Thursday, January 3, 2019

यशस्वी सेंद्रीय शेतीसाठी संयम आणि सातत्य हवे.......माजी कृषि संचालक श्री. अनंतराव जावळे

वनामकृवित आयोजित हिंगोली जिल्‍हयातील शेतक-यांसाठीच्‍या सेंद्रीय शेती प्रशिक्षण वर्गात प्रतिपादन
सेंद्रीय उत्पादनास योग्य ते नामकरण करणे व विक्री व्यवस्था राबविणे गरजेचे असुन योग्य माहिती घेणे निविष्‍ठांची निर्मिती करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती ही एक दिर्घकालीन चालणारी प्रक्रिया असून यात यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम व सातत्य अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी कृषि संचालक डॉ. अनंतराव जावळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील चार जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयाच्‍या शेतक-यांसाठी आयोजित प्रशिक्षण वर्गाचे दिनांक 1 जानेवारी रोजी माजी कृषि संचालक डॉ. अनंतराव जावळे यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर कृषिभूषण श्री. तूकाराम दहे, डॉ. एस. एन. सोळंकी, डॉ. यु. एन. आळसे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. आर.एन. खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अनंतराव जावळे पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये विविध घटकांचे एकात्मिकपणे संगोपन करण्यासाठी एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विषमूक्त व आरोग्यदायी सेंद्रीय उत्पादनाचा वापर आहारात होण्यासाठी सेंद्रीय शेतीसाठी मोठी संधी आहे. सात्विक आहारातून सात्विक विचार व आचार होवून पुढे राष्ट्र निर्माणास मोठा उपयोग होतो. प्रगतशील शेतकऱ्यांनीही सेंद्रीय शेती प्रसारात पूढे आले पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्यास आलेले अनूभव प्रकर्षाने एकमेकांस सांगणे आवश्यक आहे. विकसीत तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी प्रत्यक्ष शेतीमध्ये झाली पाहिजे. तंत्रज्ञान प्रसारातील त्रूटी दूर करणे आवश्यक आहे आणि यासाठी कृषि क्षेत्रातील सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. यू.एन. आळसे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बाजारात विविध प्रकारच्या सेंद्रीय निविष्‍ठा उपलब्ध आहेत त्याबाबत योग्य ती माहिती घेणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे. डॉ. राजेश भालेराव यांनी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये पिकनिहाय तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. कृषिभुषण श्री. तूकाराम दहे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये चांगले उत्पादन घेवून त्याचे रूपांतर चांगल्‍या उत्पन्नात करता येणे शक्य असल्‍याचे सांगितले. डॉ. एस.एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये सौर ऊर्जा, गोबर गॅस यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल असे सांगीतले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्‍व सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये डॉ. यु. एन. आळसे यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, डॉ. राजेश भालेराव यांनी गांडूळ खत निर्मिती, डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, प्रा. आर. डी. बघेले यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, डॉ. . एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास शेतकऱ्यांची भेट देवून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रमास हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती, यामध्ये अनिल कदम, प्रभाकर वडकूते, पंजाब वडकूते, रामेश्वर मांडगे, विष्णू काळे, कृषि विभागाचे श्री. घूगे, श्री. निकम आदींचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, प्रसाद वसमतकर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी यांनी परिश्रम घेतले