Thursday, May 25, 2023

कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना विविध क्षेत्रात संधी ....... प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारोह संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी. टेक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारोह दिनांक २३ मे रोजी संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. बालाजी नांदेडे, डॉ. सुभाष विखे, डॉ. संदीप पायाळ आदी उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयास गौरवशाली परंपरा असुन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्या करित आहेत. कृषि अभियांत्रिकी पदवीधरांनी समाजाच्या व देशाच्या विकासात हातभार लावावा. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेच्या नावलौकिकासाठी कार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, संरक्षित शेती, सौर व इतर उर्जा, रोबोटिक्स आदी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या व त्याद्वारे येणाऱ्या काळात कृषि क्षेत्राचा शाश्‍वत विकास करण्याची संधी कृषि अभियंत्यांना असल्याचे त्यांनी सांगितले.  

राष्ट्रीय संशोधन संस्थेत कृषी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाण असून त्यांचे कृषि शिक्षण व संशोधन कार्यात भरीव योगदान दिले हि अत्यंत अभिमानाची बाब असल्‍याचे डॉ. बालाजी नांदेडे म्‍हणाले तर कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी त्यांच्या ज्ञानाचा वापर शेतकरी बांधवासाठी करून राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावण्‍याचे आवाहन डॉ व्ही. डी. पाटील यांनी केले.

कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या आर्यन खंडागळे, गोविंद खुळे, प्रकाश पतंगे, रणजित पाटील, रुतुजा पाटील, श्रुती राजपूत आणि आकाश शेगावकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पाल्य प्राध्यापक डॉ. सुभाष विखे, डॉ. संदीपान पायाळ यांची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्रास्‍ताविक प्रा. विवेकानंद भोसले यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ काळे आणि शाहजाद हाश्मी यांनी केले तर आभार मयूर अरक याने मानले. कार्यक्रमास डॉ. मधुकर मोरे, डॉ. पंडित मुंढे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. श्याम गरुड, प्रा. दतात्रय पाटील, डॉ. सुजाता मुस्तापुरे आदि प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम येशस्वी करण्यासाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.