Friday, February 17, 2023

जमिनीत अन्‍नद्रव्‍याची तुट भरून काढणे गरजेचे ........ डॉ. बी पी भास्कर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा-परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी नागपुर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. बी.पी. भास्कर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य आदीची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इंन्‍द्र मणि म्‍हणाले की, देश – विदेशातील अनेक संस्‍था सोबत परभणी कृषी विद्यापीठ जोडले जात असुन नुकतेच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांना भेटी देऊन सहयोगी संशोधन करण्‍याचे निश्चित झाले आहे. अनेक भारतीय शास्‍त्रज्ञ अमेरिकेतील विद्यापीठात चांगल्‍या पदावर असुन याचाही लाभ भारतीय विद्यार्थ्‍यांना होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षण व संशोधनास महत्‍व दिले आहे. माती हा थेट पिकांच्‍या उत्‍पादनाशी महत्‍वाचा घटक आहे. मातीच्या प्रकारानुसार योग्‍य पिकांची निवड करणे गरजेचे आहे. याकरिता विद्यापीठानी नागपुर येथील राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्‍थेशी सामंजस्‍य करार केला, असल्‍याचे ते म्‍हणाले.

व्‍याख्‍यानात संचालक डॉ. बी. पी. भास्कर म्‍हणाले की, मानवी आरोग्‍य हे मातीच्‍या आरोग्‍यशी निगडीत असुन दिवसेंदिवस मातीचे आरोग्‍य खालावत आहे. पिक उत्‍पादन कर‍तांना जमिनीतील विविध अन्‍नद्रव्‍याचा उपसा आणि शेतकरी बांधव विविध अन्‍नद्रव्‍याचा करिता असलेला पुरवठा यांच्‍यातील संतुलन बिघडत आहे, शाश्‍वत शेतीकरिता ही अन्‍नद्रव्‍याची तुट भरून काढणे अत्‍यंत गरजेचे आहे. मातीच्‍या आरोग्‍याविषयी जागृती करण्‍याची आवश्‍यकता असुन मातीचा कार्यक्षम वापराबाबत अधिक संशोधन करून मातीनुसार पिक पध्‍दती, स्‍थाननिहाय योग्‍य अन्‍नद्रव्‍यांचा वापर यावर भर दयावा लागेल, असे ते म्‍हणाले. 

प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. प्रविण वैद्य यांनी भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणी यांच्या वतीने शेतकरी, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी यांच्यासाठी माहितीपुर्ण व्याख्याने नियमित आयोजीत केली जातात असे नमूद करून याचा पदव्युत्तर संशोधन होत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ भाग्यरेषा गजभिये  यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. स्वाती झाडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री. भानुदास इंगोले, श्री. आनंद नंदनवरे, श्री. शिरीष गोरे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रिया सत्वधर, शुभांगी अवटे, श्री. बुद्धभुषण वानखेडे, रामप्रसाद, चेतन जोंधळे आदीसह कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍यने उपस्थित होते.