Tuesday, August 15, 2023

इलेक्ट्रॉनिक - प्लास्टिक कचरा व्‍यवस्‍थापनाकरिता वनामकृवि आणि स्केप ई रिसायक्लर यांच्यात सामंजस्य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍प – नाहेप आणि स्केप ई रीसायक्लर पूर्णा यांच्या मध्ये विद्यापीठ परिसरातील इलेक्‍ट्रॉनिक व प्‍लास्टिक कचरा व्‍यवस्‍थापनाकरिता दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आला. या सामंजस्य करारावर कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि स्केप ई रीसायक्लरचे संचालक अभिजित रणवीर यांनी स्‍वाक्षरी केल्‍या. 

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, हा करार पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले असून प्‍लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. प्‍लास्टिक मुक्‍तीकरिता जनजागृतीची आवश्‍यकता आहे. सदरील सामंजस्य करार हा पर्यावरण हितासाठी असुन विद्यापीठ मानांकन वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्‍वपुर्ण आहे. श्री अभिजित रणवीर म्‍हणाले की, करारामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थामध्ये ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा वर्गीकरण व व्‍यवस्‍थापनाबाबत जागृती होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ई-कचरा आणि प्लास्टिक कचरा मुक्त होण्यास मदत होईल.

सदर करार नाहेप अंतर्गत असलेल्‍या “पर्यावरणाचे संवर्धन योजना” करण्‍यात असुन विद्यापीठांतर्गत निर्माण होणारा कचरा हा स्केप ई रीसायक्लर यांच्या द्वारे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियान व प्लास्टिक मुक्त भारत या अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. कराराच्‍या माध्‍यमातुन प्‍लास्टिक व ई कचरा व्‍यवस्‍थापनावर संशोधन आणि प्रशिक्षण, कार्यशाळा, व्याख्याने आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरणातील ई- कचरा आणि प्लास्टीक कचरा ह्यातील घातक आणि प्रदूषक घटक वेगळे करून तसेच त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रकीया केली जाते. स्केप ई रीसायक्लर प्रा. लि. हि ई-कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणारी मराठवाड्यातील अग्रणी एकमेव शासनमान्य आणि अधिकृत कंपनी असून जिचा उद्देश “पर्यावरणाचे संगोपन” करणे हा आहे. शैक्षणिक संस्थामध्ये पर्यावरणाचा -ह्रास करणाऱ्या घटकांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या करण्याच्या उद्देशाने कुलसचिव डॉ. धीरज कुमार कदम आणि शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले ह्यांनी सामंजस्य करारासाठी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे आणि समन्वयक  अधिकारी डॉ. मेघा जगताप ह्यांनी सामंजस्य करारासाठी पुढाकार घेतला.