Friday, January 17, 2020

वनामकृवित महाराष्ट्र राज्य कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे आयो‍जन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठ व महाबीज यांच्‍या कर्मचारी क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 24 जानेवारी दरम्‍यान विद्यापीठ मुख्‍य क्रीडा संकुल मैदानात करण्‍यात आले असुन सदरिल स्‍पर्धेचे उदघाटन दिनांक 22 जानेवारी डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण राहणार असुन महाबिजचे महासंचालक डॉ अनिल भंडारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल स्‍पर्धेत तेरा क्रीडा प्रकारात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, दापोली येथील बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व महाबिज येथील शंभर पेक्षा जास्‍त अधिकारी व कर्मचारी सहभाग घेणार आहेत. यात क्रिकेट, व्‍हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉस्‍केटबॉल, टेबल टेनिस, रस्‍सीखेच, कबडडी, धावणे, रांगोळी, बुध्‍दीबळ आदी मैदानी खेळासह गीतगायन व मिमीक्री स्‍पर्धेाही आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत. सदरिल स्‍पर्धेचा समारोप दिनांक 24 जानेवारी रोजी परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील व परभणी जिल्‍हा बॅडमिंटन असोशियनचे सचिव श्री रविंद्र देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे, अशी माहिती आयोजक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले व विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी दिली आहे.

Wednesday, January 15, 2020

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पाळण्‍यात आला. यानिमित्‍त विद्यार्थ्‍यांकरिता विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्‍यांमध्ये मराठी भाषा अधिक प्रमाणात प्रचलीत व्हावी यासाठी मराठी माझी मायबोली या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, मराठी काव्य लेखन, वाचन स्पर्धा, मराठी भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांच्या हस्ते विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेप्रसाद शिल्पे, शुभम पाचनकर, वर्षा येंचेवाड या विद्यार्थ्‍यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावल तर मराठी भावगीत गायन स्पर्धे प्रसाद शिल्पे, प्रज्ञा वन्नाळे, वर्षा येंचेवाड व अनामिका अंभोरे या विद्यार्थ्‍यांनी तर मराठी काव्य लेखन व वाचन स्पर्धे वर्षा येंचेवाड, पुजा अंभोरे, प्रसाद शिाल्पे व मीरा शिंदे या विद्यार्थ्‍यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांनी बक्षीसे पटकावली. स्पर्धांचे आयोजन डॉ. वीणा भालेराव, प्रा. मेधा उमरीकर आणि डॉ.माधुरी कुलकर्णी यांनी केले होते. या स्पर्धाना महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, January 14, 2020

राष्‍ट्रीय युवा दिनानिमित्‍त युवा संवाद भित्तिप‍त्रकाचे विमोचन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी स्‍वामी विवेकानंद जयंती निमित्‍त राष्‍ट्रीय युवा दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ रविंद्र देशमुख, डॉ प्रशांत देशमुख, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ विजयकुमार जाधव, डॉ जयश्री एकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यीं लिखित युवा संवाद भित्तिपत्रकाचे विमोचन करण्‍यात आले. मार्गदर्शनात प्रमुख व्‍यक्‍ते डॉ रविंद्र देशमुख म्‍हणाले, जगात भारत हा सर्वांत युवा देश असुन युवा शक्‍तीच्‍या जोरावरच आपण महाशक्‍ती होऊ शकतो. शासकीय नौक-यांमध्‍ये सर्वांनाच संधी मिळणार ना‍ही, त्‍यामुळे कृषि पदवीधरांनी नौक-या देणारे कृषि उद्योजक व्‍हावे असा सल्‍ला त्‍यांनी दिला तसेच डॉ विजयकुमार जाधव यांनी विद्यार्थ्‍यांनी कोणत्‍याही क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्‍न केले तर यश निश्चितच मिळते असे म्‍हणाले. कार्यक्रमात पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी अजित खारगे, अमर गाढवे, गोविंद भोसले, प्रलय झाडे, लव्‍हली नारझरी आदींनी स्‍वामी विवेकांनद यांचे विचार व युवक यावर आपले मनोगत व्‍यक्‍त केले.कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राजेश कदम यांनी केले तर सुत्रसंचलन अपुर्वा मोरे हिने केले. कार्यक्रमास महाविद्यालयातीन प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Saturday, January 11, 2020

महिलाच समाजातील अंधश्रध्‍दा निर्मुलनाचे कार्य करू शकतात....... मा श्री अविनाश पाटील

वनामकृवित आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक ११ जानेवारी रोजी विवेकाचा आवाज बुलंद करू या’ याविषयावर महाराष्‍ट्र राज्‍य अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे राज्‍य कार्याध्‍यक्ष मा श्री अविनाश पाटील यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन जिजाऊ मुलींचे वसतीगृहात करण्‍यात आले होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विठ्रठल घुले, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ सुनील जाधव, डॉ जयश्री एकाळे, प्रा विजयकुमार जाधव, डॉ पपिता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा श्री अविनाश पाटील म्‍हणाले की, समाजातील अनिष्‍ट प्रथा व अंधश्रध्‍दा नष्‍ट होणे आवश्‍यक असुन विज्ञानवादी विचार पुढे नेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्‍दा निर्मुलनाचे कार्य महिलाच करू शकतात. पुरूषाप्रधान संस्‍कृतीत महिलांवर अनेक निर्णय लादले जातात. कोणत्‍याही घडलेल्‍या घटनेकडे वैज्ञानिकदृष्‍टीने पाहिले पाहिजे, घटनेमागील कार्यकारणभाव समजुन घेतला पाहिजे. महाविद्यालयीन जीवनातच सदसदविवेक बुध्‍दीचा वापर करूनच निर्णय घेण्याची सवय लावा.    
शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी भाषणात विद्यार्थ्‍यांनी जीवनात अंधश्रध्‍देला थारा न देता, आधुनिकतेची कास धरली पाहिजे असे म्हणाले. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ जयश्री एकाळे यांनी केले. सुत्रसंचलन सुवर्णा चौधरी हिने केले तर आभार शुभांगी आवटे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ स्‍वाती झाडे, डॉ मिनाक्षी पाटील, डॉ वैशाली भगत, डॉ गोदावरी पवार आदीसह वसतीगृहाच्‍या कर्मचारी व विद्यार्थ्‍यींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.

Wednesday, January 8, 2020

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्‍यांकरिता उद्योजकता विकास जागरुकता यावर तीन दिवसीय शिबीराचे आयोजन दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्‍यान करण्यात असुन शिबीराचे उद्घाटन दिनांक 7 जानेवारी रोजी कुलगूरू मा डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेडचे विभागीय व्यवस्थापक श्री. एस जी. नलावडेप्राचार्या डॉ. जयश्री झेंड, एमसीईडी, प्रकल्प संचालक (परभणी) श्रीमती रुपाली कानगुडे, प्रकल्प संचालक (हिंगोली) श्री शंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात मा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकास व्‍हावा याकरिता कृषि विद्यापीठातील नवीन अभ्‍यासक्रमामध्‍ये अनेक बदल करण्‍यात आले आहेत. दैनंदिन जीवनात वावरतांना व्यवसायाच्या अनेक संधी आपणास सापडतात, त्‍या संधी डोळसपणे शोधण्याची गरज असुन परिश्रम व चिकाटीव्‍दारे संधीचा योग्य उपयोग करुन यशस्‍वी उद्योजक होता येते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी मार्गदर्शना विद्यार्थ्‍यांनी आपल्‍यातील उद्योजकता गुणांची ओळख झाली पाहिजे असे सांगितले तर श्री. एस जी. नलावडे यांनी उद्योजकता कौशल्य काही व्यक्तींमध्ये जन्मत: असते परंतु ते प्रशिक्षणाव्‍दारे देखील विकसित करता येते, असे प्रतिपादीत केले.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांनी सामुदायिक विज्ञान विद्याशाखेद्वारे विद्यार्थ्‍यांना उपलब्ध होणा-य विविध व्यवसायाच्या संधीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विणा भालेराव यांनी केले. प्रशिक्षण शिबीराच्या अभ्यासक्रमाचे नियोजन एमसीईडी, परभणी प्रकल्प संचालक श्रीमती रुपाली कानगुडे यांनी केले असुन शिबिरास विविधस्तरांच्या साधनव्यक्तींना निमंत्रित केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Friday, January 3, 2020

महिला शेतकरी केंद्रीत कृषि तंत्रज्ञान संशोधनावर भर देणार .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद


मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण


मार्गदर्शन करतांना यशस्‍वी महिला उद्योजिका मा सौ अर्चनाताई भोसले

महिलांमध्‍ये मोठी शक्‍ती आहे, आज अनेक क्षेत्रात महिलांनी आपली कर्तबगारी सिध्‍द केली आहे. ग्रामीण महिलाही शेती व शेती पुरक व्‍यवसाय मोठया यशस्‍वीरित्‍या करित आहेत. शेतीतील अनेक कष्‍टांची कामे महिलाच करतात. त्‍यांचे शेतीतील काबाडकष्‍ट कमी करण्‍यासाठी व शेतीतील कामे अधिक कार्यक्षमरित्‍या करण्‍यासाठी महिला केंद्रीत कृषि तंत्रज्ञान निर्मितीवर कृषि विद्यापीठ संशोधनाच्‍या माध्‍यमातुन भर देणार असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय, सामुदायीक विज्ञान महाविद्यालय व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍यात अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. मेळाव्‍याचे उदघाटन परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख अतिथी म्‍हणुन देवसिंगा (तुळजापुर, जि उस्‍मानाबाद) येथील विजयालक्ष्‍मी सखी प्रो़डयुसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला उद्योजिका मा सौ अर्चनाताई भोसले या उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य श्री लिंबाजीराव देसाई, श्री शरदराव हिवाळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री अजय चौधरी, प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंडकृषि अधिकारी श्री बी एस कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, विद्यापीठातील सामुदायीक विज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी महिलांना उपयुक्‍त कृषि अवजारे तसेच शेती पुरक व्‍यवसाय, गृहउद्योग, प्रक्रिया उद्योग यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व कृषि विभाग यांच्‍या माध्‍यमातुन दिले जात आहे. याचा महिला बचत गटांना मोठा लाभ होऊन अनेक ग्रामीण महिला यशस्‍वीपणे व्‍यवसाय करित आहेत, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे.

मार्गदर्शनात परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड म्‍हणाल्‍या की, आज महिला आपल्‍या कौटुंबीक जबाबदारी सांभाळुन कुंटूबासाठी अर्थाजन करित आहेत. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी पुढे यावे, मेहनत व प्रामाणिकपणे कोणतेही कार्य केल्‍यास यश प्राप्‍त होते, असे मत व्‍यक्‍त केले.

मा सौ अर्चनाताई भोसले आपल्‍या मनोगतात म्‍हणाल्‍या की, बचत गटांच्‍या माध्‍यमातुन महिला अनेक गृहउद्योग करित आहेत. रेशीम उद्योग, गांडुळ खत निर्मिती, अझोला निर्मिती, शेतमाल प्रक्रिया, दुग्‍धजन्‍य पदार्थ, कुक्‍कूटपालन आदी व्‍यवसायात महिला बचत गटांना मोठा वाव असुन व्‍यवसायाचे तंत्र शिकाण्‍याची गरज आहे, यासाठी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागातुन मार्गदर्शन घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. सौ अर्चनाताई भोसले या विजयालक्ष्‍मी सखी प्रो़डयुसर कंपनीच्‍या अध्‍यक्षा असुन त्‍यांनी एकविस महिला बचत गटांच्‍या माध्‍यमातुन हजारो महिलांना स्‍वयंरोजगार करण्‍यासाठी प्रवृत्‍त केले असुन स्‍वत:च्‍या पायावर सर्व महिला सक्षमपणे व्‍यवसाय सांभाळत आहेत. 

स्‍वयंशिक्षणातुन क्रांती चळवळीतील श्रीमती गोदावरी क्षीरसागर यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले, त्‍या स्‍वत: कमी शिक्षीत असुनही आज सतरा देशाला त्‍यांनी भेट दिली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

यावेळी कृषि तंत्रज्ञानावर आधारित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. तसेच विद्यापीठ दिनदर्शिका, विद्यापीठ मासिक शेतीभाती व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित घडीपत्रिका, पुस्तिका आदींचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याविषयी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले.


तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी महिला शेतक-यांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. महिलांकरिता अन्‍न प्रक्रिया उद्योगावर डॉ आर बी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले तर सोयाबीन प्रक्रियावर डॉ स्मिता खोडके व महिलांसाठी सुधारीत शेती अवजारे यावर डॉ स्मिता सोलंकी यांनी मार्गदर्शन केले. डॉ माधुरी कुलकर्णी यांच्‍या मार्गदर्शनाखाली सामुदायीक विज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी 'काम काम काम - कसा करू आराम' यावर लघुनाटिका सादर केली तर 'आपला आहार आरोग्‍याचा रखवालदार' यावर डॉ आशा आर्या यांच्‍या मार्गदर्शनाखाली व 'सुधारायचय गावाला' यावर डॉ जया बंगाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली लघुनाटिका सादर करण्‍यात आली. प्राचार्या डॉ जयश्री झेंड यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रसाद शिल्‍पे व शुभम पाचणकर यांनी 'समाजातील अनिष्‍ठ प्रथा' यावर भारूडाच्‍या माध्‍यमातुन प्रकाश टाकला. मेळाव्‍यास महिला शेतकरी, शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


मार्गदर्शन करतांना परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मा. उज्‍वलाताई राठोड 

Thursday, January 2, 2020

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्‍न

वनामकृवि विकसीत नवीन कापूस संकरीत वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी प्रयत्‍नशील..... कुलगुरु मा डॉ अशोक ढवण

कापसावरील गुलाबी बोंडअळीचे प्रभावीपणे व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा लागेल, तसेच लागवडीच्‍या खर्चात कपात करुन उत्पन्न वाढवणे आवश्‍यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसीत नवीन कापूस संकरीत वाण बीटी मध्‍ये परावर्तीत करुन शेतक­र्यांना उपलब्ध करुन देण्‍यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या धनेगाव प्रक्षेत्रावर दिनांक २ जानेवारी रोजी आयोजित गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कोर्इंबतुर येथील अखिल भारतीय समन्वीत कापूस सुधार प्रकल्पाचे प्रकल्‍प समन्वयक डॉ. ए. एच. प्रकाश, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे गुणनियंत्रण महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक श्री. अरविंद सोनोने, नांदेड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अशोक निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनात डॉ. ए. एच. प्रकाश म्‍हणाले की, मध्यम लांबीच्या धाग्याची देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी आयात करावी लागत आहे. एनएचएच-४४ वाणासारख्या संकरीत वाणांची लागवड झाल्यास आयात करण्याची गरज भासणार नसल्‍याचे सांगितले. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्हणाले की, एनएचएच-४४ बीटी वाणाचे विद्यापीठाच्या नांदेड प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकात एकरी दहा क्विंटल उत्पादन प्राप्त झाले असुन विद्यापीठ विकसीत विविध पीकांचे वाण व प्रसारीत तंत्रज्ञान शेतक-यांच्या पसंतीस उतरत आहेत.
आपल्‍या भाषणात श्री. चलवदे यांनी विद्यापीठाच्या वाण व तंत्रज्ञानांमुळे शेतक-यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगून गुलाबी बोंडअळीचा पुढील वर्षातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतक-यांनी चालु हंगामात कापसाची फरदड घेऊ नये, असे आवाहन केले. चालू हंगामात मराठवाड्यात एनएचएच-४४ या बीटी वाणाची सव्वीस हजार पाकीटे उपलब्ध करुन देण्यात आली होती, येणा-या हंगामात यापेक्षा जास्त पाकीटे उपलब्ध करण्याचे नियोजन महाबीजचे असल्‍याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बेग शेतक-यांच्या शेतावर एनएचएच-४४ बीटी वाणाच्या उत्पादनात सातत्य आढळून आले असुन संकरीत वाणाचे बीजोत्पादन क्षेत्र नांदेड जिल्ह्रयात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येण्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबद्दल डॉ. शिवाजी तेलंग व ट्रायकोकार्ड निर्मिती बद्दल श्रीमती संगीता सवालाखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषि विद्यापीठ व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने एनएचएच-४४ बीटी संकरीत वाणाच्या प्रात्यक्षिकाचा शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व राज्याच्या विविध भागातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू कापूस हंगामात किटकनाशक प्रतिकारक्षमता व्यवस्थापन व प्रथमदर्शनी पीक प्रात्यक्षिके योजनेंतर्गत प्रात्यक्षिकधारक शेतक-यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्‍या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. दिनेश पाटील, प्रा. अरुण गायकवाड, श्री. शेळके, श्री. शिंदे, श्री. जोगपेटे, श्री. पांचाळ, श्री. कळसकर, श्रीमती सुरेवाड, श्रीमती ताटीकुंडलवाड आदींनी परिश्रम घेतले.