Friday, July 31, 2020

वनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दर आठवडयात सुदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनांचा संतुलित वापर यावर ऑनलाईन राज्‍यस्‍तरीय वेबीनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले असुन या मालिकेचे दुसरे सत्रात दिनांक २९ जुलै रोजी कपाशीतील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते.

मुख्य मार्गदर्शक किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापना बाबत सखोल असे मार्गदर्शन करून गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रमाबाबत माहिती दिली. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पातेफुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पातेफुले यावर अंडी घालतातत्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ असुन कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, असा सल्‍ला दिला.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, पिकांतील किडींचे व्यवस्थापन करताना अचुक वेळ साधणे फार महत्वाचे असते. त्याकरिता विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अत्यंत योग्य वेळी शेतक-यांमध्ये गुलाबी बोंडअळी बाबत जनजागृती करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केले असुन याचा निश्चितच शेतकरी बांधव व कृषि विस्‍तारक यांना लाभ  होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. तसेच मार्गदर्शनात डॉ. देवराव देवसरकर यांनी कपाशीवरील किड व्यवस्थापनाचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोजक डॉ धीरज कदम यांनी केले. या वेबिनारमध्‍ये शेतकरी बांधव व कृषि विस्‍तारक मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचा पुढचा भाग शनिवार दिनांक १ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७.०० वाजता आयोजित केला असुन यामध्ये सोयाबीनवरील कीड व्यवस्थापनावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी झुम आयडी ९४१ ५३५ ०६१६ व पासवर्ड १२३४५ याचा वापर करावा तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. कार्यक्रमात बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

Wednesday, July 29, 2020

वनामकृविच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये शेतमाल प्रक्रिया, निर्यात व विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप)नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले असुन सदरिल वेबिनार मध्‍ये दिनांक २९ जुलै रोजी यशस्‍वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले, यात बेंगलोर येथील नामधारी सिड्स प्रा. लिमिटेडचे नाशिकस्थित महाव्यवस्थापक व संचालक श्री सुनिल अवारी यांनी शेतीमाल पुर्व प्रक्रिया तंत्रज्ञान व निर्यात यावर मार्गदर्शन केले तसेच परभणी येथील विश्वास अॅग्रो फुड प्रॉडक्ट्सचे संचालक श्री युसुफ ईनामदार यांनी गट शेती कृषि प्रक्रिया उद्योग (पेरु, पपई, हळद) तसेच बेंगलोर येथील फुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री शशिन शोभने यांनी फळे व भाजीपाला पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन तर बेंगलोर येथील क्लाऊंड टेल इंडिया प्रा.लि.चे प्रॉडक्ट कम्प्लायंस मॅनेजर श्री सचिन अचिंतलवार यांनी शेतीमाल पुर्व प्रक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात श्री सुनील अवारी म्‍हणाले की, शेती ही पांरपारिक पध्दतीने न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन केल्यास निश्चितपणे मोठया प्रमाणावर नफा मिळू शकतो. शेती करतांना बाजारात मागणी असणा-या पिकांची लागवड करावी. मल्चींग, माती विरहीत हायड्रापोनिक्स, ग्रीन हाऊस मध्‍ये लागवड आदी आधुनिक पध्दतीने ठरावीक पिकाची नियोजनबध्द लागवड करावी. नाशिक पॅटर्न प्रमाणे गट शेती मोठा प्रमाणावर यशस्‍वी झाली आहे. उत्पादीत झालेल्या शेतीमालाची काढणी पश्चात आधुनिक तंत्रज्ञान जसे तापमान नियोजन, पुरवठा साखळी, प्लास्टिक क्रेटचा वापर, प्रतवारी, पॅकिंग, प्रिकुलींग इत्यादी नाविन्य पुर्ण पध्दतींचा अवलंब करुन बाजारात दिड पटीने जास्त नफा मिळू शकतो असे प्रतिपादन त्‍यांनी केले. त्याच प्रमाणे शेतमालाची योग्य व एकसारख्या आकारात प्रतवारी केल्यानंतर आकर्षित पॅकिंग करुन देशाबाहेर निर्यात करणेसाठी विविध प्रकारचे शासकीय मानके विचारात घेऊन मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे ही सुचविले.

श्री युसूफ इनामदार यांनी अन्न प्रक्रिया उद्योगात येणा-या विविध अडचणी, उपाय आणि त्यांचे अनुभव याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पेरु, पपई व हळद या पिकांची आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीने लागवड कशी करावी व त्यापासून मिळणा-या उत्पादनाचे विविध मुल्यवर्धीत पदार्थात रुपांतर करणे बाबत सखोल मार्गदर्शन केले. नवउद्योजकांना प्रक्रिया व मुल्यवर्धन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, बँक व इतर शासकीय मार्गाने कमी वेळेत अर्थ सहाय्य मिळावे आणि त्यासाठी लागणारा परवाना देखील अखिल भारतीय स्तरावर म्हणजे एकाच छत्रा खाली असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री शशिन शोभने यांनी फळे व भाजीपाला पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक विविध महत्वाच्चा बाबी जसे शेतीतील गुणवत्ता कशी टिकवावी, विक्री करिता कोणत्या प्रकारचा परवाना लागतो, शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक गुणवत्ता तपासणी इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले. त्‍यांनी कुठल्याही प्रकारचा शेतमाल प्रक्रिया उद्योगाच्या यशस्वीतेसाठी गटशेती हा उत्तम पर्याय असल्याचे सुचविले.

श्री सचिन अचिंतलवार यांनी ऑनलाईन विक्रि व्यवस्थापना संबंधी माहिती देताना सद्यस्थितीत बाजारपेठेत उपलब्ध असणा­या ऑनलाईन सुविधांबाबत मार्गदर्शन केले यात विशेषत: अॅमेझॉन तथा फ्लिपकार्ट व जिओ मार्ट सारख्या विविध अॅप द्वारे आपण तयार केलेला माल ग्राहकांपर्यंत कसा पोहचतो याबाबत माहिती दिली. सदरिल ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन करतांना आवश्यक सर्व बाबी तथा परवाने उदा. जिएसटी प्रमाणत्र, एफ.एस.एस.ए.आय. प्रमाणपत्र, शासकिय धोरणे इत्यादी बद्दल सखोल माहिती दिली. श्री. अचिंतलवार यांनी यावेळी शेतमालप्रक्रिया उद्योगामध्ये केवळ प्रक्रिया व मुल्यवर्धन एवढेच पर्याय नसुन या पेक्षाही वेगळ्या प्रकारे उत्पादीत माल ग्राहकापर्यंत पोहचवुन मोठया प्रमाणावर नफा मिळवु शकतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक आयोजक प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केले तर आयोजन सचिव प्रा. शाम गरुड यांनी आभार मानले. वेबिनार मध्‍ये कृषिचे विद्यार्थी शेतकरी बांधव, महिला बचत गट सदस्य उद्योजकांनी सहभाग नोंद‍विला होता.

वनामकृविमध्ये राज्यस्तरीय ऑनलाइन बाल विकास प्रशिक्षणाचे आयोजन

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक संकटांचा सामना करत असतानाच शिक्षणाच्या बाबतीतही अनेक समस्या उद्भवत आहेत. या आव्हानात्मक काळातही गरजूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास कौटुंबिक अभ्यास विभागाच्‍या वतीने ५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर कालावधीत बाल विकास शैक्षणिक केंद्रांचे व्यवस्थापन या राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात बहुतांश कुटुंबातील दोन्ही पालक नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असल्याने बाल विकास  केंद्रांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले असुन दर्जेदार बालविकास केंद्रांची मागणी वाढत आहे. सदरील अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले प्रशिक्षणार्थी दर्जेदार बालविकास शैक्षणिक केंद्र जसे की प्ले स्कूल, नर्सरी स्कूल, किंडरगार्टन, बालविकास केंद्र, बालछद केंद्र (हॉबी सेंटर) आदी सुरू करण्यास अथवा या केंद्रांमध्ये शिक्षक, संगोपक, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका पदावर नोकरी करून अर्थार्जन करण्यासाठी सक्षम होतात. तसेच बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभावी पालक होण्याकरिता  हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी उमेदवार किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य असून महिला व पुरुषांसाठी प्रवेश खुला आहे. तेव्हा या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणाच्या समन्वयिका डॉ जया बंगाळे व डॉ वीणा भालेराव यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी ८३२९३७२९७४, ७५८८०८२०५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Monday, July 27, 2020

वनामकृविच्‍या वतीने सुद्दढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलित वापर यावर राज्यस्तरीय वेबिनार मालिकेस प्रारंभ

वेबिनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन दर शनिवार सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पध्‍दतीने विद्यापीठ किटकशास्‍त्रज्ञ साधणार संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पाच्‍या वतीने सुद्दढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलित वापर यावर राज्यस्तरीय वेबिनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले असुन या मालिकेचे उदघाटन दिनांक २५ जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्‍ठाता तथा किटकशास्‍त्रज्ञ डॉ अजितसिंह चंदेले हे होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, नाहेप प्रकल्पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे, आयोजन सचिव डॉ धीरजकुमार कदम उपस्थित होते.

मार्गदर्शनात किटकशास्‍त्रज्ञ डॉ अजितसिंह चंदेले म्‍हणाले की, रासायनिक किडनाशकांचा अयोग्‍य व अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. पर्यावरण पुरक एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन करण्‍याची गरज असुन जैविक किडनाशकांचा वापर वाढवावा लागेल. ज्‍या ठिकाणी आपणास रासा‍यनिक किडनाशकांस पर्याय उपलब्‍ध आहे, त्‍या ठिकाणी वापर टाळला पाहिजे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, रासायनिक किडनाशकांच्‍या अतिरेक वापरामुळे पर्यावरण व मानवाच्‍या आरोग्‍य अनिष्‍ट परिणाम होत आहे. रासायनिक किटनाशकांचा वापर मर्यादीत ठेवुन जैविक घटकांचा वापर करावा लागेल. परभणी कृषि विद्यापीठ जैविक किडनाशके, बुरशीनाशके व जैविक खत निर्मितीवर भर देत असुन याचा शेतकरी बांधव मोठा लाभ घेत आहेत. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सातत्‍याने ऑनलाईन पध्‍दतीने शेतकरी बांधवाशी संवाद साधत असुन दर शनिवारी किटकशास्‍त्रज्ञ वेबिनारच्‍या माध्‍यमातुन संवाद साधणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

तांत्रिक सत्रात डॉ संचिव बंटेवाड यांनी रासायनिक किटकनाशकांची सुरक्षीत हाताळणी यावर तर डॉ बस्‍वराज भेदे यांनी रासयनिक किटकनाशकाची ओळख व संतुलित वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी विचारलेल्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. 

प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मेघा जगताप यांनी केले तर आभार आयोजन सचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी मानले. सदरिल वेबिनारला राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषि विस्‍तारक, कृषि अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या वेबिनार मालिकेच्‍या माध्‍यमातुन दर शनिवार सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पध्‍दतीने विद्यापीठ किटकशास्‍त्रज्ञ संवाद साधणार असुन विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर थेट प्रक्षेपण होणार आहे.

शेतकरी व शेतीच्या विकासाकरिता शेतमाल प्रक्रिया आवश्यक ...... उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई

वनामकृवित आयोजित डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” यावरील ऑनलाईन वेबिनारचे उदघाटन 

भारत हा कृषि प्रधान देश असला तरी देशाच्या सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍नात शेतीचा केवळ १७ टक्के वाटा आहे, आज मोठया प्रमाणात शेतमाल उत्‍पादन होते, परंतु साधारणत: ३० ते ४० टक्के नासाडी होऊन वाया जातो. याकरिता शेतमालावर प्रक्रिया व मुल्‍यवर्धन करणे गरजेचे आहे. त्‍यामुळे शेतमालाची नासाडी न होता, शेतक-यांनाही आर्थिक लाभ होईल. शेतमाल प्रक्रिया केल्‍यासच शेतीला भविष्‍य आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप)नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले असुन या वेबिनाराच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते, विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि विपणन (महाराष्‍ट्र राज्‍यचे संचालक मा श्री सतीश सोनी व नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे उपस्थित होते तर नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ आर सी अग्रवालशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेनाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमारप्राचार्य डॉ अरविंद सावते आदींची उपस्थिती होती.

उद्योगमंत्री मा. ना. श्री सुभाषजी देसाई पुढे म्‍हणाले की, कृषि प्रक्रिया उद्योगाच्‍या विकासासाठी शासनाने अनेक धोरणात्‍मक निर्णय घेतलेले असुन शासकीय योजनाचा कृषिच्‍या विद्यार्थ्‍यींनी कृषि प्रक्रिया उद्योग उभारून लाभ घ्‍यावा. यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भुमिका राहणार असून विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे स्नातक विद्यार्थी यांना शेतमाल प्रक्रिया उद्योजक होण्‍यासाठी प्रेरित करावे. देशात होणारा शेतीमालाची नासाडी कमी करण्‍यासाठी अद्यावत पुरवठा साखळी तथा मुल्यवर्धनासाठी संशोधन करावे. जिल्हातंर्गत असलेल्‍या औद्योगिक वसाहातीत शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योगासाठी भुखंड राखीव ठेऊन सदरील उद्योगांना प्राधान्य देण्यात येत असुन उद्योग विकासाकरिता उद्योगमित्र पुरविण्याचे आश्वासनही त्‍यांनी दिले.

अध्‍यक्षीस भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, शेतमाल प्रक्रिया उद्योगात अनेक कृषिचे विद्यार्थ्‍यी कार्यरत असुन ते ग्रामीण युवकांसाठी दिपस्‍तंभाचे कार्य करित आहेत. कृषि प्रक्रिया उद्योगात येणा-या समस्‍या व त्‍यावर उपाय यावर या यशस्‍वी उद्योजकांचे मार्गदर्शन नवउद्योजकांना मोलाचे असुन या वेबिनारच्‍या माध्‍यमातुन निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.  

नाशिक येथील सह्याद्री फार्मसचे व्‍यवस्थापकीय संचालक मा. श्री विलास शिंदे यांनी शेतक-यांना स्‍वत:चा उत्पादीत शेत मालाची विक्री मुल्‍यवर्धन करून तथा ब्रँडींग करण्यासाठी स्वत:पासूनच प्रयत्न करण्‍याचा सल्‍ला ‍दिला तसेच कृषि विक्री व्यवस्थापन (महाराष्ट्र राज्य, पुणे) व्यवस्थापकीय संचालक मा. श्री सतिश सोनी यांनी महाराष्ट्र पणन महामंडळात असणा-या विविध शासकीय धोरण तथा योजना याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्‍ताविकात आयोजन सचिव प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी ऑनलाईन वेबीनार आयोजित करण्यामागची भुमिका याबद्दल माहिती दिली तर नाहेप प्रकल्प प्रमुख अन्वेषक प्रा. गोपाळ शिंदे  यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा. डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ शाम गरुड यांनी मानले. सदरील वेबीनारसाठी सुमारे दोन हजारपेक्षा जास्‍त  व्‍यक्‍तींनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यामध्ये ५०  टक्के कृषिचे विद्यार्थी,  ३० टक्के शेतकरी बांधव, २० टक्के महिला बचत गट सदस्य, १५ टक्के उद्योजकांचा सहभाग आहे. वेबिणारचे मुख्‍य आयोजक अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाच्‍या पश्चिम विभागाचे अध्‍यक्ष डॉ प्रबोध हळदेमुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्‍युशन चे संचालक श्री उमेश कांबळेनाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वषेक डॉ गोपाल शिंदे आहेत. सदरिल वेबिणारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.

वेबीनार च्‍या समारोपीय समारंभ अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त मा डॉ अरूण उन्‍हाळे यांच्‍या प्रमुख उपस्थिती पार पडणार असुन  विशेष अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्‍यक्ष मा डॉ सुबोध जिंदाल व भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्‍या संचालिका डॉ संगिता कस्‍तुरे उपस्थित राहणार आहेत.

पाच दिवस चालणा-या वेबीनर मध्‍ये देशातील कृषि प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्‍य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेतया उद्योजकांच्या यशोगाथा प्रत्यक्षपणे त्यांच्या तोंडुन ऐकता येणार असुन त्यात विविध कृषि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल चर्चा करणार आहेत. उद्योग उभारतांना उद्योजकांना येणा-­या अडचणीत्यावरील उपायशेतमाल ऑनलाईन पध्दतीने विविध कंपन्यांमार्फत ग्राहकांना विकणेनिर्यात करणेकेंद्र व राज्य शासनाच्या कृषि प्रक्रिया उद्योगाकरीता असणा­-या विविध योजना तसेच गटशेती  व कृषि उद्योग या बाबत माहिती मिळणार आहे. तसेच या उद्योगपतीशी प्रत्यक्ष चर्चाही करता येणार आहे. या ऑनलाईन वेबिनारचा मुख्‍य उद्देश प्रगतशील शेतकरीबचतगटाचे सदस्यशेतकरी गटनवउद्योजकलघुउद्योजक व गृह उद्योजकविद्यार्थी यांना अन्न प्रक्रिया व शेतीपुरक उद्योग सुरू करण्‍यास प्रोत्साहन देणेउद्योग संधीच्या दिशा दाखविणेमनातील उद्यमशीलतेस जागृत करणे हा आहे. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर अशा प्रकारचे राज्‍यात ऑनलाईन वेबिनार प्रथमच होत असुन कृषि प्रक्रिया उद्योगातील नविन संधीचा शोध नवउद्योजकांना घेता येईल.

Friday, July 24, 2020

कापसात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाकरिता कामगंध सापळे लावण्‍याची योग्‍य वेळ

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्‍ला


मराठवाडयात काही भागात कपाशीची लवकर लागवड झालेल्या पिकास फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ असुन कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आला.

गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी पाच या प्रमाणात लावावीत़. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी अथवा प्रादुर्भाव जास्त असल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी. फवारणी करिता प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा 2.प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (संयुक्त कीटकनाशक) 10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे. हे प्रमाण साध्या पंपासाठी असून  पावर (पेट्रोल) पंपासाठी कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. सदरिल कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटक नाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.



Sunday, July 19, 2020

काय आहे यशस्‍वी कृषी प्रक्रिया उद्योजकांच्‍या यशाचे गमक !! जाणुन घ्‍यायचे ??

तर सहभागी व्‍हा, वनामकृवि आयोजित ऑनलाईन वेबिनार मध्‍ये

पाच दिवसात १४ प्रक्रिया उद्योजक स्‍वत: सांगणार यशाचा कानमंत्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथाया विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले आहे. वेबिनाराचे उदघाटन राज्‍याचे उद्योग व खनिकर्म मंत्री मा ना श्री सुभाष देसाई यांच्‍या विशेष उपस्थितीत पार पडणार असुन अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील कृषि विपणन (महाराष्‍ट्र राज्‍य) चे संचालक मा श्री सतीश सोनी व नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत तर नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ आर सी अग्रवाल, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार, प्राचार्य डॉ अरविंद सावते आदींची उपस्थिती राहणार आहे.

समारोपीय समारंभ अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त मा डॉ अरूण उन्‍हाळे यांच्‍या प्रमुख उपस्थिती पार पडणार असुन  विशेष अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्‍यक्ष मा डॉ सुबोध जिंदाल व भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्‍या संचालिका डॉ संगिता कस्‍तुरे उपस्थित राहणार आहेत.

पाच दिवस चालणा-या वेबीनर मध्‍ये देशातील कृषि प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्‍य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेत, या उद्योजकांच्या यशोगाथा प्रत्यक्षपणे त्यांच्या तोंडुन ऐकता येणार असुन त्यात विविध कृषि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल चर्चा करणार आहेत. उद्योग उभारतांना उद्योजकांना येणा-­या अडचणी, त्यावरील उपाय, शेतमाल ऑनलाईन पध्दतीने विविध कंपन्यांमार्फत ग्राहकांना विकणे, निर्यात करणे, केंद्र व राज्य शासनाच्या कृषि प्रक्रिया उद्योगाकरीता असणा­-या विविध योजना तसेच गटशेती  व कृषि उद्योग या बाबत माहिती मिळणार आहे. तसेच या उद्योगपतीशी प्रत्यक्ष चर्चाही करता येणार आहे. या ऑनलाईन वेबिनारचा मुख्‍य उद्देश प्रगतशील शेतकरी, बचतगटाचे सदस्य, शेतकरी गट, नवउद्योजक, लघुउद्योजक व गृह उद्योजक, विद्यार्थी यांना अन्न प्रक्रिया व शेतीपुरक उद्योग सुरू करण्‍यास प्रोत्साहन देणे, उद्योग संधीच्या दिशा दाखविणे, मनातील उद्यमशीलतेस जागृत करणे हा आहे. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर अशा प्रकारचे राज्‍यात ऑनलाईन वेबिनार प्रथमच होत असुन कृषि प्रक्रिया उद्योगातील नविन संधीचा शोध नवउद्योजकांना घेता येईल. वेबिणारचे मुख्‍य आयोजक अखिल भारतीय अन्‍न प्रक्रिया उद्योजक संघटनाच्‍या पश्चिम विभागाचे अध्‍यक्ष डॉ प्रबोध हळदे, मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्‍युशन चे संचालक श्री उमेश कांबळे, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वषेक डॉ गोपाल शिंदे आहेत. सदरिल वेबिणारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार असुन प्रत्‍यक्ष झुम मिंटिग मध्‍ये सहभागी होण्‍यासाठी आयोजक सचिव डॉ. राजेश क्षीरसागर (मो.9834905580), डॉ. भारत आगरकर (मो. 8196036114), डॉ. शाम गरुड (मो.9481734569) यांच्याशी संपर्क साधावा.

 

सदरिल वेबिणार मध्‍ये पुढील विषयावर कृषि प्रक्रिया क्षेत्रातील देशातील नामांकित कंपनीचे संचालक तथा मुख्‍य व्‍यवस्‍थापक थेट संवाद साधणार आहेत.

दिनांक २७ जुलै रोजी सहकारी शेती व उद्योग यावर नाशिक येथील सह्याद्री फार्मचे संचालक मा श्री विलास शिंदे, मशरुम उत्पादन व प्रक्रिया उद्योगातील नविन संधी यावर गोवा येथील झुआरी फुड्स अॅन्ड फार्म्स् प्रा.लि. चे अध्यक्ष मा डॉ संगम कु­हाडे, तर ग्रामीण भागातील फळ प्रक्रिया उद्योग भरारी यावर उदगीर येथील पदमीनी फुड प्रॉडक्ट्स संचालक मा. श्री कालीदास जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक २८ जुलै रोजी कोविड १९ पार्श्‍वभुमीवर अन्न प्रक्रिया उद्योगातील नविन संधी यावर जळगाव येथील जैन ईरीगेशन्स अॅग्रो अॅन्ड फुड प्रोसेसिंग डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ. दिलीप कुलकर्णी, दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगावर कळंब येथील मराठवाडा अॅग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. चे संचालक मा. बालाजी गिते, तर कृषि प्रक्रिया उद्योगातील विविध शासकीय योजना यावर मुंबई येथील आय.टी.सी.ओ.टी. कन्सलटन्स अॅन्ड सर्विसेस लि. चे उपाध्यक्ष  श्री अमोल चिद्रवार मार्गदर्शन करणार आहेत

दिनांक २९ जुलै रोजी शेतीमाल पुर्व प्रक्रिया तंत्रज्ञान व निर्यात यावर नामधारी सिड्स प्रा.लि. बेंगलोर चे महाव्यवस्थापक व संचालक मा. श्री सुनिल अवारी, गट शेती कृषि प्रक्रिया उद्योग (पेरु, पपई, हळद) यावर परभणी येथील विश्वास अॅग्रो फुड प्रॉडक्ट्सचे संचालक मा. श्री युसुफ ईनामदार, शेतीमाल पुर्व प्रक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापनावर बेंगलोर येथील क्लाऊंड टेल इंडिया प्रा.लि.चे प्रमुख मा.श्री सचिन अचिंतलवार, तर फळे व भाजीपाल पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापनावर बेंगलोर येथीलफुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक मा. श्री शशिन शोभने मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक ३० जुलै रोजी ग्रामीणस्तरावर अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला सक्षमीकरण यावर हिमाचल प्रदेश मधील भुईरा जॅम्सच्‍या संचालिका श्रीमती रिबेका मुशरन, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिलांसाठी संधी व आव्हाने यावर ठाणे येथील ङि टेक्नॉलॉजी प्रा.लि. च्‍या  व्यवस्थापकीय संचालिका डॉ. दिपा भाजेकर, तसचे विविध हर्बल एक्सट्रैक्ट्स आणि न्युट्रासिटिकल्स निर्मिती यावर वसमत येथील भुमी न्युट्रॉसिटिकल्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री आतिश साळुंके मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक ३१ जुलै रोजी सेंद्रिय शेतिमाल प्रक्रिया व प्रमाणिकरण यावर राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील अन्‍नशास्‍त्र व तंत्रज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश थोरात तर निसर्ग वनशेतीव्‍दारे शेतकरी बांधवाचा आर्थिक विकास यावर कर्नाटक व गोवा राज्‍याचे इंन्‍कम टॅक्‍स विभागाचे मुख्‍य आयुक्‍त डॉ पंतजली झा मार्गदर्शन करणार आहेत.


 नोंदणी करिता क्लिक करा