Thursday, June 11, 2026

वनामकृविच्या ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमासह ‘खेती बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविले

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह ११ चमूंनी मराठवाडाभर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन आयोजित केला जातो. यावेळी या उपक्रमासोबतच केंद्र शासन पुरस्कृतखेती बचाओ अभियान” देखील प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन केंद्रे, कृषि व संलग्न महाविद्यालये, विस्तार शिक्षण केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे तसेच कृषि विभागाच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत दिनांक १० जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या ११ चमूंच्या माध्यमातून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विद्यापीठाचे २५ शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाचे १४ अधिकारी-कर्मचारी यांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ४७० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने मौजे खांबेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे व डॉ. दिगंबर पटाईत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनीखेती बचाओ अभियान” चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अवशेष उत्पादित धान्यामध्ये राहून नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, पेरणीची घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी शेती करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा. विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या वाणांचा, विविध तंत्रज्ञानांचा, बीजप्रक्रिया तसेच बायोमिक्स, रायझोबियम आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस निश्चितच मदत होईल.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये खरीपातील कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मातीचे आरोग्य तसेच यावर्षीच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पीक नियोजन व व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाचे अनियमित वितरण, पावसास होणारा उशीर, पावसातील खंड आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य पीक निवड, कमी कालावधीच्या वाणांचा वापर, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, मृदा व जलसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच रुंद वरंबा-सरी (Broad Bed and Furrow - BBF) पद्धतीचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा सुलभ होतो, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, मुळांची वाढ चांगली होते तसेच पिकांची वाढ आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते. बदलत्या हवामान परिस्थितीत ही पद्धत कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सेंद्रिय खते व जीवाणू खतांचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि महाविद्यालय (लातूर), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालय, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई व परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, खामगाव व तुळजापूर), एकात्मिक शेती पद्धती, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. आनंद गोरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. टी. बी. सुरपाम, डॉ. गणेश मंडलिक, डॉ. एफ. आर. तडवी, डॉ. एस. आर. धांडगे, श्री. अरबाड बी. के., श्री. मधुकर मांडगे, श्री. एस. आर. रोडे, कृषि विज्ञान केंद्र, दिघोळअंबा (अंबाजोगाई) येथील प्रा. नरेंद्र जोशी, श्री. जाधव तसेच कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.




















वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची रॉयल फर्टिलायझर्स अँड केमिकल्समध्ये निवड.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सेलच्या वतीने दिनांक ४ मे २०२६ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीत रॉयल फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये कृषि महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची विक्री अधिकारी (Sales Officer) पदासाठी अंतिम निवड करण्यात आली. त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

ही संपूर्ण निवड प्रक्रिया विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली.

मुलाखत प्रक्रियेस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश सावगावे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक श्री. शेख सुरज, विक्री अधिकारी श्री. रामभाऊ पवार तसेच श्री. सय्यद जुबैर उपस्थित होते. या निवड प्रक्रियेत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. गुणवत्ता, संवादकौशल्य आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारे अंतिम निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कनिष्क गायकवाड, चंद्रशेखर खुनेवाड, केदार परातकर, कृष्णकांत पोतदार, मोहन फुलवारे, रोहित चव्हाण आणि संकेत दळवी यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांची विक्री अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या गुणवत्ता, कौशल्य आणि कार्यक्षमतेच्या आधारे करण्यात आली आहे. या यशस्वी निवड प्रक्रियेत प्लेसमेंट सेलच्या सदस्य सचिव डॉ. अनुराधा लाड तसेच संपूर्ण टीमचे विशेष योगदान लाभले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी अभिनंदन केले. या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास चालना मिळाली आहे.


Wednesday, June 10, 2026

राज्य शासनाकडून वनामकृविसह चारही कृषि विद्यापीठांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता

 पदरचना पुनर्रचनेमुळे विद्यापीठाच्या विकासाला नवी दिशा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पदुम विभागाने राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या आस्थापनेवरील पूर्वीच्या ७३५ नियमित पदांमध्ये वाढ करून ८९० नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या ४५ पदांसह एकूण ९३५ पदांचा समावेश करण्यात आला आहे. हा शासन निर्णय १० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे माननीय प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आकृतिबंधासंदर्भातील आवश्यक माहिती वेळोवेळी शासनास सादर केली.

माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीने २० मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली होती. त्यानुसार शासनाने गट-अ व गट-ब संवर्गातील नियमित ३६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता दिली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे आभार मानले. ते म्हणाले की, या निर्णयामुळे विद्यापीठातील अध्यापन, संशोधन, विस्तार शिक्षण व प्रशासकीय कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असून मनुष्यबळ नियोजनाला बळकटी मिळणार आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये आवश्यकतेनुसार पदरचना सुसंगत करण्यात येणार असल्याने शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गट-क व गट-ड संवर्गातील नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असून त्यासंदर्भातील आदेश नंतर निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.




Monday, June 8, 2026

वनामकृविच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ६ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाचे सहाय्यक वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव व डॉ. किशोर कौसाडीकर तसेच कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्या, वसतिगृहातील सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या सूचना, समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली, आत्मविश्वास वृद्धी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक आणि सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या एसआरएफ व नेट परीक्षांच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच या परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट रँक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी केले.

नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवचैतन्य व प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Sunday, June 7, 2026

भारतीय कृषि विद्या सोसायटीत वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशकपदी नियुक्ती

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन


भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) माननीय महासंचालक तथा कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव डॉ. मांगीलाल जाट यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्या सोसायटीच्या (Indian Society of Agronomy) कार्यकारी समितीची बैठक दिनांक ३० मे २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत द्वैवार्षिक कालावधी २०२६–२०२७ साठी विविध राज्यांच्या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशक (Councillor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख यांनी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

देशातील विविध राज्यांमध्ये कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. भगवान आसेवार यांच्या नियुक्तीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच मराठवाड्यातील कृषि क्षेत्राच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठ परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

“माँ, माटी और जमीन” संकल्पनेतून रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाद्वारा सावरगाव येथे खेत बचाव अभियानांतर्गत भव्य कृषि मेळावा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे - RAWE), राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यापीठाचे रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी “खेत बचाव अभियानांतर्गत” कृषि मेळाव्याचे आयोजन दिनांक ०६ जून २०२६ रोजी सावरगाव खु. ता. मानवत, जि. परभणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला ३५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि सावरगाव गावचे सरपंच श्री. गजानन घाटुळ उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती झाडे, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. संदीप शिंदे व प्रा. धनंजय मोहड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रभारी अधिकारी डॉ. धीरज कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगावकर, डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान, कृषि सहाय्यक श्री. नारायण पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. माणिकराव सोन्नेकर, श्री. परमेश्वर नाना घाटुळ, श्री. आबासाहेब घाटुळ, श्री. संतोष सावते, श्री. अर्जुन घाटुळ व श्री. बबनराव गव्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच RAWE अंतर्गत गावामध्ये कार्यरत असलेले ४० विद्यार्थीही कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अंश उत्पादित धान्यामध्ये राहतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. “माँ, माटी और जमीन” या संकल्पनेनुसार शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी FFF (Fertilizer, Fuel, Foreign Currency) या सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले. या सूत्रानुसार खते, इंधन व परकीय चलनाचा वापर काटेकोरपणे आणि योग्य प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुंद वरंबा-सरी पद्धत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अतिवृष्टीच्या परिस्थितीत पाण्याचा निचरा होतो, तर दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच शक्यतो दरवर्षी शेतीची नांगरणी न करता ३ ते ४ वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करावी. सरळवाण्यामध्ये बियाण्यांची साठवण करून त्यांचा पेरणीसाठी वापर करावा. या पद्धतींचा अवलंब केल्यास पेरणी खर्चात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊन प्रति एकर ३ ते ४ क्विंटल उत्पादनवाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी माती परीक्षण करूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा तसेच गांडूळ खत व शेणखत यांसारख्या जैविक खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन केले. शेतीतील लागवड खर्च, उत्पादन व इतर बाबींची दैनंदिन नोंद ठेवावी तसेच पावसाच्या अंदाजानुसार पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

सावरगाव खु. व मंगरुळ या गावांमध्ये रावे अंतर्गत कार्यरत असलेल्या ४० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. हे विद्यार्थी संबंधित गावांमध्ये पूर्णवेळ वास्तव्यास राहून शेतीविषयक अभ्यास करतात व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान तसेच तुती पीक उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि कन्या स्नेहा थोरात व मनिषा सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मकरंद भोगावकर यांनी केले.











Saturday, June 6, 2026

वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवादात ‘१० ड्रम थिअरी’द्वारे नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून संवादाचा १०१ व्या भागाचे यशस्वी आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी आभासी माध्यमाद्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाच्या १०१ व्या भागाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आणि प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. एस. बी. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमात हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील श्रमनिष्ठा जैव-निविष्ठा संसाधन केंद्राचे प्रमुख तथा “बायोचार” विषयावरील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. शरद पवार यांनी नैसर्गिक शेतीसाठी “१० ड्रम थिअरी” या विषयावरील यशोगाथा सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. संदीप देशमुख यांनी श्री. शरद पवार यांच्या शेतीतील नाविन्यपूर्ण जैव-निविष्ठा संसाधन केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर पिकांवरील विविध कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास डॉ. तुकाराम मोटे, माजी विभागीय कृषि सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. मोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यासाठी प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा तयार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या ऑनलाईन कार्यक्रमात एकूण ५७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. नैसर्गिक शेतीतील जैव-निविष्ठांचे महत्त्व, बायोचार निर्मिती व त्याचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. बेद्रे एस. बी. यांनी केले.






वनामकृविच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ५ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाच्या सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील, कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे हेही उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन दिनचर्या तसेच वसतिगृहातील विविध सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींची माहिती जाणून घेतली. विद्यार्थिनींनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडल्या.

यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू व सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





वसमतला ‘करवंद नगरी’ बनविण्यासाठी वनामकृविचा पुढाकार : अन्न तंत्र महाविद्यालयात करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन चर्चासत्र उत्साहात संपन्न

 करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी समन्वय आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्न तंत्र महाविद्यालयात “करवंद प्रक्रिया आणि मूल्यवर्धन” या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक ४ जून २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. यावेळी परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसमत तालुक्यातील करवंद उत्पादक शेतकरी, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि अन्न तंत्र महाविद्यालय यांनी समन्वयाने कार्य करून करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या करवंद या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या फळाचे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग केल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. भविष्यात वसमत तालुक्याची ओळख “करवंद नगरी” म्हणून राज्यभर निर्माण व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी हवामान बदल आणि सध्या जगासमोर उभ्या असलेल्या ‘एल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानानुरूप शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. जलसंधारण, मृदसंवर्धन, अधिकाधिक वृक्षलागवड आणि जैविक तसेच सेंद्रिय शेतीचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे आवश्यक असून “खेती बचाओ अभियान” हे पर्यावरण संरक्षण, मातीची सुपीकता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी करवंद लागवडीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याच्या संधी तसेच प्रक्रियेद्वारे नफा वाढविण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. केदार खटिंग यांनी करवंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती व मूल्यवर्धन क्षेत्रात अन्न तंत्र महाविद्यालयाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. चर्चासत्रातील तांत्रिक सत्रात उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी करवंद लागवडीचे तंत्र आणि त्यामधील आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेत उपस्थित करवंद उत्पादक शेतकरी श्री. साखरे यांनी करवंद प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रक्रियायुक्त पदार्थांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने व्यापक जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच परिपक्व करवंद फळांच्या काढणीसाठी विद्यापीठाने विशेष काढणी यंत्र विकसित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून एकमुखाने करण्यात आली.

यावेळी करवंद लागवड व प्रक्रिया उद्योगातील प्रगतिशील शेतकरी श्री. सदाशिव अडकिने यांनी करवंद प्रक्रिया उद्योग उभारणीतील प्रत्यक्ष अडचणी तसेच उद्योग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.

चर्चासत्राच्या समन्वयक अधिकारी डॉ. अनुप्रिता जोशी यांनी करवंद प्रक्रिया व त्यापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित पदार्थांबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

विभाग प्रमुख डॉ. के. एस. गाडे यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीसाठी आवश्यक परवाने, गुणवत्ता चाचणी तसेच उत्पादनांच्या टिकवणक्षमतेबाबत सविस्तर विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अनुप्रिता जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. बी. एस. आगरकर तसेच इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि वसमत तालुक्यातील करवंद लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.