Thursday, May 30, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीचे मा. मुख्‍यमंत्री महोदयाच्‍या हस्‍ते उद् घाटन

महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांनी उद् घाटनीय भाषण करतांना 

अध्‍यक्षीय भाषण करतांना कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍णजी विखे पाटील 

 
 विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी संपादित केलेल्‍या विद्यापीठाच्‍या  स्‍मरणिकेचे व शास्‍त्रज्ञांनी लिखीत विविध प्रकाशनांचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करतांना 



कृषि प्रदर्शनाचे उद्घघाटन  करतांना

पिंगळगड नाला सिंचनस्‍त्रोत प्रकल्पास मा. ना. श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व इतर मान्‍यवरां माहिती देतांना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, डॉ मदन पेंडके डॉ उदय खोडके आदी 

 राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्‍यात आलेल्‍या कृषि औजारे चाचणी, निर्मिती व‍ प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करतांना 

कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्रास मा. ना. श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण भेटी प्रसंगी माहिती देतांना मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे, डॉ ए के गोरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी 


हवामान बदलाचा विचार करुन कृषि संशोधनाची दिशा ठरविणे आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्रातील 82 टक्‍के क्षेत्र कोरडवाहू शेती खाली आहे. सध्‍याच्‍या दुष्‍काळामुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे, यामुळे कृषि शास्‍त्रज्ञांनी शास्‍त्रीय जल व्‍यवस्‍थापनावर संशोधनावर भर देणे आवश्‍यक आहे. शेतक-यांसाठी पाण्‍याचा ताण सहन करणा-या पिकांच्‍या वाणाची निर्मितीसाठी शास्‍त्रज्ञांनी प्रयत्‍न करावे असा सल्‍ला महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांनी उद् घाटनीय भाषणात राज्‍यातील कृषि संशोधकांना दिला. महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांची संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक 30 मे ते 1 जुन, 2013 या कालावधीत परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहे. सदरील बैठकीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍णजी विखे पाटील होते. महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते, आमदार मा. बाबाजानी दुराणी, आमदार मा. सुरेश जेथलिया,  तसेच अव्‍वर मुख्‍य सचिव (कृषि) डॉ.सुधीरकुमार गोयल, यांच्‍यासह अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे, कृषि परिषदेचे महासंचालक मा.श्री.एन.एच.सावंत, विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ मिन्हांस, जिल्हाधिकारी डॉ शाळीग्राम वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण पुढे म्‍हणाले की, केंद्र व राज्‍य शासन अनेक प्रकल्‍प शेतक-यांसाठी राबवत आहेत. हवामान आधारीत कृषि पिक विमा योजना बळकट करण्‍याचा विचार राज्‍य शासनाचा आहे. हवामान अंदाजावर देशात मोठा खर्च होतो, तरी सुध्‍दा अचूक हवामानाचा अंदाज साध्‍य करणे शक्‍य झाले नाही. राज्‍याला भविष्‍यकाळात दुष्‍काळ मुक्‍त राज्‍य करण्‍यासाठी शासनाचा मानस आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम शासन हाती घेणार आहे. तसेच शिरपूर पॅटर्नच्‍या धरतीवर सिमेंट नाला बंडिंगचे काम मोठ्या प्रमाणात राबविण्‍यात येणार आहे. राज्‍यातील ऊस व कापूस क्षेत्र पूर्णपणे ठिबक सिंचनाखाली येणे आवश्‍यक आहे, यामुळे पाण्‍याची बचत होईल व उत्‍पादनात वाढ होणार आहे. विकेंद्रीत पाणी साठवण योजना राज्‍यात राबविण्‍यात येणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमिवर कृषि विद्यापीठांना महत्‍वाची भूमिका निभवावी लागणार आहे. जगातील पहिल्‍या 200 विद्यापीठात महाराष्‍ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, यामुळे विद्यापीठाने आपली गुणवता वाढविणे गरजेचे आहे. राज्‍यातील कृषि विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्‍ता जगाच्‍या पातळीवर नेणे आवश्‍यक आहे. विद्यापीठाने मुलभूत संशोधनावर भर द्यावा त्‍याचा फायदा निश्‍चीतच शेतकरीवर्गांना होईल. आज मोबाईल व इंटरनेट तंत्रज्ञानामुळे जगात मोठी क्रांती झाली आहे. याच प्रकारचे तंत्रज्ञान कृषि क्षेत्रामध्‍ये निर्माण करावे. दुष्‍काळामुळे शेतक-यांचे झालेले नुकसान हे भरून निघणे सोपे नाही. परंतु शेतीच्‍या व शेतक-यांच्‍या शाश्‍वत विकासासाठी कृषि शास्‍त्रज्ञांनी कार्य करावे असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री मा. ना. श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांनी केले.
अध्‍यक्षीय भाषणात मा. ना. श्री. राधाकृष्‍णजी विखे पाटील म्‍हणाले की, कृषि विद्यापीठ व शेतकरी यांचे जवळचे नाते आहे. विद्यापीठाने मोठे संशोधन केलेले आहे, परंतु या संशोधनामुळे शेतक-यांचा किती प्रमाणात फायदा झाला याचे परिणाम विश्‍लेषण करु शकलो नाही. यासाठी एक स्‍वतंत्र विभाग स्‍थापनेचा शासनाचा विचार चालू आहे. शासनाने राबविलेल्‍या अनेक योजनामुळे शेतकरी आत्‍महत्‍यचे प्रमाण कमी होत आहे. प्रत्‍येक जिल्‍ह्यातील प्रगतीशील शेतक-यांशी चर्चा करुन कृषि विद्यापीठाने कृषि संशोधनाची दिशा ठरवावी. कृषि विद्यापीठाचे पदवीधरांची संख्‍या वाढत आहे, परंतु विद्यापीठाने शैक्षणीक गुणवत्‍ता वाढवली पाहिजे. चारही विद्यापीठामध्‍ये साधारणत: 35 ते 40 टक्‍के कर्मचा-यांच्‍या जागा रिक्त आहेत, त्‍या भरण्‍यासाठी केंद्रीय भरती मंडळाची स्‍थापना करण्‍याचा शासनाचा विचार असून, या निवड प्रक्रिये मार्फत गुणवतेला प्राधान्‍य देते येईल. शेतक-यांना आर्थीकदृष्‍ट्या सक्षम करण्‍यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे असे प्रतिपादन मा. ना. श्री राधाकृष्‍णजी विखे पाटील यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, देशाचा विकास दर वाढवायचा असेल तर कृषि क्षेत्रात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. आज राज्‍यामध्‍ये कृषि महाविद्यालयांचे व संशोधन केंद्राची संख्‍या वाढली आहे. चारही कृषि विद्यापीठात मनुष्‍यबळाची कमतरता आहे, ही कमतरता भरून काढल्‍या शिवाय कृषि संशोधनास गती येणार नाही.
अव्‍वर मुख्‍य सचिव (कृषि) डॉ. सुधीरकुमार गोयल आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या बांधापर्यंत नेण्‍यासाठी कृषि विभाग, कृषि विद्यापीठे व शेतक-यांनी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. सध्‍याच्‍या दुष्‍काळ परिस्थितीमुळे अनेक तांत्रिक प्रश्‍न आपणास पडत आहेत. शेततळयास अस्‍तर असावे की नसावे? माथा ते पायथा की शेततळे व सिमेंट बंधारे या पैकी कोणत्‍या गोष्‍टीवर जास्‍त भर द्यावा यासाठी धोरणात्‍मक निर्णय होणे आवश्‍यक आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे यांनी प्रास्‍तावीकात विद्यापीठाच्‍या संशोधन कार्याची माहिती दिली व पुढे म्‍हणाले की, मराठवाडा कृषि विद्यापीठ लवकरच शेतकरी - शास्‍त्रज्ञ जत्रा भरवणार असून यामुळे शेतकरी व शास्‍त्रज्ञ यांच्‍यांत सुसंवाद निर्माण होईल. कोणताही विकास हा संशोधनावर आधारीत असल्‍यास तो शाश्‍वत असतो. राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतील निधीपैकी 5 टक्‍के निधी हा शिक्षण व संशोधन बळकटीकरणासाठी देण्‍याचा विचार शासनाने करावा. शासनाच्‍या सहकार्यामुळे कृषि विद्यापीठ शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यात मोठे कार्य करत आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सिंचन स्‍त्रोत विकास प्रकल्‍पामुळे 600 हेक्‍टर पडीत जमीन वहितीखाली येणार आहे, यामुळे विद्यापीठ अधिक सक्षम होईल. 41 वी संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची बैठक घेण्‍याचा बहुमान विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे याचा मला आनंद वाटतो. या बैठकीच्‍या निमित्‍ताने 
अमेटी विद्यापीठाचे गुरगांव (हरियाना) येथील संचालक डॉ. पॉल खुराणा यांचे कृषि विकासासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर विचार मांडणार असून नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. सी. देवकुमार हे कृषि संशोधनाच्‍या नविन दिशा या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. यांच्‍यासह राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक संस्‍थाचे संचालक व शास्‍त्रज्ञ त्‍यांच्‍या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्‍मक सादरीकरण करणार असुन राज्‍यातील कृषि संशोधकांना मार्गदर्शक ठरणार आहेत असे प्रतिपादन मा. डॉ. किशनरावजी गोरे यांनी केले आहे.
या बैठकी निमित्‍त विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी संपादित केलेल्‍या विद्यापीठाच्‍या  स्‍मरणिकेचे व शास्‍त्रज्ञांनी लिखीत विविध प्रकाशनांचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
आभार प्रदर्शन संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कुल‍सचिव श्री. का. वि. पागिरे उपस्थित होते. उद् घाटन कार्यक्रमास चारही कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी वर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते.
तीन दिवस चालणा-या या बैठकीच्‍या चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणता 300 कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहेत. राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्‍यात आलेल्‍या कृषि औजारे चाचणी, निर्मिती व‍ प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्‍यात आले. तसेच पिंगळगड नाला सिंचनस्‍त्रोत प्रकल्‍प व कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्रास मा. ना. श्री पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व इतर मान्‍यवरांनी भेटी दिल्‍या. या प्रसंगी भरवण्‍यात आलेल्‍या कृषि प्रदर्शनाचे उद्घघाटन मान्यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

Tuesday, May 28, 2013

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक


संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीचे मा. मुख्‍यमंत्री महोदयाच्‍या हस्‍ते उद्घाटन

संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीच्‍या बैठकीचे मा. मुख्‍यमंत्री महोदयाच्‍या हस्‍ते उद्घाटन

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची 41 वी बैठक 30 मे ते 1 जुन, 2013 या कालावधीत परभणी येथे महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने होत आहे. 30 मे रोजी सकाळी 10.30 वाजता राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते सदरील बैठकीचे उदघाटन होणार असून कृषि व पणन मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्‍णजी विखे पाटील अध्‍यक्ष म्‍हणून लाभणार आहेत. या बैठकीस उच्‍चतंत्र शिक्षण मंत्री मा. ना. श्री. राजेशजी टोपे, कृषि राज्‍यमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव देवकर, परभणीचे पालकमंत्री तथा महसुल राज्‍यमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके, महिला व बालविकास राज्‍यमंत्री मा.ना.प्रा.फौजिया खान, वैद्यकीय शिक्षण राज्‍यमंत्री मा.ना.श्री.डी.पी.सावंत, महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा.ना.श्री.विजयरावजी कोलते, तसेच राज्‍याचे मुख्‍य सचिव मा.श्री.जयंतकुमार बांठिया, अव्‍वर मुख्‍य सचिव (कृषि) डॉ.सुधीरकुमार गोयल, यांच्‍यासह अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. आर. जी. दाणी, राहूरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. टी. ए. मोरे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. ई. लवांदे, नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. ए. के. मिश्रा, कृषि परिषदेचे महासंचालक मा.श्री.एन.एच.सावंत आदींची उपस्थिती लाभणार असून मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. पी. गोरे हे बैठकीचे स्‍वागताध्‍यक्ष आहेत. 

राज्‍यातील कृषि विद्यापीठांनी केलेल्‍या संशोधनामुळे नजीकच्‍या काळात विविध पिकांचे उत्‍पादन व उत्‍पादकता यात लक्षणीय वाढ दिसून येत आहे, असे असले तरी हवामान बदलामूळे तसेच आजची दुष्‍काळग्रस्‍त परिस्थिती, लोकसंख्‍या वाढीमुळे निर्माण झालेल्‍या अन्‍न सुरक्षतेचा प्रश्‍न, जमिनीची -हास होणारी सुपिकता व कृषि उत्‍पादनाचे विविध कारणामूळे होणारे नुकसान यामूळे कृषि विकासाच्‍या वाढीवर मर्यादा येत आहेत. या अनुषगांने कृषि विद्यापीठांनी केलेल्‍या संशोधनातून शेतक-यांना उपयुक्‍त असे शाश्‍वत उत्‍पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरित वाण, पशुधनाच्‍या सुधारित प्रजाती, पिक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, एकात्मिक कीड व रोग व्‍यवस्‍थापन, मृद व जलसंधारण इत्‍यादी सारख्‍या अनेक महत्‍वाच्‍या शिफारशी उपरोक्‍त बैठकीच्‍या माध्‍यमातून शेतक-यांना उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात आणि या शिफारशी शेतक-यांना उत्‍पादन वाढीसाठी उपयोगी ठरतात.

संशोधनावर आधारित या शिफारशी सदरील बैठकीच्‍या माध्‍यमातून शेतक-यांसाठी प्रसारित केल्‍या जातात. राज्‍यातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने सर्वात महत्‍वाची बाब म्‍हणजे विविध पिकांचे अधिक उत्‍पादन देणारे 15 ते 20 नवीन वाणा शिफारशीसाठी चर्चेत येणार आहेत. या व्‍यतिरीक्‍त राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांत झालेल्‍या संशोधनांबाबत जवळपास 200 तंत्रज्ञान शिफारशी या बैठकीत मांडल्‍या जाणार आहेत.

मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारीत एकूण 63 शिफारसी मांडण्‍यात येणार असुन यात चार प्रसारित वाण, 3 पुर्व प्रसारीत वाण, 4 कोरडवाहू तंत्रज्ञान, 3 पिक संरक्षण, 3 मृद व रसायन शास्‍त्र, 1 बीजप्रक्रिया, 1 जैवतंत्रज्ञान, 4 पशु विज्ञान व दुग्‍धशास्‍त्र, 3 उद्यानविद्या, 1 तण नियंत्रण, 4 गृहविज्ञान, 7 अन्‍न तंत्रज्ञान, 2 पाणी व्‍यवस्‍थापन, 19 कृषि अभियांत्रिकी, 4 सामाजिक शास्‍त्रातील शिफारसी या बैठकीत मांडण्‍यात येणार आहेत. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कापसाच्‍या दोन, काबुली हरभराचा एक व सिताफळाचा एक वाणाची शिफारस प्रसारणासाठी मांडण्‍यात येणार आहे.

या सर्वांवर तांत्रिक चर्चासत्रात होऊन शेवटी शेक-यांसाठी प्रसारित करण्‍यासाठी त्‍यास अंतिम मान्‍यता देण्‍यात येणार आहे. तीन दिवस चालणा-या या बैठकीच्‍या चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील साधारणता 300 कृषि शास्‍त्रज्ञ सहभाग नोंदविणार असून प्रथम सत्रामध्‍ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत असलेल्‍या महाराष्‍ट्रातील 9 संशोधन संस्‍थांचे संचालक, तसेच शास्‍त्रज्ञ, राज्‍य शासनाच्‍या विविध विभागाचे 18 आयुक्‍त पदाचे अधिकारी, कृषि विषयक खाते प्रमुखांचे राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.

१ जून रोजी अमेटी विद्यापीठाचे गुरगांव (हरियाना) येथील संचालक डॉ. पॉल खुराणा यांचे कृषि विकासासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर यावर विचार मांडणार असून नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. सी. देवकुमार हे कृषि संशोधनाच्‍या नविन दिशा या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. जेनेटीकली मॉडीफाईड (जीएम) पिकांचा परिणाम व धोरणे या विषयावर नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. आर. क्रांती तर मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. एस. के. चटोप्‍पाध्‍याय यांचे सादरीकरण होणार आहे. मुंबई येथील केंद्रीय मत्‍स शिक्षण संस्‍थेचे संचालक डॉ. डब्‍ल्‍यू. एस. लाक्रा तसेच बारामती येथील राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे संचालक डॉ. पि. एस. मिन्‍हांस, सोलापूर येथील राष्ट्रिय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. जी. अडसूळ, नागपूर येथील राष्ट्रिय लींबुवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. व्‍ही. जे. शिवणकर, राष्ट्रिय डाळींब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रामकृष्‍ण पाल, नागपूर येथील राष्ट्रिय मृद सर्वेक्षण व जमिन वापर योजना केंद्राचे संचालक डॉ. दिपक सरकर, कांदा व लसुन संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. जय गोपाल यांचे त्‍याच्‍या क्षेत्रातील विविध विषयावर संशोधनात्‍मक सादरीकरण राहणार आहे. याप्रकाराचे वैविध्‍यपुर्ण संशोधनात्‍मक सादरीकरण प्रथमच या बैठकीतुन करण्‍याचे मा. कुलगुरू डॉ के. पी. गोरे यांच्‍या कल्‍पनेतुन आयोजीत केले आहे. यामुळे या सर्व राष्‍ट्रीय संस्‍थांच्‍या संचालक व शास्‍त्राज्ञांची व्‍याख्‍याने व सादरीकरणे राज्‍यातील कृषि संशोधकांना मार्गदर्शक ठरणार आहेत, हे निश्चित.

अशा प्रकारे तांत्रिक सत्राच्‍या एकूण 11 गटांमार्फत विविध शिफारशींवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्‍या पहिल्‍या गटात शेतपिकांचे विविध नवीन वाणांचे प्रसारण संरक्षण यावर शिफारशी प्रसारित होणार आहेत. द्वितीय गटामध्‍ये  फळे, भाजीपाला फुले यांच्‍या वाण प्रसारणावर चर्चा होणार असून तृतीय गटात नविन कृषि अवजारे यंत्रे यांच्‍या शिफारशी प्रसारीत करण्‍यात येणार आहेत. विविध शेतपिकांतर्गत पिक सुधारणा तंत्रज्ञान सुधारात्‍मक व्‍युहरचना यावर शिफारशी चौथ्‍या गटात मांडण्‍यात येणार आहे तर नैसर्गीक साधन संपत्‍ती व्‍यवस्‍थापनावरील शिफारशी पाचव्‍या  गटात मांडण्‍यात  येणार आहेत. उद्यानविद्या पशु मत्‍स्‍य विज्ञान यावरील शिफारशी अनुक्रमे 6 7 गटामध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत. गट क्रमांक 8 मध्‍ये  मुलभूतशास्‍त्रे, अन्नशास्‍त्रे तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्‍यात येणार आहेत. पिक संरक्षण कृषि अभियांत्रीकी या विषयावरील शिफारशी गट क्रमांक अनुक्रमे 9 10 गटामध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत तर सामाजिक शास्‍त्रावरील शिफारशी गट क्रमांक 11 मध्‍ये मांडण्‍यात येणार आहेत.

दि. 30 मे रोजी राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. पृथ्‍वीराजजी चव्‍हाण व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते  राष्ट्रिय कृषि विकास योजने अंतर्गत उभारण्‍यात आलेल्‍या कृषि औचारे चाचणी, निर्मिती व‍ प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्‍यात येणार आहे. सदरील बैठकीचा समारोप 1 जुन 2013 रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. ना. श्री विजयरावजी कोलते यांची उपस्थिती लाभणार आहे. या बैठकीसाठी राज्‍याचे मा. राज्‍यपाल व विद्यापीठांचे कुलपती मा. डॉ. के. शंकरनारायणन् व केंद्रीय कृषि मंत्री मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी व अनेक मान्‍यवरांनी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.



Sunday, May 19, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्‍या माध्‍यमातुन परीसर मुलाखती

व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्‍या माध्‍यमातुन परीसर मुलाखती देताना विद्यार्थी व विभाग प्रमुख डॉ विलास पाटील
मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी सल्‍ला व रोजगार केंद्राव्‍दारे नवी दिल्‍ली येथील वैश्‍य बॅके तर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्‍या माध्‍यमातुन 40 विद्यार्थीच्‍या परिसर मुलाखती घेण्‍यात आल्‍या. त्‍यामध्‍ये समुहचर्चा, वैयक्‍तीक मुलाखती घेउन त्‍यांची निवड करण्‍यात आली. यापैकी परभणी येथील कृषि महाविद्यालयातील 3 तर लातुर येथील  कृषि महाविद्यालयातील 2 विद्यार्थीची निवड केली गेली. हे विद्यार्थी पहिल्‍या वर्षी ट्रेनी म्‍हणुन तर नंतर त्‍यांना बॅकेत प्रोबेशनरी अधिकारी म्‍हणुन सामावुन घेतले जाणार आहे. त्‍यांना प्रति वर्ष  साधारणता 4 – 5 लाख रूपये पगार राहणार आहे. ही ऑन लार्इन मुलाखतीची कल्‍पना नवी दिल्‍ली येथील वैश्‍य बॅकचे अध्‍यक्ष यांनी अमलात आणली त्‍यांना विभाग प्रमुख डॉ विलास पाटील व विद्यार्थी सल्‍ला व रोजगार केंद्राचे सचिव डॉ महेश देशमुख यांनी मदत केली. या ऑन लार्इन मुलाखती कार्यप्रणालीमूळे विद्यार्थी आणि बॅक यांचा वेळ व पैसा याची बचत झाली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वासराव शिंदे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांनी विद्यार्थी, विभाग प्रमुख डॉ विलास पाटील व डॉ महेश देश्‍मुख यांचे अभिनंदन केले.

Saturday, May 18, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठाचा खरीप शेतकरी मेळावा उत्‍साहात साजरा

कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्यवर 
कृषी मेळाव्याचे  उदघाटन करतांना मान्यवर 



उपस्थित शेतकरी वर्ग 
मार्गदर्शन करतांना महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके 
मार्गदर्शन करतांना सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान 

मार्गदर्शन करतांना वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत 

मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्यक्षयी भाषण करतांना 
प्रगतशील शेतकरी श्री भगवानराव ठोंबरे यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 







प्रगतशील शेतकरी श्री अजित मगर यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 

प्रगतशील शेतकरी महिला लक्ष्मीबाई मुटकुळे यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला त्याप्रसंगी 

विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकाशनाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करतांना 

 इफकोचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री. अरविंद ठाकरे
         दुष्‍काळाचा फटका सर्वात जास्‍त शेतकरी व शेतमजुरांना बसला आहे. एक वर्ष दुष्‍काळामुळे शेतकरी पाच वर्ष सावरत नाही, हवामान बदलामुळे पावसात अनियमितता आली आहे. त्‍यामुळे पावसाचे पडणारे पाणी कसे मुरवता येईल व त्‍याचा कार्यक्षम कसा वापर करता येईल याकडे शेतक-यांनी लक्ष दिले पाहिजे. जो शेतकरी जलसाक्षर नाही तो शेतीत निरक्षरच आहे. शेतक-यांनी जलसंधारणाची कामे वेळेवर करावी असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके यांनी उदघाटनपर भाषण केले. मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४१  व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, इफको आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्द्याटन प्रसंगी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमास सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आणि वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत हे प्रमुख अतिथी होते तर विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्‍यक्षस्‍थानी होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थेचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी, प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते, पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे तसेच व्‍यासपीठावर जिल्‍हाधिकारी डॉ् शालीग्राम वानखेडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुल‍सचिव श्री का. वी. पागिरे, इफकोचे विभागीय व्‍यवस्‍थापक श्री. अरविंद ठाकरे व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार हे उपस्थित होते.
       मा. ना. श्री प्रकाशदादा सोळंके पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील लोकांनी लढा उभारुन आंदोलन केले व विद्यापीठाची निर्मिती झाली. त्‍यामुळे मराठवाडा कृषि विद्यापीठाचा विकास मराठवाड्यांच्‍या लोकांच्‍या भावनेशी निगडीत आहे. कृषि विद्यापीठाची वाटचाल मराठवाड्याच्‍या विकासात भर टाकणारीच आहे. गेल्‍या दहा वर्षापासून केंद्र शासनाच्‍या निर्णयामुळे शेतक-यांच्‍या जीवनात क्रांती निर्माण होत आहे. शेतक-यांना पिक कर्ज स्‍वस्‍त दरामध्‍ये मिळण्‍यासाठी व शेतीमालाचा हमी भाव वाढविण्‍यासाठी केंद्र शासन प्रयत्‍नशील आहे. शाश्‍वत शेतीसाठी व शेतक-यांच्‍या विकासासाठी कृषि विद्यापीठ हे दिपस्‍तंभ आहे असे प्रतिपादन मा. ना. श्री. प्रकाशदादा सोळंके यांनी केले.
       राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, कृषि विद्यापीठ हे शेतक-यांची श्‍वासनलिका आहे. विद्यापीठ संशोधन करुन नविन तंत्रज्ञान करीत आहे व त्‍याचा विस्‍तारही चांगल्‍या प्रकारे होत आहे. याविद्यापीठातील विद्यार्थी राष्‍ट्रीय पातळीवर चांगले काम करीत आहेत. परंतु जागतीकीय स्‍तरावरील संशोधन विद्यापीठात झाले पाहिजे. परभणी जिल्‍ह्याचे मानव विकास निर्देशांक अत्‍यंत कमी आहे आणि ते वाढवायाचे असेल तर शेतक-यांचे जीवनमानाची पातळी वाढविणे आवश्‍यक आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाप्रती शेतक-यांचे आकर्षण वाढत आहे हे निश्‍चीतच अभिमानास्‍पद गोष्‍ट आहे. शेतक-यांनी दिर्घकालीन उपायावर भर द्यावा, शेतीसोबतच जोडधंद्याची साथ दिल्‍याशिवाय शेतीमध्‍ये प्रगती शक्‍य नाही. विद्यापीठाचा पिंगळगडनाला विकास प्रकल्‍पामुळे परभणी जिल्‍ह्याच्‍या आजुबाजूच्‍या गावांना दिर्घकालीन फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी शासनदरबारी सर्वांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मेळाव्‍यामध्‍ये असलेले भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रीकी संस्‍थेचे दालणातील यंत्रे व वस्‍तु महिला शेतक-यांसाठी निश्‍चीतच उपयोगी आहेत. यावेळी मा. ना. प्रा. फौजिया खान यांनी गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या ३८  व्‍या वर्धापन दिनानिमीत्‍त गृह विज्ञान महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थीनीसाठी सुवर्णपदक दरवर्षी देण्‍यासाठी एक लाख रुपयाची देणगी महाविद्यालयाच्‍या वतीने देण्‍याची घोषणा केली.
       राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाचा परिसर पाहुन गेल्‍या काही वर्षापासून विद्यापीठाची चांगली प्रगती होत आहे असे अधोरोखीत होत आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे तो मोडता कामा नये यासाठी विद्यापीठाने आधार द्यावा. आज विद्यापीठाच्‍या बियाणासाठी शेतकरी रांगाच्‍या रांगा लावून बियाणे खरेदी करतांना पाहुण विद्यापीठावरील शेतक-यांचा किती विश्‍वास आहे हे लक्षात येते. विद्यापीठ माती परिक्षणापासून ते पिक प्रक्रियेपर्यंत तंत्रज्ञान विकसीत करुन शेतक-यांना देते ही एक चांगली गोष्‍ट आहे. कृषि पदवीधर हा फक्‍त नौकरीक्षमच झाला नाही पाहिजे तर त्‍यांचे शिक्षण शेतकरी उभा करण्‍यासाठी कामाला यायला पाहिजे. पिंगळगडनाला हा नाला नसून नदी आहे, याचा फायदा या परीसरातील पाणी पातळी वाढीसाठी होणार आहे. या प्रकल्‍पासाठी सर्वांनी पाठींबा देणे आवश्‍यक आहे. आजच्‍या दुष्‍काळाच्‍या परिस्थितीत पाटाने पाणी देणे विसरले पाहिजे. ठिबक सिंचनाचा वापर न करणा-या शेतक-यांवर येणा-या काळात गुन्‍हे दाखल करण्‍याची वेळ येऊ शकते. शेतक-यांनी एकाच कंपनीच्‍या एकाच जातीच्‍या बियाणाचा आग्रह करु नये असाही सल्‍ला त्‍यांनी दिला.
        विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनरावजी गोरे अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाले की, मराठवाड्यात ८६ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. गेल्‍या सहा वर्षापेंकी पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मराठवाड्यातील १० टक्‍के भागात पाऊस कमी पडतो तर ८० टक्‍के भागात खात्रीशीर पाऊस पडतो. या खात्रीशीर पावसाच्‍या भागात २ ते ३ पावसाचे खंड येतात त्‍यामुळे पिक उत्‍पादनात ३०-४० टक्‍के घट येते यावर उपाय म्‍हणुन विहीरी, शेततळ्यामध्‍ये साठून ठेवलेल्‍या संरक्षीत पाण्‍याच्‍या १-२  पाळ्या देणे आवश्‍यक आहे. डॉ. कुलगुरू पुढे म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्‍थीतीवर मात करण्‍यासाठी वरचेवर उपाय न करता दीर्घकालीन उपाय करावे लागणार आहेत. यामध्‍ये पाणलोट क्षेत्र विकास, पाण्‍याचा कार्यक्षम वापर, विविध सिंचन पध्‍दतीचा अवलंब करावा लागणार आहे. पावसाच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहाबरोबर हेक्‍टरी १६  टन माती वाहुन जाते, माती सोबत अन्‍नद्रव्‍य वाहुन जातात. मातीचा एक इंच सुपीक थर तयार होण्‍यास पाचशे वर्षाचा कालावधी लागतो त्‍यामुळे हे अमूल्‍य असे नैसर्गीक स्‍त्रोत जपण्‍यासाठी मृद व जलसंधारणाचे उपाय न केल्‍यास सुपीक जमिनीचे वाळवंटात रुपांतर होण्‍यास वेळ लागणार नाही. विद्यापीठाने आजवर विविध पिकांचे १२५ पेक्षा वाण व २० हून अधिक शेती औजारे विकसीत केली आहेत तसेच ७२५ पेक्षा अधिक तंत्रज्ञानाच्‍या शिफारसी शेतक-यांना सुचविल्‍या आहेत. दुष्‍काळ परिस्थितीत तग धरू शकणारा तुरीचा बिडीएन-७११ हा वाण तर यांत्रीकी पध्‍दतीने काढणी करण्‍यासाठी सोयीस्‍कर असलेला सोयाबीनचा एमएयुएस-१६२ वाण विकसीत केला आहे. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा नाविण्‍यपूर्ण विस्‍तार उपक्रम मराठवाड्यात आठही जिल्‍ह्यात राबवून शेतक-यांसोबतचे नाते अधिक दृढ केले आहे.
       या मेळाव्‍यात चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्‍यक्षीके, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्‍यादी उपक्रमांचा समावेश होता. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात राष्ट्रिय पातळीवरील तज्ञ भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थे अंतर्गत असलेल्‍या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी सोयाबीनचा आहारात वाढ होण्‍यासाठी त्‍यावर प्रक्रिया करून मुल्‍यवर्धीत पदार्थाबाबत माहीती दिली. तसेच इरगोनॉमीक्‍स अॅन्‍ड सेफटी इन अॅग्रीकलचर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते यांनी श्रमबचतीसाठी कृषि औचारांचा वापर यावर तसेच पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे यांनी जमिनीचे आरोग्‍य याविषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्‍ये विद्यापीठाच्‍या शास्‍त्रनांनी कापुस, सोयाबीन व इतर खरीप पीक लागवड तंत्रज्ञानाची माहीती दिली तसेच शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान केले.
        कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. माधुरी कुलकर्णी व प्रा. ए. पी. गुट्टे तसेच आभारप्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले. या प्रसंगी पुरस्‍कार प्राप्‍त १३ प्रगतशील शेतकरी यांचा सपत्‍नीक सत्‍कार विद्यापीठाच्‍या मार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. तसेच विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले.
     कृषिविद्या पदव्‍युतर प्रयोगशाळा, द्रवरुप जीवाणू खते निर्माण प्रकल्‍प, निम्‍नस्‍तर शिक्षण सभागृह याचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. विद्यापीठाचे बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 
       सदरील मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते, यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्‍थेचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे शेतक-यांसाठी आकर्षणाचा भाग होता. या प्रसंगी विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्री उद्घाघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या मेळाव्‍यास मराठवाडयातील व राज्‍यातील शेतकरी व कृषि उद्योजकांनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वीतेसाठी विद्यापीठ अशिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी इत्‍यादीनी परिश्रम घेतले. 
 विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उद्घाघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करतांना  

मकृविच्‍या खरिप शेतकरी मेळावातील वैशिष्‍टपुर्ण दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद




मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय, इफको आणि महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्था व बचत गटांचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे शेतक-यांसाठी आकर्षणाचा भाग होता. विद्यापीठात प्रथमच या प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. भारतीय कृषि संशोधन संस्‍थेच्‍या उद्यानविद्या विभागाचे दालणास शेतक-यांनी मोठा प्रतिसाद दिला. या दालनात सुखलेल्‍या फुलांचे संवर्धन करून अनेक वस्‍तु बनविलेल्‍या होत्‍या, पोलीहाउस मध्‍ये तयार केलेले चेरी टोमॅटो, बी विरहीत काकडी, हिरवी सिमला मिर्ची, बाजरा पफ, भाजलेले सोयाबीन, नैसर्गिक रंगाने बनवलेली पोषक व स्‍वादिष्‍ट ब्रेड, पोलीहाउसचा नमुना, विविध पिकांच्‍या सुधारीत जाती, ठिंबक सिंचन, काटेकोर शेती इत्‍यादीवर पोस्‍टर व विविध प्रकाशने उपलब्ध होती. मका पिकाचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान, मुल्‍यवर्धीत पदार्थ यावर आधारीत नवी दिल्‍ली येथील मका संशोधन संचालनालयाचे दालन होते तसेच नागपुर येथील केंद्रिय कापुस संशोधन संस्‍थाचे दालनात कपाशीचे लागवड तंत्रज्ञान, पीक संरक्षण, पाणी व्‍यवस्‍थापन, वेचणी इत्‍यादी विषयांवर माहिती व प्रदर्शन याचा समावेश होतो. मुंबई येथील केंद्रिय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थाच्‍या दालनात कपाशीच्‍या प-हाटीचा कार्यक्षम वापर, हार्डबोर्ड, कंपोस्‍ट तयार करणे इत्‍यादी विविध पदार्थाची व वस्‍तुंची माहिती, प्रदर्शन व मार्गदर्शन शेतक-यांना केले गेले. भोपाळ येथील केंद्रिय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेच्‍या दालनात शेतीसाठी उपयुत्‍क अशा विविध अवजारे व यंत्राचे दालण शेतक-यांसाठी विशेष आर्कषण ठरले यात बियाणे व फळे प्रतवारी करणारे यंत्र, विविध फळे काढणी यंत्र, भुईमुग फोडणी व काढणी यंत्र, रोप लावणी यंत्र तसेच सोयाबीनचे मुल्‍यवर्धीत पदार्थ त्‍यात सोया मिल्‍क, सोया नट, सोया पनीर, सोया बिस्किट इत्‍यादींचा समावेश होता. या प्रदर्शनीत प्रथमचे विद्यापीठात 100 पेक्षा जास्‍त दालणाचा समावेश होता, या दालनात शास्‍त्रनासोबत चर्चा करतांना शेतकरी दिसत होते.

Wednesday, May 15, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त भव्‍य खरीप शेतकरी मेळावा


मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालयामार्फत भव्‍य खरीप शेतकरी मेळावाचे आयोजन दिनांक 18 मे, 2013 शनीवार रोजी सकाळी 11.00 वाजता वैद्यनाथ वसतीगृह मैदान, प्रशासकीय इमारीतजवळ करण्‍यात आला आहे. सदरील मेळाव्‍याचे उद्द्याटन महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोंळके यांच्‍या शुभहस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमास सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आणि वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्‍यात चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्‍यक्षीके, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्‍यादी उपक्रमांचा समावेश राहणार आहे6. यावर्षी6 मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात राष्ट्रिय पातळीवरील तज्ञ भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थ्‍ेा अंतर्गत असलेल्‍या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी आणि इरगोनॉमीक्‍स अॅन्‍ड सेफटी इन अॅग्रीकलचर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते तसेच पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे हे विशेष अथिती म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी या शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्‍थेचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे आकर्षणाचा भाग म्‍हणुन राहणार आहे.
      या प्रसंगी विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्रिचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. या मेळाव्‍याचा लाभ मराठवाडयातील व राज्‍यातील जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी व कृषि उद्योजकांनी घ्‍यावा असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्‍यात आले आहे.