Tuesday, February 17, 2015

रेशीम उद्योग देऊ शकतो शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्य ........ माजी कुलगुरू मा डॉ एस एन पुरी

वनामकृवित शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादनयावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मार्गदर्शन करतांना डॉ एस एन पुरी
मार्गदर्शन करतांन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
परभणी: देशात विविध पीकांची उत्‍पादकता वाढली, परंतु त्‍यातुलनेत शेतक-यांची उत्‍पन्‍नात वाढ झाली नाही. शेतक-यांचे निव्‍वळ नफा वाढीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, यासाठी शेती क्षेत्रात विविधता आणावी लागेल. रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील बेरोजगारांना गाव स्‍तरावर रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यावी प्रचंड क्षमता या उद्योगात असुन शेतक-यांना आर्थिक स्‍थैर्यता देण्‍याची क्षमता यात आहे, असे प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रिय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाच्‍या रेशीम संशोधन केंद्र व किडकशास्‍त्र विभाग यांच्‍या वतीने ‘शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन’ यावर आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि १७ ते २४ फेब्रवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन त्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि १७ फेब्रवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेरेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरेम्‍हैसुर येथील केद्रिंय रेशीम संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ एस एम एच कादरीकुलसचिव डॉ डि एल जाधव, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, परळी येथील रेशीम उद्योजक श्री डि पी मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एन. पुरी पुढे म्‍हणाले की, शेतमालाला भाव मिळण्‍यासाठी शेतक-यांनीही शेतमालाच्‍या विक्रीचे तंत्र अवगत करावे. तसेच कृ‍षी पदवीधरांनी शेतमालाच्‍या बाजारपेठेत उतरावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले की, बदलते हवामान, पारंपारिक पीक उत्‍पादनात अनिश्चितता, वाढता उत्‍पादन खर्च आदी राज्‍यातील शेतीपुढे अनेक समस्‍या असुन राज्‍यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे. राज्‍यात रेशीम उद्योगाचे क्षेत्र विस्‍तारत असुन रेशीम उत्‍पादनात श्रम सुलभतेसाठी शास्‍त्रज्ञांनी संशोधन करावे.  
रेशीम संचलनालयाचे संचालक डॉ सी जे हिवरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, रेशीम उद्योग हा कमी कालावधीचा उद्योग असल्याने एका वर्षात शेतकरी सहा ते आठ वेळेस उत्‍पादन घेता येते, जे पारंपारिक पिक पध्‍दतीत शक्‍य होत नाही. हा उद्योग ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे जाणारा लोंढा कमी करण्‍यासाठी उपयुक्‍त आहे.
बायहोल्‍टाईन संकरीत कोष उत्‍पादनाबाबत प्रशिक्षण देणारे राज्‍यातील हे पहिलेच प्रशिक्षण असल्‍याचे प्रशिक्षण समन्‍वयक डॉ सी बी लटपटे यांनी प्रास्‍ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ फरिया खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्‍वयक डॉ पी आर झंवर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ धीरज कदम, डॉ डि डि पटाईत, डॉ ए जी बडगुजर, डॉ के टी जाधव, आर बी तुरे, जे एन जवडेकर, बालासाहेब गोंधळकर तसेच आठव्‍या सत्रातील वि‍द्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
सदरिल आठ दिवस चालणा-या प्रशिक्षणात राज्‍याचा कृषि विभागातील व कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांना शाश्‍वत संकरित रेशीम कोषाचे उत्‍पादन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करण्‍यात येणार असुन प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षिकामार्फत विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
मान्‍यवरांसोबत प्रशिक्षणार्थी