Friday, July 31, 2015

आदर्श गुरू हेच राष्‍ट्राचे निर्माते असतात....... प्रा नयन कुमार आचार्य

भारतीय मृदविज्ञान संस्‍थेच्‍या परभणी शाखेच्‍या वतीने गुरूपोर्णिमा साजरी
दिपप्रज्‍वलन करतांना
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना प्रा नयन कुमार आचार्य

सौजन्‍य
अध्‍यक्ष, भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी 
तथा विभाग प्रमुख, मृद विज्ञान विभाग, वनामकृवि, परभणी 

Friday, July 24, 2015

कला व क्रीडा क्षेत्रात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची दर्जात्मक वाढ होत आहे.......कुलगूरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

वनामकृवित विद्यार्थ्‍यांचा गुणगौरव सोहळा संपन्‍न
गुणगौरव सोहळयात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
गुणगौरव सोहळयात कोलाज या कला प्रकार सुवर्ण पदक प्राप्‍त केल्‍याबद्दल शिवशक्‍ती गोडसलवार हिचा सत्‍कार करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, सोबत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदी
*****************
गतवर्षी कर्नल व अमरावती येथे पार पडलेल्‍या युवक महोत्‍सवात विद्यापीठाच्‍या संघानी विविध कला प्रकारात चार सुवर्ण व तीन कास्‍य पदके प्राप्‍त करून विद्यार्थ्‍यांनी राज्‍य व देश पातळी चांगले यश मिळवीले, यावरून विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांची कला व क्रीडा क्षेत्रातील दर्जात्‍मक वाढ होत असल्‍याचे सिध्‍द होते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने आयोजित विद्यापीठ खेळाडु, अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा दि २३ जुलै रोजी संपन्‍न झाला, या सोहळयाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, क्रीडाधिकारी प्रा जी ए गुळभिले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     कुलगूरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, स्‍पर्धेा व खेळ हा विद्यार्थी जीवनातील  अविभाज्‍य घटक झाला पाहिजे, विद्यार्थ्‍यी जीवन हे उत्‍पादक जीवन असुन त्‍यांना प्रोत्‍साहन देणे गरजे आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या विकासासाठी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या महाविद्यालयांनी कला व क्रीडा क्षेत्रात अद्यावत दर्जाच्‍या सुविधा पुरविल्‍या पाहिजे जेणे करून त्‍यांच्‍यातील कौशल्‍यांना वाव मिळेल. या सुविधांमुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी ही या क्षेत्रात चांगली का‍मगिरी करून शकतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
     शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या विजयी संघात विविध राज्‍यातील, भागातील तसेच विविध संस्‍कृती व पार्श्‍वभुमी लाभलेले विद्यार्थी प्रतिनिधीत्‍व करीत असुन त्‍यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्‍यास सर्व महाविद्यालयांने प्रयत्‍न करावेत. कार्यक्रमात प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ विजया नलावडे, प्रा सुनील तुरकमाने व विद्यार्थ्‍यांनी अथीरा रवींद्रन यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.  
    गुणगौरव सोहळयात सन २०१४-१५ मध्‍ये विविध क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेत प्राविण्‍य मिळविलेल्‍या विद्यार्थी व विद्यार्थीनीं तसेच विविध क्रीडा प्रकारातील संघ व्‍यवस्‍थापक, प्रशिक्षक व परिक्षक यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करून प्रशस्‍तीपत्र देण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी सन २०१६ मध्‍ये अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धा व २०१७ मधील इंद्रधनुष्‍य क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन विद्यापीठात होणार असल्‍याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शाहू चौहान यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडा विभागातील संलग्‍न व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यीनी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. डी एफ राठोड, रामा खोबे, किशोर शिंदे, श्री जगताप, श्री सुर्यवंशी, अन्‍वरमिया आदींनी परिश्रम घेतले.
गुणगौरव सोहळयात सत्‍कार झालेले विद्यापीठ खेळाडू
     अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पार पडलेल्‍या इंद्रधनुष्‍य या बारावी महा‍राष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ युवक महोत्‍सवात कोलाज या कला प्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने सुवर्ण पदक तर विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात प्रविण मांजरे, अथीरा रवींद्रन, ऐश्‍वर्या ढालकरी, मृनाली बिंद, पुनम क्षीरसागर, मयुर देशमुख, चंद्रकांत मुदिराज, संकेत शिंदे, रेणुका पवार, प्रविण जाधव, शुभम सुर्यवंशी या विद्यार्थ्‍यांचा समावेश होता. कर्नल येथील राष्‍ट्रीय दुग्‍ध संस्‍था येथे पार पडलेलया अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ युवक स्‍पर्धेत विद्यापीठाच्‍या संघास लोकनृत्‍यात सुवर्ण पदक, भारतीय समुह गीतात सुवर्ण पदक, देश भक्‍तीपर गीत प्रकारात कास्‍य पदक तर कला प्रकार कास्‍यपदक प्राप्‍त केले. लोकनृत्‍य संघात सहभागी विद्यार्थ्‍यीनी मृनाली बिंद, अथीरा रवींद्रन, बी पी कुरवाळे, एस यु अंबोरे, पी जी शिरसे, सावळे पी व्‍ही, पुनम क्षीरसागर, अंजली वाघमारे, के एम केळकर, पी एस सरदार यांचा तसेच भारतीय समुह गीत स्‍पर्धेत सुवर्ण पदक प्राप्‍त केले, या संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. देश भक्‍तीपर गीत संघात एस यु अंबोरे, एस एस सेलुकर, एस बी कसबे, एस एस संत, एस पी पुंगळे, एस एस कादरी यांचा समावेश होता तर कोलाज या कलाप्रकारात शिवशक्‍ती गोडसलवार हिने व स्‍पॉट पेंटिग मध्‍ये जे एम गरूड हिने कास्‍यपदक प्राप्‍त केले. यासर्व विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला­. 
     राष्‍ट्रीय सेवा योजनेतील उत्‍कृष्‍ठ स्‍वयंसेवक म्‍हणुन निवड झालेल्‍या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी रमाकांत कारेगांवकर, रासेयोचे उत्‍कृष्‍ठ कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे तसेच उत्‍कृष्‍ठ महाविद्यालय म्‍हणुन कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके यांचा सत्‍कार करण्‍यात आला. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त केल्‍याबाबत रूचिता भालेराव, श्री सम्‍मेटा व रमाकांत कारेगांवकर यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
    कार्यक्रमात विद्यापीठातील कला व क्रीडा क्षेत्राच्‍या विकासात योगदान दिल्‍याबद्दल प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उद्य खोडके, डॉ विजया नलावडे, प्रा विशाल अवसरमल, विजय सावंत, डॉ प्रशांत करंदिकर, श्रीमती भार्गव, प्रा नागभिडे, दत्‍ता चव्‍हाण, पंकज खेडकर, मिलिंद बामणीकर, सुनिल तुरूकमाने, औंढेकर सर, प्रा खंदारे आदींचाही सत्‍कार करण्‍यात आला. 

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे सत्‍कार

वसंतराव नाईक कृषि पुरस्‍कार व भारतीय कृषि अनुसंधान परीषदेचा हरी ओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार प्राप्‍त केल्‍याबददल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा दिनांक २२ जुलै रोजी कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे सत्‍कार करण्‍यात आला. या प्रसंगी कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, विद्यापीठ अभियंता इंजी. पी. डी. जवरे आणि कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्‍य उपस्थित होते. 

Wednesday, July 22, 2015

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी निवड

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार २०१४ करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची निवड झाली असुन परिषदेच्‍या ८७ व्‍या वर्धापन दिनी पटना (बिहार) येथे दि २५ जुलै रोजी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे. हवामान बदलाचा मातीच्‍या आरोग्‍यावरील परिणाम यावरील केलेल्‍या संशोधन योगदानबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे.

वनाम‍कृवि विद्यार्थी संघटने तर्फे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा सत्‍कार

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार व वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार सन्‍मान प्राप्‍त केल्‍याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा विद्यार्थी संघटने तर्फे सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, डॉ बी व्‍ही आसेवार व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी संजय चिंचाणे, कृ‍ष्‍णा होगे, भारत खेलबाडे, दत्‍ता पांचाळ, विशालकुमार राठोड, अमोल चव्‍हाण, सारंग काळे, चंद्रकांत मुदिराज, अजित पवार आदी.

माननीय मुख्‍यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍काराने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु सन्‍मा‍ननित

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या स्मृतिप्रीत्‍यर्थ दिले जाणारे वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार वितरण सोहळा दिनांक १० जुलै रोजी मुंबईत येथे पार पडला. यात मुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणीस व विधानसभा अध्‍यक्ष मा ना श्री हरिभाऊ बागडे यांच्‍या हस्‍ते मृद्संधारण व जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच कोरडवाहु शेती संशोधनादिशा देणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना यंदाच्‍या कृ‍षी पुरस्‍काराने सन्‍माननित करण्‍यात आले. याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्‍ठानचे कार्याध्‍यक्ष श्री अविनाश नाईक, अध्‍यक्ष डॉ बी आर बारवाले व माजी मंत्री श्री मनोहर नाईक आदी उपस्थित होते.

Sunday, July 19, 2015

आपत्‍कालीन परिस्थितीत पिकांची घ्‍या काळजी

वनामकृविचा कृषि सल्‍ला
सध्‍या हवामानातील उष्‍णता व जमिनीत असणारा ओलाव्‍याचा अभाव यामुळे परभणी व हिंगोली जिल्‍हयातील सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषि तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यु.एन. आळसे, सोयाबीन पैदासकर डॉ. एस. पी. म्‍हेत्रे आणि मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मौजे जोडपरळी, हटटा व ब्राम्‍हणगाव येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर दिनांक १५ जुलै रोजी भेट दिली व सोयाबीन पीकाची पाहणी केली. या संदर्भात असे आढळुन आले आहे कि, केवळ पेरणीपुरताच पाऊस झाल्‍यानंतर पुन्‍हा पावसात खंड पडला असुन जमिनीतील ओलावा सिमांतपातळी पेक्षा कमी झाला आहे, त्‍यामुळे पाणी व अन्‍नद्रव्‍यांचे सोयाबीन पीकाकडुन शोषण बंद झाले असुन पिके मलुल झाले व पिकाची वाढ खुंटली आहे. करिता सर्व सोयाबीन शेतक-यांनी पाऊस येईपर्यंत पिक टिकवण्‍यासाठी  १०:००:४५ (पोटॅशियम नायट्रेट ०.५ टक्‍के  ५० ग्रॅम १० लिटर पाणी व झिंक सल्‍फेट ०.५ टक्‍के) ४० ग्रॅम १० लिटर पाणी याच प्रमाणात एकत्रित फवारणी करावी. किंवा ग्रेड-२ चे सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व डॉ यु एन आळसे यांनी केले आहे. 

आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा बाभुळगांव येथे संपन्‍न

मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत मौजे बाभुळगाव (ता. जि. परभणी) येथे दि. १६ जुलै रोजी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा घेण्‍यात आला. मेळाव्‍यात शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे व डॉ जी के गायकवाड यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सदयस्थितीत पडलेल्‍या पावसाच्‍या खंडामुळे पिकांना पाण्‍याचा ताण पडला असुन शेतात पडलेल्‍या भेगांसाठी हलकी कोळपणी करावी तसेच शेतात असलेला काडीकचरा किंवा सोयाबीनचा भुसा पिकात आच्‍छादन म्‍हणुन वापरावा, शक्‍य असेल तर पाण्‍याची फवारणी करावी. आर्थिक स्‍थैर्यासाठी शेतक-यांना शेती पुरक जोडधंद्या करण्‍याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले. मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. जी. के. गायकवाड यांनी शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्‍य महत्‍वाचे असुन हवामान बदलामध्‍ये सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच त्‍यांनी कपाशी, सोयाबीन या पिकांमध्‍ये खत व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. जमिनीत ओल असल्‍याशिवाय कोरडवाहू कपाशीला नत्र खताची मात्रा देऊ नये, जर पाण्‍याची सोय असल्‍यास हलके पाणी देऊनच खताची मात्रा दयावी. जेथे जमिनीत ओलावा नाही तेथे पोटॅशीयम नायट्रेट १ ते १.५ टक्‍के पाण्‍यात मिसळुण फवारणी करावी. पोटॅशियममुळे पिकात पाण्‍याचा ताण सहन करण्‍याची क्षमता निर्माण होते व पीक कीड- रोगांना कमी प्रमाणात बळी पडते, असा असे त्‍यांनी सां‍गितले.
  विद्यापीठाने वितरीत केलेल्‍या पोटॅशीयम नायट्रेट व आच्‍छादनाचा वापराबाबत माणीक संमीद्रे यांनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे माहिती दिली तर प्रगतशील शेतकरी गिरीष पारधे यांनी विहीर पुनभरण व आंतरपिक पध्‍दती याबाबत आपले अनुभव सांगितले. सुत्रसंचालन सारीका नारळे यांनी तर आभार प्रदर्शन माणीक समीद्रे यांनी केले. मेळावास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल मेळावा मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला तर मेळावा यशस्‍वतीतेसाठी प्रा. मदन पेंडके, डॉ मेघा जगताप, श्री. पिंगळे आदीसह ग्रामिण कृषि कार्यानुभव उपक्रमाच्‍या विद्यार्थीनी सहकार्य केले.
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड

Saturday, July 18, 2015

सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग मराठवाडयातील शेतक-यांसाठी सुवर्णसंधी.....शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात सोयाबीन प्रक्रिया लघुउद्योगावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
कार्यशाळेत प्रशिक्षण घेतांना शेतकरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाव्‍दारे सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग’’ या विषयावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दि. १६ जुलै रोजी एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळाचे उद्घाटन शिक्षण संचालक तथा आधिष्ठाता डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले तर हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ उद्य खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील सोयाबीनचे क्षेत्र वाढत असुन शेतक-यांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी सोयाबीनवर आधारित लघुउद्योगाचा विकास होणे गरजेचे आहे. मराठवाडयातील शेतक-यांसाठी सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग ही सुवर्णसंधी असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याबाबत तांत्रिक मदत करण्‍यास तत्‍पर असल्‍याचे ते म्‍हणाले.
प्रमुख पाहुणे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने यांनी आपल्‍या भाषणात सोयाबीन प्रक्रीया लघुउदयोग उभारण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी मराठवाड्यातील सोयाबीनचे महत्व व प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री व्यवस्था यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी सोयाबीनचे तेलाव्यतिरिक्त इतर उदयोगाबाबत मा‍हीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुमंत जाधव यांनी केले. कार्यशाळेत तोंडापूर (जि हिंगोलीयेथील कृषी विज्ञान केंद्रांनी स्थापन केलेल्या शेतकरी गटातील अनेक शेतकरी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग उभारण्याचा मानस व्यक्त केला. तांत्रिक चर्चासत्रात सोया दुध, सोया पनीर व सोयाआधारित इतर लघूउदयोगाच्या तंत्रज्ञानाबद्दल डॉ.स्मिता खोडके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी कृषि प्रक्रिया विभागाचे प्रा. प्रमोदिनी मोरे, श्री. शिवणकर, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वनामकृवि अंतर्गत असलेले सोयबीन प्रक्रिया केंद्रहे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन आणि विस्तार केंद्र असून या मार्फत आजपर्यंत राज्‍यातील अनेक लघुउद्योजक, शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रम राबविण्यात आले असुन या केंद्राची उभारणी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि वैधानिक विकास महामंडळ यांचे सहकार्यांने करण्‍यात आलेली आहे.

Friday, July 17, 2015

आपत्‍कालीन पीक नियोजन शिफारसी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचवा.....कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित विस्‍तार शिक्षण परिषदेची विसावी बैठक संपन्‍न
जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातुन केलेल्‍या जलसंधारणाच्‍या कामामुळे प्राप्‍त होणा-या पाऊसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या वापराबाबत कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन करावे. अनिश्चित पाऊसमानासाठी आपत्‍कालीन पीक नियोजनाच्‍या विद्यापीठाच्‍या शिफारसी विविध माध्‍यमाव्‍दारे जास्‍तीस जास्‍त शेतक-यांपर्यत पोहचवाव्‍यात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या आगामी वर्षातील कृषि विस्‍ताराची दिशा निश्चित करण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयच्‍या वतीने दि १६ जुलै रोजी आयोजीत विस्‍तार शिक्षण परिषदेच्‍या विसाव्‍या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, परिषदेचे सदस्‍य प्रगतशील शेतकरी श्री कांतरावजी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री उध्‍दवरावजी खेडेकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, हिंगोलीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री एस के पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, सद्याची परिस्थिती पाहाता भविष्‍यात जनावरांचा चा-याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो, त्‍या अनुषंगाने शेतक-यांना चारापिक लागवडीबाबत मार्गदर्शन करावे. विद्यापीठात शेतक-यांना उप‍युक्‍त तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून जास्‍तीत जास्‍त शेतक-यापर्यंत पोहचवुन त्‍यांचा सहभाग वाढवावा. आंतरपिक पध्‍दत, रूंद वरंबा व सरी पध्‍दत, द्रव्‍यरूप खत व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन करण्‍याची आवश्‍यकताही त्‍यांनी दिला.
प्रगतशील शेतकरी श्री उध्‍दवरावजी खेडेकर यांनी भाषणात शेतकरी एकाच जमिनीत सतत एकचएक पीक घेत असुन मातीतील काही अन्‍नद्रव्‍याची कमतरता निर्माण होत असुन त्‍यांना पीक फेरपालटीबाबत विद्यापीठाने मार्गदर्शन करावे असे मत मत व्‍यक्‍त केले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या विभागीय कृषी विस्‍तार केंद्राची  बळकटीकरणाची आवश्‍यकता असल्‍याचे सांगितले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रत्‍येक जिल्‍हातील विविध पीकात यशस्‍वी शेतक-यांच्‍या यशोगाथा तयार करून त्‍यांची यादी विद्यापीठाने प्रसिध्‍द करावी जेणेकरून इतर शेतकरी त्‍यांच्‍याशी संपर्क करू शकतील. याप्रसंगी श्री कांतराव देशमुख यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना वसंतराव नाईक कृषी पुरस्‍काराने सन्‍माननित करण्‍यात आल्‍याबाबत विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी गत वर्षीच्‍या विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली तर सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. बैठकीत डॉ यु एन आळसे, डॉ एस बी पवार, प्रा अरूण गुट्टे, डॉ व्‍ही जी टाकणखार, डॉ निर्मल यांनी विस्‍तार कार्याची माहिती दिली तर प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ हेमांगिनी संरबेकर आदीसह मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, विभागीय कृषि विस्‍तार केंद्राचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी चर्चेत सहभाग नों‍दविला. 

Wednesday, July 15, 2015

पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन वनामकृवित उत्‍साहात साजरा

सन्‍माननीय पतंप्रधानाच्‍या भाषणाच्‍या थेट प्रक्षेपणाचा घेतला कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी लाभ
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुल‍सचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १५ जुलै रोजी पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जगात भारत हा युवा राष्‍ट्र म्‍हणुन ओळखले जातो, देशाच्‍या एकुण लोकसंख्‍येत युवकांचे प्रमाण अधिक असुन त्‍यांच्‍यात उद्योजकता कौशल्‍य वाढीस कौशल्‍य विकास व उद्योजकताचे राष्‍ट्रीय धोरणाचा निश्चित लाभ होणार आहे, त्‍याचा लाभ कृषि पद्वीधरांनाही घ्‍यावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
याप्रसंगी कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्‍या वतीने स्किल इंडिया मोहिमेस नवी दिल्‍ली येथील विज्ञान भवनात सन्‍माननीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते प्रारंभ करण्‍यात आला व कौशल्‍य विकास आणि उपक्रमशीलता २०१५ या राष्‍ट्रीय धोरणाची घोषणा सन्‍माननीय पंतप्रधान यांनी केली व देशातील युवकांना संबोधीत केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे दुरदर्शनच्‍या माध्‍यमातुन थेट प्रक्षेपण कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात मोठया पडदयावर करण्‍यात आले, याचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनी घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Monday, July 13, 2015

सद्य परिस्थितीत शेतक-यांनी काय करावे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सल्‍ला
मराठवाडयात यावर्षी मोसमी पावसाने जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या पंधरवाडयातच हजेरी लावल्‍यामुळे बळीराजा सुखावला होता, परंतु ब-याचशा भागात पेरणी योग्‍य पाऊस न झाल्‍यामुळे अजुनही पेरण्‍या झालेल्‍या नाहीत. अजुन‍ही पेरणीचा हंगाम गेलेला नाही. १५ जुलैपर्यंत साधारणत: मुग, उडीद, ज्‍वार वगळता सर्वच पीकांची पेरणी करू शकतो तर १६ ते ३१ जुलै दरम्‍यान पेरणी झाल्‍यास संकरित बाजरी, सुर्यफुल, आंतरपीक पध्‍दतीत तुर व सोयाबीन, बाजरी व तुर, एरंडी व धने या पीक पध्‍दतीची पेरणी करता येते.
ज्‍या ठिकाणी पेरणी झालेली आहे व पावसाचा खंड पडला आहे, अशा परिस्थितीत सतत कोळपणी करून तणांचा बंदोबस्‍त होऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्‍यासाठी मदत होईल. तण नियंत्रण केल्‍यामुळे तणांमधुन होणारे बाष्‍पोत्‍सर्जन कमी होईल व उपलब्‍ध ओलावा पीकांना मिळेल. तसेच पिकावर पोटॅशियम नायट्रेट (१३.००.४५) खत १.० ते १.५ टक्‍के (१०० ते १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन) याप्रमाणे फवारणी केल्‍यास पिकातील बाष्‍पोत्‍सर्जन कमी होईल व त्‍यामुळे भारी जमिनीतील पीके पुढे ८ ते १० दिवस तग धरू शकतील. ज्‍या ठिकाणी शक्‍य असेल तेथे तुषार सिंचनाने पिकास पाणी द्यावे.
ब-याचशा ठिकाणी १५ जुन दरम्‍यान पेरणी झालेलया सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन यासाठी २५ ईसी क्‍वीनॉलफॉस किंवा २० र्इसी क्‍लोरपायरीफॉस किंवा ४० ईसी ट्रासझोफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच कपाशी पिकावर तुडतुडे या रसशोषण किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन या किडीच्‍या नियंत्रणासाठी अॅसिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम किंवा असिटामाप्रिड २० टक्‍के २ ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पीकांची निवड करावी. हलक्‍या जमिनीत कापुस लावु नये. त्‍या ठिकाणी बाजरी, सुर्यफुल, कुलथी, मटकी, कारळ यासारखी पीके घ्‍यावीत. मध्‍यम ते भारी जमिनीत कापुस, सोयाबीन, तुर, एरंडी ही पीके घ्‍यावीत. आंतरपीक पध्‍दतीचा अवलंब करावा उदा. तुर व सोयाबीन (२:४), बाजरी व तुर (४:२), तुर व ज्‍वार (२:४).
रूंद-वरंबा सरी पध्‍दतीने सोयाबीन पीकाची पेरणी करावी. म्‍हणजे पडलेल्‍या पाऊसाचे पाणी जमिनीत साठवता येईल व त्‍याचा पीकाला दिर्घकाळ उपयोग होईल. असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे व प्रा डि डि पटाईत यांनी केले आहे.

Thursday, July 9, 2015

दर्जात्मक कृषि संशोधनासाठी संशोधकांनी आग्रही असावे..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

वनामकृवितील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी कुलगुरूंनी साधला थेट संवाद

संशोधकांचा संशोधनातील प्रामाणिकपणा हा महत्‍वाचा गुण असुन संशोधनाची कार्यप्रणाली भक्‍कम असली तरच संशोधनातील निष्‍कर्ष योग्‍य येतील. शेतक-यांच्‍या प्रगतीसाठी दर्जात्‍मक संशोधनासाठी कृषि संशोधकानी प्रयत्‍नशील असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. दर्जात्‍मक कृषि संशोधनासाठी आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी दि ७ जुलै रोजी एका कार्यक्रमात संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शटगार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ हेमांगिनी सरंबेकर, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा ए आर सावते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाचा विषय शेतक-यांच्‍या बदलत्‍या परिस्थितीचा सखोल अभ्‍यासांती निवडावा. विदेशात आचार्य पदवी प्राप्‍त करणे अत्‍यंत अवघड असुन विकसित देशातील समाजात आचार्य पदवीधरकांचा मोठा आदर केला जातो. भारताच्‍या तुल‍नेत विदेशातील संशोधकांना संशोधन सुविधा निश्चितच अधिक आहेत. संशोधन करतांना अनेक समस्‍या आहेत, परंतु त्‍यावर मात करून शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान दिल्‍यास शेतक-यांसाठी आपण ईश्‍वरा समान व्‍हाल. अनेक वेळा संशोधक संशोधनाच्‍या आधारे शेतक-यांना शिफारशी देतो, परंतु त्‍या शिफारशी प्रत्‍यक्ष शेतात अवलंबीत असतांना अनेक अडचणी येतात, त्‍याचा विचारही संशोधकांनी करावा. आपल्‍या विचारांना चालना दया व कृषि क्षेत्राच्‍या विकासासाठी अधिकाधिक उपयुक्‍त संशोधनावर भर दया. कृषि संशोधकच कृषि विद्यापीठाची प्रतिमा बदलु शकतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि क्षेत्रातील तांत्रिक तफावतीचा अभ्‍यास करून आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाची दिशा ठरवावी. कार्यक्रमात आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या संशोधनाच्‍या विषय तसेच संशोधनात येणा-यां विविध समस्‍यावर चर्चा करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन कविता देशमुख व सुप्रिया पाचपुते हिने तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची वसंतराव नाईक कृषि पुरस्‍कारासाठी निवड झाल्‍याबाबत सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विविध शाखेचे आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Wednesday, July 8, 2015

वनामकृवितील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेस अखिल भारतीय प्रकल्प समन्वयक डॉ. महाराणी दिन यांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर या योजनेस प्रकल्पाचे अखिल भारतीय समन्वयक तथा भोपाल येथील केंद्रीय अभियांत्रिकी संस्थानचे डॉ. महाराणी दिन व त्यांचा सहकाऱ्यांनी नुकतीच भेट देउुन योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रकल्पांतर्गत परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्‍हयातील योजनेने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरील घेतलेल्या चाचण्याला भेट देऊन शेतकऱ्यांशी शेतीतील बैलाचा वापर व सुधारित कृषी औजारे बाबत चर्चा केली.
   योजनेव्‍दारे संशोधित धसकटे गोळा करण्याचे औजार, तीन फासाचे खत कोळपे, बैलचलीत फवारणी यंत्र, बैलचलीत खत पसरणारे यंत्र, शेततळे व बोअर मधील पाणी उपसणे यंत्र, कृषी प्रक्रिया यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले. बैलचलीत औजारांचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे व बैलाचे कष्ट कमी करण्‍यासाठी केलेल्‍या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. महाराणी दिन व त्‍यांच्‍या सहकार्यानी लातूर व शिराढोण (ता. कंधार जि नांदेड) येथील परिसंवादात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास इंजीनीयर सचिन कवडे, प्रा.डीग्रसे, इंजीनीयर नांदेडे, इंजीनीयर शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी योजनेचे इंजीनीयर अजय वाघमारे, सहाय्यक कृषी अभियंता प्रा. दयानंद टेकाळे, सहदेव वडमारे, दीपक यंदे, प्रा. पंडित मुंढे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्‍या आयोजन करण्यासाठी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख प्रा. जे एम  पोतेकर आदींनी मार्गदर्शन केले. 

Monday, July 6, 2015

घाणा देशातील विदेशी विद्यार्थ्यांस पदव्युत्तर पदवी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिविद्या शाखेतील घाणा देशातील विद्यार्थी केटेकु अ्रगबेसी क्‍वाडझो यांने डॉ व्‍ही एन नारखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मका पीकावर संशोधन करून पदव्‍युत्‍तर पदवी अभ्‍यासक्रम पुर्ण केला. त्‍यास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते दि ४ जुलै रोजी पदवी प्रदान करण्‍यात आली. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठातील केलेल्‍या संशोधनाचा उपयोग घाणा देशातील कृषि क्षेत्राच्‍या विकासासाठी करावा व हेच विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने मोठे योगदान ठरेल, असा सल्‍ला त्‍यांनी विद्यार्थ्‍यास दिला. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्‍ही एन नारखेडे आदी उपस्थित होते. 

Saturday, July 4, 2015

तुरीवरील खोडमाशीचे वेळीच व्‍यवस्‍थापन करा.....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले


मागील वर्षी तुरीला मिळालेल्‍या चांगल्‍या भावामुळे व यावर्षी आजपर्यंत झालेल्‍या कमी पावस पहाता तुर लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढलेला दिसतो. विशेषत: ज्‍या शेतक-यांकडे पाण्‍याची उपलब्‍धता आहे अशांनी पुर्व हंगामी तुरीच ब-याच भागात लागवड केली आहे. सद्यस्थितीत बहुतेक ठिकाणी तुरीची शेंडे जळालेली किंवा करपलेली दिसुन येत असुन  शेतक-यांचा असा समज दिसतो की, कमी पावसामुळे अथवा वापरलेल्‍या काही खतांमुळे मर रोग दिसत आहे. परंतु सनपुरी (ता. जि. परभणी) शिवारातील शेतकरी नरेश शिंदे यांच्‍या शेतावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या समवेत कृषि विद्यावेत्‍ता प्रा. बी. एन. आगलावे, पिक रोग शास्‍त्रज्ञ प्रा. पी. एच. घंटे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांच्‍या चमूने भेट दिली असता, या ठिकाणी तुरीमध्‍ये खोडमाशी या किडीचा प्रादुभार्व दिसुन आला असुन ७० ते ८० टक्‍के झाडे प्रादुर्भावग्रस्‍त दिसुन आली आहेत. या किडीची मादी खोडावर स्‍वत: केलेल्‍या खाचेत अंडी घालते. अशा अंड्यातुन पिवळसर रंगाची अळी निघुन ती खोड पोखरुन आत शिरते. कोवळे खोड पोखरल्‍यामुळे रोपाचा शेंड्याकडील भाग वाळुन जातो. यामुळे झाडाच्‍या वाढीवर विपरीत परिणाम होऊन झाडास फुले व कळ्या कमी लागतात. पीक उगवल्‍यानंतर एक महिन्‍याच्‍या आत या किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्‍यास खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. सततचे आर्द्र वातावरण व कमी पाऊस या किडीच्‍या वाढीस पोषक असुन शेतक-यांनी वेळीच उपायायोजना करणे गरजेचे आहे. अश्‍या वेळी किडग्रस्‍त झाडे, फांद्या आतील किडीसह उपटुन नष्‍ट करावीत व पीकाची विरळणी करावी. प्रादुर्भाव जास्‍त असल्‍यास जमिनीतुन फोरेट १० टकके दाणेदार १ किलो अथवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल ०.४ टकके दाणेदार (फरटेरा) १० किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत ओल असतांना टाकावे किंवा ट्रायझोफॉस ४० टकके प्रवाही २० मि.ली. किंवा थायमि‍थोक्‍झाम २५ टक्‍के प्रवाही २ ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्‍के पाण्‍यात मिसळणारी पावडर २० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन साध्‍या पंपाने फवारावे. पावर पंपाकरीता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावी. जेणे करुन किडीच्‍या प्रादुर्भवामुळे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले आहे. 
 

Friday, July 3, 2015

वनामकृवि परभणी येथील बीजोत्पादन व संशोधन प्रक्षेत्राची मोठी नासधुस

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने नागरिकांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत प्रशासकीय इमारतीच्‍या पाठीमागे ६० एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे संशोधन प्रात्‍यक्षिक व बिजोत्‍पादन घेतले जाते. परंतु विद्यापीठात परिसरात वावरत असतांना परिसरातील नागरिकांकडुन व फिरण्‍यासाठी येणा-या नागरिकांकडुन जाणते किंवा अजाणतेने या प्रक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्‍यामुळे संशोधनाच्‍या दृष्‍टीने मोठी हानी होत आहे. तसेच विद्यापीठ विकसित बियाण्‍यास शेतक-यांत मोठी मागणी पाहाता विद्यापीठ करित असलेल्‍या अधिक बीजोत्‍पादनाच्‍या प्रयत्‍नात बाध येत आहे. याप्रक्षेत्रावर सध्‍या पिकांची पेरणी झालेली असुन पावसाअभावी आणखी काही पिकांची पेरणी होणे बाकी आहे. संपुर्ण परिसरासाठी संरक्षण भिंतीचे कुंपन करण्‍यात आलेले असुनही अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी भिंतीस मोठी‍ छिद्रे पाडलेली आहेत. विद्यापीठाने अनेक वेळा ही छिद्रे बुजवुन घेतली आहेत. तरि नागरिकांना विद्यापीठाच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येते की, विद्यापीठात वावरत असतांना विद्यापीठाच्‍या मालमत्‍तेचे व पिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची दक्षता घ्‍यावी व विद्यापीठास सहकार्य करावे.

Thursday, July 2, 2015

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार जाहिर

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या स्मृतिप्रीत्‍यर्थ दिले जाणारे वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार जाहीर झाले असुन मृद्संधारण व जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच कोरडवाहु शेती संशोधना दिशा देणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे यंदाच्‍या कृ‍षी पुरस्‍कारचे मानकरी ठरले आहेत. दिनांक १० जुलै रोजी मुंबईत मुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणीस व विधानसभा अध्‍यक्ष मा ना श्री हरिभाऊ बागडे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍काराचे वितरण होणार असल्‍याची माहिती वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष डॉ बी आर बारवाले यांनी दिली.

ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे रायपुर येथे कृषिदिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्याक्रमातंर्गत अखिल भारतीय सन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पात कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांनी दि १ जुलै रोजी मौजे रायपुर येथे कै वसंतराव नाईक यांच्‍या १०२ व्‍या जयंतीनिमित्‍त कृषिदिन साजरा केला. प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच श्री मस्‍के, डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार, डॉ यु एन कराड, श्री दिवाकर काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी खरीप पिक व्‍यवस्‍थापन व कृषि हवामान सल्‍लाचे महत्‍व सांगितले तर डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार व प्रा यु एन कराड यांनी विविध कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी रायपुर येथील शालेय विद्यार्थी, शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, कृषिदुत व कृषिकन्‍या गावात वृक्षदिंडी काढुन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्‍यात आली तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवेच हवामानशास्त्र पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत विशाल राठोड यांनी केले. यावेळी शेतकरी, शालेय विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिदुत दत्‍ता पांचाळ, चंद्रकांत मुदिराज, आकाश खिस्‍ते, प्रतिक पठाडे, भारत खिलबाडे, आनंद शेटे, कुमार पानझडे आदींनी परिश्रम घेतले.

सेंद्रीय शेतीतील विविध पध्‍दतीचे शास्‍त्रीय मानके निश्चित व्‍हावीत....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प कार्यान्वित

राज्‍यात स्‍थानिक परिस्थितीनुसार अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दती वापर आहेत, परंतु त्‍याचे संशोधनात्‍मक प्रमाणिकरण नाही, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दतीचे संशोधन करून शास्‍त्रीय मानके निश्चित करा व योग्‍य त्‍या तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाच्‍या वतीने शेतक-यांना दया, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीचे औचित्‍त साधुन विद्यापीठातंर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंग्री संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुल‍सचिव डॉ. दिनकर जाधव, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री एम. एल. चपळे, आत्‍माचे उपसंचालक श्री अशोक काळे, विद्यापीठ अभियंता अब्‍दुल रहिम, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. बी. व्‍ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रीय उत्‍पादनाची मागणीही असुन सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढले आहे, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या तांत्रिक शिफारसी व तंत्रज्ञानाची मागणी शेतक-यांमध्‍ये वाढत आहे. विद्यापीठस्‍तरावर सेंद्रीय शेतीवर एकात्मिक संशोधन कार्य स्‍वतंत्र प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन व्‍हावे यासाठी कुलगुरु मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेतुन व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प १ जुलै रोजी कार्यान्‍वीत करण्‍यात आला. या प्रकल्‍पात सेंद्रिय शेतीवर आधारित विविध पिके व विषयांवर टप्‍याटप्‍प्‍याने संशोधन विस्‍तार व प्रशिक्षण कार्य हाती घेण्‍यात येणार असुन यासाठी स्‍वतंत्र प्रक्षेत्र, कार्यालय, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी विद्यापीठाच्‍या वतीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीही व्‍यापक कल्‍पना असुन विविध ठिकाणी शेतकरी बांधव अनेक पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. या प्रकल्‍पांतर्गत शास्‍त्रीय दृष्‍टीने संशोधन प्रयोग राबविण्‍यात येणार असुन विविध सेंद्रीय निविष्‍ठांचा शास्‍त्रीयदृष्‍टया वापरावर संशोधन होईल. तसेच अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, किड व रोग व्‍यवस्‍थापन या बाबीसह हवामान आधारीत सल्‍लाही सेंद्रीय शेतीमध्‍ये महत्‍वपुर्ण ठरेल. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन महत्‍वाच्‍या तांत्रीक शिफारशी शेतक-यांना देता येतील तसेच शासनस्‍तरावर सेंद्रीय शेतीचे धोरण ठरविण्‍यास मदत होईल.
      संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात भविष्‍यात सेंद्रीय निर्यातक्षम फळे व कृषि उत्‍पादन घेण्‍यासाठी आवश्‍यक ते संशोधन या प्रकल्‍पात घेण्‍यात येईल, असे सांगितले तर  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना सेंद्रीय शेतीबाबत तंत्रज्ञान शिफारशी उपलब्‍ध करुन देता येतील तसेच शेतक-यांच्‍या पारंपारीक ज्ञानाचा संशोधनात उपयोग करता येईल. कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी कोरडवाहु शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीची सांगड घालणे गरजेचे आहे असे सांगीतले. आत्‍माचे प्रकल्‍प संचालक यांनी सेंद्रीय शेती माध्‍यमातुन शेतक-यांना आवश्‍यक तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली तर  प्रकल्‍प उपसंचालक श्री अशोक काळे यांनी शेतक-यांचा सहभाग सेंद्रीय शेती संशोधनात घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ यांनी सेंद्रीय शेती प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले तर डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विविध संशोधन केंद्राचे अधिकारी, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते. या प्रकल्‍पाचे मुख्‍य प्रवर्तक म्‍हणुन डॉ. बी. व्‍ही. आसेवार राहणार असुन डॉ. आनंद गोरे हे प्रकल्‍प प्रमुख म्‍हणुन काम पाहणार आहेत. तसेच कृषिविद्या, किटकशास्‍त्र, वनस्‍पती विकृ‍तीशास्‍त्र, मृदा व रसायनशास्‍त्र या विभागाचे विभाग प्रमुख सल्‍लागार व मार्गदर्शक म्‍हणुन राहणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने नागरिकांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडयातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने विविध संशोधन कार्य करित आहे. त्‍यासाठी विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर विविध संशोधन प्रात्‍यक्षिके घेतली जातात, परंतु विद्यापीठात परिसरात वावरत असतांना अनेक नागरिकांकडुन जाणते किंवा अजाणतेने या संशोधन प्रक्षेत्राचे मोठे नुकसान होते, त्‍यामुळे संशोधनाच्‍या दृष्‍टीने मोठी हानी होते, तरी विद्यापीठाच्‍या वतीने सर्वांना आवाहन करण्‍यात येते की, विद्यापीठ परिसरात वावरत असतांना संशोधन प्रक्षेत्रास कोणतेही हानी होउन नये याची दक्षता घ्‍यावी.