Thursday, July 2, 2015

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार जाहिर

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या स्मृतिप्रीत्‍यर्थ दिले जाणारे वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार जाहीर झाले असुन मृद्संधारण व जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच कोरडवाहु शेती संशोधना दिशा देणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे यंदाच्‍या कृ‍षी पुरस्‍कारचे मानकरी ठरले आहेत. दिनांक १० जुलै रोजी मुंबईत मुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणीस व विधानसभा अध्‍यक्ष मा ना श्री हरिभाऊ बागडे यांच्‍या हस्‍ते पुरस्‍काराचे वितरण होणार असल्‍याची माहिती वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष डॉ बी आर बारवाले यांनी दिली.

ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे रायपुर येथे कृषिदिन साजरा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्याक्रमातंर्गत अखिल भारतीय सन्‍वयीत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पात कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांनी दि १ जुलै रोजी मौजे रायपुर येथे कै वसंतराव नाईक यांच्‍या १०२ व्‍या जयंतीनिमित्‍त कृषिदिन साजरा केला. प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच श्री मस्‍के, डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार, डॉ यु एन कराड, श्री दिवाकर काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी खरीप पिक व्‍यवस्‍थापन व कृषि हवामान सल्‍लाचे महत्‍व सांगितले तर डॉ ए एस कडाळे, डॉ आर बी पवार व प्रा यु एन कराड यांनी विविध कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी रायपुर येथील शालेय विद्यार्थी, शेतकरी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, कृषिदुत व कृषिकन्‍या गावात वृक्षदिंडी काढुन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्‍यात आली तसेच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करण्‍यात आले. मान्‍यवरांच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवेच हवामानशास्त्र पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत विशाल राठोड यांनी केले. यावेळी शेतकरी, शालेय विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिदुत दत्‍ता पांचाळ, चंद्रकांत मुदिराज, आकाश खिस्‍ते, प्रतिक पठाडे, भारत खिलबाडे, आनंद शेटे, कुमार पानझडे आदींनी परिश्रम घेतले.

सेंद्रीय शेतीतील विविध पध्‍दतीचे शास्‍त्रीय मानके निश्चित व्‍हावीत....... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प कार्यान्वित

राज्‍यात स्‍थानिक परिस्थितीनुसार अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दती वापर आहेत, परंतु त्‍याचे संशोधनात्‍मक प्रमाणिकरण नाही, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या विविध पध्‍दतीचे संशोधन करून शास्‍त्रीय मानके निश्चित करा व योग्‍य त्‍या तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाच्‍या वतीने शेतक-यांना दया, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीचे औचित्‍त साधुन विद्यापीठातंर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंग्री संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुल‍सचिव डॉ. दिनकर जाधव, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री एम. एल. चपळे, आत्‍माचे उपसंचालक श्री अशोक काळे, विद्यापीठ अभियंता अब्‍दुल रहिम, प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. बी. व्‍ही. आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रीय उत्‍पादनाची मागणीही असुन सेंद्रीय शेतीचे महत्‍व वाढले आहे, त्‍यासाठी सेंद्रीय शेतीच्‍या तांत्रिक शिफारसी व तंत्रज्ञानाची मागणी शेतक-यांमध्‍ये वाढत आहे. विद्यापीठस्‍तरावर सेंद्रीय शेतीवर एकात्मिक संशोधन कार्य स्‍वतंत्र प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन व्‍हावे यासाठी कुलगुरु मा डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेतुन व संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍प १ जुलै रोजी कार्यान्‍वीत करण्‍यात आला. या प्रकल्‍पात सेंद्रिय शेतीवर आधारित विविध पिके व विषयांवर टप्‍याटप्‍प्‍याने संशोधन विस्‍तार व प्रशिक्षण कार्य हाती घेण्‍यात येणार असुन यासाठी स्‍वतंत्र प्रक्षेत्र, कार्यालय, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी विद्यापीठाच्‍या वतीने उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीही व्‍यापक कल्‍पना असुन विविध ठिकाणी शेतकरी बांधव अनेक पध्‍दतीचा अवलंब करीत आहेत. या प्रकल्‍पांतर्गत शास्‍त्रीय दृष्‍टीने संशोधन प्रयोग राबविण्‍यात येणार असुन विविध सेंद्रीय निविष्‍ठांचा शास्‍त्रीयदृष्‍टया वापरावर संशोधन होईल. तसेच अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, किड व रोग व्‍यवस्‍थापन या बाबीसह हवामान आधारीत सल्‍लाही सेंद्रीय शेतीमध्‍ये महत्‍वपुर्ण ठरेल. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन महत्‍वाच्‍या तांत्रीक शिफारशी शेतक-यांना देता येतील तसेच शासनस्‍तरावर सेंद्रीय शेतीचे धोरण ठरविण्‍यास मदत होईल.
      संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात भविष्‍यात सेंद्रीय निर्यातक्षम फळे व कृषि उत्‍पादन घेण्‍यासाठी आवश्‍यक ते संशोधन या प्रकल्‍पात घेण्‍यात येईल, असे सांगितले तर  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना सेंद्रीय शेतीबाबत तंत्रज्ञान शिफारशी उपलब्‍ध करुन देता येतील तसेच शेतक-यांच्‍या पारंपारीक ज्ञानाचा संशोधनात उपयोग करता येईल. कुलसचिव डॉ. दिनकर जाधव यांनी कोरडवाहु शेतीमध्‍ये सेंद्रीय शेतीची सांगड घालणे गरजेचे आहे असे सांगीतले. आत्‍माचे प्रकल्‍प संचालक यांनी सेंद्रीय शेती माध्‍यमातुन शेतक-यांना आवश्‍यक तंत्रज्ञान उपलब्‍ध होईल, अशी आशा व्‍यक्‍त केली तर  प्रकल्‍प उपसंचालक श्री अशोक काळे यांनी शेतक-यांचा सहभाग सेंद्रीय शेती संशोधनात घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ यांनी सेंद्रीय शेती प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले तर डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विविध संशोधन केंद्राचे अधिकारी, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थितीत होते. या प्रकल्‍पाचे मुख्‍य प्रवर्तक म्‍हणुन डॉ. बी. व्‍ही. आसेवार राहणार असुन डॉ. आनंद गोरे हे प्रकल्‍प प्रमुख म्‍हणुन काम पाहणार आहेत. तसेच कृषिविद्या, किटकशास्‍त्र, वनस्‍पती विकृ‍तीशास्‍त्र, मृदा व रसायनशास्‍त्र या विभागाचे विभाग प्रमुख सल्‍लागार व मार्गदर्शक म्‍हणुन राहणार आहेत.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने नागरिकांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडयातील शेतक-यांच्‍या दृष्‍टीने विविध संशोधन कार्य करित आहे. त्‍यासाठी विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर विविध संशोधन प्रात्‍यक्षिके घेतली जातात, परंतु विद्यापीठात परिसरात वावरत असतांना अनेक नागरिकांकडुन जाणते किंवा अजाणतेने या संशोधन प्रक्षेत्राचे मोठे नुकसान होते, त्‍यामुळे संशोधनाच्‍या दृष्‍टीने मोठी हानी होते, तरी विद्यापीठाच्‍या वतीने सर्वांना आवाहन करण्‍यात येते की, विद्यापीठ परिसरात वावरत असतांना संशोधन प्रक्षेत्रास कोणतेही हानी होउन नये याची दक्षता घ्‍यावी.





हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०२ वी जयंती साजरी

महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या १०२ व्‍या जयंती निमित्‍य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘कृषिदिन’ म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. यानिमित्त कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि एन गोखले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एस कदमकृषि‍ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, विविध विभागाचे विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी आदींसह विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापकवृंद व कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

Wednesday, July 1, 2015

मौजे बाभुळगांव येथे कृषि दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्याक्रमातंर्गत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प येथे कार्यरत असलेल्‍या कृषिकन्‍यांनी दि १ जुलै रोजी मौजे बाभुळगांव येथे कै वसंतराव नाईक यांच्‍या १०२ व्‍या जयंतीनिमित्‍त कृषिदिन साजरा केला. याप्रसंगी बाभुळगांवचे प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव पारधे, कार्यक्रमाधिकारी डॉ जयश्री एकाळे, डॉ मेधा सुर्यवंशी, ज्ञानेश्‍वर पारधे, गणपतराव दळवे, मुजांजी पारधे, गिरीश पारधे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गावात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्‍यासाठी वृक्षदिंडी काढण्‍यात येऊन वृक्षरोपण करण्‍यात आले. डॉ जयश्री एकाळे यांनी कोरडवाहू पिकांच्‍या पाणी व अन्‍नद्रव्‍य  व्‍यवस्‍थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कृषिकन्‍या उर्मिला दराडे हीने विहीर व कुपनलिका पाणी पुर्नभरण या विषयी तर कृषिकन्‍या अनुजा भोसकर हिने कापुस पिकात पाणी व तण व्‍यवस्‍थापनाबद्दल शेतक-यांना माहिती दिली. यावेळी अनुराधा बुचाले हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. 

Monday, June 29, 2015

कृषिदुत व कृषिकन्‍यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे........ प्राचार्य डॉ डि एन गोखले


ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना असुन कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महावि‍द्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावेअसतो. हा कार्यक्रम राबविण्‍यांसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते, व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, कोरडवाहु संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार, करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे यांच्‍यासह विविध विषयतज्ञ उपस्थित होते.

प्राचार्य डॉ डि एन गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा व विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके, कृषि मेळावे आदींच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचवावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमात विषयतज्ञ डॉ अनिल धमक, प्रा ए बी बांगडे, प्रा ए एम कांबळे, प्रा रणजित चव्‍हाण, प्रा विशाल अवसरमल, प्रा पी एच घंटे, प्रा डि व्‍ही बैनवाड, प्रा भेदे यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावेचे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे यांनी तर सुत्रसंचालन रावेचे प्रभारी अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले. या उद्बोधन कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ डि व्‍ही दळवी, डॉ आर सी महाजन, डॉ जयश्री एकाळे, प्रा ए आर मंत्री, प्रा सुनिता पवार, प्रा एस एस गलांडे, डॉ यु एन क-हाड यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात प्रत्‍यक्ष शेतक-यांचे शेती कासण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा ते अभ्‍यास करतात. या सत्रातील विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या संबोधन्‍यात येते. यावर्षी कृषि महाविद्यालयातील १९२ विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत. 

Sunday, June 28, 2015

अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी केला कृषि तंत्रज्ञानाचा जागर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांर्गत कृषिदुतांनी अंबाजोगाई तालुक्‍यातील डिघोळअंबा व सनगांव गावात प्रभातफेरी काढुण गावातील शेतक-यांत कृषि तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करण्‍यात आली. तसेच गाजरगवत निर्मुलन व आरोग्‍यासाठी योगा कार्यक्रमही राबविण्‍यात आला. या विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ पी एन करंजीकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ एस जी पुरी व कृषिदुत यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री मेनकुदळे, श्री एकुरकेसर, श्री म्‍हेत्रे, श्रीमती देशमुख, श्रीमती चिमटे, श्री पाथरकर, श्री चव्‍हाण, श्रीमती अंबुरे, श्रीमती शिंदे आदींचे सहकार्य लाभले.