Monday, August 31, 2026

वनामकृविच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्रास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची भेट

 चालू संशोधन कार्याचा आढावा घेऊन शास्त्रज्ञांना दिले मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाच्या बदनापूर (जि. जालना) येथील कृषि संशोधन केंद्रास भेट देऊन केंद्रामध्ये सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याचा आढावा घेतला तसेच प्रक्षेत्राची पाहणी केली.

यावेळी डॉ. आसेवार यांनी केंद्रावर सुरू असलेल्या विविध पिकांवरील संशोधन प्रयोगांची माहिती घेतली. संशोधन कार्य अधिक परिणामकारक व शेतकरीहिताभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित शास्त्रज्ञांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनीही केंद्रावरील संशोधन कार्याची पाहणी करून मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील यांनी केंद्रावर सुरू असलेल्या संशोधन उपक्रमांची माहिती दिली. केंद्रातील विविध संशोधन प्रकल्प, प्रक्षेत्रावरील प्रयोग तसेच आगामी संशोधन नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी कृषि संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते. 



Sunday, August 30, 2026

कृषि व जलसंवर्धनातील योगदानाबद्दल माननीय मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची मानद पदवी प्रदान

 


शेती, शाश्वत ग्रामीण विकास, जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा आणि शेतकरी कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करण्यात आली.

नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते या मानद पदवीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

शेती क्षेत्राचा विकास, शाश्वत ग्रामीण विकास, जलसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा आणि शेतकरी कल्याणासाठी माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विद्यापीठाच्या वतीने ११ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित २७व्या दीक्षांत समारंभात त्यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आज या पदवीचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले.

माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेती व शेतकरी विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले असून, अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ‘स्मार्ट प्रोजेक्ट’, ‘पोक्रा’ तसेच महाराष्ट्र कृषि एआय धोरणाच्या माध्यमातून राज्यातील कृषि क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे ‘महाॲग्री एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

यासोबतच ‘जलयुक्त शिवार अभियान’, शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांचा विस्तार, जलसंवर्धन, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजारपेठ सुधारणा आणि डिजिटल शेती अशा विविध उपक्रमांद्वारे राज्याच्या कृषि व ग्रामीण विकासाला चालना देण्यात आली आहे.

कृषि, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील या योगदानाची दखल घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने माननीय मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित केले.

‘एलआरआय मराठवाडा पोर्टल’साठी मृदा व भूमी संसाधनांच्या डिजिटल नकाशांकनावर भर

वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन; नागपूर येथील ICAR-NBSS&LUP येथे आंतरक्रियात्मक बैठक

प्रस्तावित एलआरआय मराठवाडा पोर्टल’ तसेच त्यासंबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद–राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (ICAR-NBSS&LUP), नागपूर येथे आज, दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी आंतरक्रियात्मक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी ICAR-NBSS&LUPचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. वासू (मृदा संसाधन अभ्यास विभाग), वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बेणुकांता दास (दूरसंवेदन अनुप्रयोग विभाग), शास्त्रज्ञ डॉ. सुनील बी. एच. (दूरसंवेदन अनुप्रयोग विभाग) तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर उपस्थित होते.

प्रस्तावित पोर्टलच्या माध्यमातून मृदा व भूमी संसाधनांशी संबंधित माहितीचे व्यवस्थापन, माहिती धोरण, माहितीची देवाणघेवाण, डेटा सामायिकरण आणि माहितीचे प्रभावी प्रसारण याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन केले.

डिजिटल मृदा नकाशांच्या निर्मितीमुळे मृदा संसाधनांची अचूक व अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात अचूक शेती, पिकांचे नियोजन, मृदा व्यवस्थापन आणि शाश्वत कृषि विकासासाठी प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे प्रस्तावित एलआरआय मराठवाडा पोर्टल’ हे मराठवाड्यातील मृदा व भूमी संसाधनांशी संबंधित माहितीच्या प्रभावी वापरासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

या पोर्टलच्या अनुषंगाने दूरसंवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या (Remote Sensing and GIS) माध्यमातून मृदा संसाधनांचे डिजिटल नकाशांकन करण्याचे कार्य सुरू आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कृषि रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या मृदाशास्त्र विभागातील पीएच.डी. विद्यार्थी धीरज कदम हे मराठवाडा विभागाचे डिजिटल मृदा नकाशे (Digital Soil Maps) तयार करण्याचे काम करीत आहेत.

या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) येथे आयोजित औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठाचे कृषि अभियांत्रिकीचे विद्यार्थी ऐश्वर्या एम. ए., गोपाल इंगळे आणि विद्या कचगुंडे सहभागी झाले आहेत.

या विद्यार्थ्यांना दूरसंवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल मृदा नकाशे तयार करण्याच्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. प्रशिक्षणादरम्यान मृदा सर्वेक्षण, मृदा संसाधनांचे नकाशांकन, दूरसंवेदन तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तसेच डिजिटल स्वरूपातील मृदा माहितीचे संकलन व विश्लेषण याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. मराठवाडा विभागातील डिजिटल मृदा नकाशांच्या निर्मितीसाठी या प्रशिक्षणाचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे.

या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील विद्यार्थीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध कृषि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना मृदा सर्वेक्षण, दूरसंवेदन आणि भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकत्रितपणे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.



Saturday, August 29, 2026

यूजीसी-नेट परीक्षेत वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

 ब्रताती दास असिस्टंट प्रोफेसर व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र; मानवी व पद्मश्री पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यूजीसी-नेट जून २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सामुदायिक विज्ञान विषयातील एम.एस्सी. अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. ब्रतती दास यांनी यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण होत असिस्टंट प्रोफेसर व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता प्राप्त केली आहे. तसेच कु. मानवी झा आणि कु. पद्मश्री उग्गीना यांनीदेखील यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण करून पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता मिळविली आहे.

या विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

For English

कृषि अभियांत्रिकीच्या मौखिक सादरीकरणात वनामकृविच्या विद्यार्थ्यांची बाजी

आयईआय–२०२६’ राष्ट्रीय अधिवेशनात सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन




डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, हवामान बदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्याचा ऱ्हास आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने आयोजित ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) – ३८वे राष्ट्रीय कृषि अभियंता अधिवेशन व राष्ट्रीय परिसंवाद’ छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे दिनांक २७ व २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाला. या राष्ट्रीय अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार पटकावून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ (Emerging Technologies in Agricultural Engineering for Sustainable and Climate-Resilient Development) ही परिसंवादाची मध्यवर्ती संकल्पना होती. देशभरातून सुमारे ५०० शेतकरी तसेच १०० संशोधक व प्राध्यापक या राष्ट्रीय परिसंवादात सहभागी झाले. विविध विषयांवर सुमारे १०० संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले.

द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) यांच्या सहकार्याने आयईआय महाराष्ट्र राज्य केंद्र आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्रात महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शाश्वत व हवामान बदलास अनुकूल विकासासाठी कृषि अभियांत्रिकीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष बीजभाषण (State-of-the-Art/Keynote Lecture) दिले.

सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार

राष्ट्रीय अधिवेशनातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधनाचे प्रभावी मौखिक सादरीकरण केल्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार (Best Oral Presentation Award) प्रदान करण्यात आले. यामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी दिनेश वसंतराव कदम, रीना बी. चौधरी, मंगेश मोहिते आणि सैनी, तर पदवीपूर्व विद्यार्थी स्नेहा शर्मा, पार्वती आणि आभा सिंग यांचा समावेश आहे.

या यशाबरोबरच वनामकृविच्या २५ हून अधिक संशोधकांनी संबंधित लेखक व सहलेखक म्हणून विविध संशोधन निबंधांमध्ये योगदान दिले. तसेच अधिवेशनातील उल्लेखनीय संशोधन व तांत्रिक योगदानाबद्दल विद्यापीठाशी संबंधित १८ संशोधकांचा गौरव करण्यात आला.

वनामकृविच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित अधिवेशनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच संबंधित अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व मार्गदर्शकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या राष्ट्रीय परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे ५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप केंद्र प्रमुख फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. गोपाल शिंदे यानी समन्वय व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर सहभाग नोंदविला. यातिल निवडक संशोधन प्रबंधांचे स्प्रिंजर (Springer) मधे प्रकाशित होतील.

मौखिक संशोधन लेख सदरीकरणात कृषि अभियांत्रिकी-महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. राहुल रामटेके. डॉ. सुमंत जाधव, डॉ. व्ही. के. विखे, डॉ. जयभाये , डॉ. पांडित मुंडे, सहायक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाटील, अभियंता विशाल काळबांडे, अभियंता गीता भूमरे, अनिश शहाणे, साक्षम पंडितकर, अभिषेक कदम, रामप्रसाद भांड व गांगुर्डे, तसेच मृदाशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ तथा कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच विस्तार शिक्षण तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे यांचा यांचा सहभाग होता

एमआयटी, छत्रपती-संभाजीनगरचे संचालक प्रा. डॉ. निलेश पाटील, अधिवेशनाचे निमंत्रक तथा प्राचार्य प्रा. (डॉ.) दीपक त्र्यंबक बोरनारे, प्रा. डॉ. नारायण गटकल, प्रा. प्रतीक पोद्दार आणि एमआयटीच्या संपूर्ण चमूने अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले त्या बद्दल सर्व मा कुलगुरु यानी अभिनंदन व आभार व्यक्त केले.























हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व संसाधन संवर्धनाची सांगड आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृवित ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ विषयावर अभिनव व्याख्यान

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. एस. भास्कर


नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन हे शाश्वत कृषी विकासाचे मूलभूत अंग असून, भविष्यातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संसाधन संवर्धन आणि हवामान-अनुकूल कृषी पद्धती यांचा प्रभावी समन्वय करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कृषिशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमी, परभणी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावर दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित अभिनव व्याख्यानात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख पाहुणे तथा वक्ते म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्लीचे माजी सहायक महासंचालक (कृषिशास्त्र, कृषिवनशास्त्र व हवामान बदल) डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य आणि कृषिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. एस. भास्कर म्हणाले की, हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता मृदा, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व कार्यक्षम वापर करून शाश्वत शेतीला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी हवामान-स्मार्ट कृषी तंत्रज्ञान तसेच संसाधन संवर्धनाच्या पद्धतींचा प्रभावी अवलंब करणे काळाची गरज आहे. त्यांनी हवामान बदलामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. तसेच मृदा व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर, संसाधनांची उत्पादकता वाढविणे आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृषी पद्धतींचा अवलंब याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हवामान-स्मार्ट व शाश्वत शेतीसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि संसाधन संवर्धन यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हे अभिनव व्याख्यान ज्ञानवर्धक आणि संवादात्मक ठरले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघा जगताप यांनी केले. शेवटी कृषिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. बी. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन आणि हवामान-अनुकूल शेतीबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे अभिनव व्याख्यान महत्त्वपूर्ण ठरले.







वनामकृवितील कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वितरण

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते वितरण; पाण्याचा कार्यक्षम वापर व शाश्वत शेतीवर भर


हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामानास अनुकूल करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप उपक्रमामध्ये निवड झालेल्या शेतकरी प्रतिनिधींना  दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी तुषार सिंचन संचांचे वितरण माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे माजी सहाय्यक संचालक डॉ. एस. भास्कर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. प्रवीण वैद्य, कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्रभारी अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ असून, शेतकऱ्यांच्या गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संशोधन होणे आवश्यक आहे.” हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चाच्या, स्थानिक परिस्थितीला अनुकूल आणि शेतकऱ्यांना सहज स्वीकारता येतील अशा तंत्रज्ञानांच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे.

विकसित तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करण्यासाठी ‘शेतकरी ते शेतकरी’ संवाद वाढविणे आवश्यक असून, तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये शेतकरी दूत आणि कृषी मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक प्रभावीपणे होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कार्यक्षम आणि काटेकोर वापर ही काळाची गरज असून, पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. उपलब्ध संसाधनांचा काटेकोर वापर हाच शाश्वत शेतीचा आधार असल्याचे स्पष्ट करून, गरजेनुसार खतांचा वापर, शेततळे व इतर उपलब्ध जलस्रोतांतील पाण्याचा कार्यक्षम वापर, सौरऊर्जेचा अवलंब आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘त्रिशूल’ तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. एस. भास्कर यांनी हवामान बदल ही व्यापक आणि बहुआयामी संकल्पना असल्याचे सांगून, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन तसेच अल्पकालीन उपाययोजनांचा समन्वयाने अवलंब करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. शेती आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, आवश्यक सुविधा आणि प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार यांनी मृदा व जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोरडवाहू शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब कार्यक्षमतेने वापरणे आवश्यक असून, जलसंधारणासोबतच आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याची उत्पादकता वाढविता येईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी हवामान बदलानुरूप उपक्रमाची उद्दिष्टे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाधारित प्रसाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापूस संशोधन केंद्राच्या प्रभारी अधिकारी डॉ. मेघा जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत जाधव यांनी केले.

हवामान बदलानुरूप उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील सोन्ना आणि बाभुळगाव येथील अनुसूचित प्रवर्गातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते तुषार सिंचन संचांचे वितरण करण्यात आले. यामध्ये श्री. दिलीप टोंगराज, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. अन्सीराम वाव्हळे, श्री. आवडाजी गमे, श्री. अशोक कांबळे, श्री. सुधाकर वाव्हळे, श्री. गौतम वाव्हळे, श्री. मधुकर वाव्हळे, श्री. रामकिशन वाव्हळे, श्री. लक्ष्मण उबाळे आणि श्री. तुळशीराम टोंगराज यांचा समावेश होता.

कार्यक्रमानंतर शेतकरी प्रतिनिधींनी अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन व बीजोत्पादन प्रक्षेत्रास भेट देऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. यावेळी पावसाच्या खंडाच्या काळात पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना, पिकांची पाण्याची गरज, उपलब्ध ओलाव्याचे व्यवस्थापन, तुषार सिंचनाचा कार्यक्षम वापर, मृदा व जलसंधारण तसेच हवामान बदलाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. आनंद गोरे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. पपीता गौरखेडे, श्री. सुरेश खटिंग आणि श्री. रिठे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.

हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना पाणी वाचवा, संसाधने जपा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोरडवाहू शेती अधिक सक्षम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.








Friday, August 28, 2026

रक्षाबंधनानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद

 सण-उत्सवांच्या काळात वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधण्याचे माननीय कुलगुरूंचे आवाहन



रक्षाबंधनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी संवाद साधला. सण-उत्सवांच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी आपल्या घरी जात असताना वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना आपण घरापासून दूर आहोत, अशी भावना निर्माण होऊ नये, यासाठी अशा प्रसंगी विद्यार्थ्यांशी आवर्जून संवाद साधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी व संबंधितांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करण्यापेक्षा आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीची, संस्कारांची आणि मूल्यांची जोपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृतीतील उत्तम विचार माणुसकीची शिकवण देतात. तसेच जीवनात विनम्रता कायम ठेवून इतरांप्रती कृतज्ञतेची भावना विकसित करण्यास मदत करतात, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या अंगी असलेल्या विविध छंदांची जोपासना करण्याचे आवाहन केले. विविध राज्यांतून विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. विविध भाषांचे आदान-प्रदान झाल्यास एकमेकांची संस्कृती, विचार आणि परंपरा समजून घेण्यास मदत होते, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.

विद्यापीठात शिक्षण घेत असताना उपलब्ध असलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा, नवनवीन प्रयोगशाळांचा तसेच अत्याधुनिक उपकरणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. या सुविधांचा प्रभावी वापर करून आपल्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा साधावी, असे आवाहनही माननीय कुलगुरूंनी केले.

विद्यार्थ्यांना येणारे विविध अनुभव, संशोधनासंदर्भातील त्यांच्या नवीन कल्पना तसेच त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आणि सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सूचनांचे स्वागत करून त्यांचा सकारात्मक विचार करावा व योग्य सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी विद्यापीठातील सर्व अधिकारी व संबंधितांना केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व मार्गदर्शकांप्रती आदराची भावना ठेवून त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्याद्वारे आपले कौशल्य, ज्ञान आणि नैपुण्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, अधीक्षक डॉ. मिलिंद सोनकांबळे तसेच उपस्थित अधिकारी यांना राखी बांधून त्यांचे आशीर्वाद घेतले. वसतिगृहाच्या सहायक अधीक्षिका डॉ. गोदावरी पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला. यावेळी वसतिगृहातील सर्व विद्यार्थीनी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कु. ऋतुजा हिने भजन सादर केले. तसेच कु. निशा आणि कु. रिषिता यांनी वसतिगृहातील मागील दोन वर्षांतील आपल्या अनुभवांचे कथन करत वसतिगृह व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले. रक्षाबंधनाच्या या स्नेहपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.