Monday, December 31, 2018

वनामकृविसाठी २०१८ वर्ष ठरले महत्वपुर्ण

विद्यापीठ अधिस्‍वीकृती, कापसाचा नांदेड-४४ वाण बीटीत परावर्तीत, देशातील पहिला जैवसमृध्‍द ज्‍वारीचा वाण परभणी शक्‍ती, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबतची विस्‍तार मोहिम आदी यावर्षातील महत्‍वाच्‍या घडामोडी  
********************************************************
२०१८ वर्ष हे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने एक महत्वपुर्ण वर्ष ठरले आहे. कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तीनही क्षेत्रात अनेक घडामोडी झाल्‍या. शेतकरी, विद्यार्थ्‍यी व सामान्‍य नागरिकांचा विचार करता, या वर्षातील काही महत्‍वाच्‍या बाबीं आपण पाहु.
कृषि शिक्षण
भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठास पुढील पाच वर्षाकरिता दिलेली अधिस्‍वीकृती ही विद्यापीठातील शिक्षण क्षेत्रातील महत्‍वाची उपलब्‍धी आहे. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेची राष्‍ट्रीय कृषि शिक्षण अधिस्‍वीकृती मंडळाच्‍या २२ व्‍या बैठकीत हा निर्णय झाला. विद्यापीठास शै‍क्षणिक दर्जाच्‍या आधारे एकुण ४ पैकी २.७७ मिळाले असुन विद्यापीठाने ‘’ दर्जा प्राप्‍त केला आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी, लातुर, बदनापुर, गोळेगाव, उस्‍मानाबाद व अंबेजोगाई येथील कृषि महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्‍नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व लातुर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अधिस्‍वीकृती प्राप्‍त झाली आहे. या महाविद्यालयातील सर्व पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्या अधिस्‍वीकृ‍तीस मान्‍यता देण्‍यात आली आहे. ही गोष्‍ट विद्यापीठाच्‍या भावी शैक्षणिक कार्यासाठी एक संजीवणीच ठरेल. यावर्षीच्‍या दिक्षांत समारंभात ३३७६ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले असुन येणा-या काळात या प्रशिक्षित मनुष्‍यबळाचे योगदान कृषि विकासात मोलाचे ठरणार आहे. संपुर्ण वर्षभरात विद्यापीठातील नियमित शैक्षणिक कार्यासोबतच क्रीडास्‍पर्धा, सां‍स्‍कृतिक कार्यक्रम व विविध मान्‍यवरांची व्‍याख्‍याने महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यींचे व्‍यक्‍तीमत्‍व घडविण्‍यात फलदायी ठरले. यात देशाचे प्रसिध्‍द विधिज्ञ पदमश्री मा. अॅड उज्‍ज्‍वल निकम यांचे व्याख्‍यान अविस्‍मरणीयच होते.  
कृषि संशोधन
विद्यापीठाच्‍या कृषि संशोधनाचा विचार करता, मराठवाडयातील शेतक-यांचे सोयाबीन, कापुस, ज्‍वारी व तुर हे मुख्‍य पिके आहेत. सोयाबीन व तुर या पिकांमध्‍ये यापुर्वीच विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांच्‍या शेतात चांगल्‍या प्रकारे स्थिरावली आहेत, या मुख्‍यत: सोयाबीन मधील एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-१६२ याचा तर तुर पिकातील बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, बीडीएन-७११ आदींचा उल्‍लेख करावा लागेल. मराठवाडयातील शेतक-यांचे पांढरे सोने म्हणचेच नगदी पिक कापुस, या पिकातही विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने ऐतिहासिक गोष्‍ट ठरली, ती म्‍हणजे विद्यापीठाचा नांदेड-४४ (एनएचएच-४४हा संकरित वाण बीटी वाणात परावर्तीत करण्‍यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातुन १९८४ साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-४४ हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्‍यापुर्वी अधिक उत्‍पादन देणारा, पुनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणा-या कीडींना प्रतिकारक असल्‍यामुळे मराठवाडा व राज्‍यातीलच नव्‍हे तर देशातील इतर राज्‍यातील शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्‍हणजेचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी मार्च २०१४ मध्‍ये वनामकृवि व महाबीज मध्‍ये सामंजस्‍य करार करण्‍यात आला, गेल्‍या चार वर्षात हा वाण बीटीमध्‍ये परावर्तीत करण्‍यात येऊन यशस्‍वी प्रक्षेत्र चाचण्‍यात घेण्‍यात आल्‍या. पुढील हंगामात तो मर्यादित स्‍वरूपात महाबीजच्‍या माध्‍यमातुन विक्रीसाठी उपलब्ध होणार असुन अनेक दिवसापासुन शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी पुर्ण होऊ शकली, असा सार्थ अभिमान नक्कीच विद्यापीठ शास्‍त्रज्ञांना आहे.  
ज्‍वारी हे पिक ही मराठवाडयातील एक महत्‍वाचे पिक आहे, यातही एक ऐतिहासिक अशी उपलब्‍धी झाली. विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील आंतरराष्‍ट्रीय अर्धकोरडवाहु ऊष्‍णकटिबंधीय पीक संशोधन संस्‍था (इक्रीसॅट) यांच्या संशोधन सहभागातुन परभणी शक्ती या लोह आणि जस्ताचे अधिकतम प्रमाण असणाऱ्या खरीप ज्वारीचा जैवसमृध्द वाण वि‍कसित करण्‍यात आला असुन देशातील ज्‍वारीचा हा पहिला वाण ठरला आहे. सदरिल वाणाचे दिनांक  जुलै रोजी इक्रीसॅट हैद्राबाद येथे समारंभपुर्वक प्रसारण करण्यात आले. या वाणात लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असल्यामुळे मानवी जीवनावर व आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. शरीरातील रक्‍तातील लोहाच्‍या कमरतेमुळे अनेक व्‍यक्‍तींमध्‍ये रक्‍तक्षय मोठया प्रमाणात आढळतोतसेच गर्भवती महिला व आदीवासी मुलांसाठी हा वाण अत्‍यंत उपयुक्‍त ठरणार आहे. यात लोह प्रती किलो ४४ ते ४६ मिलीग्रॅम तर जस्त प्रती किलो ३२ ते ३३ मिलीग्रॅम असुन भाकरीची प्रत चांगली आहे. तसेच कडबाही उच्‍च प्रतीचा असुन उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ज्वारीचे ३६ ते ३८ क्विंटल व कडब्याचे उत्पादन १०५ ते ११० क्विंटल आहे. हा वाण खोडमाशीखोडकीड व काळया बुरशी रोगास प्रतिकारकक्षम आहे. यामुळे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने आहारात पुन्‍हा एखादा ज्‍वारीचे महत्‍व वाढणार आहे. याशिवाय बाजरी संशोधनातील महत्‍वाच्‍या घटनेचा उल्लेख करावा लागेल. औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाच्‍या अखिल भारतीय सन्‍मवयीत बाजरी संशोधन प्रकल्‍पास सन २०१७-१८ साठी उल्‍लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्‍ट संशोधन केंद्र म्‍हणुन सन्‍मानित करण्‍यात आले. बाजरी संशोधन प्रकल्‍प केंद्रानी जैवसमृध्‍द लोहयुक्‍त एएचबी-१२०० व एएचबी-१२६९ ही दोन वाण विकसित केलेली असुन या वाणांची राष्‍ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्‍यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात संपन्न झालेल्‍या ४६ व्‍या बैठकीत परभणी कृषि विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापुस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषि यंत्रे आणि २८ पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता देण्यात आली.
विस्‍तार कार्य
विद्यापीठाचे विस्‍तार कार्य नियमितपणे विविध मेळावे, प्रशिक्षण, चर्चासत्र, शास्‍त्रज्ञांच्‍या प्रक्षेत्र भेटी, माहिती वाहीनी आदींच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे राबविण्‍यात आले. परंतु यावर्षी विशेष ठरले ते कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत राबविण्‍यात आलेली मोहिम. मागील वर्षी निर्माण झालेल्‍या कापसावरील गुलाबी बोंडअळीचा धोका यावर्षी उदभवु नये, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाचा कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या विस्‍तार यंत्रणेच्‍या वतीने विविध विस्‍तार कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांना कापसावरील गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनाकरीता मार्गदर्शन करण्‍यात आले. यामुळे निश्चितच शेतकरी बांधव गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कमी फवारणीत व कमी खर्चात करू शकले. या मोहिमेत मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाचे सातवे सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) चे विद्यार्थ्‍यांनी मोलाचे योगदान दिली. ही मोहिम विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील एकुण २७ घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालयातील २२८० विद्यार्थ्‍यांनी तीनशेपेक्षा जास्‍त गावांपर्यंत पोहचवली हे विशेष. यावर्षी विद्यापीठांतर्गत बदनापुर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राची सुरूवात करण्‍यात आली, याचे उदघाटन ऑनलॉईन पध्‍दतीने देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री नरेन्‍द्र मोदी यांनी केले. यामुळे जालना जिल्‍हयातील विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यास चालना मिळणार आहे.    

या वर्षातील आणखी एका महत्‍वाच्‍या घटनेचा उल्‍लेख करावा लागेल, ती म्‍हणजे विद्यापीठाचे सतरावे कुलगुरू म्‍हणुन कोरडवाहु शेती संशोधनातील आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी कुलगुरू म्‍हणुन ३१ मे रोजी म्‍हणजेचे चार वर्ष चार महिने कार्यकाळ यशस्‍वीपणे पुर्ण केलाया कार्यकाळात विद्यापीठाच्‍या संशोधनशिक्षण व विस्‍तार कार्यास त्‍यांनी एक विशिष्‍ट दिशा दिलीतर विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन मा. डॉ अशोक ढवण यांनी दिनांक १ जुन रोजी पदभार स्‍वीकारला. अध्‍यापन, विस्‍तार शिक्षण व संशोधनाचा ३३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले, तसेच मराठवाडयातील शेतक-यांच्‍या प्रश्‍नांची जाण असणारे, एक आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व अशी ओळख असणारे कुलगुरू विद्यापीठास लाभले आहेत. येणा-या काळात निश्चितच कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील शेती, शेतकरी व विद्यार्थ्‍यी यांच्‍या हिताचे उत्‍कृष्‍ट कार्य होईल, यात शंकाच नाही.

संपुर्ण वर्षभरातील विद्यापीठाच्‍या यशस्‍वी प्रवासात निश्चितच अनेकांचे योगदान आहे, यात  माननीय कुलगुरू पासुन ते शेतकरी, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी, प्रसारमाध्‍यमाचे प्रतिनिधी यांचाही वाटा आहे. माजी कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्‍वरलु, सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठाचे कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ, कृषि विस्‍तारक व विद्यार्थ्‍यी यांचा उल्‍लेख करावाच लागेल.

हे वर्ष जरी विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने महत्त्वपूर्ण ठरले, परंतु ज्‍यांच्‍या साठी हा सर्व अट्टाहास केला जात आहे, तो जगाचा पोंशिदा शेतक-यांसाठी कमी पावसामुळे निराशाजनक राहीले आहे. परंतु येणा-या वर्षात चांगल्‍या पर्जन्‍य व हवामानाची अपेक्षा करू व भावी काळ सर्वांसाठी समृध्‍दी घेऊन येईल, हीच अपेक्षा.

डॉ प्रविण कापसे, जनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी