विकसित केलेले यंत्र शेतक-यांकरिता विक्रीसाठी उपलब्‍ध होण्‍यासाठी रोहीत कृषि इंडस्ट्रिज सोबत सांमजस्‍य करार केला. यावेळी केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैद्राबाद येथील विभागातील वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Friday, October 18, 2019

कृषि प्रक्रिया उदयोगांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करण्याची क्षमता.......डॉ. प्रबोध हळदे

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्‍न दिन साजरा
कृषि प्रक्रिया उदयोगांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्‍पट करण्यची क्षमता असुन कृषि अभियंत्यांनी कृषि प्रक्रिया उदयोगांसह इतर शेती कामासाठी लागणारी विविध यंत्रे व उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन मारीको लिमिटेडचे विभाग प्रमुख (खाद्य नियंत्रण) तथा भारतीय खाद्य तंत्रज्ञान संघटनाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व समुपदेशन केंद्रामार्फत जागतिक अन्‍न दिनाचे औचित्य साधून दिनांक 16 ऑक्‍टोबर रोजी “कृषी उद्योगातील संधी व आव्हाने” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते तर कार्यक्रमास डॉ. गोपाळ शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. शाम गरुड आदीची उपस्थिती होती.  
पुढे मार्गदर्शनात डॉ. हळदे यांनी भारतीय पारंपारिक खाद्य संस्कृती समोर ठेवून खाद्य प्रक्रिया यांत्रिकीकरणावर भर देण्‍याची गरज असल्‍याचे सांगुन कृषी विद्यापीठातील विद्यार्थांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. चर्चेसत्रात विद्यार्थांच्या कृषि प्रक्रिया उद्योगाशी निगडीत प्रश्नांचे डॉ. प्रबोध हळदे यांनी निरसन केले. भाषणात प्राचार्य डॉ.उदय खोडके विद्यार्थ्यांनी आयुष्यात आपले ध्येय समोर ठेवून प्रामाणिकता व कठीण मेहनत, आत्मविश्वास जोपासल्यास ध्येय साध्य करणे कठीण नाही असे सांगितले.
सुत्रसंचालन डॉ. शाम गरुड यांनी केले तर प्रा. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तुकाराम चावण, ऋषिकेश होळकर, रोहित गायकवाड, प्रफुल्ल देशमुख, रोहन आरकडे, वरद आढाव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, October 15, 2019

वनामकृविच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्‍त ग्रंथ प्रदर्शन संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली, यानिमित्‍त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या प्रतिमेस कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी पुष्‍णहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वाचनामुळे प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होऊन जीवनात मोठे यश संपादन करता येते. विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनातच वाचनाची आवड निर्माण करायला हवी. प्राध्‍यापकांनीही नियमित ग्रंथाचे वाचन करून आपले अध्‍यायन कौशल्‍य वृध्‍दींगत करावे, असा सल्ला देऊन विद्यार्थ्‍यांना अभ्‍यास करतांना येणारा क्षीण कमी करून स्‍फुर्ती निर्माण करण्‍याकरिता लवकरच विद्यापीठ ग्रंथालयात भारतरत्‍न डॉ ए पी जे अब्‍दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी भाषणांचे संग्रहित व्‍हीडिओचे स्‍वतंत्र दालन निर्माण करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 
याप्रसंगी आयोजित ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्‍यानी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ग्रंथपाल डॉ संतोष कदम, डॉ वंदना जाधव, श्री मोहनकुमार झोरे, गोमटेश बुक एजन्‍सीचे श्री भुषण घोडके आदीसह ग्रंथालयीन कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Saturday, October 12, 2019

वनामकृवित डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय कृषि संशोधन परिषद व जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पातंर्गत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्‍या वतीने दिनांक 11 ऑक्‍टोबर रोजी वैद्यनाथ वसतीगृहात विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांकरिता डिजीटल शेती व संशोधन यावर कार्यशाळाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यशाळेत प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ राजेश कदम, डॉ धीरज कदम, प्रा संजय पवार, डॉ सुरेश वाईकर, डॉ भारत आगरकर, डॉ श्‍याम गरूड, डॉ विशाल इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ गोपाल शिंदे यांनी पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्‍या संशोधनात डिजीटल शेती व डिजीटल साधनांचा विविध शेती कार्यात उपयोग करून शेती व शेतक-यांच्‍या प्रश्‍नावर उपाय निर्माण करता येतील असे सांगुन राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना डिजीटल शेती तंत्रज्ञानात काम करण्‍याची विविध संधीची माहिती दिली. जागतिकस्‍तरावर प्रगत देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन हे तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतक-यांच्‍या परिस्थितीस अनुकूल बनविण्‍याची गरज असुन त्‍यासाठी लागणारे उच्‍चतम कौशल्‍य प्राप्‍त मनुष्‍यबळाची निर्मिती या प्रकल्‍पांतर्गत प्रयत्‍न करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यासाठी प्रकल्‍पांतर्गत विद्यापीठाने डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील विद्यापीठे व शैक्षणिक संस्‍थेशी करार करण्‍यात आले असुन या संस्‍थेत प्रशिक्षण घेण्‍याची संधी कृषिच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना प्राप्‍त होणार असल्‍याचे सांगितले. याकरिता पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी शैक्षणिक संशोधनात निवडतांना डिजिटल शेतीशी निगडीत विषय निवडावा प्रकल्‍पांतर्गत डिजिटल शेती क्षेत्रात आतंरराष्‍ट्रीय स्‍तरावर कार्यरत संशोधक, प्राध्‍यापक व विद्यापीठे यांचे संपर्क जाळे निर्माण करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत कृषि शाखा, अन्‍न तंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी, उद्यानविद्या शाखेतील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
जागतिकस्‍तरावर प्रगत देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन डिजिटल शेती करून अधिक व दर्जेदार कृषि उत्‍पादन कार्यक्षमरित्‍या शेतकरी घेत आहेत. हे तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतक-यांच्‍या परिस्थितीस अनुकूल बनविण्‍याची गरज असुन त्‍यासाठी लागणारे उच्‍चतम कौशल्‍य प्राप्‍त मनुष्‍यबळाची निर्मिती करण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भारतीय कृषि संशोधन परिषदेने राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍पातंर्गत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रास पुढील तीन वर्षा करिता मान्‍यता देण्‍यात आली आहे.

Wednesday, October 9, 2019

वनामकृवित वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनावर भर

वनामकृवितील कृषि पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी वृक्षसंवर्धनासाठी सरसावले



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ व हरित विद्यापीठ अभियान राबविण्‍यात येत असुन विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील विविध प्रक्षेत्रावर आजपर्यंत हजारो वृक्षाची लागवड करण्‍यात आली आहे. केवळ वृक्षलागवड करून न थांबता त्‍या वृक्षाचे संवर्धनाकरिताही विद्यापीठ विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, अधिकारी कर्मचारी व नागरिकांच्‍या सहकार्याने अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानाचा भाग म्‍हणुन दिनांक 8 ऑक्‍टोबर रोजी विजयादशमीचे औजित्‍य साधुन वैद्यनाथ वसतीगृहात विद्यार्थ्‍यी व प्राध्‍यापकांनी लागवड करण्‍यात आलेल्‍या वृक्षांचे संगोपन करण्‍याच्‍या दृष्‍टीने सकाळी दोन तास श्रमदान केले. यावेळी लागवड केलेल्‍या वृक्षाच्‍या सभोवताली व्‍यवस्‍थीतरित्‍या आळे करण्‍यात येऊन आळया भोवतालचे अनावश्‍यक गवत काढुन वरच्‍या बाजुस आच्‍छादन करण्‍यात आले. या श्रमदानात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ राजेश कदम, डॉ धीरज कदम, डॉ सुरेश वाईकर, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डॉ संदिप बडगुजर, डॉ प्रल्‍हाद जायभाये, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी राहुल चौरे, सतीश सुरासे, वैभव ठानगे, विशाल राठोड, तात्‍यासाहेब, गडदे आदीसह कृषि विद्याशाखेच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.

Tuesday, October 8, 2019

वैविध्‍दपुर्ण सांस्‍कृतिक व बौध्‍दिक विचारांनी विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व प्रगल्‍भ होईल.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित देशातील अकरा राज्‍यातील 173 विद्यार्थ्‍यांनी घेतला विविध पदवी अभ्‍यासक्रमास प्रवेश
अकरा राज्‍यातील दिडशे पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यींनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध घटक महाविद्यालयातील पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी अभ्‍यासक्रमात यावर्षी प्रवेश घेतला आहे, या विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतीक, भाषिक व सामाजिक पार्श्‍वभुमीत वैविध्‍द आहे. यामुळे महाविद्यालयीन जीवनात वैविध्‍दपुर्ण सांस्‍कृतिक व बौध्‍दिक विचारांचे देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व प्रगल्‍भ होण्‍यास मदत होणार आहे, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्‍ये भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन विविध पदवी अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उदबोधन कार्यक्रम दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते, लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि एन धुतराज, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ जयश्री झेंडे, डॉ हेमंत देशपांडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, पालकांच्‍या आपल्‍या मुलांकडुन अनेक अपेक्षा असतात, शिक्षणाकरिता आपले गाव, राज्‍य सोडतांना निश्चितच सर्वांना त्रासदायक असते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आई-वडीलांच्‍या संस्‍काराची सातत्‍यांनी जाण ठेवावी. यापुर्वीही परभणी कृषि विद्यापीठातुन विविध राज्‍यातील अनेक विद्यार्थ्‍यांनी पदवी प्राप्‍त करून चांगले यश संपादन केले आहे. विद्यापीठ परिसर सुंदर, स्‍वच्‍छ, हरित व सुरक्षित करण्‍याचा आमचा मानस असुन इतर राज्‍यातील विद्यार्थ्‍यांनाही येथे सुरक्षीत वाटले पाहिजे. परराज्‍यातील विद्यार्थ्‍यांना शिकवितांना प्राध्‍यापकांनाही स्‍वत: च्‍या अध्‍यापनात सुधार करण्‍याची संधी आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रल्‍हाद जायभाये यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालयातील कृषी, कृषि अभियांत्रिकी, अन्‍नतंत्र, उद्यानविद्या, सामाजिक विज्ञान आदी विद्या शाखेत पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य अभ्‍यासक्रमात देशातील अकरा राज्‍यातील 173 विद्यार्थ्‍यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या माध्‍यमातुन प्रवेश घेतला. यात राजस्‍थान, पश्चिम बंगाल, उत्‍तर प्रदेश, बिहार, तेंलगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, ओरिसा, मध्‍य प्रदेश, मनिपुर आदी राज्‍यातील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.

Monday, October 7, 2019

वनामकृविच्‍या उत्तरा मुलींच्या वसतीगृहात मंडळ कृषि अधिकारी झालेल्‍या विद्यार्थ्‍यींनीचा सत्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या उत्तरा मुलींचे वसतीगृहात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत मंडळ कृषि अधिकारी या पदासाठी नुकतीच निवड झालेल्या परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यींनीचा दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉ. अंजली निरस यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. प्रियंका वालकर, सपना देव्हारे व स्वाती कागणे विद्यार्थ्‍यींनी मंडळ कृषि अधिकारी म्हणुन निवड झाली आहे. कार्यक्रमात डॉ. अंजली निरस व सहाय्यक वसतीगृह अधिक्षीका डॉ. मिनाक्षी पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले व मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पठाण मॅडम, मृदुला रोजेकर, माया कुन्टे, आरती पाटील, चित्रा कंन्नर, किरण शिंदे, सोनाली इंगळे, गीतांजली केतके, प्रियंका बोर्डे, मेघा कोतुरवार आदींनी परिश्रम घेतले. 

Wednesday, October 2, 2019

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात महात्‍मा गांधी जयंती निमित्‍त स्‍वच्‍छ भारत हरित भारत अभियान


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री जयंतीचे औजित्‍य साधुन दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी स्‍वच्‍छ भारत हरित भारत अभियानाचे आयोजन करण्‍यात आले होते. अभियानाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कुलसचिव श्री रणजित पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ भगवान आसेवार, डॉ जहांगिरदार, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, प्‍लॉस्टिकमुळे मोठया प्रमाणात पर्यावरणाचा हास होत असुन सर्वांनी प्‍लॉस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावा. प्रत्‍येकांनी वैयक्‍तीक जीवनात परिसर स्‍वच्‍छतेसाठी आग्रही राहावे. स्‍वच्‍छ व हरित विद्यापीठाकरिता विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व कर्मचा-यांनी योगदान देण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. यावेळी उपस्थित प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी महाविद्यालय व वसतीगृह परिसर स्‍वच्‍छ केला. तसेच वृक्षलागवड अभियानात लागवड केलेल्‍या झाडांना व्‍यवस्थितरित्‍या आळे करण्‍यात आले व आळया भोवतालचे अनावश्‍यक गवत काढुन वरच्‍या बाजुस आच्‍छादन करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ पपिता गौरखेडे, प्रा विजय जाधव, डॉ आनंद बडगुजर यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वयंसेवकांनी व राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी डॉ एस व्‍ही कल्‍याणकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.