Sunday, June 21, 2026

योगाच्या माध्यमातून स्वस्थ शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाचा मार्ग अधिक सुलभ होतो.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उत्साहात योग दिन साजरा


योग ही केवळ शारीरिक हालचालींची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित करणारी भारतीय संस्कृतीची प्राचीन जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक, मजबूत आणि ऊर्जावान राहते. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन शांत व स्थिर राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कृषि महाविद्यालयासमोरील प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी दिलेल्या “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वृद्धत्वासाठी योग) या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, दरवर्षी २१ जून रोजी जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. भारताच्या प्राचीन परंपरेचा अमूल्य वारसा असलेला योग आज संपूर्ण जगाने आरोग्यदायी आणि संतुलित जीवनशैलीचा प्रभावी मार्ग म्हणून स्वीकारला आहे. नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व विविध आजारांपासून संरक्षण मिळते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास तसेच जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळविण्यास योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योगामुळे आध्यात्मिक विकास साधला जाऊन सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि अंतरिक शांततेचा अनुभव मिळतो. निरोगी, समृद्ध आणि शांततामय जीवनासाठी नियमित योगाभ्यास अत्यावश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून योग करा – निरोगी रहा” हा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणावा. योगाच्या माध्यमातून स्वस्थ शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाचा मार्ग अधिक सुलभ होतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी भारत घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत, नियमित योगसाधना ही निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. तसेच सर्वांना निरोगी, सकारात्मक आणि तणावमुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यातील महत्त्व विशद केले. विद्यापीठामार्फत विद्यार्थी, कर्मचारी आणि समाजामध्ये योगाविषयी जनजागृती निर्माण करून निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्यासह विद्यापीठातील विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सामुदायिक स्वरूपात विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.

याप्रसंगी परभणी येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशी व त्यांच्या पथकातील अर्चना घनवट, राजकुमार चव्हाण आणि संस्कृती गोंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायामाचे सामुदायिक प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी प्रा. दिवाकर जोशी यांनी मानवी जीवनात पृथ्वीप्रमाणेच आरोग्याचे मूलभूत महत्त्व अधोरेखित केले. शेवटी त्यांनी वंदना आणि शांतीपाठ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संघर्ष श्रंगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


























Saturday, June 20, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे पेठशिवनी येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात देशभर खेत बचाओ अभियान” राबविण्यात येत आहे. स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा प्रमुख उद्देश मातीचे आरोग्य संवर्धन, जलसंधारण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, पर्यावरण संरक्षण तसेच शाश्वत शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मौजे पेठशिवनी येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना एल-निनोच्या संभाव्य परिणामांबाबत तसेच आकस्मिक पीक नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मातीचे आरोग्य हेच शेती, पशुधन आणि मानवाच्या सुदृढ आरोग्याचा मूलभूत पाया असल्याचे स्पष्ट केले. मृदेचे आरोग्य चांगले राहिल्यास पिकांची उत्पादकता वाढते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि शेती अधिक शाश्वत बनते, असे त्यांनी सांगितले. मृदेची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी त्यांनी हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर, जैविक खतांचा अवलंब, पीक फेरपालट पद्धतीचा स्वीकार तसेच मर्यादित प्रमाणात नैसर्गिक शेती पद्धती अंगीकारण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रासमोरील बदलते हवामान, जमिनीची घटती सुपीकता आणि उत्पादन खर्चातील वाढ या आव्हानांचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून सातत्याने संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांनी खांद्याला खांदा लावून कार्य केल्यासच कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल.

एकेकाळी देशाची लोकसंख्या ४० कोटी असताना भारताला अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता; मात्र आज १४० कोटी लोकसंख्या असूनही भारत केवळ अन्नधान्यात आत्मनिर्भर नाही, तर जगातील अनेक देशांना अन्नपुरवठा करण्याची क्षमता बाळगतो. या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवांना जाते, असे गौरवोद्गार काढत त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना समाजात योग्य सन्मान, आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आणि धोरणात्मक पाठबळ मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी “स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी एल-निनोमुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त करत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, जलसंधारण आणि योग्य पीक व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. रुंद सरी-वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा होतो आणि कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ. राहुल रामटेके यांनी एल-निनो आणि जागतिक पातळीवरील संघर्षजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला.

मृदा शास्त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड यांनी मृदा आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणे तसेच शेणखत व कंपोस्ट खतांचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्स आणि सेंद्रिय खतांचे फायदे स्पष्ट केले. डॉ. गोपाळ शिंदे व डॉ. दयानंद टेकाळे यांनी कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुमंत जाधव यांनी सूक्ष्म सिंचन पद्धती आणि पाणी बचतीचे उपाय सांगितले, तर डॉ. अनिल कांबळे यांनी मृदा व जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले.

या कार्यक्रमास पेठशिवनी व शिंगणापूर परिसरातील सुमारे ७० शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्ता पाटील, डॉ. विशाल इंगळे आणि डॉ. ओमकार गुप्ता यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसू निओटेक कंपनीचे सभासद, कंपनीचे संचालक श्री. संभाजी शिराळे तसेच गावातील मान्यवर श्री. मंचकराव शिंगारे, श्री. प्रेमनारायण शेटे आणि श्री. गुरव यांनी विशेष सहकार्य केले.





कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट; ड्रोन प्रशिक्षण केंद्र व AI3C प्रकल्पाची पाहणी

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयास दिनांक १९ जून २०२६ रोजी भेट देऊन महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, संशोधन तसेच पायाभूत सुविधांची पाहणी केली.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित AI3C (Artificial Intelligence Innovation and Incubation Centre) प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा व इतर सुविधांची पाहणी कुलगुरूंनी प्रकल्प प्रमुख तथा कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या समवेत केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) अर्थात ड्रोन प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन तेथील कार्यपद्धती आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. ड्रोन प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी डॉ. विशाल इंगळे यांनी नुकतीच एनसीसी इंडिया (NCC India) च्या नागपूर विभागाच्या विंग कमांडर राधिका मॅडम व त्यांच्या पथकाने विद्यापीठातील ड्रोन प्रशिक्षण केंद्राला दिलेल्या भेटीची माहिती दिली. तसेच भविष्यात एनसीसी कॅडेट्सना ड्रोन प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावित उपक्रमाबाबत सविस्तर माहिती माननीय कुलगुरूंना सादर करण्यात आली.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत संशोधन, अध्यापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयासाठी शासनाकडून नुकत्याच मंजूर झालेल्या आकृतीबंधासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ, नवीन पदनिर्मिती तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.

माननीय कुलगुरूंच्या या भेटीमुळे महाविद्यालयातील विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून संशोधन, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष आधारित उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरण सोहळा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात थेट प्रक्षेपण

 


भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते दिनांक २० जून २०२६ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” (PM-Kisan) योजनेच्या २३ व्या हप्त्याचे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना पश्चिम बंगालमधील हुगळी येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाद्वारे देशभरातील ९ कोटी ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा सन्मान निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाचा लाभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांनी थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, नियंत्रक श्री अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल घंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, पीएम-किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत मिळणारी दोन हजार रुपयांची रक्कम ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. या निधीची अनेक शेतकऱ्यांना मोठी उपयुक्तता असून त्यांच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, पुढील पिढीला सुदृढ व पिकांसाठी पोषक जमीन उपलब्ध व्हावी या उद्देशाने खेत बचाओ अभियान’ राबविले जात आहे.

या अभियानात विद्यापीठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून सेंद्रिय घटकांचा वापर वाढविण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच बदलत्या हवामान परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अकस्मित पीक नियोजनाबाबतही मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा घेताना सांगितले की, ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माननीय कुलगुरूंसह विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करतात. तसेच आठवड्यातील प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ऑनलाइन संवाद कार्यक्रम आयोजित केला जातो.

या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधानकारक निरसन केले जाते. यासोबतच शेतकरी-शेतकरी संवाद’ या संकल्पनेवरही विशेष भर दिला जातो. विद्यापीठाच्या नियमित विस्तार कार्याची माहिती देताना त्यांनी नमूद केले की, मागील चार वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधत महाराष्ट्रात अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृतीमध्ये अ’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा अधिक उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात औंढा येथील प्रगतशील शेतकरी श्री रामेश्वर मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त करत शास्त्रज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहनाची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील १३० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी विद्यापीठाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव, डॉ. गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख तसेच विस्तार शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहुल औंधकर यांनी केले. यावेळी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, डॉ. संतोष फुलारी यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Friday, June 19, 2026

वनामकृविद्वारा एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती तयारीसंदर्भात विभागीय कार्यशाळेचे आयोजन

 एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप नियोजनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पेरणी करावी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




यंदाच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचे योग्य नियोजन व तयारी याबाबत शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांना मार्गदर्शन  करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या पुढाकाराने विभागीय स्तरावरील एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे दिनांक १९ जून २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. तसेच संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे आणि हैदराबाद येथील प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एस. प्रसाद यांची प्रमुख उपस्थित होती. 

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, असे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, या खरीप हंगामात पाण्याचा काटेकोर व आर्थिकदृष्ट्या विचारपूर्वक वापर करणे अत्यंत आवश्यक असून यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. राष्ट्रीय स्तरावर एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पर्जन्यमानात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अतिवृष्टी, अल्पवृष्टी किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. विद्यापीठ तसेच भारतीय हवामान विभागाच्या सूचनांनुसारच पेरणीचा निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील विविध भागांनुसार पीक रचना वेगवेगळी असल्याने स्थानिक परिस्थितीनुसार पीक पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. विशेषतः कमी पाणी लागणारी, कमी कालावधीची आणि पाण्याचा ताण सहन करणारी पिके निवडावीत. तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक जोखीम कमी करता येते.

माननीय कुलगुरूंनी सांगितले की, सध्याची हवामान परिस्थिती ही नवीन सामान्य (न्यू नॉर्मल) बनत असून त्याला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती प्रभावी माध्यम ठरू शकते. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असून केंद्र शासनाचे “खेती बचाव अभियान” प्रभावीपणे सुरू आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी सर्व विभागांनी समन्वयाने करावी. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी कमीत कमी नुकसान कसे होईल यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपत्कालीन पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात सोयाबीन + तूर तसेच सोयाबीन + कापूस या आंतरपीक पद्धती लाभदायक ठरू शकतात. रुंद सरी-वरंबा पद्धती पाण्याचे नियोजन करण्यासाठी अत्यंत प्रभावी असून स्मार्ट सिंचन पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे. शेततळे, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन व तुषार सिंचनाच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्राची क्षमता तिप्पट वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, पावसाचा अचूक अंदाज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. या परिस्थितीतही चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही शास्त्रज्ञांचे प्रमुख कार्य असून कोणत्याही औपचारिक परवानगीची वाट न पाहता आवश्यकतेनुसार तातडीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सुचविले.

डॉ. भगवान असेवार यांनी कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी आंतरपीक पद्धती, विहीर पुनर्भरण, योग्य वाणांची निवड आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम केला पाहिजे असे सांगितले.

विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर योग्य तंत्रज्ञान शेतकरी बंधू भगिनी यांना उपलब्ध करून देणे  आणि योग्य अंमलबजावणी साठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पावसाच्या आगमनानुसार पिकांची निवड, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि शेततळे तंत्रज्ञान व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर द्यावा लागेल. यादृष्टीने दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील. असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आयोजना मागील पार्श्वभूमी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य  शास्त्रज्ञ  डॉ. आनंद गोरे यांनी मांडली.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक पाटील, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अरविंद पांडागळे, प्रा. किशोर जगताप, डॉ.आनंद गोरे, डॉ. सुनील उमाटे,डॉ. गजेंद्र  जगताप, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. एम. आर. मोरे,  डॉ. दीप्ती पाटगावकर, तसेच जालना कृषी विकास अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, डॉ. गायकवाड, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. सचिन मंडलिक आणि प्रा. पंडित वासरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभाग अधिकारी यांनी अनेक समस्या उपस्थित केल्या त्यावर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून कोरडवाहू शेतीतील पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आनंद  गोरे आणि डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, विभागीय कृषी विस्तार यंत्रणेतील शास्त्रज्ञ, विविध विषयांचे तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी असे शंभरहून अधिक कृषि विभाग अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठ शास्त्रज्ञ  उपस्थित होते.






Thursday, June 18, 2026

‘शेतकरी देवो भवः’ भावनेतून संशोधन व तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प येथे दिनांक १८ जून २०२६ रोजी ७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक’ ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले.

या बैठकीस संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. संजय पाटील, श्री. दीपक गवळी हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेश तीर्थंकर (लातूर), विद्यापीठातील विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विस्तार कृषि विद्यावेत्ते ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी देवो भवः” ही भावना मांडत विद्यापीठाच्या संशोधन व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान शिफारशी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात कपात आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शनाची आज नितांत आवश्यकता आहे.

सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी, बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी, आंतरपिक पद्धतीचा अवलंब करावा, पाण्याचा कार्यक्षम वापर करावा तसेच चारा पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन माननीय कुलगुरुंनी केले.

पुढे त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, पुणे येथील कृषि परिषद आणि विविध विभागांमार्फत आयोजित बैठकीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची शिफारस सातत्याने केली जाते. शेतीच्या सर्वांगीण समृद्धीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या संस्थेने चांगले कार्य केल्यास इतर संस्थांनी त्याचा उपयोग करून आपले कार्य पुढे न्यावे, असे सांगत त्यांनी सहकार्याची भावना अधोरेखित केली. तसेच खेत बचाओ अभियान” अंतर्गत जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारत सरकारच्या पीएम प्रणाम’ योजनेचा प्रभावी प्रसार केला जात असून माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर आणि हिरवळीच्या खतांचा अवलंब केल्यास नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठी बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

या मोहिमेत कृषि विभाग, शेतकरी आणि विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकरी देवो भवः” ही भावना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी विद्यापीठ आणि इतर सर्व विभागांनी आपली ताकद ओळखून सहकार्यात्मक भावना, नवोपक्रमशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन एकत्र साधावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नमूद केले की, बायोमिक्स क्षेत्रात विद्यापीठाने उल्लेखनीय कार्य केले असून त्याचे विकेंद्रीकरण करून मराठवाड्यातील इतर केंद्रांपर्यंत ते पोहोचविण्याची आवश्यकता आहे. परभणीबरोबरच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर जिल्हा केंद्रांवर बायोमिक्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी बंधूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीतील चर्चेदरम्यान संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रत्याभरणावर उत्तरे दिली. तसेच भविष्यात या विषयांवर सखोल संशोधन करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रस्तावना सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी करत नमूद केले की, चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेतील शिफारशी तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत विभागामार्फत शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया संकलित केल्या जातात आणि त्यानुसार पुढील हंगामासाठी संशोधनाची दिशा निश्चित केली जाते. तसेच पिकांसंबंधित अडचणी समजून घेऊन हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठीही प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर) व श्री. महेश तीर्थंकर (लातूर) यांनी सादरीकरण करून शेतकऱ्यांचे प्रत्याभरण (feedbacks - प्रत्यक्ष अनुभव) मांडले. तसेच विभागासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली. त्यांनी खजूर, ॲव्होकॅडो, राजमा, ड्रॅगन फ्रूट, देशी कापूस, फळबाग लागवड यांसह विविध विषयांवर संशोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.

बैठकीत विविध विभागीय योजनांची माहिती, तांत्रिक सल्ला, हवामान आधारित पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन, बियाणे उपलब्धता, खत वापर मार्गदर्शन, जलसंधारण आणि शाश्वत शेती या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आशिष बागडे यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी डॉ. डी. एस. मुटकुळे, डॉ. दिलीप हिंगोले, श्री. ढगे, श्री. साळी, श्री. रामेश्वर ठोंबरे तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

वनामकृविद्वारा ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 एल निनोचा विचार करून योग्य पीक निवड केल्यास उत्पादनवाढ शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर खेत बचाओ अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानात स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर भर देण्यात येत असून, मातीचे आरोग्य जपणे, पाणी संवर्धन करणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, पर्यावरण संरक्षण करणे तसेच शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आपली शेती, आपले भविष्य – चला, एकत्र करूया संवर्धन” हा संदेश देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या अधिकारी तसेच शेतकरी यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

याच अभियानांतर्गत विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, एकात्मिक शेती पद्धतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजन करताना संभाव्य एल निनो परिस्थितीचा विचार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य पिकांची निवड करणे आवश्यक आहे. कमी पर्जन्यमान किंवा पावसातील अनिश्चिततेच्या परिस्थितीतही उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य द्यावे. तसेच कापूस पिकाची लागवड शिफारशीत तंत्रज्ञानानुसार करावी. विद्यापीठाने एल निनोच्या पार्श्वभूमीवर विविध पिकांसाठी विकसित केलेल्या पीक नियोजन सूत्रांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनवाढ साध्य करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यापीठ दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करीत असून, शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, योग्य लागवड अंतर, पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी शेंडा खुडणी, लागवडीपूर्वी खतांचे नियोजन, सुधारित वाणांचा वापर तसेच बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या शिफारशींचा अवलंब केल्यास तूर पिकाचे अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी खेत बचाओ अभियान” चे महत्त्व विशद करताना मातीचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच उत्पादनवाढीसाठी जैविक खतांच्या वापराचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी येत्या खरीप हंगामात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या दिसून येणाऱ्या भुंग्यांच्या व्यवस्थापनापासूनच हुमणी नियंत्रणाची सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच पीक संरक्षणासाठी आवश्यकतेनुसारच कीटकनाशकांची फवारणी करावी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास गावातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर यांच्या वतीने बीडीएन-७१६ या तूर वाणाच्या प्रात्यक्षिकासाठी निवडक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे सर्व सभासद तसेच संचालक श्री. दिलीप अंभोरे यांनी विशेष प्रयत्न केले.