Thursday, January 25, 2024

सेंद्रीय शेती हा शाश्‍वत शेतीचा पाया……कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

सेंद्रीय शेती ऑनलाईन संवाद मालिकेचे उदघाटन, प्रत्येक महिन्याच्या दुस-­या व चौथ्या मंगळवारी करण्‍यात येेणार मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरू फाऊंडेशन (मुंबई) यांचे वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या दुस­या व चौथ्या मंगळवारी करण्यात येत आहे. या श्रृखंलेचे उद्धघाटन दिनांक  २३ जानेवारी रोजी सायंकाळी ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. नागपुर येथील जैविक व नैसर्गिक शेती केंद्राचे विभागीय संचालक डॉ. अजय सिंह राजपुत यांचे मुख्य तांत्रिक मार्गदर्शन झाले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. प्रितम भुतडा आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सर्वांचे आरोग्य महत्वाचे आहे, आज एक देश एक स्वास्थ्य (आरोग्य) संकल्पना महत्वाची असून त्यात जमीनीचे, पिकाचे / वनस्पतीचे, मनुष्य व प्राण्यांचे स्वास्थ्य हे एकामेकांवर अवलंबून आहे. शाश्‍वत उत्पादन हे उद्दिष्ट असावे. रसायने विरहीत शेतीपेक्षा कमी रसायने वापरून केली जाणारी शेती करावी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेतीकडे जावे. त्यामुळे अचानक केला जाणारा बदल हा शेती क्षेत्र व एकूणच पर्यावरण यांचासाठी स्विकार्य होईल. आज सेंद्रीय व नैसर्गिक शेती मध्ये निविष्ठांची निर्मीती व उपलब्धता या बाबी महत्वाच्या आहेत. सेंद्रीय व नैसर्गिक शेती मध्ये निविष्ठांची बाहेरून खरेदी करण्यापेक्षा शेतक­यांनी त्या स्वत: शेतावर  बनविने व त्या वापरणे आवश्यक आहेत. त्या कशा कमी खर्चात व शास्त्रीय दृष्टया तयार करता येतील असे प्रशिक्षण शास्त्रज्ञांनी शेतक­यांना देणे आवश्यक आहे. भारतीय शेतकर­यांची सामाजिक, आर्थिक व स्थानिक परिस्थिती बघून, त्यांच्या समस्या लक्षात घेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. सेंद्रीय प्रमाणिकरण ही प्रक्रिया कमी खर्चाची व सोपी करणे आवश्यक आहे. शेताचे, शेतमालाचे, संपुर्ण गावाचे यापैकी कशाचे प्रमाणिकरण करायचे हा निर्णय महत्वाचा ठरतो. सेंद्रीय शेतमालाचे विक्री व्यवस्थापन व सुविधा यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून काम करावे, नव्याने जमीनीचा आरोग्य निर्देशांक विकसीत करावा.           

मार्गदर्शनात डॉ. राजपूत यांनी या पर्यावरणाचे व मानवाचे आरोग्य व चांगले अन्न हा अधिकार सर्वांचा आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, हरीतक्रांतीमुळे शेती उत्पादनात वाढ झाली पण पोषकता कमी झाली. आजार वाढले, प्रश्न वाढले, जमिनीचे आरोग्य खालावले, यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे. त्यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना व जिवामृत, बिजामृत, वाफसा व आच्छादन हे नैसर्गिक शेतीची चार महत्वाचे स्तंभ असून यावर सविस्तर माहिती दिली. याशिवाय शेतक­यांनी मिश्र पीक पध्दती व पारंपारिक ज्ञानांचा अवलंब नैसर्गिक शेतीमध्ये करावा असे आवाहन केले. त्यांनी पाच स्तरीय पीक पध्दती, इमा मार्केट, शेत माल उत्पादनावर आधारित बाजारपेठ यावर माहिती दिली.

डॉ. प्रविण वैद्य यांनी जमीनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमीनीचा कर्ब वाढवणे आवश्यक असून विविध सेंद्रीय निविष्ठांचा पर्याय शोधणे आवश्यक आहे असे सांगितले. याशिवाय शेतक­यांचे अनुभव लक्षात घेवून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

कृषिभुषण शेतकरी श्री. ओंकार शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये सुरुवात ही कडधान्य पिके, भरडधान्य पिके, निवडक भाजीपाला पिके यापासून सुरूवात करावी जेणेकरून उत्पादनात घट येणार नाही, असे आवाहन शेतकरी बंधू-भगिणीना केले. याशिवाय त्यांनी सेंद्रीय शेतीमध्ये मजुरांचा प्रश्न, सुधारित यंत्रे व यांत्रिकीकरणाची गरज, प्रमाणिकरण खर्च कमी करणे, बाजारपेठ व विक्री व्यवस्था यावर काम करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सेंद्रीय शेतमालाला वेगळी आधारभूत किंमत शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व विविध उपक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा व आभार प्रदर्शन डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठा प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. प्रितम भुतडा, डॉ. सुनिल जावळे, श्री. रघुनाथ थोरात, श्री. सचिन रणेर व श्री. अजय कटारे आदींनी परिश्रम घेतले.