Wednesday, May 18, 2022

शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे .... कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी

वनामकृवित आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

मेळाव्‍यात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला 

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी 
अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले

देश कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी बांधवाच्‍या परिश्रमातुन अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. देशाने अन्‍नधान्‍य उत्‍पादनात उच्‍चांक गाठला. परंतु शेतकरी बांधवाच्‍या उत्‍पन्‍नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. शेतक-यांपेक्षा शेतमालाचा व्‍यापारी मोठे होत आहेत, शेतकरी कुटुबांतीलच एखादी तरी व्‍यक्‍ती शेतमाल व्‍यापारी झाली पाहिजे. आज युवा पिढी शेती व्‍यवसायाकडे येत नाही. शेती करणा-या युवकांना समाजात मानाचे स्‍थान दिले जात नाही. शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्‍याची गरज असल्‍याचे  प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तसेच राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी जयंती निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी रेणवसिध्‍द लामतुरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी कुलगुरू डॉ सुभाष पुरी पुढे म्‍हणाले की, आज देशातील गोदामे अन्‍नधान्‍याने भरली असल्‍याने देशात शांती आहे. अन्‍यथा श्रीलंके सारखी स्थिती झाली असती. श्रीलंकेत कोणताही विचार न करता रासायनिक खत व औषधावर बंदी करून सेंद्रीय शेती करण्‍याचे बंधन शेतक-यांवर लादले, तेथे अन्‍नधान्‍याची मोठी कमतरता नि‍र्माण झाली. सेंद्रीय शेतीचे धोरण अभ्‍यासपुर्णपणे राबविण्‍याची गरज आहे. शेती निविष्‍ठाच्‍या दरात मोठी वाढ होत असुन उत्‍पादन खर्च वाढत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे, यावर संशोधनाच्‍या आधारे मार्ग काढावे लागतील.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले म्‍हणाले की, कृषि तंत्रज्ञानाने देशात हरित क्रांती व धवल क्रांती झाली. परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांचे अनेक वाण विकसित केले असुन अनेक तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांना दिला आहेत. मागील पन्‍नास वर्षात मराठवाडयातील कृषी विकासात विद्यापीठाााचे भरीव असे योगदान आहे. विद्यापीठावर शेतकरी बांधवांचा मोठा विश्‍वास आहे. विद्यापीठातील पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्‍त प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांची पदे रिक्‍त असुन दर्जेदार कृषि शिक्षण व संशोधना करिता विद्यापीठातील ही पदे भरणे गरजेचे आहे. करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीतही शेती व शेतकरी थांबला नाही, कोठेही शेतमालाचा तुटवडा जाणवला नाही की शेतमालाची भाव वाढ झाली नाही. शेतकरीही करोना योध्‍दा प्रमाणे अविरत काम करत होता, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मनोगतात प्रगतशील शेतकरी अभिमान आवचर म्‍हणाले की, शेतकरी बांधवाचा कृषी विद्यापीठावर मोठा विश्‍वास असुन शेतीतील शाश्‍वत उत्‍पादन वाढीचे तंत्रज्ञान विद्यापीठानेच  शेतक-यांना दिले आहे.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्‍ये प्रचलित असुन मराठवाडयात सोयाबीन व तुर पिकांच्‍या वाणाची मोठी लागवड केली जाते. बदलत्‍या हवामानात आंतरपिक पध्‍दती, एकात्मिक किड - रोग व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात विविध विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद दिला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुनिता पवार, डॉ प्रितम भुतडा, डॉ अरूण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्‍तारक, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मेळाव्‍यात पुढील शासन पुरस्‍कार प्राप्‍त शेतीनिष्‍ठ शेतकरी बांधवाचा सत्‍कार करण्‍यात आला.

रावसाहेब ढगे (शिरसवाडी ता जि जालना), दत्‍तात्रय जाधव (उदंडवडगाव पो. मोरगाव ता जि बीड), नानासाहेब गायके (मु सुलातनाबाद ता गंगापुर जि औरंगाबाद), तात्‍यासाहेब गोरे (मुपो आंरगाव ता भुम जि उस्‍मानाबाद), सिकंदर जाधव (मु. जळगाव फेरण चिकलठाणा ताजि औरंगाबाद), सतिश खडके (मुपो वाघोली वरूड ता जि उस्‍मानाबाद), श्रीमती मेघाताई देशमुख (झरी), दिनकर पाटील (लातुर रोड), बालचंद्र घुनावत (मु पो लाखेगाव, पैठण), मल्लिकार्जुन सोनावणे (मु झरेगाव, ता जि उस्‍मानाबाद), अभिमान आवचर (वडवाडी, बोरखेड, बीड), प्रल्‍हाद गवारे (चिंचवडगाव वडवणी, बीड), पंजाबराव हारे (जवळगाव, अंबाजोगाई बीड), ओमकार मसकल्‍ले (महादेववाडी, देवणी, लातुर), मुरलीधर नागटिळक (मुरूड, लातुर), निवृत्‍ती दिडोरे (औरंगपुर, औरंगाबाद), सुचिता सिगारे (खेडगांव अंबड), चौरंगनाथ वाघमोडे (शिराळा, परंड), नागनाथ पाटील (लिंबाळवाडी नळगांव, चाकुर), आण्‍णसाहेब जगताप (सावरगांव, माजलगांव), अंबादास बनसोड (धावडा आमठाणा, औरंगाबाद), दत्‍तात्रय कदम (दहामदरी अर्धापुर), देवराव शिंदे (मुरसुल पुर्णा), राजेश इंगळे (माटेगाव कसाबखेडा, कन्‍नड), प्रभावती लामतुरे (तेर, उस्‍मानाबाद), सुदाम शिरवत (मुलानी वाडगाव पैठण), धोडीराम सुपारे (टाकळगाव देवगाव हदगांव), अभयकुमार काळुंके (रायपुर परतुर), प्रताप काळे (धानोरा काळे, पुर्णा), कृषी सहाय्यक वसंत कातबने आदींचा सत्‍कार करण्‍यात आला.

मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर
कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर

जैविक रोग व्‍यवस्‍थापन घडीपत्रिकेचे विमोचन करतांना