प्लास्टिकमुक्त भारतासाठी कृतीशील प्रेरणा घ्या — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन
जागतिक स्तरावर पर्यावरण
संवर्धनाच्या उद्देशाने साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन यंदा "प्लास्टिक
प्रदूषणावर विजय मिळावा " (Beat Plastic Pollution) या
अधिकृत संकल्पनेच्या माध्यमातून साजरा होत आहे. या मोहिमेमुळे प्लास्टिक
कचऱ्यामुळे होणाऱ्या हानीविषयी जनजागृती घडवून पर्यावरण रक्षणासाठी दिनांक ५ जून रोजी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालयाच्या वतीने विद्यापीठात
जागतिक पर्यावरण दिन २०२५ साजरा केला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना
त्यांनी सांगितले की,
प्लास्टिकमुक्त भारत हे आपले ध्येय असावे आणि भविष्यातील
पिढ्यांसाठी सुरक्षित व स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन केवळ
एक प्रतिकात्मक दिवस नसून, तो आपल्या कृतीसाठी एक प्रभावी
प्रेरणा ठरावा.
विद्यापीठाने
हरित विद्यापीठ संकल्पनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य सुरू केले आहे. विद्यापीठाच्या
परिसरातून जाणाऱ्या ४.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत ५०० मीटर रुंद हरित पट्टा
विकसित करण्यात आला आहे. शेतीमध्ये जैविक कुंपणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी चारस्तरीय
जैविक कुंपण अवलंबण्याची शिफारस केली. मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड
हाती घेण्यात आलेली असून,
यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक लाभही
मिळत आहे. यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून शेतकऱ्यांना मोठ्या
प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे.
वनशेतीमध्ये
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी ‘वन विज्ञान केंद्र’ स्थापन होण्याची गरज
त्यांनी व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध
योजना राबवत असून त्यासाठी भरीव आर्थिक मदतही देत आहे. विद्यापीठाने देखील
सेंद्रिय व नैसर्गिक शेती क्षेत्रात कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य
करार केले असून त्याचा उपयोग रासायनिक घटकांचा वापर कमी करण्यासाठी तंत्रज्ञान
विकासात होतो आहे.
मागील
वर्षी पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड मा के नाम’ ही अभिनव मोहिम हाती घेण्यात
आली होती. ज्या नागरिकांनी अजूनही आपल्या आईच्या नावे झाड लावलेले नसेल, त्यांनी जरूर या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन
माननीय कुलगुरूंनी केले.
महाराष्ट्र राज्य सध्या
पर्यावरणाच्या खराब स्थिती बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही
चिंतेची बाब आहे. आज आपण जे चुकीचे करतो आहोत, तेच भविष्यात
आपला इतिहास ठरेल आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे आजच
प्लास्टिकला "नाही" म्हणायला शिकले पाहिजे.
विद्यापीठाच्या सर्व
संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने स्वतः पुढाकार घेऊन, जिथे
प्लास्टिकचे कचरे दिसेल तिथून तो उचलून दूर करावा. कारण आपले कृतीशील अनुकरणच
विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजाला योग्य दिशा देईल. विद्यापीठ पर्यावरणपूरक वातावरण
निर्माण करणारे एक आदर्श व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त
करत, प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करण्याचे आवाहन
त्यांनी केले.
पर्यावरण रक्षणासाठी
विद्यार्थ्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्व घटकांना एकत्र येणे आवश्यक आहे. आपण
आपल्या कृतीमधून पर्यावरणाला नुकसान पोहोचवत तर नाही ना, याचे
आत्मपरीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. वीज, पाणी आणि अन्न या
नैसर्गिक संसाधनांचा काटेकोर वापर आणि बचत करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठाचे
सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी या मूल्यांचा प्रसार करून विद्यार्थ्यांमध्ये
पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करावी, आणि समाजात
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश पोहोचवावा. हेच खरे विद्यापीठाचे जागतिक पर्यावरण
दिनानिमित्त योगदान ठरेल, असे मत माननीय कुलगुरूंनी व्यक्त
केले.
यावेळी मार्गदर्शन करताना
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, प्लास्टिकचा अतिरेक आणि
त्याचे जलचर, वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर होणारे
दुष्परिणाम आता गंभीर पातळीवर पोहोचले आहेत. दरवर्षी कोट्यवधी टन प्लास्टिक
समुद्रात आणि जमिनीवर टाकले जाते, जे नैसर्गिक
परिसंस्थांसाठी मोठे संकट निर्माण करते. "प्लास्टिकला
नाही" असे ठामपणे म्हणायला शिका, आणि केवळ पुनर्वापर
करता येणाऱ्या घटकांचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी केले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश
क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.
राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन डॉ धीरज पाथ्रीकर यांनी केले तर आभार डॉ. रणजीत चव्हाण
यांनी मानले कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी,
कर्मचारी आणि विद्यार्थी असे जवळपास ४०० सहभागी झाले होते.
या दिनानिमित्ताने दिनांक
५ जून रोजी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांनी, संशोधन केंद्रांनी, विस्तार योजना
आणि कृषी विज्ञान केंद्रांनी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, जनजागृती रॅली, शालेय व महाविद्यालयीन चर्चासत्रे,
इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर यावर आधारित प्रदर्शन आणि कार्यशाळा असे
विविध उपक्रम राबवले. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी ठोस पावले उचलण्याचे आवाहन
केले.