कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'कृषी संकल्प अभियान' अंतर्गत मौजे रुमना, ता. गंगाखेड, जि. परभणी येथे दिनांक ९ जून रोजी प्रभावी मार्गदर्शन व तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबवण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे रुमना चे सरपंच श्री. परमेश्वर
टिकाराम सोळंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमात
प्रगतशील शेतकरी श्री. उध्दव भगवानराव सोळंके, डॉ. गजानन गडदे
(प्रमुख, कृषि माहिती तंत्रज्ञान केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ), डॉ. सी.
व्ही. आंबाडकर (सहाय्यक प्राध्यापक, वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ) तसेच डॉ. अरुणा खरवडे (शास्त्रज्ञ,
केव्हीके परभणी) हे देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात करताना डॉ. प्रशांत भोसले यांनी 'कृषी संकल्प अभियान' अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ९० गावांमध्ये
केव्हीके परभणीमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. खरीपपूर्व नियोजन,
नविन तंत्रज्ञानाचा प्रसार, व शासकीय योजनांची
माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ. गजानन गडदे यांनी कापूस, सोयाबीन, तुर या खरीप पिकांचे वाण, पेरणी पद्धती, खत व्यवस्थापन आणि कोरडवाहू शेती तंत्रज्ञान
यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बियाणे प्रक्रिया,
किड-रोग व्यवस्थापन व बायोमिक्सचा वापर याविषयी माहिती दिली.
कृषी विभागाचे श्री. राजू टकले यांनी विविध शासकीय योजनांवर माहिती
दिली तर आत्मा परभणीचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. प्रकाश साळुंके यांनी सोयाबीन
बियाण्याच्या उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर केले.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा फीडबॅक घेण्यात आला असून, त्यांच्या अनुभवावरून संशोधन व तंत्रज्ञान सुधारण्यात मदत होईल असा विश्वास
व्यक्त करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘महाविस्तार’ अॅप द्वारे हवामान अंदाज,
पीक सल्ला, बाजारभाव यांची अधिकृत माहिती शेतकऱ्यांना
मिळणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. सिध्देश्वर सोळंके
यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र परभणीचे अधिकारी
व कर्मचारी तसेच रुमना गावातील तरुण यांनी विशेष मेहनत घेतली. गावातील शेकडो शेतकरी
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.